*उपवास.*
“उद्या महाशिवरात्र आहे. कोण कोण करणार आहे उपवास उद्या? ललिताने रात्रीच्या जेवणाच्या वेळी, टेबल वर सगळ्यांना प्रश्न केला.
तसे चिनू म्हणाला, “आई मी लंगडा उपवास करणार”.
छकू म्हणाली, “आई मी पूर्ण उपवास करणार बरं का….”
त्यांचे बाबा म्हणाले, “अगं मी पण पूर्ण करेन उपवास. पण काहीतरी वेगळे कर बाबा खाण्यासाठी. छान चमचमीत, झणझणीत. कर ,उपवासाचे थालीपीठ, त्यासाठी शेंगदाण्याची झणझणीत चटणी.”
“ आम्हाला चावण्या सारखं काहीतरी कर गं ललिता. एवढी वर्षे पाळली आहे शिवरात्र, आता थोडक्यासाठी कशाला मोडू उपवास…” हळूच अण्णांनी सुचवले.
“ए आई, माझा लंगडा उपवास आहे. पण साबुदाण्याची खिचडी कर हां भरपूर. मला खुप आवडते. किती दिवस झाले खाल्लीच नाही मी ….”चिनू...
“आणि हो मग जेवणासाठी ना पावभाजी कर.मस्त. गरमा गरम. सुट्टी आहे उद्या शाळेला.
“ दीदी तू पण लंगडाच कर ना उपवास. मस्त दिवसभर आवडीचं.”
चिनूने दिदिला उपदेश केला.
“चालेल मी पण लंगडाच करीन गं आई, उपवास उद्या. मस्त बटाट्याचे वेफर्स करशील ना? काय फक्कड लागतात गं ताजी ताजी.”इति छकु....
“मला आपली भगर आणि आमटीच कर गं, गरम गरम छान मऊसुत! तूप घालून गुटु गुटू गिळता येते”, आई आपले मौन सोडत बोलल्या.
“आणि काय ग रताळी आणली आहेत ना तू ,त्याचा शिरा कर मधुर म्हणजे पोटभरी वाटेल.”
“ ललिता थोड्या साबुदाण्याच्या पापड्या पण तळून काढ,म्हणजे उपवास असेल तरीही ताटात कसे भरून होतील पदार्थ.”
नवरोबांची आणखी एक सुचना.
ललिता एवढ्या साऱ्या सुचनांचा भडीमार ऐकून दिक्क झाली.
खरंतर उद्या उपवासच आहे. झटपट साबुदाणा खिचडी आणि भगर आमटी करावी.आणि दुपारी मस्त पैकी जाऊन यावे मैत्रिणींबरोबर ‘आनंदी गोपाळ’ बघण्यासाठी. दुपारीच लवकर आहे त्याचा शो. असे मनातच ठरवलेले होते तिने. आता सगळ्या नियोजनावर पाणी फिरणार तर….
उद्या सगळ्यांना सुट्टी. त्यात उपवासाचा दिवस. या नावाखाली खाण्याची फर्माईश चालूच राहणार दिवसभर. कुठून विषय काढला मी….. असे होऊन गेलंय, बरं आता विचारलं मोठेपणाने तर प्रत्येकाची खवय्येगिरी तर जोपासावी लागेलच ना !
चला, साबुदाणा खिचडी आणि अर्थातच साबुदाणा वडा काही पटकन होणारे नाही. लगेचच लागावे लागेल तयारीला.
कन्येची वेफर्सची ऑर्डर म्हणजे बटाटे बघावे लागतील आहेत का घरात? नाहीतर पळावे लागेल मंडईत सकाळीच.फळंही आणावे लागतील भरपूर! कधी नव्हे ती ह्यांची फर्माईश झाली .नाही कसे म्हणणार? तेही काम वाढलेच. फळे स्वच्छ धुऊन घ्या ,बारीक कापा, गार करा, उद्या कस्टर्डही चालणार नाही. दूध आटवून घ्यावे लागेल जरासे.
आई, अण्णा यांची तरी काय असते एरवी खाण्याची मागणी? बऱ्याच गोळ्या आहेत दोघांनाही. पोटभरीचे हवेच त्यांना….
....आणि हा लंगडा उपवास चिरंजीवांचा. तोही पाळावाच लागेल. आपणच तर घातलाय तो लहानपणीच मुलांना…..
छकुने विचारले सुद्धा होते, “आई उपवास म्हणजे कोणी चालत येणारा देव आहे का गं? आणि लंगडत का चालतो तो?”
यावरचे मी तिला दिलेले स्पष्टीकरण किती मजेशीर वाटले होते त्यावेळी तिला….
खरं तर, ‘उपवास' म्हणजे उप+वास. याचा अर्थ नेहमीच्या मुख्य पदार्थांच्या पेक्षा वेगळे असलेले उप किंवा जेवणात खाण्याचे पर्यायी पदार्थ. यांचा वास घेणे अर्थात ते चाखून बघणे यालाच आपण उपवास म्हणतो. ऋतूमानाच्या बदलांच्या संधीवर चवीत बदल म्हणून असे मोठे आलेले काही थोडेच तर उपवास करतो आपण.
