शुक्रवार, १५ डिसेंबर, २०१७

*संस्कार आणि शाळकरी मुले*

       " अगं निकिता, हॉल मध्ये बसलेल्या पाहुण्यांसाठी ट्रे मध्ये पाण्याचे ग्लास घेऊन जा बरं...."
       " निखिल, हॉल मध्ये विखूरलेल्या वस्तू आवरून जागेवर ठेऊन देशील तेवढ्या...."
        "अरे मुलांनो , काका काकू निघाले आहेत ना गावी जाण्यासाठी ,या त्यांना नमस्कार करा...."       किंवा
       "अरे वरद,क्लास पुर्ण करून येशील तेंव्हा,वेळ मिळेल तसे शेजारच्या आजींच्या घरी जाऊन त्यांना भेटून ये बरं का...तब्येत बरी नाहीए त्यांची,तुझी आठवण काढत होत्या आजी...."
       "अगं मैथिली,आज सुट्टी आहे ना तुला? मग चल आज माझ्या सोबत मंडईतून भाजी आणू या आपण ....."
        मुलांनो,वरील प्रकारचे संवाद दररोजच तुम्ही तुमच्या किंवा तुम्हा मित्र मैत्रिणींच्या आईबाबां कडनं दिवसातून एकदा तरी नक्कीच ऐकत असाल होय ना ? तुम्ही म्हणाल,त्यात काय एवढे? हे तर रोजचेच डायलॉग ! पण बरं का मुलांनो , घरातील मोठ्या माणसां कडून दिवसभरांत तुम्हाला आलेल्या अशा प्रकारच्या सुचनां मधून ही माणसे काही ना काही तरी शिकवत असतात नक्कीच. तुम्ही सुध्दा त्यातून कांही तरी शिकावे अशी त्यांचीही अपेक्षा असतेच.
     या सर्व  गोष्टी वर वर बघता,या तर खूपच सोप्प्या आहेत असे वाटतही असेल.पण,बर का,या सार्या गोष्टी,तुम्हाला मोठे झाल्या नंतर जेंव्हा समाजा मध्ये एक मोठी आणि यशस्वी व्यक्ती बनाल तेंव्हा फार उपयोगी पडणार आहेत.
     या आणि अशाच प्रकारच्या अनेक सुचना,तसेच तुमच्या अवती भोवतीच्या वातावरणातून,परिस्थिती मधून तसेच शाळेत असताना तुमच्या शिक्षक वृंदां कडून तुमच्यावर नकळतपणे संस्कार घडवत असतात.
     तुम्ही म्हणाल,संस्कार म्हणजे काय?तर मित्रांनो,सध्या तुम्ही विद्यार्थि अवस्थे मध्ये आहात.यालाच आपण विविध विषयांचा अभ्यास करुन विद्या ग्रहण करण्याची म्हणजे त्यातून द्य्न्यान मिळवण्याची अवस्था असे म्हणतो.तुम्ही जसे मोठे होत जाल तसे,तुमचा या जगातील वेगवेगळी क्षेत्रं,त्यात काम करणारी माणसं, वेगवेगळी परिस्थिती इत्यादी अनेक बाबींशी संबंध येईल.उच्च शिक्षणाच्या निमित्ताने,नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने किंवा प्रसंगानुरुप तुम्हाला कधी तरी आपल्या घरा पासून आपल्या माणसां पासून थोडे दूर एकट्याने जाण्याचे सुध्दा काम पडू शकते.प्रत्येकाच्या आयुष्यात केंव्हा ना केंव्हा अशी वेळ येत असतेच.अशा परिस्थिती मध्ये काही अडचण आली तर, त्यातून योग्य तो मार्ग काढण्या साठी,किंवा आलेल्या अडचणीला योग्य पध्दतीने सामोरे जाण्यासाठी तसेच अडचणी येऊच नयेत या साठी प्रयत्न करता यावेत म्हणून तुमचे आई बाबा,घरातील मोठी माणसं,तुमचे शिक्षक वृंद आपल्या अप्रत्यक्ष शिकवण्यातून वेळोवेळी जी शिकवण देत असतात ना,त्यांनाच "संस्कार" असे संबोधले जाते.
       अगदी छोटी मुलं ही मातीच्या गोळ्या सारखी असतात.त्यांच्या मनाला आणि शरिराला योग्य संस्कारां मधून योग्य वळण लावण्याचे काम घरातील मोठी माणसे करत असतातच.मुलांना देवा घरच्या फुलांचीही उपमा दिली जाते.म्हणतात ना,"मुले ही देवा घरची फुले असतात."म्हणूनच लहान पणा पासून ते विद्यार्थी दशेमध्ये होणारे संस्कार हे अतिशय आवश्यक असे पायाभूत संस्कार असतात.त्यांना फार महत्व असते.या अवस्थेत होणारे संस्कार हे चांगल्याच दर्जाचे असावेत असायलाच पाहिजेत असाच वडिलधार्या लोकांचा आणि शिक्षक वृंदांचाही प्रयत्न असतोच.म्हणूनच या संस्कारांचे पालन,ग्रहण प्रत्येकानेच करण्याचा आपला प्रयत्न चालूच ठेवला पाहिजे.कोणत्याही चांगल्या गोष्टी एेकल्याने,वाचल्याने,निरिक्षण केल्याने त्यांचा आपल्या मनावर चांगला परिणाम होऊन त्याचा आयुष्यात आपल्याला कधी ना कधी तरी निश्चितच उपयोग होतो हे आपण चांगले लक्षात ठेवलेच पाहिजे.
