मंगळवार, २४ एप्रिल, २०१८

*व्हॉट्स ॲप समुह*

*व्हॉट्स ॲप समुह*

    असावा एखादा समुह व्हॉट्स ॲप'चा
ज्यायोगे जागतात आठवणी बालपणीच्या

रेंगाळत नव्याने बालपणात
काढाव्यात खोड्या परस्परांत

चिडवा चिडवी
हसवा हसवी आणि
फिरक्या घेत बनवा बनवी

नसेल या समुहात आकस आसुया
असतील वाहत सदा आनंदी नद्या

विसरुन साऱ्यांनी वयाचे बंधन
दरवळत ठेवावे मैत्रीचे चंदन

होऊन प्रत्येकाच्या सुख दुःखात वाटेकरी
नव्याने पेरत पेरत मैत्रीची अदाकारी

निर्मळ निर्भेळ मैत्रीत मने होताना लुब्ध
अहंकार श्रीमंती होऊन जावो लुप्त

ओढ वाटावी कायम मैत्रेय नात्याची
साधताना संवाद आठवण बालपणीची
मंत्रमुग्ध करणाऱ्या बाल आठवणींची .......
बाल आठवणींची.....

*नंदिनी म.देशपांडे*

nmdabad@gmail.com .

🌷🌷🌷🌷🌷🌷

*किती परिणामकारक?*

*किती परिणामकारक*?

