सोमवार, १६ नोव्हेंबर, २०२०

दिवाळी...

उगवले नारायण सवे सोनियाचा दिन 

दिवाळीच्या शुभ मुहूर्ती जोडी पाडवा-भाऊबिज
॥१॥

पाडवा देतसे देतसे जन्मदात्याची गं सय 

ओढ माहेराच्या गं भेटीची तव होई अनावर ॥२॥

लेकीच्या शिरावर 
थरथरे गं आशिर्वादाचा हात 

लेक होतसे हळवी
हळवी मायेच्या गं त्या स्पर्शानं ॥३॥

पाडव्याचा योग आणतसे जोडीदारा औक्षवण 

त्याच्या नजरेतील कौतूक गं देई जगण्याची उमेद ॥ ४॥

माझ्या आयुष्याचा साथीदार होवो उदंड आयुष्यवंत ॥४॥

देवाकडे माझं आज गं मागणं एवढंच 

सौभाग्याचं लेणं असो भाळी माझ्या गं अखंड 
॥५॥

पाडव्याच्या हाती हात घेऊनी आली आली गं भाऊबिज

भावाच्या मायेला सदा आसुसलेली गं बहिण ॥६॥

 बघूनी भावाचे वैभव होई तिला गं अभिमान 

त्याच्या कर्तृत्वाचा तिला होई आनंद अपार ॥७॥

सुखी राहो भाऊ माझा त्याच्या संसारी फुलत 

भाचरांना यावी नित्य आत्याची गं सय ॥८॥

होई  मनाचा गहिवर येता आईचा आठव 

जीव व्याकूळ व्याकूळ
क्षण ओलेते स्मरून ॥९॥

मन म्हणे आपोआप 
आई असू दे असाच 

लेकरांवर तुझ्या नित् आशिर्वादाच्या  मायेची अशीच मऊ दुल ॥१०॥

©️
 नंदिनी म. देशपांडे.
औरंगाबाद.
९४२२४१६९९५.
          
🌹🌹🌹🌹

सोमवार, २१ सप्टेंबर, २०२०

एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्व!

एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्व,
 #श्री #रामचंद्र
#आसोलेकर
💥💥💥

     "दादा आधार देऊ का तुम्हाला? उठण्यासाठी?"
असं म्हणत मी पटकन उभी राहिले.... सोफा थोडा खालच्या लेव्हलला होता, म्हणून काळजीनं विचारलं मी दादांना...पानं वाढलेली होती,त्यांना उठून जेवणाच्या टेबला जवळ जेवणासाठी जावयाचं होतं...पण दादांनी खुणेनेच तळहात हलवत मला नकार दिला....आणि मागनं उमाचा त्यांची (सूनबाई) तिचा आवाज आला तीनही मला सुचना केली,'त्यांना आवडत नाही आधार घेणं,'मी मात्र दोन मिनिट निःशब्दच झाले....   
   
     साधारण सात-आठ महिन्यांपूर्वी आम्ही मुंबईला त्यांच्या घरी आयआयटीच्या कॅम्पसमध्ये,पवईत गेलो होतो....दादांच्या आणि आमच्या आत्यांच्या भेटीसाठी... तसे नात्याने,दादा माझे मामा... आत्यांचे यजमान... पण आम्ही सर्वजण त्यांना 'दादा' या नावाने संबोधितो... अगदी त्यांच्या भावंडांपासून, मुलांपासून आम्ही बाकीचे सर्व नातेवाईक... 

    दादा, *रामचंद्र असोलेकर*  या नावाने सर्वांना परिचित आहेत... माझ्यासाठी तर ते एक पितृतुल्य व्यक्तिमत्व...
माझ्या वडिलांच्या नंतर आदरयुक्त असणारं असंच त्यांचं माझ्या आयुष्यातील स्थान.... 
२१ सप्टेंबर १९३१  रोजी जन्मलेले आमचे दादा, आज त्यांच्या वयाच्या नव्वदी मध्ये प्रवेश करत आहेत... आणि आजही हे व्यक्तीमत्व बघून पंचविशी तीशीचा तरुण लाजेल असेच हे कार्यरत असतात... प्रत्येकासाठी अत्यंत अनुकरणीय, आदर्श, सोज्वळ,अतिशय साधी रहणी, भौतिक सुखाची कधीही आसक्ती नसणारं,कायम दुसऱ्यांचा विचार करणारं,अतिशय स्वावलंबी आणि कुटुंबासाठी,आईवडिलांसाठी ,
आपल्या माणसांसाठी अविरत कष्टणारं असंच...
किंबहूणा, "कुटुंबाप्रती कर्तव्य" हेच आपल्या आयुष्याचे ब्रिद ठेवणारे असे....

    नाकी डोळी नीटस, हसतमुख गोरापान तेजःपुंज चेहरा, मध्यम उंचीचा बांधा आणि बघणार्‍याला आदरच वाटावयास हवा असंच हे  व्यक्तिमत्व....
आजही श्री रामचंद्रराव आसोलेकर नव्वदीत आले आहेत,यावर कोणाचा विश्वासच बसणार नाही... दोन-तीन दिवस त्यांच्या सहवासात घालवले तर, 'हे ज्येष्ठ नव्हेतच, तर नव्वदीतील तरुणच'! असेच उद्गार निघतील कोणाच्याही मुखातून...

   आई-वडिलांचं हे ज्येष्ठ आपत्य... वडील प्राथमिक शिक्षक शेतीशिवाय दुसरा बाकी आधार नाही.... पण पाठची पाच भावंडं... एवढा मोठा डोलारा सांभाळताना एकट्या वडिलांची कसरत व्हायची.... माफक शिक्षण झाल्याबरोबर नोकरी करण्याशिवाय पर्याय नव्हता ,दादांजवळ....  बीएस्सी नंतर खूप इच्छा असूनही शिक्षणाला अर्ध विराम  देऊन औरंगाबादच्या शासकीय (घाटी) रुग्णालयात क्लार्कची नोकरी स्विकारली त्यांनी... त्यामुळे वडिलांना आधार होऊन भावंडांची लग्न, बहिणींची बाळंतपण, शिवाय घाटी ची सोय म्हणून नातेवाईकांची आजारपणं, त्यांची शुश्रुषा ह्यांची कायम जबाबदारी त्यांनीच घेतली... औरंगाबाद शहराचं ठिकाण म्हणून गरजवंत नातेवाईकाला शिक्षणासाठी स्वतःच्या घरी ठेवून घेणं... असे कितीतरी नातेवाईकांना, स्नेह्यांना आपल्या आहे त्या परिस्थितीत सामावून घेत असताना कोणताही अभिनिवेश नाही की उपकाराची भाषा नाही....कायम  इतरांप्रती मदतीचा हात त्यांनी दिलाय....

      त्यांच्या स्वतःच्या संसारात या दोघांशिवाय तीन मुलींसह एक मुलगा.... या चौघांनाही त्यांनी शिक्षणाच्या परिपूर्ण संधी उपलब्ध करून दिल्या...त्यांनी प्रत्येकाला उच्चशिक्षीत बनवलेले आहे... आज प्रत्येक जण ताठ मानेने आपल्या पायावर भक्कमपणे स्थिरावलेली दिसतात... मुलाला इंजिनियर बनवत,पी.एच. डी.बनवले... परदेशगमनाची संधी उपलब्ध करून दिली...आज पवई आय आयटीत तो पर्यावरण विभागाचा एच.ओ.डी.असून प्रोफेसर आहे...एक मुलगी शिक्षिका, इतर दोघी डॉक्टर म्हणून यशस्वी  झाल्या आहेत... असं सगळं सांभाळत, आपली शिक्षणाची सुप्त इच्छाही त्यांनी नोकरी करत करतच पूर्ण केली...एल.एल.बी. केले... शिवाय वयाच्या ४५ व्या वर्षी एम. एस. सी. बायोकेमिस्ट्री करुन घाटीमध्येच प्राध्यापक पदावर रुजू झाले... आज औरंगाबाद येथील कितीतरी डॉक्टर्स त्यांचे विद्यार्थी आहेत...

    या सर्व आघाड्यांवर बरोबरच कौटुंबिक जबाबदारीत तसूभरही कमी पडले नाहीत दादा... अर्थात घरातल्या आघाडीवर आमची आत्या, सौ. कुंदा रामचंद्र आसोलेकर हिची यथार्थ साथ होतीच... आजही आहेच...आमच्या आत्यांना तिच्या लग्नानंतर जवळजवळ पंचवीस वर्षे बाहेरचे कोणतेही व्यवहार करावे लागलेच नाहीत...एक तर घकामाच्या मांदीयाळीत तिला वेळही मिळायचा नाही, आणि काटकसरीनं संसार करत, घरातील सदस्यांच्या कपड्यांचं शिवणकाम करत वाचवता येतील तेवढे पैसे वाचवण्याचा प्रयत्न केला...दादा, बाहेरची सारी कामं खंबीरपणानं
करुन संसारातील समतोल साधत....शिवाय  आत्यावर असणाऱ्या घरच्या जबाबदारीची जाणीव ठेवत घर कामातही शक्य तेवढी मदतच केली दादांनी...घरात नेहमीच पाहूण्यांचा राबता असायचा...
  
  शासकीय नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर सुध्दा दादा, पुण्यात भारतीय विद्यापीठाच्या मुलींच्या हॉस्टेलवर रेक्टर पदावर कांहीवर्ष कार्यरत होते...
  
   मुंबईसारख्या ठिकाणी सुध्दा आसोलेकर कुटुंबाच्या चार पिढ्या एकत्र राहत असत... दादांचे वृद्ध आई-वडील, ही दोघं नवरा-बायको, मुलगा-सून आणि एक नातू... अक्षरशः या सर्वांना समाधानाने एकत्र नांदताना बघून लोकांना आश्चर्य वाटायचं... आपल्या वयाच्या सत्तरी,बहात्तरी पर्यंत रामचंद्रराव आसोलेकरांना मातृपितृ सुख मिळाले...खरंच, त्यांच्यासारखे भाग्यवान तेच!

   दादा आपल्या सत्तरी मध्ये स्वतः आपल्या अतिवृद्ध आईला उचलून घेत त्यांची शुश्रूषा करत असत...

     गेली दोन वर्षे झाली, माझी आत्या बेडरिडन  आहे... २४ तासांसाठी मेट्रन ठेवावी लागते.... पण या 'करोना'काळात ती सोयही थांबवावी लागली आहे...   आज नव्वदीतही हे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व, रामचंद्रराव आसोलेकर, आपल्यापेक्षा दहा वर्षांनी लहान असणाऱ्या आपल्या अर्धांगिनी ची काठी बनून तिला मानसिक आधार तर देत आहेतच, पण  तिला शारीरिक आधार देत,अगदी भरवण्या पासून तिची शुश्रुषा करत आहेत ! अगदी न थकता...विना तक्रार...अजूनही आपली बँकेचीे कामं ते गाडीतून जातात, पण स्वतः करतात.... उच्चप्रतीची स्मरणशक्ती लाभलेले, आणि भूगोल या विषयाचे सखोल ज्ञान असणारे रामचंद्रराव आसोलेकर कायम अवतीभवती काय चालू आहे याचे अपडेट्स ठेवून असतात....

    असा सगळा आनंदीआनंद असताना, समाधान असताना कुठेही दादांच्या वागण्या-बोलण्यात बडेजाव नाही... कायम जमिनीवर पाय घट्ट रोवलेले असतात... 
दुर्देवानं आजारपणामूळे एका जावयानं अर्ध्यातून संसार टाकत एक्झिट घेतली या जगातून...पण, दादा आणि आत्याने आपल्या मुलीला आणि  नातवंडांना अगदी समर्थपणे मानसिक आधार देत खंबीरपणे उभं केलं आहे....नातवंडही आपापल्या पायावर स्थिर होत आहेत....

    तरुणपणातील कष्टांचा शीण कुठल्या कुठे पळून गेलाय आज दादांचा... असाच प्रसन्न तृप्तीचा आनंद, समाधान ईश्वराने त्यांच्या आयुष्यात कायम ठेवावा... या अतिशय साध्या आदरणीय व्यक्तिमत्वाला शतायुषाचा उंबरठा ओलांडण्यास ईश्वरानं साथ करावी...हिच सदिच्छा व्यक्त करते,मी आज त्यांच्या नव्वदाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने....  
    दादांना, या पुढच्या वाटचालीसाठी मनःपुर्वक शुभेच्छा देऊन त्यांना अभिवादन करते....🙏🙏
*त्वं जीव शतम् वर्धमानः।।*

