सोमवार, ३० ऑगस्ट, २०२१

कृष्णसखा....

श्रीकृष्णा, आयुष्यातील कितीतरी आठवणींना तू सोबत केलीएस अगदी
बालवयापासून.... काळ्याशार मातीतून साकारलेले तुझे रुप,कृष्णाने जणू आपल्याच घरात जन्म घेतलाय,असेच भासवायचा...मन मोहवूनच टाकायचा...गोकुळ आष्टमीच्या दिवशी  आजीने आणि तिच्यानंतर आईने साकारलेले गोकूळ, मला तुझ्या अंगणी खेळायला येण्यासाठी खुणवायचे...
मग एकदाचा तू अवतरलास, कृष्णजन्म झाला आणि खमंग सुंठवडा हातावर प्रसाद म्हणून मिळाला की पुढचे चार आठ दिवस आपली गट्टी अशी काही जमायची ना खेळताना!गोकुळातील गवळणी, बलराम, सारेच सामील व्हायचे..
रांगत रांगत जाऊन मिश्किल भाव दाखवत दही,लोणी खाणारे तुझे चित्रातील बाळरुप हातात घेऊन कुरवाळण्याचा मोह तर कितीदा झाला म्हणून सांगू!
शालेय वयामध्ये कोपलेल्या ईंद्रदेवाला शह देत अख्खा पर्वत निश्चलतेने आपल्या करंगळीवर पेलणारा तू,आमचाच सवंगडी कान्हा व्हायचास...त्या पर्वताखाली आम्हालाही आसरा देत आहेस अशीच जाणीव द्यायचास... 
     तारुण्यात प्रवेश करताना, तुझे बासरी वाजवणारे सावळे,सुंदर मनोहर, निर्मोही रुप कायम मनात भरुन असायचे...शांत, शीतल निर्मळ प्रेमानं ओतप्रोत भारलेला तुझा चेहरा मनात कायम रुंजी घालायचा... 
मनरमणा, 
होळीचा रंग खेळताना तू सतत सोबत करायचास...
आणि त्यानंतर संसार मागे लागला...कोणत्याही अडचणीत तूच डोळ्यासमोर यायचास सखा बनून...आजही येतोस...योग्य मार्गदर्शन करतोस आणि पुढे चालायला शिकवतोस....शंख,चक्र, गदा पद्म हातात घेवून समोर दिसणारे तुझे प्रसन्न रुप क्षणात हसू आणते ओठावर आणि निर्धास्त करते...
कधी व्यंकटेशाच्या रुपात, कधी विठ्ठलाच्या रुपात कधी नारायणाच्या रुपात तर कधी विष्णूच्या रुपात भेटायवयास येतोस तू.
देवघरातील लंगडा बाळकृष्ण तर कायमच हसरी सोबत करतो...त्याचा अवतोभोवती असणारा वास सतत दिलासा देत रहातो...तू आहेस पाठीशी ही जाणीव फारच अश्वासक वाटते...सगळी संकटं पेलण्यास तू आहेस समर्थ, मग कशाला हवाय किन्तु मनात !
तुझा मधूर पावा ऐकत सुमधुर संगीत ऐकण्याची जाण निर्माण केलीस ती तूच...
  निसर्गात पानाफुलांच्या रुपात रंगीबेरंगी फुलातून तूच तर हसत खेळत असतोस...वार्‍या सवे डोलतोस आणि पक्ष्यांच्या सुरातून गोड पावा वाजवत रहातोस...केवढा तरी आधार, उभारी देत असतोस मनाला आणि चैतन्य खेळवतोस शरीर रुपी या माणसाच्या नश्वर देहात!
किती तुझे उपकार किती तुझी रुपं आणि किती तुझी ती  किमया!आमच्या अख्ख्या आयुष्याला प्रेरणा देण्यासाठी,भावनांचा समतोल साधण्यासाठी तू अवतार घेत रहातोस वेळोवेळी! वेगवेगळे 
असाच सोबत कर रे राजसा...
🙏🌹🙏

 ©️
नंदिनी म. देशपांडे .
कृष्णाष्टमी ,२०२१.
🌹🌹🌹🌹🌹

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

बालपण आणि नागपंचमी.

