मंगळवार, ४ जानेवारी, २०२२

प्रेमळ प्रेमलताई.

*प्रेमळ प्रेमल*   
      *ताई*
**************

   प्रेमल ताईची ही प्रतिमा बघितली आणि, तिच्या मला आठवतात तशा म्हणजे, ती बहूतेक चाळीशीत असावी, तेंव्हापासून च्या प्रतिमा, डोळ्यासमोर येत राहिल्या....
    गोरी गोरीपान, पातळ जीवणी,गोल चेहरा, नाजूक बांधा असणाऱ्या प्रेमल ताईचं पहिलं आपत्य,जयाताई आज सत्तरीत आहे!
परभणीला दरवर्षीच दोन तीन वेळेला तरी तिची चक्कर असायचीच.... निळकंठराव भावजींसोबत...
    तिचं माहेर आणि आजोळ दोन्ही परभणीतच, त्यामूळे माहेरी आली की आजोळी एकदोन दिवस मुक्काम असायचा तिचा...
बाप्पांची नात, त्यांच्याच सारखी कांती आणि रुपातलं साम्य!
     तिच्या आईला,अंबुताईला आपण कोणीच बघू शकलो नाही पण, वडिल दिगंबरराव लोहगांवकर मामा आपण सर्वांनीच बघितलेले...बाप्पांचे सर्वांत जेष्ठ जावई...तेही अतिशय देखणे आणि तजेलदार कांतीचे होते...
    प्रेमल ताई,मी बघते तशी नऊवारी पातळातच दिसली नेहमीच....नेसतेही छान ती;आणि कोणताही रंग तिला शोभूनच दिसतो....  त्यामुळे तिचं सौंदर्य आणखीनच खुलायचं...आजही ती वयाच्या 87+मध्येही स्वतःच्या हाताने नऊवारच नेसते आणि सुंदर दिसते!

     प्रेमल ताई  खरं म्हणजे बाप्पांची  नात...अंबुताई नावाच्या सर्वांत जेष्ठ मुलीची मुलगी!ही अंबुताई बाप्पा आणि त्यांची पहिली सहचारीणी कृष्णाबाई हिची मुलगी....
या नंतर कृष्णाबाई लवकरच जात राहिल्या म्हणून त्या काळच्या समाज रुढी नुसार बाप्पांचं दुसरं लग्न,आहिल्या म्हणजे मोठीआईशी झालं....पहिली कृष्णाबाई म्हणून मोठीआई उमरीकरांच्या घरी प्रवेशताच आहिल्येची 'कृष्णाबाई' झाली...
आणि लोहगांवकर मामी ज्यांना आपण सारे ओळखतो ती आपली आत्याच म्हणजे, प्रेमल ताई ला जन्म दिलेल्या आत्या च्या जागेवर नव्याने लग्न होऊन आलेली आत्या...मामींचे खरे नाव मला आजही माहित नाही पण आपली मुलगी अंबुताईच्या जागेवरची ती आपलीच अंबुताई, या नात्यानं मोठी आई बाप्पा तिला 'अंबु' बोलवायचे...
तिनेही कधीच ती त्यांना दोघांना किंबहूणा आपल्या सर्वांनाच,म्हणजे आम्हाला आत्याचे आणि बहिणीच्या मुलींना भाच्यांचे प्रेम दिले...आई,बाबा आणि आम्हालाही त्यांचा फार लळा होता...
    प्रेमल ताई आपली सर्वांत मोठी कझिन....म्हणजे जयाताई आणि तिचे भावंडं आमची भाच्चे मंडळी!पण भाच्यां पेक्षा मावशा मामा कितीतरी लहान म्हणून तिला ताईच म्हणतो आम्ही! 
   प्रेमल ताईने जयाताई मार्फत सांगितलेल्या दोन गम्मतशीर आठवणी....
     सिंधू आणि शरयू
आत्या त्यांच्या बरोबर प्रेमल ताई यांना बाप्पांनी शाळेत घातलं होतं आणि या तीघीही पडदा लावलेल्या रिक्षात बसून शाळेत जात असत....

