गुरुवार, ३० जानेवारी, २०२०

व्दारका.

*द्वारका*

अहमदाबाद मधील वास्तुकलेचं आणि कोरीव शिल्पकलेचं सौंदर्य डोळ्यात साठवून घेत, दुसऱ्या दिवशी सकाळीच पोटपूजा करुन आम्ही,त्या जगदीशाच्या 'द्वाराच्या' दिशेने, द्वारकेच्या दिशेने प्रयाण करते झालो.

    रामेश्वरम बघितले ते पर्यटनाच्या दृष्टिकोनातूनच. पण दोन वेळेला तीन महासागरांच्या सान्निध्यात राहून 'तो' निसर्ग अनुभवता आल्याचे समाधान मिळाले!

 उत्तरांचल केले ते सुद्धा हिमालयाच्या सानिध्यात रहाण्याच्या ओढीने!तेथील भव्यदिव्य निसर्ग डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी!पण या अन्वये, दोन पवित्र धामा चे दर्शन घडलंयं आपल्याला! ही जाणीव   आत्ता, म्हणजे द्वारकेशाला सन्मुख जाताना प्रकर्षाने होऊ लागली होती. 

   आपल्या भारतीयांची ही श्रद्धास्थानं. ती आम्ही प्रत्यक्षात अनुभवत आहोत,त्या समोर जाऊन हात जोडत समाधानानं त्यांच्यासमोर लीन होत आहोत,ही भावना खूपच सुखावह नी कृतकृत्य करणारी अशीच होती! कधीही जाणीवपूर्वक मनीमानसी न ठरवता, आपण परमार्थाच्या वाटेवरुन पर्यटनही साधतोआहोत,याचा अलौकिक आनंद चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.गुजरात सारख्या नर्मदेच्या पाण्यानं व्यापून असणाऱ्या संपन्न प्रदेशातून प्रवास करत करत आनंद लुटणं, ही एक छान संधी होती आम्हासाठी!

     अहमदाबाद ते द्वारका हा आठ एक तासांचा प्रवास. खूपच आल्हाददायक होता. रस्त्याचे रुपडे छानच. चार आणि सहा लेन्स असणारे भव्य रस्ते. टापटीपपणा असणारे. शिवाय रस्त्यांच्या दुतर्फा लांब पर्यंत कापसाची, भुईमुगाची,तीळ, बाजरी यांच्या जोडीला तांदूळ, ज्वारी यांची शेतं.दर दहा दहा किलोमीटर अंतरावर मोठी जलाशयं! कुठं तलावाच्या रुपात तर कुठे विहिरींच्या रुपात! पाण्याची वानवा कुठेच दिसत नव्हती.ठिकठिकाणी धरणही आपली उंची मान वर करुन दाखवत होती. खळाळून वाहत वाहत नर्मदा मातेच्या रुपानं निसर्गानं भरभरुन दान घातलंयं या भूमीला. त्यामुळे डोळ्यांना सगळीकडेच प्रसन्नतेची बिछायत घातलेली आहे, लक्षात येत होतं.

    जाताना वाटेमध्ये विरपुर या छोट्याशा गावातील जलाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. गुजरातमध्ये साऱ्या ठिकणी त्यातही मंदिरांमध्ये स्वच्छतेचे व्रत काटेकोरपणे पाळलं जातं.याचे ठिकठिकाणी दाखले मिळत होते.जलाराम मंदिर गावठाणातच आहे. हे मंदिर आपल्या शिर्डीच्या साईबाबां प्रमाणेच सत्पुरुष होऊन गेलेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ कधीकाळी बांधलेलं. हे जलाराम मंदिर, बर्‍यापैकी मध्यम आकाराचं.वीरपूर हे गाव येथील जलाराम मंदिरामूळे मोठ्या वर्दळीचं बनलं होतं.        

    जलाराम नावाचे सदगृहस्थ, मोठे दानशूर आणि सत्पुरुष होऊन गेले .या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे, येथे सकाळी आठ वाजेपर्यंतच दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भावीकासाठी प्रसाद म्हणून मोफत जेवण बनवलेलं असतं.पण,एकदाच सकाळी बनवलेलं हे जेवण, दिवसभरात कितीही मोठ्या संख्येत भाविक आले तरीही अजिबात कमी पडत नाही! हे आश्चर्यच! अन्नपूर्णेचा भरभरून वरदहस्त लाभलाय या शहराला, मंदिराला!

