सोमवार, २२ जानेवारी, २०२४

॥जय श्रीराम॥

हारफुलांचा साज ल्याला 
झोकात डोलल्या तोरणे पताका ।

रंगावलीने भुमी भारली 
दिपोत्सवाने रंगत आली ।

श्रीरामांचा ध्वज फडकला 
राम आगमनाचा सोहळा सजला ।

श्रीराम जयराम जयजयराम 
जल्लोष अवघ्या मातृभुमीचा जाहला ।

चराचरात गर्जे रामनामाचा गजर 
हर्ष दाटला मनोमन ।

आज विराजमान आमचे राघव 
आयोध्येत त्यांचे भव्यदिव्य स्वागत ।

याची देही याची डोळा 
सोहळा आम्ही श्रीराम आगमनाचा पाहिला ।

कणाकणास श्रीरामांचा ध्यास लागला 
त्यांंच्या चरणी अवघा भक्तीभाव 
लीन जाहला।

©️ॲड.नंदिनी म. देशपांडे.
जाने.२२,२०२४.
🌹🌹🌹🌹🌹🌹

आयहोळे, पट्डकल आणि बदामी...

आयहोळे आणि पडट्कल तसेच बदामीही....
-------------------------

         हम्पी वरुन बदामीला जाण्यासाठी केवळ अडीच तास लागतात पण रस्त्यात आयहोळे आणि पडट्कल ह्या ठिकाणचे मंदिर समुह बघण्यात आपण एवढे रमून जातो की सुर्यास्त केंव्हा झाला हे समजतही नाही.....
      पण हम्पी पेक्षाही पुरातन मंदिरं आहेत ही...कदाचित इ.स.च्या पाचव्या सहाव्या शतकातील!
       त्या वेळचे हिंदू राजे हे कलेचे भोक्ते होते...कलाकारांना राजाश्रय मिळत असे...हे राजे, देशातील कानाकोपर्‍यातून वेगवेगळ्या प्रांतांच्या शिल्पकारांना आमंत्रित करत असत आणि आपली शिल्पकला सादर करण्यासाठी अशी छोटी मोठी मंदिरं बांधण्यास प्रोत्साहन देत असत....
        आयहोळे आणि पडट्कल येथील मंदिर समुह याच काळातील आहेत...
         काही दाक्षिणात्य शैलीत, काही उत्तरेकडील शैलीत बांधलेली तर काही दोन्ही शैलींची सरमिसळ करत बांधलेली....
जैन आणि बौध्द शैलीही डोकावते काही मंदिरांतून....
        प्राथमिक अवस्थेतील या शिल्पांच्या दोषांचे निर्मुलन करत मग सुधारित शिल्पकलेतून साकारली गेली आहेत ती हम्पी येथील मंदिर समुह!
      थोडक्यात शिल्पकारांची वार्षिक परिक्षा म्हणजे हम्पीतील मंदिरं असे म्हणावयास हरकत नाही....

        आयहोळे आणि पडट्कल येथील शिल्पांचे सौंदर्य सुध्दा गाईड शिवाय समजणे अशक्यच....गाईड फार गरजेचा आहेच...

      आयहोळेतील सारीच मंदिरे छानच आहेत, बरीच भग्न होण्याच्या स्थितीत आहेत...

     सर्वांत सुंदर मंदिर म्हणजे "दुर्गा मंदिर".... या मंदिराची जडण घडण बघून आपल्याला जुन्या संसदभवनाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही..
 किंबहूना संसदभवन
या मंदिराशी साम्य सांगते....
   अतिशय वैशिष्ट्यपूर्ण रचनेतून साकारलेले हे मंदिर सुंदर, नीटनेटके आकर्षक तर आहेच पण या मंदिराचा मागचा भाग हा ऊभ्या असणाऱ्या हत्तीच्या मागच्या पाठीच्या आकारात आहे...वरकरणी हे मंदिर महादेवाच्यापिंडीच्या आकाराचे आहे....
       असंख्य खांबांवर पेललेली ही वास्तू फारच मोहक आहे....
मल्लप्रभा नदीच्या किनाऱ्यावर असणारी ही सारी मंदिरं प्राचीन वास्तुशास्त्राचा अप्रतिम ठेवा आहे...

         सामान्यपणे सुर्यमंदिरात कधीच मुर्ति दिसत नाही...पण येथे भारतातील सुर्याची मुर्ती असणारे एकमेव मंदिर असल्याचा दावा केला जातो...

         यांपैकी काही मंदिरात मुर्ति नाहीत....काही मंदिरं अर्धवट अवस्थेत बनवलेली आहेत अर्थात मी पूर्विच उल्लेख केलाय की हा शिल्पकरांचा प्रायोगिक प्रयत्न आहे....पण काही फारच अप्रतिम आहेत!
        मंदिराच्या खांबांवर, छतावर, भिंतीवर, चौकटींवर आणि बाहेरील भिंतीवर सुध्दा फार सुंदर कोरीव काम केलेले आहे....
       त्या काळी राजांची संपन्नता त्यांच्या राज्यात असणारी मंदिरं आणि शिल्पकला बघून ठरवली जात असायची असे म्हणतात...अशी शिल्प म्हणजे त्या विशिष्ट राज्याची संपत्ती आणि वैभवाची साक्ष असायची...
        गजलक्ष्मी, उजेडासाठी खिडकीवजा झरोके, बारीक कोरीव नक्षीकाम जे आजही आपण आपल्या दागिन्यांवर घडवून घेतो,अशी एक ना अनेक कितीतरी शिल्पांचा उल्लेख करता येईल....
     काहींचे फोटो मी लेखासोबत पोस्ट करत आहे....
     
          याच मार्गावरुन बदामीकडे कूच करताना आम्ही जांबुवंत गुहा, शबरीची गुहा आणि श्रीरामांचे पाय तिच्या गुहेला लागली त्या पाऊलखूणा! 
हे सारे किष्किंधा नगरीत बघताना खरोखरच कृतकृत्य झाल्याचे समाधान मिळते...रामायणातील ते ते प्रसंग डोळ्यासमोर उभे रहातात....

