गुरुवार, ३० डिसेंबर, २०२१

नाना,एक देवमाणूस.

*नाना-एक देवमाणूस*
*********
    
    खूप दिवसांचं ठरवत होते,आपल्या नानांचं व्यक्तीचित्र शब्दांत मांडू या...पण या अख्ख्या महिन्यात कमालीची धावपळ झाली आणि राहून गेलं....आज प्रयत्न करते...
    माझा नोव्हेंबर मध्ये वाढदिवस आला की नानांची मला फार प्रकर्षाने आठवण येते...माझी भेट झाली की, अगदी हमखास ते माझ्या जन्माच्या वेळी त्यांची झालेली फजीती मोठ्या कौतूकाने सांगत आणि त्या वेळी त्यांना झालेले मानसिक क्लेश जणू ते आत्ताच अनुभवून आले आहेत असे वाटत असे....त्यांच्या चेहर्‍यावर....
     "नाना",श्री विश्वंभरराव निटूरकर मामा म्हणजे, आमच्या आक्का (गोदावरी)आत्याचे येजमान....उंचे पुरे धिप्पाड, छान कमावलेली शरीरयष्टी!दोन्ही गालांवर आणि हनुवटीवर मोठ्या खळ्या!मला आठवतात तसा जाड भिंगांचा गोल काळ्या फ्रेमचा चष्मा,विपूल काळा कुळकुळीत केशसंभार, सावळ्या रंगाला शोभेल असा पांढरा शुभ्र कुर्ता आणि शुभ्र पांढरं धोतर आणि डोक्यावर काळी टोपी असा पेहराव! त्या काळचा अधुनिक आणि नीटनेटका म्हणावा असाच अगदी...
     आक्का आत्यांचे लग्न झाले तेंव्हा त्या नऊ वर्षांच्या होत्या हे ऐकण्यात आहे...पण नानांचे वय किती असावे?याचा काही अंदाज सांगितला नाही कोणी त्यांचासोबतचाफोटोहा लग्नानंतर काहीच दिवसात काढलेलाआहे.....या वरुन त्यांचे वय सधारण सतरा अठरा वर्षे असावे....मुरली दादा सांगू शकेल...
     अत्यंत लाघवी, नितांत प्रेमळ आणि मायाळू कधीही कुणाला दुखावणार नाहीत असा स्वभाव आणि बोलताना कायम "माय "हा प्रेमभरा शब्द मुखातून बाहेर आला की समजावे हे नानाच होत!
     एकत्र कुटुंबात मधले,बहुतेक हे दोन नं चे भाऊ...त्या मूळे व्यावहारिक जबाबदारी अशी काही नसावी त्यांच्यावर....
मोठेभाऊ आणि नानांच्या पाठचे भाऊ हुशार म्हणून आर्थिक व अगणीत असणारी सांपत्तिक जबाबदारी सांभाळण्याचीही जबाबदारी या दोन भावांवरच...हे सारं आत्याच्या बोलण्यात यायचं...शेताची जबाबदारी असावी नानांवर असे वाटते......
   जगरहाटी प्रमाणे कालौघात भावाभावांच्या वाटण्या झाल्या तेंव्हा मोठ्या भावा शिवाय न करमणारे नाना, जेवणाचं ताट घेऊन भावाच्या पंक्तीला येऊन बसायचे, असे आत्या सांगतात...
   नानांच्या या अतिशय साध्या, सरळ, निर्मळ मनाच्या, आत्यांना लटका राग येत असे कधी कधी, आणि "ह्यांना काही कळत नाही, भोळा सांभ आहेत अगदी" असे आत्या म्हणायच्या...
    आत्यांची बोलण्याची ढब बघून आम्हाला हसू यायचं...
     मला नाही वाटत नाना कधीच कोणावर रागावले असतील!
    सासुरवाडीला, परभणीला आले तरीही जावयासारखे कधीच वागले नाहीत...आईबाबांना ते नेहमीच वडलां समान होते...बाबांवरही मुलासारखेच प्रेम करायचे आणि आईला 'माय दुर्गा' असेच संबोधायचे...
     माझ्या जन्माच्या वेळची गम्मत सांगते हं आता...त्यांच्या बाबतीत घडलेली...
     नोव्हेंबर महिना, थंडी मी म्हणत होती, आमावस्येची रात्र,त्यातही उगवत्या सुर्याला ग्रहण लागलेला दिवस होता तो...
माझ्या आईला प्रीमॅच्यूअर लेबर पेन्स चालू झालेल्या, अचानक सुरु झालेला त्रास बघून सारेच भांबावलेले गोंधळलेले...
      पहाटे चार पाच वाजता परभणीच्या सरकारी दवाखान्यात आईला  ॲडमीट केलेलं...सोबत मोठीआई, बाबा, कुमारकाका आणि नाना...
सगळे जेंट्स बाहेर ऊभे माझ्या आगमनाच्या प्रतिक्षेत ! खूप थंडी...बाहेर पटांगणात इतर पेशंट्चे नातेवाईक गच्च पांघरुणात झोपलेले...अशा वेळी अंधार असताना, एका पांढर्‍या रंगाच्या मोठ्या धोंड्याजवळ नाना लघुशंकेसाठी गेले...आपला कार्यभाग आटोपून ते वळले एवढ्यात ताड ताड फटाके फुटावेत तश्या शिव्या एक बाई नानांना घालत होती...त्यांचा जीव अगदी अर्धमेला झालेला...कारण 'तो' मोठा 'धोंडा' नसून एक पांढर्‍या रंगाचे पांघरुण पांघरत झोपलेली बाई होती...नानांना अंधार असल्याने हे काही दिसलं नाही आणि लक्षातही आलं नसावं....हे फटाके फुटत असतानाच थंडीचा चहा घेण्यासाठी आणि माझ्या जन्माची बातमी देण्यासाठी कुमारकाका नानांना शोधत तेथे पोहोंचले आणि हा सारा प्रकार त्यांच्या लक्षात आला...
   ईकडे नात झाल्याचे समजल्या बरोबर घरी बाप्पांच्या आनंदाला पारावार राहिला नाही...तेवढ्यात, "दे दान सुटे ग्रीह्राण", असे म्हणत दारावर दान मागावयास आलेल्या लोकांना, बाप्पांनी, खुंटीला अडकवलेला जावयाचा (नानांचा) काळा कोट दान करुन टाकला...घालण्यासाठी म्हणून कोट कुठे गेला?अशी विचारणा नानांनी करताच बाप्पा म्हणाले, तुमचा होता का?मी दान करुन टाकला...हे ऐकले आणि नानांनी आपल्याच कपाळावर हात मारुन घेतला आणि गप्प राहाले बिचारे नाना....काय करतील?सासर्यांना जाब कसा विचारावा?
    अशी सारी त्यांच्या झालेल्या फजीतीची आठवण मला डोळ्यासमोर बघताच त्यांना हमखास व्हायचीच, आणि नाना केवालवाणा चेहरा करत, अगदी विनोदी ढंगाने ती कथन करायचे!आम्हा सर्वांची मात्र हसून हसून मुरकुंडी वळायची!
    असे आमचे नाना, आजही त्यांची प्रकर्षाने आठवण येते...अशी प्रेमळ माणसं आपल्या आयुष्यात आली,त्यांचा थोडाफार सहवास मिळाला आणि आयुष्य समृध्द होत गेलं, याचा मनस्वी आनंद वाटतो आज!
ति.स्वरुप नानांना विनम्र अभिवादन करत मी येथे थांबते आता...🙏🙏

©️ सौ.नंदिनी म. देशपांडे. 
🌹🌹🌹🌹🌹

रविवार, २८ नोव्हेंबर, २०२१

पवशी.

ओळखलंत का मला मंडळी? माझी आठवण येते का कधी कुणाला?जरासा ताण द्या तुमच्या
स्मरणशक्तीला!अगदी, बालपणात जा म्हणजे येईल माझी सय!
    अहो, माझ्याशिवाय गृहिणीचं पान हालत नसे...स्वयंपाक चालू करण्या अगोदर माझ्याशी संवाद अनिवार्य च असायचा!
छोटीशी जागा व्यापणारी मी, पण पटदीशी मदतीसाठी तत्पर असायचीच!साऱ्या स्वयंपाकघरभर भिरभिरती नजर असायची माझी. बाजारातून आणलेल्या ताज्या ताज्या भाज्यांवर विशेष नजर ठेवून असायची मी... आणि कुठलीही भाजी आणि मी आमच्यात आडवा विस्तू जात नसे कधीच...'विळ्या भोपळ्याचे नाते', 
ही म्हणही माझ्याच स्वभावाचा परिपाक!चांगला किंवा वाईट?हे ज्याचे त्याने ठरवावे....चांगले मानाल तर जेवणात भाजी खाल आणि वाईट मानाल तर भाजीशिवाय जेवाल!ठरवावे ज्याने त्याने...
  मला मात्र खूप आठवण येते हो, आजही....कुठे तरी कोपर्‍यात  आहे माझे अस्तित्व शिल्लक!पण वय झाल्यासारखी पडून रहाते आपली....कोणाला तरी कधीतरी आठवण होईल माझी या आशेवर...कधी कधी वाटतं, दुर्मिळ वस्तूंच्या यादीत माझी रवानगी होऊन काचेच्या कपाटात जागा मिळेल कदाचित!
   कैरीचा,लिंबाचा आंबटपणा, भेंडीचा चिकटपणा, भोपळ्याचा कडकपणा, मिरचीचा तीखटपणा आणि 
आवळ्याचा तुरटपणा,कारल्याचा कडवटपणा आणि फळांचा गोडवाही सगळ्यांच्या सगळ्या तर्‍हा, स्वभाव फार जवळून अनुभवलंय मी!
माझ्या सर्वात जास्त आवडीचं ओलं नारळ बरं का... माझ्या बोटांवर नाचवत नाचवत  त्याचा अख्खा चव काढण्याची किमया मला साध्य करता यायची!
     आता "मात्र गेले ते दिन गेले",असंच म्हणावे लागते...
 येतील का परत फिरून गेलेले ते दिन?कठिण वाटतंयं सारंचं...असो...पण झालीच कधी आठवण माझी तर नक्कीच आवाज द्या,असेल त्या कोपर्‍यातून लगेच येईन तुमच्या मदतीला धावून!आजही त्राण आहे बऱ्या पैकी माझ्यात...पण तुमच्यात आहे आहे का बघा तरी बसण्याचा त्राण?तेच आजमावून बघा अगोदर आणि मग मला बोलवा.....
    अरे,हो विसरलेच मी माझे नावच सांगावयाचं राहून गेलं...जुन्यांना, आडजुन्यांना माहित असेल कदाचित पण नव्यांना मात्र माझी ओळख करवूनच द्यायला हवी....माझे नाव ना,'विळी' विदर्भात मला,'पावशी' म्हणतात...
दोन्हीही नावं माझ्या आवडीचीच!

©️
*नंदिनी म. देशपांडे*

🌹🌹🌹🌹

रविवार, १४ नोव्हेंबर, २०२१

बालकदिन

बालपण

आपल्याच बालपणात पुन्हा फिरुन डोकावताना....

   वाटतं,पुनःश्च
   लहान व्हावं...
    अवती भोवतीचा
   स्वच्छंदीपणा आणखी
   एकदा अनुभवावा...

    निरागस प्रश्नांची
     मौक्तिक माला 
    अविरत ज्यपावी...

    फुलपाखरू होऊन
     उंच उंच उडावे
     परि बनून आनंदाने
    खूप खूप बागडावे....

   भातुकलीच्या खेळात,
    बाहुला बाहूलीचे
    लगिन लावावे...

  लुटूपूटूचा स्वयंपाक
   साग्रसंगीत बनवून
 जेवणावळी
घलाव्यात....

 पावसात भिजत चिंब
कागदाची नाव
पाण्यावर सोडावी...

  चॉकलेटचे बांधावेत ईमले
      टपाटप टाकत टापा
    घोड्यावर घ्यावी रपेट....

मामाचं पत्र,आंधळी 
     कोशिंबीर,शिवनापाणी 
आणि
लपाछपी खेळत खेळत
दमून जावं....

बाबांच्या हातून घास
   घेत गोड खाऊचा
  आईच्या तोंडून गोष्ट
   ऐकावी हिरकणीची....

 होताच रात्र,
  पदराच्या पांघरुणात
   आईच्या कुशीत
   झोपावं गुडगुडुप्प
   झोपावं गुडगुडुप्प...

© 
*नंदिनी म.देशपांडे*

🌹🌹🌹🌹🌹🌹

बुधवार, १० नोव्हेंबर, २०२१

दिवाळीचा निरोप एक हुरहुर.

आली आली दिवाळी आली, म्हणत म्हणत आजच निरोप घेऊन निघून गेलेली दिवाळी आपल्याला कितीतरी सकारात्मक उर्जा बहाल करवून गेलीए, ही जाणीव आज मनाला झाली...
गतस्मृतिंना उजाळा देत, माहेरच्या आठवणीत आईच्या स्मृतांना स्मरत त्या जागवत गेली...
नवीन आठवणींची दुलई मनावर घालत मानसिक ऊब देऊन सांगता होणारी ही दिवाळी म्हणजे आपली जवळची सखीच जणू!
आपल्या सहवासात चैतन्याने न्हाऊ माखु घालणारी,कितीतरी मनोकामनांचा नैवैद्य स्विकारणारी अशीच....
माणसाच्या वागण्या बोलण्यात सकारात्मक वृत्तींना खतपाणी घालत जाणारी,ती हिच दिवाळी...
अंतःकरणात प्रेम माया, वात्सल्य, भक्तीरस यांना सवे घेऊन येणारी ती हिच दिवाळी!
   या दिपोत्सवाच्या मंद प्रकाशात तेजाळत जाणारी मनं, आपल्याला मिळालेल्या समाधानाचे तेज चेहर्‍यावर विलसत ठेवते...आपल्या देहबोलीतून प्रकट होत जाते...
    लक्ष्मीच्या रुपाने आगमन करणारी ही दिवाळी पक्वान्नांच्या  पंक्तींचा थाट करते...फराळाच्या पदार्थांची मांदियाळी सजवते...रंगावलींचा गालिच्या ची बिछायत घालते... घराचे सुशोभीकरण करत मनाचे सुशोभीकरण साधते...
शरदाच्या चांदण्या शिंपवत हवेतील गारव्याचे मोरपीस अंगावर फिरवते आणि रोमांचित करते...ऋतूबदलाची वर्दीही देऊ करते...
    अशा या हव्याहव्याशा मैत्रीणीने आज निरोप घेतला आणि 
लगबगीला मंदावलेपण आलं जरासं...
गेल्या काही दिवसांत अपूर्ण राहिलेली निद्रादेवी आपल्या डोळ्यांचा ताबा घेतीए असं जाणवत राहिलं...आणि एखाद्या मोठ्या कार्यानंतर मांडववारं
लागणं काय असतं? हे लक्षात आलं...
पण हे मांडव वारं नव्हे तर नवीन स्वप्न, योजना यांना आकारण्या साठी घेतलेला अल्पविराम आहे असे मनानं समजावलं....