©️ 
*नंदिनी म. देशपांडे.*

गुरुवार, १० सप्टेंबर, २०२०

🌹वेणी🌹

🧛‍♀️ *वेणी*.🧛‍♀️
~~~~~~~~~
   आज सहज आरशात बघून केसांना कंगवा करताना, जाणवले खूप वर्षांनी केसांची लांबी थोडी वाढली आहे का? लॉक डाऊन आणि अजूनही या करोना दहशतीने पार्लरमध्ये जाऊन केसांना कात्री लावण्याची हिम्मत होत नाहीये मला.... पण गंमत म्हणून पेडाची वेणी घालावी का?किती किती वर्ष झाली,अशी वेणी गुंफायला....    
   एकदा मनाने ठरवल्यावर मग काय, लगेच कृतीत उतरवले.... आणि नकळत मन चाळीस-पंचेचाळीस वर्ष मागे, अगदी माझ्या बालपणात जाऊन पोहोचले.... बालपणी पाचवीत प्रवेश केला, आणि," आता मी मोठी झालेआहे आई...मी आता बॉबकट करणार नाही.....मी यापुढे केस वाढवणार आहे...."असा हट्ट धरून  त्यावेळी वेणी घालण्यासाठी केस वाढवले होते.... पण आपली आपल्याला ही वेणी घालता येत असेल तर शपथ! अजिबात जमायचे नाही....
    मग सकाळची शाळा असताना आईने तेल लावून चापून-चोपून वेणी घालून द्यावी.... कधी घाईघाईत ती उंच व्हावी तर कधी अगदी मानेवर मग मात्र माझी आईकडे अशीच घातलीस तू वेणी ,अन् तशीच घातली...अशी भुन भुन चालू असायची....कधी ती थोडी उंचच जायची तर कधी अगदीच मानेवर...
कधी थोडी सैल होऊन केस बाहेर निघायचे...मग, "पुन्हा 
 घालून दे बघ गं आई... बघ कसा 'बुचका' आलाय?"असं टुमणं लावायची मी आईजवळ..... तर कधी एका कानावरच आलीए नाहीतर वाकडीच पडते आहे.... अशा अनेक तक्रारी हमखास असायच्याच... अशा काहीतरी सबबीखाली ती वेणी एकदा तरी उकलून घालावीच लागायची आईला....
     "बुचका", हा शब्द कितीतरी वर्षांनी या संदर्भाने आठवलाच... एरवीही कधीच उपयोगात आणला जात नाही हा, पण मला आठवला अचानक! ह्याचे माझेच मला कौतुक वाटले....
    वेणीचे असंख्य प्रकार होते... एक  वेणी, दोन वेण्या, रिबीन लावून,दोन वेण्यांना रिबनी लावून वर बांधून.... कधी वेणी चा पाळणा सुद्धा!तर कधी चार पेडाची.... कधी उलट्या पेडांची.... अशी विविध रूपं... कशीही घातली तरी केस बांधलेले असावेत.... डोळ्यांवर कपाळावर रेंगाळू नयेत हा त्यामागचा उद्देश असे.... शाळेमध्ये केस मोकळे सोडावयास बंदीच होती....
   काही शाळांमध्ये तर पेडाची वेणी दोन वेण्या घालून वर सांगितली त्या प्रमाणे कानावर फोल्ड करुन घालणेच आवश्यक असायचे....  
    मला आठवतं, मी औरंगाबादेत एक वर्ष आत्याकडे शिकले... तिच्या तिघी मुली आणि चौथी मी... शाळा सकाळची, विश्वास नगर लेबर कॉलनीतून शारदा मंदिर शाळा फार लांब...  तेव्हा सिटी बसेसही मोजक्याच असायच्या.... सकाळी साडेसहाला तयार होऊन शाळेसाठी निघावे लागायचे....आम्ही रात्रीच आत्याच्या उशाशी कंगवा, तेलाची बाटली आणि छोटा आरसा आणून ठेवत असू... बाकी तयारी आम्ही आमचीच शाळेत जाताना करायचो....त्या वेळी सकाळी उठलेली आत्या तेथे जागेवरच बसायची आणि आम्ही एक एक जणी तिच्या समोर वेणी साठी नंबर लावायचो.... चौघींच्या वेण्या त्याही दोन घालून वर बांधणे हे चांगलेच मोठेच काम होते....
    त्याकाळी तरुण मुलींनी केस मोकळे सोडणे म्हणजे वाहिय्यात पणाचे लक्षण समजलं जायचं...नंतर हळू हळू केसांची लांबी कमी होत गेली...पेडाची वेणी घालणं लुप्तच झालयं जवळ जवळ.....कायमच गायब होईल की काय? अशीही पाल चुकचुकते मनात... या निमित्ताने मी मात्र माझ्या बालपणात गेले आणि व्यक्त झाले हे मात्र खरंय....

©️ 
*नंदिनी म. देशपांडे*.

🌹🌹🌹🌹🌹🌹

🌹कहाणी एका यूट्यूब चॅनलची🌹

कहाणी एका चॅनलची....
*********
    "अगं,आत्या, मला फार 'बोअर' होतंयं आत्या....तुझे आपण  यूट्यूब चैनल बनवूया", "सांग केंव्हा बनवायचे?" "अरे,मला काही जमत नाही बाबा.... ते बनवणे, ऑपरेट करणे, व्हिडिओ तयार करणे...." "मी आहे ना गं,मी बनवून देतो....तू फक्त हो म्हण"..... 

लॉक डाऊनच्या काळात, हा आमच्या आत्या- भाच्या मधला अधून-मधून सुरू असणारा संवाद....
१३-१४ वर्षांचा शाळकरी मुलगा हा, आणि किती आत्मविश्वासाने म्हणतोय, मी बनवतो सारे! मला थोडीशी धाक धुक होती.... चॅनल बनवणं म्हणजे काही सोपं आहे का ते? नेटवरून सर्वांना दिसेल... एकदा चालू केल्यास सातत्य ठेवावे लागेल....उद्या शाळा चालू झाल्यानंतर जमणार आहे का याला.... आणि मला तर त्यातले 
र ट फ  काहीच येत नाही....शंकेने घर केलं होतं, पण पुन्हा विचार केला,मागे लागलयं लेकरु, टेक्निकल विषयात त्याला गोडी निर्माण होत आहे,पण हाताखालून सराव होण्यासाठी त्याच्या हातून काम व्हावयास हवेच.... चुकले तरी काही म्हणणार नाही,असे त्याच्या हक्काचे ठिकाण होते मी त्याच्यासाठी.... म्हणूनच मी माझ्या १४ वर्षांच्या भाच्याला, ईशान,त्याचं नाव....
माझे चॅनल बनवण्याची संधी द्यायची ठरवली.... माझा होकार मिळताच, अवघ्या पाचच मिनिटांत खटा खटा मोबाईलचे बटन क्लिक करत, त्यांनं माझं "शब्दगंध" हे यू ट्यूब चॅनल बनवलं सुद्धा....मी चाटच पडले... एवढ्या लवकर! घाईघाईतच  ईशानने मला त्यासाठी नाव विचारलं...त्या वेळी जे सुचलं ते मी पटकन सांगितलं त्याला,
"शब्द गंध".... खरं म्हणजे तो इंग्लिश माध्यमातून शिकणारा विद्यार्थी.... मराठी भाषा  त्याला बोलता येते,कामापुरती  लिहिता येते.... बऱ्याच गोष्टींचा अर्थबोध होत नाही, मग अशावेळी ती गोष्ट तो मला विचारतो, मी त्याला मराठीत किंवा इंग्लिश मध्ये त्याचा अर्थ स्पष्ट करुन सांगते... त्यामुळे त्याचाही मराठीतील शब्दसंग्रह वाढत चाललाय हे लक्षात येऊ लागलंय.... पण तो व्हिडिओ कसा, कुठून बनवायचा, त्याची एडिटिंग 
प्रक्रिया कशी करावयाची, निवेदनाच्या संदर्भात असणारी चित्रं, फोटो कशी टाकावीत? सुरुवात, शेवट, टाइमिंग पार्श्वसंगीत वगैरे वगैरे तांत्रिक बाजू तो अगदी जबाबदारीने,
एवढ्या एकाग्रतेने करतो, की आश्चर्य मिश्रीत कौतुक वाटते मला....मी फक्त स्क्रिप्ट  लिहित असते.... बाकी साऱ्या कल्पना त्याच्याच.... गेल्या चार-पाच वर्षात ॲन्डरॉईड फोन मी जसा वापरते तसा, केवळ लिहिणे, शोधणे, फोन करणे आणि घेणे या शिवाय पुढच्या वर्गात मी आणखीनही जाऊ शकले नाही.... तेथे ही एवढीशी मुलं लीलया किती सहजपणे वापरतात आपलं
टॅलेंट!खरंच चाट पडायला होतं.... हल्लीची पिढी स्मार्ट आहे, त्यांची ग्रास्पिंग पॉवर कमालीची वेगवान आहे, या म्हणण्यात खूपच  तथ्य आहे, याची प्रचिती आली.... त्यामुळे, आणि त्याला आपण संधी देत ती आणखी फुलवत न्यायची हे मी त्याची या क्षेत्रातील आवड बघून ठरवूनच टाकलं.... ह्या प्रयोग करण्यामुळे, याबाबतीत त्याच्या नवनवीन कल्पना त्याला प्रत्यक्षात उतरण्याची संधी मिळते.... यातूनच मुले शिकत जातात आणि परफेक्ट बनतात.... उद्या या छंदाचे रूपांतर असाच दूरदर्शीपणा समोर ठेवत,कदाचित त्याच्या प्रोफेशन मध्येही होऊ शकेल....आपण मुलांना नाउमेद  करता कामा नये असे मला वाटले... 
ईशानने आत्तापर्यंत शब्दगंध चॅनलचे सहा व्हिडिओज बनवले...प्रत्येक व्हिडिओ  मध्ये काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला आहे....
यामध्ये, 
* शब्दगंध एक ओळख.
* श्रावणधारा.
* काव्यशब्दांच्या सरी. 
 *संस्कृती.
* एक धमाल सफर.   आणि *शब्द माधुर्य.
  माझ्या दृष्टीने सर्वच व्हिडीओज चांगलेच बनले आहेत... दरवेळी त्याच्या मनातील  उदयाला येणार्‍या  नवनवीन कल्पना प्रत्यक्षात  उतरवण्यासाठी त्याला त्याची स्पेस,चालना मिळत जाते....त्याची या क्षेत्रातील गोडी, सातत्य परफेक्शन अट्टाहास एकाग्रता या साऱ्या गोष्टी तो या विषयात तयार होण्यास मदत होत जाते....हे बघून मलाही समाधान वाटतं... आणि त्याच्या या क्षेत्रातील कामाचे कौतुकही वाटतं.... म्हणतात ना, 
"केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे".

©️ 
नंदिनी म.देशपांडे.
🌹🌹🌹🌹🌹

https://youtu.be/XRf9-GzP1kM

https://youtu.be/sV6VDQdgANs

https://youtu.be/IzZ-C-cNFSk

https://youtu.be/F_zstroOPPc

https://youtu.be/GYPaRcEhF1k

https://youtu.be/aDWqsvNizv0

व्हिडिओज च्या लिंक्स...
🌹🌹🌹🌹

🌹घे भरारी🌹

🌿 घे भरारी! 🌿

     एक छोटेसे पिल्लू घरात आले की,संपूर्ण घर, वास्तू आणि घरातील माणसांची मनंही  चैतन्यानं भारून जातात.... सारं घर सारखं या पिल्लाच्या सानिध्यात, त्याच्या अवतीभवती रेंगाळत रहातं.... मोठी माणसं स्वतः एक पिल्लू बनून आपल्यात ते पिल्लूपण उतरवतात...या पिल्लाचे बोबडे बोल किंबहुना त्याचं रडूही प्रत्येकाला आनंद देऊन जातं... प्रचंड ऊर्जेचा हा बालरूपी स्त्रोत घरातील साऱ्यांचीच ऊर्जा व्दिगुणीत करत असतं....
    
     हेच बाळ जसं मोठं होत जातं तसं त्याचं आकाशही विस्तारत जातं....त्याची स्वतंत्र मतं उदयाला येतात...या मतांचा इतरांकडूनही आदर होऊं लागतो...कारण,ती त्याची 'स्वतःची'अशी त्याच्या मनाच्या प्रगल्भतेतून बनलेली मतं असतात... त्याच्या मतांना एक ठामपण प्राप्त होत जातं.... आणि मोठ्या होत जाणाऱ्या या बाळाच्या मतांची दखल घेत, घरातले निर्णय पूर्णत्वास येत जातात. जन्मापासून कुमारावस्था पार करुन,बाळ तारुण्यात पदार्पण करतं, पण तरीही घरातील मोठ्यांसाठी हे बाळ आजही बाळच असतं...अतिशय सुरक्षित वातावरणात वाढलेलं;आई-बाबांच्या पंखांच्या सावलीत सुखनैवपणानं बहरलेलं;सुरक्षित कोषात संचार करणारं असंच.... साऱ्यांचंच लाडकंही असतंच.... 

   परिस्थितीनुरुप  कालौघाच्या प्रवाहाबरोबर चालण्याचा त्याचा आपला स्वतःचा असा एक निर्धार असतो... त्याची निर्णयक्षमता परिपक्व झालेली असते.... मनोमन ठरवलेला निर्णय वेळीच प्रत्यक्ष उतरवण्यासाठी हे बाळ आपले प्रयत्न चालू ठेवते....मनापासून केलेले प्रयत्न नक्कीच त्याच्या मेहनतीला फळ देऊन जातात... त्याच्या या जिद्दीला घरातील ज्येष्ठांची साथ मिळत जाते...आयुष्यात केव्हा तरी आपल्याला या घरट्याच्या कोषातून बाहेर पडावेच लागणारच याची पुरेपूर जाणीव या मोठ्या झालेल्या पिलाला  असते... 

    आणि तो दिवस येतो, घरट्यातून आकाशाकडे झेपावण्याचा, पंखांमध्ये आलेलं बळ आजमावण्याचा.... 'आपल्या माणसांपासून कितीतरी दूर जायचे आहे आपल्याला',ही जाणीव क्लेशदायक असेल तरीही,निर्णयावर ठाम राहून भरारी घेण्याचा,आपल्याच मनाने दिलेली साद ऐकण्याचा हा दिवस.... बाळाच्या आयुष्यात त्याला यशश्री कडे खेचून नेतो... हे नवीन स्वप्नांना नवीन ध्यैय्यांना साकार करण्यासाठीचे असे पहिले पाऊल यशस्वीतेच्या दिशेने ज्या दिवशी पडते, तो क्षण त्या बाळाच्या आयुष्यातील सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असाच असतो....

   कधीही आपल्या घरट्यातून बाहेर न पडलेल्या या पिल्लाला आपल्या स्वप्नपूर्तीसाठी ध्येयपूर्तीसाठी आकाशात उंच उंच भरारी घेऊन सातासमुद्रापार जाण्याचा दिवस; एक नवी उमेद,नवी जिद्द,नवीन उन्मेश, नवीन जोश, नवीन माणसं ,नवीन वातावरण आणि नवीन देश धरती यांकडे घेऊन जातो.... केवळ बाळाने आपले आकाश विस्तारत असताना घेतलेल्या निर्णयाचे ध्येय गाठण्यासाठी,स्वतःला सिद्ध करताना एक पाऊल आणखी
टाकण्यासाठी.... ते प्रत्यक्षात  उतरवण्यासाठी... त्यातून स्वतःला आनंद, समाधान मिळवण्यासाठी आणि इतरांनाही या समाधानात न्हाऊन निघण्यासाठी... म्हणूनच, मोठ्यांच्या अंतःकरणातून या बाळासाठी आपोआप शब्द उमटत जातात, 

यशस्वी भवः
यशस्वी भवः
यशस्वी भवः

©️ नंदिनी म.देशपांडे.
🌹🌹🌹🌹🌹🌹

शनिवार, १५ ऑगस्ट, २०२०

कविता-पाऊस. (बालकवी). रसग्रहण.

#आठवणीतील कविता#

      आठवणीतील कविता या साखळी उपक्रमातील एक कडी बनण्याची संधी,मला माझी मैत्रिण अर्चना कुलकर्णी,हिनं दिली आणि मी आनंदून गेले....या साखळीचा एक हिस्सा आपण बनत आहोत,या जाणिवेनं....अर्चनाचे मनस्वी आभार....

      आठवणीतील कविता आठवण्यापूर्विच, त्या कवितांचे कवी प्रथम आठवत गेले....त्यांपैकीच एक;
बालकवी-त्र्यिंबक बापूजी ठोंबरे हे एक!

     अवघ्या सतराव्या वर्षी, साहित्य संमेलनात यांनी जागेवरच कविता रचून, तिचं निवेदन केलं आणि कौतुकानं संमेलनाध्यक्ष कर्नल डॉ.किर्तिकर यांनी त्यांना बालकवी ही पदवी स्वयंस्फुर्तिनं बहाल केली....

     अर्वाचीन काळातील एक प्रतिभावंत कवी अशी ख्याती असणाऱ्या बालकवींना,
"निसर्गकवी"असेही संबोधले जाते...केवळ सत्तावीस वर्षे आयुष्य लाभलेल्या या कवीनं पावणेदोनशे कविता रचून ठेवल्या आहेत!

     त्यांच्या, श्रावणमास, आनंदी आनंद गडे, औदुंबर,निर्झरास,
फुलराणी,पाऊस इ. कवीतांनी शतकोत्तर काळ लोटलायं,पण आजही मनावर गारुड केलं आहे....
   कविता म्हणजे काय?कविता वाचनाची गोडी, 
 निसर्गाकडे बघण्याची सौंदर्यपूर्ण नजर ही आमच्या पिढीला बालकवी
कडंन मिळालेली देणगी आहे असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही....

   त्यांपैकी,"पाऊस"
ही कविता मी आज येथे उपकृत करत आहे...
     सध्या पर्जन्य राजानं,साऱ्या सृष्टीवर आपला वरदहस्त ठेवलेला दिसतोय...
अशाच पाण्यांनं भरभरुन ओंथबणाऱ्या आकाशातील मेघांचे वर्णन काय सुंदर केलंय,या आपल्या कवितेतून बालकवींनी!
   तुम्ही प्रत्यक्ष वाचूनच तो आनंद मिळवा....पावसाच्या जलधारांसवे पाऊस वाचत.....
🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️
# पाऊस #
___________
थबथबली ओथंबून खाली आली  ‌‌
जलदाली मज दिसली सायंकाळी
रंगही तिचे नच येती वर्णायाते!
सुंदरता त्यांची मम भुलवी चित्ता
व्योमपटी जलदांची झाली दाटी
कृष्ण कुणी काजळिच्या
शिखरावाणी!
नील कुणी ईंद्रमण्याच्या कांतिहुनी!
गोकर्णी,मिश्र जांभळे जसे कुणी;
तेजात धुम्राचे उठती धोत,
चमकती पांडुरही त्यापरिस किती!
जणू ठेविल माल भरुनी वर्षादेवी
आणुनिया दिगंत राहुनि या ठाया!
कोठारी यावरला दिसतो न परी!
पाहूनि ते मग मारुत शिरतो तेथें!
न्याहळूनी नाहिं बघत दुसरे कोणी
मग हातें अस्ताव्यस्त करी त्याते!
मधु मोतीं भुवरती भरभर ओती!

बालकवी.

(बालकवींच्या निवडक कविता).

🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️

#वरणफळं.#

चोचले जीभेचे....
__________________

*वरणफळं*