             सगळीकडे मोठमोठ्या शिळा आणि दगडांच्या साम्राज्यातून सैर करताना आणि तेथील तीव्र उन्हाची काहीली सोसताना त्रास होऊ नये यासाठी ठिकठिकाणी हिरवळ, मोठे वृक्ष, छोटी छोटी झुडपं आणि फुलांचे ताटवे निर्माण केलेले दिसून येतात....मनाला आल्हाददायक असणाऱ्या या गोष्टी जाणीवपूर्वक उत्तम रितीने जोपासल्या गेल्या आहेत याचे खरंच खूप कौतुक वाटलेच...शिवाय संपूर्ण परिसर अगदी स्वच्छ, योग्य तेथे नावाचे, माहितीचे बोर्ड आणि भग्न सुट्या अवशेषांचे म्युझियम बनवून ते प्रदर्शित करणं ह्या सर्व बाबी तेथील शासनाची आणि नागरीकांची पुरातन शिल्पसौंदर्याची असणारी आवड जाणवून देते....हा ऐतिहासिक ठेवा जापावयास मदतच करते...

            सायंकाळपर्यंत आम्ही आयहोळे, पट्डकल करत बदामीला पोहोंचलो...
     बदामीलाही संपूर्ण पहाडी प्रदेशातून शिल्पकलेतून साकारलेली अप्रतिम मंदीरसमुह आहे....विशाल पुष्करणीच्या भोवती ही छोटी छोटी मंदिरं दिमाखात उभी राहून तेथील निसर्ग सौंदर्यात भरच घालतात...
 पण जवळच वानरसेनेची किष्किंधा नगरी असल्यामूळे म्हणा किंवा पहाडी प्रदेशामूळे येथे काळंया तोंडाची वानरसेना आणि मर्कटसेना विपुल प्रमाणात आहे आणि त्यांचा मुक्त संचार आपल्याला काहीशी धडकी भरवतो...असो...

      दुसरे दिवशी सकाळीच नाश्ता करुन आम्ही प्रथम बदामी येथील प्रसिद्ध असणाऱ्या शाकंभरी देवीच्या मंदिरात दर्शनासाठी गेलो...नेमकीच आरती पुजा झालेली देवीची सालंकृत प्रसन्न मुर्ती आपल्या महाराष्ट्रातील तुळजाभवानीशी साधर्म्य सांगणारी वाटली...
मात्र तुळजाभवानी शांत संयमी रुपात दर्शन देते तर आई शाकंभरी थोडी उग्र रुपात ऊभी आहे असे वाटले...देवीचंच रुप ते कोणत्या स्वरुपाचा भास होईल सांगता येत नाही. 
पण दर्शनाने मन प्रसन्न झाले...मांगल्ययुक्त वातावरणात दिवसाची सुरुवात मनाला फार भावली...

       बदामीचं महत्वाचं आकर्षण म्हणजे तिथल्या पहाडांमध्ये कोरलेल्या भव्य लेण्या !
थोडा ट्रेक करण्याशिवाय पर्याय नाही...सोबतीला मर्कट सेनाही असतेच...स्त्रीयांनी चुकूनही केसांमध्ये गजरा किंवा फुल लावू नये हे चढताना....खाण्याची कुठलीही वस्तू दिसेल अशी ठेवू नये कारण ही माकडं आपल्या केसात माळलेली फुले आपल्या खांद्यावर बसून अगदी क्लचर काढून घेवून जातात...मला असा अनुभव आलाय!....आपली नुसती घाबरगुंडी उडते मात्र...
एका स्री ची हातातील पर्स हिसकावून घेतली एका  माकडाने,  ती पण अशीच घाबरलेली....तरी तेथे हातात लांबलांब काठ्या घेवून सेक्यूरिटी पर्यटकांची काळजी घेताना दिसतात...

         बदामीच्या या भव्य लेण्यांपैकी एक लेणी विष्णू देवतेस, एक शंकराला, एक विष्णू आणि शिव या दोहोंना समर्पित आहेत तर एक लेणी गौतम बुध्दांना आणि एक भगवान महावीर यांना समर्पित आहेत...
      विष्णू लेणीत विष्णूंच्या दशअवतारांपैकी कही अवतार कोरलेले आहेत...शिवाच्या लेणीत शंकराची रुपं तर काही हरिहराची 
म्हणजे शरीराचा अर्धा भाग विष्णूंचा आणि अर्धा शिवाचा अशा आहेत...
छतावर, खांबांवर महाभारतातील प्रसंग आहेत...
बुध्द लेणीत गौतम बुध्दांची तर जैन लेणीत भगवान महावीर यांची विशाल शिल्प आहेत...
सारीच शिल्प आपण स्तिमित होऊनच बघत रहातो आणि त्या शिल्पकारांना मनोमन शतदा नमन करतो, ज्यांच्यामूळे आपण आज हे वैभव बघू शकतो...
     आम्ही गेलो तेंव्हा मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट  या महाविद्यालयातील ऐंशी विद्यार्थ्यांची अभ्याससहल आली होती आणि हे सर्व विद्यार्थी या शिल्पांचे स्केचेस काढण्यात मग्न होती....दरवर्षीच अशी सहल येते असे समजले...
        येथेही गाईड गरजेचा पण आम्हाला त्या दिवशी मिळू शकला नाही...कारण त्या वेळी सर्व गाईड लोकांची सात दिवसांसाठी प्रशिक्षण शिबीर चालू होते...
   
         पण ही भव्य शिल्पे बघून आपल्याला दिव्यत्वाची प्रचिती येते आणि आपली हम्पी बदामीची सहल सुफळसंपन्न झाल्याचे समाधान आपल्याला भरभरुन मिळते हे अगदी खरंए...
      प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी बघावा आणि आपल्या पुढच्या पिढीला आवर्जुन दाखवावा असाच हा प्राचीन ऐतिहासिक ठेवा आहे....

©️ॲड.नंदिनी म. देशपांडे. 

🌹🌹🌹🌹🌹

आयहोळे आणि पडट्कल येथील मंदिर समुह....

शनिवार, ६ जानेवारी, २०२४

हम्पी, २.

*हम्पी*
__________

       दगडधोंड्यांच्या राज्यात तापलेल्या पाषातून पुरातन इतिहासाच्या खूणा बघताना, तोंडात बोट घालण्याची पाळी आपली येते,जेंव्हा आपण हम्पी येथे मोठ्या नव्हे अतिप्रचंड पाषाणातून, आणि किंबहूणा पहाडी पाषाणातून भव्य दिव्य अशा धार्मिक मुर्ति बघतो ना त्यावेळी...

        एक ना अनेक अशी कितीतरी शिल्प आहेत जे बघताना आपली नजरही कमी पडेल....घडवलेली मुर्ती बघताना खरंच वर्णनास शब्दच सुचत नाहीत पण त्या अनामी शिल्पकारास लोटांगण घालावेसे वाटते....
      त्यांपैकी काही शिल्पाविषयी आज सांगते...