  ©️
नंदिनी देशपांडे. 
🌹🌹🌹🌹🌹

मंगळवार, १४ सप्टेंबर, २०२१

🌹महिलक्ष्मी पुजन.🌹

🌹सोनपावली लक्ष्मीचे
          आगमन.🌹

भादव्यात गं सखे आल्या आल्या गौराई।
गणपतीचा हा थाट होई दिवे लखलखती।
हे असं कोणतं तरी , प्रत्येक मराठी महिन्याच्या वैशिष्ट्यांसह गायलं जाणारं गाणं आम्ही फार लहानपणी शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात गायलं होतं...आज राहूनराहून ते सारखं आठवतंयं...

महालक्ष्मी पुजन झालंयं ना आजच ....

 महालक्ष्मीचा सण,भव्य दिव्य, घवघवीत आणि मांगल्य सोबत आणणारा,घराघरात माणसांची वर्दळ घडवणारा  स्नेहबंधनात बांधून ठेवणारा असा हा भक्तीभाव श्रध्देचा विलक्षण योगायोग!

सासू सुनेच्या नात्यात समन्वय साधणं, जावाजावांच्या नात्यात प्रेम निर्माण करणं, गौराई बनून आल्या महालक्ष्मी, तर माहेरवाशीण मुलीला माहेराची ओढ लावणारं, अशीही काही  वैशिष्ट्यं या पारंपारिक खानदानी सणाचे....

आज बरेच ठिकाणी ह्या सणाला अधुनिकता स्पर्शत जाऊन उत्सवाचे स्वरुप प्राप्त झालेले दिसते आहे...

महालक्ष्मी, वर्षातून तीन सलग दिवसांची लांबी घेऊन येतो हा सण रुपी उत्सव, पण हिची रुपंही किती अनेकविध!
आश्चर्य वाटतं, ती कोणत्याही रुपाने येऊ देत आपल्या घरी, पण तिचे तितक्याच श्रध्दाळू भावनेनं आणि उत्साहानं स्वागत होतं प्रत्येक घराघरांतून...

कुंभाराने बनवलेल्या गोलाकार सुगड्यांच्या रुपात त्या अवतरु देत किंवा 
शाडूच्या बनलेल्या मुखवट्यांच्या रुपात...

सुगड्यांच्या रुपानं येणार्या लक्ष्मीच्या रुपाला रंगवून दरवर्षी नाक कान, डोळे यांची कलाकुसर करुन त्या रेखीव बनवण्यात घरातील गृहिणीची कला आणि कसब पणाला लागायचे पुर्वि...पण हल्ली त्या कायमस्वरुपी रंगवून घेतल्या जातात...

शाडूची बनवतानाही कलाकाराच्या कलेचे कसब त्या लक्ष्मीच्या मुद्रेबरोबरच त्या घरच्या गृहलक्ष्मीलाही प्रसन्न करत जाते...
गृहलक्ष्मी जणू लक्ष्मीचं रुप धारण करुन घरात वावरते!

अगदीच अलिकडच्या काळात तर हे मुखवटे अगदीच सजीव वाटावेत एवढे बोलके बनवले जातात...

काही घरात पितळी धातूचे कणखर रुप घेऊन येतात या महालक्ष्मी,तर कोकणात काही ठिकाणी खड्यांच्या रुपात अवतरतात...
शाळिग्राम रुपी विष्णूदेवतेची विष्णूपत्नी खड्यांचे रुप धारण करत लक्ष्मीच्या रुपात घरात प्रवेशत असावी...

धान्याच्या राशीरुपाने काही घरात या लक्ष्मीला पुजले जाते...धनधान्य समृध्दीचे प्रतिक असणारी ही लक्ष्मी खरोखर भरभरुन दान देत असणार यात शंकाचनाही...

लक्ष्मीचे रुप कोणतेही असो, ती प्रत्येक घराला  मांगल्याने, 
प्रसन्नतेने व्यापून टाकते....
सुखसमृध्दीची पखरण करते आणि स्नेहभावाचा
आदरसत्कार करत,नात्यांच्या धाग्यांना परस्परांत घट्ट गुंफून ठेवते...

सोनपावली आलेली लक्ष्मी जेष्ठेच्या घरी कनिष्ठेला आमंत्रण देते...लेकीबाळींना माहेरपण घडवते 
घरांघरांत चिवचिवाट
आणते...माणसांनी घरं फुलून येतात....
हसर्‍या खेळत्या वृत्तींना उधाण आणतात....
पक्वान्नांची आरास सजवतात, फुलाफुलांचा सुगंध पसरवत ठेवतात... 
धुप, दिप कर्पुराचा दरवळ घरात रेंगाळत ठेवतात...
गणपती बाप्पाला पुढे पाठवून देत 
"आम्ही लवकरच येत आहोत"
 असा सांगावा पाठवतात...

तीन दिवसांच्या या भरगच्च सणात महालक्ष्मीच्या रुपात तीन निराळ्या कळांचा भास नकळतपणे होत रहातो...

आगमनीत होतात तो पहिला दिवस. अगदी नवपरिणीत युवतीचे तेजाळ आनंदी,हसरी मुद्रा असते तिची या दिवशी!

दुसरा दिवस लक्ष्मीपुजनाचा. प्रसन्न असे सालंकृत नटून थटून तृप्तीचा आनंद घेवून मिरवणारे मंगल रुप!

तिसरा दिवस निरोपाचा अर्थात विसर्जनाचा. माहेरपणाला आलेली एखादी  सासुरवाशीण,सासरला जाण्याची ओढ जशी तिला स्वस्थ बसू देत नाही, पण माहेरचा विरहही  किंचित औदासीन्य आणतो तिच्या चेहर्‍यावर! असा भास निर्माण करणारं हे रुप!
आपल्यालाही हुरहुर लावणारं...

काही ठिकाणी सोबत समोर पाठवलेल्या गणपतीबाप्पाला जाताना सोबत घेऊन जाते ही गौराई, तर काही ठिकाणी बाप्पाला आपल्या आजोळी आणखी काही दिवस ठेवून जाते...
त्यामूळे मनाला लागलेली ही हुरहूर थोडी हलकी होते...

थोडक्यात सुख, समृध्दी, प्रासन्य,मांगल्य म्हणजे आणखी काय हो!ही सारीच त्या लक्ष्मीची रुपंच!
या सर्वांसोबत हातात हात घालत श्रध्दा आणि भक्तीभाव सुध्दा प्रकट होतो त्यावेळी नक्कीच त्या घरात लक्ष्मी नांदते तिचा कायमच वास तेथे रहातो...यापेक्षा मोठे वरदान आणखी कोणते?
   
खरंए आपली प्राचीन भारतीय संस्कृती आणि परंपरा, काळ कितीही बदलला असेल तरी हवीहवीशी अशीच आहे...तिच्या रुपवैभवात,साजरीकरणात काळानुरूप बदल घडवले जात असतीलही, पण त्यामागचा भोळा भाव मात्र स्थिरच आहे,तो कायमच स्थीर रहाणार यात शंकाच नाही...
शेवटी काय तर 
संतांनीही उक्ती सांगून ठेवली आहेच की, 
"भाव तेथेच देव."

 🙏🌹🙏

©️ 
*नंदिनी म. देशपांडे.*
🌹🌹🌹🌹🌹

सोमवार, ३० ऑगस्ट, २०२१

कृष्णसखा....

श्रीकृष्णा, आयुष्यातील कितीतरी आठवणींना तू सोबत केलीएस अगदी
बालवयापासून.... काळ्याशार मातीतून साकारलेले तुझे रुप,कृष्णाने जणू आपल्याच घरात जन्म घेतलाय,असेच भासवायचा...मन मोहवूनच टाकायचा...गोकुळ आष्टमीच्या दिवशी  आजीने आणि तिच्यानंतर आईने साकारलेले गोकूळ, मला तुझ्या अंगणी खेळायला येण्यासाठी खुणवायचे...
मग एकदाचा तू अवतरलास, कृष्णजन्म झाला आणि खमंग सुंठवडा हातावर प्रसाद म्हणून मिळाला की पुढचे चार आठ दिवस आपली गट्टी अशी काही जमायची ना खेळताना!गोकुळातील गवळणी, बलराम, सारेच सामील व्हायचे..
रांगत रांगत जाऊन मिश्किल भाव दाखवत दही,लोणी खाणारे तुझे चित्रातील बाळरुप हातात घेऊन कुरवाळण्याचा मोह तर कितीदा झाला म्हणून सांगू!
शालेय वयामध्ये कोपलेल्या ईंद्रदेवाला शह देत अख्खा पर्वत निश्चलतेने आपल्या करंगळीवर पेलणारा तू,आमचाच सवंगडी कान्हा व्हायचास...त्या पर्वताखाली आम्हालाही आसरा देत आहेस अशीच जाणीव द्यायचास... 
     तारुण्यात प्रवेश करताना, तुझे बासरी वाजवणारे सावळे,सुंदर मनोहर, निर्मोही रुप कायम मनात भरुन असायचे...शांत, शीतल निर्मळ प्रेमानं ओतप्रोत भारलेला तुझा चेहरा मनात कायम रुंजी घालायचा... 
मनरमणा, 
होळीचा रंग खेळताना तू सतत सोबत करायचास...
आणि त्यानंतर संसार मागे लागला...कोणत्याही अडचणीत तूच डोळ्यासमोर यायचास सखा बनून...आजही येतोस...योग्य मार्गदर्शन करतोस आणि पुढे चालायला शिकवतोस....शंख,चक्र, गदा पद्म हातात घेवून समोर दिसणारे तुझे प्रसन्न रुप क्षणात हसू आणते ओठावर आणि निर्धास्त करते...
कधी व्यंकटेशाच्या रुपात, कधी विठ्ठलाच्या रुपात कधी नारायणाच्या रुपात तर कधी विष्णूच्या रुपात भेटायवयास येतोस तू.
देवघरातील लंगडा बाळकृष्ण तर कायमच हसरी सोबत करतो...त्याचा अवतोभोवती असणारा वास सतत दिलासा देत रहातो...तू आहेस पाठीशी ही जाणीव फारच अश्वासक वाटते...सगळी संकटं पेलण्यास तू आहेस समर्थ, मग कशाला हवाय किन्तु मनात !
तुझा मधूर पावा ऐकत सुमधुर संगीत ऐकण्याची जाण निर्माण केलीस ती तूच...
  निसर्गात पानाफुलांच्या रुपात रंगीबेरंगी फुलातून तूच तर हसत खेळत असतोस...वार्‍या सवे डोलतोस आणि पक्ष्यांच्या सुरातून गोड पावा वाजवत रहातोस...केवढा तरी आधार, उभारी देत असतोस मनाला आणि चैतन्य खेळवतोस शरीर रुपी या माणसाच्या नश्वर देहात!
किती तुझे उपकार किती तुझी रुपं आणि किती तुझी ती  किमया!आमच्या अख्ख्या आयुष्याला प्रेरणा देण्यासाठी,भावनांचा समतोल साधण्यासाठी तू अवतार घेत रहातोस वेळोवेळी! वेगवेगळे 
असाच सोबत कर रे राजसा...
🙏🌹🙏

 ©️
नंदिनी म. देशपांडे .
कृष्णाष्टमी ,२०२१.
🌹🌹🌹🌹🌹

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

बालपण आणि नागपंचमी.

*बालपणीची नागपंचमी*🐍

   नागपंचमी झाली आईचीही सय आली आणि बालपणातल्या किती तरी नागपंचमींची आठवण जागवत गेली, नव्हे ताजीच झाली...
अगदी आठ नऊ वर्षाची होते मी, तिसरी चौथीत असेल...दर वर्षी नागपंचमीला आई आम्हा भावंडांना नवीन कपडे शिवून घ्यायची...त्या वेळच्या नवीन फॅशनचा!
आणि अगदी पारंपारिक पध्दतीने हा सण साग्रसंगीत  साजरा व्हायचा...
माझ्यासाठी लाल रंगाचा पांढरी लेस लावलेला प्लेन पाकिजा शिवला होता त्या वर्षी...
आजही लख्ख आठवतोय...
नागाचे चित्र असलेल्या पुठ्ठ्याच्या वहीची खरेदीही झाली...त्या पूर्वि दोन दिवस बारीक पानांची मेंदीची झाडं मैत्रीणींनी मिळून शोधत शोधत त्याची पानं आणून झाली होतीच....ती पाटा वरवंट्यावर वाटून मेहंदी भिजवणे त्यात कात, चुना मिसळून...आणि दोन्ही हातांवर रात्री झोपताना लेप फासणे, शिवाय यावर थोडे सुकल्या नंतर कपडयाने तळहात बांधून झोपणे असा कार्यक्रम असायचा...
सकाळी तेल लावून हात धुतले की लालेलाल हात बघून स्वतःचेच कौतूक वाटायचे!
    शाळेत नवीन कपडे, नव्या बांगड्या, नवे कानात, गळ्यात, हातावर मेहंदी आणि सजून धजून स्वारी शाळेत निघायची...आठवणीने नागाच्या पुठ्ठ्याची वही सोबत घेऊन...
मग शाळेत या पुठ्यावरच्या चित्राची पुजा म्हणून तीन तीन वेळेला पाया पडले जायचे!
   त्या दिवशी अर्धीच शाळा असायची, घरी आईने कागदावर पेनाने काढलेल्या नागोबाला नमस्कार होत असे आणि मग उकडीचे दिंड, ढोकळा यावर जेवणात ताव मारला जायचा...
   दुपारी वाड्यात गारुडी यायचा नागोबा त्याच्या गोल झाकणाच्या परडीतुन हळूच डोकावत हळू हळू वळवळत बाहेर यायचे...किती दूर उभे असायचो आमही मूले!मनातील भितीचे साम्राज्य डोळ्यात मावायचे नाही!
कोणी तरी मावशी, काकू समोर जाऊन त्याला हळदी कुंकू वहायच्या आणि दूधाची छोटी वाटी त्याच्या समोर ठेवायच्या...गट्टम करायचा ना तो क्षणात!
आणि मग दिवसभर काय दोन तीन  दिवस उंबराच्या झाडाला बांधलेल्या झोक्यावर उंच उंच झोके घेत मज्जा चालायची! आम्ही मुलीच नव्हे तर वाड्यातील सर्वच स्त्रियाही बालिकाच बनायच्या!
हळू हळू पानांच्या मेंदीची जागा मेंदीच्या पावडरने घेतली, काडीने हातावर डिझाईन आले,मग तीच जागा मेंदीच्या कोनाने घेतली....
झाडावरच्या झोक्याची जागा परसातल्या झूल्याने किंवा झोपाळ्याने घेतली....जेवणात दींड ऐवजी ईडली,उखरी आली आणि नागोबाची गच्छंती होऊन कायम ते चित्रातच जाऊन बसले...
  सासरी आल्यावर सासुबाईंकडनं  नागपंचमीचा एक दिवस अगोदरचा धान्य उपवास समजला...त्या दिवशी चीरणं,आणि विंचरणं हा प्रकारही बंद असतो हे समजलं...माहेर घरच्या लेकीचं कौतूक असतं, बहिणीनं भावाला दूधलाह्या भरवायच्या असतात हे सारं समजलं...त्या साठी गावातल्या नणंदबाई यायच्या...
    हल्ली तर काय हे 
सुध्दा हळू हळू लोप पावत चाललंयं...ती पिढीही, तो साग्रसंगीतपणा आणि तो मेन्यूही...
कुणाला हे सारं करण्यासाठी वेळही नाही, अशा औपचारिकपणाची आवश्यकता वाटतही नाही....
पण आमच्या पिढीजवळ त्या आठवणींचा खजिना आहे...तो सांगावासा वाटला म्हणून हा प्रपंच!
    हल्ली मात्र निसर्गाचा श्रावणात असणारा उल्हासितपणा, वृत्तींची तरलता, आणि प्राणीमात्रांविषयी सहानुभूतीपूर्वक दृषटकोन यांविषयी मनात वाटणारी प्रगल्भता पूर्णपणे वाढलेली आहे...हे ही नसे थोडके!हो ना? बस आता थांबते...🐍

