शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०२६

*कोपेश्वर थोपेश्वर मंदिर*. खिद्रापूर. --ॲड.नंदिनी म.देशपांडे. (लेखिका) छ.संभाजीनगर.

*कोपेश्वर थोपेश्वर मंदिर*. 
खिद्रापूर. 

--ॲड.नंदिनी म.देशपांडे. 
(लेखिका) छ.संभाजीनगर. 

     'खिद्रापूर' हे आहे  मंदिर असणाऱ्या गावाचे नाव. 
खिद्राखान नावाचा सरदार होता.तो मोगलांशी लढताना मारला गेला (1702 )
त्यावरुन या गावाला खिद्रापूर हे नाव पडले...
या गावाचे मूळ नाव "कोप्पम" (कोपलेला )
असे होते पण नंतर ते मंदिराला देण्यातआले.आणि
"कोपेश्वर" ह्या नावाने हे महादेवाचे मंदिर ओळखले जाऊ लागले. 
     या मंदिराचं अगदीच वेगळेपण दाखवणारा फोटो बघण्यात आला आणि तेंव्हा पासूनच,  या मंदिराला प्रत्यक्ष भेट देणारच.हे मनात ठरवून टाकले होते मी...
त्या दृष्टिने माहिती मिळवली आणि समजले अरे हे तर आपल्याच महाराष्ट्रात आहे...कोल्हापूर पासून केवळ 60 कि.मी.अंतरावर...असे असूनही नावही ऐकण्यात आले नव्हते आत्तापर्यंत! 
   खिद्रापूर नाव या गावाचे...खरे म्हणजे, "कट्यार काळजात घुसली",या चित्रपटातील एका गाण्याचे चित्रीकरण या मंदिरात झाले आणि या मंदिराला प्रसिध्दी मिळण्याची दारं उघडली गेली...
   स्थापत्य कलेच्या अद्भुत आणि अप्रतीम नमुना! सौंदर्याने नटलेलं हे मंदिर डोळ्यात किती साठवून ठेवू?अशी अवस्था होती मनाची...
भव्यदिव्य आणि आपली वेगळी वैविध्यपूर्ण वैशिष्ट्ये जपणारं हे मंदिर प्रत्येक भारतीयाने आपल्या आयुष्यात एकदा तरी पहावेच असे आहे. 
    यातील प्रमुख वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे सांगता येतील.
     इसवीसनाच्या सातव्या शतकात मंदिर उभारणीला सुरुवात केली गेली होती. चालूक्य राजांनी केलेली ही सुरवात नंतर पुलकेशी  शीलाहार राजांनीही चालूच ठेवली. मंदिर बांधणीला पाचशे वर्षे खर्ची झाली आणि कारागीरांच्या सात पिढ्या या बांधणीसाठी झिजल्या!असे सांगितले जाते. एकूण 126 खांबांनी हे मंदिर पेललंयं...
स्वर्ग मंडपाला 48 खांब,आणि सभामंडप 26 खांबांवर ऊभा आहे..
दक्षिण दिशेला महादेवाची पिंड असणारं हे बहूतेक एकमेव मंदिर असावं. सामान्यपणे महादेवाच्या पिंडीसमोर नेहमीच नंदीची मूर्ती असते कारण नंदी हे महादेवांचे वाहन आहे. येथे आपल्याला नंदीच दिसत नाही...किंबहूणा तो येथे नाहीच.हाच नंदी 
कोपेश्वराच्या दिशेने तोंड करुन कर्नाटकात,हासन तालूक्यात "येडूर", या गावी आहे.तेथे केवळ नंदीचेच मंदिर बांधले आहे अशी माहिती मिळाली. 
      यामागची गाईड कडून सांगण्यात आलेल्या अख्यायिकेचे 
शब्दांकन थोडक्यात असे, 
   महादेवांची पहिली पत्नी, सती,दक्ष राजाने पुत्रकामेष्टी यज्ञ केला तरीही आपली मुलगी सती हिला आमंत्रण केले नाही.असे असतानाही
शंकराजवळ हट्ट करुन सती 
नंदीवरती स्वार होत ती यज्ञासाठी गेली होती. 
पण तेथे सतीचा अपमान झाला.तो अपमान सहन न झाल्याने तिने स्वतःला
यज्ञात झोकून देत आहूती दिली...
तेंव्हापासून ",सती जाण्याची" प्रथा पडली 
असे मानले जाते...
     शंकराला सतीच्या आहूतीची ही बातमी समजताच ते अतिशय कोपले. अती रागाने आपल्या जटा ते जमीनीवर आपटून आपटून आपला क्रोध व्यक्त करु लागले. म्हणूनच या मंदिराला "कोपेश्वर",
महादेव मंदिर असे नाव पडले...
क्रोधयुक्त महादेवांना शांत करण्यासाठी साक्षात विष्णू भगवान
तेथे अवतीर्ण झाले. महादेवांना थोपटत थोपटत विष्णूंनी त्यांना शांत केले... म्हणून शेजारीच असणाऱ्या विष्णूंच्या पिंडीला "थोपेश्वर",असे संबोधन मिळाले. 