          *चनागणपती*
________________________

       हे गणपतीबाप्पाचे भले मोठे शिल्प, "महागणपती" ,या नावानेही ओळखले जाते...एका अखंड विशालकाय पाषाणात विजय नगरच्या साम्राज्यात शिल्पकाराने बनवलेली ही मुर्ती....
      जमीनीच्या पोटात प्रचंड उलथापालथ होवून पृष्ठभागावर आलेल्या या पाषाणातून एक एक  मुर्ति आकाराला आलेली आहे...
          शिल्पकला किती प्रगत होती त्या ही काळात याचेच हे द्योतक आहे...कलाकारांना, शिल्पकारांना राजाश्रय होता आणि शिल्पकलेतून प्रत्येक राजाने आपापल्या काळाचा ठसा उमटवून ठेवला आहे असे निश्चित सांगतायेते....असो...

    तर ह्या महागणपतीचे पोटाचा आकार "चन्या" (हरभर्या सारखा) आहे म्हणून यास "चनागणपती" असेही संबोधले जाते...

*उग्रनृसिंह*
_______________________

       मुर्तिरुपात नृसिंह आपण बहूतेक उग्र रुपातच बघितला आहे...याला अपवाद मला आपल्या वाईच्या जवळ असणाऱ्या नृसिंह मुर्तित सापडला...वाईजवळ एकाच पाषाणी चौथऱ्यावर एका बाजूने नृसिंहाची उग्र मुर्ति आहे आणि त्याच्या पाठीच एक मुर्ति शांत स्वरुपात आहे...मला खूप आवडलेल्या मुर्तिंपैकी या कायम मनात घर करुन राहिलेल्या मुर्ति! असो...  
      तर हम्पीमधील नृसिंहाची ही विशाल मुर्ति सुध्दा एकाच भव्य पाषाणात अतिशय उग्र स्वरुपात शतकानुशतके विराजमान आहे... पण,शेजारीच लक्ष्मीचीही मुर्ति होतीच असे ठामपणे सांगता येते....कारण आदिलशाहीच्या माथेफिरु लोकांनी यातील लक्ष्मीची मुर्ति फोडलेली दिसून येते...पण तिचा सालंकृत हात आजही मुर्तित स्पष्ट दिसतो....म्हणूनच हिला "लक्ष्मीनृसिंह"असेही म्हणता येईल....
     
         *बडवीलिंग*
________________________

याच परिसरात आणखी डोळे विस्फारत बघावी अशी विशाल अशी महादेवाची पषाणाची पिंड आहे....विशेष म्हणजे ही वर्षानुवर्षे पाण्यात ऊभी आहे....समोरच नंदीही आहे... आजही त्या पिंडीभोवती पाणी असून ते कधीच आटलेले नाही....असे सांगितले जाते...तेथे पाण्याचा नैसर्गिक स्रोत असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येतो...मी पण या मताला पुष्टीच देईन, कारण आम्ही बघत होतो तो सगळा पाषाणी पठाराचा भाग होता...तेथून काही कि.मी. अंतरावर खाली उतरले की, दगडधोंड्याच्या साथीने, त्यांना कवेत सामावत, तुंगभद्रा नदी खळाळून वाहताना दिसते....
     तिचे स्वच्छ, सुंदर खळाळते रुप दगडगोट्यांच्या संगतीने फारच मोहक दिसते...पाण्याचा प्रवाह त्यामूळे अजिबात भितीदायक वाटत नाही...
या पात्रात वेताच्या मोठ्ठया टोपलीवजा तराफ्यात बसुन जलविहार करताना मजा आली...
       नदीतून विहार करतानाही दगडांच्या कितीतरी कपारी दिसतात....त्यातही वेगवेगळ्या देवतांची शिल्पे कोरलेली आहेत...ती लांबून बघितल्याने स्पष्ट दिसत नाहीत...पण त्या भगवान परशुराम, पांडव वगैरे आहेत...कांही कपारी पाण्याच्या मार्याने बनल्या असाव्यात असे जाणवते...

      एकूणच या मुर्ती भग्न पावलेल्या असल्याने त्यांची पुजा होत नाही...
      अशा भल्या मोठ्या मुर्ती,आणि त्यातही त्यांचं देवपण लोप पावलेले बघून सुरुवातीला अंगावर शहारे येतात...भितीही वाटते...पण त्यांच्या निर्मितीमागे कितीतरी श्रम,मेहनत आणि जिद्द पणाला लागलेली आहे हे बघून त्या आपल्याला शिल्पकाराच्या कलेसमोर नतमस्तक होण्यास भाग पाडतात...त्या वेळच्या या हिंदू राजांच्या कलासक्त स्वभावधर्माला प्रणाम करावयास लावतात हे निश्चित....

©️ॲड.नंदिनी मधुकर देशपांडे.
छ. संभाजीनगर. 

🌹🌹🌹🌹🌹

बुधवार, ३ जानेवारी, २०२४

हम्पी....

कर्नाटकातील हम्पी आणि बदामी ही सहल करावी असे सारखे वाटत होते...ऐतिहासिक ऐवज असणारी ही सोनेरी खाण डोळेभरुन बघावी आणि त्या सुवर्ण काळाच्या साक्षीदारांशी हितगुज साधावे आपण,असे फार मनापासून वाटत होतेच...
     पण, तेथील तो ट्रेक, त्या दोन दोन दोन तीन तीन फूट असणाऱ्या पायऱ्या चढणे आपल्याला कितपत झेपेल?ही शंकाही अंतर्मनात घोंघावत होती...शेवटी मनातील प्रखर ईच्छाशक्तीचाच विजय झाला आणि तेथील सहली साठी अनुकूल कालावधी बघून आम्ही हम्पी ,बदामी या सुप्रसिद्ध ऐतिहासिक स्थळांना भेट दिली...

      *हम्पी*
***************
अगदी प्राचीन काळापासून म्हणजे इ.स. च्या सहाव्या शतकापासून भारतीय संस्कृती परंपरा, शासन पध्दती किती तरी पुढारलेली,आपला स्वतःचा एक वेगळाच बाझ जपणारी होती...तसेच शासन आदर्शत्वाच्या मार्गाने चालणारी शासन व्यवस्था होती याची साक्ष देणारी विशालकाय मंदिरं, त्यांवरील कोरलेली असंख्य शिल्प आणि पावलोपावली मिळणाऱ्या प्राचीन इतिहासाचं आगार भांडार असेच वर्णन करावे असे हे हम्पी शहर...