©️ 
*नंदिनी म.देशपांडे*
नागपंचमी, २०२१.
औरंगाबाद. 
🌹🌹🌹🌹🌹
.

मंगळवार, १० ऑगस्ट, २०२१

"व्रतबंध संस्कार".

*व्रतबंध संस्कार*
****************
   हिंदू धर्मात माणसाच्या जन्मानंतर शेवटापर्यंत त्याच्यावर सोळा संस्कार केले जातात...त्या व्यक्तीच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर कोणता तरी एक ठराविक संस्कार केला जात असावा असा माझा अंदाज आहे...
    त्यातीलच एक 'व्रतबंध'संस्कार....
या मागचे धार्मिक अधिष्ठान थोडे बाजूला सारुन आपण या संदर्भात सामाजिक दृष्टिकोनातून विचार करु या...
    
व्रतबंध संस्कार हा सामान्यपणे मुलाच्या आठव्या वर्षी केला जातो...
बाळ बर्‍यापैकी मोठं होऊन आपली कामं ते या वयात करु लागते...म्हणजेच ते आईवडिलां पासून थोडे वेगळे झालेले असते.
या वयात ते स्वतंत्रपणे बसून दिलेला अभ्यास करु शकते,शिकण्याची कला त्याला अवगत होऊ लागते...त्याच्या भविष्याच्या वाटचालीतील हा एक फार महत्वाचा पहिला टप्पा होय...
   आपण स्वतंत्रपणे काही गोष्टी करु लागलो आहोत याचा मनस्वी आनंद त्याला होतो आणि,"मी आता मोठा झालोय," असे तो सांगू लागतो...

  व्रतबंध हा संस्कार विवाहविधीशी साधर्म्य सांगणारा...यात वडिल आणि मुलगा या दोहोंचा विवाहच लावला जातो...म्हणजेच, वडिल आणि मुलगा यांच्यात या टप्प्यावर मैत्रीचे नाते निर्माण होणे अपेक्षित आहे...मुल मोठं झालंयं, त्याला आता हात धरुन किंवा धाकधपाटा देऊन शिकवणं गरजेचं नाही तर त्याचा चांगला सहकारी बनत त्याला सुचना,मार्गदर्शन करत शिकावयास लावणं होय...
गुरुकुल पध्दतीने शिक्षण घेण्यासाठी त्याला गुरुकुलात पाठवण्याची तयारी हा व्रतबंध संस्कारा मागचा दुसरा एक हेतू...याचाच अर्थ, वयाच्या या टप्प्यावर मोठ्या होत जाणाऱ्या मुलाला स्वावलंबन आणि समायोजनाचे धडे गिरवत गुरुंच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेण्याची मुभा देणे होय...
म्हणूनच व्रतबंध संस्कार फार महत्वाचा मानला जातो....
आज आमच्या नात्यातील एका आठ वर्षीय बालकाचा व्रतबंध संस्कार पार पडला,आणि माझे मन या मागच्या सामाजिक पार्श्वभूमीचा नकळत आढावा घेऊ लागले...
शैक्षणिक शिखराची एक पायरी चढण्याची तयारी म्हणजे व्रतबंध असेही म्हणता येईल....

    आणखी एक महत्वाचे म्हणजे, 'व्रतबंध' याचा अर्थ एखाद्या नियमाशी बांधून घेणे...तो पालन करण्यात सातत्य टिकवणे...
व्रत म्हणजे,
स्विकारलेल्या नियमांचे,तत्वांचे सातत्याने पालन करणे,आणि हे पालन करण्यासाठी आपण बांधिल असल्याची जाणीव या वयात मुलांच्या मनात रुजवणे होय...
म्हणूनच योग्य त्या वयात योग्य तो संस्कार होणे केंव्हाही चांगलेच...

©️
नंदिनी म.देशपांडे. 
७,ऑगस्ट, २०२१.
🌹🌹🌹🌹🌹

मंगळवार, १३ जुलै, २०२१

तात्यासाहेब देशपांडे.

दोन तीन दिवसांपूर्वीच फादर्स डे पार पडला...प्रत्येकाने तो आपल्या वडिलांप्रती कृतज्ञ भाव व्यक्त करत, साजरा केला...
काकांविषयी व्यक्त व्हावं असं आवर्जुन वाटायचं माझ्या मनाला,काका,माझे सासरे,म्हणजे माझ्यासाठी पित्यासमानच...यांच्या विषयी व्यक्त होण्यास वाटलं,  हे निमित्त अगदी योग्य आहे 

   केवळ वर्ष दिडवर्षेच काय तो त्यांचा सहवास लाभला मला त्यांचा...वाटलं असे कितीसे ओळखतो आपण त्यांना? पण मधुकरच्या बोलण्यातून येत असणाऱ्या त्यांच्याविषयीच्या संदर्भाने मग मी एक आठवणींची मालिका मांडत गेले....
     काका, म्हणजे स्व.श्री भुजंगराव संतुकराव उमरजकर देशपांडे. जन्म.१९०७ चा ...
माझे हे सासरे.... त्यांच्या शेंडेफळ आपत्याचे लग्न झाले, म्हणजेच मधुकर आणि मी विवाहबंधनात बांधले गेलो, तेंव्हा आमच्या काकांचे वय होते, ७८ वर्षे....
लग्नानंतर गावी गेले असताना चार आठ दिवस आणि ते आमच्या बदलीच्या गावी जेमतेम महिनाभर राहिले असावेत एवढाच काय तो माझा त्यांच्याशी प्रत्यक्ष सहवास!
      त्यांचे आईवडिल लवकरच गेलेले, आत्याने (वैधव्य आलेल्या)या दोन भावंडांना सांभाळले...आमच्या घरी राहून त्यांचे पालनपोषण केले...शेती बघितली...
    काकांना गावात सारेजण 'तात्यासाहेब' या नावाने संबोधत....
तात्यासाहेबांनी त्या काळात नववी पर्यंत शिक्षण घेत शेतीकडे लक्ष द्यावयास सुरुवात केली....आपल्या शिक्षणाला पूर्णविराम देत,शहरात शिकावयास न जाता घराच्या कारभाराची जबाबदारी स्विकारली...

   तात्यासाहेबांना गावातील पोस्टाचे, (पोस्टमास्तर) चे काम मिळाले...नोकरी म्हणून नव्हे पण काही अंशी मानधन मिळायचे त्यांना यातून...पोस्ट खात्याकडून विचारण्यात आल्या नंतर त्यांच्या विनंतीला मान देत,काकांनी गावात पोस्टाची सोय होईल लोकांसाठी, या हेतूने हे काम घरीच करावयाचे पण आनंदाने स्विकारले...
      त्या वेळी सहा पैशांना एक पोस्टकार्ड होतं, असे चार पोस्टकार्ड घेतल्यानंतर एखाद्या ग्राहकाने पंचेवीस पै. दिल्यास, राहिलेला एक पैसाही काका ग्राहकाला परत करत असत!
त्यामूळे घरी येणाऱ्या लोकांचा राबता वाढला...

    काकांना,धार्मिक ग्रंथ पठणाचा नाद होता...ओसरीवर त्याचे नियमित पणे काही वेळ हे वाचन पठण चालू असायचे...आपल्या कानावरही हे पडेल या निमित्ताने अनेक जण येवून बसत ओसरीवर....
    एक अतिशय तत्त्वनिष्ठ आणि प्रामाणिक व्यक्तिमत्व, एक सोज्वळ देवमाणूस अशी त्यांची गावभर ओळखली जाणारी प्रतिमा होती...
    गाव तसे छोटेसेच. फार पूर्वी दवाखान्याची सोय नव्हती,पण लोकांची तात्यासाहेबांवर फार श्रध्दा. एखादी अडलेली पहिलटकरीण असेल तर आमच्या काकांना ही लोक नदीवर घेऊन जायची पाण्याची घागर त्यांच्या स्वहस्ते भरून आणत, पहिलटकरीणीच्या अंगावर ओतायला लावायचे लगेच ह्या बाईची प्रसुती होऊन तिला वेदना मुक्ती मिळायची असा गावकऱ्यांचा विश्वास होता...

    उममरज आमचे गाव...मन्याड नदी वाहते आमच्या गावातून....नळाची सोय नव्हती त्या वेळी, पुरुष माणसं नदीवर अंघोळीला जायचे आणि येताना पिण्याच्या पाण्याची लगड  घेऊन यायचे हा शिरस्ता होता...
  
काकांच्या प्रामाणिकपणाची
साऱ्या पंचक्रोशीत ख्याती होती...आसपासचे लोक बाहेरगावी जाताना स्वतःच्या घरातील किंमती ऐवज, पैसा अडका काकांच्या स्वाधीन करुन जायचे!आपण केंव्हाही परतलो तरी, जसाच्या तसा सारा ऐवज आपल्याला लगेच परत मिळतोच असा लोकांना गाढ विश्वास होता त्यांच्यावर....

  दिसायला देखणे, मध्यम उंचीचे, गोरेप्पान काका अत्यंत शिस्तीचे होते....सकाळी अगदी हलकी न्याहरी आटोपून देवपुजा,गड्याने शेतातून आणलेल्या पळसाच्या पानाचे दररोज थोडे द्रोण पत्रावळी बनवून ठेवणे, शेतामध्ये जाऊन येणे, पोस्टाचे काम बघणे, आल्या गेलेल्यांची व्यवस्थित विचारपूस करणे, पाहूणे आले तर त्यांचा आदर सत्कार करत,त्यांना पाहूणचार करणे ,दररोज मठामध्ये जाऊन दर्शन घेऊन येणे..आणि सायंकाळी सायंप्रार्थना आटोपत  अगदी वेळेच्या वेळी 
मोजकाच आहार घेणं असा त्यांचा दिनक्रम असायचा...
वर्षातून दोन वेळेस तरी लेकीबाळी माहेरपणाला आणणे...दिवाळी आणि उन्हाळ्यात...
जावयांचा मानसन्मान, नातवंडांच्या सहवासात रमणं हे सारं त्यांना आवडत असे...
   बाजारहाट करण्यासाठी जवळच्या तालूक्याच्या ठिकाणी पायी किंवा बैलगाडीने जावे लागायचे....
सारा प्रपंच आवश्यक त्या गरजा पूर्ण करत पण काटकसरीनं, व्यवस्थित रीती रिवाजानं सणवार साजरे करत, कुलधर्म कुलाचाराचे आचरण करत कोणाचेही मिंधेपण न स्विकारता अगदी स्वाभिमानाने चालवला त्यांनी....केवळ शेतीच्या उत्पन्नावर!
सहा आपत्यांचे शिक्षण,लग्नकार्य, त्यांची बाळांतपणं सणवार यथोचित केले...
गाठीशी रोकड रक्कम नसायची पण अडल्या नडल्या परिस्थितीत लोकांना, नातेवाईकांना शेतमालाच्या रुपाने मदत द्यायचे....
मधुकरचे सारेच शिक्षण घरापासून लांब राहून झाले...त्याला नियमीत पत्र लिहून त्याची खुशाली विचारत.. येणाऱ्या सणवारांची माहिती द्यायचे...
व्यवहारात अगदी चोखपणा बाळगला काकांनी...
भावाने जरी तिकीट काढले असेल कधी बसचे,तर त्यालाही घरी आल्यानंतर लगेच तिकीटाचे पैसे चुकते करत ते!
   मला आठवतं, आमच्या लग्नाच्या वेळी उमरजहून औरंगाबाद येथे येण्यासाठी बसभाडे रु.पाच हजार माझ्या बाबांनी देऊ केले होते....साडेचार हजारच लागले, 'हे उरलेले पाचशे रु.' असे म्हणत बाबांनी नको म्हणत असतानाही त्यांनी ती पाचशे रु.ची रक्कम परत केली होती...