कालांतराने त्याचा अपभ्रंश करत त्याला लोकांनी "धोपेश्वर", असे नामाभिधान केले...
    पण सतीची वाट बघत नंदी आजही खिद्रापूर च्या दिशेने तोंड करुन उभा आहे.
    सामान्यपणे शिव आणि विष्णू यांची स्वतंत्र पण एकत्रित प्रतिष्ठापना कुठेच दिसत नाही. आपण "हरिहराची"
म्हणजे शिवतत्व व विष्णूतत्व यांची एकत्र मुर्ति बर्‍याच ठिकाणी बघतो.पण पिंडीच्या रुपात ही दोन्ही तत्वे अगदी शेजारी शेजारी ऊभी दिसतात ती याच 
खिद्रापूर येथील कोपेश्वराच्या मंदिरात!
     या मंदिराच्या स्वर्गमंडपाचे छत हे पूर्णपणे उघडे म्हणजेच याचे गोलाकार अंबर हेच याचे छत होय!
हे फार महत्वाचे आणि सुंदर असे या मंदिराचे वेगळेपण आपल्या मनाला भुरळ पाडते...त्रिपूरी पौर्णिमेला या मंडपाच्या बरोबर मध्यावर संपूर्ण चंद्र येतो, त्यावेळी दिसणारा नजारा केवळ अवर्णनीयच असणार यात शंकाच नाही...
     त्याच प्रमाणे दरवर्षी पाच मे, या दिवशी गर्भगृहातील दोन्ही पिंडींवर रवीकिरणांचा अभिषेक होतो...तोही नजारा काय अप्रतिम दिसत असेल!
     मुखमंडप,सभापंडप,
(स्वर्गमंडप),आणि गर्भगृह अशा रचनेतून तयार असणारे हे पाषाण देवालय प्रत्येक मंडपाचे वेगळेपण राखून आहे. 
मुखमंडपात प्रवेशद्वारावर गणेश विराजमान आहेत. 
सभा किंवा स्वर्गमंडपात 
प्रवेशद्वारावर सरस्वती देवी विराजमान आहेत. 
आणि गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर विष्णूपत्नी 
लक्ष्मी विष्णूंच्या मांडीवर विराजमान आहेत.हे दुर्मिळ शिल्प येथे बघावयास मिळते. 
यातून देवांच्या आशिर्वादाने अगोदर सरस्वती पुजन करुन विद्या प्राप्त करावी...विद्याप्राप्त झाली की, आपोआप लक्ष्मीची प्राप्ती होते.हाच संदेश यातून दिला गेलाय असे वाटते...
  या शिल्पातून काही बोधकथा,दंतकथा कथन केलेल्या आहेत. रामायणातील श्रीराम आणि हनुमंत यांची पहिली भेट झाल्याचा प्रसंग कोरलेला आहे...
 इंटरलॉक पध्दतीने शिल्पांची मांडणी केलेली भव्यदिव्य शिल्पे 
आपण बघतच रहातो. कोरीवकाम तर अत्यंत सुंदर!कोरलेला रुद्राक्ष अगदी खरा वाटावा असाच. तसेच साप,आपण शिल्परुपात बघतोय हे खरे वाटतच नाही!
     नृत्याविष्कारातील गणेशमूर्ती शिल्प येथेच बघितले. तर आसनस्थ विष्णूंचे शिल्प पहिल्यांदाच येथे बघण्यात आले...ही आणिक अजून कितीतरी वैविध्यपूर्णता आणि वैशिष्ट्य आपल्याला येथे दिसतील...ती प्रत्यक्षात तेथे जावून बघण्यातच मजा आहे. प्रशिक्षित गाईड घेवून यातील बारकावे समजून घ्यावित...आपण अक्षरशः अचंबित होऊन जातो...आज सातव्या शतकात बांधलेले मंदिर ,बांधावयास पाचशे वर्षे लागली..म्हणजे त्या काळातही आपली संकृती,वास्तूकला,स्थापत्यशास्त्र, शिल्पकला,किती प्रगत होती!याचा विचार कल्पनातीच... धार्मिक अधिष्ठानावर या साऱ्या गोष्टींची मांडणी असेल तरीही ती कितीतरी शास्त्रीय आणि तर्कशुद्ध होती याची प्रचिती येत जाते आपल्याला...
आपण आज एकवीसाव्या शतकातही ज्ञानाने किती तोकडे आहोत...याची जाणीव होत जाते...म्हणूनच हे मंदिर निरिक्षण करताना अर्थातच प्रशिक्षित व्यक्तीमार्फत आपण कणाकणाने समृध्द होत आहोत असे वाटते...
धन्य ते राजघराणे, राजे, ज्यांनी शिल्पकारांना राजाश्रय देत अतुलनीय 
शिल्प कला जपून ठेवली...त्या शिल्पकारांना त्रिवार वंदन ज्यांच्यामूळे आज आपण हा अप्रतिम खजाना डोळ्यात साठवून ठेवू शकतो...
संधी मिळेल तेंव्हाच नव्हे तर  मुद्दामहून जावून यावे असे हे शिल्पसौंदर्य आपल्याच महाराष्ट्रात आहे याच अभिमान वाटतोय...