        वर लिहिलेल्या संवादांमध्ये आई निकिताला पाणी घेऊन जाण्यासाठी सांगते.कित्ती साधे काम आहे ना हे !पण फार महत्वाचा संस्कार किंवा शिकवण देऊन जाते हे काम.घरी आलेल्या पाहुण्याचे प्रथम आदरातिथ्य कसे करावे?याचा धडा शिकवलाय आईने निकिताला.आल्या आल्या पाहूण्यांचे स्वागत कसे करावे ही ती शिकवण होती.
       याच बरोबर आलेल्या पाहूण्यांशी आई बाबा कसे बोलतात ,वागतात, त्यांची काळजी कशी घेतात ?त्यांचा व्यवस्थित पाहूणचार करत त्यांचा मान कसा राखतात?या सार्या गोष्टीं सुध्दा तुम्ही निरिक्षणातून शिकू शकता,आत्मसात करू शकता.हा पण एक संस्कारच होय.प्रत्येक गोष्ट सांगून किंवा हाताला धरूनच शिकवली पाहिजे असे नाही तर,आपल्या सभोवती चांगले काय?वाईट काय?यातून आपण कोणता बोध घ्यावयास हवा?हे तुम्ही तुमच्या तर्क शक्तीच्या म्हणजेच विचार क्षमतेचा उपयोग करत ठरवले पाहिजे.यातून होणारा संस्कार तुमच्या मनावर आणि व्यक्तिमत्वावर नक्कीच परिणाम करतो.
        निखिलला त्याची आई,हॉल आवरुन ठेवण्याविषयी सांगते.याचा अर्थ आपण आपल्या स्वतः प्रमाणेच घराचा निटनेटकेपणा पण नेहमीच राखला पाहिजे हेच आईला यातून निखिलच्या लक्षात आणून द्यावयाचे आहे.नेटके पणाचा संस्कार होणार निखिलवर हे निश्चित.
       काका काकुंना नमस्कार करावयास सांगून,यातून तुमच्यावर विनम्र होण्याचा,मोठ्या माणसांचा आदर राखण्याचा संस्कार रुजवणे हाच हेतू असतो आईचा.
       वरदला त्याची आई शेजारच्या आजारी आजीला भेटून यावयास सांगते,याचा अर्थ ती वरदवर माणुसकी धर्म कसा पाळावयास हवा या संस्काराचे धडे शिकवते आहे.
        आई मैथिलीला मंडईत भाजी आणण्या साठी घेऊन जाणार आहे,यातून मैथिलीने दैनंदिन जीवनात आवश्यक असणारे व्यवहार द्न्यान शिकले पाहिजे हा त्या मागे आईचा हेतू तर आहेच.शिवाय चांगली भाजी कशी निवडून घ्यावी?हे सुध्दा मैथिली यातून जाणणार आहेच.
       तर मित्रांनो,अशा पध्दतीचे हे शिकणे आणि शिकवणे जे आहे ना ,हेच तर तुमच्यावर घडत असणारे संस्कार होत.
     तुम्ही जसे जसे मोठे होत जाता तसे,तुम्ही चांगल्या आणि वाईट गोष्टींतील फरक जाणायला लागाल.त्यातील चांगले तेवढे स्विकारावे आणि वाईटा पासून दूर रहावे ,याचे द्न्यान तुम्हाला या संस्कारांमुळेच होऊ शकेल.