    "बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायदा" (पॉक्सो) कायद्यातील शिक्षे संदर्भात दुरुस्ती करणारा अध्यादेश काल केंद्रीय पातळीवर मंजूर करण्यात आला.त्या अन्वये नराधम इसमास,कमाल जन्मठेपेच्या शिक्षे ऐवजी फाशीची शिक्षा सुनावली जाईल ही तरतूद स्विकारली गेली आहे.
    ‌‌ काही कायदे हे परिस्थितीजन्य असतात.समाजात उद्मवणाऱ्या समस्यांना समोर ठेवत,लोकक्षोभाच्या परिणामकारकतेवर ते बनवले जातात.त्यांपेकीच एक हा 'पॉक्सो' कायदा २०१२ साली बनवण्यात आला.
      आज २१ व्या शतकात चोहीकडे स्त्री मुक्तीचा नारा दुमदुमत असताना मुलींच्या किंवा स्त्रियांच्या ‌संरक्षणासाठी कायदे बनवण्याची निकड भासावी या सारखी दुसरी शोकांतिका काय असेल ?
      ज्या देशात गर्भावस्थेत असतानाच स्त्री भृण मारण्याची तयारी केली जाते, त्या समाजात सहाजिकच निगरगट्ट मनाचे,पाशवी वृत्तीची माणसं नव्हे तर जनावरंच रहातात असे म्हणावेसे वाटते.
       संस्कृति,परंपरा जपत, आदर्श मुल्यांच्या पायावर  उभं असणारं आपलं म्हणजे भारतीयांचे, वैचारिक विश्व. मोठ्या अभिमानाने प्रतिज्ञेतून आणि देशभक्तीपर गीतांतून आपण त्याचे गुणगान गात असतो.पण त्यात किती तथ्य आहे हे रोजच्या बातम्यांमध्ये झळकणाऱ्या माणसाच्या हीन प्रवृत्तीने गाठलेल्या परिसीमेतून दिसून येते.
     ज्या देशात स्वत:च्या घरातही मुली/स्त्रिया यांना ‌वखवखलेल्या नजरांशी सामना करावा लागतो ,कधी कधी शिकारही व्हावे  लागते अशा   विकृत नराधमांकडून.तेथे ईतर नात्यांची किती शाश्वती देता येईल?ही शंकाच आहे.कोण म्हणेल या देशात सुसंस्कृती रुजलेली आहे?       नैतिकतेच्या वाऱ्यालाही न शिवलेला फार मोठा समाज ‌आज आपली पाळं मुळं घट्ट रोवू पहात आहे.केवळ वासना आणि वासना एवढं एकच ध्यैय समोर ठेवून बुध्दी गहाण ठेवलेले,हे लोक  ठिकठिकाणी संचारत आपली दहशत निर्माण करत आहेत.त्यांना ना स्वत:च्या वयाचे बंधन असते ना समोरच्या सावजाच्या वयाचे.
     गेल्या काही काळात, क्रूर पणाचा कळस गाठणाऱ्या ‌घडून गेलेल्या घटना बघितल्या, वाचल्या की मन विषण्ण होते.कुठे चाललीय आपल्या समाजाची ,देशाची मानसिकता? असा प्रश्न मनाला सतत भेडसावत रहातो .   अशा बऱ्याच प्रकरणात पिडिताच नव्हे तर समोरचा गुन्हा करणारा पुरुष ही अल्पवयीन असतो.कठुआ प्रकरण असेच सुरु झाले . कुठे वाहवत चालली आहे आजची पिढी ? आणि का?यांचा मागोवा घेऊन, त्यावर उपाय शोधण्याची खरी गरज ‌आज निर्माण झाली आहे .
      ‌मुलांच्या मनावर विपरीत परिणाम ‌करणारी साधने ,असंख्य गोष्टी आज मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत.खरे तर त्यांवर तारतम्याची काही बंधनं घालणं आवश्यक आहे असे म्हणावेसे वाटते.
    ‌ बऱ्याच प्रकरणात प्रौढ माणसं राजरोस पणे अशा हीन वृत्तीच्या आधिन होऊन ‌गुन्हा करतात.चीड आणणाऱ्या या वृत्तीला काय म्हणावे? माणसाला आयुष्यात केवळ वासना,भोगलालसा ही एवढी महत्वाची आहे का?की,ज्या वेळी सावजावर झेप घेताना त्यांना कोणत्याही नैतिक जबाबदारीचे भान थोडे सुध्दा राहू नये ?
     कायद्यातील तरतुदी आणखी कडक बनवून अशा गोष्टींना थोडा फार चाप बसेल ,पण ही पाशवी वृत्ती मनातून समुळ नष्ट करण्यासाठी कुठला परिणाम कारक कायदा अस्तित्वात आणता येईल?मानवी प्रवृत्तीच्या अशा घाणेरड्या रुपांचा धिक्कार करणे हे सर्वस्वी कोणत्याही कायद्यान्वये नव्हे तर त्याच्या मनावर अवलंबून आहे.          माणसाच्या मनावर संस्कारांचा फार मोठा प्रभाव असतो.तोच योग्य दिशेने होणे,ही आज काळाची गरज आहे.केवळ कायदे करुन भागणार नाही तर, दारा दारातून ,शाळा शाळांतून किंबहूणा हल्ली वयाच्या प्रत्येक टप्प्यावर नैतिकता, नैतिक जबाबदारी म्हणजे काय?ती कशी पार पाडावयास हवी ?या साठी समुपदेशन होणे गरजेचे झाले आहे.माणसाच्या गोठलेल्या विचार क्षमतेला हलवून जागे करणे आवश्यक आहे.या सर्वांसाठी वर्ग घ्यावेत की काय?अशी अवस्था निर्माण झाली आहे.कांही अध्यात्मिक नेतृत्वाकडून ते थोड्या फार प्रमाणात होत असेल तरीही हे क्षेत्र सुध्दा वासनाकांडा पासून सुटलेले व       नैतिकतेच्या पायावर उभे नाही हे वास्तव आपण बघतो आहोतच.
   ‌‌म्हणूनच काही गोष्टी कायद्यातील बदलांतून साध्य होतील का?यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते....

*नंदिनी म.देशपांडे*

nmdabad@gmail.com .