तेथे माहिती सांगणारे प्रशिक्षित गाईड या मंदिरावर चार पाच तास 
बोलू शकतात...पण आम्हाला दिड दोन तासच वेळ होता...ऐकता येईल तेवढी महत्वाचे मुद्दे आम्ही ऐकले...

गाईड साठी संपर्क 
मो. 7083221199

🌹🌹🌹🌹

रविवार, २ ऑगस्ट, २०२६

गीताचे रसग्रहण.

डाव मांडून भांडून
मोडू नको

आणले मी तुझे सर्व मी आणले
सर्व काही मनासारखे मांडले
तूच सारे तुझे दूर
ओढू नको

सोडले मी तुझ्या भोवती सर्व गे
चंद्रज्योती रसाचे
रुपेरी फुगे
फुंकणीने फुगा हाय
फोडू नको

गोकुळीचा सखा तूच केले मला
कौतुकाने मला हार
तू घातला
हार हासून घालून
तोडू नको

काढले मी तुझे नाव
तू देखिले
आणि माझे पुढे नाव
तू रेखिले
तूच वाचून लाजून खोडू नको

#आठवणीतील कविता#

    किती किती विनवणी आहे या शब्दांमध्ये!किती आर्जवं आहेत...एका पतीनं आपल्या संसार मोडावयास निघणाऱ्या पत्नीसाठी....
या गीतातील शब्दा शब्दांमधून या गीतातील नायकाचा (पतीचा)सच्चेपणा जाणवत जातो...
   
    दोघांनी मिळून आनंदानं थाटलेल्या संसारातून त्याची पत्नी,निघून जाण्याचं ठरवते....संसाराचा डाव मोडू बघते,त्या वेळी हा पती आपल्या पत्नीला त्या सुरुवातीच्या साऱ्या आनंदमय गोष्टींची मुद्दाम आठवण करुन देत असतो....

पती तिला एक एक आठवण सांगताना म्हणतो,संसारातली प्रत्येक वस्तू,तुझ्याच पसंतीनं मी आणलेल्या आहेत...त्या साऱ्यांना घेऊन आपण संसार मांडलाय आणि हे सारं तुझंच असताना तू दूर करु नकोस...

प्रिये,तुला मी सारी सुखं उपलब्ध करुन दिली आहेत...
ह्या सुखांना कवींनी दिवाळीत उडवल्या जाणाऱ्या चमकत्या फुग्यांची (झाड) उपमा दिली आहे....पण हे सारं तूच तुझ्या हातानं उध्वस्त करु नकोस...

आपण दोघांनी मिळून उभं केलेल्या गोकुळाचा
(संसार)सखा,सोबती तूच मला कौतुकानं बनवले आहेस,माझ्या गळ्यात वरमाला घालत तू माझी निवड कौतुकानं केली आहेस आणि आता तोच हार (संसार)सोडून तू अशी जाऊ नकोस...

आपल्या लग्नात मीच तुझे नाव देवापुढे लिहून तुला माझी अर्धांगिनी बनवले आहे...तू पण तुझ्या नावापुढे माझे नाव लावत, मला तुझा पती म्हणून स्विकारले आहेस,ते वाचताना तू लाजतही होतीस आणि तेच माझे नाव असे पुसून टाकून जाऊ नकोस....असा मांडलेला संसार भाझ्याशी भांडून तोडू नकोस....

गर्भितार्थानं किती आशयघन असं हे गाणं आहे... लहानपणापासून रेडिओ वर लागलेलं कानावर पडणारं हे गाणं मला त्यातील अर्थही कळत नव्हता पण तरीही आवडायचं...सूर, ताल,लय साऱ्याच बाबतीत सरस असणारं म्हणूनही असेल कदाचित...पण नंतर त्यातला अर्थ समजत गेला आणि हे तर तसं बघितलं तर,मनाला क्लेश करणारं गाणं आहे हे लक्षात आलं...
      या गाण्याचे गीतकार कवी ना.घ. देशपांडे....यांच्याच गावी,मेहकरला वास्तव्याचा योग आला आणि मग त्यांची रचलेली सारीच गाणी आवडू लागली....

नागोराव घनःश्याम देशपांडे.ना.घ.देशपांडे या नावानं मराठी माणसाला परिचित आहेत...
आपलं,एल.एल.बी.
करुन त्यांनी नंतर 'वकिली' व्यवसाय म्हणून स्विकारला...पण बी ए.चं शिक्षण चालू असताना त्यांनी,
"शिळ"ही त्यांची पहिली कविता लिहिली...त्यांच्याच वर्गमित्राने ती गायली आणि ती लोकांमध्ये अतिशय प्रसिध्द झाली...अगदी कविता वाचनाचे कार्यक्रम होऊ लागले...नंतर ती ध्वनिमुद्रित केली गेली आणि येथूनच मराठी मध्ये भावगीतांची परंपरा सुरू होत नावारुपाला आली....
या अर्थानं कवी ना.घ.देशपांडे भावगीतांचे जनक ठरले असे म्हणता येईल...

नंतरच्या काळात त्यांच्या हातून बरंच मोठं काव्यलेखन होत अनेक कविता संग्रह प्रकाशित झाले...ललित लेखनही झालं...
त्यांच्या खूणगाठ या काव्यसंग्रहास ')साहित्य अकादमी' पुरस्कार मिळाला....

साहित्यिक कारकिर्दी शिवाय त्यांनी ईतरही अनेक क्षेत्रात आपले महत्वाचे योगदान दिले आहे....
१९०९मध्ये जन्मलेल्या या कलासक्त व्यक्तिमत्वाचं २०००साली निधन झालं....पण त्यांच्या कवीता,गीतं,त्यांनी स्थापन केलेली शिक्षण संस्था वगैरे अनेक गोषटींमधून ते कायम आठवणीत राहिले आहेत...
अंतरीच्या गुढ गर्भि,
शीळ, मन पिसाट माझे अशी अनेक गाणी आजही प्रसिद्ध आहेत...
बाबुजींनी गायलेली ना घं ची गाणी तर अप्रतीमच!
त्यांपैकीच एक हे काव्य जे नंतर गाण्यात रुपांतरीत झालं....
डाव मांडून भांडून मोडू नको
डाव मोडू नको
डाव मोडू नको.

काव्य वाचा आणि गीतही ऐकाच...

©️नंदिनी म. देशपांडे.