     साधारण सायंकाळ होण्यापूर्वी आमचा द्वारकेत प्रवेश झाला. रानातून चारुन परतत आपल्या गोठ्याकडे रमत-गमत जात असतानाची किती तरी गायी वासरं दिसत होती. हे चित्र कितीतरी वर्षानंतर डोळ्यांना अनुभवयास मिळत होतं! द्वारकेत प्रवेश करताच गोकुळात प्रवेश केल्याची जाणीव  मनस्वी सुखावून गेली! गावातील रस्त्यांवर भरपूर मोठ्या प्रमाणावर आपल्या देशी गायी वासरं यांची गर्दी दिसत होती. गावही आपल्या पुरातन खुणा सांभाळत व्दारकेशाला अंगाखांद्यावर खेळवत आहे.असं वाटत होतं! नंदलालाच्या कुमारवयातील आणि तरुणपणातील वास्तव्याचं हे शहर! साक्षात श्रीकृष्णाच्या शहरामध्ये आपण पाऊल ठेवलं आहे. साक्षात परमेश्वराचा वास असणारं कृष्णमय झालेलं  असं हे शहर! प्रत्यक्ष द्वारकाधीशाच्या सान्निध्यात आपण दोन दिवस राहणार आहोत! ह्या कल्पनेनंच मन प्रफुल्लित बनलं होतं.

     गावात प्रवेश करताच त्याच्या मंदिराचा कळस दिसला. आणि आपोआप हात जोडले गेले.दुसऱ्या दिवशी सकाळीच मंगल आरती साठी मंदिरात पोहोचायचे आहे. या ओढीनं डोळ्यांवर निद्रेचे पांघरुण घेत झोपी गेलो आम्ही.

     गुजरातच्या मुख्य देवस्थानाच्या मंदिरांमध्ये सकाळ आणि संध्याकाळच्या मंगल आरती चे फार महत्त्व आहे.नव्हे, या आरत्या म्हणजे,तेथील देवतांचे दिपसोहळेच म्हणता येतील! पहाटेच शुचिर्भूत होऊन सूर्योदयाच्या आत, आम्ही जवळच असणार्‍या द्वारकाधीशाच्या मंदिरात जाण्यासाठी निघालो.पवित्र आरतीचा सोहळा बघण्यासाठी भाविकांनी बरीच गर्दी केलेेली होती.मंदिराच्या गाभार्‍यात मूर्तिला सालंकृत सजवून   असंख्य दिव्यांच्या साह्याने भव्यतेचे दर्शन देणारी आरती केली जात होती!ही आरती म्हणजे आपल्या डोळ्यांना आणि मनाला सुखावून टाकणारा एक उत्कट क्षण असतो! मंगलमय वातावरणात टाळ,झांज, घंटांच्या नादात भगवंताची स्तुती सुमनं, गीत, आरत्या म्हटल्या जातात. त्यावेळी माणूस भगवंतावर स्थिरावलेली आपली नजर तसूभरही हलू देतत नाही.चित्त प्रसन्न होऊन वृत्ती भक्तिमय होऊन जातात. आरती संपेपर्यंत आपण भगवंताच्या समोर, त्यांच्या सानिध्यात आहोत ही जाणीव खूप ऊर्जा देऊन जाते! आरतीच्या वेळी मंदिरात खूप गर्दी होती प्रत्येकालाच आपण हा सोहळा 'याची देही याची डोळा', बघावा अशी इच्छा असणे स्वाभाविक आहे. पण, प्रत्येक जण भक्तिरसात न्हाऊन निघालेला असतो.त्यामुळे गर्दीची कोणीही पर्वा करत नाही.या गर्दीचे शक्य तेवढे नियोजन करत शांतता आणि शिस्त राखण्याचे काम मंदिर प्रशासनाकडून बऱ्यापैकी चोख बजावले जाते.