    अगं मावशी अहाहा,काय टेस्टी झालीए डिश!मावशी,तू ना, पुण्यात राहिला आलीस ना की,तेथे  एक छानसा स्टॉल टाक वरणफळांचा. बघ मस्त रिस्पॉन्स मिळेल....
    माझ्या भाचीच्या वेदश्रीच्या या सिरियसली बोलण्याचे मला हसू आले...
   
       पण तिच्या म्हणण्यात तथ्य आहे,म्हणजे चवीच्या बाबतीत.... खरंच तर आहे ते!आपला पारंपरिक पदार्थ पिढ्यान् पिढ्यांपासून वेगवेगळ्या चवीने बनवला जाणारा... वेगवेगळ्या पध्दतीनं बनवला जाणारा...पण कॉम्बिनेशन एकच तुरीच्या डाळीच्या पातळ वरणात कणकेचे लाटून छोटी छोटी फळं(पुरी) टाकून त्यात शिजवायची....

      कुणी साध्या वरणात बनवतं,कुणी आंबट वरणात तर कुणी मसाल्याच्या वरणात...मला मात्र ही फळं 
आंबटगोड वरणातलीच आवडतात...तेही पहिल्या वाफेचे...वरण पातळ असेल तेंव्हाचे तर फारच चवीष्ट!
   गरमागरम वाढून घेत, छान पैकी हात सोडून त्यावर तुपाची धार टाकावी आणि लोणचं चटणी सोबतीला असावं...बस्स...
   
   ‌यातही एक एक वेगवेगळी पुरी करुन सोडलेली जास्त चवदार लागते... शंकरपाळी बनवून एकदमच शिजवलेली गिजगा होतात आणि माझ्या मते बेचव लागतात...
   
     पण खरंच ही वरणफळाची डिश आहे मोठी टेस्टी....या लॉकडाऊनच्या काळात भाजीशिवाय बनवता येणारी, वेगळ्या चवीची पण एक वेगळी डिश,उकडीची म्हणता येईल अशीच.आठवड्यातून एकदा तरी बनवावी अशीच आहे...ठरवा तर मग कधी बनवता ते!!

*नंदिनी म.देशपांडे*

🌹🌹🌹🌹🌹

शनिवार, ११ जुलै, २०२०

येसर...

*येसर*
*एक वाटी उडदाची डाळ
*अर्धी वाटी चनाडाळ
*अर्धी वाटी धणे
*पाव वाटी जिरं
*थोडी सुंठ
*हिंग‌ चवीनुसार
*काळा मसाला (गोडा मसाला)पाववाटी

*कृती*

   हिंग, आणि मसाला हे जिन्नस सोडून बाकीचे सारे, वेगवेगळे कोरडेच पण खमंग भाजून घ्यावेत...
आणि गार झाल्यावर  हिंग आणि गोडा मसाला घालून मिक्सर मधून दोन वेळा एकजीव होईपर्यंत फिरवून घ्यावेत किंवा जाडसर दळून आणावेत...

*येसरवडी*

    या येसराची पूड ऊकळी काढलेल्या फोडणीचा पाण्यात टाकून वरणा सारखी ग्रेव्ही करावी...त्यात कोथिंबीर,आलं कडिपत्ता घालावा.... व्यवस्थित शिजवून घ्यावे...
   बाऊलमध्ये वाढून घेताना पिठल्याच्या वड्या आणि त्यावर ही ग्रेव्ही घालावी...
चवदार
येसरवडी तयार!

🌹🌹🌹🌹🌹🌹

शनिवार, २७ जून, २०२०

कांदाभजी.

*चोचले जिव्हेचे*

*कांदा भजी*

      खरं म्हणजे,पाऊस आणि कांदाभजी यांचं नातं कोणी लावलंयं माहित नाही, पण मोठं झक्कास आहे!
    
       आषाढाचा महिना आहे हवेमध्ये कुंदपणा दाटून आलाय...आकाशात काळ्या मेघांची दाटी झालीए....त्यांची गार गार हवेने छेड काढलीए...बिचारे चिडून बरस बरस बरसताहेत....अशा या मस्त पावसाळी हवेचा आनंद आपण छानपैकी गरमागरम कांदाभजी बनवण्याचा बेत करुन साजरा करतोय....सुटले ना तोंडाला पाणी!

     कांही ठिकाणी कांदा भजी खेकडा भजी म्हणून ओळखली जातात...कांद्याचे काप उभे केल्यास तसा आकार येणारच,पण म्हणून एवढं किळसवाणं नाव?खाण्यावरची वासनाच जाईल माणसाची....असो...

    पण काहीही म्हणा पाऊस आणि कांदाभजी यांचं जमलेलं सुत छानच!
मला वाटतं याच कारणानं आषाढातच कांदेनवमी येत असणार...चातुर्मासात 'कांदा बंद' चा नारा दिला जातो काही घरांमध्ये,तो पाळण्याचं निमित्त करुन कांदाभजी होतात घरोघरी...हल्ली महिला मंडळात तर या निमित्ताने पावसाळी सहली आयोजित केल्या जातात....कांदाभजीच्या पार्ट्या होतात म्हणे....

     आमच्या मराठवाड्यात भजांचं जुनं नाव"बोंडं",असं आहे...जुनी लोकं आजही असेच संबोधत असतील,पण असं संबोधन करणारी पिढी आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे....पण नंतरच्या पिढीला हे भज्यांचं नाव
कांही पचनी पडलं नाही....अहो,बोंडं म्हटलं की मोठे मोठे बेसनाचे तळलेले गोळेच दिसतात डोळ्यासमोर....ते कसे पडणार पचनी?

      मग थोडसं नाजूक नाव, हिंदीतून घेतलंयं मराठीत उसनं खास भज्यांसाठी ते म्हणजे"पकोडे".असं म्हणताच,गरमागरम, कुरकुरीत,छोटी छोटी कांद्याची किंवा मिरचीची झणझणीत किंवा पारशी दोडक्यांची किंवा पानकोबीची किंवा पालकाची अशा सर्वच चवींची चवदार लागतात....

     भजी हे नामाभिदान तसं बरंए पण त्याला पकोड्यांची सर नाही असं माझं मत आहे...

     पण काहीही असो,हा पदार्थ स्वरुपात,नावात कितीही बदल झाला असेल तरीही खमंग आणि चवदारच!
 गरमागरम आस्वादाचा भुकेला....करणाराची आणि खाणारांची भट्टी एकदा जमली की,दोघंही कंटाळणार नाहीत अशीच....एव्हाना पावसाळी कांदाभजींची एक एक फेरी नक्कीच झाली असणार घरोघरी....आता दुसरी फेरी कांदेनवमीच्या दिवशी होय ना?
👍🏻😊

©️
  *नंदिनी म.देशपांडे*

🌹🌹🌹🌹🌹🌹

सोमवार, २२ जून, २०२०

बाबा

*बाबा*

    "तू आमचं पहिलं आपत्य!किती आनंद वाटला घरात सर्वांनाच!सगळ्यात जास्त तुला जपलंयं....सात महिन्यांची जन्मली आहेस ना तू!पाच वर्षांपर्यंत कडेवरच घेऊन फिरलोय आम्ही दोघं तुला....पायी चालवलं तर बाप्पा (माझे वडिल)रागवायचे आम्हाला."...
   एकदा सायकलवर तुला घेऊन पडलो होतो मी!काय अवतार झाला होता, माझा म्हणून सांगू....पण तुला अधर ठेवलं...."
     माझ्या बालवयातील आठवणी सांगताना आजही पंचाहत्तरी पार केलेले ‌बाबा, तेवढंच उत्साहानं आणि उस्फुर्तपणे कौतुकानं, भरभरुन बोलतात....आणि  अशावेळी मला स्वतःला आज पन्नाशी पार करुन दोन तीन वर्षे झालीएत तरी मीही तेवढीच लहान झाले आहे त्यांच्या सहवासात.... असं वाटत असतं....हे लहानपण,हे कौतुकाचे बोल,हा मनाला खंबीर बनवणारा आधारस्तंभ कधीच लोपू नये,कायम आपली अशीच साथ करत राहो असंच वाटत रहातं....
      आई-वडिलांच्या मायेच्या सावलीत असलं की,मुलांना कितीही वय वाढलं आपलं की आपण आजही लहानच आहोत ही जाणीव कायम असते....ही हवीहवीशी चीरतरुणपण कायम ठेवणारी आपली जाणीव, या आधारवडाच्या सावलीचा थंडगार गारवा देत रहाते कायमच....उन्हाचे चटकेच नव्हे तर साध्या झाळ्या सुध्दा लागू देत नाहीत....
     आज फादर्स डे,खरं म्हणजे आईवडिलांच्या ममतेसाठी कोणत्याही डे ची गरज नाहीच....ते अव्याहतपणे नेहमीच आपल्या पाठीवरुन आपला मृदुल हात फिरवत असतं...पण सगळं जग साजरा करतंय मग या निमित्ताने थोडेसे व्यक्त होऊ आपणही असं वाटलं....
   असेही जन्मदात्यांच्या ऋणातून मुक्त आणि व्यक्त होण्यास, शब्दांचा आधार घेणं म्हणजे,पहाडाला काठीच्या आधारावर पेलण्यासारखं आहे....
    माझ्या बालपणापासून बाबांना जाणून घेणं म्हणजे त्यांनी स्विकारलेली नवनवीन आव्हानं यशस्वीपणे पेलणं होय...अर्थात हे करताना आईचीही खंबीर साथ तेवढीच मोलाची होती...
   त्यांना जाणून घेणं म्हणजे,त्यांनी आपल्या वकिली व्यवसायातील ज्ञानला आजही कायम अपडेट ठेवत, यातील बारकाव्यांची चर्चा करणं,ती समजाऊन सांगणं होय...आम्ही भावंडच नव्हे तर कोणीही परिचित व्यक्ती आला कायद्याचा सल्ला मागावयास, तर त्याचे उदाहरणासह विवेचन करुन शंकानिरसन करणं होय....
     सुट्टीच्या दिवशी आपल्याच क्षेत्रातील मंडळींशी गप्पांष्टकंची महेफिल जमवून आपल्याला आलेले या क्षेत्रातले निराळे अनुभव कथन करणं, हा त्यांचा मनस्वी छंद पण या गोष्टी कानावर पडून आम्हीही त्यातून बरंच कांही शिकलो आहोत... आयुष्याच्या वाटेवरुन यशस्वी वाटचाल करत असताना या छोट्या छोट्या टिप्स फार उपयोगी पडतात...
    कायदेविषयक चर्चा हा त्यांचा अतिशय आवडीचा विषय आणि त्यावर त्यांची तेवढीच कमांड असणारा हा विषय...
    कायदेविषयक चर्चेतून बाबा जसे उमजत गेले तसेच बांधकाम या विषयातूनही....व्यवसायानं,शिक्षणानं बांधकम क्षेत्राशी तीळमात्र संबंध नसताना,त्या विषयीची प्रचंड आवड त्यांना कधीच स्वस्थ बसू देत नाही....सारखं त्यांच्या स्वतःच्या किंवा आमच्या पैकी कोणाच्याही घराचं नवीन बांधकाम असो नाहीतर रिनोवेशन हे कायम तत्परतेनं हजर राहून समोर उभं राहून बांधून घेतील....त्यांच्या डोक्यात तेथील नकाशा, डिझाईन यांची प्रतिमा अगोदरच तयार झालेली असते ती तेवढीच स्पष्ट उतरवून घेण्यात बाबांना स्वतःला फार आनंद मिळतो....
   एका जज्जचा किंवा वकिलाचा, सर्व विषयांची संपर्क येत असतो, त्यामूळे त्याने आपले ज्ञानचक्षू सर्वंवकषपणे खुले ठेऊन वावरायला हवे हे त्यांचे तत्व ते आम्हाला नेहमी सांगत असतात...
    बाबा उमगले ते त्यांच्या दूरदृष्टीपणाच्या नजरेमधून....वर्तमानाची पावलं ओळखत भविष्याची वाटचाल करावयास हवी हे त्यांचे ब्रिद स्वतः आचरणात आणत आम्हालाही करावयास लावणारे बाबा...
    त्यामुळे खरंच, अडचणी च्या वेळी माणूस कधीच डगमगत नाही....ह्याची प्रचिती येते....
अशा कितीतरी बारीकसारीक गोष्टींंतून बाबा आम्हाला दरवेळी नव्याने उलगडत गेले...
     गेल्या पाच वर्षात आईची बावन्न वर्षाची साथ सुटलीए...तिची त्यांच्या आयुष्यातील साथ संपलीए.‌‌...पण आपल्या अनुपस्थितीत बाबा सक्षमपणे उभे राहू शकतात आता, ही जाणीव झाल्यानंतरच आई निर्धास्तपणे गेली आहे....आईची उणीव भरुन निघणं केवळ अशक्यच....पण बाबा आम्हा साऱ्या बालगोपाळांमध्ये रमले आहेत...आपल्यातील ज्ञानकणांची झिरपण आमच्यावर करत करत....
    आज,या फदर्स डे च्या निमित्ताने या त्यांच्या मुलीकडून भरभरुन शुभेच्छा आणि त्यांच्या उदंड आयुष्यासाठी ईश्वराजवळ प्रार्थना...🙏🏻

  *नंदिनी म.देशपांडे*
*उमरीकर*

🌹🌹🌹🌹🌹

रविवार, २१ जून, २०२०

साहस

*साहस*

    आज तब्बल तीन महिन्यानंतर सुहासराव घराबाहेर पडले!बाप रे तीन महिने!एवढे दिवस आपण किती सेफ झोन मध्ये होतो!!
     त्या मेल्या मेडियानं दररोज कोरोना बाधितांचा गलेलठ्ठ आकडा दाखवत छातीत नुसती धडकी भरवून ठेवली होती...
घराबाहेर पाऊल ठेवायलाच उशीर,की आपण या कोरोना विळख्यात पडलोच...म्हणून समजा.... ही मनात पक्की घर करुन बसलेली भिती, सारखी त्या देवाचं नाव घेण्यासाठी भाग पाडायची....
एरवी त्या बिचाऱ्याची आठवण कधीतरी सणावाराला दोन हात जोडण्यापुरती होत असे..‌‌.. पण गेल्या तीन महिन्यांत हे आठवणींचं(देवाच्या)
सत्र वारंवार येऊ लागल्याची जाणीव होत आहे...

      समोर येईल ते,असेल त्या चवीचं गपगुमान पोटात ढकलावं लागतंयं आणखीनही....नावं ठेवण्याची किंवा आवडी निवडी सांगण्याची हिम्मत कोण करणार बाबा?
वेळेवर पोटापुरते दोन तीन वेळेला खायला मिळतंयं हेच नशीब समजायचं....बाहेरुन मागवून खाणं किंवा हॉटेलमध्ये जाऊन चोपणं सगळंच थांबलंयं आता.... आपल्या उभ्या आयुष्यात आपल्याला कधी साधा चहा करुन घेणं माहित नाही...किती काळ हे चालेल ते काळच सांगेल....

     मागच्या आठवड्यात लॉकडाऊन चे नियम थोडे शिथील झाले आहेत म्हणा,पण लगेच बाहेर पडण्याची हिम्मत नाही झाली बाबा....

 सुहासराव मनाशीच बोलत होते....
     चार दिवसांपासून किमान गेटपर्यंत येत रस्त्यावरच्या रहदारीचा अंदाज घेत होतो....त्यावरुन किती गर्दी आहे?एवढ्या गर्दीत जावं का आपण?
तशी कोरोना युध्दाला तोंड देण्यासाठी सारी आयुधं जवळ ठेवली आहेतच आपण....तीन महिन्यांपासून....अगदी, वाजवी पेक्षा जास्त किंमत मोजून....न जाणो गरज पडलीच आपल्याला तर....तर असू द्यावीत हाताशी....वेळवर शॉर्टेज झाले तर....या भितीनं....

    नाहीतर मी कसचा देतोय एरवी जास्तीचे पैसे....उलट कमीत कमी पैशात कुठे मिळेल त्या ठिकाणी गेलोच असतो...जाऊ दे, कधी कधी होते असे....जास्तीचे पैसे गेले आपल्या अक्कल खाती....

     आपण आता तरुण नाही आहोत....जेष्ठांच्या यादीतही नाही आहोत मग असं किती दिवस तोंड लपवून बसायचं घरी?
     सौ.पण जातीए कधी कधी बाहेर....अगदी डोळ्यांची आडवी रेषा तेवढी बांधायची ठेवून....काय मिजास आहे?त्या कोरोना राक्षसाची आपल्या पर्यंत पोहोंचण्याची?असे म्हणत झाशीच्या राणीच्या आविर्भावात पडते ती बाहेर....आवश्यक कामं करुन, "मोठ्ठा पराक्रम गाजवून आलेय मी" या आवेशात परतते घरी...आपण मात्र आचंबित होऊन बघत रहाण्याशिवाय काहीच करत नाहीत...

      किती दिवस हे असं भयग्रस्त जीवन जगत कोंडून ठेवायचं स्वतःला घरात?आपलंच मन आपल्या भ्याडपणाची साक्ष देतंयं हल्ली....सांगू कोणाला?

     झालं, एवढं जपूनही दोन दिवसांपूर्वी कॉलनीतल्या आसपासच्या दोन तीन ओळीत कोरोनानं चढाई केली आहे, या बातम्या येऊन धडकल्या....झालं थोडावेळ चलबिचल....हा छुपा रुस्तुम आपल्या गेटमध्ये तर दबा धरुन बसला नाहीए ना?आपलीच टेहळणी करतोय की काय?असेेही वाटले...पण लगेच झटकून टाकली मी ही भिती मनातून....

 ‌.    कसेही तर आपल्या कॉलनीत शिरकाव केलाय या मेल्यानं मग आता करावाच हिय्या,बाहेर फेरफटका मारण्याचा....घरात बसूनही तो आपल्यात घुसणार नाही याची काय गॅरंटी?मग थोडी बाहेर जाऊन परिस्थिती आजमावण्यातील मजा तरी घेऊ या....
     मास्क बांधलेले चेहरे निरखू या....ते ओळखता येतील का आपल्याला ते बघू या....कांही चेहऱ्यांशी संवाद साधूया अर्थात अंतर ठेऊनच....
     आपल्या सुरक्षेच्या दृष्टिने पवित्रा घेत घेत एक एक पाऊल पुढे टाकू या....लहान बाळ जसं नव्यानं चालायला शिकतं आणि अंदाज घेत पावलं टाकत,टाकत अगदी तस्सच!
      पण थोडं धिट बनू या....या कोरोना पासून लांब रहाण्याचा निश्चय करत....तो समीप आला तरी त्याच्याशी दोन हात करण्याची तयारी ठेवत.... आजुबाजुला असेल तो, तरीही त्याला खड्यासारखे बाजूला ठेवत....न घाबरता संपूर्ण काळजी घेत....

   सुहासरावांनी रस्त्यावरुन रपेट मारताना मनाचा ठिय्या केला, आणि त्यांच्या मनावरचं खूप मोठं ओझं झटकून टाकलं....भयाचं.... आणि मोकळा श्वास (तोंडाला मास्क बांधूनच) घेतला....तेवढ्यात गार हवेची झुळूक कुठेतरी पडणाऱ्या पावसाचा मृदगंध सोबत घेऊन आली.... आणि मन प्रसन्न करुन गेली....

   *नंदिनी म.देशपांडे*

जून,१९,२०२०
     
    🌹🌹🌹🌹🌹

शनिवार, १३ जून, २०२०

स्वागत पावसाचे.

*स्वागत पाऊसाचे*

सृष्टिला या अभिषेक घडवण्या
वसुंधरेला हिरवाईत
नटविण्या
साज अवनीचा नवनीत
बनवण्या


बरसत आल्या पाऊसधारा
स्वागत त्यांचे चला कराया

फुलांनी बघा सडा शिंपला
पानांनी तव घातला वारा

पक्ष्यांचा हा किलबिलाट
अहा!हा
वाजवी मंजूळ शहेनाई

डोलती सन्मुख फळे रसरशीत 
खग पाहुणचारा असती उत्सुक

प्रसन्न वदनी सुवासिनी