🌷🌷🌷🌷🌷🌷

रविवार, १ एप्रिल, २०१८

*१ एप्रिल च्या निमित्ताने.....*

*ईश्वरी वरदान.*

       " अहो आबा ,तुम्ही मला नोटबुक्स साठी पैसे दिलेले पण मी मात्र आणले आईस्क्रीम....आबा, तुम्ही एप्रिल फूल बनला आहात चक्क....छोटा ईशू चेहऱ्यावरचा आनंद उडवत आपल्या आजोबांची गम्मत‌ करत होता....
    मग माझ्याही लक्षात आले,अरे,आज १ एप्रिल .मुर्ख बनणे आणि बनवण्याचा दिवस.आपण जरा सावधच रहायला हवे...
एरवी कधी आपल्याला कोणी उल्लू बनवले तर,हा नाकाच्या शेंड्यावर येणारा राग आज मात्र जरा बाजूलाच  ठेवायला लागतो.
    ‌‌खरंच, विनोदबुद्धी ची ही ईश्वरी देणगी माणसाला मिळालीच नसती तर....जीवन किती निरस बनले असते ? या विनोदांमूळे माणसाच्या जगण्यातली लज्जत वाढते.सुखदु:खाच्या चढ उतारांचे हिंदोळे घेत असताना येणारा मानसिक ताण हळूवारपणे बाजूला सारणाऱ्या ‌या विनोदबुद्धीचे मानावेत तेवढे धन्यवाद कमीच आहेत....
   ‌विनोदबुध्दी ही माणसाच्या वृत्तीचा एक स्थायी भाव.ती किती प्रमाणात अॅक्टिव्हेट करावी आणि तिला कुठे ब्रेक लावावा हे कसब ज्याला जमले तो व्यक्ती सुखी आनंदी झालाच म्हणून समजावे.अहो,विनोद करणे आणि तो समजणे या उभय गोष्टी जमल्या ना,की त्याला सुखी जीवनाची चावीच सापडली आहे हे म्हणणं अतिशयोक्तीचे ठरणार नाही.....
     एकदा ही चावी चांगली सांभाळता आली ना,की आयुष्यात येणाऱ्या ताणाचा निचरा क्षणभरात होऊ शकतो.
‌ ही विनोदबुद्धी बापडी कोणताही भेद न करता प्रत्येकाच्या मनात आपली जागा शोधून ती मिळवत रहाते.कारण प्रत्येकाला हसरे ठेवण्याचा वसाच जणू तिने घेतला आहे....पण असे असले तरीही प्रत्येकाने आपल्या तार्किक क्षमतेनुसार या चावीला किती फिरवावे?हे ठरवायला हवे.नाही तर 'आ बैल मुझे मार'अशी गत होऊ शकते.
      उगाच नाही काही पु. ल. देशपांडे ,चि.वी. जोशी,व.पु.काळे वगैरे लेखकांच्या विनोदी साहित्यावर आपल्या कित्येक पिढ्या पोसल्या गेल्या आहेत या पुढेही पोसतीलच....याच हेतूने चित्रकार आपल्या व्यंग चित्रांतून अणि अभिनेते आपल्या अभिनयातून सशक्त मानवी मनांवर हसण्याचे संस्कार घडवत आहेत...हे संस्कार होत असतानाच आपल्या उपजत विनोदी बुध्दीला कायम जागृत ठेवून आपल्या बरोबरच इतर अनेकांना हास्यकल्लोळात सामावून घेण्यासारखे दुसरे मोठे पुण्य नाही.
   ‌विनोद बुध्दीतून हास्य, हास्यातून तणाव मुक्ती तणाव मुक्तीतून आनंद नि आनंदातून सशक्त मनाची जडणघडण घडण हे असे चक्र कायम ‌टिकवून ठेवण्याच्या लॉजिक मधूनच हास्य क्लब नावाचा प्रकार अस्तित्वात आला असावा....
   ‌चला तर मग या दैवी देणगीचा उपयोग करुन घेत जीवनाचा निर्भेळ आनंद लुटू या....


*नंदिनी म.देशपांडे*© ‌‌   १ एप्रिल ,२०१८.

🍉🍉🍉🍉🍉🍉
   ‌‌