लाखो वर्षांपूर्वि भूगर्भातील प्रचंड मोठ्या हालचालींमुळे, बहूतेक ज्वालामुखीच्या उद्रेकामूळे पाण्याखाली असणारा जमिनीचा भाग अगदी कोरडा ठक्क होवून तेथे जमीनीच्या पोटातून आलेल्या प्रचंड मोठ्या खडकांचा, दगडांचा, पाहाडांचा उष्ण प्रदेश म्हणजे हम्पी असा अंदाज व्यक्त केला जातो...

        दक्षिणेकडील म्हणजेच कर्नाटकातील  शेवटचा हिंदू राजाच्या कार्यकाळात विजयनगरच्या साम्राज्याचा सुवर्णकाळ दर्शवणारे कितीतरी पुरावे आजही येथे अस्तित्वात आहेत...
     कित्तेक देवालंयं जी मुर्तिविना मुक रुदन करत आहेत असा भास होतो...कित्तेक किल्ले, बाजारपेठा, ईमारती, राजवाडे, जलकुंभ, भग्न मुर्तींचे असंंख्य अवशेष या साऱ्या खुणांचे शहर हे हम्पी शहर...आजचे खेडे पण त्या काळचे विजयनगर साम्राज्याच्या राजधानीचे शहर, अर्थात पूर्विचे " विजयनगर ".
   
        म्हणावे तर भग्न अवशेषांचे शहर, म्हणावे तर, दगडांच्या खाणीचे शहर म्हणावे तर सुवर्णकाळ कथन करणारे शहर आणि मानले तर प्रत्यक्ष रामायणातील राम-रावण युध्दाची कल्पना जेथे प्रत्यक्षात  मांडली गेली ,आणि त्या दृष्टिने जेथून पावले उचलली गेली तीच ही किश्किंधा नगरी! आपल्या बाहूत रामायणातील कितीतरी प्रसंगांचा थेट पुरावा देते आपल्याला!..
हम्पी देवालयांपैकी सुप्रसिद्ध असणारे "विरुपाक्ष मंदिर"...
या परिसरात केवळ हे एकच मंदिर असे आहे की, जेथे मंदिरातील मुर्तीची, विरुपाक्ष, महादेवाच्या पिंडीची आजतागायत पुजा केली जाते...कारण केेवळ ही एकच मुर्ती आदिलशाही निजाम
शाहीच्या वक्रनजरेतून सुटली आणि अभंग राहिली....
इतर अनेक मुर्ती खूप सुंदर, रेखीव प्रचंड मोठ्या आहेत...काही एकाच दगडात अखंड कोरलेल्या आहेत...शिल्पकलेचा उत्तुंग अविष्कार असणारी ही शिल्प कुठे ना कुठे भग्न आहेत तर काही मंदिरांच्या गाभाऱ्यात देवच  नाही....भंग पावलेल्या मुर्तिंची पुजा करणे निशिध्द मानले जाते, म्हणून तेथे पुजा होत नाही...आणि आज ती सुवर्णकाळ दाखवणारी ऐतिहासिक साधनं बनली आहेत...
     एक एक मुर्ति घडवण्यासाठी कितीतरी शिल्पकारांनी आपले अख्खे आयुष्य खर्च केलेले असेल याची प्रचिती आपल्याला प्रत्यक्ष बघताना नक्कीच येते...
हा वैभवशाली इतिहास जगासमोर आणणं फार महत्वाचं आहे...आपल्या भारताचं हे भुषण युनेस्के जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलंय ते अगदीच योग्य आहे...

   इतिहासाचा एवढा महत्वपूर्ण ठेवा प्रत्येक भारतीयाने आवर्जुन डोळेभरुन बघावा असाच आहे... 
आपल्या पुढच्या पिढ्यांना हा ऐतिहासिक ठेवा आवर्जुन दाखवावा आणि शक्य तेवढा जतन करावा असाच आहे...

            वर उल्लेख केल्या प्रमाणे हम्पी येथील मंदिर समुच्चयात केवळ विरुपाक्ष मंदिरात प्राचीन काळापासून ते आजतागायत मुर्ति ची पुजा केली जाते...
      महादेवाची स्वयंभू पिंड असणाऱ्या या देवालयात मुर्तिपुजेचं मांगल्य आणि पावित्र्य संपूर्ण परिसर व्यापून टाकतं आणि पाऊल टाकताच मनाला प्रसन्न वाटतं...
        या विशाल मंदिराच्या कळसाला गवसणी घालताना तब्बल नऊ मजले पार करावे लागतात...आतल्या आत वरपर्यंत पोहोंचावयास जिन्याची व्यवस्थित बांधणी केलेली आहे, पण सुरक्षेच्या कारणास्तव हल्ली हा मार्ग पर्यटकांसाठी बंद केलाय...नऊ माळ्यांच्या गोपुराची रचना अगदी वरच्या टोकावर बघाल तर, लांंबूून गायीच्या दोन कानांसारखी वाटते...वास्तविक हे दोन्ही टोकाचे (कानांमधील) अंतर बरेच जास्त आहे पण शिल्पकाराचे कसब पणाला लावून यातील एक एक शिल्प घडवलेले दिसते...
       येथील आणखीन  एक वैशिष्ट्य म्हणजे,महादेवाचे वाहन नंदी आपण प्रत्येक मंदिरात बघतो पण या मंदिरात मात्र मुळ नंदी तीन तोंडाचा बघावयास मिळतो...तो भग्न पावलाय म्हणून ओळीने तीन नंदी याला पर्याय म्हणून बनवले गेले आहेत...

        त्याही काळात शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून मंदिराची बांधणी केलेली दिसून येते त्याचा पुरावा म्हणजे जेंव्हा आपण या मंदिरात एका बारीकसारीक छिद्रातून या ठिकाणी सूर्योदयापासून ते सुर्यास्ता पर्यंत गोपुराची थ्रीडी इफेक्ट बघाायास मिळणारी सावली बघतो आणि थक्क होऊन जातो...
       मंदिर परिसरात गजलक्ष्मी हत्तीणीचे दर्शन घेताना समाधान मिळते...
      मुख्य मंदिरातील उत्सव मुर्तिचा फोटो घेण्यास मनाई आहे त्या मूळे ती सोडूण काही फोटो शेअर करत आहे...
        हम्पी राजधानीचे ठिकाण असल्याने मोठ्ठी बाजारपेठ येथेच होती...मंदिराच्या दोन्ही बाजूस लांबच लांब असे अधुनिक शटर्स सारखे दगडीशिळांचे शॉपिंग कॉम्प्लेक्स तेही दोन मजली बघून आचंबित होण्याची पळी आपली असते...
       व्यापारासाठी वेगवेगळ्या प्रदेशातून येणारे व्यापारी महिनोन महिने मुक्कामास यायचे, त्यांच्या खाण्यापिण्याच्या, निवासाची आणि पाणवठ्याची व्यवस्था अगदी चोख होती हे आजही या खुणा बघून खात्रीच पटते आपली...
      
