रविवार, २८ नोव्हेंबर, २०२१

पवशी.

ओळखलंत का मला मंडळी? माझी आठवण येते का कधी कुणाला?जरासा ताण द्या तुमच्या
स्मरणशक्तीला!अगदी, बालपणात जा म्हणजे येईल माझी सय!
    अहो, माझ्याशिवाय गृहिणीचं पान हालत नसे...स्वयंपाक चालू करण्या अगोदर माझ्याशी संवाद अनिवार्य च असायचा!
छोटीशी जागा व्यापणारी मी, पण पटदीशी मदतीसाठी तत्पर असायचीच!साऱ्या स्वयंपाकघरभर भिरभिरती नजर असायची माझी. बाजारातून आणलेल्या ताज्या ताज्या भाज्यांवर विशेष नजर ठेवून असायची मी... आणि कुठलीही भाजी आणि मी आमच्यात आडवा विस्तू जात नसे कधीच...'विळ्या भोपळ्याचे नाते', 
ही म्हणही माझ्याच स्वभावाचा परिपाक!चांगला किंवा वाईट?हे ज्याचे त्याने ठरवावे....चांगले मानाल तर जेवणात भाजी खाल आणि वाईट मानाल तर भाजीशिवाय जेवाल!ठरवावे ज्याने त्याने...
  मला मात्र खूप आठवण येते हो, आजही....कुठे तरी कोपर्‍यात  आहे माझे अस्तित्व शिल्लक!पण वय झाल्यासारखी पडून रहाते आपली....कोणाला तरी कधीतरी आठवण होईल माझी या आशेवर...कधी कधी वाटतं, दुर्मिळ वस्तूंच्या यादीत माझी रवानगी होऊन काचेच्या कपाटात जागा मिळेल कदाचित!
   कैरीचा,लिंबाचा आंबटपणा, भेंडीचा चिकटपणा, भोपळ्याचा कडकपणा, मिरचीचा तीखटपणा आणि 
आवळ्याचा तुरटपणा,कारल्याचा कडवटपणा आणि फळांचा गोडवाही सगळ्यांच्या सगळ्या तर्‍हा, स्वभाव फार जवळून अनुभवलंय मी!
माझ्या सर्वात जास्त आवडीचं ओलं नारळ बरं का... माझ्या बोटांवर नाचवत नाचवत  त्याचा अख्खा चव काढण्याची किमया मला साध्य करता यायची!
     आता "मात्र गेले ते दिन गेले",असंच म्हणावे लागते...
 येतील का परत फिरून गेलेले ते दिन?कठिण वाटतंयं सारंचं...असो...पण झालीच कधी आठवण माझी तर नक्कीच आवाज द्या,असेल त्या कोपर्‍यातून लगेच येईन तुमच्या मदतीला धावून!आजही त्राण आहे बऱ्या पैकी माझ्यात...पण तुमच्यात आहे आहे का बघा तरी बसण्याचा त्राण?तेच आजमावून बघा अगोदर आणि मग मला बोलवा.....
    अरे,हो विसरलेच मी माझे नावच सांगावयाचं राहून गेलं...जुन्यांना, आडजुन्यांना माहित असेल कदाचित पण नव्यांना मात्र माझी ओळख करवूनच द्यायला हवी....माझे नाव ना,'विळी' विदर्भात मला,'पावशी' म्हणतात...
दोन्हीही नावं माझ्या आवडीचीच!

©️
*नंदिनी म. देशपांडे*

🌹🌹🌹🌹

रविवार, १४ नोव्हेंबर, २०२१

बालकदिन

बालपण

आपल्याच बालपणात पुन्हा फिरुन डोकावताना....

   वाटतं,पुनःश्च
   लहान व्हावं...
    अवती भोवतीचा
   स्वच्छंदीपणा आणखी
   एकदा अनुभवावा...

    निरागस प्रश्नांची
     मौक्तिक माला 
    अविरत ज्यपावी...