🌹🌹🌹🌹🌹🌹

https://youtu.be/wgdacZ9fd98

रविवार, २१ जून, २०२६

बाबा.

बाबा.
माझा जन्मदाता तुम्ही
माझा पिता तुम्हीच 
तुम्हीच माझा पहिला 
सखा अन् मित्रही तुम्हीच 
ईवल्याशा पायांना दिलात
चालविताना आधार तुम्हीच 
माझ्या आयुष्याचा
आधारवडही तुम्हीच 
तुम्हीच माझी प्रेरणा, 
तुम्हीच माझा मार्गदर्शक 
तुम्ही कायमच हितचिंतक 
बाबा,
तुमच्या शिवाय 
नाही मनाला दिलासा 
आठवणींचे काहूर देते 
 समज मनाला आणि 
सांगत रहाते नेहमीच 
सोबतच आहात तुम्ही 
   बाबा,
आशिर्वादाच्या रुपाने 
प्रेरणेच्या रुपाने अन् 
संस्कारांच्या रुपाने 
तुमची ही सोबतही 
आहेच मोलाची फार 
आदर्शांवर चालताना 
आम्हाला दिलासा 
मिळतो छान....
पितृदिनी आज 
प्रकर्षाने आठवण आली 
अन् लेखणीतून भावनांना 
कागदावर उतरवत गेली...
🙏🏻🙏🏻
ॲड. नंदिनी देशपांडे. 
🌹🌹🌹🌹

रविवार, १४ जून, २०२६

हिल्स ऑफ कर्नाटका.

लेखिका--
ॲड.नंदिनी देशपांडे. 
---------------------------
कुर्ग 
    भारतातील कर्नाटक, राज्य हे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्टिने बऱ्याच वरच्या क्रमांकावर आहे. आपण पर्यटन म्हणून भ्रमंती करावयाची ठरवली तर, ते टप्प्याटप्प्यानेच केले जाते. 
      विजापूर चा गोलघुमट फार पूर्विचबघितलेला...
पण हम्पी बदामी,
आयहोळे पडट्कल,येथील ऐतिहासिक ठेवा बघण्याची सुप्त ईच्छा दोन वर्षांपूर्वीच पूर्ण झाली आणि ईतिहासाच्या असंख्य खूणा डोळ्यात आणि त्यानंतर शब्दरुपाने साठवून ठेवल्या...कधीही आठवण झाली की,वाचनानंदातून पुनःश्च 
प्रत्यय घेण्यासाठी.असो 
      हा उन्हाळा आपल्या महाराष्ट्रात खूपच कहर करुन जातोय.
कोस्टल कर्नाटकाचे सौंदर्य तर अवर्णनीयच!स्वच्छ खळाळत्या बीचेसवर आणि धार्मिक अधिष्ठानाच्या बैठकीवर पेललेला हा प्रदेश कोणत्याही माणसाच्या मनाला भुरळ पाडेल असाच आहे. 
    आपल्या महाराष्ट्रात या वर्षी ऊन्हाने कहर केलाय. तेवढेच एखादा आठवडा थोडं थंड भागात वास्तव्यास जाण्याचे मनात घोळत असतानाच, पर्वतीय कर्नाटक कुर्ग भागात जाण्याचे आम्ही ठरवले. आणि भर मे मध्ये 
कुर्ग प्रांताचा तेथील निसर्गाचा आणि तेथील
प्राचीन मंदिरांच्या शिल्पकलेचा मनभरुन आस्वाद घेतला. जमतील तेवढे हे शिल्पसौंदर्य डोळ्यात आणि कॅमेरात साठवून घेतले...
सुरुवातीलाच जाताजाता मैसूरचा सुप्रसिद्ध राजवाडा बघितला...
त्यातील भव्यदिव्य अशी दालनं,त्यातील पुरातन वस्तू, उंची वस्त्र, आणि या 
राजवाड्याचं सौंदर्यपूर्ण वास्तूकलेचं अप्रतिम उदाहरण बघून अक्षरशः डोळ्यांचं पारणं फिटतं आपल्या.
 या राजमहालाचं अंतर्गत सौंदर्य जेवढं अप्रतिम होतं तेवढंच त्याच्या बाहेरचा विशाल असा परिसर विविध पानंफुलझाडं, हिरवळ आणि स्वच्छतेनं चमचमत होतं..
      मैसूरहून कुर्गच्या मडीकेरीचा प्रवास सुखद झाला. जंगल परिसरात आपण लवकरच पोहोंचणार याचे संकेत रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या मोठे मोठे वृक्ष देत होते...
आम्ही उतरलेलं "होमस्टे" चा 'फील' येणारं रिसॉर्ट अगदी छानच होतं...
नाश्ता,जेवण चवदार, चविष्ट आणि अगदी गरमागरम असायचा. शिवाय टेबलवर सर्व्ह करण्याच्या पध्दतीमूळे ऐतं मिळाल्याच्या आनंदात दोन घास जास्तच जेवण जायचं. 
पण निसर्गाच्या सान्निध्यात असणारं आणि निसर्गाशी अगदी जवळून संवाद साधता येणारं हे रिसॉर्ट मनाला भावलं खूप...
विस्तीर्ण परिसरात भरपूर भटकंती साधत वेगवेगळी मसाल्यांची झाडं आणि कॉफीच्या बागा यथेच्छ न्याहाळता आला. 
   कुर्ग हा कर्नाटकातील डोंगराळ भागातील एक स्वतंत्र विभाग आहे. जो काही जिल्ह्यांचा आहे. या प्रांतातील घरांची रचना बघून थोडी सिमल्याची आठवण झाली. वेगवेगळ्या उंचीवर वसलेली घरं रात्रीच्या अंधारात लाईटच्या प्रकाशात डोळ्यांना लुभावत होते. 
एकूणच मेडीकेरीहून आमचा लवकर पाय निघत नव्हता हे ही तेवढेच खरे...
     मेडीकेरी येथून हसन साठी निघालो आम्ही आणि रस्त्यात असणार्या
कुशल नगर येथील भारतातील सर्वात मोठ्या असणार्या मॉनेस्ट्री पैकी दुसर्‍या क्रमांकाची तिबेटियन मॉनेस्ट्री 
बघितली...अरुणाचल प्रदेश आणि भुतानमधील बघितलेल्या मॉनेस्ट्रीजचे चित्र डोळ्यांत पक्के होऊन बसलेले त्या मानाने आपल्या भारतातील ही मॉनेस्ट्रीचा परिसर भरपूर गर्दीने व्यापलेला जाणवला...
     हसन हे कर्नाटकातील एक जिल्ह्याचे ठिकाण.हा कुर्ग विभागातच आहे. 
होयसाळा व्हिलेज रिसॉर्ट मध्ये मुक्काम करत आम्ही 
पहिल्या दिवशी उंचावर असणाऱ्या एका डोंगरमाथ्यावर कावेरी नदीचे उगमस्थान बघितले. 
त्या दिवशी वातावरण फारच अल्हाददायक होते. उंचावर असल्यामूळे ट्रेकिंग झाले. त्यात दाट धूके आणि दवाचा हलकासा शिडकावा भर उन्हाळ्यात अंगात शिरशिरी आणत होता...निसर्ग अतिशय सौंदर्यपूर्ण भासत होता...या रमणीय वातावरणातून बाहेर पडूच नये असेच कोणालाही वाटणे अगदीच सहाजिकच होते....असो. 
तेथून खाली उतरत गेलो की खाली एक प्राचीन ओंकारेश्वर मंदिरात दर्शन घेतले.मंदिर जरी शिवाचे आहे तरी त्याचा वरचा आणि कळसाचा भाग हिंदू मंदिरांसारखं नसून गोलघुमटासारखी रचना आहे. ईस्लामिक शक्तींचा प्रकोप मंदिरावर होऊ नये म्हणूनच त्या वेळी ही रचना जाणीवपूर्वक केलेली असावी असा एक मतप्रवाह आहे...
    जवळच कावेरी नदी, कन्निका नदी आणि सुज्योती नदी या तिघींचा संगम होतो ते ठिकाण बघितले...भरपूर पण संथ वाहात अंसणारे थंडगार पाणी स्पर्शून मन उल्हासित झालं..डोळ्यांना सुखावह थंडावा मिळाला.
खरं म्हणजे, उन्हाच्या काहिलीतून चार आठ दिवस थंड निसर्गाच्या सान्निध्यात जीवाला आराम मिळावा यासाठी या सहलीचे आयोजन केले आम्ही पण मला ऐकून वाचून माहिती मिळालेले हळेबिडू आणि बेलूर येथील अप्रतिम शिल्पकलेने समृध्द अशी दोन मंदिरं प्रत्यक्ष बघण्याचा योगही याच सहलीने आणला. आणि डोळ्यांचे पारणे फिटले. ही 
मंदिरं आम्ही भर दुपारी उन्हात निरखली,या विशाल परिसरात संपूर्ण पाषाणाची मंदिरं ,नव्हे खालची जमीनही पाषाणच.पण त्या शिल्पांना बघून उन्हाचे बसलेले चटके जाणवलेही नाहीत!