व्दार कहॉं?व्दार कहाॅं?(भगवंताचं)असा प्रश्न विचारत विचारत आपल्या जिवलग मित्राला भेटावयास येणार्‍या सुदाम्यानं व्दारके मध्ये पाऊल ठेवले.भगवंताला, द्वारकाधीशाला, आपल्या मित्राला भेटण्याची ओढ त्यांना अनावर झालेली होती. म्हणूनच या शहराला "द्वारका"(व्दार कहाॅं चा अपभ्रंश)हे नाव पडलं. असेच सांगितले जातं. हे मंदिर म्हणजे 
द्वारकाधीशाच्या दरबाराचे ठिकाण होय. येथून सारा राज्यकारभार श्रीकृष्ण भगवान चालवत असत.
 पण त्यांच्या कुटुंबासमवेत रहावयाचे ठिकाण, घर मात्र 'बेट द्वारका' या ठिकाणी होतं.आजही हे ठिकाण, ही वास्तू जतन करुन ठेवलेली आहे. 

   जवळच असणाऱ्या बेट द्वारकेला मात्र थोडा गाडीचा व पंधरा मिनिटांचा बोटीचा प्रवास करुन जावे लागते. समुद्रात असणारे बेटच ते! आपला मित्र, सुदामा जेंव्हा श्रीकृष्णाच्या भेटीसाठी द्वारकेत आले,तेंव्हा, भगवान श्रीकृष्ण आपल्या राहत्या घरी, त्यांना रहावयास घेऊन  आले.त्यांना काही दिवस ठेवून घेत,त्यांचा यथोचित सत्कार पाहूणचार मोठ्या आनंदानं केला भगवंतानं! ही अनोख्या मित्रप्रेमाची विशिष्ट खूण, जागा या घरात आजही जपून ठेवलेली आहे.गावातच, वस्तीत असणारं ही घरवजा मंदिराची मोठी प्रसन्न वास्तू आहे.भगवंताची पायधूळ लागलेल्या या पवित्र वास्तूला, आपलाही पदस्पर्श घडणं म्हणजे केवढा भाग्याचा क्षण! ही भावना मनात रुंजी घालत राहते. प्रत्येक जण आपल्या जीवनाचे सार्थक झाल्याच्या आनंदानं भरुन पावल्याच्या समाधानात असतो. 

व्दारकेशाच्या राजवाड्याला,राहत्या घराला भेट दिल्यानंतर 'नागेश्वर' नावाच्या ज्योतिर्लिंग असणाऱ्या मंदिराला आम्ही भेट दिली. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आपल्या औंढा नागनाथाचा नागेश्वर आहे .असे आपण मानतो. पण गुजरातमध्ये हाच नागेश्वर 'ज्योतिर्लिंग' म्हणून गणला जातो. मंदिराची भव्यता डोळ्यांचे पारणे फेडते. यानंतर बघितलेले २५०० वर्षे जुने असणारे, पण बाराव्या शतकात पुनर्निर्माण केलेले रुक्मिणी मातेचे मंदिर. त्यावरील देव देवतांची शिल्पे कोरीवकाम बघण्यासारखे आहे. रुक्मिणी मातेचा कुमकुम प्रसाद घेत समाधानानं आपण बाहेर पडतो. 
 
    व्दारकेत फिरत असताना ठिकठिकाणी लोण्या सह दही विकणारे गवळी पावलोपावली दिसतात. अगदी माफक दरात ते असे दही विकतात. तेंव्हा आपण महाराष्ट्रात एक लिटर दुधासाठी पन्नास-साठ रुपये मोजतो.हे शल्य वाटल्यावाचून राहत नाही.द्वारकेत पाऊल टाकता क्षणीच दिसून आलेल्या भरपूर संख्येतील गायींचे गुपित हे शुभ्र पांढरे लोणी बघून पटकन लक्षात आले. व्दारकेशाच्या समोर उभे राहून, सायंकाळी पुन्हा एकदा पवित्र अशा मंगल आरतीचा सोहळा डोळ्यात साठवून ठेवला.