       वर उल्लेख केलाय त्या प्रमाणे तुमच्या शिक्षक वृंदा कडूनही तुमच्यावर संस्कार होतच असतात तुमच्या शिक्षणातूनच ते घडवले जातात.उदा: शिस्तीने वागण्याचे संस्कार,नियमीत अभ्यास करण्याचे संस्कार.तुम्हाला क्लास चा मॉनिटर बनवले जाते यातून तुमच्या अंगी नेतृत्व गुण विकसित व्हावेत हा उद्देश असतो. आपला जेवणाचा डबा सर्वांनी मिळून खाण्याची शाळेतील सवय तुम्हाला आहे तेवढे अन्न सार्यांमध्ये वाटून खाण्याचे संस्कार शिकवते.शाळेतील विविध खेळांमार्फत तुमच्या मध्ये व्यायामाचे महत्व,संघटित पणाचे गुणधर्म घडवले जातात.असे एक ना अनेक किती तरी संस्कार नकळतपणे तुमच्यावर रुजवले जातात.त्याची जोपासना तुम्ही सुध्दा मनापासून करत असता.हे असे चांगल्या दर्जाचे संस्कार आपल्या भल्यासाठीच आहेत,असतात हे तुम्ही कायम लक्षात ठेवणे आवश्यक आहे.तुमच्या भविष्य काळात त्यांचा सातत्याने पाठपुरावा करत,सुसंस्कृत आणि यशस्वी जीवन जगण्याची कला यातून तुम्ही आत्मसात करू शकता.ती तशी तुम्ही आत्मसात केलीच पाहिजे.आपण अापल्या संस्कारांच्या माध्यमातून शिकलेली कोणतीही चांगली गोष्ट कधीच वाया जात नसते हे विसरु नका.ही आपण मिळवलेली आयुष्यभराची संपत्ती असते.तिला आपण नैतिक संपत्ती असेही संबोधू शकतो.विद्यार्थी दशे मध्ये घडवलेले ,रुजवलेले संस्कार हे कायम स्वरुपी असतात.आपल्या करिअर मध्ये उच्च पदावर पोहोंचण्या साठी या संस्कारांचा फार मोठा वाटा असतो.त्यांमुळे तुमचे आयुष्य सोन्या सारखे बनवता येऊ शकते यात काहीच शंका नाही.
       चला तर मग मुलांनो,चांगल्याच संस्कारांची कास आपण कायम स्वरुपी आपल्या हाती धरु या ! त्या साठी तुम्हा सर्वांनाच माझ्या मनःपुर्वक शुभेच्छा !!
*नंदिनी म.देशपांडे*.
nmdabad@gmail.com
✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌
   

बुधवार, ६ डिसेंबर, २०१७

*निमित्त*

     आज एका साहित्यिक ग्रुप वर एका मित्राने प्रश्न केला,"लेखक का बनायचे असते?पैसा ,कौतुक ,प्रसिध्दी की आत्मसुख यांसाठी?"हा प्रश्न वाचनात आला आणि मलाच आश्चर्य वाटलं हा काही प्रश्न असू शकतो! एखादा व्यक्ती लेखक बनतो म्हणजे काय तो ठराविक इन्सटीट्यूट मध्ये जाऊन त्या बद्दलची पदवी /पदविका घेतो की काय असे अभिप्रेत आहे का या प्रश्नात?हा प्रश्न वाचल्या पासून मी मात्र अस्वस्थ बनले.कधी एकदा व्यक्त होईल मी या विषयावर असे झाले अगदी!
       या प्रश्नाच्या निमित्ताने एक संधी चालून आली आहे व्यक्त होण्या साठी....असे वाटले खरे मनातून....
         अरेच्या!! एखाद्या विषयावर व्यक्त होण्या साठी आपल्या मनातील विचार लिहून काढणे  हा एक सोप्पा उपाय असू शकतो की!असे वाटून गेले पटकन. पण लगेच लक्षात आले,व्यक्त होण्यासाठी लिहावेच लागते असेच कांही नाही बोलण्यातूनही ते साधता येतेच ना ?
         प्रश्न वाचल्या बरोबर ,"आपण यावर व्यक्त झालेच पाहिजे," असे मनाच्या आतल्या कप्प्यातून बुध्दिला जो संकेत मिळाला ना ,हा संकेत  म्हणजे लेखनासाठी आवश्यक असणारे पहिले लक्षण होय.ज्याला साहित्यिक भाषेत "प्रतिभा" या नावाने संबोधले जाते.
          प्रतिभा ही एक कला आहे.कोणत्याही कलाकाराच्या अंगी असणारी कला ही त्याला उपजतच मिळालेली दैवी देणगी असते.कलेला जसजसे मार्गदर्शन, सराव,योग्य ती संधी मिळाल्यास तिचे सौंदर्य अधिकात अधिक प्रमाणात खुलवण्याचे प्रयत्न कलाकार करत असतो.कलेची प्रगल्भता वाढती ठेवतो,तसेच प्रतिभेचेही आहे.पुस्तकांचे जास्तीत जास्त वाचन,निरिक्षण क्षमता,आपल्या स्वतःला आलेले अनुभव,इतरे जनांचे अनुभव कथन एेकणे,एखाद्या विशिष्ट विषयाचा सखोल अभ्यास या सर्व  गोष्टींची मुबलकता ज्यांच्याजवळ असते त्यांची प्रतिभा सदाफुली सारखी असते.
      प्रगल्भ झालेली ही प्रतिभा मग काव्य किंवा गद्य लेखनाच्या स्वरूपात जेंव्हा प्रकट होते ना,तेंव्हा संबंधित व्यक्ती लेखक बनण्यासाठी पात्र आहे असे मला वाटते.तो आपल्या प्रतिभा शक्तीच्या जोरावर काल्पनिक रचनाही शब्दांमध्ये गुंफत रहातो.यातूनच कथा,कादंबरी,नाटक,ललितगद्य,विडंबन,प्रवास वर्णन,व्यक्तीचित्र,समिक्षण,काव्य वगैरे वगैरे लेखनाच्या स्वरुपात व्यक्त होऊ लागली की,ती व्यक्ती लेखक बनली आहे याला पुष्टीच मिळते.