     हळेबिडू 

    हळेबिडू ,म्हणजे, तूटफूट केलेले.अल्लाउद्दीन खिलजीच्या सरदाराने दोन वेळेला चाल करत या मंदिराची शिल्प बरीच तोडून फोडून विध्वंस केला म्हणून या मंदिराला "हळेबिडू",(विध्वंस झालेले गाव)असे नाव पडले. 
   होयसाळा राज्याची बाराव्या शतकातली हे राजधानीचे ठिकाण. होयसाळा शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असणारे आणि ऐतिहासिक स्तरावर जागतिक पातळीवर प्रसिद्ध पावलेली ही मंदिरं. 
ही दोन्ही शिवाला समर्पित 
 आहेत.एक होयसाळेश्वर आणि दुसरे केदारेश्वर. 
 हे मंदिर बांधण्यासाठी शंभरहून अधिक वर्षे लागली. अकराव्या शतकात चालू झालेले बांधकाम बाराव्या शतकात पूर्ण बांधून झाले. पण पूर्ण झाले असे म्हणता येत नाही कारण दोनही मंदिरांवर कळस नाही. कदाचित मुघलांच्या आक्रमणापासून वाचवण्यासाठीही ही योजना असावी असे वाटते. 
   मंदिराच्या बाह्य भागावर पुराणातील, रामायण महाभारतातील अनेक प्रसंग कोरुन ठेवलेले आहेत.या शिल्पकलेला तोडच नाही!शिल्पकाराच्या पाच पिढ्या हे बनवण्यात खर्ची पडल्या असे सांगितले जाते. 
   नृत्यांगनांचे कौशल्य दाखवणार्‍या निरनिराळ्या मुद्रा, असंख्य देवता,सैन्यदळ,हत्तींचे वैविध्यपूर्ण भावछटा ई.अनेक अनेक ऐतिहासिक नोंदी आपल्याला दिसून येतात या ठिकाणी!ही मंदिरं आहेत तेथे जागेवरच कोरली गेली आहेत. गुरुत्वाकर्षणाचा नियम बाजूला सारुन आपली खालून वर निमुळती होत जाणारी अफाट उंचीचा दीपस्तंभ हे एक येथे एक आश्चर्यकारक उदाहरण आपल्याला थक्क करते. अक्षरशः हा स्तंभ खालून जमिनीला टेकलेला नाही..
            