    द्वारकाधीशाची मूर्ती छोटीशीच पण नटखट चेहऱ्याची आहे असा भास होत होता.कृष्ण भगवान बालवयातील नसून कुमार अवस्थेतील तरुणपणातील आहेत हे पटकन लक्षात येत होतं! काळ्या  पाषणाच्या या मूर्तीला विविध रंगांच्या वस्त्रांनी, अलंकारांनी सजवलेलं होतं. मुर्ती मोठी लोभस दिसते ही! गदाधर आणि चक्रधर  भक्तांच्या डोळ्याचे पारणे फेडून टाकतो अगदी!दर्शन झाल्यानंतर मिळणाऱ्या लोणी आणि साखर या प्रसादानं आत्मा तृप्त होतो.व्दारकेशाला  डोळ्यात भरभरुन साठवून घेत, त्रिवार नमन केलं.आणि दुसऱ्या दिवशी सोमनाथाच्या दर्शनासाठी निघण्याची तयारी आम्ही करू लागलो....

*नंदिनी म.देशपांडे*.
    औरंगाबाद.

👑👑👑👑👑👑

सैर गुजरात राज्याची.

*सैर गुजरात     
        राज्याची*

♦ *अहमदाबाद*

‌‌   "परमार्थातून पर्यटन," हे ब्रीद समोर ठेवत गेल्या वर्षी आम्ही, आपल्या भारतातील तीर्थ स्थानं आणि त्या त्या राज्यांच्या परिसरात असणारी ईतर पर्यटन स्थळं,तेथील निसर्ग सौंदर्य व त्या ठिकाणची संस्कृती चालीरीती या गोष्टांची ओळख करुन घेण्यासाठी पर्यटन यात्रेला सुरुवात केली.

‌ ‌‌ उत्तरांचल मधील चारधाम यात्रा यशस्वीपणे पूर्ण करुन आल्यामूळे, इतर पठारी प्रदेशातील पर्यटन फारच सोप्प आहे.असं वाटू लगलं होतं.
  उत्तरेतला बद्रीनाथ केदारनाथ बघितल्या नंतर साहजिकच पश्चिमे चा "व्दारकेश"आम्हाला त्याच्याकडे यावयास खूणावत होता.

   दसरा आणि दिवाळी यांच्या मधल्या काळातील गुलाबी थंडीमध्ये,आकाशात शरदाच्या चांदण्यांची शिंपण घातलेली असताना, आम्ही व्दारकेशाच्या भुमीवर पाऊल ठेवण्याचं निश्र्चित केलं.
   गुजरात मध्ये प्रवेश करताना अहमदाबाद ला विसरुन चालणारं नव्हतंच...
    
     ठरल्या प्रमाणेअहमदाबादच्या एअरपोर्ट वर तीन्ही सांजा टळत असताना आम्ही प्रवेश केला.
"सरदार वल्लभभाई पटेल एअरपोर्ट." टापटीप असणारे, ठिकठिकाणी गुजरातच्या भुमीचे सुपुत्र म.गांधीआणि वल्लभभाई पटेल यांच्या छायाचित्रांवरुन इतिहासातील प्रसंगांची साक्ष देत होते.अधनं मधनं आपल्या भुमीतील ऐतिहासिक वास्तूंच्या, कोरीव नक्षीकामाचे नमूने वॉल पेपरवर झळकवत,अगदी ‌खरे वाटावेत ईतपत डोळ्यांचे पारणे फेडत होते.
स्वच्छ भारत अभियानाचा पुरस्कार करणाऱ्या घोषणा, ठिकठिकाणी मान उंचावत प्रवाशांना स्मित करताना दिसत होत्या.
तेथील जमेल तेवढी वैशिष्ट्यं डोळ्यांनी पित पित आम्ही आमच्या कॅब मधून हॉटेलच्या मुक्कामी पोहोंचलो.

   जेवणाच्या वेळी पोटात कावळ्यांची कावकाव झाली.तेथेच जेवणाचा आस्वाद घेऊन सकाळी ' हेरिटेज वॉक'घ्यायचा आहे हे मनाशी ठरवूनच झोपेच्या आधिन झालो...