मला प्रथम बघितले त्यांनी होणारी सून या दृष्टिकोनातून... आणि पहिला प्रश्न विचारला, 'आम्ही खेडेगावात रहाणारी माणसं, निमित्तानं चार दिवस आलीस, पोरी गावी,तर करमेल तुला?"आणि "भाकरी खाणारे आम्ही, ती बनवायला येते का?"
मला खरोखरच येत नव्हती...पण मीही अश्वासन दिले त्यांना, मी शिकेन लवकरच आणि तुम्हाला बनवून वाढेल...
आणि ज्या वेळी पहिल्यांदा ते आमचा संसार बघावयास सेलू या गावी आले तेंव्हा, मी त्यांना माझ्या हातची भाकरी करुन वाढली....तर ते माझ्या सासुबाईंना कौतुकाने म्हणाले, "पोरीने केलेली ही भाकरी बघा किती पातळ आहे!पोळी आहे का भाकरी?कळत सुध्दा नाही"...
    गावी मी चूल पेटवून स्वयंपाकही बनवलाय हे बघून त्यांना फार कौतूक वाटायचे...जन्मापासून शहरातच वाढलेली मी, काही कामं येतील का हिला?यासाठी साशंक होते ते...
पुनःश्च एकदा आमच्या बदलीच्या गावी (सेलू ) येथे त्यांना काही दिवस येऊन रहावयाचे होते...लकडा लावला होता त्यांनी सारखा 
पण, नियतीला ते अमान्य होते...
   मार्च महिना,दुपारचे भर बारा वाजत आलेले,
कोणी परिचित आलाय म्हणून त्याच्याशी बोलत बसले....पर्यायानं स्नान, देवपुजा यांना उशिर झाला..."आजच्या दिवस राहू द्यात देवपुजा", असे म्हणताच चिडून म्हणाले,"माझ्या जीवात जीव आहे तोवर मी पुजा करणे सोडणार नाही" ...
सिंहगर्जनाच केली त्यांनी...मात्र दररोज सोवळे नेसून पुजा केल्या नंतर त्यांना लगेच  गरमागरम जेवण तयार लागायचं...
 ते स्वयंपाक घरात आले की जेवायला बसायचे...
त्या दिवशीही असेच घडेल असे वाटले होते....आमच्या ताई पुजेची सारी तयारी काकांना करुन देत, त्यांचे ताट वाढण्यासाठी स्वयंपाक गृहात दाखल झाल्या आणि सासूबाई चूलीजवळ गरम भाकरी करु लागल्या...
 देवासाठी लावलेली तेवती निरंजन एका कपाटा प्रमाणे असणाऱ्या देवघरात ठेवताना, त्यांच्या डोळ्यांच्या अधू झालेल्या दृष्टिने घात केला आणि,ती निरंजन त्यांच्या सोवळ्याच्या सोग्यावर ठेवली गेली....भराभरा सोग्याने खालच्या बाजूने पेट घेतला...पायाला चटके बसेपर्यंत त्यांच्या लक्षात आले नाही...तेथून तसेच बाहेर आले...आतल्या खोलीत जाऊन आपले पेटलेले सोवळे त्यांनी फेडून टाकले...पण... पण तो पर्यंत कमरेपर्यंत चा भाग अगदी भाजून निघाला होता....
सासूबाई आणि ताई तेथे येईपर्यंत बरीच हानी पोहोंचली होती त्यांच्या शरीराला...
असह्य वेदना होत असतानाही तशाच वेदना सहन करत स्थितःप्रज्ञ होऊन केवळ "डोंगराला आग लागली", असे म्हणाले आणि मुखी विष्णूसहस्रनामाचा पाठ त्यांनी सुरु केला....
    खेडेगाव, वाहनाची बस शिवाय दुसरी सोय नाही...बसही फक्त दोन वेळेस...त्या दिवशी योगायोगाने  नेहमी दहा वाजता येणारी बस दुपारी बारा वाजता आली...
गावकऱ्यांनी घडलेल्या अपघाताची कल्पना बसचालकाला दिली...त्या भल्या माणसाने काकांना आणि आवश्यक त्या लोकांना बसमध्ये घेतले आणि सरळ ती बस कंधारच्या हॉस्पिटल समोरच थांबवली....घरी असेपर्यंत सासूबाई आणि लेकीने त्यांना साठवलेल्या सायीमध्ये हळद मिसळून लेप लावला होता त्यांच्या  शरीरावर....
    हाच काय तो प्राथमिक उपचार झाला...कारण कंधारचे डॉक्टर ही पेशंटची अवस्था बघून उपचारास धजावले नाहीत...त्यांनी सरळ नांदेडला घेऊन जावयास सांगितले...
त्यात आणखी दोन तीन तास गेले...
पण, डोंगराएवढ्या काळजाचा,करारी वृत्तीचा हा देवमाणूस अजिबात डगमगला नाही...मुखी अव्याहत देवाचे नामःस्मरण चालूच होते...रक्ताची आवश्यकता त्यांच्याच धाकट्या मुलाने म्हणजे, मधुकरने त्यांना रक्त देवून पूर्ण केली...ऐंशी वर्षाच्या या महापुरुषाला आपली दोन्ही मुलं आपल्या जवळ आहेत याचे खूप समाधान वाटले आणि अपघातानंतर आठ दिवसांनी अगदी शांततेने दोन हात जोडत, २८मार्च,१९८७ या दिवशी जगाचा कायमचा निरोप त्यांनी घेतला...
 गंगाकिनारी आपला देह ठेवून गावकरी आणि आप्तजनांसाठी आपल्या कितीतरी समृतींचा गंध साठवून गेला....सारं गाव हळहळलं देवमाणसाविना पोरकेपणा आल्याच्या भावना व्यक्त करत साश्रू नयनांनी त्यांच्या आठवणी जागवत राहिलं....
असे माझे हे पित्यासमान सासरे, 
केवळ दीड वर्षांच्या सहवासातून माझ्या मनातील त्यांची प्रतिमा कितीतरी उंचावर नेऊन ठेवत, स्वर्गवासी झाले...नेमक्याच झालेल्या पितृदिनानिमित्त त्यांचे स्मरण करत, माझी ही शब्दसुमनांजली त्यांना वाहते....
🙏🙏
-- नंदिनी म. देशपांडे. 

🌹🌹🌹🌹🌹

बाप्पा.

🌹'कर्तव्याने घडतो माणूस'
  आमचे बाप्पा आजोबा.🌹
  ‐------------------------------         
 श्री आनंदराव शेषराव उमरीकर....
वकील. परभणी. 
हे माझे आजोबा. माझ्या वडिलाचे वडील...
 त्यांची मुलं,मुली,जावई,सूनबाई,आप्तस्वकीय, नातवंड ही सारीचजण त्यांना "बाप्पा"
असे म्हणत...घरी सर्वांचे बाप्पा असणारे आजोबा, बाहेर साऱ्यांचे आनंदराव,वकिलसाहेब  होते...
    मी अगदी चार वर्षांची असेल तेंव्हा आपल्या वयाची ऐंशी वर्षे पूर्ण करुन बाप्पांनी या जगाचा निरोप घेतला...सहाजिकच त्यांच्या मला मिळालेल्या सहवासाच्या आठवणी मला आठवाव्यात हे अशक्यच...पण, माझ्या बाबांचं दैवत असणाऱ्या बाप्पांचा मोठा फोटो कायम आमच्या बैठकीत लावलेला असायचा, आजही तो आहेच...सोबत माझ्या मोठीआईचाही...
पण मोठीआई मी दहा वर्षाची असताना गेली.... म्हणून तिच्या थोड्यातरी आठवणी स्मरणात आहेत माझ्या....असो...

 बाप्पांची प्रतिमा बघत बघत त्यांचं अस्तित्व कायमच माझ्या माहेरी जाणवत रहायचं....बाबांनी आईने ते त्यांच्या आठवणी सांगत जागतं ठेवलं असं म्हणू या हवं तर...
आणि यामूळे ते मला पुसटसे आठवतात असा भास होतो...
    पण बाबांच्या सांगण्यातून बाप्पांच्या आठवणींना उजाळा मिळत जातो...तो आपण शब्दबध्द करावा असं प्रकर्षानं   वाटलं आणि लिहिती झाले मी...

...२७ मे,१९७० मध्ये बाप्पा गेले तेंव्हा ते ८० वर्षे वयाचे होते...म्हणजेच त्यांचा जन्म इ.स.१८९० चा...बालपण परभणी जिल्ह्यातच असणाऱ्या (माळाची) उमरी या गावी गेलेले...या छोट्याशा गावी एका टेकडीवर ईंद्रायणी देवीची प्रसन्न मूर्ति(तांदळा)वास करतो...
याच गावी त्यांची वडिलोपार्जित घर आणि शेती, म्हणूनच ते उमरीकर....

   पूर्विपासूनच हे सुखवस्तु कुटुंब...
    एकूण सहा भावंड. त्यांपैकी शिक्षणाच्या निमित्ताने दोघे भाऊ हैद्राबादेत गेले...तेथे वकिलीची सनद घेऊन दोघांनी सध्याच्या मराठवाड्यात,पण त्या काळी निजामाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या... परभणी शहरात श्री आनंदराव यांनी म्हणजे माझ्या आजोबांनी आणि सेलू या गावी त्यांचे भाऊ रंगराव यांनी वकिली चालू करत तेथेच आपले बिऱ्हाड थाटले...

   सुरुवातीला जम बसेपर्यंत आनंदरावांनी भाड्याच्या घरात राहूनच संसाराची घडी बसवली.... एक मुलगी झाल्या नंतर त्यांची पहिली पत्नी कृष्णाबाई दुर्दैवानं जात राहिली...या कृष्णाबाईंचं माहेर परळी होतं....

    तिच्या जाण्यानं त्या वेळच्या रुढी नुसार तिची जागा माझी आजी, मोठीआई अहिल्या राम उर्फ राजाजी कोठेकर,जी बाप्पांपेक्षा पंधरा वर्षांनी लहान होती.... यांनी भरुन काढली....पण कृष्णाबाई आनंदराव उमरीकर या नावानेच तीही उमरीकरांच्या घरी माप ओलांडून आली....

   मोठी आई बाप्पांच्या लग्नानंतर लवकरच 
 प्लेगची साथ आली होती, त्यावेळी बहुतेक जण गावाच्या बाहेर तंबू ठोकून राहू लागले... बाप्पाही कुटुंबासह तेथेच होते...
...बाप्पांनाही प्लेगची गाठ आली होती...या आजाराशी निकराने झुंज देत त्यांनी मातही केली होती  प्लेगवर...
पण, एक दिवस अचानक बाप्पा एकदमच निपचीत पडले ...
तेथे उपलब्ध वैद्यांनी"बाप्पा गेले", असे जाहिर केले...
त्यांच्या अंतीम प्रवासाची तयारी केली गेली...त्यांचा खाली घोंगडीवर ठेवलेला देह आता उचलणार एवढ्यात, नव्यानेच लग्न झालेल्या माझ्या आजीच्या चाणाक्ष नजरेनं बाप्पांचा पायाचा अंगठा हलतोय हे लक्षात आलं...तिने, "ते आहेत, गेले नाहीत"असे निक्षून सांगितले. एकच गोंधळ उडाला...वैद्यांना पाचारण करण्यात येवून लगेच उपचार चालू केले...आणि काय आश्चर्य, बाप्पा यातून लवकरच ठणठणीत बरे झाले..
    या नंतर माझ्या आजीशी कित्तेक वर्षे संसार होऊन  त्यांना सहा अपत्य झाली!
त्यांच्या कर्तृत्वाने आभाळाएवढी उंची गाठत 
कुटुंबाचा आधारवड बनले ते...
ही आठवण बाबांना,१९७० मध्ये बाप्पांचे निधन झाल्यानंतर बाप्पांचे मित्र श्री महतपुरीकर देशपांडेआजोबा,जे क्रांती चौकात रहावयाचे, यांनी सांगितली होती...

   अगदी केतकी असं चमकदार गोरेपण, नाकीडोळी निटस, उंच, धिप्पाड बांध्याचे आमचे बाप्पा फारच देखणे होते...
 त्यांचा विवाह झाला त्यावेळी ते वकिल झालेले होते...
परभणीत सुरुवातीला, सध्याच्या गांधी पार्क या भागात भाड्याने राहिले ते... आपल्या कुटुंबाला घेऊन ....
म्हणजे,पहिला विवाह झाल्यानंतर ही ते तेथेच रहायचे...
पण ती जागा नंतर पालिकेने ताब्यात घेतली आणि सर्वांनाच तेथील घरं रिकामी करावी लागली...त्यावेळी बाप्पांनी, गावापासून थोडे दूर, (आताचा स्टेशन रोड)
सलग अशी मोठ्ठी जागा घेतली ... आणि आपला मोठा वाडा, बंगला बांधला... 
    बाप्पांनाही बांधकामात आणि त्याच्या नुतनीकरणात फार रस होता...
आपल्या बंगल्याचे बांधकाम झाल्यानंतर राहिलेल्या जागेचे मोठे मोठे प्लॉट्स पाडून त्यांनी ते आपल्या ओळखीच्या लोकांना आणि वकिल मित्रांना विकून टाकले...
म्हणूनच एका ओळीत आनंदराव उमरीकर, खळीकर, शहाणे,शहाणे असे बंगले होते सर्वांचे! कालांतराने माझ्या वडिलांनी,प्रभाकरराव उमरीकर यांनी त्या बंगल्याचे नुतनीकरण करत, याच बंगल्याचे नामाभिधान,"आनंद सदन " असे केले...
   त्यावेळी या भागात नळ आलेले नव्हते..पण शेजारीच एक बांधलेली विहिर होती...ती व्यवस्था बघूनच त्यांनी हा बंगला बांधला होता...
अतिशय प्रशस्त असा समोर हा बंगला आणि मागे बरेच भाडेकरु असा मोठ्ठा डोलारा छान पैकी नांदत असायचा येथे....अगदी पंधरा एक वर्षां पूर्वी पर्यंत!
परभणीचा उमरीकरांचा वाडा तेंव्हापासून प्रसिध्द होता...कित्येक बिह्राडं राहून गेली या वास्तू मध्ये!

    बाप्पांचा वकिली व्यवसाय छानच चालायचा...पण तरीही त्यांनी सिगारेटस् मध्ये भरावयाची तंबाखू तयार करण्याची फॅक्टरी काढली ती तंबाखू तयार करुन हैद्राबादेत पाठवण्याचा एक छोटेखानी व्यवसायही चालू केला होता...
या फॅक्टरीची जड मोठे लोखंडी अवशेष नंतर कित्येक वर्षे होती आमच्या अडगळीच्या खोलीत...