   पण,प्रत्यक्षात भेट देवून बघण्याजोगे हे ठिकाण एकदा आवर्जुन बघावे असेच...
 आज एवढेच पुरे...
बाकी मंदिरांविषयी  यथावकाश लिहिनच...

©️ॲड.नंदिनी म.देशपांडे.
छ.संभाजीनगर.

हम्पी....

कर्नाटकातील हम्पी आणि बदामी ही सहल करावी असे सारखे वाटत होते...ऐतिहासिक ऐवज असणारी ही सोनेरी खाण डोळेभरुन बघावी आणि त्या सुवर्ण काळाच्या साक्षीदारांशी हितगुज साधावे आपण,असे फार मनापासून वाटत होतेच...
     पण, तेथील तो ट्रेक, त्या दोन दोन दोन तीन तीन फूट असणाऱ्या पायऱ्या चढणे आपल्याला कितपत झेपेल?ही शंकाही अंतर्मनात घोंघावत होती...शेवटी मनातील प्रखर ईच्छाशक्तीचाच विजय झाला आणि तेथील सहली साठी अनुकूल कालावधी बघून आम्ही हम्पी ,बदामी या सुप्रसिद्ध ऐतिहासिक स्थळांना भेट दिली...

      *हम्पी*
***************
अगदी प्राचीन काळापासून म्हणजे इ.स. च्या सहाव्या शतकापासून भारतीय संस्कृती परंपरा, शासन पध्दती किती तरी पुढारलेली,आपला स्वतःचा एक वेगळाच बाझ जपणारी होती...तसेच शासन आदर्शत्वाच्या मार्गाने चालणारी शासन व्यवस्था होती याची साक्ष देणारी विशालकाय मंदिरं, त्यांवरील कोरलेली असंख्य शिल्प आणि पावलोपावली मिळणाऱ्या प्राचीन इतिहासाचं आगार भांडार असेच वर्णन करावे असे हे हम्पी शहर...

लाखो वर्षांपूर्वि भूगर्भातील प्रचंड मोठ्या हालचालींमुळे, बहूतेक ज्वालामुखीच्या उद्रेकामूळे पाण्याखाली असणारा जमिनीचा भाग अगदी कोरडा ठक्क होवून तेथे जमीनीच्या पोटातून आलेल्या प्रचंड मोठ्या खडकांचा, दगडांचा, पाहाडांचा उष्ण प्रदेश म्हणजे हम्पी असा अंदाज व्यक्त केला जातो...

        दक्षिणेकडील म्हणजेच कर्नाटकातील  शेवटचा हिंदू राजाच्या कार्यकाळात विजयनगरच्या साम्राज्याचा सुवर्णकाळ दर्शवणारे कितीतरी पुरावे आजही येथे अस्तित्वात आहेत...
     कित्तेक देवालंयं जी मुर्तिविना मुक रुदन करत आहेत असा भास होतो...कित्तेक किल्ले, बाजारपेठा, ईमारती, राजवाडे, जलकुंभ, भग्न मुर्तींचे असंंख्य अवशेष या साऱ्या खुणांचे शहर हे हम्पी शहर...आजचे खेडे पण त्या काळचे विजयनगर साम्राज्याच्या राजधानीचे शहर, अर्थात पूर्विचे " विजयनगर ".
   
        म्हणावे तर भग्न अवशेषांचे शहर, म्हणावे तर, दगडांच्या खाणीचे शहर म्हणावे तर सुवर्णकाळ कथन करणारे शहर आणि मानले तर प्रत्यक्ष रामायणातील राम-रावण युध्दाची कल्पना जेथे प्रत्यक्षात  मांडली गेली ,आणि त्या दृष्टिने जेथून पावले उचलली गेली तीच ही किश्किंधा नगरी! आपल्या बाहूत रामायणातील कितीतरी प्रसंगांचा थेट पुरावा देते आपल्याला!..
हम्पी देवालयांपैकी सुप्रसिद्ध असणारे "विरुपाक्ष मंदिर"...
या परिसरात केवळ हे एकच मंदिर असे आहे की, जेथे मंदिरातील मुर्तीची, विरुपाक्ष, महादेवाच्या पिंडीची आजतागायत पुजा केली जाते...कारण केेवळ ही एकच मुर्ती आदिलशाही निजाम
शाहीच्या वक्रनजरेतून सुटली आणि अभंग राहिली....
इतर अनेक मुर्ती खूप सुंदर, रेखीव प्रचंड मोठ्या आहेत...काही एकाच दगडात अखंड कोरलेल्या आहेत...शिल्पकलेचा उत्तुंग अविष्कार असणारी ही शिल्प कुठे ना कुठे भग्न आहेत तर काही मंदिरांच्या गाभाऱ्यात देवच  नाही....भंग पावलेल्या मुर्तिंची पुजा करणे निशिध्द मानले जाते, म्हणून तेथे पुजा होत नाही...आणि आज ती सुवर्णकाळ दाखवणारी ऐतिहासिक साधनं बनली आहेत...
     एक एक मुर्ति घडवण्यासाठी कितीतरी शिल्पकारांनी आपले अख्खे आयुष्य खर्च केलेले असेल याची प्रचिती आपल्याला प्रत्यक्ष बघताना नक्कीच येते...
हा वैभवशाली इतिहास जगासमोर आणणं फार महत्वाचं आहे...आपल्या भारताचं हे भुषण युनेस्के जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलंय ते अगदीच योग्य आहे...

   इतिहासाचा एवढा महत्वपूर्ण ठेवा प्रत्येक भारतीयाने आवर्जुन डोळेभरुन बघावा असाच आहे... 
आपल्या पुढच्या पिढ्यांना हा ऐतिहासिक ठेवा आवर्जुन दाखवावा आणि शक्य तेवढा जतन करावा असाच आहे...