 बेलूर.

        बेलूर ही पण अकराव्या शतकात होयसाळा राज्याची राजधानी होती. हे मंदिर विष्णूवर्धन नावाच्या मूळचा जैन धर्मिय असणाऱ्या पण कालांतराने विष्णूभक्त झालेल्या राजाने वेगवेगळ्या ठिकाणांहून शिल्पकारांना आमंत्रित करुन निर्माण केलेले विष्णूचे मंदिर आहे. 
 याचे वेगळेपण म्हणजे, शिल्पकारांनी मंदिराचे निरनिराळे भाग आपल्या गावी बनवले आणि ते येथे येवून व्यवस्थित इंटरलॉक पध्दतीने बांधणी करत बसवलेले आहेत!शिल्पकलेचे आणि शिल्पकारांचे करावे तेवढे कौतूक कमीच आहे. शिवाय त्यावर चित्रकार जशी चित्राच्या खाली आपली सही करतो तश्या सह्या कोरुन ठेवलेल्या दिसतात. 
     हे मंदिर युनेस्कोच्या जागतिक ऐतिहासिक ठेव्यात स्थान मिळवून बसले आहे. 
     आंतर्बाह्य छतापासून पायापर्यंत अप्रतिम नमुने येथे बघावयास मिळतात. यातून आपली प्राचीन संस्कृती, समाजिक, आर्थिक, राजकीय ऐतिहासिक माहितीचे हे अक्षरशः भांडार आहे. 
आखीव रेखीव,नजाकतीने परिपूर्ण आणि मानवी भावभावनांच्या सुंदर अविष्काराने नटलेले शिल्पसौंदर्य शब्दात वर्णन केवळ अशक्यच!
     हे मंदिर अनेक कोनांच्या चांदणीकृत उंच पायावर ऊभे आहे. 
     हल्ली येत असणाऱ्या आणि पाश्चिमात्यांच्या नावावर खपवली जात असणारे कितीतरी वेशभुषेचे प्रकार, उदा. 
वनपीस, मीडी, नाईट गाऊन, स्विमिंग सूट, शर्टपॅन्ट, वगैरे वगैरे. त्याच प्रमाणे निरनिराळी केशरचना किंबहूणा स्रीयांचे त्यावेळीही युध्दकार्यात भाग घेतल्याचा इतिहास, त्या काळचे घोडदळ, पायदळ या साऱ्या साऱ्या गोष्टींची ऐतिहासिक नोंद येथे बघावयास मिळते. 
प्रत्यक्ष तेथे जावून भेट देवून आणि गाईड च्या सहाय्याने वेळ काढून बघावे असेच हे सौंदर्य कितीही वेळेला बघितले तरीही समाधान होणार नाही असेच आहे!
आवश्य मुद्दामहून बघावा असा हा ठेवा खूपच किंमती आणि मौल्यवान आहे आणि तो आपल्या देशात आहे हे बघून एक भारतीय म्हणून आपली मान अभिमानाने उंचावते नक्कीच. 
🌹🌹🌹🌹

रविवार, १२ एप्रिल, २०२६

आशाताई भोसले...

आशा भोसले,
या भारतमातेच्या उदरी जन्म घेतलेलं एक अलौकिक सुरांचं व्यक्तिमत्व!
     विविध भाषांतून तब्बल 12000 च्या वर गाणी गायलेली!
    मराठी भाषेविषयीच बोलायचं झालं तर, बालगीतं, भावगीतं, भक्तीगीतं, लावण्या,लोकगीतं, चित्रपट गीतं आणि नाट्यगीतं सुध्दा!
       सुरांच्या विश्वातलं अष्टपैलू व्यक्तिमत्व!
त्यांच्या आवाजाला-सुराला
चौफेर वक्राकार फिरवण्याची कला त्यांना देवानं जन्मतःच बहाल केलेलं एक लेणंच...
आवाजातील नजाकत भावनांचे अविष्कार आणि स्पष्ट शब्दोच्चार सारंच आचंबित करणारं...
   आशाताईंचं साधं बोलंणं सुध्दा किती गोड!ऐकतच रहावं असं वाटणारं...
त्यांना प्रत्यक्ष ऐकण्याचा योग आला नाही पण विविध माध्यमांतून त्यांना ऐकणं ही सुध्दा एक सुंदर सुरीली पर्वणीच असते हे निश्चित...
    लता/आशा या बहिणींच्या काळात आपला जन्म झाला आणि 
अगदी बालवयापासून आपण यांना ऐकतोय, ऐकत आलोय हे खरोखरंच आपलं परम भाग्यच!
त्यांच्यातील विनम्रता, साधेपणा आभासी पध्दतीने का होईना पण अनुभवलाय आपण...
खरंच, स्वतःच्या संघर्षमय आयुष्यातून आपली वाट धुंडाळत आपलं असं खास 
अढळ स्थान निर्माण करणं,ते ही त्या वेळच्या परिस्थितीत...
हे सारं विलक्षणच!

