मंगळवार, ४ एप्रिल, २०२३

नॉर्थ ईस्ट थ्री सिस्टर्स सहल.

🎍आमची नॉर्थईस्ट, थ्री. 
             सिस्टर्स सहल 🎍

©️लेखिका---
नंदिनी म. देशपांडे. 
तेजपूर --- दिरांग.

    आसाम मधलं तेजपूर हे ठिकाण, म्हणजे, अरुणाचल प्रदेशात प्रवेश करताना प्रवासाचे ठराविक अंतर पार करत; आराम करण्यासाठी एक सोयीचे ठिकाण... याच दृष्टिकोनातून हा मुक्काम होता आमचा...अर्थातच आल्हाददायक निसर्ग, थंडगार वाहती हवा, आणि सोबतीला पर्वतीय रांगांच्या महिरपी....असे सारे असेल तर माणसाला प्रवासाचा कंटाळा आणि शीण दोन्हीही येत नाही...निसर्गा चे अवलोकन करणं हा छंद असेल जवळच तर अशी भटकंती म्हणजे दुग्धशर्करा योगच!

    तेजपूर ते दिरांग या प्रवासात मात्र आपण आता पहाडांच्या वरच्या भागावर जात आहोत याची जाणीव होऊ लागली...आता पर्यंत च्या प्रवासात लांबून वळसा घालावयास लावणारी वळणं आता मात्र आपला व्यास कमी कमी करत चालली होती...तापमानात घटही कमालीची लक्षात येत होती...
हिमालयाच्या हिमाच्छादित रांगा जवळपासच असाव्यात याचे ज्ञान मनाला आणि वृत्तींनाही जाणवत होते...नव्हे, आता तर हिमाच्छादित शिखरं दृष्टिक्षेपात येऊन अंगावर रोमांच उभे राहू लागले...
    काळ्याशार पहाडांवर शुभ्र बर्फाच्या कणांनी, तुकड्यांनी रेखाटलेली सुंदर रांगोळी म्हणजे त्या अंबराच्या स्वागतार्ह, पाहूणचारासाठी या अवनीने स्वतःच्या हाताने रेखाटलेली सुंदर नक्षीदार रांगोळीच असा भास होत होता....
हा दिवस दिरांग च्या सान्निध्यात घालवला आम्ही...
प्रत्येक हॉटेलच्या परिसरात फुलांचे वैविध्य, त्यांचे रंग आणि रचना मनाला मोहवत असायची...प्रत्येक फूल डोळ्यात आणि फोटोतून जपण्याचा मोह खरोखरच अनावर होत असायचा...

   अरुणाचल प्रदेश हा केंद्रशासित प्रदेश आहे...येथे भारतीय सैन्य दलाच्या परवानगीशिवाय आपण या भुमीवर प्रवेश करु शकत नाही...
ठिकठिकाणी भारतीय सैन्यदलाचे रेजिमेंट्स आपल्याला दिसून येतात...भारतीय जवान पावलापावलावर तळ ठोकून आपल्या भारतीय सीमेचं संरक्षण करत असतानाचे दृश्ये दिसत रहातात...हे बघून आपला उरही अभिमानाने भरून येतो, आणि आपले मन अगदी नकळत त्यांचे आभार मानू लागते...
 आम्ही महाराष्ट्रीयन आहोत म्हटल्यावर,प्रवेशालाच एक सैनिक आमच्याशी मराठीत संवाद साधत होता..'मी लातूरचा आहे' असे त्याने म्हणताच,कृतकृत्य झाल्यासाखे वाटले...बुलढाण्याच्या एका सैनिकानेही मुद्दाम आपली महाराष्ट्रीयन ओळख सांगितली आणि आम्हाला फार आनंद वाटला...त्यालाही आमच्याशी बोलून छान वाटत आहे हे लक्षात आले आमच्या..