*बालपणीची नागपंचमी*🐍

   नागपंचमी झाली आईचीही सय आली आणि बालपणातल्या किती तरी नागपंचमींची आठवण जागवत गेली, नव्हे ताजीच झाली...
अगदी आठ नऊ वर्षाची होते मी, तिसरी चौथीत असेल...दर वर्षी नागपंचमीला आई आम्हा भावंडांना नवीन कपडे शिवून घ्यायची...त्या वेळच्या नवीन फॅशनचा!
आणि अगदी पारंपारिक पध्दतीने हा सण साग्रसंगीत  साजरा व्हायचा...
माझ्यासाठी लाल रंगाचा पांढरी लेस लावलेला प्लेन पाकिजा शिवला होता त्या वर्षी...
आजही लख्ख आठवतोय...
नागाचे चित्र असलेल्या पुठ्ठ्याच्या वहीची खरेदीही झाली...त्या पूर्वि दोन दिवस बारीक पानांची मेंदीची झाडं मैत्रीणींनी मिळून शोधत शोधत त्याची पानं आणून झाली होतीच....ती पाटा वरवंट्यावर वाटून मेहंदी भिजवणे त्यात कात, चुना मिसळून...आणि दोन्ही हातांवर रात्री झोपताना लेप फासणे, शिवाय यावर थोडे सुकल्या नंतर कपडयाने तळहात बांधून झोपणे असा कार्यक्रम असायचा...
सकाळी तेल लावून हात धुतले की लालेलाल हात बघून स्वतःचेच कौतूक वाटायचे!
    शाळेत नवीन कपडे, नव्या बांगड्या, नवे कानात, गळ्यात, हातावर मेहंदी आणि सजून धजून स्वारी शाळेत निघायची...आठवणीने नागाच्या पुठ्ठ्याची वही सोबत घेऊन...
मग शाळेत या पुठ्यावरच्या चित्राची पुजा म्हणून तीन तीन वेळेला पाया पडले जायचे!
   त्या दिवशी अर्धीच शाळा असायची, घरी आईने कागदावर पेनाने काढलेल्या नागोबाला नमस्कार होत असे आणि मग उकडीचे दिंड, ढोकळा यावर जेवणात ताव मारला जायचा...
   दुपारी वाड्यात गारुडी यायचा नागोबा त्याच्या गोल झाकणाच्या परडीतुन हळूच डोकावत हळू हळू वळवळत बाहेर यायचे...किती दूर उभे असायचो आमही मूले!मनातील भितीचे साम्राज्य डोळ्यात मावायचे नाही!
कोणी तरी मावशी, काकू समोर जाऊन त्याला हळदी कुंकू वहायच्या आणि दूधाची छोटी वाटी त्याच्या समोर ठेवायच्या...गट्टम करायचा ना तो क्षणात!
आणि मग दिवसभर काय दोन तीन  दिवस उंबराच्या झाडाला बांधलेल्या झोक्यावर उंच उंच झोके घेत मज्जा चालायची! आम्ही मुलीच नव्हे तर वाड्यातील सर्वच स्त्रियाही बालिकाच बनायच्या!
हळू हळू पानांच्या मेंदीची जागा मेंदीच्या पावडरने घेतली, काडीने हातावर डिझाईन आले,मग तीच जागा मेंदीच्या कोनाने घेतली....
झाडावरच्या झोक्याची जागा परसातल्या झूल्याने किंवा झोपाळ्याने घेतली....जेवणात दींड ऐवजी ईडली,उखरी आली आणि नागोबाची गच्छंती होऊन कायम ते चित्रातच जाऊन बसले...
  सासरी आल्यावर सासुबाईंकडनं  नागपंचमीचा एक दिवस अगोदरचा धान्य उपवास समजला...त्या दिवशी चीरणं,आणि विंचरणं हा प्रकारही बंद असतो हे समजलं...माहेर घरच्या लेकीचं कौतूक असतं, बहिणीनं भावाला दूधलाह्या भरवायच्या असतात हे सारं समजलं...त्या साठी गावातल्या नणंदबाई यायच्या...
    हल्ली तर काय हे 
सुध्दा हळू हळू लोप पावत चाललंयं...ती पिढीही, तो साग्रसंगीतपणा आणि तो मेन्यूही...
कुणाला हे सारं करण्यासाठी वेळही नाही, अशा औपचारिकपणाची आवश्यकता वाटतही नाही....
पण आमच्या पिढीजवळ त्या आठवणींचा खजिना आहे...तो सांगावासा वाटला म्हणून हा प्रपंच!
    हल्ली मात्र निसर्गाचा श्रावणात असणारा उल्हासितपणा, वृत्तींची तरलता, आणि प्राणीमात्रांविषयी सहानुभूतीपूर्वक दृषटकोन यांविषयी मनात वाटणारी प्रगल्भता पूर्णपणे वाढलेली आहे...हे ही नसे थोडके!हो ना? बस आता थांबते...🐍

©️ 
*नंदिनी म.देशपांडे*
नागपंचमी, २०२१.
औरंगाबाद. 
🌹🌹🌹🌹🌹
.