शास्त्रीय अर्थ उपवास म्हणजे ‘लंघन’ वगैरे गोष्टी मनाला शिवतही नाही ना ! देवपूजेच्या अनुषंगाने पोटपूजा ही करावीच लागणार! एक वेळ देवपूजा राहिली तरी चालते की ! देव कुठे म्हणतो रोज मला आंघोळ घालत जा म्हणून ! आपणच नाही का आपल्या सोयीने देवाला अंघोळीची गोळी देतो बरेचदा !
माणसाचं वेगळं आहे. उपवासाची गोळी असावयास हवी होती असे वाटते कधी कधी. असाच विचार करत करत ललिताला झोप लागली.
भरपूर प्रकारांची फर्माईश आहे म्हणून नेहमीपेक्षा लवकरच उठली आज ललिता…….
सर्वांच्या जिभेचे चोचले पुरविण्यात चार वाजले दुपारचे.आता कसचा ‘आनंदी गोपाळ’? एक सुस्कारा सोडला ललिताने....
थोडंसं निवांत बसावे, पुन्हा आहेच चिरंजीवांची पाव भाजीची ऑर्डर!
पण या सर्वांच्या नादात आपली ही काही आवड असू शकते किंवा असावयास हवी, आणि ती आपण पूर्ण करावी हे तर मनातही आलेच नाही कधी !
एखाद्याने जरी विचारले असतं, “तुला, काय आवडतं? तेच कर.” तर नक्कीच आपण शिंगाड्याचा पिठाचा शिरा आणि रताळ्याची उसळ केली असती.....
रताळे ची उसळ आणि शिंगाड्याचा शिरा ! पण नाहीच माझी आवड पूर्ण करण्यात आणखी एखादा तास गेलाच असता नक्की !
“ आई शी किती चिकट चिकट (गिजगा) आहे हा पदार्थ”? आणि हा काय शिरा? किती घाणेरडा वास येतोयं याला….. अजिबात करु नकोस ललिता हे पुन्हा……..” अशी सूचनावजा तंबी ऐकलीयं दोन वर्षांपूर्वी.
आपण आपल्या आवडीचं काही करावं या भूमिकेतून, करावेसे वाटले होतं त्यावेळी….
पण खरंच हल्ली आपली आवड-निवड शिलकीत ठेवलीच आहे कुठे आपण? मुलांची, ह्यांची, आईअण्णांची या साऱ्यांच्या आवडी निवडींनाच तर आपणही जोडून घेतलंयं जाणीवपूर्वक ! आपलेच काम थोडे हलके व्हावे म्हणून आपणच तर दुय्यम मानलंयं आपल्या आवडींना !
आपल्या संसाराचं रहाटगाडगं विना अडखळत, विना आवाज करत, मुलायम वाटेवरून चालण्यासाठी ! किंबहुना खाण्याच्या नाहीतर एकूणच जीवनाच्या विविध अंगांशी निगडीत आपल्या आवडींना कोंडून ठेवलंयं आपल्या मनाच्या एका कप्प्यात……
आपणच सवय करून घेतलीए ना आपल्या आवडीनिवडी बाजूला सारण्याची…… येतात कधीतरी उफाळून, तरीही पुन्हा घालतोच की मुरड त्यांना आपण ! अगदी सहज ! कोणत्याही अपेक्षेविना……
पण तरीही आहोत ना,आपण आनंदी ! काय बिघडलं आपल्या आवडींना फारसे महत्त्व दिले नाही म्हणून ! पण इतरांच्या आवडीनिवडी जपताना मनापासून विचारावेसे वाटले सर्वांना ,म्हणूनच तर चिवचिवाट झाला सगळ्यांचा ! आणि हो लागले थोडे जास्त कष्ट, दररोज पेक्षाही, पण आज आपण किती खूष आहोत सारे !
सुट्टीची निवांत मनासारखी पोटपूजा झाली आहे म्हणून !
समाधानाचे हे तरंग कितीतरी चैतन्य पसरवतात की आपल्या वास्तू मध्ये! यापेक्षा दुसरं काय हवंयं ?चैतन्य फुलवणे, ते जीवापाड जपणे, त्यांना एकत्रित बांधून ठेवणे हीच तर खरी आवड आहे आपली संसारातील !
ही माझीच आवड नव्हे का मग ? का म्हणून मानावे मी, की माझ्या आवडीनिवडींना दुय्यम दर्जा आहे असे? नाहीच, अजिबात असे नव्हेच. ‘घरातील सर्वांचा आनंद जपणे’ हीच तर माझी खरी आवड. त्यासाठीच तर स्विकारलंयं ना मी पूर्ण गृहिणीपद ! हेच अतिउच्च पद देणारं,मला स्वामिनी बनवत आनंद देऊन जाणारं……माझं इप्सित साध्य करणारं !!
© नंदिनी म.देशपांडे.
🎀🎀🎀🎀🎀🎀