*मी मज हरपून बसले गं 
*केंव्हा तरी पहाटे 
*चांदण्यात फिरताना 
*जीवलगा राहिले रे दूर 
*कानडाऊ विठ्ठलू 
*परवशता पाश दैवे ज्यांच्या
*शुरा मी वंदिले 
*युवतीमना 
*कठिण कठिण 
*उषःकाल होताहोता 

ही आणिक आणखी कितीतरी आवडीची गाणी !
अशा सर्वस्पर्शी भावनांच्या आवेगात गाणारा सुरीला गळा आज लौकिक अर्थाने लुप्त झाला असेल तरीही, त्यांनी त्यांच्या आयुष्यभराची आपल्या गोड, जादुई स्वरांची, सुरांची पुंजी आपल्यासाठी 
ठेवली आहे...आपले सर्वांचे सांस्कृतिक विश्व,आपली श्रवण क्षमता समृध्द करुन ठेवली आहे...
आशाताईंना मनःपुर्वक शतशत धन्यवाद तर आहेतच.🙏🏻🙏🏻
त्यांचा हा सुरेल ठेवा कायमच आमच्या मनाचा 
ठाव घेत रहाणार आहे...
आणि म्हणूनच आशाताई, तुम्ही आहात तुमच्या आवाजातून आम्हा सर्व रसिक श्रोत्यां सोबत...

तुम्हाला त्रीवार विनम्र अभिवादन 🙏🏻🙏🏻🙏🏻
भावपूर्ण श्रध्दांजली 🙏🏻

नंदिनी देशपांडे. 
🌹🌹






मंगळवार, ४ नोव्हेंबर, २०२५

दिवाळी.

आली बघा आली दिवाळी आली

चांदण सडा शिंपत शिंपत
बांधूनि तोरंणं दारोदारी

      आली बघा आली दिवाळी आली

आईची माया बाबांची छाया
उधाण भावा बहिणींच्या प्रेमा
हृदयस्थ नात्यांच्या पखरणीला

आली बघा आली दिवाळी आली

दिवाळी मनसुब्यांची परिपुर्ति*
मिष्टान्न फराळाची आरास पात्री
मंगल दिव्यांची ही मांदियाळी

आली बघा आली दिवाळी आली

घेवूनि सौख्य समृध्दीच्या राशी
अंगणी रंगावली या खाशी
उजळूनि टाकण्या आसमंती

आली बघा आली दिवाळी आली

आनंदाने करा दिवाळी साजरी
शुभेच्छा आपणांस त्यासाठी भारी
आयुर् आरोग्य ज्ञानदिप हाती

आली बघा आली दिवाळी आली
दिवाळी आली.

*नंदिनी म. देशपांडे*

🙏🏻😊

💥💥💥💥💥💥

सोमवार, ६ ऑक्टोबर, २०२५

हौसेला मोल नसते?

हौसेला खरंच मोल नसते?
**********************

लेखिका --- 
ॲड.नंदिनी म.देशपांडे. 
९४२२४१६९९५..
छ.संभाजीनगर. 