       लेखकाची प्रतिभा जसजशी बहरु लागते,तसा त्याच्या लिखाणाचा वाचक वर्ग वाढू लागतो.लेखनाचे विषय समाजाभिमुख असतील तर नक्कीच ते वचकांच्या पचनी पडते.हाच वाचक वर्ग उस्फुर्तपणे दाद देऊन प्रशंसा करतो तेंव्हा,होणारे कौतूक कोणाला नको असते?अहो,देव सुध्दा भक्तिभावाचा भुकेला असतो म्हणतात,मग हा प्रतिभा संपन्न माणूस तर,हाडामांसाचा बनलेला असतो .तो कौतुकाचा भुकेला असणे अगदी स्वाभाविक आहेच.
        हळू हळू कौतूकाची ही पावलं पुर्णत्वाच्या दिशेने सरकत सरकत प्रसिध्दी पर्यंत पोहोंचतात.प्रसिध्दी हे कौतूकाचेच विस्तारित रुप आहे असे म्हणता येईल.ही वाट्याला आल्यास न आवडणारा व्यक्ती विरळाच.
       प्रश्नातला आणखी एक मुद्दा म्हणजे पैसा.याबाबत मी एकदा मत व्यक्त केले असल्याचे स्मरते आहे मला.लेखक किंवा कवी आपल्या प्रतिभेच्या माध्यमातून कौतूक प्रसिध्दी,अधुनिक काळात थोडाफार पैसा मानधन म्हणून मिळवू शकतो.पण त्याची शाश्वती देता येत नाही.त्यामूळे प्रतिभा शक्तीच्या जोरावर मिळणारा पैसा हा लेखकाचे जीवन आर्थिक दृष्टिने संपन्न करेलच असे अजिबात नाही.पण ही प्रतिभा त्याची स्वतःची वैचारिक आणि मानसिक क्षमता नक्कीच संपन्न बनवते हे तेवढेच खरे.
       कोणताही लेखक ,कवी आपल्या लिखाणातून जेंव्हा व्यक्त होतो,तेंव्हा त्याची प्रत्येक लेखन कलाकृति ही त्याची सवतःची अशी एक स्वतंत्र नवनिर्मिती असते.ती पुर्णत्वाला नेल्यानंतर त्याला मिळणारे आत्मसुख /आत्मानंद हा कुठल्याही एककात न मोजता येण्याजोगे असा अलौकिक असतो .त्याच्या या आत्मसमाधानापुढे इतर कोणत्याही गोष्टी क्षुल्लक असतात.तो कधीच 'कमाई'करण्यासाठी लिहित नसतो . आत्मसुखाच्या रुपाने त्याला मिळणारा मोबदला हा सर्वोच्च स्थानी असतो.हेच समाधान साध्य करण्याच्या ध्येयाने प्रेरित होत त्याची प्रतिभा त्याच्या लेखणीतून पाझरत रहाते.
        *नंदिनी म.देशपांडे*
nmdabad@gmail.com
✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍
  

बुधवार, २९ नोव्हेंबर, २०१७

आठवणीतील कॅरी .....

       तब्बल तीन तपाच्या खंडा नंतर वर्षभरा पासून पुन्हा नव्याने नित्य संवाद साधावयास सुरुवात करत,मधल्या तीन तपांच्या काळाची भरपाई करण्याचा प्रयत्न सुरु केला होता आमचा मित्र कॅरी याने .
        " काय गं नंदिनी,मी एवढा वेळ झाला आलोय पण तुम्ही मैत्रिणी मात्र बोलल्या नाहीत कश्या आणखीन?" एवढ्या बालिश प्रश्नातून मनाचाही तेवढाच निरागसपणा पाझरवणारा कॅरी,माझा शाळा मित्र . दहा बारा दिवसांपुर्विच भेटलो आम्ही परभणी मध्ये. अरेंज केलेल्या छोट्याशा गेट टूगेदर ला येणार नक्की असे सांगूनही त्याने रितसर फोनवर आमंत्रण दिलेच होते. माधुरीने ,(त्याची लाईफ पार्टनर) या वेळी सुरेख मराठी गाणं सादर केलं तेंव्हा,जाम खूष झाली  होती,कॅरीची स्वारी. तो मनापासून चांगल्या संगीताचा भोक्ता आहे हे त्या वेळी त्याच्या चेहर्यावर दिसत होते. त्याची ही आवड ,तो व्हॉट्स अॅप वर सुंदर सुंदर मराठी हिंदी गाणी पाठवत शेअर करायचा याची आठवण झाली मला.तरीच,त्याचे व्हॉट्स अॅप स्टेटस् हे नेहमीच एखाद्या छानश्या मराठी भावगीताची आेळ का असायची याचाही उलगडा झाला या वेळी एकदम.