    परभणीत चांगला जम बसवला बाप्पांनी आणि गावी,उमरी येथे असणाऱ्या वडिलोपार्जित शेतजमीनीवरचा आणि घरावरचा हक्क मात्र बाकी भावंडांना देऊ केला...
अतिशय उमद्या मनाचे आणि समाधानी वृत्तीचे बाप्पा, फार कुटुंब वत्सल होते...
त्या काळात मुलींना शिक्षणासाठी शाळेत पाठवले जायचे नाही...पण आमच्या बाप्पांनी, आपल्या मुलींना घरी येवून शिकवणाऱ्या शिक्षकाची नियुक्ती केली होती...माझी मोठीआईही साक्षर आणि हुशार होती...
त्यांच्या काळापासूनच आमच्या घरात अंधश्रध्देला कधीच थारा नव्हता...
पण ईश्वरी श्रध्दा नांदत असायची....बाप्पा दररोज मोठ्या अशा लाकडी देवघरात बसून दररोज पुजा नैवैद्य वैश्वदेव करायचे....

   बाप्पांचा मित्रपरिवार सुध्दा फार मोठा होता...दरवर्षी ते मित्रमंडळींसोबत सुट्ट्यामध्ये पर्यटनासाठी चार दिवस बाहेरगावी जाऊन येत...पण रझाकार सुरु झाला तेंव्हा आपल्या संपूर्ण कुटुंबासह, काही नातेवाईक,त्यात माझ्या आजीचे मावसभाऊ सेलूचे वासुदेवराव टाकळकर आणि कुटुंबीयही होते...आणि कांही मित्र मंडळी व त्यांचे कुटुंबीय क्रांती चौकात रहात असणारे असे सर्वच जवळपास सहा सात महिने त्र्यंबकेश्वर येथे भाड्याने एक जागा घेऊन मुक्कामी राहिले होते...
   त्या वेळेस आमचा परभणीचा कारभार माझ्या आजीचे मोठे भाऊ श्री उध्दवराव कोठेकर यांनी आमच्या घरी राहून सांभाळला होता...त्यांना रझाकारापासून काही धोका नव्हता कारण  ते स्वतः अधिकाऱ्यांच्या बायकांना संगीत शिकवण्यासाठी त्यांच्या घरी जायचे...

  बाप्पांनी वडिलोपार्जित शेतीवरील हक्क सोडून दिला होता तरीही, परभणीत स्वकष्टार्जित अशी तीस एकर बागायती शेती घेतली होती...
आंबराई तर फारच नामी होती...आमराई थोडी उशिरा लावली, बरेच जण "तुम्हाला काय खायला मिळतील अंबे?कशाला लावताय"?असे म्हणाले पण "मी नाही तरी माझी मुलं नातवंडं खतील ना "असे ते म्हणाले ...आणि त्यांच्याच भाग्याने त्यांनी स्वतः तर खाल्लेच अंबे, पण कितीतरी लोकांच्या घरच्या रसाळी आणि लोणची या आब्यांनी साजरी केली.... वर्षानुवर्षे!
आम्ही लहानपणी चाखलेली आंब्याची मज्जा काही ओरच होती...आयुष्यभर पुराव्यात अशा या बाबतीतील गोड आठवणींची साठवण मनात रुजून बसलीए...
आमच्या या शेताला लागूनच उरूस भरायचा परभणीच्या तुरतपीराचा आजही भरतो तो...गावातच शेती झाल्याने नाईलाजाने बाबांनी साधारण वीस वर्षांपूर्वि शेती विकली....
    
   त्या काळच्या समाजमनाप्रमाणे बाप्पांचे आपल्या मुलावर अतोनात प्रेम होतं...वयाच्या आपला थोड्या पुढच्या टप्प्यात थोडं उशिरा पाच मुलींच्या पाठीवर झालेला मुलगा म्हणजे त्यांचा जीव की प्राण. मुलींचं क्षेम क्षेम आहे ना याकडे कायम लक्ष असायचे...
स्वकर्तृत्वावर प्रगाढ विश्वास असणाऱ्या अशा आमच्या बाप्पांचा आत्मविश्वास फार प्रबळ होता...

    उर्दू माध्यमातून न्यायालयिन कामकाज चालू होते तो पर्यंत म्हणजे इ.स.१९५० पर्यंत...
मराठवाडा स्वतंत्र झाल्यानंतर, कामकाजाची भाषा इंग्रजी झाली आणि आनंदराव उमरीकर वकिलांनी कोर्टात जाऊन कामकाज बघणे सोडले...
आमच्या घरी उर्दू भाषेतून कायद्याच्या कायद्याच्या पुस्तकांचा फार मोठा संग्रह मी स्वतः बघितला आहे...
आपल्या वयाच्या साठ वर्ष पूर्ण करत निवृत्ती पत्करणार्या आमच्या बाप्पांनी स्वतःचा मुलगा आपल्या जवळच असावा म्हणून माझ्या बाबांना मुद्दाम वकिलच बनवले होते...
दोन तीन वर्षे मुलाचा वकिलीतील जम बसलाय हे बघत समाधानाने,
घरात माहेरपणाला लेकी जावई नातवंड आलेली असताना, मुलाला झालेली दोन कन्यारत्न  बघून,आंबराईची अढी लागलेली असताना अगदी भरल्या गोकुळातून आनंदाने, "माझा शेवट जवळ आलाय आता औषधांचं काम नाही ही सुचना डॉक्टरांना दिली...
आमचे कौटुंबिक डॉक्टर,श्री मधुकरराव चौधरी हे बाप्पांना ऑक्सिजन सिलिंडर लावत असताना, माझ्याशी फक्त थोड्या गप्पा मारा" असे म्हणाले...माझ्या आईकडून तिच्या सासुबाईंची यथायोग्य काळजी घेण्याचे वचन घेतले.. आणि आपल्या धाकट्या जावयाकडून,श्री रामचंद्र आसोलेकर यांच्या कडून मेहूण्याकडे (स्वतःच्या मुलाकडे)
लक्ष देणयाचा शब्द घेतला त्यांनी,आणि बारा तासातच दोन ह्रदयविकाराचे झटके आल्यानंतर,बाबांच्या मांडीवर डोके ठेवून 
कायमचा निरोप घेतला आणि स्वर्गलोकीची वाट धरली बाप्पांनी...तो दिवस होता, २७,मे १९७० चा...
आजही बाप्पांची प्रतिमेतील प्रसन्नमुख छबी बघितली की, त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होते हे मात्र खरंए...
माझ्या आजीच्या ईच्छेनुसार नातवाला आजोबांचेच नाव द्यावे ही तिची ईच्छा माझा भाऊ झाल्या नंतर आईबाबांनी पूर्ण केली आहे...त्यांच्या वकीली व्यवसायाचा वारसा उत्तम पध्दतीने चालवणारी ही उमरीकरांची तिसरी पिढी होय...
   स्व. बाप्पांच्या,आनंदराव उमरीकर यांच्या स्मृतिंना विनम्र अभिवादन करत मीही आता पूर्ण विराम घेते...🙏🙏

©️ 
नंदिनी म. देशपांडे.
दि. १० जूलै,२०२१.
औरंगाबाद. 

🌹🌹🌹🌹🌹

रविवार, २३ मे, २०२१

# चहा. #

☕ चहा  ☕
           _________

     खरे तर चहा, चहा मी स्वतः दहावीला गेल्यानंतर वार्षिक परीक्षेचा, रात्री जागून अभ्यास करायची ना, तेंव्हापासून घेणे चालू केलेले....हे मला निश्चित आठवते....
     नवीन टेपरेकॉर्डर घेतला बाबांनी, आणि दिवसभर आमच्या एका स्नेह्या कडून गाण्याच्या  तबकड्या आणून नवलाईने आवडीची गाणी टेप करायची, मी....आणि मग रात्री अभ्यास करत जाऽगत बसायचं....
त्यावेळी, अभ्यासासाठी जागायचं म्हणजे, चहा तर घ्यायला हवाच...हे समिकरण डोक्यात पक्कं बसलेलं...
   जागून अभ्यास करणारांचा तो मुलभूत हक्कच जणू, असंच नेहमी वाटायचं...
    
   त्या वेळीच प्रथम झालेली चहाच्या चवीची ओळख, हळू हळू दोन वेळच्या चहामध्ये कधी बदलत गेली समजलेच नाही....
वयाच्या तीशी पर्यंत दोन  वेळेला चहा घेणारी मी, चांगलीच चहाबाज बनले आहे,  हे प्रवास करताना लक्षात आलं...बरोबर चार साडेचार  झाले की दुपारचा आणि  सकाळी आठ वाजता चहाची आठवण यायचीच यायची....
प्रवासात बाहेरचा चहा तेथील स्वच्छता (? )बघता भावायचीच नाही कधीच आणि मग जाणवला हा माझा चहाबाजपणा मलाच पहिल्यांदाच....
या शिवाय पर्यटनासाठी परदेश दौऱ्यावर असताना तर चहाची आठवण प्रकर्षाने व्हायचीच....
       
    पण चहा सुध्दा बाहेर गेल्यानंतर कुणाच्या घरी झाला असेल,आपल्या वेळेतच झाला असेल तरीही त्याला आपल्या घरच्या, त्यातही आपल्या हाताने बनवून घेतलेल्या चहाची सर काही केल्या येत नाही....असेच वाटत रहाते...."ती" तल्लफ काही केल्या भागतच नाही...
   बरं घरीही चांगला भरपूर दुध घालून चांगला उकळवून दाट केलेला....थोडी साखर आणि सवाईने चहापूड टाकत बनवलेलाच चहा, शिवाय कपामध्ये तोही बऱ्या पैकी मोठ्या आकाराच्या काठोकाठ भरुन घेतल्या शिवाय चहा पिल्याचे समाधान मिळतच नसे...असा चहा घेऊन मग जेवणाला कितीही उशीर लागला तरी बेहत्तर असेच वाटायचे...
       
   चाळीशी पार झाली आणि डायबेटिस नावाच्या दोस्ताचा सहवास आता नेहमी साठीच लाभेल की काय अशी शंका निर्माण झाली...मग मात्र त्यावेळी पासून बिना साखरेचा चहाच गोड लागू लागला....कधी वेलची पूड घालून तर कधी आलं घालून हळू हळू साखरेच्या चहाची सवयच गेली ती कायमचीच!
     हल्ली तर चुकून सुध्दा घेतलेला साखरयुक्त चहा औषध घेतल्या सारखा कडवट
भासू लागतो.... 

    काळा चहा घेणर्यांचे तर मला फारच कौतूक मिश्रीत आश्चर्य वाटते...आणि हे कोणत्या परग्रहावरचे लोक आहेत की काय अशी शंका येते...
या शिवाय ग्रीन टी की काय आणि ते लेमन फ्लेवर टी ही अशा प्रकारची नावं कितीही फॅशनेबल असतील तरीही पुळचटच आहेत हे नक्की.....
    
  आताशा म्हणजे हा कोरोना चालू झाल्यापासून मात्र मस्तपैकी आलं घालून उकळवून तयार केलेल्या काळ्या चहात नंतर व्यवस्थित दुध घालून बनलवेला चहा अमृततुल्य वाटायला लागला....
छान पैकी आल्याच्या स्वादाने घशाला शेकून खाली उतरणारा चहाच जास्त भावायला लागलाय, नव्हे त्याचीच सवय झालीय,आता तीच कायम राहील असे वाटते....
   
हल्ली खास, छान छान स्वच्छ अशी वेगवेगळ्या चवीच्या आणि नावाची चहाची खास दुकानं दिसून येतात...अमृततुल्य काय,  मातीच्या भांड्यातील काय आणि आणखी कितीतरी नावांची बिरुदं लावून बनवलेला चहा 
असू दे ,पण आपल्या घरच्या चहाची सर कशालाच नाही हेच जाणवतं....
      
   पण गंमत म्हणून आणि कुठे तरी ऐकलंय म्हणून म्हणा, मी एकदा किंचित मीठ घालून चहा केला...पण असा चहा फारसा पचनी पडलाच नाही...
     चहा,हे पेय गरीबांचे जेवढे जवळचे तेवढेच श्रीमंतांचेही....
    जेवढा एखाद्या टपरीवर चांगला मिळेल चहा, तेवढाच हल्ली निघालेल्या पॉश दुकानातूनही...
  किमान माणुसकी दाखवण्याचे एक साधे सरळ साध्या लोकांचे माध्यम म्हणजे चहा....
गहन विषयावर चर्चाही घडवल्या जातात,  त्या याच चहाच्या साक्षीनं आणि हलके फुलके विनोद साधत डोकं ताजंतवानं करता येतं तेही याच चहाच्या साक्षीनं.... 

  तो सर्व शाष्टाचार पाळत, 'टी सेट' नामक भांड्यांमधून येणाऱ्या चहाची शपथ घेऊन सांगते, पण त्या चहाची रयाच गेलीय असेच वाटते....
      डोक्यातली तल्लफ भागवणारे एक अनुपमेय पेय आहे हा चहा....हल्ली त्याला आरोग्य रक्षणाचे दाखलेही मिळू लागले आहेत, पण अती प्रमाणात काहीही वाईटच बरं का....
     मला बाई रोज दोन वेळेस काठोकाठ कप भरलेला चहा मिळाला, की मग तिसऱ्या वेळी पुन्हा तो घ्यावा अशी साधी ईच्छाही होत नाही...
   पण हं कुणाच्या घरी गेल्यानंतर मोठ्या मोठ्या भारी कपांमध्ये तळाशीच बसेल असा चहा बघितला की, देणाऱ्याच्या मानसिकतेची कीव येते आणि अगदीच छोट्या कपात काठोकाठ असेल तो तरीही 'नकट्या' कपात काय दिलायं चहा म्हणून नाक मुरडावेसे वाटते...काय करणार स्वभावाला औषध नसतं असे म्हणतात ना.... 

  तर असो, पण आजचा दिवस खास चहासाठी राखून ठेवलेला, अगदी जागतिक स्तरावर!केवढा या अमृततुल्य  चहाचा सन्मान!