     "हौसेला मोल नसते", असे आपण पूर्विपासून ऐकत आलो आहोत...काही अंशी ते 
बरोबर असतेही...
     हौस म्हणजे आवड, आपल्या दैनंदिन आयुष्यात प्रत्येक जण आपल्या मनात असणाऱ्या आवडी निवडी वेळ मिळेल तश्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. 
     काही आवडी पूर्ण करण्यासाठी पैसा आवश्यक असतो...
       पण तरीही आपल्या ऐपतीनुसार आपण प्राधान्यक्रम ठरवत त्या जास्तीत जास्त पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतोच ना...
       मनात कायमचे घर करुन बसलेल्या आवडींचे रुपांतर हौसेमध्ये केंव्हा होऊन बसते हे 
आपल्यालाही कळत नाही...
याच हौसेचा पाठलाग करत आपण ती पूर्ण करण्यासाठी मिळणाऱ्या संधीची वाट बघत रहातो...कधी कधी अख्खे आयुष्यही खर्ची होत जाते या साठी...
       पण हल्ली पैसा मिळवण्याचा मुख्य उद्देश हा आपल्या असणाऱ्या हौसे मौजेसाठीच आहे आणि तो 
माझ्या कमाईचा आहे, मग मी तो माझ्या "ऐंजॉयमेंट"साठी खर्च करणार ही भावना वाढीस लागलेली दिसते...
     मान्य आहे हा विचार पूर्णपणे अयोग्य आहे असे अजिबात नाहीच..पण जीवन जगत असताना आपला सभोवताल, आपली माणसं, आपलं कुटुंब यांचा विचार करणंही अपरिहार्य असते. 
आज आपल्या हाती महिन्याच्या शेवटी पैशाचा मोठ्ठा आकडा येत आहे हे दिसत असेल तरीही त्या आकड्याची किंमत दिवसेंदिवस कमी होत चालली आहे हे विसरुन चालणार नाही...त्यामूळे आपली हौसमौज, आपला पैसा आणि आपला प्राधान्यक्रम यांचा ताळमेळ साधता येणं फार गरजेचं असतं...
 "यालाच आपण अंथरुण बघून पाय पसरणे",म्हणतो. 
       उदाहरणच द्यावयाचे झाले तर,आजच्या काळात विवाह विधी हा केवळ सोहळा न रहाता एक अफाट खर्चिक असा "इव्हेंट" झालेला आहे...
हौसेखातर आपण यावर कितीतरी मोठी रक्कम खर्च करत जातो...हे खरंच एवढे गरजेचे आहे का?आपले बजेट
त्यामूळे कोलमडणार तर नाही ना?किंवा इतरांनी असे केले तर आपणही असेच केले पाहिजे, अशी तुलना किंवा स्पर्धा करणं आवश्यक आहे का?या आणि इतर अनेक गोष्टींवर विचार करणं नितांत गरजेचं आहे असे वाटते. 
      आज विवाह,त्यातील विधींपेक्षा भव्यदिव्यपणा, दिखाऊपणा, त्यातील मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे अतीरेकी प्रदर्शन आणि इतर तांत्रिक गोष्टींवर अवाढव्य खर्च,यांवर एवढेच नव्हे तर 
जेवणाच्या पदार्थांतील वाया जाण्या इतपत असणारी विविधता यांच्या निकषावर
होताना दिसतात. या बाबी किती तरी महागड्या आहेत याची कल्पनाही अंगावर शहारे आणते हे वास्तव सत्य आहे...पण तरीही आपण या सर्व गोष्टी करण्यासाठी बळी पडतोच आहोत!
      आपल्याजवळ पैसा आहे म्हणून?की आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करावयाचे म्हणून?याचाही विचार केला गेला पाहिजे...
      लग्नाचा इव्हेंट पार पाडण्यासाठी हल्ली बर्‍याच साधनांची आवशयकता असते.ही एक चैन आहे आणि कितीतरी लाखांची उलाढाल यातून होत जाते...या प्रत्येक उद्योगांची साखळी ही परस्परांवर अवलंबून असते...प्रत्येकाला एका इव्हेंट मधून मोठा बिझनेस मिळतो...त्यांचे फावत जाते पण ग्राहकाचे खिसे रिकामे होत जातात त्याचे काय?
आयुष्यभर खस्ता खाऊन जमवलेली पै पै दोन दिवसांच्या एका इव्हेंट मध्ये रिकामी होऊच शकते...
"ॠण काढून सण साजरा करण्याची" आपली परंपरा नव्हे....
       आपल्याला मार्केट मिळावे म्हणून हे उद्योजक अनेक राज्यांतून परंपरा "उसन्या", आणत आपल्या महाराष्ट्रीयन विवाह परंपरेत घुसवत आहेत...त्यात त्यांचे फावते पण ग्राहकाच्या तोंडाला फेस येवू शकतो...
    तसे बघितले तर, केवळ देवाब्राम्हणाच्या, अग्नीच्या आणि काही थोडक्या लोकांच्या साक्षीने पूर्ण करावा असा अगदी साधा असणारा आपला महाराष्ट्रीयन विवाह विधी आहे...
      कायद्याच्या चौकटीत नोंदणी पध्दतीने करावयाचा असेल तर तो आणखीनच सोपा आहे...नवरा-नवरीने स्वखुषीने दोन्ही बाजूंच्या दोन दोन साक्षीदारांसमोर विवाहासाठी असणाऱ्यां नोंदणीपत्रावर सह्या करुन आमचे परस्परांशी लग्न झाले आहे, आम्ही आजपासून नवरा बायकोच्या नात्यात बांधले गेलो आहोत,हे मान्य करणे होय....
      एवढे सगळे साधे सोपे असताना यातील साधेपणा केंव्हाच लोप पावला आणि विधींनी सोहळ्याचे रुप घेतले...सोहळा एक वेळ ह्रद्य होऊ शकतो...त्याला भावनेच्या ओलाव्याचा गंध असतो...म्हणून सोहळा होणेही  असंयुक्तिक नाही,असे आपण म्हणूया, पण "इव्हेंट" मध्ये रुपांतर खरंच तोंडचे पाणी पळवणारे आहे...
शिवाय इव्हेंट मध्ये भावनांपेक्षा दिखावा, देखावा, कृत्रिमपणा आणि तंत्रज्ञान याच गोष्टींचे पारडे जड असते..
      मला वाटतं या साऱ्या गोष्टींचे प्रत्येक आईवडिलांनी, लग्नाळू मुलामुलींनी खूप सखोल परीक्षण करावे...
 आपल्याजवळ भरभक्कम पैसा असेल तरीही हा नाहक खर्च कसा टाळता येईल याचा विचार करावा...
      आपल्याजवळ असणारा पैसा इतर अनेक जीवनोपयोगी बाबींवर, सामाजिक बांधिलकी जाणत त्यावर काही प्रमाणात खर्च करावा. उद्या वाढत्या संसारातील वाढत्या खर्चासाठी, तसेच गरज पडल्यास आपल्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी तरतूद म्हणून गुंतवणूक करावा.....
     आपल्या हक्काचे घर घेणं ही गरजही आपल्या मनातील हौस असू शकते...त्यासाठीही भरपूर रक्कम हाताशी असावी लागते...
     थोडक्यात सांगण्याचा मुद्दा हा आहे की, आयुष्यातील एकाच" इव्हेंट " वर भारंभार पैसा खर्च करण्या ऐवजी, दूरदृष्टिने विचार करत त्या पैशाची सुयोग्य गुंतवणूक करावी आणि आपल्या आयुष्यातील आनंद कायम टिकवण्यासाठी असणाऱ्या पैशांचा योग्य विनियोग करत 
सुखाने जगावे...
हौसेला मोल नसते हे जरी खरे असले तरीही,हौसेसाठी आपण किती रकमेचा विनियोग करावा?याचे सूत्र मनात तयार करावे...म्हणूनच हौसेला मोल असते...
असावयास हवे असे माझे मत आहे...
आर्थिक विनीयोगाचे सूत्र मनात तयार असले तर, यामूळे 
आपल्या जीवनातील आनंदाचे गणित जुळवण्यास नक्कीच मदत होईल यात शंकाच नाही...

🌹🌹🌹🌹🌹