       एकदा पुण्यातही आम्ही काही मित्रमंडळी आवर्जून ठरवून भेटलो होतो.स्वभाविकपणे इतरही सार्यांच्या आठवणी निघाल्या.त्या वेळी उमेश ने कॅरी विषयी सांगितले,"अरे यार,शाळेत असताना माझे गणित या विषयी कधी फारसे जमलेच नाही , पण आता मात्र मी स्वतः हाच विषय शिकवतो शाळेत ! असे कसे रे ?"असे  बोलला होता त्याच्या जवळ.असा निरागस प्रश्न नितळ मनाचा प्रामाणिक माणूसच विचारु शकतो स्वतः विषयी हे मात्र खरे.
      कांहीच महिन्यांपुर्वि प्रमोशन देत संस्थेने त्याला हेड मास्तर या पदाच्या खुर्चिवर बसवले होते सन्मानाने.कोण आनंद झाला होता त्याला या वेळी ! आपल्या परिवारासोबत ज्या हर्षोल्हासाने शेअर केली त्याने ही बातमी तेवढ्याच उत्साहाने ग्रुपवर आमच्या सर्व मित्र मैत्रिणींच्या मेळाव्यातही शेअर केली . फोटोंवरून त्याचा हा आनंद स्वच्छपणे चेहर्यावर प्रकटला होता . स्वतंत्र केबिन मध्ये विराजमान झालेला हा चेहरा समाधानाची अपुर्वाई अनुभवत उजळून निघालेला दिसला आम्हाला .
       आमच्या एका शाळा मैत्रिणीचा वाढदिवस ग्रुपवर साजरा केला आम्ही ,त्यानेही शुभेच्छा दिल्या पण काही केल्या कॅरीला ती काही आठवतच नव्हती . तेंव्हा मुद्दाम फोन करत ,तिला आठवण्याचा त्याचा प्रयत्न माझ्या स्मरणात आहे आजही .
        कॅरी नि माधुरी यांना त्यांच्या घरी जेंव्हा मी भेट दिली , त्यावेळी त्याची वहिनी ही माझी बहिण लागते हे बोलण्याच्या ओघात त्याला समजले आणि त्याच क्षणी प्रसन्नतेने फोन लावत आमच्यातील मैत्रीचे स्पष्टीकरण देत आनंद व्यक्त करत ,मलाही तिच्याशी संवाद साधावयास लावला तेंव्हाचा संवाद आजही जसाच्या तसा आठवतोय .
         गेली बावीस तेवीस वर्षे नोकरी वर जाण्यासाठी पहाटे चारलाच उठावे लागते , 'साखर झोप' काय असते याचा पुर्णपणे विसर पडलाय आता . ही खंत विनोदी शैलीत मांडत तो कांही तरी मीस करतोय याची वेदना जाणवली कॅरीच्या मनात आणि संवेदनशील कॅरी डोकावून गेला त्या वेळी .
         स्वतःच्या स्वकतृत्वावर बांधलेले टुमदार घर,मनमिळावू बोलकी बायको,आणि इंजिनिअर बनत असणार्या दोन गुणी मुली हीच माझी संपत्ती ,असे अभिमानाने सांगणारा निगर्वी , पण कुटुंब वत्सल कॅरी नेहमीच दिसायचा त्याच्या बोलण्यातून . आताशी आपल्या उपवर मुलीच्या विवाहाचे विचार मनात घोळवत असणारा जबाबदार कॅरी वारंवार दिसायचा .
       जे आहे आपल्या जवळ त्यावर खूप मोठ्या प्रमाणावर आनंदी आणि समाधानी असणे व 'अंथरुण पाहून पाय पसरणे' या तत्वावर विश्वास ठेवणारा विश्वासू कॅरी कायम खर्या हसर्या चेहर्याने वावरत दुसर्यांनाही आनंद वाटत फिरायचा.त्याच्यातील निःस्वार्थी भावना,मनाचा निरागसपणा, नितळ मनाचा स्वच्छ तळ ,त्याचे हास्य हे सर्व त्याच्या चेहर्याला उजळवत  तेजस्वी ठेवत असत.त्याच्या मुळच्या काळ्या रंगावर लिलया मात करण्याचे काम चोख बनवत असत.पण तरीही आपल्या गमतीशीर बोलण्यातून तो आपल्याच रंगावर स्वतःच विनोद करायचा आणि सार्यांनाच हसवायचा.