बघा गाती अक्षयगाणी

 हासला मनातून बळीराजाही
लगबग त्याची सुरु जाहली
धान पेरण्या शेतांमधूनी

 घालत मुजरा वरुण
राजाला
आपली कृतज्ञता पोहोंचवित पावसाला

आकाशी तव मेघ दाटले
हरखूनी गेले मनोमनी

पाहूनी आपला स्वागत समारंभ मेघ असे म्हणती
आहे सदा मी भाग्याचा
धनी....

असेच भाग्य सदा लाभू दे
आनंदाचे असेच ‌क्षणक्षण
नित्य सदा बहरु दे

सृष्टिला या रोज नवा
मज अभिषेक घडवू दे
मज अभिषेक घडवू दे.

©  *नंदिनी*

जूलै,७,२०१९.
सायं.६ वा.
औरंगाबाद.

शुक्रवार, २९ मे, २०२०

निसर्ग काव्य....स्वर्ग

हिरवा,निळा पोपटी निसर्ग
मनास लुभावतो मस्त
वाटे जणू हा अवनी वर
अवतरलेला स्वर्ग स्पष्ट
आकाशीच्या देवतांना
पडलायं वसुंधरेचा मोह
स्वर्गातून उतरण्या तिवर 
 ह्या पायऱ्याच तर होय
पहिली ही शुभ्र धवल
बर्फीली थंडगार छान
दुसरी भासे ती हिरव्या
मखमलीची मृदू शाल
तिसरी पायरी वृक्षरुपी
डोलती हासत स्वागता साठी
चौथी असे ही मुलायम
सुंदर पोपटी रंगाची
त्या खाली ही घरं ईवलीली
माणूस रुपी दुतांची
स्वागत करण्या त्या ईशाचे
फुलांसवे हासत येती
हे ईश्वरा सदैव राहो
कृपा ही अशीच आम्हावरती
शब्द न सापडे व्यक्त होण्या
तुझ्या या अतीव ऋणासाठी
तुझ्या असणाऱ्या
या आशिर्वादासाठी
आम्हा वरच्या या 
सुंदर सुरेख प्रेमासाठी

© *नंदिनी*

🎄🎄🎄🎄🎄🎄

बुधवार, २७ मे, २०२०

चोचले जिभेचे...चणे....

*चोचले जीभेचे*
_______________
*चणे*
   © नंदिनी म.देशपांडे.

    लहानपणापासून परभणी -औरंगाबाद- 
परभणी असा रेल्वेचा भरपूर प्रवास घडला...म्हणजे सारे नातेवाईक याच दोन ठिकाणी एकवटलेले मग काय, निमित्ताने तो अगदी वर्षभरात चार पाचदा तरी व्हायचा....किंवा औरंगाबादहून परभणीला तरी दर एक दोन महिन्यात कोणीतरी यायचंचं...
फार आतुरतेनं वाट बघायचो आम्ही मुलं अशा येणारांची....मुलंच काय पण मोठी माणसंही वाटेकडे डोळे लावून असायची....
का?अहो का म्हणून काय वाचारता,रस्त्यात लागणाऱ्या 'सेलू' गावच्या रेल्वेस्टेशनवर मिळणाऱ्या खमंग चण्यांसाठी....

    ओल्या (भिजत घातलेल्या)साध्या हरभऱ्यांच्या उसळीलाच "चणे"असे संबोधन आहे हे त्यामूळे उमगलं खरं तर....
पण सेलूच्या स्टेशनवर मिळणारे चणे खरोखरच चवीला एक नंबर होते....मला वाटतं या बाबतीत एकखांबी तंबू होता त्या विक्रेत्याचा, त्याच्या हातच्या चवीला नंतरची कित्येक वर्ष अजिबात पर्याय नव्हता....केवळ रेल्वेस्टेशनवरच,शिवाय जाणाऱ्या येणाऱ्या रेल्वेच्या वेळातच ते उपलब्ध असायचे....
बरं हा माणूस एका लोखंडी स्टॅंडवर आपलं चण्याचं घमेलं ठेऊन एकाच जागेवर उभा असायचा! त्याची जागाही ठरलेलीच!
   
    स्टेशन आता येणार आहे म्हटलं की,अगोदरच लवकर उतरण्यासाठी प्रवासी गाडीच्या दरवाज्याजवळ येऊन थांबायचे....आले स्टेशन की,भरभरा खाली उतरत त्याच्या दिशेनं पळायचे...या चणे वाल्याच्या भोवती अश्शी गर्दी जमायची ना! पण हा पठ्ठ्या एकटाच पेपरच्या अगोदरच करुन ठेवलेल्या तुकड्यावर गरमागरम खमंग चणे,त्यावर कच्चा भुरभुरलेला कांदा,चतकोर लिंबाची फोड,कैरीच्या दिवसात एखादी कैरीची फोड आणि झणझणीत फ्राय मिरची!अहाहा!झणझणीत होतं सारंच प्रिपरेशन म्हणूनच तोंडाला पाणी सुटायचं,सेलूच्या चण्यांचं नाव काढलं तरी....
    
   ईकडे गाडीत दात घासून बसलेली मंडळी आपलं माणूस चणे घेऊन कधी येतयं याची वाट, खिडकीतून सारखं डोकावत बघत बसायचे....
     
   पण खरंच, या सेलूच्या चण्यांना अख्ख्या पंचक्रोशीत तोडच नव्हती....त्याची चव,त्याची क्वालिटी जी होती ती सुरुवातीपासून ते शेवट पर्यंत अगदी एकच.... म्हणूनच हवीहवीशी!
    
     त्यानंतर कांही वर्षांनी आम्हीही वास्तव्यास होतो तेथे पण माणूस पाठवून मुद्दाम चणे मागवून घेत असू स्टेशनवरचे!
   
एरवी रेल्वेस्टेशन,बसस्टॅंड वरचं काहीही खाण्यास मज्जाव करणारी मी,याला मात्र अपवाद ठरायची....माझंच मला आश्र्चर्य वाटतं कधीकधी...असो...
    
    पण कालांतराने हा सेलूच्या चण्यांचा कारभार इतर कोणाच्या तरी हाती गेला आणि सारंच बदलून गेलं असं समजलं....ईतरही चणेवाले सेलू स्टेशन आलं की गाडीत येऊ लागले आणि मग मात्र  चण्यांना बाजारात बसल्यासारखं वाटलं असणार नक्कीच...
मुखातून "चणे घ्या चणे", असं नावही न कढता,प्रचंड मागणी व खप असणारे चवदार चणे मग आपली पत सांभाळू शकले नाहीत असे जाणवले....
    
    हल्ली,सेलूच्या स्टेशनवर चणे मिळतात किंवा नाही याची माहिती नाही, पण एके काळी सेलू शहर,त्यातही स्टेशनच केवळ तेथील खमंग चण्यामूळे ओळखले जायचे....

    ‌‌तीच चव आजही जीभेवर रेंगाळते आहे...कधी चणे खाण्याची हुक्की आली म्हणजे मी पण आवर्जुन बनवतेच....आणि सेलूच्या चण्यांशी,त्याच्या चवीशी आंतर्बाह्य साधर्म्य दाखवणारे चणे मला बनवणं जमतंय....हे सांगताना मला खूप आनंद वाटतोय....
   अबालवृध्दांना आवडणारी ही डिश खरंच तोंडाला फार चव आणते! 😋😋

🌹🌹🌹🌹🌹🌹

रुसवा.

रुसवा हा सोड सखे
    नको असा दुरावा
लटका तुझा राग प्रिये
    प्रेमाचा लाडिक बहाणा
 बहाणा हा मला आता 
    होतो जीवघेणा 
नको अंत पाहूस सखे
    सोड हा अबोला
प्रित तुझी माझी ही
    जन्मोजन्मीचा ठेवा
हृदयांतरीचा आपल्या
    हा अव्दैत विरंगुळा
 सोड आता सखे गं
    रुसवा हा लटका
साद घाल प्रितीला त्या
   पुनःश्च अवतरण्या
घाल साद त्या प्रितिला
पुनःश्च बहरण्या....

© *नंदिनी*

💝💝💝💝💝

मंगळवार, २६ मे, २०२०

आत्या

*आत्या* ♦️
   
©️ नंदिनी म. देशपांडे.

    हो,आत्याच!
   प्रत्येक माहेरवाशिण,ही अपल्या माहेरघरी लक्ष्मीरुपानं आलेली लेक असते....
 आणि त्या घरच्या पुढच्या पिढीच्या बालगोपाळांची ती आत्या होते....
    आत्यासाठी
आपली भाच्चे कंपनी हे तिच्या माहेरचं वैभव असतं...एक वेळ तिच्या स्वतःच्या मुलांनी केलेली मस्करी आत्याला जिव्हारी लागेल, पण भाच्यांनी केलेली गम्मत ती हासण्यावरी नेते...कारण आपल्या भाच्च्यां मध्ये ती आपलं बालपण शोधत असते...आपल्याच प्रतिबिंबाचं परावर्तन न्याहळताना दिसते...
माहेरचं घर म्हणजे तिला तिच्या पायाखालचं अंगवळणी पडलेलं....तेथील बारीक बारीक गोष्टींशी तिच्या बालपणीच्या आठवणी गुंफलेल्या असतात....त्या आठवणी भाच्च्यांना उलगडवून सांगण्यात तिला आनंद मिळतो...म्हणूनच केवळ माहेरच्या माणसांशीच नव्हे तर त्या घरातल्या इतरही गोष्टींमध्ये तिचा जीव गुंतलेला असतो....सासरी गेली आत्या,तरीही आपलं अर्ध लक्ष माहेरी ठेवून जाते.... निघताना तीन तीन वेळेला काळजी घ्यायला सांगते....

    अशा या आत्या भाच्च्याच्या नात्यात अपार गोडवा भारुन राहिलेला असतो....
आत्याला जेवढा भाच्च्यांचा लोभ येतो, तसाच भाच्चे मंडळींना आपली आत्या म्हणजे एक हक्काचं ठिकाण असतं...एखाद्या गोष्टीची आई-बाबांकडून परवानगी हवी असेल तर आत्याचा 'लग्गा'लावला म्हणजे ती हमखास पदरात पाडून घेता येते हे गणित त्यांना उमगलेलं असतं....हव्या असणाऱ्या गोष्टीं साठी आत्याचं माध्यम म्हणून कसा उपयोग करायचा हे वकुबीनं जाणणारी मंडळी, म्हणजे भाच्चे मंडळी....कितीही मोठी झाली ती, तरीही आत्या भाच्च्या मध्ये मनोमन नातं स्थिरावतं ते प्रमुख्यानं मैत्रीचंच...एक निर्मळ निरागस....
आत्यानं समज दिल्याचा राग भाच्च्यांना येत नाही कधी,जेवढा ईतरांनी रागावल्यास येतो....
भाच्च्यांसाठी आत्या म्हणजे "त्यांचं" असं एक खास ठिकाण असतं...
    कुणा विषयी तक्रार असो वा सुचना देणं असो,आत्याला सांगितलं की त्यावर मार्ग निघतो नक्कीच ही भाच्च्यांची धारणा आत्याही पुर्णत्वाला नेते...
तर हे आत्या भाच्च्यांचं नातं,प्रेमाचं,मैत्रीचं,अंतःकरणाचं,
हक्काचं,आपलेपणाचं असं मोठं सरमिसळीचं पण मोठं गोड असतं...

   मलाही पाच आत्या होत्या...
त्यांपैकीच एक आमची मोठी आत्या....गोदावरी नाव होतं तिचं...पण लहान भावंडं आक्का म्हणायचे... त्यानंतरही ती "आक्काच" राहिली....कुणाची आक्का आत्या,कुणाची आक्कामावशी!
    ही आमची आक्का आत्या उंचीला कमीच पण गोरी गोरी पान,केशरी नितळ चमकदार कांतीची,नाकी डोळी निटस, ठसठशीत होती....
त्या वेळच्या प्रथेप्रमाणं दहाव्या,अकराव्या वर्षीच लग्न झालं होतं तिचं...आजही तिचा तेंव्हाचा फोटो बघितला की वाटतं,लग्न म्हणजे काय?याचा बोध तरी असेल का तिला त्या वयात?
बालपण सरलंही नाही की सासरी रवानगी झालेली....तिच्या पेक्षा बारा वर्षांनी मोठ्या असणाऱ्या नवरदेवा बरोबर....

   असेल सासर माणसांनी भरलेलं, गर्भश्रीमंत,जमिनदार घराणं....असेल तिला सोन्यानं मढवून टाकलेलं,एक सुन म्हणून,पण त्या साठी किती तडजोडी स्विकारल्या तिनं....
बालपणातलं हक्काचं ठिकाण माहेर दुरावलं,सहाजिकच बालसुलभ वयात आईवडिलांच्या प्रेमाला पारखी झाली...काय शिकली होती माहित नाही,माझ्या माहितीप्रमाणे शाळेत कधी गेलेलीच नव्हती ती...पण आजोबांनी तिला संस्कृत,मराठी,लिहिता वाचता यावं म्हणून घरी येऊन शिकवणाऱ्या एका शिक्षकाची नेमणूक केली होती... त्यामूळे सुंदर हस्ताक्षराची आणि सहज वाचनाची आक्का आत्याची सवय आम्हा सर्वांच्या परिचयाची होती... तिची स्वहस्तक्षरातली बरीच पत्र मी‌पण वाचली होती....
  
  खूप हुशार होती आत्या,हे आम्हाला तिच्या सहवासानं दाखवलं....लिहिता वाचता येण्या ईतपत शिक्षण झालेलं....पण वाचनाची प्रचंड आवड असणारी....आणि वाचनातून आत्मसात केलेलं ज्ञानाचं तेज चेहऱ्यावर प्रतिबिंबीत झालेलं...

     तिला आपले वडिल आणि त्यानंतर भाऊही वकिल असल्याचा फार अभिमान होता.....

   खरं म्हणजे संधी मिळाली असती तर,एक विचारवंत विदूषी अशी तिची ओळख निर्माण झाली असती....पण,इ.स.१९२५ सालचा तिचा जन्म! माहेर शहरातलं,परभणी हे गाव होतं पण सासर मात्र खेडे गाव लातूर जवळ निलंगा तालुक्यातील निटूर....त्या काळच्या सामाजिक रुढी परंपररांना महत्वाचं मानणारं...घरातलं बाळबोध पारंपारिक वातावरण त्यातही एकत्र कुटुंब पध्दती...कर्मठ विचारांची घरची माणसं...मग काय,शिक्षणाचा बट्याबोळच होणारच....शिकायचे आहे मला हे मतही मांडणं दुरापास्तच....
पण तरीही तिची वाचनाची आवड तिनं कायमच ठेवली...एकत्र कुटुंब पद्धती असल्यानं जबाबदारी अशी फारशी नव्हती...दिमतीला गडी माणसं होतीच... वाचनासाठी भरपूर वेळ असायचा... धार्मिक ग्रंथ,गीता,ज्ञानेश्वरी यांचं नित्यपठण करत असायची आत्या.... मुलांनाही शिकवायची...
वर्षातून एकदा दरवर्षी माहेरी परभणीला येत असायची...अंगावर नेहमी वापरण्याचे दागिने एवढे की उंची कमी असल्याने जमिनीवर बसलेली असताना ते जमिनीला टेकायचे! असे आमचे बाबा सांगतात....माहेरी आली की तीन चार महिने आरामात रहायची....बालसुलभ वयात लहानपणीच माहेर घरापासून दूर गेलेली आत्या, अशा प्रकारे मग माहेरी राहून आपली माहेरपणाची हौस भागवून घ्यायची...
त्या मानाने माहेरी  वातावरण आणि जीवनशैलीही आधुनिक पध्दतीची होती...शिवाय मोठी अक्का सर्वांची लाडकी...भावंडांना हवीहवीशी...

   गोदू आत्या स्वभावानं फार प्रेमळ...लहानांना लाड करुन घेण्याचं एक आवडतं ठिकाण!जेवढी प्रेमळ तेवढीच स्पष्टवक्तीही....जे तिच्या मनाला पटायचं नाही ते तिनं स्पष्ट बोलून दाखवावं... शिवाय एखाद्याची झालेली चूक त्याला त्याच्या समोर दाखवून,बोलून सोडायची..... एवढेच नव्हे तर त्याची कान उघाडणी केल्याशिवाय चैन पडायची नाही तिला...
   आत्या माहेरी येताना सोबत दळलेला ओल्या लाल मिरचांचा ठेसा आणि सपिटाचे शुभ्र लाडू आणत असे...आम्हाला फार आवडायचे ते!श्रीखंडाची वडी बनवण्यातही हातखंडा होता तिचा...
    तिची मुलं फार खोडकर होती आणि त्यांच्या मागेपुढे धावण्यात तिला आपलं माहेरपण नीटसं उपभोगता येत नाही असं आमच्या आजोबांना वाटे... त्यामूळे,"गोदे तू येथे येताना पोरांना तिकडेच ठेवून येत जा बरं" असं आजोबा गमतीनं म्हणायचे ही आठवण बाबा सांगतात...

     आमचे बाबा  तिच्यापेक्षा वीस वर्षांनी लहान त्यामूळे माझ्या आई वडिलांना ती आईच्याच ठिकाणी होती....
पण तरीही ती मैत्रीण बनून रहात असे...
अगदी आम्हा भाच्चे कंपनीचीही....
आम्हालाही तिचा सहवास आवडत असे...तिच्या गमतीशीर,प्रेमळ बोलण्याची लकब आम्हा साऱ्यांनाच फार आवडयची...त्यात विलक्षण आपलेपणा,लावकेपणा होता...
   आक्का आत्या जशी मोठी होत गेली तशी तिचं मुळचंच देखणं रुप आणखी सौंदर्यानं खुलत गेलं...वाचनानं तिच्या वृत्ती आणि विचार प्रगल्भ बनत गेले असावेत असे वाटते...
जुन्या काळातली पारंपरिक रुढी परंपरांच्या दबावाखाली असूनही तिचे विचार आधुनिक होते....
फारशी देवभोळी नसणारी, किंबहूना कधीही देवांची पुजा बिजा न करणारी पण श्रध्दा बळगणारी होती...जात,धर्म,पंथ यांना फारसे महत्व न देता माणसातील चांगुलपणा जाणणारी,माणुसकीला प्राधान्यक्रम देणारी होती.... त्यामूळे ती खूप जुन्या काळातली आहे असे तिनं तिच्या वागण्या बोलण्यातून आम्हाला जाणवू दिलंच नाही कधी.... पण विचारांना शेवटपर्यंच आधुनिक पणाची चौकट होती आत्याच्या....  
  लहानपणापासून सुखातच राहिलेली दोन्हीही घरी, त्यामूळे असेल कदाचित पण स्वतःची आबाळ तिनं कधीही होऊ दिली नाही...करवून घेतली नाही...
   
   आपल्या मुलांचा आणि भाच्चे मंडळींचा उत्कर्ष होताना तिने बघितला होता...सगळ्या भाच्चेमंडळींकडे जाऊन दोन दिवस राहून तिनं प्रत्येकाचा संसार बघितला....समाधानानं मन भरुन कौतूक केलं तिनं...मला आठवतं,माझ्याकडे दोन दिवस रहाण्यासाठी मी घेऊन आले असता,माझ्या संग्रही गृहशोभिका मासिकाचे वर्षभराचे अंक होते त्यावेळी...ते सर्वच्या सर्व अंक तिनं एका दिवसात वाचून काढले होते...अगदी वयाच्या सत्तरी नंतरही...मला त्यावेळी फार कौतूक आणि अभिमान वाटला होता तिचा...
तिचा विनोदी स्वभाव फारच भाऊन जायचा सगळ्यांना....
अशी ही आमची आक्का आत्या,स्वाभिमानानेच जगली अखेर पर्यंत...
वय झाल्यानंतर ८१वर्षे पर्यंत जीवनानंद घेऊन,२३ मे २००६ रोजी परलोकात गेली...पण आजही तिच्या आठवणींनी मन हळवं होतं...त्या आठवणींचा ताजेपणा आजही तेवढाच ताजा वाटतो...