            वर उल्लेख केल्या प्रमाणे हम्पी येथील मंदिर समुच्चयात केवळ विरुपाक्ष मंदिरात प्राचीन काळापासून ते आजतागायत मुर्ति ची पुजा केली जाते...
      महादेवाची स्वयंभू पिंड असणाऱ्या या देवालयात मुर्तिपुजेचं मांगल्य आणि पावित्र्य संपूर्ण परिसर व्यापून टाकतं आणि पाऊल टाकताच मनाला प्रसन्न वाटतं...
        या विशाल मंदिराच्या कळसाला गवसणी घालताना तब्बल नऊ मजले पार करावे लागतात...आतल्या आत वरपर्यंत पोहोंचावयास जिन्याची व्यवस्थित बांधणी केलेली आहे, पण सुरक्षेच्या कारणास्तव हल्ली हा मार्ग पर्यटकांसाठी बंद केलाय...नऊ माळ्यांच्या गोपुराची रचना अगदी वरच्या टोकावर बघाल तर, लांंबूून गायीच्या दोन कानांसारखी वाटते...वास्तविक हे दोन्ही टोकाचे (कानांमधील) अंतर बरेच जास्त आहे पण शिल्पकाराचे कसब पणाला लावून यातील एक एक शिल्प घडवलेले दिसते...
       येथील आणखीन  एक वैशिष्ट्य म्हणजे,महादेवाचे वाहन नंदी आपण प्रत्येक मंदिरात बघतो पण या मंदिरात मात्र मुळ नंदी तीन तोंडाचा बघावयास मिळतो...तो भग्न पावलाय म्हणून ओळीने तीन नंदी याला पर्याय म्हणून बनवले गेले आहेत...

        त्याही काळात शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून मंदिराची बांधणी केलेली दिसून येते त्याचा पुरावा म्हणजे जेंव्हा आपण या मंदिरात एका बारीकसारीक छिद्रातून या ठिकाणी सूर्योदयापासून ते सुर्यास्ता पर्यंत गोपुराची थ्रीडी इफेक्ट बघाायास मिळणारी सावली बघतो आणि थक्क होऊन जातो...
       मंदिर परिसरात गजलक्ष्मी हत्तीणीचे दर्शन घेताना समाधान मिळते...
      मुख्य मंदिरातील उत्सव मुर्तिचा फोटो घेण्यास मनाई आहे त्या मूळे ती सोडूण काही फोटो शेअर करत आहे...
        हम्पी राजधानीचे ठिकाण असल्याने मोठ्ठी बाजारपेठ येथेच होती...मंदिराच्या दोन्ही बाजूस लांबच लांब असे अधुनिक शटर्स सारखे दगडीशिळांचे शॉपिंग कॉम्प्लेक्स तेही दोन मजली बघून आचंबित होण्याची पळी आपली असते...
       व्यापारासाठी वेगवेगळ्या प्रदेशातून येणारे व्यापारी महिनोन महिने मुक्कामास यायचे, त्यांच्या खाण्यापिण्याच्या, निवासाची आणि पाणवठ्याची व्यवस्था अगदी चोख होती हे आजही या खुणा बघून खात्रीच पटते आपली...
      
   पण,प्रत्यक्षात भेट देवून बघण्याजोगे हे ठिकाण एकदा आवर्जुन बघावे असेच...
 आज एवढेच पुरे...
बाकी मंदिरांविषयी  यथावकाश लिहिनच...

©️ॲड.नंदिनी म.देशपांडे.
छ.संभाजीनगर.

शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०२३

बाबांची माय. ....

"बाबांची माय"
 -------------

             ©️ नंदिनी म. देशपांडे. 

         "आपल्याला काही गोष्टींचा कालपरत्वे विसर पडतच असतो ना? कारण आपला त्याच्याशी फारसा संबंध येत नाही हो ना? "
      
         अगदीच प्राथमिक टप्प्यात अल्झायमर चालू झालेला असताना माझ्या वडिलांनी मला प्रश्न केला एक दोन वेळेला....किंबहूणा त्यांना अशा काही मानसिक आजाराची सुरुवात झाली असेल याचा मलाही थांगपत्ता लागला नव्हताच....

      "कांही दिवसानंतर मला डोक्यात काहीतरी वेगळंच जाणवतंयं...डोकं जड होतंयं आणि झोपही येते आहे"...अशी एक सुचना मला त्यांनी केली...

      आपल्याला काहीतरी वेगळं होत आहे, ते जाणवतंय, पण नेमकं काय ते सांगता येत नाहीए, याची सातत्याने बाबांना स्वतःला जाणीव होत होती...चाणाक्ष बुध्दिमान माणूस,म्हणूनच आयुष्याचे 78 वर्षे काढलेली ही व्यक्ती अजूनही विचार क्षमता प्रगल्भ होतीच याचेच हे उदाहरण!

         पण जेंव्हा,व्हॉट्स ॲपवर गुुड मॉर्निंग मेसेजेस ईव्हिनिंगला ते पाठवू लागले, शेव्हिंग करताना 
डोक्यावरचे केसही स्वतःच कापू लागले  तेंव्हा मात्र आमचे धाबे दणाणले...आणि अचानक एक दिवस मोबाईल ऑपरेट कसा करावा हेच पूर्णपणे ते अगदीच विसरून गेले...
 
      या सर्व घटना केवळ महिना दोन महिन्यातच घडू लागल्या आणि नेमकाच कोरोना संपलेला असताना आम्ही भावंड मानसोपचार तज्ञाकडे बाबांच्या 'केस'विषयी चर्चेसाठी गेलो...
       
      खरं म्हणजे बाबांच्या दैनंदिन वागण्यात झपाट्याने होणारा बदल हा प्रथम भावाच्या लक्षात आला...तो आम्हा बहिणींना कळकळीने, "मानसोपचार तज्ञाकडे बाबांना घेऊन जाऊ या आपण"असे बोलत होता पण आम्हाला फारसे जाणवत नव्हते आणि बाबा स्वतः यासाठी तयार होतील का?हा फार गहन प्रश्न आमच्यासमोर होता...त्यांना त्यासाठी कसे तयार करावे यासाठी लुप्तीशोध चालू झाला...उलट आमच्या बोलण्यातील या विषयावरची कुणकुण त्यांना लागली असावी, आम्हाला ते स्वतः पेपरमध्ये आलेली अल्झायमर आजारावरचे लेख वाचून दाखवत...आठ नऊ ऑक्टो.ला मानसिक आरोग्या विषयी विशेष दिना निमित्त बरेच लेख आले होते,ते सारे पेपर्स सांभाळून ठेवण्या विषयी आम्हाला सांगत होते...
     