        असा हा आम्हा सर्वांचा मित्र कॅरी ,किरण गुळवेलकर याने आपल्या नावाचे शॉर्ट फॉर्म "कॅरी असे केलेले "आम्हा सर्वांना आवडलेच होते.नावातच गुळाचा गोडवा असणारा हा मित्र नेहमीच हा गोडवा आपल्या बोलण्यातून वाटत वाटत  सर्वांना आपलंस करण्याचा छंद जोपासत असायचा .त्याच्याशी संवाद झाला की,आपल्या मनावरचा ताण कमी झालाय हे लक्षात यायचं लगेच.
     " कधीच आजारपण असं माहित नाही " म्हणणारा कॅरी,आपल्या एका मित्राला,घरी गेल्यानंतर आता मात्र मी माझ्या आरोग्याकडे खूप लक्ष देणार असे प्रॉमिस देता झाला होता हॉस्पिट्ल मध्ये.चारच दिवस काय तो आजारी पडला होता,पण तरीही त्याच्या मनाचे कोमेजलेपण त्याने एकदाही दाखवले नाही .शारिरिक वेदनांमूळे आतल्या आत कोमेजत नियतीच्या , काळ आणि वेळ यांच्या कचाट्यात आमच्या सार्यांच्या आणि त्याच्याही नकळत सापडत गेला कॅरी.आपल्या मित्राला दिलेल्या वचनाला तो विसरला पण अगदी शेवट पर्यंत हसतमुखाने प्रतिसाद देणारा हा आमचा मित्र बाय करत सार्यांना कायमचा निरोप देता झाला. प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेला.
     "  जो आवडतो सर्वांना ,
        तोचि आवडे देवाला "
   ह्या  उक्तिला  प्रत्यक्षात उतरवण्यासाठी......
      आठवांच्या रुपात कॅरीला वाहिलेली ही छोटीशी शब्द सुमनांची भावांजली.........
                       नंदिनी म.देशपांडे .
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀

सोमवार, २० नोव्हेंबर, २०१७

*सुखानंद*


    आहो,काय आहे हा वात्रटपणा ? आपली नातवंड लग्नाच्या वयाची होताहेत आता!तुम्ही हे काय खुळ घेतलंय डोक्यात?शोभतंय का तुम्हाला? सुनिता काकू,सुदर्शन काकांकडे मिश्कील नजरेने बघत गालातच हासत हासत बोलत होत्या.....आपली मुलं काय म्हणतील?याचा काही विचार केलात का तुम्ही?थोडं तरी जिभेला हाड असू द्यात.....
     'सुनी डार्लिंग,चल ,पुढच्या रविवारी जाणार आहोत आपण हनिमुनला', हे वाक्य काकांच्या तोंडून बाहेर पडले रे पडले नि सुनिता काकूंच्या तोंडचा पट्टा हा अस्सा चालू झाला होता....
     या उभयतांच्या लग्नाला कांहीच दिवसांत पण्णास वर्षे पुर्ण होणार होती....काकांना वाटले,आता पैशाची कांही चणचण नाहीए आपल्याला.दोन्हीही मुलं आपापल्या संसारात चौकोनी आकारात व्यवस्थित स्थिरावलेली आहेत.दोन्ही संसारातील आठही हात त्यांच्या स्वतःच्या बौध्दिक कौशल्याच्या जोरावर खोर्याने पैसे आेढत आहेत....नातवंड योग्य मार्गावरून वाटचाल करत आहेतच....
    मुलांना आवश्यक तेंव्हा त्यांच्या अडचणीच्या  काळात जमेल तशी आर्थिक मदत करून त्यांची नड आपण भागवलेली आहेच....आता मात्र त्यांना आपल्यावर अवलंबून रहाण्याची गरज नाही लागत,आपले बँक बॅलन्स ही बराच मोठ्ठा आकडा दाखवत आहे....नोकरीतून निवृत्त होताना शेवटचा पगार उचलला त्याच्या दिडपट आकड्यात आता पेन्शन जमा होते आपल्या अकाउंटवर,आणखी काय हवे? आकडा वाढता असला तरी खर्च असा कितीसा लागतो आम्हा दोघांना?दोघांचे आरोग्यही आहे उत्तम काय हरकत आहे ? थोडे लांब पर्यंत फिरुन यावे नि नव्याने ताजेतवाने व्हावे....असा पुर्ण विचार करत ,सुदर्शन काकांनी ,सुनिता काकूंच्या एकाहत्तरीत प्रवेशाच्या वाढदिवसाला सिंगापूरची दोन तिकिटं दाखवत सरप्राईज दिले....आणि फ्रेश होण्यासाठी का वयाचे बंधन लागते ?असा प्रतिप्रश्न काकूंना विचारत आपल्या म्हणण्याची री पुन्हा आेढली....
      गेल्या पन्नास वर्षांत काकांना आपल्या बायकोचा स्वभाव मुख:पाठ झालेला होता.कोणत्याही गोष्टीवर दुसर्याच क्षणी रिअॅक्ट होणं या काकूंच्या स्वभावाला अजून औषध काही सापडलंच नव्हतं. चालू असणारा काकूंचा तोंडपट्टा सवयी प्रमाणे काका शांतपणे एेकून घेत  गुणगुणत होते....