    आज २३ मे...आमच्या आक्का आत्याचा १४ वा स्मृतिदिन.... तिच्या आठवणींना उजाळा द्यावा असं प्रकर्षानं वाटलं....आणि तिच्या स्मृतिंना अभिवादन करत लिहिती झाले...🙏🏻

🌹🌹🌹🌹🌹

सोमवार, १८ मे, २०२०

वाढदिवसानिमित्त शुभेच्छा...

नावातलं माधुर्य
स्वभावात पाझरलं
स्वभावातला गोडवा  
 व्यक्तिमत्वात अवतरला
व्यक्तिमत्वातील चांगुलपणानं
स्नेहीजनांचा गोतावळा 
  जमवला...
स्नेहीजनांच्या सद्भावना
  पाठीशी खंबीरपणे उभ्या
  राहिल्या
कोणाच्या म्हणून
काय विचरता....
अहो,माझ्याच सखयाच्या 
 नाव सांगू‌ तुम्हाला?
नाव आहे त्याचं मधुकर
 लाभो त्यांना उदंड आयुर्र्आरोग्य 
हेच ईश्वरचरणी साकडं
हिच माझी प्रार्थना
 माझ्या ईश्वराला हेच माझं
मागणं....

तुम्हाला, वाढदिवसाच्या खूप मनापासून आभाळभर आरोग्यपूर्ण शुभेच्छा....

🎂🎉💐💕 १५मे,२०२०.

नंदिनी म.देशपांडे

🌹🌹🌹🌹🌹🌹

चोचले जीभेचे... शंकरपाळी.

*चोचले जिभेचे*
________________

    *शंकरपाळी*

© नंदिनी म. देशपांडे.

   शंकरपाळी म्हटलं की,दिवाळी आठवते,चैत्रगौर आठवते,सहज म्हणून केलेलं परिवाराचं एकत्र जमणं आठवतं....ओघानेच लाडू करंजी अनारसे आणि चिवडा यांचीही आठवण येतेच....
    मला वाटतं शंकरपाळी हा खरं म्हणजे प्रत्येक भारतीयाच्या खाद्यसंस्कृतीचं एक अविभाज्य अंग.....
ही शंकरपाळी माहिती नाहीत असं म्हणणारा माणूस शोधूनही सापडणार नाहीच!
   ‌लहानपणापासून या ईवल्याशा पदार्थाशी अशी गट्टी जमलीए म्हणून सांगू....
     अगदी शाळेच्या डब्यातला खाऊ म्हणून तर कधी भुलाबाईच्या प्रसादाचा खाऊ म्हणून आईनं आवर्जुन शंकरपाळी बनवावितच... बहूतेक किंचित गोड चवीचीचं... कधी गुळाला तर कधी  साखरेला कणकेत नाही तर मैद्यात घोळवून....
दिवाळीच्या फराळाच्या पदार्थांच्या मांदियाळी मध्ये तर हमखास यांची वर्णी लागतेच लागते...डिश ची शोभा वाढवण्यासाठी ह्यांच्या शिवाय मजाच नाही...
कुरकुरीत खुसखुशीत सहज जीभेवर विरघळणारे....
कधी कधी खमंग खारे तर कधी चटपटीत खट्टेमिठेही....अगदीच आळणी असतील तरीही कुरुम कुरुम खाण्यातली मजा काही ओरच! 
    फराळा बरोबरच दुपारचं खाणं म्हणून तर कधी चहासोबत बिस्काटा सारखं....एक सिप चहा चार दोन शंकरपाळी काय मस्त लागतं हे कॉम्बिनेशन!
     बिस्किटं बिनदिक्कत पणे कोपऱ्यात जाऊन बसतात अशावेळी... 
 ‌ लांबचा प्रवास आणि शंकरपाळी यांचं नातंही फारच जवळचं....प्रवासात तोंड चालू ठेवण्यासाठी,पोटभरीची आणि वेगवेगळ्या चवीची शंकरपाळी म्हणजे अगदी हुकुमाचा एक्काच!शिवाय टिकावू पणा अभिमानानं मिरवणारा.... सहाजिकच या शिवाय प्रवास होत नाहीच.....
    करावयाला सोपा,पटकन कुणालाही जमणारा, आयत्या वेळी होणारा नि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या चवीचा बनवता येणारा, असा हा आपला एक पारंपारिक पदार्थ....
  बहुतेक लवकरच हे शंकरपाळे वैश्विक पदार्थ बनण्याकडे वाटचाल करतील हे भाकित नोंदवावयास काहीच हरकत नसावी असं वाटतंय....
  सहज म्हणून दुपारच्या चहाच्यावेळी तोंडात टाकण्यासाठी म्हणून कालच बनवलीत मी पण त्यांचं कौतूक केल्याशिवाय रहावतच नव्हतं...म्हणून हा सारा लिहिण्याचा घाट.....
मग काय! बघू या
आज कोणा कोणाच्या स्वयंपाकगृहात यांचा प्रवेश होतोय ते!....
🌹🌹🌹🌹🌹🌹

सोमवार, ११ मे, २०२०

मॅरेज ॲनिव्हरसरी...

असू दे अरेंज किंवा लव मॅरेजही
  तुझ्या सहजीवनी रहाण्याची लज्जतच न्यारी

 दिव्य गंधित प्रेमफुलाचा
 अस्वाद घेत नजाकतीनं भारुन जाते मी आजही
   क्षणोक्षणी अविरत

एक एक पाकळी उलगडताना हळूच मृदूल मुलायम
समाधानाचं सौंदर्य खुलत जायी बहरत बहरत

संसाराच्या मखमली वाटेवर
लागला खाचखळगा कधीतरी
तुझ्या भक्कम हातानं आधार दिला वरचेवरी

निर्धास्त मी तुझ्या सहजीवनी
सावलीत गार तुझ्या विसावूनी
आच कधीच आली नाही
अडचणींची माझ्या जवळी

अशीच साथ राहो कायम 
परमात्म्याला मागणं माझं
तुझ्यासह सहजीवनी
 वेचू देत सोनेरी क्षण

तुझ्या बळकट आधारात 
मला बुडून जाऊ देत
तुझ्या सवे जीवनाचा असाच 
आनंद टिपू देत...
असाच आनंद टिपू  देत..

_सौ.नंदिनी मधुकर.
दि.११मे,२०२०.

🌹🌹🌹🌹🌹

शुक्रवार, २४ एप्रिल, २०२०

चोचले जीभेचे.... दहीभात...

*चोचले जीभेचे*
*दहीभात*

©️नंदिनी म. देशपांडे.
__________________
  
जीवन करि जीवीत्वा
अन्न हे पूर्ण ब्रह्म
उदरभरण नोहे जाणीजे
यज्ञकर्म ।
    
    वैशाख वणव्यात सुर्यदेव अगदि सकाळपासूनच आपल्या किरणांच्या माध्यमातून या धरतीवर यज्ञोत्सव साजरा करतात ना, त्यावेळी
आपल्या पोटपुजेची सोय मस्तपैकी थंडावा देणाऱ्या एखाद्या पदार्थानं झाली तर किती छान ना!
     चला तर मग आपण आपली हा क्षुधाग्नी आज मस्तपैकी रसरशीत दहीभातानं पूर्ण करुया!
     ताजं ताजं लावलेलं गोडसं पण गारेगार अशा भरपूर दह्यामध्ये ताजाच शिजवलेला पण गार झालेला भात,त्यात चवीपुरते मीठ,साखर,कोथिंबीर घालून छानसं एकजीव कालवून त्यावर गार झालेली तुपजिऱ्याची फोडणी आणि त्यासोबत दोन तळलेल्या मसाला मिरची किंवा साधी सुकी मिरची....व्वा काय बिशाद आहे या मुखरसाची चव जाण्याची!
असा गार गार भात पोटात पडल्यावर काय पोटातून मिळणारा गारवा कोणत्याही कोल्ड ड्रिंक पेक्षाही तहान आणि भूक दोन्हीही शमवणाराच!
     दक्षिणेमध्ये तर सकाळी नश्त्याला खावयाचा असेल दहीभात तर,भातातच रात्री दुधाचं विरजण लावतात म्हणे...आणि तो तसा एकजीव झालेला खातात त्यावर बारीक कापलेला कच्चा कांदा घालून असं ऐकण्यात आलंयं...
   खूप जण शिळा भात दह्यात मिसळून हा दहीभात करतात...कधी कधी याला थोडेसे मेतकूटही लावतात....
     महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीमध्ये जेवणात शेवटी थोडासा तरी दहीभात खाल्ल्याशिवाय जेवणाला पुर्णत्व येतच नाही,अशी रीत आहे...
    थोडक्यात तुम्ही दहीभात कसाही बनवला तरीही चवीनं वेगवेगळा लागत असेल तरीही प्रत्येकाच्या आवडीचाच असेल हे मात्र नक्की!

🌹🌹🌹🌹🌹🌹

शनिवार, ११ एप्रिल, २०२०

चोचले जिभेचे...

# चोचले जीभेचे # ♦️

          ©️नंदिनी म.देशपांडे
   
  ♦️मेथीचं वरण♦️
     
     दररोज काय भाजी करावी?हे फार मोठ्ठं प्रश्नचिन्ह उभं असतं हल्ली प्रत्येक गृहिणीच्या चेहऱ्यावर...
सध्या लॉकडाऊन च्या काळात घरात होत्या नव्हत्या, त्या भाजा आता संपल्याएत किंवा संपत तरी आल्या आहेत...पण शक्य तेवढे घराबाहेर पडण्याचंही टाळायचंयं नक्कीच....
    असा विचार सर्वच गृहिणींच्या डोक्यात चालू आहे यात वादच नाही....ही गृहिणीना आपल्या उद्याच्या कामाचं,स्वयंपाकाचं नियोजन एक दिवस अगोदरच करत असते नेहमीच...मनात प्लॅन तयार असला म्हणजे कामं कशी पटापट आटोपली जातात...
    माझंही असंच आहे....उद्याच्या भाजीचं प्रश्नचिन्ह लाऊन विचार चालू होता...एवढ्यात त्या मेथीच्या वरणानं हात उंच केला...मला म्हणालं ते,"तू मला किती दिवस झाले स्वयंपकात लुडबुडू दिलं नाहीएस...भरमसाठ ताज्या ताज्या भाज्या आणल्यास की, तुला चक्क माझा विसर पडतो, हे लक्षात आलंयं माझ्या....त्याच त्या खाऊन कंटाळा आला, की मग मला आवाज देतेस...किंवा सारखं गोड खाऊन वीट आला की माझी आठवण काढतेस...नाही तर अशा आणीबाणीच्या परिस्थितीत मीच उपयोगी पडते हे गृहितच धरत असतेसच तू....म्हणूनच मी हात उंचावला,कळलं ना....

     मनाशीच हसले मी....आणि लक्षात आलं अरे,हो उद्या हेच बनवू आपण...वरण आणि भाजी दोन्हीही
'टू ईन वन' डिश मस्तच आहे...
     मेथीची जुडी नाहीऐ तर काय झालं आपण तिच्या बिया,मेथीदाणे वापरुया ...तुरीची डाळ शिजवताना त्यात थोडया जास्त प्रमाणात!....पातळ भाजी ईतपत दाटसर करुया हिंग,असेल तर ठिकचं कोथिंबीर,लाल शाबीत मिरची घालून वरण फोडणीला द्यावयाचे... नसेल तर तसेच....आणि वरतून त्यावर दोन चमचे वेगळी फोडणी घेऊ या...मस्त! चवदार जीभेला चव आणणारं खमंग!आणिक काय हवंयं....त्याबरोबर ताक,किंवा ‌कढी
आणि झणझणीत ठेचा... शिवाय गरमागरम भाकरी (शाळूची) अहो पंचपक्वांनाही लाजवेल असं जेवण....शिवाय वेळही निभाऊन नेते...
    ठरलं तर मग मी उद्याचं आमंत्रण आजच देत तुला...आता खूष ना!

   असं खुणावलं आणि अश्वासितही केलं त्याला....अन् निवांत पणे स्वतःला झोपेच्या स्वधिन केलं...

🌹🌹🌹🌹🌹🌹

मंगळवार, ७ एप्रिल, २०२०

करोना कर्फ्यूच्या करामती.

कोरोना कर्फ्यूतील करामती....

    त्या दिवशी संपूर्ण शहर बंद होते, कोरोनामूळे.... आणिक काय गंमत, खरोखर व्यापाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच असे वाटत राहिले...एखाद्या वाईट गोष्टींसाठी निषेध म्हणून पाळलेला बंद एवढा यशस्वी होत नाही,तेवढा ह्या करोनाच्या निषेधासाठी झाला होता....
    लागोलाग दुसरे दिवशी जनता कर्फ्यू आणि लॉकडाऊन ची घोषणा झाली....सलग सुट्टी अनुभवायला मिळतीए....शाळांना तर सुट्टी आहेच....बरीच अॉफिसेसही बंद किंवा अंशतः चालू....पण सर्वत्रच फील आहे तो सुट्ट्यांचा! 
   
       या कर्फ्यू मूळे
   ‌‌ घरातील जेष्ठांना सर्वात मोठा आनंद झालायं....घरातील लहानथोर मंडळी सारीच एकाच छताखाली....मस्त घर भरुन वाटतंयं...गप्पांष्टकांच्या बैठकी होताहेत...त्यांना दिवसभराची अशी सोबत खूप आनंद देऊन जातेय....
    
     गप्पांच्या ओघात घरा्तील तरुणांची गुपितं उलगडली जाताएत....
तरुणांच्या गाली गुलाब फुलताएत....चिडवा चिडवी...रुसवे फुगवे अगदी न्हाऊन निघालंयं अख्खं घर अशा खेळकर वातावरणानं...

      निमित्त कसंही असू देत पण शिक्षणासाठी बाहेर मोठ्या शहरात रहाणारी, हॉस्टेलवर रहाणारी सारी तरुणाई आपापल्या घरी एकत्रितपणे रहाण्याचा आनंद उपभोगत आहेत...
      घराच्या भिंतीही प्रसन्न होऊन या अनुभवाला मोकळेपणानं दाद देताएत...
    घरातला दिवाणखाना दिवसभर खळखळून हसतो आहे...बैठ्या खेळांना उदा:पत्ते,कॅरम,बुध्दीबळ अशा प्रकारच्या खेळांना चांगले दिवस आले आहेत....त्यातच टीव्ही महाशय सुध्दा दिवसाचे बारा तास बोलत रहातात....त्यांना थोडीही उसंत म्हणून मिळत नाहीए...

      मुख्य म्हणजे घरातील मुलांना घरकामाची ओळख होतीए....
   आणि हो, घरातलं किचन तर  अगदी चैतन्यानं फुलून गेलंयं...
गम्मत म्हणजे घरातील तरुणाई स्वयंपाक करण्यात वेगवेगळे प्रयोग करण्यात गुंतत आहेत...त्यात जास्तीतजास्त नाविन्य आणण्याचा प्रयत्न होताहेत.....हॉटेलिंगला कांही दिवस तरी पूर्णविराम मिळालायं....घरच्या अन्नपदार्थांचा भाव बऱ्यापैकी वधारलायं... किंबहूना पारंपारिक पदार्थांच्या रेसिपीजची
देवाणघेवाण जोरदार गतीनं चालू आहे...त्या आमलात आणत फोटोंची(पदार्थांच्या)
पाठवापाठवी होऊन आपल्याला जमलंय तर... याचा आनंद चेहऱ्यांवर मावेल का?अशी शंका उत्पन्न होतीए.... पारंपारिक पदार्थांची चव चाखत चाखत मिटक्या मारत खाणं काय असतं हे लहान थोर मंडळींना समजू लागलंय....
    
     घरातील पुरुष मंडळी अगदी पडेल ते काम करण्याची तयारी दाखवतेयं....घर सांभाळणं हे किती कठिण काम आहे,याची प्रचिती ते अनुभवत आहेत....आपल्या गृहलक्ष्मीचे कौतुक त्यांच्या मनात कायम घर करुन बसलंयं....
संसाररथाची दोन्हीही चाकं सक्षम असावयासच हवीत याचं महत्व त्यांना पटलंयं....
घरातील साऱ्यानाच 'काटकसर कशी करावयाची असते'? याचं प्रात्यक्षिक परिस्थाती शिकवत आहे....कारण संपलेलं आणण्यासाठी बाहेर जाणं टाळायचं आहे....हे प्रत्येकाला उमगलंयं...

    सर्वांत मोठ्ठा सकारात्मक बदल झालाय तो,महिलावर्गाच्या मानसिकते मध्ये....
एरवी घरकामाचा बाईंनी सुट्टी मागितली तर 'का कू' करत सुट्टी देणारी ही महिला स्वतःहोऊन कामवाल्या बाईंना,"तू सुट्टीवर जा",असं सुचवत आहेत...अर्थातच घरातलं सारं काम ईतर सदस्यांच्या मदतीनं पूर्ण करत कपडे, भांडी अगदी झाडू फरशीही याची कामंही या महिला लिलया हाताळत आहेत....मुख्य म्हणजे त्यांचा, "आपण हे काम पूर्ण आणि व्यवस्थित करु शकतो"या बाबतचा आत्मविश्र्वास प्रचंड वाढला आहे...'मी एक यशस्वी गृहिणी आहे' हे सिध्द केलंयं हा फील त्यांच्या मनात आनंदाच्या उकळ्या काढत आहे....
उलट नेहमी पेक्षा लवकरच आटोपतंयं काम... शिवाय बायकांची वाट बघणं नको की त्यांची आदळ आपट नको.....त्यांच्या वेळांचं बंधन पाळणं नको.....या गोष्टींचं महिला वर्गाच्या डोक्यावरचं ओझंचं कमी झालयं एकदम....म्हणून महिला वर्ग सध्या तरी हूश हूश न करता खूष खूष आहेत....

     सर्वांनाच नेहमीच्या वागण्यातील औपचारिक पणा झटकून मनाला वाटेल तसं वागण्याची थोडीफार संधी मिळाली आहे....कारण बाहेरचं कोणी येणार नाही हे सर्वच जण जाणून आहेत....
स्वावलंबनाचे धडेही घराघरातून गिरवले जात आहेत....
    अजिबात बाहेर न पडता घरात रहाण्याचं सुख सर्वांनाच भावतंय हे मात्र खरं...नको ती गर्दी,नको प्रदुषण,नको घाई घाई आणि नको तो दिवसभर बाहेर घालवून घरी प्रवेशताच आलेला थकवा...
आयुष्यात निसर्गानं म्हणा किंवा नियतीनं, आणलेला हा टप्पा सारेच जण मस्त एन्जॉय करताहेत अगदी, अबालवृध्दांपर्यंत...
ही सारी करोना कर्फ्यूचीच करामत नव्हे काय?
    लुटा तर मग या सुट्टीची मज्जा!घरातच राहून,सुरक्षित अंतर ठेवून पण खेळीमेळीनं....आपली आणि कुटुंबाची काळजी घेऊन....😊🙏🏻 

नंदिनी म.देशपांडे.

🌹🌹🌹🌹🌹🌹

‌.

मंगळवार, ३१ मार्च, २०२०

चोचले जीभेचे... मेतकूट...

गुढिपाडवा झाला की,ठेवणीतल्या किंवा साठवणीच्या पदार्थांचे वास आसंमंतात दरवळू लागतात...त्याची मागच्या वर्षीच्या चवीची आठवणही जिभेवर आंमल करु लागते...याच दिवसांत दिवस मोठा होत जातो आणि रिकमपणही बऱ्यापैकी हाताशी असतं...उन्हाळ्याची चाहूल मेतकूट लावलेले कच्चे पोहे, मुरमुरे त्यात भरपूर शेंगदाणे....यांची आठवण करुन देतात...तर दुपारची वेळ सातुच्या पिठाची सय आणत रहाते...
उन्हाळ्यात कांहीतरी चटक मटक आंबट आंबट खाण्याची ईच्छा होते...जिव्हेचे चोचले पुरवण्यासाठी या महिना दोन महिन्यांसाठी मेतकूट,सातूचं पीठ आणि पुडचटणी जर असेल घरात, तर खवय्यांना वेगवेगळे पदार्थ बनवण्याची रेलचेल करता येते....

