शनिवार, १० एप्रिल, २०२१

परिमळ

या कोव्हिड 19 ने खूप जणांचे नातेवाईक, परिचित यांचा बळी घेतलाय....अशा प्रत्येक व्यक्तीस समर्पित आजची ही कविता... 

*परिमळ*

 आठवणींचा परिमळ घालतो भावनांना साद ....

का रे देवा  बोलावतोस स्वतःकडे 
माणसं अशीच खास....

जरी आमच्या दृष्टिआड मूर्ति त्यांची झाली.....

तरीही त्यांच्या आठवणींचा परिमळ 
कायमच साथ करेल आमची....

घालवलेले क्षण क्षण त्यांच्या समवेतचे....

बहरुन येतील पुनःपुन्हा संदर्भासवे 

घेवून गेलास मूर्ति  
परि ठेवा आठवांचा....

सांभाळी घालून आमच्या 
त्यांच्या सहवासाचा....

आठवांच्या सोबतीने आम्ही
  जगू    
नव्याने पुन्हा फिरुन 

 क्षण हसरे नाचरे घेऊन .....

आणिक 
आठवांची गंधभारली फुले वेचून वेचून....

 ©️*नंदिनी*

🌹🌹🌹🌹🌹

गुरुवार, १ एप्रिल, २०२१

अस्तित्वाची लढाई.....

अस्तित्वाची लढाई....
~~~~~~~~~~~

     या जगाच्या पाठीवर माणसा सारखा बुध्दिमान प्राणी दुसरा कोणीही नाही...म्हणूनच त्याला कितीही नाही म्हणालं तरी 'ग' ची बाधा झालेली आहेच...कधी कधी तर आपल्या सुविधांसाठी,आपल्या हौसमौजेसाठी भारंभार खर्च तर करत असतोच, पण पर्यावरणाचा समतोल सुध्दा नकळतपणे बिघडवत रहातो...थोडक्यात आपल्या बुध्दीचा वापर माणूस केवळ भल्यासाठीच करेल असे अजिबात नाही....किंबहूणा स्वार्थासाठी तो मागचा पुढचा विचार न करता काहीही करु शकतो हे जगात घडत जाणाऱ्या विविध उदाहरणांतून सिध्द होऊ लागलंय....
मी सर्वात बुद्धिमान,का म्हणून इतर गोष्टींचा विचार करु?आपण कम्फरटेबल हवंच....कसंचं पर्यावरण अन कसचा निसर्ग...
वेळ पडलीच तर,पाण्यातील माशांचा नियम स्वतः आमलात आणून लहान मासा मोठ्या माशाला (येथे माणूस) गिळंकृत (संपवायलाही कमी करत नाही....
    "अती झालं अन् रडू आलं",ही परिस्थीती त्याने स्वतः च्या कृतितून निर्माण केली आहे की काय?अशी भिती वाटतेय आता....
म्हणूनच त्याला आज स्वतःच्याच अस्तित्वासाठी लढावं लागतंयं का....
     आपल्या अवती भोवती किती भयावह परिस्थिती आहे.....कोरोना या संसर्गजन्य आजाराने नुसता उच्छाद मांडलाय... प्रत्येकाच्या डोक्यावर या कोरोनाची टांगती तलवार लटकत आहे....कितीही काळजी घेतली तरीही हा विषाणू गनिमी काव्याने आपल्या शरीराचा ताबा कधी घेईल आणि आपला घात करेल अशी भिती प्रत्येकाच्या,अगदी लहान थोरांच्या मनात दडी देऊन बसलीए...कुठेतरी इतरत्र या भितीपासून थोडं लांब जावं या हेतूने माणूस आपलं मन रिझवत आहे....घरात बसूनच....
आपलं,जवळचं असं माणूस कितीही अडचणीत असेल,आजारी असेल किंवा अगदि परलोक प्रवासाला निघालं असेल तरीही ईच्छा असूनही कोणीच जाऊ शकत नाही त्यालाबघण्यासाठी सुध्दा नाहीच...काही क्षण जाण्याचं निमित्त होईल पण नंतर समोर काय वाढून ठेवलेलं असेल हे कुणालाही सांगता येत नाही....प्रत्येकाच्या मनात स्वतःच्याच अस्तित्वाची लढाई चालू झाली आहे....गेल्या दोन महिन्यांपासून हा जोर जास्तच वाढलेला दिसून येतोय....
अशा वेळी माणसाची बुध्दी साथ देत नाही,त्याची श्रीमंती नाही आणि त्यांच्या जवळ असणारी माणूसकीही नाहीच....
या विषाणूपुढे अजून तरी कुणाचे काहीच चालत नाही... केवळ आपलं या जगातलं अस्तित्व शाबूत रहावं, त्याच्या खूणा नव्हे हिच प्रत्येकाची ईच्छा आहे. आणि त्यासाठीच संघर्ष ही चालू आहे....
दररोज किती तरी परिचित लोकांचं या जगतातलं अस्तित्व शून्य होताना आपण निर्विकार नजरेनं यांत्रिकतेनं केवळ ऐकत आहोत...याशिवाय काहीही करु शकत नाही आहोत ....
हिच फार मोठी शोकांतिका आहे आजची....
कधी एकदा संपेल?ते "तोच" जाणे....आपल्या हातात केवळ शक्य तेवढी काळजी घेणं आणि हताश होऊन परिस्थिती बघत बसणं या पलिकडे काय आहे.....

नंदिनी म.देशपांडे.
औरंगाबाद.
३१, मार्च,२०२१.

🌹🌹🌹🌹🌹