। इति श्रीचहा पुराणम् संपुर्णम्। 

©️
*नंदिनी म. देशपांडे*
मे, २१,२०२१ 

🌹🌹🌹🌹🌹

सोमवार, १० मे, २०२१

"आई "(मातृदिना निमित्त)

"आई "

      'आई ' हा शब्द उच्चारला की केवळ वात्सल्य वात्सल्य आणि वात्सल्यच आठवतं....आईच्या सहवासातील ते प्रेमभरे, वात्सल्यभरे क्षण अन् क्षण डोळ्यासमोरुन सरकत जातात...
आज जागतिक मातृदिनाच्या निमित्ताने सारं जग मातृ उत्सव
साजरा करत असताना तुझी आठवण होणार नाही हे केवळ अशक्यच ना, आई?...
     आई, तुला जाऊन सहा वर्षे होऊन गेली, पण तू आमच्या अवतीभोवती नाही आहेस असे कधी वाटलंच नाही...
मुर्ती दृष्टिआड झाली असेल,पण तरीही तुझ्या आठवणी जागवल्या की आपोआप तुझी प्रेमळ मुर्ती डोळ्यासमोर उभी रहातेच...तू स्वतः संवाद साधत आहेस असाच भास होत रहातो...
   आई,तू आहेस नक्कीच आहेस, आमच्या ह्रदयात, आमच्या आठवणीत, तुझ्या घराच्या वास्तूत किंबहूणा वस्तूंमध्येही,त्यांच्याअस्तित्वात, स्पर्शात...त्यातील तू वापरलेली प्रत्येक वस्तू आजही तुझी आठवण देतात....एवढेच नव्हे तर, देवघरासमोर हात जोडून ऊभं राहिलं की, त्यातील प्रत्येक मुर्ती त्या प्रत्येकाला तुझा झालेला स्पर्श,देवघरासमोरची रांगोळी, तुझ्या अंगणातील रांगोळी, तुझ्या मनात अंबाबाईवर असणारी तुझी श्रध्दा
हे सारं सारं तुझीच आठवण देत रहातं...
     संक्रमणाने तुझ्याकडून आम्हा सर्वांमध्ये आलेले, तुझ्या नातवंडांमध्ये परावर्तित झालेले तुझ्यातील सद्गुण, सवयी, शिस्त या साऱ्यां मधूनही तू डोकावत असतेस आमच्याकडे...
तुझ्या आवडीचा एखादा पदार्थ, तुझ्या सारखा मला न जमलेला पदार्थ या बाबी तुझीच आठवण करुन देतात...
तुझे संस्कार तर पदोपदी आठवण करुन  देतात आम्हा सर्वांना...
आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे, आम्हा भावंडांचे अस्तित्व, माझे अस्तित्व हेच मुळी तू असण्याची सजीव साक्ष आहे....
मग तू नाहीस असं कसं गं म्हणू?
तू आहेस, तुझ्या आशिर्वादाचा हात आमच्या डोक्यावर आहे...आणि दूरून कुठून तरी तू आमच्यावर कायम लक्ष ठेवून असतेस यावर माझी श्रध्दा आहे....
    तुझं अस्तित्व जाणवत रहावं म्हणूनच तर मन प्रसंगानुरुप तुझ्या आठवणीतून अशी जाणीव करत रहातं बोलण्यातूनही तुझ्या आठवणी व्यक्त करताना मन प्रसन्न
होतं रहातं...तू आहेस आणि कायम असणारच आहे...
आई, तुला त्रिवार विनम्र अभिवादन. 🙏🙏🙏🌹🌹

 ©️
नंदिनी म. देशपांडे.
मातृदिन, 
९ मे,२०२१.

शनिवार, १० एप्रिल, २०२१

परिमळ

या कोव्हिड 19 ने खूप जणांचे नातेवाईक, परिचित यांचा बळी घेतलाय....अशा प्रत्येक व्यक्तीस समर्पित आजची ही कविता... 

*परिमळ*

 आठवणींचा परिमळ घालतो भावनांना साद ....

का रे देवा  बोलावतोस स्वतःकडे 
माणसं अशीच खास....

जरी आमच्या दृष्टिआड मूर्ति त्यांची झाली.....

तरीही त्यांच्या आठवणींचा परिमळ 
कायमच साथ करेल आमची....

घालवलेले क्षण क्षण त्यांच्या समवेतचे....

बहरुन येतील पुनःपुन्हा संदर्भासवे 

घेवून गेलास मूर्ति  
परि ठेवा आठवांचा....

सांभाळी घालून आमच्या 
त्यांच्या सहवासाचा....

आठवांच्या सोबतीने आम्ही
  जगू    
नव्याने पुन्हा फिरुन 

 क्षण हसरे नाचरे घेऊन .....

आणिक 
आठवांची गंधभारली फुले वेचून वेचून....

 ©️*नंदिनी*

🌹🌹🌹🌹🌹

गुरुवार, १ एप्रिल, २०२१

अस्तित्वाची लढाई.....

