सोमवार, २३ जानेवारी, २०२३

शुभारंभ.

*शुभारंभ*

 ।गणपती बाप्पा मोरया।
शुभ+आरंभ=शुभारंभ.
     कोणत्याही,अगदी छोट्याशा पण महत्वाच्या कामाची सुरुवात आपण ज्या क्षणापासून करतो तो त्या विशिष्ट कामाचा शुभारंभ असतो,असे आपण मानतो..
काम महत्वाचे असते म्हणून सुरुवातही शुभ मुहूर्तावर, शुभहस्ते आणि शुभदिनी व्हायला अशी आपली अंतरिक इच्छाही असतेच हो ना?
    ‌‌तर असा हा शुभारंभाचा क्षण आपण साजरा करतो..
आपल्या हिंदू संस्कृतीत या क्षणाला फार महत्त्व आहे...
कोणी श्रीफळ फोडून,कुणी छोटी मोठी पुजा घालून तर कोणी एखाद्या विशिष्ट दिनाचे औचित्य साधून हा शुभारंभाचा योग साधत असतो....
पण खरं सांगावयाचे झाले तर, कोणत्याही कार्याच्या शुभारंभाला माणसांच्या घोळक्या शिवाय शोभा नाही असेच म्हणावे लागते....
 शुभारंभी कुटुंबातील सारे उपस्थित असावेत ही मनोधारणा असणं अगदीच रास्त आहे..
       म्हणूनच शुभारंभ दणक्यात करण्याची प्रथा पडली असावी असे वाटते..
शुभारंभाचा घाटच मुळी घातला जातो,तो आपण करत असलेल्या कामाची वाच्यता चार माणसांत होऊन त्याला प्रसिद्धी मिळावी,त्याचे कौतूक व्हावे आणि समाजाने याची दखल घ्यावी यासाठी...
'शुभारंभ' ही संकल्पना म्हणूनच सामाजिक आहे.
       हे लक्षात घ्यावयास हवे की, शुभारंभ हा केवळ चांगल्या,समाजहिताच्या आणि सकारात्मक भावनेने केलेल्या कामाचाच झाला पाहिजे तर आणि तरच ते काम लोकांची वाहवा मिळवेल.
       हल्ली शुभारंभाला उद्घाटन समारंभ असेही संबोधले जाते...पण शुभारंभ हा पारंपरिक शब्द कसा भारदस्त आणि ईश्वरी वरदहस्त सवे घेऊन आल्या सारखा वाटतो... म्हणून तर आरंभ देवतेची, विघ्नहर्त्याची पुजा या प्रसंगी घालतात याला नक्कीच पुष्टी मिळते....
   ‌‌चला तर सख्यांनो,उत्तरायणाच्या साक्षीने आपणही मरगळ झटकू या आणि नव्याने लेखनाचा श्रीगणेशा करुन शुभारंभ करु या.

©️नंदिनी म.देशपांडे.
जाने.१९,२०२३.
🌹🌹🌹🌹🌹

सर्कस,एक गर्भित सत्य.

सर्कस,एक गर्भित सत्य....
*********************

       जीना यंहा मरना यंहा
ईसके सिवाय जाना कंहा?