मंगळवार, १० ऑगस्ट, २०२१

"व्रतबंध संस्कार".

*व्रतबंध संस्कार*
****************
   हिंदू धर्मात माणसाच्या जन्मानंतर शेवटापर्यंत त्याच्यावर सोळा संस्कार केले जातात...त्या व्यक्तीच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर कोणता तरी एक ठराविक संस्कार केला जात असावा असा माझा अंदाज आहे...
    त्यातीलच एक 'व्रतबंध'संस्कार....
या मागचे धार्मिक अधिष्ठान थोडे बाजूला सारुन आपण या संदर्भात सामाजिक दृष्टिकोनातून विचार करु या...
    
व्रतबंध संस्कार हा सामान्यपणे मुलाच्या आठव्या वर्षी केला जातो...
बाळ बर्‍यापैकी मोठं होऊन आपली कामं ते या वयात करु लागते...म्हणजेच ते आईवडिलां पासून थोडे वेगळे झालेले असते.
या वयात ते स्वतंत्रपणे बसून दिलेला अभ्यास करु शकते,शिकण्याची कला त्याला अवगत होऊ लागते...त्याच्या भविष्याच्या वाटचालीतील हा एक फार महत्वाचा पहिला टप्पा होय...
   आपण स्वतंत्रपणे काही गोष्टी करु लागलो आहोत याचा मनस्वी आनंद त्याला होतो आणि,"मी आता मोठा झालोय," असे तो सांगू लागतो...

  व्रतबंध हा संस्कार विवाहविधीशी साधर्म्य सांगणारा...यात वडिल आणि मुलगा या दोहोंचा विवाहच लावला जातो...म्हणजेच, वडिल आणि मुलगा यांच्यात या टप्प्यावर मैत्रीचे नाते निर्माण होणे अपेक्षित आहे...मुल मोठं झालंयं, त्याला आता हात धरुन किंवा धाकधपाटा देऊन शिकवणं गरजेचं नाही तर त्याचा चांगला सहकारी बनत त्याला सुचना,मार्गदर्शन करत शिकावयास लावणं होय...
गुरुकुल पध्दतीने शिक्षण घेण्यासाठी त्याला गुरुकुलात पाठवण्याची तयारी हा व्रतबंध संस्कारा मागचा दुसरा एक हेतू...याचाच अर्थ, वयाच्या या टप्प्यावर मोठ्या होत जाणाऱ्या मुलाला स्वावलंबन आणि समायोजनाचे धडे गिरवत गुरुंच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेण्याची मुभा देणे होय...
म्हणूनच व्रतबंध संस्कार फार महत्वाचा मानला जातो....
आज आमच्या नात्यातील एका आठ वर्षीय बालकाचा व्रतबंध संस्कार पार पडला,आणि माझे मन या मागच्या सामाजिक पार्श्वभूमीचा नकळत आढावा घेऊ लागले...
शैक्षणिक शिखराची एक पायरी चढण्याची तयारी म्हणजे व्रतबंध असेही म्हणता येईल....

    आणखी एक महत्वाचे म्हणजे, 'व्रतबंध' याचा अर्थ एखाद्या नियमाशी बांधून घेणे...तो पालन करण्यात सातत्य टिकवणे...
व्रत म्हणजे,
स्विकारलेल्या नियमांचे,तत्वांचे सातत्याने पालन करणे,आणि हे पालन करण्यासाठी आपण बांधिल असल्याची जाणीव या वयात मुलांच्या मनात रुजवणे होय...
म्हणूनच योग्य त्या वयात योग्य तो संस्कार होणे केंव्हाही चांगलेच...

©️
नंदिनी म.देशपांडे. 
७,ऑगस्ट, २०२१.
🌹🌹🌹🌹🌹