    फुलपाखरू होऊन
     उंच उंच उडावे
     परि बनून आनंदाने
    खूप खूप बागडावे....

   भातुकलीच्या खेळात,
    बाहुला बाहूलीचे
    लगिन लावावे...

  लुटूपूटूचा स्वयंपाक
   साग्रसंगीत बनवून
 जेवणावळी
घलाव्यात....

 पावसात भिजत चिंब
कागदाची नाव
पाण्यावर सोडावी...

  चॉकलेटचे बांधावेत ईमले
      टपाटप टाकत टापा
    घोड्यावर घ्यावी रपेट....

मामाचं पत्र,आंधळी 
     कोशिंबीर,शिवनापाणी 
आणि
लपाछपी खेळत खेळत
दमून जावं....

बाबांच्या हातून घास
   घेत गोड खाऊचा
  आईच्या तोंडून गोष्ट
   ऐकावी हिरकणीची....

 होताच रात्र,
  पदराच्या पांघरुणात
   आईच्या कुशीत
   झोपावं गुडगुडुप्प
   झोपावं गुडगुडुप्प...

© 
*नंदिनी म.देशपांडे*

🌹🌹🌹🌹🌹🌹

बुधवार, १० नोव्हेंबर, २०२१

दिवाळीचा निरोप एक हुरहुर.

आली आली दिवाळी आली, म्हणत म्हणत आजच निरोप घेऊन निघून गेलेली दिवाळी आपल्याला कितीतरी सकारात्मक उर्जा बहाल करवून गेलीए, ही जाणीव आज मनाला झाली...
गतस्मृतिंना उजाळा देत, माहेरच्या आठवणीत आईच्या स्मृतांना स्मरत त्या जागवत गेली...
नवीन आठवणींची दुलई मनावर घालत मानसिक ऊब देऊन सांगता होणारी ही दिवाळी म्हणजे आपली जवळची सखीच जणू!
आपल्या सहवासात चैतन्याने न्हाऊ माखु घालणारी,कितीतरी मनोकामनांचा नैवैद्य स्विकारणारी अशीच....
माणसाच्या वागण्या बोलण्यात सकारात्मक वृत्तींना खतपाणी घालत जाणारी,ती हिच दिवाळी...
अंतःकरणात प्रेम माया, वात्सल्य, भक्तीरस यांना सवे घेऊन येणारी ती हिच दिवाळी!
   या दिपोत्सवाच्या मंद प्रकाशात तेजाळत जाणारी मनं, आपल्याला मिळालेल्या समाधानाचे तेज चेहर्‍यावर विलसत ठेवते...आपल्या देहबोलीतून प्रकट होत जाते...
    लक्ष्मीच्या रुपाने आगमन करणारी ही दिवाळी पक्वान्नांच्या  पंक्तींचा थाट करते...फराळाच्या पदार्थांची मांदियाळी सजवते...रंगावलींचा गालिच्या ची बिछायत घालते... घराचे सुशोभीकरण करत मनाचे सुशोभीकरण साधते...
शरदाच्या चांदण्या शिंपवत हवेतील गारव्याचे मोरपीस अंगावर फिरवते आणि रोमांचित करते...ऋतूबदलाची वर्दीही देऊ करते...
    अशा या हव्याहव्याशा मैत्रीणीने आज निरोप घेतला आणि 
लगबगीला मंदावलेपण आलं जरासं...
गेल्या काही दिवसांत अपूर्ण राहिलेली निद्रादेवी आपल्या डोळ्यांचा ताबा घेतीए असं जाणवत राहिलं...आणि एखाद्या मोठ्या कार्यानंतर मांडववारं
लागणं काय असतं? हे लक्षात आलं...
पण हे मांडव वारं नव्हे तर नवीन स्वप्न, योजना यांना आकारण्या साठी घेतलेला अल्पविराम आहे असे मनानं समजावलं....

  ©️
नंदिनी देशपांडे. 
🌹🌹🌹🌹🌹