हे राजकपूर चं गाणं,आज नुसतं ऐकलं तरीही,त्यांचा तो केवीलवाणा चेहराच सतत डोळ्यासमोर रेंगाळत रहातो माझ्या....
    या उलट लहानपणी आमच्या शहरात, साधारणपणे फेब्रुवारी महिन्यात उरुस भरायचा त्या वेळी सर्कसचा तंबू ठोकलेला असायचा...त्याचं फार आकर्षण वाटायचं...
मोठे व्यापलेले मैदान,अवती भोवती विशाल हत्ती,घोडे,माकडं यांना बांधलेले असायचे...त्या वेळी सर्कस बघण्याचं फार आकर्षण वाटायचं मनाला...
पण वयाच्या आणि मनाच्या प्रगल्भते बरोबर अशा सर्कशीतील पात्रांच्या,कलाकारांच्या,खेळाडूंच्या भुमिका किंबहूना त्यातील प्राण्यांविषयी सुध्दा एक कणव दाटून येऊ लागली मनामध्ये....सर्कस बघण्याचं आकर्षणही कमी कमी होत गेलं....
       सर्कस,म्हणजे त्यातील पात्रांना करावी लागणारी अगदी जीवावर बेतेल अशी तारेवरची कसरतच...
जीव मुठीत धरुन अघोरी खेळांना सामोरी जाणारी ही सर्कशीत काम करणारी मंडळी,केवळ आपली आणि आपल्या कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी महिनो न् महिने घराबाहेर रहाणारी आणि प्रेक्षकांचा श्वास रोधून ठेवत,आपल्या जीवावर बेतणाऱ्या कसरती करणारी, हतबल झालेली ही मंडळी...
      कधी अक्षरशः 'मौत का कुवा" मधून बाहेर परततील का?असे वाटायला लावणारी हीच जेंव्हा उंच झोक्यावरुन कोपरापाणी खेळतात तेंव्हा बघणाराच्या काळजाच ठोकाच चुकेल की काय असे वाटते....
    यातील काहीजण वाघोबाशी सलगी करतात तेंव्हा तर प्रेक्षकांची आपलाच बचाव करण्यासाठी त्रेधातिरपीट उडते अगदी...
विशालकाय हत्ती जेंव्हा माहूताच्या तालावर नाचतात तेंव्हा त्यांचे हे विशालपण फार केविलवाणं वाटतं...
      सगळ्यांच्या आवडीचं पण तेवढचं आपल्या शारीरिक व्यंगाचं प्रदर्शन करत लोकांना हसवणारं सर्कशीतील पात्र म्हणजे,त्यातील "जोकर".
जोकर शिवाय सर्कस आणि पत्त्यांचा डाव ह्या दोन्हींनाही अर्थच नाही...
      एका डोळ्यात हसू आणि दुसऱ्या डोळ्यात आसू घेऊन वावरणारं हे पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करुन रहाते नक्कीच.... आपल्या शारीरिक व्यंगाचा असा उपयोग करणं म्हणजे व्यंगाचं एका अर्थी प्रदर्शन असले तरीही स्वकष्टातून कमावलेली दोन वेळची भाकरी त्याला समाधान देऊनच जात असणार...
      एकूणच सर्कस म्हणजे लोकांची करमणूक करणारं साधन,पण त्यातील जीवंत पात्रांच्या वाट्याला अवहेलना, असुरक्षितता आणि केविलवाणेपण बहाल करणारे एक पोट भरण्याचे साधनच आणि दुसरे काय...
या पात्रांच्या चेहर्याऱ्यांमागची ही शोकांतिका आपण माणूस म्हणून बघायला हवी हे मुद्दाम नमुद करावेसे वाटते....

©️
नंदिनी म. देशपांडे.
२०-१-२०२३.

🌹🌹🌹🌹🌹🌹

शनिवार, ७ जानेवारी, २०२३

नि.न्यायमूर्ती प्रभाकरराव उमरीकर.