  दिरांग वरुन तवांगला जातानाच्या  प्रवासाच्या रस्त्यात आम्ही 500 वर्षे जुनी असणारी मॉन्स्ट्री (भगवान गौतम बुध्दांचा मठ) बघितला...
    किंबहूणा अरुणाचल प्रदेश हा भव्य दिव्य मॉन्स्ट्रीजचा प्रदेश आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही....
  भगवान गौतम बुध्दांचा वास या भुमीला सदैव शांती, प्रेम, आस्था बहाल करतो...एका बाजूला निसर्गाचे विराट रुप, स्वर्गाच्या स्पर्शाला आसुसलेले प्रचंड मोठे हिमाच्छादित शिखरं...आणि दुसरीकडे मॉनस्ट्रीजचे पावित्र्य यांचा सुंदर मिलाफ साधून ताठ मानेने ऊभा असणारा हा प्रदेश...
बौध्द धर्माची विलक्षण छाप जपणारा असाच आहे...
ठिकठिकाणी शांतीचा संदेश देणाऱ्या पताका फडकावत संदेश देत रहातो...
एकापेक्षा एक भव्य दिव्य मॉन्स्ट्रीज, त्यात असणारे,गौतम बुध्दांचे भव्य पुतळे आणि समानतेचा संदेश देणारी त्यातील अनेकविध गोष्टी, वस्तू, तेथील प्रचंड मोठे ध्यान मंदीर आणि मनाला मिळणारी शांतता हे सारंच अद्भुत आहे हे जाणवत रहातं...
  अशा कितीतरी मॉन्स्ट्रीज ना आम्ही भेटी देवून मःशांती अनुभवली या प्रदेशात! प्रत्येक मठातील स्वच्छता, रंगीबेरंगी फुलांच्या ताटव्यांची जोपासना आणि रचना हे सारंच अप्रतिम होतं!

      सेलापास....
    -----------------

तवांगच्याच या रस्त्यामध्ये "सेलापास" नावाचे एक सरोवर आहे...1962 च्या भारत चीन युध्दात सेला नावाच्या मुलीने भारतीयांच्या विजयासाठी फार महत्वाची भुमिका(मदतनीस म्हणून)
बजावली होती...
तिच्या स्मरणार्थ भारत सरकारने बनवलेले हे सरोवर आहे...
   तवांगची ही भुमी हे युध्द चालू असतानाची साक्षिदर आहे...युध्द यशस्वीपणे पेलत, विजयश्री आपल्याकडे खेचून आणली तेच हे 'तवांग' होय....
      सेलापास या सरोवराने तवांगला उर्वरीत भारतभुमीशी जोडून ठेवलेले आहे...म्हणूनही हे सेला पास....
निसर्गाचा अप्रतीम अविष्कार असणारा सेला लेक अक्षरशः आपल्या डोळ्याचे पारणे फेडतो...दुतर्फा शुभ्रतेने नटलेले हिमपर्वत....संपूर्ण पणे गोठून पाणेरी कडक बनलेला चकचकीत पृष्ठभाग म्हणजेच सेला लेक होता..
अगदीच अवर्णनीय होतं हे सारंच...या ठिकाणी ऑक्सिजन चे प्रमाण कमी असते म्हणून बऱ्याच  लोकांना त्रास होऊ शकतो...पण आम्हाला तसे काही जाणवले नाही...याच निसर्गरम्य परिसरात किततरी वेळ रेंगाळत आम्ही आमचे पॅक लंच उघडले आणि मनसोक्त पिकनीक साधून घेतली...

    भारत-चीन युध्दात फारच महत्वाची जबाबदारी पार पाडत शहिद झालेले कॅप्टन जसवंत सिंह यांच्या स्मरणार्थ ऊभे केलेले एक अनुपमेय  मेमोरियल बघण्याचा योगही याच तवांगने घडवून आणला...
"जसवंत घर" असे त्याचे नाव...
प्रत्येक भारतीयाचे स्फुर्तीस्थान असणारे हे ठिकाण... आम्ही विनम्रपणे अभिवादन करत जसवंत सिंहाचे मनोमन आभार मानले...शुध्द हवेवर ऊंच फडकणार्या आपल्या तिरंग्याला आणि जसवंत सिंहांच्या स्मृतिंना जयहिंद करत आम्ही  तेथून निघालो...
   
   महाराष्ट्रभर कडक उन्हाळा असताना आम्ही मात्र थंडीमध्ये कुडकुडत त्या रात्री गरम पांघरुणात लपेटून निद्रादेवीच्या स्वाधीन झालो..