"हेरिटेज वॉक".या भारदस्त शब्दांत खूप कांही दडलेलं असेल असा आमचा अंदाज होता.ही सारी ठिकाणं जवळ जवळ आहेत, आणि पायी दोन तासांत बघून होतील, असं सांगण्यात आलेलं.त्यासाठी स्पेशल गाईड लागेल,ह्या सर्व ऐतिहासिक स्थळांची माहिती गाईड कडून घ्यावयास माणसी रु.दोन हजार दोनशे खर्च येईल,असे सांगण्यात आले आम्हाला.पण हा म्हणजे पर्यटकांकडून निव्वळ पैसे उकळण्याचा मार्ग आहे. हे आमच्या वेळीच लक्षात आलं.अव्वाच्या सव्वा रक्कम उकळण्याची ही व्यपारी वृत्ती खरोखरच चीड आणणारी होती.
शेवटी एका भल्या माणसाने अम्हाला बाहेर येऊन सल्ला दिला,"तुम्ही अॅटो रिक्षा ठरवा...दोन तीनशे रुपयांत ही सारी ठिकाणं माहितीसह तुम्हाला दाखवून पुन्हा तुमच्या गाडीजवळ आणून सोडण्यात येईल...हो, कराण,मोठी गाडी जुन्या शहरातून फिरवणं अशक्यच होतं.

  प्रसिध्द ऐतिहासिक स्थळं बघण्यासाठीचा, त्यांचा इतिहास जाणून घेण्यासंबंधीचा हा वॉक होता.अर्थात ही सर्वच ठाकाणं जुन्या शहरात,अगदी वस्तीमध्येच,किंबहूणा गल्लीबोळतच होती.बऱ्याच ऐतिहासिक ईमारतींचे अवशेष खिळखिळे झाले होते.कांही ऐतिहासिक ठेवा म्हणून जाणीव पूर्वक जोपासली होती, तर कांहींच्या छताखाली कुटुंब आसऱ्याला होती.त्यामूळे थोडी अस्वच्छता,गलिच्छपणा,सुध्दा वास्तव्यास होता तेथे.
   या ऐतिहासिक ठिकाणांत आम्ही, अहमदाबाद मध्ये असणारे प्राचीन दरवाजे,कांही मज्जिती,कांही मंदिरं,तर कांही चौक तसेच कांही जुन्या हवेल्या,जुने स्टॉक एक्सजेंज अॉफिस अशी बरीचशी ठिकाणं बघातली.
  थोडक्यात पहिल्या दिवशी जुने अहमदाबाद शहर बघून झाले.
एकूणच शहर बरेच मोठे वाटले.विमानतळावरुन शहरात येताना नवीन शहर रचना खूप नियोजनबध्द पध्दतीने झाली असावी,असे जाणवत होते.
   गुजरातच्या रस्त्यांची महती खूप ऐकून होतोच आम्ही.त्या रस्त्यांवरुन प्रत्यक्ष प्रवास करताना ही महती पुरेपूर पटली.
अगदी तरंगत प्रवास करत आहोत हा फिल येत होता.
    
    अहमदाबाद च्या दोन दिवसीय मुक्कामात,तेथून जवळच असणाऱ्या राजधानीच्या शहराला,गांधीनगरला आम्ही भेट दिली...
गुजरात विधानसभेचं कामकाज तेथूनच चालतं.शिवाय राजधानीचं शहर म्हणून भरपूर सुनियोजित पध्दतीनं,नव्यानं उभारणी केली आहे असं वाटत होतं.महत्वाची कार्यालंयं तेथेच होती.
गांधीनगरला गांधी आश्रम बघण्यात आला.महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांच्या वास्तव्याचं हे ठिकाण.आश्रम म्हणजे त्यांचं रहातं घरच ते.किती तरी ऐतिहासिक घटनांचं साक्षिदार असणारं.या ऐतिहासिक घटनांचं,गांधीजी आणि कस्तुरबा यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या असंख्य घटनांच्या छायाचित्रांचं जणू प्रदर्शनच होतं हे. खूप चांगल्याप्रकारे ह्या वास्तूचे जतन करुन ठेवल्याचे बघता क्षणीच लक्षात येत होतं.

   शहराला साबरमती नदीने पूर्ण वेढा दिलाय असे चित्र दिसत होते.म्हणूनच गांधी आश्रमाला,'साबरमती आश्रम' असेही म्हटले जातं.
   कृष्ण सखयाच्या अस्तित्वाच्या खूणाही आपल्या तेजाची प्रभावळ दाखवत होत्याच.रस्त्यात असणाऱ्या राधा-माधवाचं देखणं मंदिर बघावयास मिळालं.