*निवृत्त न्यायमूर्ती श्री* *प्रभाकरराव उमरीकर* 

     कायद्याचा सातत्याने अभ्यास हा ज्यांचा ध्यास,कायदेविषयक ज्ञान सतत अपडेट ठेवणं हा ज्यांचा छंद, येईल त्याला कायदेविषयक निकोप सल्ला देणं ही ज्यांना आवड आणि कायदेविषयक चर्चेमध्ये हिरीरीनं भाग घेणं यात ज्यांचा आनंद, असे एक व्यक्तीमत्व म्हणजे, निवृत्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्री प्रभाकरराव आनंदराव उमरीकर....
     19 ऑक्टो.1944 रोजीचा यांचा जन्म...मुळचे परभणीचे रहिवासी,पण कालांतराने औरंगाबादेत स्थायिक झालेले  कायदेक्षेत्रातील एक निष्णात ज्ञानभांडार....
      7 नोव्हेंबर,2022 रोजी अल्पशा आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली....
दिवाणी आणि फौजदारी अशा दोन्हीही क्षेत्रात सारख्याच परिपूर्णतेने न्यायदान करणं हा यांचा हातखंडा होता...
वकिली व्यवसायात वडिलांच्या,आनंदराव उमरीकर यांच्या नंतरची ही दुसरी पिढी...
औरंगाबादच्या एम.पी.लॉ कॉलेज मधून कायद्याची पदवी संपादन केल्यानंतर सुरुवातीला तीन वर्षे वकिली व्यवसाय केला आणि नंतर सात वर्षे सरकारी वकील म्हणून कार्यरत राहिले...
श्री प्रभाकरराव उमरीकर यांची त्यानंतर न्यायाधीश पदी नेमणूक झाली आणि ते संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या गावांत/शहरांत न्यायदानाचे पवित्र कार्य पार पाडत राहिले....
कितीही क्लिष्ट खटले असतील तरीही आपल्या सूक्ष्म अभ्यासूवृत्तीने त्यांनी दाव्यांचे निकाल दिले आहेत...दावा दिवाणी असो किंवा फौजदारी  दोन्ही पक्षाच्या वकिलांचे म्हणणे ऐकले, की लगेच डायसवरच (कोर्टहॉल) मध्येच, न्यायपत्राचे डिक्टेशन देत संदर्भित खटल्याचा निकाल देणं ही यांची खैसियत होती...
अतिशय मोजक्या न्यायाधिशांना जमणारी ही गोष्ट प्रभाकरराव उमरीकर यांनी आपल्या कार्यकाळात एका व्रतस्थ न्यायाधिशाप्रमाणे पाळली होती...
कितीतरी वकिल मंडळी, न्यायाधीश मंडळी एखाद्या कायदेविषयक क्लिष्टते संदर्भात यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी अगदी हक्काने येत असत...यथायोग्य मार्गदर्शन करत,ते प्रत्येकास उत्साहाने कायदेविषयक सल्ला देत...त्यातील बारकावे समजाऊन सांगत...कोणीही कधीच विन्मुख होऊन परतत नसे...
त्यांनी न्यायदान केलेले आणि अपिलात (उच्च न्यायालयात) दाखल झालेल्या सर्वच खटल्यांचा निकाल कायमस्वरुपी जसा आहे तसाच रहात असे...
केवळ एका दाव्यात दिलेला निकाल उच्च न्यायालयात फेटाळला गेला, पण सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल फेटाळून जिल्हा न्यायालयात झालेला निकालच कायम ठेवला होता...ही आठवण सांगताना त्यांना आपण न्यायक्षेत्रात दिलेल्या सेवेबद्दल कृतकृत्यतेची भावना वाटत असे...
 कित्तेक बार मधील वकिल मंळींनी श्री प्रभाकरराव उमरीकर यांनी दिलेल्या निकालपत्रांचे पुस्तक बनवून, न्यायालयाच्या वाचनकक्षात अभ्यासासाठी ठेवले आहेत....
वकील मंडळींमध्ये त्यांची प्रतिमा "एक रेडी रेफरन्सर" अशी केली जायची...
कायद्याचा अतिसूक्ष्म अभ्यास करत कायदा कोळून प्यालेले न्यायाधीश ही त्यांची ख्याती अवघ्या महाराष्ट्रात आहे...
आज ते आपल्यात नाहीत तरीही त्यांच्या निकालपत्रांच्या पुस्तकाच्या रुपाने कायमच कायदेक्षेत्रात वावरणार आहेत हेच खरे....
निवृत्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश दिवंगत श्री प्रभाकरराव उमरीकर,यांना सात जानेवारी रोजी या जगातून एक्झिट घेऊन दोन महिने होतील...त्यांना विनम्र अभिवादन. 🙏🙏
©️ 
ॲड.नंदिनी म.देशपांडे.
nmdabad@gmail.com 
9422416995.
🌹🌹