        प्रथम आम्हीच भावंड डॉ. शी चर्चेत भाग घेऊन ठरवू या असे आमचे ठरले...

       एका मानसोपचार डॉक्टर शी पाच फूट लांब बसून आम्ही चर्चा केली...पेशंटला आणण्याची गरज नाही त्यांचा दैनंदिन वागणूकीचा एक व्हीडीओ करुन घेऊन या असे त्या बोलल्या...
तसे आम्ही केलेही आणि दोन दिवसातच त्यांनी बाबांच्या अल्झायमर वर शिक्कामोर्तब करुन औषधंही लिहून दिली...

      फारतर तीनचार दिवसातच औषधांचे परिणाम दिसू लागले...बाबांचा बडबडा स्वभाव अगदीच लोप पावला...एवढा की त्यांना बोलता येतच नाही की काय? अशी शंका मला येऊ लागली...जेवणावरची वासनाही उडत चालली होती....कळजी करण्यासारखी परिस्थिती उद्भवली आणि आम्ही या औषधांना कचराकुंडी दाखवली...

        पुन्हा तज्ज्ञ म्हणवणारे नवीन मानसोपचाराचे डॉक्टर बघितले...त्यांनी पेशंट च्या एमआरआय वगैरे टेस्टस् सुचवल्या लगेच करुनही घेतल्या आणि आमच्या बाबांचा मेंदू श्रींक (आकसण्याची) प्रक्रिया चालू झाली आहे, अशा पेशंटच्या वागण्या बोलण्यात काय काय बदल होऊ शकतात, काळजी कशी घ्यावी वगैरे ईत्यंभूत माहिती आम्हा सर्वांनाच त्यांनी दिली, आणि औषधोपचार चालू केले...पुन्हा पेशंट ला आणण्याची अजिबात गरज नाही हे आवर्जून सांगत...

        डॉक्टर म्हणाले तसे बदल बाबांमध्ये फारच झपाट्याने होत गेले...तसा त्यांचा त्रास आम्हाला नव्हता पण केअर टेकर 24 तास सोबत हवाच  हे कळून चुकले आम्हाला, आणि आम्ही ते ठेवलेही...केवळ एक वर्षच ठेवावा लागला तो...दिवसभर ते माझ्या आसपासच असायचे...मला अजिबात दूर जाऊ द्यायचे नाहीत...अगदी त्यांचं लहानपण फिरुन आलंयं का?अशी शंका वाटण्या ईतपत आमची सोबत त्यांना हवी असायची...

     मला तर त्यांनी त्यांच्या "माय" चा  दर्जा दिला होता...तू माझी आई आहेस तिच्या सारखीच माझी काळजी घेतेस हे वारंवार बोलून दाखवायचे ते!
या निमित्ताने दिवसातले जवळ जवळ बारा तास माझ्या सान्निध्यात असायचे बाबा, होईल तेवढी सेवा करत आपल्या जन्मदात्याच्या ऋणातून किंचितशी उतराई होण्याचा प्रयत्न करत होते मी पण...त्यांनी मला दिलेल्या आईपणाच्या दर्जाला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होते...

     पण आयुष्याची 77 वर्षे ज्यांनी शाही,वैभवी जीवन जगलं, आपला दबदबा आपल्या कार्यकौशल्यातून दाखवला, कितीतरी माणसं जोडून ठेवली..ज्यांनी आम्हा भावंडांवर नितांत प्रेम करत आमची काळजी वाहिली,माझी आई गेल्यानंतर आम्हा भावंडांवर आईचीही माया केली...त्या आपल्या वडिलांची केवळ एकच वर्ष का असेना पण अल्झायमर मूळे झालेली विकलांग मानसिक अवस्था, मला माझ्या समोर बघणं म्हणजे,हा माझ्या मनाच्या क्लेशदायक वेदनांचा अक्षरशः कडेलोट होता....

      पण त्यांची "माय" बनून कसा सहन केला ते, आठवले तरी मन विदीर्ण होते आजही...

         मागच्या वर्षी ऑक्टो. च्याच 9 ता.ला ,कोजागिरी पौर्णिमेस माझ्याच घरुन त्यांना हॉस्पिटल मध्ये ॲडमीट होण्यासाठी निघताना,मी सांगितल्यानंंतर देवाला व्यवस्थित नमस्कार करुन निघालेले आमचे बाबा, परत फिरुन येतील ना?अशी पालही चुकचुकली माझ्या मनात...

      आपण मोठी माणसं गावाला निघताना त्यांना पदस्पर्श करत नमस्कार करतो तसाच, त्या वेळी मलाही घालावासा वाटत होता...पण सकारात्मक विचार मनात आणत आपण येथेच त्यांचे आनंदाने स्वागतच करणार आहोत असे मनात ठरवून त्यांना हॉस्पिटल मध्ये जाताना निरोप दिला होता मी....

   पण महिनाचभरात परिस्थितीत  फारच गुंतागुंत होत जाऊन माझ्या मनात निर्माण झालेली शंका वास्तवात बदलली...
  तशाही अवस्थेत प्रसन्न आणि तेजःपुंज असणारा त्यांचा हसरा चेहरा मात्र कधीच मलूल झाल्याचे आठवत नाही...
     
      नियतीशी दिलेली बरोबर महिनाभराची त्यांची नीकराची झुंज देखील दुःखाचा लवलेशही आणू शकली नाही बाबांच्या चेहर्‍यावर...

    अगदी आमच्या नकळत शांत सोज्जवळ तेवणारी प्राणज्योत 7 नोव्हेंबर च्या, त्रीपूरी पौर्णिमेच्या नीशेच्या निद्रेमध्ये चीरनीद्रा घ्यावयास गेली....

     आजच्या वर्ष भरापूर्विच्या त्या सर्व दिवसांचे आपसुकच 
पुनरावलोकन मनाने चालू केले आणि माझ्या मनातील या क्लेशदायक आठवणींना वाहून जाऊ दिले अगदी अलवारपणे...

        पण त्यांच्याही नकळत मला माझे बाबा मला "माय" बनवून गेले होते...याचा मला झालेला आनंद मनाच्या आतल्या कुपीत जपून ठेवलाय मी कयमचाच....

आज ति.बाबांचा,प्रथम स्मृतिदिन 
या निमित्ताने त्यांना आदरपूर्वक 
विनम्र अभिवादन....
🙏🙏🙏

औरंगाबाद, 7 नोव्हेंबर 2023.

🌹🌹🌹🌹🌹

बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३

कन्यादान.