   आता आम्ही निघालो होतो,अदालज स्टेपवेल किंवा "अदालज नि वॉव" हे ठिकाण ‌बघण्यासाठी.
    गुजरात मध्ये इंडो इस्लामिक स्थापत्यकलेचा उत्कृष्ट मिलाफ साधलेला आपल्याला दिसून येतो.हेमाडपंथी मंदिरं किंवा ऐतिहासिक ठिकाणांवर भौमितिक पध्दतीने पण अतिशय बारीक सारीक नजाकतीतून त्यावर नक्षीचे कोरीवकाम अप्रतीम असेच आहे.
अदालज स्टेपवेल ही नावाप्रमाणेच पायऱ्या पायऱ्यांच्या रचनेने बांधलेली एक सुंदर ईमारतवजा विहिर आहे.ही विहिर हिंदू राणी रुपबा हिनं,शेजारच्या मुस्लीम राजाची म्हणजे,राजा मेहबूब बेगड याच्या मदतीने आपला पती,राजा वीर सींग याच्या स्मरणार्थ बांधलेली अशी उत्कृष्ट स्थापत्य कलेचं एक सुंदर उदाहरण होय.पाच मजल्यांच्या स्वरुपात बांधलेल्या या भव्य विहारीला तळाशी उतरण्यासाठी रुंद पायऱ्या व प्रत्येक मजल्याला स्वतंत्र प्लॅटफॉर्मस् आहेत. प्रत्येक खांबावर अतिशय सुबक अशी नक्षी बनवलेली दिसून येते.अप्रतीम वास्तूकलेचा नमुना म्हणता येईल असेच हे ठिकाण आहे.
   तेथून आम्ही अक्षरधाम मंदिराकडे कूच केली.नव्यानंच बांधल्या गेलेल्या मंदिराचं बांधकाम अजूनही चालू असल्याच्या खूणा दिसत होत्या पण तेथील मुख्य आकर्षण होतं ते,तेथे दाखवला जाणारा,सत् चिदानंद साऊंड आणि लाईट शोचं.कोजागारी पौर्णिमेच्या चंद्राच्या साक्षीने,किंचित झोंबणाऱ्या गारव्यात आम्ही या अप्रतीम शो चा आनंद घेतला आणि या मंदिराच्या,सत्पुरुषाच्या कार्याविषयी जाणून घेतलं. परतीच्या वाटेवर चवीष्ट गुजराती थालीचा मधूर बांसुंदीसह साऱ्या पक्वान्नांचा यथेच्छ आस्वाद घेतला.

    दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता आटोपून,गुजरातच्या उत्तरेकडे सिध्दपूर साठी प्रयाण केले.रस्ते एवढे गुळगुळीत की,जणू आपण हवेवर सैर करत आहोत. खूप रुंद रस्ते,वाहतूकही खूप कांही गर्दीची नाही त्यामूळे प्रवास खूपच सुखावह होत होता.
सिध्दपूर या गावी मूळचे येथील रहिवासी असणारे पण आता बरेचसे गल्फ कंट्रीज मध्ये स्थायिक झालेल्या बोहरा समाजाची ठराविक साचेबध्द घरं,हवेल्या बघितल्या.लाकडी कलाकुसरीने सजलेली ही घरं एकसारखी अशी एखाद्या चाळीसारखी भासत होती...त्यांचे असणारे ऐश्वर्य या घरांमधून डोकावत असल्याचा भास मात्र होत होता.
   त्यानंतर असणारं आमचं आकर्षण होतं ते",रानी की वाव",पाटण स्टेपवेल.
तेथे जाताना रस्त्यात मातृतीर्थ मंदिरात दर्शन घेतलं.त्याच प्रमाणे गुजरातची ओळख असणाऱ्या "पटोला", या आकर्षक डिझाईन ने तयार होणाऱ्या प्यूवर सिल्क हातमाग  केंद्राला.भेट दिली.अत्यंत सुंदर आणि नाजूक,विविध आकर्षक रंगसंगतीनं बनवलेल्या,बनत असलेल्या साड्यांचे नमुने आम्ही डोळे भरुन बघितले.कारण त्यांच्या किंमती आमच्या सारख्या सामान्य माणसांच्या अवाक्याबाहेरच्या होत्या.सहज म्हणून डोक्याला बांधण्याच्या स्कार्फ ची किंमत विचारली,आणि पंचेवीस हजाराचा आकडा ऐकून चक्रावल्या सारखंच झालं.
रेशिम किड्यांनी बनवलेल्या रेशमाच्या धाग्यांनी आणि अथक् मेहनतीनं बनवलेल्या वस्त्राची किंमत अशी असणे सहाजिकच आहे.
राणी की वाव!हा आणखीन एक अप्रतीम वास्तूकलेचा, नाजूक नक्षींनी बनलेला विहिरीचा नमुना.पाटण या गवात असणारी गुजरात मधील एक सौंदर्यानं नटलेली ही वास्तूकला!
ही विहिरही राणी उदयमती हिनं अकराव्या शतकात,आपल्या राजाच्या,राजा भिमदेवच्या स्मरणार्थ बांधलेली आहे.यांच्या भिंतींवर अप्रतीम अशा हिंदूंच्या देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या दिसून येतात.फारच रेखीव अशा या वास्तू वरचे नक्षीकाम मला पटोला साडीच्या पदरावर विणलेले आहे हे लगेच लक्षात आले.आणि "पाटण ची पटोला" ही ओळख पटकन समजली.