*मेतकूट* एक अत्यंत उपयोगी,तोंडाला चव आणणारं टिकणारा असा पदार्थ बनवण्याचं माध्यम...किती किती म्हणून उपयोग कराल याचे!एक तर मेतकूटाला लग्नाच्या तयारीतील पदार्थांमध्ये खूप मानाचं स्थान आहे.... शुभ शकूनाचा मान म्हणून येणाऱ्या जवळच्या पाहूण्यांना थोडा तरी नमुना चिवडा लाडू बरोबर देण्याची पध्दत आहे...
शिवाय थोडंसं दही टाकून पातळसर केलेल्या मेतकुटावर फोडणी टाकली थोडी की,जेवणातील चटणीची किंवा कोशिंबीरीची जागा भरुन निघते....जीभेची रसतृप्ती होते ती वेगळीच...अहो,गरमागरम मऊ भातावर लोणकढं तूप आणि मेतकूट मीठ लावून मस्त कालवून खाल्लेल्या भाताची चव....
अहाहा!सोबत एखाद्या लोणच्याची फोड असावी...... मेतकूटावर कच्चं तेल नि मीठ टाकून त्यासोबत शिळी भाकरी किंवा पोळी!एकदा खाऊन तर बघा,संपलं तरीही बोटं चाखत रहाल नुसते...
गार भातावर मेतकूट आणि त्यावर फोडणी ही चवही खासच...तुमच्या पुलावला लाजवणारी...
मेतकूटाची खरी किंमत उन्हाळ्यात मुरमुरे खाताना लक्षात येते...कच्चे मुरमुरे त्यावर भुरभुरलेले मेतकूट,मीठ,कच्चे शेंगादाणे,लावली तर थोडीशी पूडचटणी, आणि कच्चा कांदा.... व्वा!यासारखी चवदार डिश नाही दुपारच्या खाण्याची...
असंच काहिसं पोहे,ज्वारीच्या लाह्या यांंचही कॉम्बिनेशन चवदार!
ढोकळे भात, विदर्भातील एक भाताची चविष्ट डिश!अहो तो तर मेतकूटाशिवाय बनतच नाही...
मेतकूट खरं म्हणजे हा महाष्ट्रीयन पदार्थच आहे का दक्षिणेतला?असा संभ्रम पडतो...कारण तिकडे मेतकूट भाताशिवाय जेवणाला पुर्णत्वच येत नाही...
पण काहीही असले तरीही,मेतकूट एक खमंग माध्यम म्हणून आणि आयत्यावेळी अतिशय उपयोगी ठरणारा पदार्थ, प्रत्येकाच्या स्वयंपाकगृहात आपली खास जागा बनवून आहे...म्हटलं तर त्याशिवाय काहीच अडणार नाही पण म्हटलं तर खूप काही अडेल असा एक ठेवणीतला पदार्थ...
सध्याच्या लॉकडाऊन काळात तर फारच उपयोगी पडणारा...

*नंदिनी म.देशपांडे*

🌹🌹🌹🌹🌹🌹

*मेतकूट*

साहित्य:

* एक वाटी चनाडाळ
* एक वाटी उडिद डाळ
* एक वाटी धणे
अर्धी वाटी गहू
* पाव वाटी तांदूळ
* पाव वाटी मुगाची डाळ
* अर्धी वाटी जिरं
* तुपाची वाटी अर्धी मोहरी
* तुपाची वाटी अर्धी मेथीदाणे
* सुंठीचे चार कोंब
* चवीनुसार हिंग
*!हळकुंडाचे कोंब दोन किंवा हळद पावडर

वर दिलेले साहित्य कोरडेच वेगवेगळे चांगले भाजून एकत्र करावेत आणि बारीक दळावेत...
मेतकूट तयार...

*नंदिनी म.देशपांडे*

🌹🌹🌹🌹

चोचले जिभेचे...

चोचले जीभेचे.              _____________

*पुडचटणी*

    खरं म्हणजे येसर, मेतकूट आणि पुडचटणी ही सारी एकाच कुटुंबातील सख्खी भावंडं....एकाचं नाव घेतलं की साऱ्यांची जोडीनं येतातच...
    ही तीघंही लग्नकार्यात तेवढीच महत्त्वाची,टिकणारी आणि तोंडाची चव वाढवणारी....
     मेतकुटाविषयी सांगून झालंय आज इतर दोघेजण....
  ‌‌पुडचटणीआंबटगोड चवीची, उन्हाळ्यात हमखास तोंडी लावणं म्हणून भुमिका निभावणारी! उन्हाळ्यात जेवणावरची 
ईच्छा थोडी कमी होते माणसाची, त्यावेळी चव आणण्यासाठी अती उत्तम...
    या शिवाय चिवड्याला किंवा मेतकूट लावलेल्या मुरमुऱ्याला थोडी पुडचटणी भुरभुरुन लावली की झक्कास चव येते!तुमचा बाजारी चिवडा मसाला या पुढे अगदी "ह्है" असाच....
    याशिवाय आपण आंबट वरण(आमटी)बनवतो त्यावेळी,त्यात चमचाभर पुडचटणी घातल्यास मस्त चव येते...बटाट्याची रस्सा भाजीची चवही या थोड्याशा चटणीनं चवदार बनते...
     अशी ही पुडचटणी कोणी वरतून कच्चं तेल,कोणी थोडीशी फोडणी वरतून टाकत आवडीनं खातात. किंवा तशी कोरडीही पोळी, भाकरीबरोबर लज्जत वाढवते...
कधी तोंडी लावणं,(चटणी)तर कधी मसाला म्हणूनही फार उपयोगाची!घरात आवर्जुन असावी अशीच!घरच्या घरी बनवता येणारी...घरातील सदस्य अगदी जिभल्या चाटत चाटत खातील आणि कधी संपली ते कळणार सुद्धा नाही!

*येसर*

      पूर्विच्या काळी एखादं लग्नकार्य असेल  तर चांगले ८-१५ दिवसांपासून घरी पाहूण्यांचा राबता असायचा....कालौघात अनेक कारणांमुळे  कमी झालायं....
पण देवकार्या च्या दिवशी येसर हा पदर्थ आवर्जुन लागायचाच....गम्मत म्हणजे, लग्नकार्य आटोपले,नवरा नवरी स्थिरस्थावर झाली तरीही,कांही मानाची मंडळी लग्नघरी मुक्काम ठोकून असायची....अशा वेळी एक दिवस जेवणात येसर वड्यांचा बेत केला जाई....असणाऱ्या पाहुण्यांनी येसर वड्यांचा यथेच्छ पाहुणचार घ्यावा आणि लग्नघराचा निरोप घ्यावा हे सुचवण्यासाठी ही पंगत असायची....
ही पंगत झाली म्हणजे ताम्हण पळीनं वाजवत असत....याचा अर्थ, "पाहुणे मंडळींनो,आता आपण आपल्या गावी जाण्यासाठी प्रस्थान करा". असा असायचा....त्यांच्या
सोबत येसर मेतकुटाचा नमुना चिवडा लाडू बरोबर दिलाच जायचा...
    हल्ली आपण हॉटेल्स मध्ये पाठवड्यांची भाजी म्हणून जे खातो ना,त्याचे मुळ या येसरवडीच्या डिश मध्येच आहे बरं का....

*नंदिनी म.देशपांडे*.

🌹🌹🌹🌹🌹🌹

 ‌*पुडचटणी*

साहित्य.

* एक वाटी चनाडाळ
*एक वाटी उडीद डाळ
*एक वाटी धणे
*अर्धी वाटी तीळ
*अर्धी वाटी ‌किंवा थोडी त्या पेक्षा कमी जिरं
*हिंग चवीनुसार
*चिंच किती प्रमाणात आंबट लागते त्या नुसार (वाळलेली)या प्रमाणाला पाऊण ते एक वाटी
*गुळ साधारण तेवढाच
*तीखट चवीनुसार
*मीठ चवीनुसार

कृती.
सर्व डाळी,आणि धणे जिरं,तीळ वगैरे वर दिलेलं सर्वच साहित्य वेगवेगळं असं थोड्या तेलावर खमंग भाजून एकत्र करावे.
तीखट,मीठ,हिंग भाजण्याची गरज नाही.
पण शाबीत लाल मिरची घेतल्यास थोड्या तेलावर परतून घ्यावी.
चिंचेच्या रेषा काढून ती पण तेलावर भाजून घ्यावी.भाजलेली चिंच गार झाल्यानंतर कडक होते.चिंच चिंचोके काढून असावी.
या साऱ्या मिश्रणात चिरलेला गुळ घालावा (मिश्रण गार झाल्यानंतर)
नंतर हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे
एकदा फिरवून घेतलेल्या मिश्रणाची चव एकजीव होत नाही म्हणून एकदा मिक्सर मधून काढलेले मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून एकजीव करावे म्हणजे चटणी चवदार लागते....
हे तयार झालेले रवाळ मिश्रण म्हणजेच तयार झालेली पुडचटणी!ही चांगली ३-४महिने टिकते.आंबट गोड असते म्हणून काचेच्या बरणीत भरून ठेवावी.

©️ 
*नंदिनी म.देशपांडे*.

🌹🌹🌹🌹

रविवार, २२ मार्च, २०२०

कोरोना

*कोरोना*

     एवढासा जीव पण दहशत किती देवू.... असं झालंय खरं त्या बारीकशा विषाणूला....
जेमतेम १४-१५ तास त्याचं आयुष्य....पण शतायुषी मजल मारणाऱ्या अती बुध्दीमान प्राण्याला, माणसाला अगदी कःपदार्थ ठरवलंयं त्यानं आपल्या समोर....
व्यवहार सगळेच ठप्प!सगळीकडे भयाण शांतता,भरीस रणरणतं ऊन....आंतरबाह्य भयाण शांतता...ना कोणाचे खाण्यात लक्ष ना टीव्ही बघण्यात....टीव्ही वरही त्याच त्या कोरोनाच्या बातम्या...अख्खा टीव्ही व्यापून गेलाय कोरोनानं.... त्यावरती येणारे आकडेही धडकी भरवणारे....घरातील भिंतीवरच्या घडाळ्याची टिकटिक सुध्दा भयानक वाटतीए... रस्त्यांवर शुकशुकाट...कुत्री सुध्दा म्लान होऊन निपचित पडलेली....झाडं मलूल झालीएत...एखाद दोन छोटे पक्षी हिंमत करताएत माणसाला साद घालण्याची ....तर फुलां भोवती गुंजारव करणारा भुंग्याचाही नाद नकोसा झालाय...कॉलनीतल्या एखाद्या घरातून ऐकू येणारा लहान मुलाचा आरडा ओरडा फारच कर्कश्श वाटतोय....
एखादा पादचारी चुकून माकून दिसलाच रस्त्यावर,तर तो कोरोना तर वाहून नेत नाहीएना?अशी धास्ती वाटतेय...कुणाकडे जाणं नको,कुणी आपल्याकडे येणं नको असं झालंय खरं...लगेच आंर्तमनातून आवाज येतो....तू तरी कुठे सेफ आहेस ? दोन दिवस घरात बंद होऊन बसलाएस,पण 'तो' विषाणू कधीच प्रवेशणार नाही याची तरी काय शाश्वती?....
 केवळ प्रयत्न,संयम,स्वच्छता,प्रतिकार क्षमता नि, सहनशक्ती ‌हीच खरी आपल्याजवळची शस्त्रं.... तीच कायम उपयोगात आणावी लागणार आपल्याला...तो,तो विषाणू वरचढ ठरतोय माणसाला...औषधालाही दाद देत नाहीए...म्हणून काय शांत बसायचंयं? अजिबात नाहीच...लढा द्यायचाच त्याच्याशी....त्याला पराभूत करुन सोडायचंच...सर्व जनशक्तीनीशी....युक्तीनीशी.. त्यासाठीच तर हे आजचं पहिलं पाऊल....नक्कीच यशस्वी होणार म्हणजे होणार म्हणजे होणारच...

नंदिनी म.देशपांडे
दि..२२ मार्च,२०२०.

👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

रविवार, ८ मार्च, २०२०

माझी आजी.

*माझी आजी*

       गोरी गोरी पान,तकतकीत सुरकुतलेली कांती,मध्यम ऊंची पण ताठ कणा...माझ्या आईची आई...माझी आजी....माहेरची शारदा तर सासरची पार्वती!
   आमच्या कुटुंबात दर वेळी आंबट वरण आणि गोळेभात आणि बटाट्याची चिंच गुळ घातलेली भाजी बनवण्याचा बेत झाला की, हमखास आजीची आठवण आजही येते...हे तीनही पदार्थ अतिशय साधे,सोपे अगदी सहज बनवले जाणारे, पण तिच्या हातच्या चवीची अशी आम्हाला आजही जमत नाहीत...कितीही प्रयत्न केला तरीही...
    ९३ वर्षांचे आयुष्य तिला मिळालं. पण तिला सधवा बघितल्याचे खूप पुसटसे आठवते...मी सहा वर्षांची असतानाच आजोबा गेले आणि आजीनं केशवपन केलं..त्या नंतरचीच आजी आजही मनाच्या एका कप्पयात तिची अशी एक जागा कायम करुन आहे...आजीला जाऊनही वीस वर्षे झालीएत आता... पण तिच्या आठवणी,तिचा करारीपणा,खंबीरपणा,तिची कणखर वृत्ती आजही आठवत रहाते... निमित्ताने....
   आजीचा सतत कांहीतरी कामात अण्याचा स्वभाव तर सवयीचाच झाला होता...आजोबांकडे भोवतीच्या बऱ्याच गावांचं पांडेपण होतं....त्यांचा लोकसंपर्क आणि घरी पाहूण्यांची वर्दळ नेहमीच असायची...‌
     औंढा नागनाथ हे माझं आजोळ...म्हणून तेथील प्रत्येक घराचं नागनाथ हे अराध्य दैवत....दररोज सकाळी सोवळ्यात स्वयंपाक आटोपून आजी देवाला,म्हणजे नागनाथाला जाऊन यायची.हाती पितळेची जाळीची कलाकुसर असणारी जड फुलदाणी घेऊन...त्यात परसबागेतीलच पांढरी, लाल कन्हेरीची फुलं आणि बेलाची काही पानं... त्यावेळी तेथील स्थानिक रहिवासी मंदिरात दर्शनासाठी जाताना अनवाणीच जात असत...बाराही महिने...गावातील बहुतेक स्त्रीयांचा असाच नियम असायचा...मग रस्त्यात परस्परांची विचारपूस व्हायची...पण तरीही अर्ध्या तासाच्या आत आजी घरी परतायची....
    वयाच्या नव्वदीपर्यंत आजी कुठेही गेली,अगदी आमच्या घरीही म्हणजे तिच्या लेकीकडे,नातीकडे,एखाद्या बहिणीकडे,भाचीकडे तरी, साऱ्यांचा स्वयंपाक तीच करायची...तिला सोवळ्यात होऊन तिचा करायचाच असायचा पण साऱ्यांचा करण्यात तिला आनंद वाटायचा... 
    आमच्याकडे आली आजी,की घरातील प्रत्येकाच्या आवडीनुसर दररोज एक फर्माईश ती पूर्ण करायचीच....आजी आली की आईला आराम होई...दुपारीही तीनं फार तर अर्ध्या तासापेक्षा जास्त कधी वामकुक्षी घेतलेली आठवत नाही मला....तिचा हात चालूच असायचा सारखा....कधी जात्यावर स्वतः मेतकूट दळून ठेव तर कधी सातूचं पीठ....काहीच काम नसेल तर सपीट काढून गव्हले (वळवट) तरी बनवून ठेवायचीच....एवढे बारीक,शुभ्र आणि पांढरे की बस्स !! खीर खाताना किती मेहनतीचं जिन्नस आहे हे!याची आम्हाल जाणीव व्हायची...
   तिच्या काळात महिलांच्या शिक्षणाला फारसे महत्व नव्हते,पण ती शिकली असती तर नक्कीच बुध्दिमान विद्यार्थ्यांमध्ये तिची गणना झाली असती....
ती किती शिकलीए याची चौकशी मी पण केली नाही कधी,पण दररोज तुळशीपुढे "श्रीराम प्रसन्न" ही अक्षरं रांगोळीनं सुरेख काढायची...
कामाचा उरक आणि टापटिपपणा तर एखाद्या तरुणीला लाजवेल असाच शेवटपर्यंत होता...आपले काम आपणच करायची...कधीही परस्वाधिनत्व पत्करण्याची वेळ तिच्यावर आली नाही...
आपलं पातळ दररोज स्नान झाल्याबरोबर स्वतःच धुवून टाकायची...कायम पांढरं पांढरं शुभ्र असायचं ते...आई कधीतरी गडद पिवळ्या किंवा गुलबक्षी रंगाचं नेसावयास लावायची तिला ते फार खुलून दिसायचं....म्हातारपणातही तिच्या अंगावर...
    आजीसह त्या सहाजणी बहिणी आणि दोन भाऊ होते...या भावंडांमधील परस्परांचे प्रेम फारच वाखाणण्यासारखं होतं...सारीच नाती शेवटच्या क्षणापर्यंत तिनं जीवापाड जपली होती...
    तिनं कधीच कोणाला रागवून बोलल्याचं ऐकलं नाही मी...पण आपला नातू लहान वयात स्वतः एकटा चारचाकी चालवत मध्यरात्री आलेला बघून आईची मात्र चांगलीच कान उघडणी केली होती तिनं...त्यावेळी दुधापेक्षा दुधावरची साय तिच्या मायेला सरस ठरली होती...
    आलेल्या परिस्थितीला धैर्यानं तोंड देण्याची कला तिला आत्मसात होती...तिच्या आयुष्यात प्रत्येक अडचणीच्या परिस्थितीवर तिनं यशस्वीपणे मात केली...आपल्या सुनेला आणि नातवंडांना खंबीरपणे उभं रहायला शिकवलं तिनं....स्वाभिमानानं जगायला शिकवलं...
अत्यंत वैभवाचे दिवस तिनं उपभोगले तसे उतारवयात काही हलाखीचे दिवसही सोसले...खंडीभर गाई वासरं म्हणजे कशी असतात?ते तेथल्या गोठ्यांमध्ये अनुभवाला आलं होतं आम्हाला....पण नातवांसाठी घर आणि शेती जीवापाड सांभाळून ठेवली...त्याची फळं आज नातवंड,पतवंड चाखत आहेत...आईनं प्रेमानं एखादी भेटवस्तूही देऊ केली तर कधीच घ्यायची नाही तिने....जावयाचं काही घेत नसतातच...या सबबीखाली...
    ती एक वेळेलाच जेवायची...रात्री अर्धी ज्वारीची दशमी आणि मीठभुरका किंवा मुरमुऱ्याचा एक प्लेट चिवडा एवढाच आहार घ्यावयाची...मला वाटतं तिच्या दिर्घायुष्याचं हेच रहस्य असावं...नेहमी पेक्षा दोन घासही ती कधीही जास्त खायची नाही पण शेवटपर्यंत काटक होती...
आजी आली की तिच्या दशमीवर आमचा डोळा असायचा...त्यातील थोडी मला मिळायचीच....तिला त्याबरोबर माझ्या हातचा मिठभुरका आवडायचा....मी त्यात किंचित साखर घालत होते त्यामूळे तीखट लागायचाच नाही..त्याचे तिला फार आश्चर्य वाटायचं...पण मी माझं गुपित तिला कितीतरी वर्ष कळूच दिलं नव्हतं...पण ती जेंव्हा स्वतःहोऊन मला तो करावयास लावायची ना,त्यात फार धन्यता वाटायची मला... कारण तिची तेवढीच काय ती सेवा घडण्याची संधी मला मिळयची....
   आमच्या घरी आली आजी की,कधीही जावयाच्या समोर बसलेली किंवा त्यांना प्रत्यक्ष बोललेली मी बघितली नाही...
    आम्हा नातवंडांशी,आईशी गप्पागोष्टी रंगात आल्या की बाबा सामिल होण्यासाठी येत, पण आजी लगेच काढता पाय घेत असे...
कोणत्याही परिस्थितीत तिनं आम्ही आजोळी गेल्यानंतर आम्हा नातवंडांची,लेकीची किंवा जावयाची गैरसोय शेवटच्या श्वासापर्यंत होऊ दिली नाही....तिला आपल्या जावयाचं फार कौतूक आणि अभिमान वाटायचा....