मानवी आयुष्यात कन्यादाना एवढं पुण्य कशात नाही असे म्हणतात...याचाच अर्थ पोटी कन्येनं जन्म घेणं किती पुण्याई आहे बघा...
      कन्या, मुलगी घरात अवतरते ती 'लक्ष्मीचे' रुप असते असे म्हणतात...लक्ष्मीच्या पावलाच्या आगमनाने या घराण्याची भरभराटच होत जाते...हळू हळू ती सरस्वतीचा आशिर्वाद मिळवते आणि जिद्दीने आपल्या पायावर ऊभे रहाण्याचा अट्टहास ठेवते....
     हे साधत असताना ती घरातील सर्व सदस्यांच्या गळ्यातील ताईत बनते...भावंडात सर्वांत मोठी असेल ,तर वडिलांचा उजवा हात बनते...आईला घरकामात मदत करते...गृहिणीपदाची  वाट अजमावून बघण्याची आस मनी ठेवते...
      मोठी ताई असेल तर भावंडांची आईसारखी काळजी घेण्याचा प्रयत्न करते आणि लहान असेल तरीही भावंडांवर प्रेमाची पखरण करते...आजी-आजोबा यांची सेवा करण्यात कृतार्थता मानते...
      एकूणच मुलगी घरात आनंदी आनंद पेरत पेरत येते...

       हिच मुलगी लग्नाळू वयाची झाली की, भावंड तिला चिडवतात, 

ताई मला सांग, मला सांग, कोण येणार गं पाहूणे?

     ही ताई मग लटक्या रागाने 'मी लग्नच करणार नाही मुळी'असं म्हणते...पण मनात मात्र रुबाबदार राजकुमाराची वाट बघत असते...स्रीसुलभ भावना मनात नाचत रहातात ती स्वप्न बघण्यात रममाण होते...
      मनासारखा राजकुमार तिला मिळाला म्हणजे, मग ती, 

लेक लाडकी या घरची होणार सून मी त्या घरची....

असं गुणगुणंत रहाते...
       हात पिवळे होण्याची घटिका समिप येऊ घालते...मग हातभरून हिरवा चुडा आणि नाजूक मेंदीने रंगलेले आपल्या लेकीचे हात कौतुकाने बघून घरातील मोठी मंडळी,आणि तिच्या सख्या तिला म्हणत असतात, 

 पिवळी पिवळी हळद लागली भरला हिरवा चुडा, वधु लाजरी झालीस तू गं सांगे तो चौघडा...

    अशाप्रकारे सनई चौघड्याच्या साक्षीने आपल्या घरची लाडली दोनाचे चार हात होत, नियंत्याने बांधलेल्या ब्रह्मगाठीत बांधली जाते...नवर्या मुलाला गळ्यात हार घालताना लाजेनं चूर होत नजरेनंच त्याच्याशी बोलते...
      
हळव्या तुझीया करात देता करांगुली मी 
स्पर्शावाची गोड शिरशिरी उठते ऊरी 
सप्तपदी मी रोज चालते तुझ्या सवे शतजन्मीचे हे माझे नाते...
      
ही नववधू असे मनातल्या मनात गुणगुणत असेल का?असा भास होतो...
 
      विवाह वेदीवर चढलेले नवरानवरी विवाह विधी पूर्ण करत या समारंभाच्या शेवटाकडे येऊ लागतात...आईचा ऊर आपल्या लाडकीची लवकरच पाठवणी करावी लागणार म्हणून राहून राहून दाटून येऊ लागतो...आपले भरले डोळे ती जाणीवपूर्वक लपवत असते...आणिक वरमाय असणाऱ्या आपल्या विहिणबाईंना विनवते...

ओटीत घातली मुलगी विहिणबाई 
सांभाळ करावा हिच विनवणी पायी...

मुलीचे आणि तिच्या स्वकीयांचे या हळव्या शब्दांनी डोळे पाणावतात...आपल्या लाडक्या सानुलीच्या विरहाने वधूपित्याचे मन मूक रुदन करु लागते...

     आता निरोपाचा क्षण आलेला असतो...वधूला आपले माहेर आणि तेथील माणसं आपल्याला दुरावणार या भावनेने सारखं वाईट वाटणं सहाजिकच असते...
    मनातून ती म्हणत असते, 

निघाले आज तिकडच्या घरी 
एकदाच मज कुशीत घेऊनी पुसुनि लोचने आई 
तुझी लाडकी लेक आपुले घरकुल सोडून जाई 
तव मायेचा स्पर्श मागते 
अनंत जन्मांतरी 
निघाले आज तिकडच्या घरी...

आईवडील आणि वधू या हळव्या क्षणांना सामोरं जात जात 
आई बाबा मुकपणे म्हणत असतात, 

जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा 
गंगा यमुना डोळ्यात ऊभ्या का...

     भरल्या डोळ्याने आपल्या लाडक्या लेकीची पाठवणी करताना आईबाबा कृतकृत्य नजरेनं लेक जावयाला शुभाआशिर्वाद देतात...

     वाजत गाजत नववधु उंबरठ्यावरचं माप ओलांडत सासरच्या घरी प्रवेश करते...सासरच्या घरी लक्ष्मीचे आगमन अगदी वाजत गाजत आनंदाने होते....
 सासुबाई म्हणतात ,

लिंबलोण उतरता 
अशी का झालीस गं बावरी 
मुली तू आलीस आपल्या घरी 
मुली तू आलीस आपल्या घरी...

    असा हा माहेर घरच्या लक्ष्मीचा सासर घरची लक्ष्मी या नात्याने होणारा प्रवास हुरहूर लावणारा पण मोठा गोड आणि हवाहवासा असतो...

      ती कुठेही असेल तरीही लक्ष्मीच असते...
पण आयुष्याच्या अनेक वळणांवर ती सरस्वती, दुर्गा, चंडिका, रेणूकाई, अंबाबाई,अशी शक्ती देवतेची नवचंडी रुपं धारण करत करत नवचंडीच्या अनेक रुपांतून आपल्या आयुष्याचा प्रवास करते...
न थकता, कोणत्याही तक्रारीशिवाय आणि अडचणींवर मात करत करत जिद्दीने यशस्वी होत जाते....

   कालच झालेल्या जागतिक कन्यका दिनाच्यानिमित्ताने एका स्त्रीच्या प्रवासाचा असा आढावा घ्यावासा वाटला...म्हणून हा लेखन प्रपंच...
वाचकांनाही आवडेल अशी आशा करते...

©️नंदिनी म. देशपांडे. 

🌹🌹🌹🌹🌹