शनिवार, १२ ऑगस्ट, २०२३

संवाद.

संंवाद

    काही काही पदार्थांची चव जीभेवर रुजून बसलेली आहे अगदी लहानपणापासून...आईच्या हातची चव असायची ना त्यांना...शिवाय प्रेम आणि माया ओतून मन लावून केलेला असायचा पदार्थ...
    पदार्थ अगदी साधेसेच आपल्या दैनंदिन आहारातले, पण जीभेवर ठेवले की अहाहा....
    आता हेच घ्या ना,आपण दररोजच खातो ती साधी पोळी, अगदी पातळ, त्याला छानसे पापुद्रे सुटलेले, मऊ,लुसलुशीत आणि खरपूस भाजून हलकी बनलेली गरमागरम पोळी!अशी खाण्याची लागलेली सवय,मग कशी आवडेल दुसर्‍या कुणाच्या हातची?पुरणपोळीच्या बाबतही तेच, गरमागरम छान फुगलेली कमी व पातळ कणकेच्या उंड्यात जास्त पुरण घालून बनवलेली...जीभेवर ठेवली की विरघळणारच!   
    पंचामृत, पातळ भाजी, भजी, कायरस,तव्यावरचं पिठलं अहाहा!हे जेवणाची लज्जत वाढवणारे पदार्थ, माझ्या आई च्या हातचे बनवलेेेले खाण्याची लागलेली सवय तिला जाऊन आठ वर्षे झाली तरीही जीभेवर रेंगाळतेच आहे अजून....  
    तिने बनवलेले उकड शेंगोळे,वरणफळं आणि नागपंचमीला करतात तो वाफेवरचा भरड्याचा ढोकळा...आजही पाणी सोडतात तोंडाला...
           चिवडा, पोहे, दहीपोहे, लावलेले पोहे, बेसनाचे, नारळी पाकाचे आणि सत्यअंबेच्या प्रसादाचे लाडू हे सारेच आईने बनवलेले त्याला तोडच नसायची अगदी....मग काय जाता येता त्यावर ताव मारणं चालूच रहायचंय... 
    करंजी, चकली, साटोरी हे पदार्थ बनवणं हा देखील तिचाच हातखंडा होता...वेगवेगळ्या खिरी,श्रीखंड,बासुंदी फारच लज्जतदार मधूर! ही पण आईची खैसियतच....
    या जीभेला लहानपणापासून या चवींची लागलेली सवय आईच्या हयातीत माझ्या वयाच्या अर्धशतकापर्यंत चाखलीए मी...अशी सहजासहजी जाणे कदापीही शक्यच नाही...
   आज,रंगपंचमी,आईचा आठवा स्मृतिदिन म्हणून आठवणी जाग्या झाल्या नकळतपणे....खरं म्हणजे, तिच्या आठवणींचा डोंगर मनात अगदी आत स्थिरावलाय,पण आजच्या निमित्ताने या आठवणी मी वेचून ठेवल्या तिचे स्मरण करत करत....आणि "सुगरण" आईशी नकळतपणे संवाद साधलाय मी या निमित्ताने...   
   
नंदिनी म. देशपांडे.       
रंगपंचमी २०२३.     
🌹🌹🌹🌹