     प्रसन्न सकाळी भरभरुन मोकळा श्वास घेत आम्ही दुसरे दिवशी तवांग शहरात असणाऱ्या जगातील दुसर्‍या क्रमांकाच्या आणि भारतातील पहिल्या क्रमांकाच्या सुंदर मॉन्स्ट्रीला भेट दिली...18 फुट ऊंच असणारा भगवान गौतम बुध्दांचा 
भव्य पुतळा कुठूनही लक्ष वेधून घेत होता...सभोवती असणाऱ्या हिमालयाच्या रांगा आपल्या भोवती फेर धरुन आनंदाने नाचत आहेत असा भास होत होता...या अवनीचे अतीसुंदर रुप आपण जवळून न्याहाळत आहोत ही भावना मनातून कृतज्ञता व्यक्त करत आहे या निसर्गा प्रती... हे समाधान घेऊनच अख्खा दिवस तवांगच्या रम्य सान्निध्यात राहिलो आम्ही.... त्याच सायंकाळी,तवांग वॉर मेमोरियल येथेच नितांत सुंदर असा लाईट अँड साऊंड शो बघितला....
राष्ट्रध्वजाला वंदन करत राष्ट्रगीत गायले आणि तवांग च्या भुमीचे आभार मानत दुसरे दिवशी सकाळी तेथून पुढच्या प्रवासासाठी म्हणजे बोंम्डिला या गावी जाण्याची परवानगी घेतली...

  तवांग --- बोंम्डिला.
-------------------------

   दोन दिवस मस्तपैकी तवांग हे थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण अनुभवले आणि तिसरे दिवशी बोम्डिला या गावी जाण्यास निघालो आम्ही....प्रवास 175 कि.मी.चा, बऱ्या पैकी मोठे अंतर कापायचे होते...कोणताही त्रास होऊ नये आणि कंटाळवाणाही होऊ नये याची भरपूर काळजी घेण्यात येत असे...
मुळात मेघालय आणि अरुणाचल प्रदेशाची सहलीचा हेतूच निसर्गाच्या सान्निध्यात अगदी समरसून रहाणे, अनुभवणे आणि आनंद मिळवणे हा होता....अशा निसर्गात भटकंती कोणाला आवडणार नाही!!...शिवाय रस्ते एकदम छान होते...अगदीच काही ठिकाणी काम चालू असल्याने अगदी थोडी गैरसोय व्हायची पण अगदीच नगण्य अशीच...
     गाड्या आरामदायक होत्या, चालकही चांगले होते आणि नागमोडी चालीने प्रवास करण्यास मज्जा येत होती...
   
      तवांगहून बोम्डिला शहरी जाताना रस्त्यात "गँगॉंग अन् गमपा"
या ठिकाणी अति सुंदर असा "नुरांन्ग"
नावाचा अती उत्कृष्ट निसर्गाविष्कार आम्ही बघितला...हा एक डोळ्याचे पारणे फेडणारा सुंदर धबधबा आहे...
ऊंचावरुन वेगाने खाली पडणारे शुभ्रफेसाळ पाणी, आसमंतात आपले तुषार उडवत आपले वेगळे अस्तित्व सिद्ध करतात...या धबधब्याच्या अगदी पायथ्याशी जाऊन उभे रहाण्यात आणि हा थंडगार शॉवरबाथ घेणं एक अविस्मरणीय अनुभव आहे...
हेच फेसाळलेले पाणी खाली पडून नदीमध्ये एकरुप होऊन आपला प्रवाह शांत करते...नयनसुख काय असतं ते प्रत्यक्षात अनुभवायलाच हवं...
    सेला लेक ज्या प्रमाणे सेला नावाच्या मुलीच्या स्मृती जपण्या साठी तयार झालाय... 
अगदी त्याच कार्यात (युध्दजन्य परिस्थितीत) सैनिकांना मदत केली म्हणून सेलाचीच मैत्रीण,नुरांग् हिची आठवण म्हणून या धबधब्याला "नुरांग्न वॉटरफॉल" असे नाव देण्यात आले आहे...
बराच वेळ रेंगाळत या धबधब्याचा आनंद अनुभवला आणि आम्ही बोम्डीलाच्या दिशेने प्रयाण केले...