   दुसरी आठवण म्हणजे, (गोदावरी) आत्यांचं लग्न झालेलं होतं....
त्यानंतर सिंधू आत्या,शरयू आत्या आणि त्यांची ही भाच्ची प्रेमल जवळजवळ एकाच वयोगटातल्या,तिघीही लग्नाळू वयाच्या अर्थात त्या काळातल्या...म्हणजे 72 ते 75 वर्षांपूर्विचा काळ तो! या तीघी साधारण नऊ ते बारा या वयोगटातील असाव्यात त्या वेळी...
 तर ,सिंधू आत्याला बघण्यासाठी स्थळ आलं की बाप्पा या तीघींनाही तयार व्हावयास सांगत,आणि तिघींनाही बघण्याचा कार्यक्रम व्हायचा....जिला पसंती आली तिचे हात पिवळे करायचे हा हेतू ठेवून!

     प्रेमल ताईचे मामा म्हणजे आमचे बाबा....तिच्या लग्नात बाबा पाचसहा महिन्यांचे होते...नवर्या मुलीला बोहोल्यावर चढताना नवरीचा मामा तिच्या मागे ऊभा लागतो....अशी आपल्याकडची पध्दत असते...
तिच्या मागे मामा म्हणून बाबा ऊभे होते पण बाप्पांच्या कडेवर!
     आहे की नाही सारेच गमतीशीर...आज आपल्याला वाचून आश्चर्य वाटतं पण या पिढीने हे सारं अनुभवलंयं....या पिढीच्या प्रेमलताई , नलू आत्या आणि त्या खालोखाल कुंदा आत्या ही मंडळी सहज बोलण्यातून या गमती आजही सांगत असतात...त्यातून आपल्याला त्या काळच्या सामाजिक चालीरीती लक्षात येतात...काळ केवढा बदललाय याची प्रचिती येते...
     अशी कितीतरी पावसाळे बघितलेल्या या व्यक्ती म्हणजे अनुभवांचं शहाणपण आणि आठवणींचं भांडार घेऊन आपल्या सहवासात आज आहेत याचं खरोखर अप्रुप आणि भाग्य वाटायला हवं ना आपल्याला!त्यांच्या अनुभवांची शादोरी खूप काही शिकवून जाते आपल्याला...
    आज प्रेमलताई मुलं,नातवंड,पतवंड अशा भरगच्च गोकुळात वास्तव्यास असते, आणि गम्मत म्हणजे तिची पतवंडही लवकरच लग्नाळू वयाचे होतील...
खापरपणती जावाई आणि तिचे मुलही बघेल ही निश्चित....
असेच घडो आणि तिने शतायुषाचा उंबरठा पार करो हिच मनोमन ईच्छा येथे व्यक्त करते आणि माझी लेखणी थांबवते आता...
   