     मेर्रा नाम चून चून चू
      चून चू चू बाबा चून चू चू
      रात चाँदनी मै आैर तू
     हैल्लो मिस्टर हाऊ डू यू डू.....
आणि सुनिता काकूंकडे मिश्कील नजरेने बघत होते....
       सुनिता काकू का जाणत नव्हत्या ,आपल्या पति देवांचा स्वभाव?प्रचंड हौशी,हरहुन्नरी,नि तेवढाच मिश्किल.पण, तरुण वयात जबाबदारी आणि नौकरीच्या आेझ्याने दबला गेला होता तो.नव्हे,काकांनी जाणीवपूर्वक मुरडच घातली होती त्याला....संसारात कमवणारे त्यांच्या एकट्याचेच दोन हात.बहिणीच्या लग्नाची ,आईच्या तब्येतीची नि मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी .होताच कुठे पैसा आणि वेळ हौस मौज करावयाला....
      अंथरुणाला पाठ टेकल्यावर रात्रीच्या निरव शांततेत विचार करताना काकूंच्या डोळ्या समोरून आपले पुर्विचे दिवस झर्रकन सरकत गेले....याच विचार वलयात त्या मनोमन बोलत्या झाल्या ",तोंडचा पट्टा चालवला तरीही केवढी खूष झाले होते मी ,यांच्या बोलण्याने सकाळी!ह्यांना थांगपत्ताही लागू दिला नाही ....!"
     दहा बारा दिवसांत जायचेच आहे सिंगापूरला तर तयारीला लागायलाच हवे उद्या पासून.आपणही अश्शी झक्कास करू ना तयारी, की तेथे आपल्याला बघून यांनी तोंडात बोटे घातलीच पाहिजेत...
     दुसर्याच दिवशी आपल्या महिला मंडळातील एका मैत्रिणीला सोबत घेऊन, त्यांनी आपल्या स्वतःसाठी व काकांसाठी भरपूर खरेदी केली.जिन्स बरमोडा काय नि प्लाजो टी शर्टस् शॉर्ट शर्ट्स काय!शूज,पर्स बॅग्ज अशी एक ना अनेक वस्तूंची खरेदी! आपली मुले टूरवर जातात ना तेंव्हा ती करतात अगदी तश्शी खरेदी! त्यातून नवीन मेकअप कीटही सुटला नाही....जात्याच सुंदर असणाऱ स्वतःच सौंदर्य पार्लर मध्ये जाऊनआणखी परिपूर्ण बनवत,काकांनाही जेंट्स पार्लर मध्ये जाऊन येण्याविषयी सुचवले अप्रत्यक्षपणे.....
    वय लपवता येत नव्हते तरीही,मन मात्र तारुण्यात भिजून चिंब होत होते दोघाही नवरा बायकोचे.चाणाक्ष सुनेच्या नजरेने हे बरोब्बर हेरले .तिने सुहास,आपला नवरा याच्या लक्षात त्यांच्यातील हा बदल आणून दिलाच. त्यांच्यातील या बदलाचे त्यालाही काहिसे आश्चर्य च वाटले.
     सुहासने सुध्दा आपल्या आई बाबांच्या मनात फुललेल्या या प्रसन्नतेच्या फुलबाज्यांचा वेध घेण्याचा आडून आडून प्रयत्न चालवलाच.आॅनलाईन माहिती नुसार बाबांनी सिंगापूरसाठी फ्लाईटची दोन तिकिटं बुक केली असल्याचे सुहासच्या लक्षात आले.मग मात्र आई बाबांची  गोल्डन ज्यूबली मॅरेज अॅनिव्हरसरी आहे काहीच दिवसांत,  या आठवणीने लख्ख प्रकाश पडला त्याच्या डोक्यात...त्या दोघांनाच एवढ्या हौसे मौजेची अनुभूती घेताना बघण्याची कधी सवयच नव्हती ना मुलांना ,म्हणून थोडे वेगळे वाटत होते एवढेच ! पण करु देत त्यांना एन्जॉय , तरुण वयात नाही जमले म्हणून काय झालं ? आता आलंय ना मनात त्यांच्या ,अगदी पंचेवीस वर्षांनी तरुण वाटत आहेत दोघेही .त्यांच्या मनांच्या या उत्साहात आपणही कांही तरी भर घालत  योगदान द्यावयास हवे हे सुहासने निश्चित केले.
     सुनिताबाई आणि आणि सुदर्शन काकांचाच मुलगा तो...त्यांच्या प्रमाणेच गुप्तता ठेवत,आपली बहिण सुनयना आणि बायको सुरुची यांच्या मदतीने त्याने आईबाबांना त्यांच्या टूर ला निघावयाच्या पुर्व संध्येला एक पार्टी आयोजित करण्याचा बेत आखला...