    बोम्डिला शहर प्रवेशाच्या अगोदर आणखी एका बौध्द मठाला भेट दिली...
   दिवसभराच्या प्रवासाने आरामाची आवश्यकता आहे ही जाणीव करवून दिली आणि यथेच्छपणे रात्रीचे जेवण घेऊन आम्ही  निद्रेच्या स्वधिन झालो...थंडीचा कडाकाही काहीसा कमी झालेला होता....सकाळी पुनः कझिरंगाच्या प्रवासासाठी सिध्द व्हायचे होते आम्हाला...

बोम्डीला--काझीरंगा .
   दुसरा दिवस आमच्या सहलीच्या शेवटचा टप्पा ठरणार होता...बोम्डिला ते काझिरंगा हा सहा तासांचा प्रवास करुन आम्ही आसामच्या काझीरंगा या जुन्या आणि मोठ्या अशा राष्ट्रीय पार्क मध्ये प्रवेश केला....
पार्क असले तरीही एक मोठे शहरच होते हे!फार मोठा परिसर या पार्क च्या रुपाने पालथा घालण्याची संधी मिळाली आम्हाला....
ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर वसलेले हे पार्क एप्रिल च्या शेवटा पर्यंतच पर्यटकांसाठी खुले असते...
  मे पासून आसामात पावसाळा चालू होतो...ब्रह्मपुत्रेच्या पाण्याची पातळी वाढते आणि सारं जंगल तिच्या पाण्याने व्यापून जाते...एप्रिल च्या शेवटी तेथे असणारे प्राणी, पक्षी डोंगराळ भागाकडे कूच करतात...
 काझिरंगा नॅशनल पार्क मध्ये कायम दलदल असण्याचे हेच खरे कारण आहे....
मार्च च्या शेवटीही जंगलामध्ये भरपूर पाण्याचे साठे असल्याचे दिसून आले...
   हे जंगल फारसे दाट नसावे असे वाटते....पण गेंडे आणि हत्ती यांची बरीच वर्दळ असणारे हे ठिकाण आहे...
   आमचे मुख्य आकर्षण होते ते  म्हणजे हत्तीवर स्वार होऊन जंगलात सैर करुन येणे...
      दुसर्‍याच दिवशी भल्या पहाटे आम्ही हत्तीच्या सफारीसाठी जंगलात पोहोचलो...माहूत आपले हत्ती घेऊन तयारच होते...
अंबारीवजा बेंचेस ची व्यवस्था स्वार होण्यासाठी हत्तीच्या पाठीवर होती...बसे पर्यंत थोडी भिती वाटली...पण मग मात्र निश्चिंतपणे मुक्त सैर केली जंगलात...या एक दीड तासाच्या सफारीवर असताना आम्हाला बरेचसे गेंडे, हत्तीचे कळप, हरीण, सुसर असे प्राणी दिसले...
रानरेडे, आणि काही पक्षी एवढीच काय ती संपत्ती दिसली जंगलाची,पण आमची नजर वाघोबाचा वेध घेत होती...पण शेवटी भ्रमनिरासच झाला..हा अनुभव मात्र मजा चाखून गेला आम्हाला...
     दुपारच्या सत्रात जीप सफारी केली...तेंव्हा तरी दिसेल काही असे वाटले, पण छे!एखाद दुसर्‍या गेंड्या शिवाय काहीही दिसले नाही...

      याच परिसरात असणाऱ्या ऑर्चिड पार्क मध्ये मात्र फार उपयुक्त माहिती मिळाली आणि एकाहून एक सुंदर सुंदर ऑर्चिड्सचे रंग, गंध आणि प्रकार अगदी जवळून बघितले...एवढी सारी फुले बघून मन हर्षोल्हासित झाले आणि काझीरंगाला भेट देण्याचे सार्थक वाटले....
  या शिवाय कॅक्टस गार्डन मध्ये कॅक्टस च्या कधीही न बघितलेल्या कितीतरी जाती बघावयास मिळाल्या...अक्षरशः आचंबित व्हायला झाले....
    याशिवाय थोडीफार खरेदीही झालीच... आसामच्या बिहू नृत्याची आणि त्या मागील हेतू विषयी माहिती देत ह्या पारंपारिक नृत्याचे सादरीकरण खास आम्हा पर्यटकांसाठी हॉटल मध्ये आयोजित करण्यात आले होते...या सर्वांचा आनंद घेत आमचा मुक्काम आम्ही काझीरंगा परिसरात केला....निसर्गाशी हितगुज मनाला आनंद दायक वाटले...पण रात्री आणि सकाळी पाऊसाने मस्त जोरदार हजेरी लावत सलामी दिली आम्हाला....पण तारांबळ उडवली नाही मात्र....