अस्तित्वाची लढाई....
~~~~~~~~~~~

     या जगाच्या पाठीवर माणसा सारखा बुध्दिमान प्राणी दुसरा कोणीही नाही...म्हणूनच त्याला कितीही नाही म्हणालं तरी 'ग' ची बाधा झालेली आहेच...कधी कधी तर आपल्या सुविधांसाठी,आपल्या हौसमौजेसाठी भारंभार खर्च तर करत असतोच, पण पर्यावरणाचा समतोल सुध्दा नकळतपणे बिघडवत रहातो...थोडक्यात आपल्या बुध्दीचा वापर माणूस केवळ भल्यासाठीच करेल असे अजिबात नाही....किंबहूणा स्वार्थासाठी तो मागचा पुढचा विचार न करता काहीही करु शकतो हे जगात घडत जाणाऱ्या विविध उदाहरणांतून सिध्द होऊ लागलंय....
मी सर्वात बुद्धिमान,का म्हणून इतर गोष्टींचा विचार करु?आपण कम्फरटेबल हवंच....कसंचं पर्यावरण अन कसचा निसर्ग...
वेळ पडलीच तर,पाण्यातील माशांचा नियम स्वतः आमलात आणून लहान मासा मोठ्या माशाला (येथे माणूस) गिळंकृत (संपवायलाही कमी करत नाही....
    "अती झालं अन् रडू आलं",ही परिस्थीती त्याने स्वतः च्या कृतितून निर्माण केली आहे की काय?अशी भिती वाटतेय आता....
म्हणूनच त्याला आज स्वतःच्याच अस्तित्वासाठी लढावं लागतंयं का....
     आपल्या अवती भोवती किती भयावह परिस्थिती आहे.....कोरोना या संसर्गजन्य आजाराने नुसता उच्छाद मांडलाय... प्रत्येकाच्या डोक्यावर या कोरोनाची टांगती तलवार लटकत आहे....कितीही काळजी घेतली तरीही हा विषाणू गनिमी काव्याने आपल्या शरीराचा ताबा कधी घेईल आणि आपला घात करेल अशी भिती प्रत्येकाच्या,अगदी लहान थोरांच्या मनात दडी देऊन बसलीए...कुठेतरी इतरत्र या भितीपासून थोडं लांब जावं या हेतूने माणूस आपलं मन रिझवत आहे....घरात बसूनच....
आपलं,जवळचं असं माणूस कितीही अडचणीत असेल,आजारी असेल किंवा अगदि परलोक प्रवासाला निघालं असेल तरीही ईच्छा असूनही कोणीच जाऊ शकत नाही त्यालाबघण्यासाठी सुध्दा नाहीच...काही क्षण जाण्याचं निमित्त होईल पण नंतर समोर काय वाढून ठेवलेलं असेल हे कुणालाही सांगता येत नाही....प्रत्येकाच्या मनात स्वतःच्याच अस्तित्वाची लढाई चालू झाली आहे....गेल्या दोन महिन्यांपासून हा जोर जास्तच वाढलेला दिसून येतोय....
अशा वेळी माणसाची बुध्दी साथ देत नाही,त्याची श्रीमंती नाही आणि त्यांच्या जवळ असणारी माणूसकीही नाहीच....
या विषाणूपुढे अजून तरी कुणाचे काहीच चालत नाही... केवळ आपलं या जगातलं अस्तित्व शाबूत रहावं, त्याच्या खूणा नव्हे हिच प्रत्येकाची ईच्छा आहे. आणि त्यासाठीच संघर्ष ही चालू आहे....
दररोज किती तरी परिचित लोकांचं या जगतातलं अस्तित्व शून्य होताना आपण निर्विकार नजरेनं यांत्रिकतेनं केवळ ऐकत आहोत...याशिवाय काहीही करु शकत नाही आहोत ....
हिच फार मोठी शोकांतिका आहे आजची....
कधी एकदा संपेल?ते "तोच" जाणे....आपल्या हातात केवळ शक्य तेवढी काळजी घेणं आणि हताश होऊन परिस्थिती बघत बसणं या पलिकडे काय आहे.....

नंदिनी म.देशपांडे.
औरंगाबाद.
३१, मार्च,२०२१.

🌹🌹🌹🌹🌹

सोमवार, २९ मार्च, २०२१

होळी रे होळी पुरणाची पोळी.

*होळी रे होळी पुरणाची पोळी*😋

  काय मंडळी,खाल्ली का मग शिळी पुरणपोळी? किंवा शिळया पुरणाची ताजी पोळी?संगतीला दुधातला चंद्र घेऊन?
      हे काय बोलतीए मी? संभ्रम आला ना मनात?पण असू दे, जातीवंत पुरणपोळी भक्तांना बरोबर समजलंयं बरं का माझं म्हणणं....😀
       महाराष्ट्रातील संस्कृती जेवढी प्राचीन तेवढीच या लोकांची खवय्येगीरीही प्राचीनच!
थोडक्यात माणसाचा पोटोबा शमवण्याचा मार्ग या सणावारांच्या निमित्ताने जास्त सुकर होतो असेच म्हणा ना!....हवे तर...
  कारण ऋतूचक्र हवामानातील बदल यांना जुळवून घेण्याचे कसब माणूस आपल्या खाद्यसंस्कृती मधून शिकतो असे म्हणता येईल....
     प्रत्येक मोठ्या सण उत्सवा बरोबर आपल्या एखाद्या पदार्थाचे घट्ट नातं जुळलेलं आहेच...
     अगदी गुढी पाडव्या पासून ते होळी पौर्णिमे पर्यंत....
    कधी श्रीखंड, बासुंदी, निरनिराळ्या खीरी तर कधी जिलेबी,लाडवाचे विविध प्रकार आणि वर्षाचा शेवट आणि सुरुवात मात्र,पक्वान्नांच्या महाराणी सोबतच!
     ही परंपरा कितीही मोडावी आपण असे वाटले तरीही आपल्या जीभेचे चोचले ती चुकवू देतच नाहीत... बरोबर त्या त्या सणाला तेच वैशिष्ठ्यपूर्ण पदार्थ बनवण्याकडेच कल असतो आपला.....
      आता होळी आणि पुरणाची पोळी यांचं नातं तर फारच घनिष्ठ!
पिढ्या न् पिढ्या जपले गेलेलं....
    'पुरणपोळी आवडत नाही' असे म्हणणारा माणूस सहसा पटकन सापडणं कठिणच!
   ‌‌मस्तपैकी गरमागरम पुरणपोळी त्यावर,किंबहूणा वाटीतच लोणकढं तूप!असा घास जीभेवर ठेवला रे ठेवला की,खरंच स्वर्गीय सुख ते हेच तर! असे म्हणावेसे वाटते...मग तुम्ही त्याच्या सोबतीला भले दहा पदार्थ बनवा, पण सारी फीकीच त्यापुढे!
     मग ती भजी असो,पंचामृत असो,आमटी असो,कढी असो किंवा होळीच्या पुरणपोळी बरोबरचा कायरस असू दे!
काही जण कुरडी,पापड वडा अशीही संधी साधतात पुरणपोळी बरोबर.....
मुखरस चाळवला गेला ना, मंडळी!
   हरकत नाही कालच होळी पौर्णिमा झालीए...फ्रीज मध्ये
थोडे तरी पुरण ठेवले असेलच ना शिलकीत?मस्त वेलची जायफळाचा घमघमाट येत असेल... 
मला माहित आहे,
ती एकदाच खाऊन पोट भरेल,तृप्त होईल असे घडणे केवळ अशक्यच!
     अहो दोन दोन दिवस फ्रीज मध्ये ठेवून आवडीने पोळी खाणारा वर्गही मोठ्या प्रमाणात आहे.... किंवा पुरण ठेवून पोळी बनवणारेही!
     कधीतरी एखादा 'पुरण पोळी आवडत नाही',असे म्हणणारा सापडला तर कीव येते त्याची!हे म्हणजे कोकणात राहून हापूस आवडत नाही म्हणण्या सारखं आहे....
     पुरणपोळीची श्रीमंती काय वर्णावी?
हे जेवणाचं ताटही कसं दृष्ट लागण्या सारखं दिसतं....
जणू त्या गरमागरम पोळीचं त्या तुपाच्या धारे बरोबरच्या मिलनाचा हृद्य सोहळा होतोय आणि बाकी पदार्थांची मांदियाळी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी जमली आहेत....
    शिळ्या पोळीला दुधातला चंद्रच भावतो मात्र....पण पुरणपोळी आणि आमरस काय चवदार लागतं म्हणून सांगू....
प्रत्येकाची चवीष्टपणाची तह्राच न्यारी!
म्हणूनच तर पुरणपोळी माझी पक्वान्नाची राणी! मऊ मऊ लुसलुशीत अगदी ओठांनी तोडून खावी आणि जीभेवर तत्काळ विरघळणारी!
     ‌हळू हळू आपले हातपाय जगभर पसरते आहे ती...अगदी परदेशातही मिळू लागलीए हल्ली!
    पण ताज्या ताज्या पोळीची गम्मतच भारी!
अशी ही पुरण पोळी
जिला येते ती जातीवंत सुगरण गृहिणी आणि राजाची आपल्या आवडती राणी!🤗
म्हणूनच सरत्या वर्षाला निरोप देताना होळी रे होळी अन् पुरणाची पोळी!

©️
 नंदिनी म. देशपांडे.
होळी,२०२१.
औरंगाबाद.

🌹🌹🌹🌹🌹🌹

रविवार, २८ मार्च, २०२१

होलिकोत्सवाच्या शुभेच्छा...

गोकुळीच्या अंगणी
   रासरंग रंगला 

 कान्हासवे खेळण्या 
गोपिका त्या जमल्या
 
रंगरंग घेऊनिया 
 सोहळा रंगांचा 
  सजला 

गोकुळात कृष्णसखा 
रंगांमध्ये भिजला 

पितरंग सुवर्णाचा किरणा किरणांत हासला 

हरित रंग चैतन्याचा 
आसमंती भारला 

रंग गुलाबी प्रितिचा 
गाली वसला राधेच्या
 
जांभळी ती मस्त छटा 
व्यापून टाकी अंबरा
 
श्वेत शुभ्र छान साज 
दिशादिशात फाकला
 
कोमल श्यामल श्याम सावळा 
कृष्णसखा तो दंगला

रंगूनी रंगारंगात तोच 
तरीही किती आगळा!

कान्हा माझा विश्व राणा 
आहेस खूप वेगळा 
आहेस खूप वेगळा!

*होलिका पुजनाच्या सर्वांना शुभेच्छा*. 🔥

©️
नंदिनी म. देशपांडे. 
औरंगाबाद. 
मार्च, २८,२०२१.

🌹🌹🌹🌹🌹

शुक्रवार, २६ मार्च, २०२१

एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्व. रामचंद्रराव आसोलेकर.

एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्व,
 #श्री #रामचंद्र
#आसोलेकर
💥💥💥

     "दादा आधार देऊ का तुम्हाला? उठण्यासाठी?"
असं म्हणत मी पटकन उभी राहिले.... सोफा थोडा खालच्या लेव्हलला होता, म्हणून काळजीनं विचारलं मी दादांना...पानं वाढलेली होती,त्यांना उठून जेवणाच्या टेबला जवळ जेवणासाठी जावयाचं होतं...पण दादांनी खुणेनेच तळहात हलवत मला नकार दिला....आणि मागनं उमाचा त्यांची (सूनबाई) तिचा आवाज आला तीनही मला सुचना केली,'त्यांना आवडत नाही आधार घेणं,'मी मात्र दोन मिनिट निःशब्दच झाले....   
   
     साधारण सात-आठ महिन्यांपूर्वी आम्ही मुंबईला त्यांच्या घरी आयआयटीच्या कॅम्पसमध्ये,पवईत गेलो होतो....दादांच्या आणि आमच्या आत्यांच्या भेटीसाठी... तसे नात्याने,दादा माझे मामा... आत्यांचे यजमान... पण आम्ही सर्वजण त्यांना 'दादा' या नावाने संबोधितो... अगदी त्यांच्या भावंडांपासून, मुलांपासून आम्ही बाकीचे सर्व नातेवाईक... 

    दादा, *रामचंद्र असोलेकर*  या नावाने सर्वांना परिचित आहेत... माझ्यासाठी तर ते एक पितृतुल्य व्यक्तिमत्व...
माझ्या वडिलांच्या नंतर आदरयुक्त असणारं असंच त्यांचं माझ्या आयुष्यातील स्थान.... 
२१ सप्टेंबर १९३१  रोजी जन्मलेले आमचे दादा, आज त्यांच्या वयाच्या नव्वदी मध्ये प्रवेश करत आहेत... आणि आजही हे व्यक्तीमत्व बघून पंचविशी तीशीचा तरुण लाजेल असेच हे कार्यरत असतात... प्रत्येकासाठी अत्यंत अनुकरणीय, आदर्श, सोज्वळ,अतिशय साधी रहणी, भौतिक सुखाची कधीही आसक्ती नसणारं,कायम दुसऱ्यांचा विचार करणारं,अतिशय स्वावलंबी आणि कुटुंबासाठी,आईवडिलांसाठी ,
आपल्या माणसांसाठी अविरत कष्टणारं असंच...
किंबहूणा, "कुटुंबाप्रती कर्तव्य" हेच आपल्या आयुष्याचे ब्रिद ठेवणारे असे....

    नाकी डोळी नीटस, हसतमुख गोरापान तेजःपुंज चेहरा, मध्यम उंचीचा बांधा आणि बघणार्‍याला आदरच वाटावयास हवा असंच हे  व्यक्तिमत्व....
आजही श्री रामचंद्रराव आसोलेकर नव्वदीत आले आहेत,यावर कोणाचा विश्वासच बसणार नाही... दोन-तीन दिवस त्यांच्या सहवासात घालवले तर, 'हे ज्येष्ठ नव्हेतच, तर नव्वदीतील तरुणच'! असेच उद्गार निघतील कोणाच्याही मुखातून...

   आई-वडिलांचं हे ज्येष्ठ आपत्य... वडील प्राथमिक शिक्षक शेतीशिवाय दुसरा बाकी आधार नाही.... पण पाठची पाच भावंडं... एवढा मोठा डोलारा सांभाळताना एकट्या वडिलांची कसरत व्हायची.... माफक शिक्षण झाल्याबरोबर नोकरी करण्याशिवाय पर्याय नव्हता ,दादांजवळ....  बीएस्सी नंतर खूप इच्छा असूनही शिक्षणाला अर्ध विराम  देऊन औरंगाबादच्या शासकीय (घाटी) रुग्णालयात क्लार्कची नोकरी स्विकारली त्यांनी... त्यामुळे वडिलांना आधार होऊन भावंडांची लग्न, बहिणींची बाळंतपण, शिवाय घाटी ची सोय म्हणून नातेवाईकांची आजारपणं, त्यांची शुश्रुषा ह्यांची कायम जबाबदारी त्यांनीच घेतली... औरंगाबाद शहराचं ठिकाण म्हणून गरजवंत नातेवाईकाला शिक्षणासाठी स्वतःच्या घरी ठेवून घेणं... असे कितीतरी नातेवाईकांना, स्नेह्यांना आपल्या आहे त्या परिस्थितीत सामावून घेत असताना कोणताही अभिनिवेश नाही की उपकाराची भाषा नाही....कायम  इतरांप्रती मदतीचा हात त्यांनी दिलाय....

      त्यांच्या स्वतःच्या संसारात या दोघांशिवाय तीन मुलींसह एक मुलगा.... या चौघांनाही त्यांनी शिक्षणाच्या परिपूर्ण संधी उपलब्ध करून दिल्या...त्यांनी प्रत्येकाला उच्चशिक्षीत बनवलेले आहे... आज प्रत्येक जण ताठ मानेने आपल्या पायावर भक्कमपणे स्थिरावलेली दिसतात... मुलाला इंजिनियर बनवत,पी.एच. डी.बनवले... परदेशगमनाची संधी उपलब्ध करून दिली...आज पवई आय आयटीत तो पर्यावरण विभागाचा एच.ओ.डी.असून प्रोफेसर आहे...एक मुलगी शिक्षिका, इतर दोघी डॉक्टर म्हणून यशस्वी  झाल्या आहेत... असं सगळं सांभाळत, आपली शिक्षणाची सुप्त इच्छाही त्यांनी नोकरी करत करतच पूर्ण केली...एल.एल.बी. केले... शिवाय वयाच्या ४५ व्या वर्षी एम. एस. सी. बायोकेमिस्ट्री करुन घाटीमध्येच प्राध्यापक पदावर रुजू झाले... आज औरंगाबाद येथील कितीतरी डॉक्टर्स त्यांचे विद्यार्थी आहेत...

    या सर्व आघाड्यांवर बरोबरच कौटुंबिक जबाबदारीत तसूभरही कमी पडले नाहीत दादा... अर्थात घरातल्या आघाडीवर आमची आत्या, सौ. कुंदा रामचंद्र आसोलेकर हिची यथार्थ साथ होतीच... आजही आहेच...आमच्या आत्यांना तिच्या लग्नानंतर जवळजवळ पंचवीस वर्षे बाहेरचे कोणतेही व्यवहार करावे लागलेच नाहीत...एक तर घकामाच्या मांदीयाळीत तिला वेळही मिळायचा नाही, आणि काटकसरीनं संसार करत, घरातील सदस्यांच्या कपड्यांचं शिवणकाम करत वाचवता येतील तेवढे पैसे वाचवण्याचा प्रयत्न केला...दादा, बाहेरची सारी कामं खंबीरपणानं
करुन संसारातील समतोल साधत....शिवाय  आत्यावर असणाऱ्या घरच्या जबाबदारीची जाणीव ठेवत घर कामातही शक्य तेवढी मदतच केली दादांनी...घरात नेहमीच पाहूण्यांचा राबता असायचा...
  
  शासकीय नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर सुध्दा दादा, पुण्यात भारतीय विद्यापीठाच्या मुलींच्या हॉस्टेलवर रेक्टर पदावर कांहीवर्ष कार्यरत होते...
  
   मुंबईसारख्या ठिकाणी सुध्दा आसोलेकर कुटुंबाच्या चार पिढ्या एकत्र राहत असत... दादांचे वृद्ध आई-वडील, ही दोघं नवरा-बायको, मुलगा-सून आणि एक नातू... अक्षरशः या सर्वांना समाधानाने एकत्र नांदताना बघून लोकांना आश्चर्य वाटायचं... आपल्या वयाच्या सत्तरी,बहात्तरी पर्यंत रामचंद्रराव आसोलेकरांना मातृपितृ सुख मिळाले...खरंच, त्यांच्यासारखे भाग्यवान तेच!

   दादा आपल्या सत्तरी मध्ये स्वतः आपल्या अतिवृद्ध आईला उचलून घेत त्यांची शुश्रूषा करत असत...

     गेली दोन वर्षे झाली, माझी आत्या बेडरिडन  आहे... २४ तासांसाठी मेट्रन ठेवावी लागते.... पण या 'करोना'काळात ती सोयही थांबवावी लागली आहे...   आज नव्वदीतही हे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व, रामचंद्रराव आसोलेकर, आपल्यापेक्षा दहा वर्षांनी लहान असणाऱ्या आपल्या अर्धांगिनी ची काठी बनून तिला मानसिक आधार तर देत आहेतच, पण  तिला शारीरिक आधार देत,अगदी भरवण्या पासून तिची शुश्रुषा करत आहेत ! अगदी न थकता...विना तक्रार...अजूनही आपली बँकेचीे कामं ते गाडीतून जातात, पण स्वतः करतात.... उच्चप्रतीची स्मरणशक्ती लाभलेले, आणि भूगोल या विषयाचे सखोल ज्ञान असणारे रामचंद्रराव आसोलेकर कायम अवतीभवती काय चालू आहे याचे अपडेट्स ठेवून असतात....