   एव्हाना,ह्या दोन विहिरी बघितल्यानंतर  आम्ही गुजरातच्या स्थापत्य कलेच्या आणि त्यावरील कलाकुसरीच्या नक्षीकामाच्या प्रेमात न पडलो असतो,तरच नवल होते! या दोन वास्तू नंतर कलेची खाण असणाऱ्या 'मोधेरा,सनटेम्पल,' म्हणजेच सुर्य मंदिराला आम्ही सुर्यास्ताच्या पुर्वार्धात भेट दिली.... अक्षरशः डोळे दिपवून टाकणारं असं हे गुजरातचं सौंदर्य वैभव,सुर्यास्ताच्या सोनेरी किरणांनी न्हाऊन निघत आणखीनच सुंदर दिसत होतं.
इ.स.१०२६-२७ मध्ये बांधलेल्या या वस्तूचे तीन स्वतंत्र भाग आहेत.श्राईन (तीर्थस्थान) हॉल,असेंब्ली हॉल(सभागृह) आणि रिझर्व्हायर(जलाशय).हे ते भव्य दिव्य तीन हॉल्स आहेत.
हॉल्सचे पिलर्स आणि छत अप्रतीम नक्षीकलेतून साकारलेली आहेत.उच्च पातळीवर बांधलेली ही दालनं उतरताना भरपूर पायऱ्या आहेत.
   आपल्या आवडत्या व्यक्तीच्या स्मरणार्थ बांधण्यात येणारी जलाशयांची ही कल्पना खरोखरच लोकोपयोगी व कौतुकास्पद आहे.तसेच अनुकरणीय सुध्दा आहेच.
    एकूणच या वास्तू बघून,त्या वेळच्या राज्यकर्त्यांच्या वैभवाचे व भव्यतेचे दर्शन घडल्याचा आनंद मिळतो.

©
नंदिनी म.देशपांडे
    औरंगाबाद.

⚛⚛⚛⚛⚛⚛

रविवार, १२ जानेवारी, २०२०

संकल्पांची ऐशीतैशी...