   साऱ्या नातवंडांचे दोनाचे चार हात झालेले तिने बघितले...प्रत्येकाचा संसार बघून सुखावून गेली....शेंडेफळ नातवंड माझा भाऊ...त्याच्या लग्नाला मात्र ती हजर राहू शकली नाही...कारण तेवढा प्रवास झेपण्यासारखं तिचं वय नव्हतं...आम्हा सर्वांना तिची त्यावेळी फार उणीव जाणवत होती...कारण दर कार्यात,कोठीघर आणि देवधर्माचा विभाग ती अत्यंत कुशलतेनं हाताळायची... आईनं तिला लग्नानंतर लवकरच नवदाम्पत्याला तुझ्या आशिर्वादासाठी घेऊन येते.असे आश्वासन दिलेले होते....ती दोघं फिरुन आली की तीन आठवड्यातच आम्ही सारेच तिच्या भेटीला औंढ्याला गेलो...अत्यंत वृध्दावस्थेमूळे तब्येत तोळामासा झाली होती...पण डोळ्यात प्राण आणून नातवाला व नातसुनेला आशिर्वाद देण्यासाठीच जणू त्या प्राणपक्षाला तिनं जिद्दीनं आपल्यातच थोपवून धरलं होतं...स्वतःला शक्य नव्हतं, पण मामीकडून तिनं दरवेळी प्रमाणे याही वेळी  तुकडा ओवाळून पायावर पाणी घालत आम्हा सर्वांचं स्वागत केलं...यथोचिच स्वयंपाक बनवावयास लावून व्यवस्थित पाहूणचार केला...राखी पौर्णिमेचं आईला मामाला औक्षवण करावयास लावलं....आम्हा सर्वांना हसतमुखानं वाटी लावलं (निरोप दिला)‌आणि दुसरे दिवशी पहाटेच पाच वाजता अगदी तृप्ततेनं शांतपणे आपल्या अडवून ठेवलेल्या प्राण पक्षालाही निरोप दिला....कायमचा....
    
   आज जागतिक महिला दिन...शब्दांतून आजीला आदरांजली वहावी असं मनापासून वाटलं आणि लिहिती होत तिच्या आठवणीत रममाण होत नतमस्तक झाले...तिच्या जिद्दीला,काटकपणाला,कणखरपणाला,स्वच्छता,टापटिपीला,सुगरणपणाला,तिच्या माणसं जोडून ठेवण्याच्या स्वभावाला,शिस्तीला त्रीवार अभिवादन करत !!!! 🙏🏻🙏🏻🙏🏻

  *नंदिनी म.देशपांडे*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹.

शनिवार, ७ मार्च, २०२०

तू स्त्री आहेस म्हणून....

‌   *तू एक स्त्री आहेस म्हणून*
*~~~~~~~~~~~~~~* 
 ‌       आईच्या गर्भातच कायमचं खूडून टाकण्याचा प्रयत्न होतोय गं तुला.... जन्माला येण्याआधीच तुझा मृत्यू घडवून आणला जातोय.... का तर तू एक स्त्री आहेस म्हणून.... याला खतपाणी मिळतंयं घरातल्या जुनाट विचारांकडून....त्यांचा पगडा असणार्‍या तुझ्याच माणसांकडून.... काय ही शोकांतिका ?कुठे फेडतील ही पापं ही लोक....

    बरं तू जन्माला आलीसही.... सिद्ध केलंस स्वतःला आपल्या स्वतःच्या मेहनतीनं आपल्या बुद्धी सामर्थ्यावर...‌ तर, तर तुझ्या उच्च शिक्षणासाठी मोडता घातला जातो....आम्ही आता उजवून टाकणार,तुला.,..आमच्या कर्तव्यातून मुक्त होणार आम्ही....जे काय शिकायचे ते नवऱ्याकडे कडे जाऊन....का तर तू एक स्त्री आहेस म्हणून...

     मग धसास नेतेस गं तू लग्नानंतरही हीच जिद्द शिक्षणाची... व्यवस्थित संसार सांभाळत घरच्या रूढी-परंपरा,रितीभाती सांभाळत,सर्वांचं सर्व काही करत असतेस. रात्रंदिवस जागून, नेतेस तुझ्या शिक्षणाची नौका पार करत.... पण आता बस झालं नोकरी वगैरे ची गरज नाहीये.... तुझ्या पैशावर काही घर चालणार नाही ....."आता पाळणा हळू द्या", अशा सूचना होतात....पुन्हा पहिलाच कित्ता,का....तर तू एक स्त्री आहेस म्हणून....  

    पाळणा लवकर हलला तर ठीकच.पण वेळ लागू लागला तर तुलाच दूषणं दिली जातात...तुला वांझ म्हणत हिणवलं जातं.... कुटुंबातील तुझं अस्तित्व पुसून टाकण्याचा प्रयत्न केला जातो..... का तर तू स्त्री आहेस म्हणून....

    वाढत्या संसारात वेलीवरच्या दोन तीन साजिऱ्या फुलांचं,घरातील ज्येष्ठांचं, नवऱ्याचं,करत करत एव्हाना फार मागे राहिलेल्या आपल्या करिअरला तू विसरूनही जातेस .... मुलं मोठी होत जातात....आपले छंद आवडीनिवडी भटकंती यामध्ये रममाण होतात....पण तुझी वैचारिक प्रगल्भता आणि बौद्धिक चातुर्य तुला अस्वस्थ करत रहातं....

    हल्ली खरंतर खूप रिकामा वेळ मिळतो आपल्याला....तो सत्कारणी लावून, बघूया चार पैसे मिळाले तर ....आपल्या आवडीचे काम मिळते का कुठे ते? पण कसचे काय ?बराच काळ पुढे सरकलेला असतो.... आतापावेतो पुष्कळशा संधी दारावर टिकटिक करत पुढे सरकलेलल्या असतात....वयाचा आकडा सुद्धा संधींना सीमारेषेच्या आत येऊ देत नाही... शिवाय ,"तुला काय कमी आहे आत्तापर्यंत काही कमी केले आहे का मी?आहे ते सर्व तुझंच तर आहे.....कशाला हवीए धावपळ?कर की ,थोडा आराम....असे सल्ले वजा संवाद घराच्या चार भिंतीत होऊ लागतात....का, तर तू एक स्त्री आहेस म्हणून....

    तुझ्या करिअरला महत्व नसतंच मुळी.... कालौघात जावई सुना येतात.... घर कसं माणसांनी भरुन जातं...छोटी नातवंड चिव चिव करत असतात....आजोबा रिटायर्ड झाले तरीही,आजी आजोबा सुखाने राहतील एवढी पेन्शन त्यांना मिळत असते.... मुलं-मुलगी , सून,जावई सारे कमावते असतात.....कोणाला काहीही कमी नसतं.....पण तुझं आईचं अंतःकरण ना!.... तुला चार सहा महिन्याला लेक घरी आली की साडीचोळीनं तिची पाठवणी करावीशी वाटते....नातवंडांचे लाड करावेसे वाटतात..... निमित्तानं जावयाला  कधीतरी कौतुकानं सूटबूट शिवावा वाटतो.... सासुरवाडीचा....कौतूक म्हणून....पण येथेही माशी शिंकतेच....काही फालतू खर्च नकोयंत आता.....त्यांच्या लग्नात झालंयं सगळं यथायोग्य आता काही देणं-घेणं नको....मुलगी परक्याचं धन....तिच्यावर कशाला हवाय खर्च ?...तू बिचारी गप्प बसतेस... मनातून दुखावली जातेस....मनाची कुचंबणा सहन करत....सबला बनण्याच्या तुझ्या प्रयत्नांवर जाणीवपूर्वक पांघरूण घालत....तू अबलाच कशी राहशील याचे प्रयत्न होत राहतात.... त्याची प्रौढी मात्र मिरवली जाते....का तर तू एक स्त्री आहेस म्हणून.... 

      तुझंही वय उतरणीला लागलेलं असतं...आर्थिक सूत्र तुझ्याकडे नसतात....आता तुझ्या सर्व गरजा वेळेवर भागवल्या जातात....मग तुला हातात रक्कम कशाला हवी आहे ? दिलीच तर त्याचा हिशेब मागितला जातो.....कारण तुला आर्थिक व्यवहारांचं निर्णय स्वातंत्र्य उरत नाही... काहीच आवश्यकता नाही याची....या सबबीखाली... तुझ्या हातात पैसा खेळू नये याची व्यवस्थित तरतूद होते...का तर तू एक स्त्री आहेस म्हणून.....

      उतारवयात तू ही शरीराने थकलेली असतेस....मनाने खचून जातेस.....आणि मुख्य म्हणजे तुझी आता गरजच उरलेली नसते....विरोध केलास तू, तरी त्याची किंमत काहीच नसते..... का तर तू एक स्त्री आहेस म्हणून.....

      मुलं मोठी होत राहातात.... त्यांची आकाशं विस्तारतात.....त्यांचे मार्ग सुध्दा बदलतात.....पण आई-वडिलांच्या पुंजीची बरोबरीनं हिस्सेदार होतात......"आता तुमचे असे किती दिवस राहिले  आहेत ? कशाला हवंयं तुम्हाला ऐश्वर्य ?" असं म्हणत, आपल्या पदरात गोडीगोडीनं काढून घेतात.....कारण ती या घरची कुलदिपकं असतात....मुलगी परकी....आणि मुख्य म्हणजे,ती एक स्त्री असते म्हणून.... 

       याही वेळी पूर्णपणे अबला ठरलेल्या तुला एक 'आई' म्हणून लेकीला काहीतरी द्यावं असं मनातून वाटतच राहतं.....तुझी इच्छा पूर्ण होणार नाही हे माहित असतानाही.....कारण तुझं आईचं अंतःकरण असतं..... तुझ्याच  हाडामासाची बनलेली तीनही मुलं...तुझाच एक भाग असतात....तू कधीच त्यांच्यात आपपरभाव करत नसतेस.... कारण तू एक स्त्री आहेस म्हणून...

      आपल्या साऱ्या मुलांशिवाय तुझं संसारचक्र पूर्ण होऊच शकत नाही....या वर्तुळावर तुला आपला नवरा,मुलं,सुना,जावई नातवंडं सारी हवी असतात....आपण स्वतःला झिजवून उभ्या केलेल्या संसार विश्वात तू कायम तुझ्या साऱ्या लेकरांना समान दर्जा देत असतेस....प्रत्येक पाखरावर सारखीच माया आणि प्रेम करत असतेस....त्यांच्याशिवाय तुला पूर्णत्व नसतंच....हे पूर्णत्व आल्याशिवाय  तू मोकळा श्वास घेऊ शकत नाहीस....कारण कारण तू एक स्त्री आहेस म्हणून....

     स्त्रीच्या जन्माला आल्यानंतर तुला,जन्मापासून ते वृद्धत्वा  पर्यंत काळानं बरंच काही शिकवलेलं असतं......दुर्दैवानं कधीतरी बंड करुन तू एकटी उभी राहिलीस  कुणाच्याही आधारा शिवाय..... तर,तर भोवतीच्या घाणेरड्या नजरांचा सामना तुलाच करावा लागतो.... संशयाच्या भोवर्‍यात तुलाच अडकावं लागतं.... कारण कारण तू एक स्त्री आहेस म्हणून .....

    नराधमांच्या हैवानी वृत्तीची शिकार तुलाच व्हावं लागतं नव्हे,तुला जीवंत ऊभं जाळलं जातं.....कारण तू एक स्त्री आहेस म्हणून....

       पावलोपावली, तू एक स्त्री आहेस याची जाणीव तुला करवून दिली जाते....जेणे करून तुझं मानसिक खच्चिकरण होईल....कारण तू एक स्त्री आहेस म्हणून....

अगं तू कितीही स्त्री-पुरुष समानतेचे नारे दिलेस,निशाणं फडकवलेस,तरीही ते फाडूनच टाकले जातात....कधी या पुरुषप्रधान समाजाकडून,कधी धार्मिक नियमांचा भंग होतो या सबबीखाली....तर कधी तू वरचढ ठरशील या धास्तीनं....आणि रुढी परंपरांच्या पगड्यांनं...कारण तू एक स्त्री आहेस म्हणून....

    कधी तू सबला बनलेली नसतेस..... तू कायम अबलाच असते....सर्व बाजूंनी हेळसांड होते ती केवळ तुझीच....कारण तू एक स्त्री आहेस म्हणून......

      महिला दिनाचे कितीही गोडवे गायलेस,कितीही आनंद उत्सव साजरे केलेस,तरी आपल्या समाजात असणाऱ्या अशा मनोवृत्तीचं ,तुला कायम कमी लेखणाऱ्या या प्रवृत्तीचं  समूळ उच्चाटण झाल्याशिवाय तुझा गौरव कधीच होणार नाही.....तुझा सन्मान तुझ्यापर्यंत कधीही पोहोंचणार नाही.... कारण तू एक स्त्री आहेस म्हणून....

  तरीही

  *जागतिक महिला दिनाच्या तुला भरभरुन शुभेच्छा*

*©*नंदिनी म.देशपांडे*.

*मार्च,७,२०२०*
*औरंगाबाद*

🌹🌹🌹🌹🌹🌹

शनिवार, २९ फेब्रुवारी, २०२०

फुलपाखरू.

फुलपाखरू झालो रे
मी फुलपाखरू झालो

हिरव्या पानांचे पंख
लाऊनी बागेमध्ये आलो
सुपाएवढे पंख लावून
मोर पिसाऱ्या सम
फुलवत पिसारा मी 
  हर्षोल्हासित रे झालो
फुलपाखरू झालो रे...

वाऱ्यासवे खेळून मस्त
आनंदाने डोलू लागलो
गुलाब फुलाचे रुप
घेऊनी राजा बनून
राहिलो
फुलपाखरू झालो रे...

--- नंदिनी.

🌹🌹🌹🌹

हसती खेळती सकाळ.

आली हासत खेळत सकाळ
उधळत पानांतून रंग बहार
आली हासत खेळत सकाळ

हिरवा कंच तो रंगबावरा
पोपटी सुंदर खूप देखणा
पिवळा हळदीचा  नाजूक कोवळा
आली हासत खेळत सकाळ...

अमसुली असे रसभरीत
छानसा
या सर्वांवर मोहोर अलौकिक
लाल गुलाबही हासून देई
हसरी नाचरी रंग पसरवी
आली हासत खेळत सकाळ....

मनांस अवघ्या प्रफुल्लित बनवी
आणि देई नयन सुखही
अपरंपार
आली हासत खेळत सकाळ....

__ नंदिनी.

🌹🌿🌹🌿🌹🌿

गंगाजळी फुलं.

पीत अन् केशरी फुलांनी
हिरव्या पानां सवे हासोनी
शुभप्रभात आली
ताजी तवानी
पीतवर्ण तो चमचमणारा
उगवतीच्या छटा घेऊन
अवतरला या फुलाफुलांतून
केशरी सुंदर सांगतसे
मनातून
मावळतीची आभा गोजिरी
हिरवे पिवळे पर्ण
तटस्थ
तरुवेलींच्या साथीला अविरत
प्रसन्न जाहले मन्मथ
पाहोनी
विराजमान ही फुले
गंगाजळी.

*नंदिनी*

🌺🌻🌺🌻🌺🌻

कुसुम हास्य.

भरगच्च पानांमधून डोकावती
   फुले केशरी नाजूक पाकळीची
प्रसन्न हास्य या कुसुमांचे
मन आपले मोहित करिती
गर्द हिरवा रंग पानांचा
भूलभुलैया या सुमनांचा
करोनी बरसात दव बिंदूंची
गोड फुलांना हसते करिती
पाने फुले ही असे संपत्ती
अवनीची ही आभुषणे कंठीची
करुया सांभाळ या खजिन्याचा
फुलवू आनंद या वसुंधरेचा

*नंदिनी*

🌺🌱🌹🌿🌻🍃🌴

स्वस्तीक पुष्प.

हिरव्यागार प्रशस्त छान
सिंहासनावर मी विराजमान
बाप्पाने रेखला तिलक
 भाळी माझ्या सन्मानपूर्वक
छंद असे माझा अद्भुत
सान्निध्यात बाप्पाच्या रहाण्याचा 
रंग तांबडफुटीचा घेऊन
सजलेला पाच पाकळ्यांचा
आकारले स्वस्तिक चिन्ह
कोरले निसर्गदेवतेने सुंदर
म्हणतात मला जास्वंदी
मी बागेची पट्टराणी
सदा वास माझा
असे बाप्पांच्या चरणी

*नंदिनी*

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

सोनेरी पानाचं भान.

सोनेरी पानाचं हरपलंय भान
लावून दोन लांबलांब कान
सजलंय बघा किती छान
चांदण झुल्यात ठेवत शान
गिरकी घेतंयं वळवून मान 
गालात हसतंय  हळूच खुदकन
अंगणी माझ्या उतरुन पटकन...

*नंदिनी*

🍃🍃🍃🍃🍃🍃

पुष्पांचा एकोपा.

फुलवून आपला पानपिसारा
वेगवेगळी फुले बहरली
रंग निराळे गंध निराळे
एकोप्यानं सुंदर सजले
हासून करीती सुमने सारी
परस्परांचा आदर सन्मान
अरे माणसा तूही शिकावे
फुलांकडूनही काही भान
जन्मुनी अनेक झाडांमधूनी
मुशीत एका किती रमशी
हात हाती घेऊनी सुंदर
फेर धरोनी हसती गाती 
प्रेम मैत्रीची कवने अधिकच
गर्वाने ती नित्य आळवती
मैत्रीच्या नात्यांचा गर्भितार्थ
त्यातूनी उकलून दाखविती....

*नंदिनी*

🎍🎍🎍🎍🎍🎍🎍

गणनायक पुष्प.

गडद गुलाबी कर्ण कुंडलं
इकडून तिकडे हालत डोलत
शुभ्र पांढरा मुकुट मोहक
पुष्कराज तो बैसला ऐटित
वक्रतुंड गणनायक सुंदर
हास्य प्रसन्न ‌सवे घेऊन
भूलोकीचे करीत अवलोकन
ठेवती गणांवर वरदहस्त नीत्
  श्रींच्या चरणी भोळा भक्तगण
 मंगल अनुग्रहे तृप्त अविरत
दंडवत घाली होई नतमस्तक

*नंदिनी*

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

स्वागत सोनेरी पहाटेची.

फुलांनी प्याली पहाटेची आभा सोनेरी
हसली सोनकिरणं त्यामधून साजिरी
भाळलं गोड हास्यावर गुलाबी फुल  देखणं
हलकेच चुंबीत भाळीला कोमल पाकळीनं
घेतलं त्यानं सामावून आपल्यात अलगद
होऊन कुंकुम तिलक उठून राहिलं हसत.

नंदिनी.

शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२०

बहुरंगी पुष्पमेळा.

बहुरंगी फुलांचा मेळा
भास्कराच्या स्वागताला
अधिर जाहला स्पर्शावाला
रवीकिरणाच्या सान्निध्याला

बहुरंगी या फुलांमधूनी
बहुढंगी ती पानं हसली
हरित कणांचे अर्घ्य देऊनी
पर्णिका मनातून तृप्त जाहली

पानाफुलांच्या मुखकमलातूनी
तृप्तीचे तव पाट वाहती
धन्य जाहली अवनी बघूनी
वसंत हसला कणाकणातूनी

बहरु लागली तरुवेलीही
नवचैतन्य सोबतीने घेऊनी
पक्षीही आळवती सुरांतूनी
गोड मधुर तो पावा ओठी.

*नंदिनी*

🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

पुष्प कविता.

हिरव्या हिरव्या कोंदणात
   अवतरली आभ्रकाची फुलं
हसून प्रसन्न स्वागताला
जाहली होऊन सज्ज

  शंखनाद सोबतीला
जल तरंग उठवती
शुभ्रतेच्या प्रकाशानं
आसमंत उजळती

उजळल्या दाही दिशा
उजळले अंबर
आदित्याच्या तेजाला