    असा सगळा आनंदीआनंद असताना, समाधान असताना कुठेही दादांच्या वागण्या-बोलण्यात बडेजाव नाही... कायम जमिनीवर पाय घट्ट रोवलेले असतात... 
दुर्देवानं आजारपणामूळे एका जावयानं अर्ध्यातून संसार टाकत एक्झिट घेतली या जगातून...पण, दादा आणि आत्याने आपल्या मुलीला आणि  नातवंडांना अगदी समर्थपणे मानसिक आधार देत खंबीरपणे उभं केलं आहे....नातवंडही आपापल्या पायावर स्थिर होत आहेत....

    तरुणपणातील कष्टांचा शीण कुठल्या कुठे पळून गेलाय आज दादांचा... असाच प्रसन्न तृप्तीचा आनंद, समाधान ईश्वराने त्यांच्या आयुष्यात कायम ठेवावा... या अतिशय साध्या आदरणीय व्यक्तिमत्वाला शतायुषाचा उंबरठा ओलांडण्यास ईश्वरानं साथ करावी...हिच सदिच्छा व्यक्त करते,मी आज त्यांच्या नव्वदाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने....  
    दादांना, या पुढच्या वाटचालीसाठी मनःपुर्वक शुभेच्छा देऊन त्यांना अभिवादन करते....🙏🙏
*त्वं जीव शतम् वर्धमानः।।*

©️ 
*नंदिनी म. देशपांडे.*

सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा. (कुंदा आत्या)

*सहस्त्रचंद्र दर्शन*
   *सोहळा*
🌹🌹🌹🌹🌹
        "मेल्या,थांब, तुला बघते, नंतर..."असे म्हणत, कौतुकाची नजर एखाद्याकडे टाकत,पण हसत त्याच्याकडे बघणं....ही माझ्या आत्याची, कुंदा आत्याची फार जुनी सवय...माझी कुंदा आत्या म्हणजे,
*सौ.कुंदा रामचंद्रराव* *आसोलेकर*. 
 माझ्या लहानपणापासून तिची ही सवय मी बघते आहे....मला खरंच आश्चर्य वाटायचं, कौतूक करतानाही कुणी एखाद्याला शिवी का घालतं असं ? हा माझ्या बालमनाला नेहमीच प्रश्न पडायचा....पण मग माणसाचा चेहरा वाचायचं समजायला लागलं आणि आत्याच्या बोलण्याचा रोख, तिच्या त्या कमलपाकळी अशा मोठ्या मोठ्या डोळ्यातून ओसंडणारं कौतूक, आणि खणखणीत पण प्रेमभरा आवाज ऐकला की मला त्या मागचे भाव समजायला लागले....
     अशी माझी कुंदा आत्या...अगदी आम्हा भावंडाचीच, हक्काची अशी...कारण तिला आत्या म्हणणारे  भाच्चे मंडळी फक्त आम्हीच भावंड!
     त्यामूळे बाबांपेक्षा मोठी असली तरीही आम्हा भावडांना सगळ्या आत्यांमध्ये लहान असणारी हिच आत्या....
     "आत्या" हे नातं कायमच हक्काचं, लाड करवून घ्यायचं, हट्ट पुरवून घ्यायचं आणि आईबाबांकडे आपली मागणी पुरी करुन घेताना माध्यम म्हणून उपयोगी पडणारं!
     गव्हाळ गोरापान रंग, मध्यम ऊंची, मध्यम बांधा, बऱ्यापैकी लांब सडक केस, कपाळावर मोठं लाल कुंकु.साडीचा पदर मागून घेत कमरेला खोचणं ही तिची लकब अगदी खास आहे....हे सारं तिला खूप शोभून दिसणारं असंच...
  तिच्या या साऱ्या गोष्टी तिचं जात्याच असणारं सौंदर्य आणखी खुलवत ठेवतात आजही....
    अशी माझी कुंदा आत्या आज २६ मार्च, २०२१ या रोजी तिच्या वयाची ८० वर्षे पूर्ण करत आहे....आज ती तिच्या वयाच्या 
८१ व्या वर्षात, *'सहस्त्रचंद्र दर्शन वर्षात'* 
प्रवेश करत आहे...
  या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या आरंभी कुंदा आत्याचे,माझ्या शब्दरुपी ज्योतींनी लावलेल्या निरंजनांनी औक्षवण करण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न!
     त्या वेळच्या प्रथेप्रमाणे सातवी पर्यंत शिक्षण झाले, आणि आत्या लग्नाच्या बेडीत अडकवली गेली...तिच्या लग्नाविषयी घरात चर्चा चालू झाली असताना घडलेला एक किस्सा मला माझ्या मोठ्या आत्याने सांगितलेला... 
     कुंदा आत्यापेक्षा मोठी असणारी एक बहिण,तिच्या स्वतःच्या लग्नानंतर तीन वर्षांत काही आजारपणानं जात राहिली...
तिच्याच यजमानांबरोबर आपल्या ह्या मुलीचे(कुंदाचे)लग्न लावून देऊ अशी घरात चर्चा चालू झाली... आणि कुंदा आत्याने मात्र या गोष्टीला ठासून नकार दिला....तिने मोठ्या बहिणीला तिच्या गावी 'मला घेऊन चल',असा लकडा लावत तिच्या घरी (निटूरला) ही चार दिवस रहाण्याच्या निमित्ताने गेली...आणि तेथून तिने स्वतः आजोबांना स्वतःच्या लग्नाबाबत चा निर्णय स्वहस्ते मोठ्ठं पत्र लिहून कळवला....
हा तिचा विलक्षण करारी बाणा आजही तिनं जपून ठेवलायं!प्रचंड आत्मविश्वास, अभेद्य निर्णय क्षमता,परिस्थितीशी जुळवून घेणं आणि एवढंच नाही तर प्रतिकूल परिस्थितीही आपल्याला अनुकूल बनवणं तिच्यातील हे गुण खरोखरच वाखाणण्या सारखे आहेत!
     हस्ताक्षर तर अतिशय वळणदार सुंदर!तिच्या हस्तक्षरातील कितीतरी पत्र आजही असावित माझ्या माहेरी!
    किती गम्मत असते ना, भाचीचं माहेर तेच तिच्या आत्याचं माहेर!दोघींचेही 'माहेर घरची लेक' या नात्याने सारखेच लाड!त्यामूळे तर आत्या बद्दल आणखीनच आपलेपणा वाटत जातो....आपणही तिच्याच रक्ताचा पण पुढच्या पिढीचा अंश आहोत ही जाणीव फार सुखाऊन जाते...
     शिक्षणाची संधी मिळाली नाही पण, आमची कुंदा आत्या फार हुशार!काळाची पावलं बरोबर ओळखणारी आणि आपल्या एक मुलगा व तीन मुली यांना उच्च शिक्षित करताना जीवाचं रान करणारी!त्याच बरोबर नातेवाईकांच्या मुलांनाही आपल्या जवळ ठेवत शिक्षणाच्या संधी उपलब्ध करवून देणारी....
देवावर श्रध्दा बाळगणारी पण देवभोळेपणा झुगारणारी, स्पष्टवक्तेपणा बाळगणारी, पण अत्यंत सेवाभावी वृत्तीनं,कृतार्थतेनं नाती जपत त्यांचे आदरातिथ्य करणारी!
     संसारात गृहिणी म्हणून यथार्थ पणे हातभार लावत, मामांबरोबर आनंदानं संसार पेलणारी....अशी माझी ही आत्या!
    मला नाही वाटत तिनं कधी आमच्या आसोलेकर मामांकडे (तिचे यजमान) कधी एखाद्या साडीसाठी, वस्तू साठी, किंवा एखाद्या दागिन्या साठी हट्ट धरला 
असेल....माहेर आणि सासर शिवाय कधीतरी प्रसंगानुरुप इतर दोन बहिणींच्या घरी म्हणून प्रवास करणारी आत्या, कधीच पर्यटन किंवा बदल म्हणून सुध्दा, चार दिवस बाहेरगावी जाऊन राहिली नाही...तिला त्याची कधीच खंतही वाटलीच नाही...
अतिशय समंजसपणा,
तडजोड करण्याची वृत्ती ठेवत, काटकसरीनं संसार करणाऱ्या या कुंदा आत्या कडून आमच्या पिढीला खूप काही शिकावयास मिळाले...आजही मिळत आहे....
अधुनिक विचारांची कास धरलेली, एक यशस्वी गृहिणी, अर्धांगिनी, एक उत्तम सून,उत्तम आई, सासू,आजी,आणि पणजी आजी सुध्दा... अशा विविध पातळ्यांवर च्या नात्यांवर तिने आपला ठसा उमटविला आहे...
गाण्याची आवड जोपासत सुरेल आवाजात गाणं म्हणणं हा तिचा छंद! सुगरणपणा ही दैवी देणगीही तिच्याजवळ आहेच...
     गेल्या तीन वर्षांपासून वृध्दापकाळाने घराबाहेर पडू शकत नाहीए ती, पण सर्वांची खबरबात ठेवून असते....
     आदर्श सहजीवनाचा पायंडा पाडून या उभयतांनी एक उत्तम आदर्श संसाराचं उदाहरण आपल्या पुढच्या तीन पिढ्यांसमोर  एक आदर्श म्हणून उभं केलं आहे....याचा एक भाच्ची म्हणून मला स्वतःला कुंदा आत्या आणि (दादा)श्री रामचंद्रराव आसोलेकर या उभयतांचा निश्चितच खूप अभिमान वाटतो.....
आज मामांचे वय वर्षे ९०आणि आत्याचे वय वर्षे ८० आहे....
आयुष्याच्या शतायुषाकडे चालू असणारी या दोघांची वाटचाल मृदू मुलायम मखमली वाटेवरुन चालू रहावी.... सहजीवनातील आनंद व्दिगुणीत करणारी असावी,या साठी आत्या आणि मामांना माझ्या मनाच्या अगदी गाभार्‍याच्या आतून भरभरून आरोग्यपूर्ण हार्दिक हार्दिक शुभेच्छा...
आणि आत्याला सहस्त्र चंद्र दर्शन सोहळ्याच्या उदंड उदंड शुभेच्छा,
हार्दिक अभिनंदन आणि आत्या व मामा या उभयतांना  माझा मनःपुर्वक  नमस्कार...
🙏😊🙏

 ©️
 नंदिनी म. देशपांडे.
942241695.
औरंगाबाद. 

🌹🌹🌹🌹🌹

सोमवार, २२ फेब्रुवारी, २०२१

• वाळूक •

वाळूक.

    मराठवाड्यात, त्यातही परभणी जिल्ह्यात राहून नंतर इतर शहरात स्थायीक झालेली माणसं या वाळकाला खरोखरच फार मीस करतात....
  म्हणूनच शेतातील वाळकं आली आहेत, पाठवू का?असे विचारण्यात आले मला, आणि मी पटकन हो पाठव ना, तुला शक्य होतील तेवढे पाठव...असं लगेच उत्तर पाठवलं...
  खरं तर वाळकं घरी पोहोंचे पर्यंत त्यापासून काय काय पदार्थ बनवायचे?याच्या रेसिपीज मनात तयार झाल्या सुध्दा.....
   अहाहा!वाळकाचं थालीपीठ, धपाटे,लोणचं, एवढेच नाही तर भरडा भाजी, वरण असे साधेसेच पदार्थ पण कल्पनेतून या सर्व खमंग पदार्थांची चव जीभेवर रेंगाळत राहिली...या वाळकांना ना मुळी एक अंगचाच खमंगपणा असतो....
   वाळूक, म्हणावे तर फळ, म्हणावे तर फळभाजी....
लहानपणी खेळता खेळता नारळासारखे फोडून, आम्ही सवंगड्यांनी तुकडा तुकडा वाटून मोठ्या चवीनं खाल्लेल्या आठवणी जाग्या झाल्या...थोडेसे अंबूस, थंड, काकडी,कलिंगड, खरबूज यांच्या पंक्तीत बसणारं अंडाकृती, पिवळे धमक, गोल्डन कलरचे!
बघता क्षणीच मोहक वाटणारे!
या वाळकाची गंमत म्हणजे हिरवेगार  कच्चे वाळूक जेवढे शूष्क दिसते तेवढेच ते कडवटही असते...
    पण पिवळेधमक तेवढेच आकर्षक ! पिकलेल्या आंब्यांचा दरवळ जसा सुटतो, तसाच पिकलेल्या वाळकांचा अंबूस दरवळ घरभर पसरतो....
   केवळ टाळकी (शाळु) ज्वारीच्या पीकात अधनं मधनं डोकावणारी वाळकाची वेली जमिनीवर जोंधळ्याच्या कणसांच्या पायाशी लोळण घेत,  आपल्या अंगाखांद्यावर ही वाळकं खेळवतात....
खरं म्हणजे ग्रामीण शेतकऱ्यांच्या लेखी या वाळकांची महती फक्त गाई, म्हशी बैलांपूढे त्यांचं खाद्य म्हणून टाकण्या ईतपतच...
एकदा असाच त्यांच्याशी बोलताना वाळकाचा विषय निघाला आणि एकजण उद्गारला,"हो,आम्ही जनावारांना खाऊ घालण्यासाठी टाकत होतो वाळकाचं बी शेतात,पण त्यांना खाण्यासाठी उंदीर फार धुमाकूळ घालतात...मग सोडून दिलं टाकणंच"...
 पण खरंच जेथे सहज उपलब्ध होत नाही, पण लहानपणापासून ज्यांच्या जीभेवर त्याच्या चवीने गारूड केलेले असेल तर, अशी माणसं जगाच्या पाठीवर कुठेही असा, बरोबर सिझनमध्ये या वाळकांची आठवण होत ती नजरेसमोर तरळत रहातातच...
   बीयाही वाया जात नाहीत या फळाच्या...त्या उन्हात वाळवून त्याची मिक्सरमधे चटणी करावी... काय चवदार लागते म्हणून सांगू!ही आयडिया माझ्या सासूबाईंनी सांगून ठेवलेली मला...
त्या नाहीत आता पण आठवणी मनात घर करून आहेत ना!
  सामान्यपणे शहरात उपलब्ध होत नाही ना हे फळ...असेल तरीही फार महाग आणि अर्धा किंवा एक किलोत एकच बसेल असं वजनदार फळ हे! महिनाभर तरी टिकतेच...खरं म्हणजे हुरडा पार्टी बरोबर या वाळकाच्या थालीपीठांचीही पार्टी झालीच पाहिजे असं आपलं अस्तित्व टिकवणारं हे फळ!
आता मात्र बस करते हं हे वाळूक पुराण!

©️नंदिनी देशपांडे. 

🌹🌹🌹🌹🌹

रविवार, ३१ जानेवारी, २०२१

फुलपाकळी हसली..

पाकळी पाकळीतून हलकेच
   उमलली
   जांभळफुलं सुंदर ती
   हसली
   संगतीला नाजूक पिवळी 
   सखी
  हातीहात घेऊनि स्वागत
  करी
  शेवंती मम नयनां
  सुखावती
  हिरवी पिवळी पर्ण
 देखणी
 फुलवून पिसारा तव
   नाचती  
  शामल नीळ्या पिवळ्या 
    कुसुमांचे
  गुणगान गंधित होऊन
  गाती...

__©️नंदिनी

🌱🌱🌱🌱🌱

गुरुवार, २८ जानेवारी, २०२१

ऊब.

*ऊब*
😌

    आज आई असती तर...तर तिने तिच्या वयाच्या अमृतमोहोत्सवी वर्षात पदार्पण केले असते....
सकाळ पासून राहून राहून आईची प्रकर्षाने आठवण होत आहे...
कशी बरी दिसली असती आज आई? ७५ पर्यंत रहावयास हवीच होती...हे वय काही खूप नाहीए...असंही सारखं वाटतंय आज मनात...
आज
खूप वाटत होतं, आईच्या वाढदिवसाचा सोहळा केला असता आपण...तिला किती समाधान वाटले असते...
    पण हे घडायचे नव्हतेच....सहा वर्ष  होतील आईला जाऊन....
आईची आठवण झाली की मी, माझी आई नेहमी नेसायची  त्यांपैकी एक मऊ उबदार अशी कॉटनची साडी दुपदरी करत पांघरुन घेते...
किती अश्वासक वाटतो हा स्पर्श म्हणून सांगू!आईच्या प्रेमाची,मायेची साक्ष देणारा...
अगदी प्रेमानं ओथंबलेला आणि दिलासा देणारा...
     एक साडी पांघरायची आणि एका साडीची मऊ घडी उशाला घ्यायची!जणू आईच्या मांडीवर डोक ठेवून निवांत क्षण अनुभवतेय मी आणि तिच्या प्रेमळ हळूवार स्पर्शानं रोमरोम नाहून निघतोय आपला ....
असा भास होत रहातो...
तिच्या आशिर्वादाचा हात तिनं अंगावरुन फिरल्याचा भास होतो...
   माझी आई कायम हैद्राबाद हॅडलूम च्या सुती साड्या नेसायची...काय भारदस्तपण सामावलेलं असायचं त्या साडीत!स्वतः हातानं कडक स्टार्च केलेली, कडक ईस्त्रीची साडी नेसून बाहेर पडायची....
व्यवस्थित नीटनेटकी तयार होऊन...बाहेर जाताना.... घरातही तेवढीच निटनेटकीच रहायची...अशाच पण स्टार्च शिवाय साडी घरात नेसत... असायची ...
अव्यवस्थित रहाणं कधीच भावलं नाही तिला.... 
अगदी आईच्या शेवटच्या क्षणा पर्यंतही तिच्या या सवयीनं साथ काही सोडली नाही तिची...
...साड्यांची रंगसंगती आणि पोत या बाबत फारच चोखंदळपणा जपलेला होता आईनं शेवटपर्यंत...
आई गेल्यानंतर तिच्या चारपाच उबदार साड्या मी तिची आठवण म्हणून जपून ठेवल्या आहेत आजही...
थंडीत ती साडी पांघरली की ऊब देते तर उन्हाळ्यात पांघरल्यास हलका थंडावा देते...
माझ्या वॉर्डरोब मध्ये तिच्या स्पर्शानं ओथंबून गेलेल्या या माझ्या आईच्या साड्या, आईच्या आशिर्वादाचा दिलासा देऊन  जातात...
किती साधी साडी ती! पण आईच्या, स्पर्शानं जणू पावित्र्य  प्राप्त झालेली...
अवती भोवती आईची सावली साथ करते आहे, याचा भास निर्माण करणारी...
किती तरी दिलासादायक...
अशी मनाला ताकद देणारी....आईचा मऊ उबदार स्पर्श बहाल करणारी.... अशी माझ्या आईची ही अनमोल ठेव मी आजही जपलीए.... याचे मला खूप समाधान मिळते... कृतकृत्य झाल्याचे समाधान मिळते... आईचे अस्तित्व आसपासच असल्याची भावना सतत जागवते...ही अशी माझ्या आईची उबदार पोत असणारी साडी....
आज पौष पौर्णिमा, आईच्या वाढदिवसा चा दिवस यानिमित्ताने आईच्या पवित्र स्मृतिंना वंदन करत...🙏🌹🙏

*नंदिनी म. देशपांडे*. 

♥️♥️