©️ 
*नंदिनी म.देशपांडे*.
दि.3-1-2022.
🌹🌹🌹🌹🌹

शनिवार, १ जानेवारी, २०२२

🌹नव्याचे स्वागत🌹

🌹नव्याचे स्वागत 🌹

     कित्ती पटकन संपल्यासारखे वाटले नाही हे 2021वर्ष! या विश्वावरच्या मानवजातीचे आयुष्य ढवळून टाकणारे वर्ष. असेच याचे सिंहावलोकन केल्यास  म्हणता येईल...सर्व म्हणजे अगदी सर्वच पातळ्यांवर या वर्षाने आपला चांगला-वाईट, मनाला विषण्णता आणण्यात ठसा उमटविला....त्यात वयाचे बंधन नव्हते की, गरीब-श्रीमंतीचे...कोणत्याही देशाच्या सीमांची बंधनं नव्हती की कोणत्याही जाती धर्माची....एक विषाणू आला....त्याने आपले परिणाम दाखवण्यास सुरुवात केली...हळू हळू पाय पसरत प्रसार गती वाढवली, नंतर वेगवेगळी रुपं धारण करत मानवाच्या जीवाशी खेळला...अगदी खेळण्यांसारखा...आधाशासारखी माणसं त्यानं अक्षरशः गिळली.... त्याने कित्तेक घरं दुःखात ढकलली, कित्तेक पोरकी केली आणि कित्तेकांच्या तोंडचा घासही काढून घेतला...
    एखादं तुफान यावं आणि त्यात वाताहात होऊन होत्याचं नव्हतं व्हावं ह्याचा अनुभव माणसानं याच वर्षात अनुभवला...
     मुलांचं बाल्य सुकवलं, त्यांच्या शिक्षणात असंख्य अडथळे निर्माण केले..."घरातच रहा" ही शिकवण यानंच दिली...चार भिंतींचे महत्व आणि डोक्यावर छप्पर असणं किती गरजेचं आहे याची प्रचिती आली...
     कोरोनाच्या या थैमानानं माणसाला पैसा हेच सर्वस्व नाही...आणि तो कितीही मोठ्या प्रमाणात असेल जवळ,  तरीही त्याने सर्वच गोष्टी मिळत नाहीत याची जाणीव झाली....
या आणि आणखी कितीतरी गोष्टी माणसाच्या जीवनावर परिणाम करवून गेल्या त्या याच वर्षात...
    अशा साऱ्या नकारात्मक गोष्टींप्रमाणेच काही चांगल्या सकारात्मक बाबींचीही महती पटली आपल्याला ती म्हणजे,आरोग्याची काळजी घेणं...माणसामाणसांतील माणुसकी जपणं, "एकमेका सहाय्य करु..." ही उक्ती प्रत्यक्षात उतरवणं....नात्यांचे महत्व जाणत त्यांची वीण घट्ट करणं एवढचं नव्हे तर एकत्रीत रहाण्याने मनाला मिळालेली उभारी टिकवून ठेवणं...
    नाण्याच्या चांगल्या वाईट दोन्ही बाजूंचा फार जवळून अनुभव घेत,संपूर्ण मानव जात यात तावून सुलाखून निघाली ती याच वर्षात, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही निश्चित....

     पण तरीही नव्याची ओढ, नव्याची उत्सुकता आणि नव्यातील नाविण्य हे ही लुभावते, खुणावतेच की माणसाला...
निसर्गानेच शिकवलेला हा उपदेश माणूस कधीही विसरला नाही, विसरणारही नाहीच...नदी जशी आपल्या मार्गाने, एका दिशेने पुढे पुढे वाहत जाते...वाहता वाहता निसर्गातील इतर घटकांचा होणारा परिणाम स्विकारत स्विकारत अविरतपणे, तसेच काळाचेही आहेच...तो कोणासाठी थांबणार नाही...पुढे सरकताना आपल्यालाही पुढे ढकलत नेतच असतो.... तो कसा व्यतित करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न, ज्याची त्याची पध्दत....पण सरत्या वर्षात मिळालेल्या अनुभवांच्या शहाणपणाचं गाठोडं मात्र आपण कायम जवळ बाळगावं...न जाणो त्यातील कोणता केंव्हा उपयोगी पडेल...
   
     उद्या उगवणारे सुर्यनारायण या अवनीवरील प्रत्येक घटकासाठी नक्कीच सुखी, संपन्न, आरोग्यपूर्ण आयुष्याचा आणि शांततेचा मार्ग आखत आखत अवतरतील अशी आशा व्यक्त करु या सारे जण... आणि एवढ्याशा विषाणूची पाळंमुळं खणून काढत फेकून देण्यात आपण सारेच जण जरुर यशस्वी होऊ या...
     आज संपणाऱ्या 2021 या वर्षाला हसत निरोप देऊन, 
2022 या वर्षात प्रवेशताना 'हम होंगे कामयाब' असा नारा देऊ या...

आपल्या सर्वांना, नवीन वर्षात प्रवेशासाठी मनभरुन शुभेच्छा आणि नववर्षाभिनंदन. 🌹

©️ 
नंदिनी म. देशपांडे. 

🌹🌹🌹🌹🌹