दिले सृष्टिने समर्पण

सुगंधाच्या कुपीतूनी
सुवास मंद शिंपिती
वाऱ्यासवे झुळूकीतूनी
भारुन टाकती दिशा दिशा

समर्पण सृष्टिचे 
कणकणातून बहरले
पानेफुले तरुवेलीतून
जीवाजीवांत नाहले

धन्य झाली वसुंधराही
समाधानानं तृप्त
ऊभी धरणीमाय अधिर
वसंतोत्सवाच्या सन्मुख.

*नंदिनी*

🌹🌹

पुष्परचनेवर आधारीत कविता.

उंच भरारी घेऊन अलगद
उमलवूनी नाजूक पाकळ्या सुंदर
हसले गाली फूल अवचित
करुनी साजरा साज शृंगार 

गळा वैजयंती नाजूक सोनेरी
हिरवे कोंदण सजलंय भारी
गुलबक्षी पेहराव देखणा लेवूनी
सजली अहा किती फुलराणी

 हासलं चांदणंं सांडून रुपेरी
उमटवूनी गराऱ्यावर नाजूक नक्षी
लगबग चाले किती‌ फुलराणीची 
स्वागता भृंगराजाच्या उभी गोजिरी.

*नंदिनी*

🌹🌹🌹🌹

श्रध्दांजली...

आज,निसर्गही मलूल झालाय... हिंगणघाट च्या"त्या"मुलीचा अतिशय दुःखद, क्लेशकारक अंत झालाय....काय चूक होती त्या मुलीची? केवळ तो "नालायक" मुलगा तिला आवडत नव्हता, तिनं नकार दिला म्हणून?मुळात आपण कोणत्या माणसा बरोबर आयुष्यभर रहावयाचं हे ठरवण्याचा तिचा मुलभूत अधिकार होताच....ती सज्ञान मुलगी सद्सद्विवेक बुध्दीने वागणारीच असावी....त्या मुलाच्या वागण्याच्या पध्दती वरुनच तिनंं आपला नकार दिलेला असावा...नकार देण्यासाठी याशिवाय इतरही भरपूर कारणं असू‌ शकतातच ना....
पण म्हणून असा माथेफारु पण पणा....
आपण सर्वजणही याच समाजाचा एक भाग आहोत....केवळ ऐकायचे,टिव्हीवर बघायचे आणि सोडून द्यायचे का?अशा माणूसकीला काळिमा फासणाऱ्या गोष्टी घडू नयेत म्हणून आपलीही काही जबाबदारी आहेच ना....
आपल्याच घरातूनच अशा प्रकारच्या जबाबदारीची जाणीव आपण आपल्या मुलांना करवून द्यावयास हवी...नैतिकतेचे धडे गिरवण्याची सुरुवात मूळी सर्वांत प्रथम‌ घरातूनच केली जाते....
मुलांना मागेल ती गोष्ट अगदि आणूनच द्यावयासच हवी हा अट्टहास मुलाचाही नसावा आणि पालकांचाही....
मुलांना नकार पचवता यावयास हवा.कोणताही नकार सकारात्मकतेनं घ्यावययस हवा याचे संस्कार बाळकडू त्याला सर्व प्रथम घरातूनच मिळत असततात....
मुख्य म्हणजे त्याला आपल्या जवळ असणाऱ्या सद्सद्विवेक बुध्दीचा उपयोग कसा करावा? याचे पाठ घरातून सुरुवात करत द्यावयास हवेत
तर आणि तरच आपण थोडी का होईना समाज ऋणाची उतराई करण्याचा प्रयत्न केलाय असं मनाला वाटेल...
अशा पिडितांना मानसिक आधार देणं गरजेचं आहे...केवळ मेणबत्त्या दिवे लावून मोर्चे काढून आणि कायदा हातात घेऊन काहीच होणार नाही...
तो नराधम तर फाशीच्याच शिक्षेच्या काबील आहे...त्याला ती कायद्याच्या चौकटीत नक्कीच मिळेल पण अशा प्रवृत्ती उद्भवूच नयेत यासाठी कुटुंब,समाज,शाळा कॉलेज पासूनच संस्कार फार महत्वाचे आहेत....ते पाल्यांवर करणं हे प्रत्येकाचचं कर्तव्य आहे...
त्या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली...

नंदिनी.

😢

सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा.

*आण्णा काका अन् प्रभा काकू*

 मंगल दिन आज
 सोनियाचा आला ।
      रंगला सोहळा 
सहस्त्र चंद्रदर्शन अन्
   अमृतमोहोत्सवाला ।।

  तेजःपुंज दाम्पत्य 
  बैसले सिंहासिनी ।
 उत्सव मूर्ती‌ प्रभा                                  काकूंसह
मूर्ती आण्णा काकांची भारदस्त साजिरी  ।।

 ही लक्ष्मी नारायणाची              जोडी अविरत ।
    असते करीत सतत        प्रेमाची बरसात ।
 स्नेह सावली आप्तांची
बनत.

साऱ्यांचीच ही स्नेह सावली।
  आनंदे क्षण वेचती                     भरभरुनी
कौतुकाच्या वर्षावी सदा हासतमुख जोडी ही देखणी

स्पर्श ममतेचा पाठीवरी
    मुलायम फिरे
     उभयतां करवी
निरपेक्ष प्रेमाचा सागर                   अव्याहत
वाहतसे यांच्या रंध्री ।।

स्नेह सावलीने यांच्या
मिळे आधारवडाची थंड दाट छाया ।
तृप्त लोचने निरखिती
भुषण आप्तजनांचे करीती ।। 

 आनंद मुर्तींची जोडी
जणू खाणच 
ही आशिर्वादांची ।
घालिती सडा अंगणी यशस्वीतेच्या मार्गावरुनी ।।

भरभरुन मुखी त्यांच्या
प्रेमळ आश्वस्त संवाद वसशी।
यथार्थ दिलासा सदा 
आम्हा आप्त स्वकियास
   देती ।।

चालतं बोलतं विद्यापीठ आण्णा काका आमचे असती ।
कुलगुरुचे पद भुषवी
प्रभा काकू विव्दान   विदूषी।।

अभिमान यांचा असे आम्हा आप्तांना ।
 लावी छंद जीवा
 या पितृतुल्य जोडीच्या सहवासा रमण्या ।।

आशिर्वाद रुपी फुलांची
अशीच पखरण त्यांनी करावी ।
अन् उधळलेली फुलं
सारखी मनात आम्ही
मिरवती ठेवावी‌।।

उदंड आयुष्य 
     लाभो उभयता
ईश्वर चरणी प्रार्थना मनस्वी।
 फुलं शतायुषाची वाहण्या 
आस ही आहे सर्वस्वी।।

हृद्य सोहळा शतायुषाचा
पुनःश्च घडवूनी आणा देवा ।
ईच्छा ही आमच्या मनीची आपण पूर्ण करावी देवा पूर्ण करावी देवा।।

© *नंदिनी म. देशपांडे*.

🌹🌹🌹🌹

बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२०

चोचले जिव्हेचे.

चोचले जिव्हेचे.

     उखरी

   चुली मधील निखऱ्यावर छान फुललेली उखरी त्यावर टाकलेला तुपाचा गोळा वितळून घरंगळत ताटभर पसरत जावा...तो ताटात वाढलेल्या भुरक्यात,लोणच्यात मिसळू नये यासाठी आपली होणारी त्रेधातिरपिट....मध्येच तुपाने माखलेली दोन बोटं चाटणं... अणि उखरी गरम आहे तोवर संपवणं....गट्टम करणं.....
     होते थोडी तारांबळ आपली,पण आहाहा!एकदा जिभेवर घास ठेवला रे ठेवला की,ही होणारी तारांबळ कुठच्या कुठे पळून जाते....ऊलट दुसरी गरमागरम उखरी केंव्हा एकदा पानात पडते आपल्या याची वाट बघत असतो आपण....
     उखरी,पानगा अशा वेगवेगळया नावानं प्रचलीत असणारा हा आपला एक पारंपारिक पदार्थ....नाश्त्यासाठी पोटभरीचा.... शिवाय पौष्टिकपणा सोबत ठेवणारा...जेवणातही हमखास चालेल असा...पण बरं का,ही उखरी अशीच कोरडी कोरडी तूप,भुरका,लोणचं, आणि शेंगदाण्याची चटणी अशीच खाण्यात गम्मत आहे... म्हणूनच ती जेवणात नको वाटते...
     आधुनिक काळात निखाऱ्यांवर भाजलेली उखरी खाणं दुरापास्तच.पण,लोखंडी झाऱ्यावर गॅसच्या फ्लेमच्या मध्यम आचेवर ती बनवता येते...थोडंसं तेलाचं किंवा तुपाचं मोहन घालून दुधात घट्ट भिजवलेल्या कणकेची हातावर थापून बनवलेली उखरी चवदार लागते....छानशा भाजलेल्या उखरीचा स्वाद जिभेला कशी भुरळ घालतो ते कळतही नाही.... त्यामूळे करावयास थोडं पेशन्स लागलं तरीही बदल म्हणून आठवड्यातनं एकदा अगदी चालण्यासारखं आहे....
मी करत असते नेहमी अशी उखरी,पण लहानपणी आजोळी आजीज्या हातच्या खाल्लेल्या चुलीतील निखाऱ्यावर बनवलेल्या पानग्याची आजही आठवण येतेच येते....

 *नंदिनी म.देशपांडे*.

😋😋

शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२०

भुवनेश्वर.

*ॐ नमः शिवाय*

लिंगराज मंदिर, भुवनेश्वर
ओरिसाची राजधानी भुवनेश्वर,नावच मुळी या मंदिरामूळे पडलंयं...भुमीतून स्वयंभू निघालेली लिंगराजाची मुर्ती ह्या शहराची शान आहे....
बारा ज्योतिर्लिंगाचा राजा असणारे लिंगराज देवाचे दर्शन घेणं म्हणजे बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेणं होय...येथे फोटो काढण्यासाठी परवानगी नव्हती....पण या शिवपिंडीमध्ये विष्णू आणि शिव दोघे एकत्रित वास करतात.शिवपिंडीच्या मध्यभागी खोल जागेवर विष्णूंचे शाळीग्राम आहेत....
    येथे एकाचवेळी पिंडीवर तुळशीपत्र आणि बिल्वपत्र वाहिले जाते....
भुवनेश्वर मंदिरांचे शहर  मानले जाते....येथे १००० मंदिरं आहेत... त्यांपैकी केवळ एक मंदिर विष्णूचे आहे बाकी सर्व शिवाची आहेत...म्हणून शिवाला वाहिलेलं हे शहर....
भुवनेश्वर शहरातील सिध्देश्वर आणि मुक्तेश्वर या दोन मंदिरांची ही उत्कृष्ठ शिल्पकला....

*नंदिनी म.देशपांडे*

🌹🌹


शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०२०

सोरटी सोमनाथ.

*सोरटी सोमनाथ*

सौराष्ट्र सोमनाथंच  श्रीशैले मल्लिकार्जुनम्। उज्ययिन्यां महाकाल ओमकारम मल्लेश्वरम्। परल्या वैजनाथंच  डाकिन्यां भीमाशंकरम्।  वाराणस्या तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे। हिमालये तु केदारं
घृष्णेशं शिवालये ।।

पवित्र अशा बारा ज्योतिर्लिंगाची महती सांगणारा हा श्लोक मनात सारखा रुंजी घालत होता, जेंव्हा आम्ही द्वारका नगरी चा निरोप घेऊन सौराष्ट्रातील सोमनाथा च्या वाटेवर गाडीत बसून धावू लागलो. द्वारके हुन सोमनाथाकडे जाताना आपण आता हळूहळू समुद्रसपाटीच्या समिप जात आहोत, याची वर्दी हवेतील दमटपणा आणि खाऱ्या पाण्याचा एक विशिष्ट वास आपल्याला देत आहे, असे लक्षात आले,
   
    आमच्या या प्रवासात मार्गावर पोरबंदर या शहराला भेट दिली. पोरबंदर हे शहर, श्रीकृष्णाचा बाल पणीचा मित्र, सुदामा यांचे जन्मस्थान.सुदामाचे छोटेसे मंदिर येथे बघावयास मिळते.या परिसराला 'सुदामपुरी', असे संबोधले जाते.

    या शहराची आणखी एक महत्त्वाची ओळख म्हणजे, राष्ट्रपिता महात्मा गांधींचेही हे जन्मगाव. त्यांचे निवासस्थान गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी अगदी बाजाराला लागूनच आहे.आज जुन्या पद्धतीच्या रचनेने युक्त असे तीन-चार खोल्यांचे हे छोटेखानी घर बघताना, महात्मा गांधी यांच्या बाबत इतिहासात सांगितलेले अनेक प्रसंग आपण वाचले आहेत याची आठवण होते. त्यांच्या जन्माच्या वेळी साक्षीदार असणारी ती खोलीही खास आठवण म्हणून आज दाखवली जाते पर्यटकांना.

याच मार्गावर "भालका तिर्थ",हे ठिकाण बघण्याचे प्रचंड कुतूहल होते आमच्या मनात! तुम्ही म्हणाल येथे काय असे विशेष होते? पण खरंच,महाभारताच्या दृष्टीने आणि कृष्ण अवताराच्या दृष्टिने या जागेला विशेष असे महत्त्व प्राप्त झालेले आहे. भालका तीर्थ म्हणजे ज्या ठिकाणी एकशे पंचवीस वर्ष आयुष्य लाभलेल्या श्रीकृष्णांचा वध झाला ते ठिकाण.आश्चर्य वाटलं ना कि देवांनाही मृत्यू असतो हे ऐकून! त्यांचाही वध होऊ शकतो याचे!पण, दुर्दैवाने हे सत्य आहे. जरा नावाच्या एका पारध्याने आपला बाण श्रीकृष्णांच्या पायाच्या अंगठ्यावर मारला. केवळ अनाहूतपणे ही कृती या पारध्याकडून घडली. पण ती श्रीहरीचा प्राण घेऊन गेली,असेच म्हणावे लागेल.
  श्रीकृष्ण एका पिंपळाच्या झाडाखाली दुपारची वामकुक्षी घेत होते. एका पायाच्या गुडघ्यावर दुसऱ्या पायाचा तळवा टेकवून पहुडलेल्या स्थितीत ते असताना, जणू काय हे हरिणच आहे.असे समजत लांबून या पारध्यानं हरणाची शिकार करण्यासाठी म्हणून बाण मारला.तो नेमका श्रीकृष्णांच्या पायाच्या अंगठ्यात  घुसला आणि श्रीकृष्ण गतप्राण झाले. याठिकाणी आजही त्या झाडाचे अवशेष दिसून येतात. त्या जागेवर कृष्णाची त्याच अवस्थेत झोपलेली मूर्ती आपण बघतो. जणू हा सारा प्रसंग आपल्या डोळ्यासमोर तरळून जातो.
   देवांचा अंत घडून आलेलं भालका तीर्थ पाहून क्षणभर मन हेलावून जातं.

 यानंतर आम्ही भारतमाता मंदिराला भेट दिली.अगदी ओसाड ठिकाणी,जिथे फारशी वर्दळही नाहीए,अशा ठिकाणी एका भव्य हॉल मध्ये हे मंदिर आहे.माझ्या कल्पने नुसार तेथे आपल्या भारत मातेची मूर्ती असावी असे वाटले होते.पण तसे नव्हतेच.तेथे सिमेंटच्या असंख्य उंचच उंच खांबावर,भारतमातेच्या उदरात जन्म घेतलेल्या असंख्य सत्पुरुषांच्या आणि विदुषींचे मोठी मोठी पेंटिंग्ज आहेत.ते बघून अभिमानाने आपला ऊर भरुन येतो.
त्यात आपले ज्ञानेश्वर माऊली आणि जिजाऊ पण आहेत.ह्या सर्वांची चित्र रुपानं होणारी ओळख मनावर कोरली जाते कायमची.या शिवाय याच ठिकाणी खाली जमिनीवर प्रचंड मोठा असा भारत मातेचा नकाशा, सिमेंटच्या सहाय्याने कायम स्वरुपी बनवलेला आहे.त्यामूळे भारत मातेच्या कानाकोपऱ्याची आपल्याला पटकन ओळख होते.खूपच सुंदर ठिकाण आहे हे.पण येथे पर्यटकांची फारशी वर्दळ दिसत नाही याचे शल्य वाटले मनाला.

    सायंकाळच्या सुमारास समुद्राच्या काठाकाठाने आपण सोरटीसोमनाथ या शिवालयाच्या सानिध्यात पोहोचलो. हे लक्षात आलं. 
   सोमनाथ,
 बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले असणारं असं खूप प्राचीन, सागराच्या संगतीनं, या निसर्गाचं, हवामानाचं, एवढेच नव्हे तर, काळाच्या ओघात होऊन गेलेल्या वेगवेगळ्या राजसत्ता, त्यांच्या राजकारणाचे अर्थकारणाचे आणि समाजकारणातील चढ उतारांचे चटके या दोघांनी सहन केलेले. यांच्या घणाघाताने तावून सुलाखून निघालेल्या या सागर लहरींनी आणि मंदिराच्या एका एका पाषाणाने ढाल बनवून या शिवलिंगाची प्राणपणाने जपवणूक केली. त्याच्यावर कोणतीही आंच येऊ न देता त्यांच्या देवत्वाचं संरक्षण केलं. म्हणूनच आपण सर्वजण आज मोठ्या भक्तिभावाने या सोमनाथा समोर नतमस्तक होऊन चार क्षण मनःशांती मिळवत कृतकृत्य होतो. प्राचीन मंदिर थोडेसे अलीकडे, हेमाडपंथी असून त्यात तळमजल्यावर  मन प्रसन्न करणारी शिवपिंड आहे कालांतराने अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला असे इतिहास सांगतो.

 सागराच्या समीप असणारे सोमनाथाचे मंदिर बांधले ते सोनेरी पाषाणात! हे अतिशय भव्यदिव्य स्वरूपात बांधलेलं आहे. १९५१ साली स्थापन झालेल्या या मंदिरात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या हस्ते शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.पश्चिमेच्या सागर किनाऱ्यावर वसलेले हे देवालय, तीर्थक्षेत्र अतिशय रम्य आणि अप्रतिम आहे. मंदिराच्या भिंतीवरून सागर लाटा न्याहाळताना आपण कितीतरी वेळ उभे आहोत हे लक्षातही येत नाही!जणू काही या मंदिराच्या वैभवशाली इतिहासाची कहाणी सागर आपल्याला कथन करतो आहे असं वाटत रहातं.
   सायंकाळी मंदिराच्या गाभाऱ्यात होणाऱ्या आरती चा महिमा काय वर्णावा !भव्यदिव्य स्वरूपात होणारी आरती बघताना आपण भक्तिरसात न्हाऊन निघतो. त्यानंतर मंदिराच्या आवारात मंदिरावर दाखवण्यात येणारा साऊंड आणि लाईट शो केवळ अप्रतिम!मंदिराची गाथा आपण याच वास्तूच्या तोंडून प्रत्यक्ष ऐकत आहोत ईतपत भास व्हावा असे आपण यात रममाण होऊन जातो. हा सारा इतिहास ऐकून आपण अक्षरशः भारावून जातो. पुन्हा एकदा या ठिकाणाला भेट देण्यासाठी यावयास हवेच. ही ईच्छा मनोमन व्यक्त करतो आणि तेथे मिळणारा चुरम्याच्या लाडूचा मधुर प्रसाद जिभेवर ठेवतो...

© 
*नंदिनी म. देशपांडे*

✴️✴️✴️✴️✴️✴️