काझीरंगा--गोवहाटी 
-------------------------

सकाळी पावसातच काझीरंगाचा निरोप घेऊन आम्ही गोवहाटीसाठी प्रवास चालू केला....
 प्रवेशालाच ब्रह्मपुत्रेच्या पाण्यात  एका बेटावर असणाऱ्या
 "उमानंदा " या अती प्राचीन महादेव  मंदिराला भेट देवून त्या शिवशंभो ला नमस्कार घातला...
जाता येता छोटासा बोटीचा प्रवास करुन घेतलेले दर्शन, व्दारकेच्या बेट व्दारकेची आठवण देऊन गेला....
खरं म्हणजे या रात्री आमचे ब्रह्मपुत्रेच्या पाण्यावर क्रुझ डिनर ठरलेले होते....पण नेमके याच दिवशी आसामचे मुख्यमंत्री शहरात येणार होते आणि याच क्रुझवर त्यांच्या डिनरचे आयोजन केलेले होते....सहाजिकच आम्हाला माघार घ्यावी लागली...
आम्ही आपले छानपैकी हॉटेल डिनर एन्जॉय केले आणि सकाळी परतीचे वेध घेत निद्राधिन झालो...

   हा आमचा सहलीच्या निरोपाचा दिवस होता...शुचिर्भूत होऊन नाश्ता आटोपला आणि गोवहाटीत असणाऱ्यां कामाख्य देवीच्या दर्शनासाठो सज्ज झालो....
साडेतीन पीठापैकी एक असणारं हे एक जागृत शक्तीपीठ आहे...मंदीरात गर्दी बरीच होती...अगदी गावातच असणारं पुरातन मंदिर,कोणतेही मंदिर असू द्यात, तेथील चित्र नेहमीच जसं असतं तसंच सारं सारं होतं येथेही....
मुखदर्शन घेऊन आम्ही देवीला मनोमन नमस्कार केला आणि सहलीची सांगता केली....
दुपारी दोन वाजेपर्यंत एअरपोर्ट गाठावे लागणार होते....तत्पुर्वि सर्वांनी एकत्रित जेवणाचा अस्वाद घेत परस्परांचा निरोप घेतला आणि आपापल्या मार्गावरच्या विमानात स्वार होऊन परतीचा प्रवास चालू केला...
आमचे विमान सर्वांत शेवटी रात्री दहा वाजता होते...
एअरपोर्ट वर बराच वेळ गर्दी ला न्याहाळत अवलोकन केले....
छोटेसेच होते एअरपोर्ट पण संपूर्ण देशाच्या प्रमुख शहरांशी जोडला गेलेले होते हे शहर!त्या मूळे गर्दी भरपूरच होती आणि विमानांची ये जा सुध्दा खूप मोठ्या प्रमाणावर होती येथे...
     ठरलेल्या वेळी आमच्या विमानाने टेक ऑफ केले आणि सहलीला जाताना पौर्णिमेचा पूर्ण चंद्र सोबत घेऊन गेलेलो आम्ही,सहलीहून येताना मात्र काळ्याभोर आभाळात आकाशगंगा आणि कितीतरी लखलखतं चांदणं सोबत घेऊन चाललो होतो....
    फाल्गुनाच्या परतीचा काळ होता तो...चांदोबा मात्र गडप होऊन गेले होते या काळ्या आभाळाच्या पोटात....पुन्हा नव्याने, नव्या रुपात लवकरच प्रकटण्यासाठी.....
आम्हीही अडीच तासाचा विमान प्रवास आणि त्या नंतर पाच तासांचे मार्गक्रमण करत सुर्योदयाच्या साक्षीने आमच्या घरी परतलो....
जगाच्या पाठीवर कुठेही जा तुम्ही सहलीला, पण आपल्या घराची ओढ मात्र कायम आपली सोबत करत असते आणि आल्या नंतर "आपले घर ते आपलेच घर....त्याची सर नाहीच कशालाच.."
हा विचार येतोच येतो.....

समाप्त....
दि. 23-4-2022.


🌹🌹🌹🌹🌹