*संकल्पांची ऐशीतैशी*

     "नाही नाही,आता मात्र एक जानेवारी,नवीन वर्षारंभा पासून, मी दररोज जाणारच मॉर्निंग वॉक ला...."
बेमालूमपणे ही भिष्म प्रतिज्ञा वाटावी इतपत निग्रहाने झाली ही घोषणा....
अर्थातच आमच्या कडूनच....
"गर्जेल तो बरसेल काय",या उक्ती प्रमाणे "घोषणा करेल तर फोलपणा ठरेल", अशी एक नवी उक्ती आपण निर्माण केलीय....याचा मनस्वी आनंद मात्र वर्षारंभाच्या पहिल्याच दिवशी मिळाला.....कांही तरी 'क्रिएटिव्ह'केल्याचा आनंद....मनात उकळी काढून गेला....
संकल्प पहाल्याच दिवशी मोडित निघाला आहे हे वास्तव पचवण्याच्या आपल्यावरच्याच रागावर (उक्तीच्या) नवनिर्मितीच्या आनंदानं मात केली....
केवढी थंडी पडलीए सध्या!छान मऊ मऊ दुलई,त्याला आतून आईची कॉटनची उबदार स्पर्शाची साडी जोडलेली...जणू आई आपल्या बाळाला (?) मोठ्या प्रेमानं पांघरुण घालत झोपी घालते आहे....
अशा आविर्भावात
सकाळची लागलेली साखरझोप गुलाबी थंडीत मोडून काढणं केवळ अशक्यच!
याच्या पुढे कसचा संकल्प नि कसचे काय!....एवढ्या छान थंडीत मिळणाऱ्या उबदार झोपेच्या आनंदावर कोण पाणी सोडेल?....
त्याच क्षणाला सायंकाळी फिरावयास जाण्याचा संकल्प सोडला गेला.अर्थातच आमच्याच कडून....तो पुर्वापार चालत आल्यामूळे, थोडा तरी तडिस जातोय....असे वाटण्या ईतपत,मजल दरमजल करत अधनं मधनं सिध्दीस जातोय तो,याचे मिळणारे समाधान किलोभर वजन मात्र वाढवून जातंयं....ही जाणीव करून देण्यासाठी,की नवसंकल्पाचा फज्जा उडालाय....हा तरी चालू राहू दे....
कधी कधी घरच्या घरी योगा करत दररोज एक तास व्यायाम करायचा!असाही संकल्प मनातल्या मनात सोडला जातो.... 
या महिन्यात सुरुवातीच्या पंधरा दिवसांत कितीही सोडले संकल्प,तरीही ते नवीन वर्षातीलच असतात....(ही माझ्या भाबड्या मनाची कल्पना!)खूप छान पध्दतीनं करता येत असतील तरीही त्यात सातत्य टिकून राहिले तर शपथ!आज काय, बाहेर जायचे....उद्या काय अमक्याच्या बर्थ डे पार्टीला....परवा तर शॉपिंग ला त्यानंतरच्या दिवशी रिसेप्शन....असे करत करत अख्खा आठवडा गेला तरीही योगाचे 'योग' काही केल्याअजूनही जुळून येत नाहीएत....
नाही म्हणायला डिंकाचे लाडू नियमीतपणे खाण्याचा संकल्प,आणखी तरी तग धरुन आहे....तो मात्र आपली वेळही चुकवत नाही....बरोबर वेळेला आठवण करुन देण्याचे काम प्रामाणिकपणे मुखरसा करवी केलेच जाते....
तेवढं पौष्टिक गेलंच पाहिजे पोटात!त्या शिवाय शरीराचा स्टॅमिना कसा टिकेल?आता या वयात शक्ती कशी येणार?जणू काही अर्धी लाकडं.... ठिकाणी गेल्याच्या अभिनीवेषात माझंच मनंच सांगत रहात गुपचूप पणे... 
अजूनही पंधरा दिवस संपायला चार दिवस बाकी आहेत....आणखी किती संकल्पांची घोषणा होईल,त्यातील किती तडिस जातील,आणि कितींची ऐशीतैशी होईल ते हे चार दिवसच सांगतील....
बघू या....काय होते ते....
पुर्णत्वास गेलेच हे संकल्प तर पुढच्या वर्षीच्या नवीन संकल्पांची घोषणा करताना सांगीनच नक्की....तो पर्यंत नववर्षाच्या,नवसंकल्पांच्या योजनेसाठी,त्यांच्या पुर्ततेसाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा...💐💐

©
*नंदिनी म.देशपांडे*

🌹🌹🌹🌹🌹

शनिवार, ११ जानेवारी, २०२०

शब्द.कविता.

*शब्द*
शब्द मखमली स्पर्श
शब्द अग्नीचा विखार
शब्द वेदनेचा हुंकार
शब्द कौतूके अपार
शब्द प्रेमाचा जागर
शब्द नाजूक कोमल
शब्द मनाला फुंकर
शब्द देखणे निरागस
शब्द बावरे मधूर
शब्द मोती गुंफून
शब्दमाला होई सुंदर
शब्द चांदणं शिंपण
शब्द आनंदे लेपन

© *नंदिनी*

🌹🌹🌹🌹