     शनिवारची सायंकाळ खूपच लगबगीची ठरली.सुनयना आपल्या पति समवेत नियोजित ठिकाणी निमंत्रितांच्या दिमतीला हजर होती.बच्चे कंपनींनी मोठ्ठा केक ऑर्डर करत आजी आजोबांच्या मधुर आठवणींच्या फोटोंचे कोलाज बनवले होते ,स्वादिष्ट असा डिनरचा मेन्यू आॅर्डर केलेला होताच....
     इकडे घरी कोणत्याशा मोठ्या खास कार्यक्रमाला जायचे आहे ,असे सांगत सुरुचीने सासुबाईंना नवी कोरी अशी त्यांच्या आवडीची  रंगसंगती असणारी पैठणी नेसावयास देत छान पैकी तयार होण्यविषयी सुचवले. सुहासनेही बाबांना आग्रहाने थ्री पीस सुट घालावयास भाग पाडले...ठरलेल्या वेळी नियोजित अशा सुंदर व्हेन्यू वर चौघेही पोहोंचले.मुलांनी दिलेल्या या सरप्रार्ईज गिफ्ट चा स्विकार करत ,सुनिता काकू व सुदर्शन काका यांनी परस्परांच्या गळ्यात सुगंधित फुलांचे हार घातले.आपल्या डोळ्यांच्या भाषेतच पुन्हा एकदा एकमेकांच्या प्रेमात नव्याने  पडल्याचे खुणावले.आपली मुले नातवंडे आणि मित्रमंडळ यांच्या साक्षीने परस्परांवरील प्रेम आयुष्याच्या या शेवटच्या ट्प्प्यात केक कापत कापत व्यक्त केले....
    मुलांच्या या सुंदर मेजवानीचे स्वागत व स्विकार कृतकृत्ततेच्या भावनेने करत उभयतांच्या चेहर्यावर हर्षोल्हासाच्या समाधानाचे तेज लख्खपणे झळकत होते. नातवंडांनी बनवलेल्या कोलाजमध्ये बारकाईने न्याहळत दोघेही जुन्या आठवणींमध्ये रमले....सर्वांसोबत गप्पा गोष्टी करत स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेत ,सार्यांच्या शुभेच्छांचा आनंदाने स्विकार करत असताना दोघांच्याही आनंदाला पारावार राहिला नाही अगदी.
     घरी परतताना गाडीच्या पळत्या चाकांबरोबर उभयतांच्या मनात विचारांचे चक्र सुध्दा वेग घेत होते.आपल्या अवती भोवती तसेच मित्र मंडळींच्या अनुभवातून मुलगा सुन यांच्या वागणूकीतून निर्माण होणार्या धास्तीने भांबाऊन गेलेली मंडळी ,त्यांचे अनुभव यांच्या तुलनेत आपण किती तरी नशिबवान आणि पुण्यवान आहोत ! खरंच आपल्याला किती गुणी मुलं जावई आणि सुनेसहित मिळाली आहेत.या साठी ईश्वराचे आभार मानावेत तेवढे कमीच असे च काहींसे होते त्यांचे भावविश्व त्या वेळी....देवही सार्यांच्याच पदरी अशी गुणी बाळं का घालत नसावा?जन्म दात्यांना सांभाळण्या साठी कायदा बनवण्या ईतपत का निकड भासावी शासनाला? का अशी परिस्थिती यावी? अशा अनेक प्रश्नांची मनात चालू असणारी मालिका घर जवळ आल्याने खंडित झाली.
     आपल्या समाधानाच्या परिपूर्णतेच्या आस्वादा बरोबर मनात चालणार्या प्रश्नावलीची मांदियाळी भंग करत सुहास कांहीतरी बोलू बघतोय हे लक्षात आले त्यांच्या.सुहासने थायलंड आणि मलेशिया येथे जाण्याची आणखी दोन तिकिटं आईबाबांच्या हातात देत त्या देशांनाही भेटी देऊन यावे असे सांगितले त्यांना.आणि सुरुची व  मुलासह पण्णासाव्या मॅरेज अॅनिव्हरसरी साठी आईबाबांना शुभेच्छा दिल्या.सुरुचीने धावपळ होणार नाही अशी त्यांची पंधरा दिवसांची रुपरेषा आखत केलेल्या मांडणीचे नोटपॅड त्यांना सुपुर्त केले.
     ठरलेल्या म्हणजे दुसर्याच दिवशी सायंकाळी जावई,मुलं,नातवंडं,सुनबाई असे सर्वच जण उभयतांना सि आॅफ करण्या साठी एअर पोर्टवर आले होते.सर्वांचा निरोप घेताना सुनिता काकू आणि सुदर्शन काकांना गहिवरायला झाले नकळतपणे....आपल्या पुण्याईच्या या सुखानंदाला मनोमन हात जोडत त्यांनी सुहास्य मुद्रेने नजरे आड होई पर्यंत मुलांना टाटा केला....
  
    * नंदिनी म.देशपांडे.
nmdabad@gmail.com
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