शनिवार, २९ फेब्रुवारी, २०२०

फुलपाखरू.

फुलपाखरू झालो रे
मी फुलपाखरू झालो

हिरव्या पानांचे पंख
लाऊनी बागेमध्ये आलो
सुपाएवढे पंख लावून
मोर पिसाऱ्या सम
फुलवत पिसारा मी 
  हर्षोल्हासित रे झालो
फुलपाखरू झालो रे...

वाऱ्यासवे खेळून मस्त
आनंदाने डोलू लागलो
गुलाब फुलाचे रुप
घेऊनी राजा बनून
राहिलो
फुलपाखरू झालो रे...

--- नंदिनी.

🌹🌹🌹🌹

हसती खेळती सकाळ.

आली हासत खेळत सकाळ
उधळत पानांतून रंग बहार
आली हासत खेळत सकाळ

हिरवा कंच तो रंगबावरा
पोपटी सुंदर खूप देखणा
पिवळा हळदीचा  नाजूक कोवळा
आली हासत खेळत सकाळ...

अमसुली असे रसभरीत
छानसा
या सर्वांवर मोहोर अलौकिक
लाल गुलाबही हासून देई
हसरी नाचरी रंग पसरवी
आली हासत खेळत सकाळ....

मनांस अवघ्या प्रफुल्लित बनवी
आणि देई नयन सुखही
अपरंपार
आली हासत खेळत सकाळ....

__ नंदिनी.

🌹🌿🌹🌿🌹🌿

गंगाजळी फुलं.

पीत अन् केशरी फुलांनी
हिरव्या पानां सवे हासोनी
शुभप्रभात आली
ताजी तवानी
पीतवर्ण तो चमचमणारा
उगवतीच्या छटा घेऊन
अवतरला या फुलाफुलांतून
केशरी सुंदर सांगतसे
मनातून
मावळतीची आभा गोजिरी
हिरवे पिवळे पर्ण
तटस्थ
तरुवेलींच्या साथीला अविरत
प्रसन्न जाहले मन्मथ
पाहोनी
विराजमान ही फुले
गंगाजळी.

*नंदिनी*

🌺🌻🌺🌻🌺🌻

कुसुम हास्य.

भरगच्च पानांमधून डोकावती
   फुले केशरी नाजूक पाकळीची
प्रसन्न हास्य या कुसुमांचे
मन आपले मोहित करिती
गर्द हिरवा रंग पानांचा
भूलभुलैया या सुमनांचा
करोनी बरसात दव बिंदूंची
गोड फुलांना हसते करिती
पाने फुले ही असे संपत्ती
अवनीची ही आभुषणे कंठीची
करुया सांभाळ या खजिन्याचा
फुलवू आनंद या वसुंधरेचा

*नंदिनी*

🌺🌱🌹🌿🌻🍃🌴

स्वस्तीक पुष्प.

हिरव्यागार प्रशस्त छान
सिंहासनावर मी विराजमान
बाप्पाने रेखला तिलक
 भाळी माझ्या सन्मानपूर्वक
छंद असे माझा अद्भुत
सान्निध्यात बाप्पाच्या रहाण्याचा 
रंग तांबडफुटीचा घेऊन
सजलेला पाच पाकळ्यांचा
आकारले स्वस्तिक चिन्ह
कोरले निसर्गदेवतेने सुंदर
म्हणतात मला जास्वंदी
मी बागेची पट्टराणी
सदा वास माझा
असे बाप्पांच्या चरणी

*नंदिनी*

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

सोनेरी पानाचं भान.

सोनेरी पानाचं हरपलंय भान
लावून दोन लांबलांब कान
सजलंय बघा किती छान
चांदण झुल्यात ठेवत शान
गिरकी घेतंयं वळवून मान 
गालात हसतंय  हळूच खुदकन
अंगणी माझ्या उतरुन पटकन...

*नंदिनी*

🍃🍃🍃🍃🍃🍃

पुष्पांचा एकोपा.

फुलवून आपला पानपिसारा
वेगवेगळी फुले बहरली
रंग निराळे गंध निराळे
एकोप्यानं सुंदर सजले
हासून करीती सुमने सारी
परस्परांचा आदर सन्मान
अरे माणसा तूही शिकावे
फुलांकडूनही काही भान
जन्मुनी अनेक झाडांमधूनी
मुशीत एका किती रमशी
हात हाती घेऊनी सुंदर
फेर धरोनी हसती गाती 
प्रेम मैत्रीची कवने अधिकच
गर्वाने ती नित्य आळवती
मैत्रीच्या नात्यांचा गर्भितार्थ
त्यातूनी उकलून दाखविती....

*नंदिनी*

🎍🎍🎍🎍🎍🎍🎍

गणनायक पुष्प.

गडद गुलाबी कर्ण कुंडलं
इकडून तिकडे हालत डोलत
शुभ्र पांढरा मुकुट मोहक
पुष्कराज तो बैसला ऐटित
वक्रतुंड गणनायक सुंदर
हास्य प्रसन्न ‌सवे घेऊन
भूलोकीचे करीत अवलोकन
ठेवती गणांवर वरदहस्त नीत्
  श्रींच्या चरणी भोळा भक्तगण
 मंगल अनुग्रहे तृप्त अविरत
दंडवत घाली होई नतमस्तक

*नंदिनी*

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

स्वागत सोनेरी पहाटेची.

फुलांनी प्याली पहाटेची आभा सोनेरी
हसली सोनकिरणं त्यामधून साजिरी
भाळलं गोड हास्यावर गुलाबी फुल  देखणं
हलकेच चुंबीत भाळीला कोमल पाकळीनं
घेतलं त्यानं सामावून आपल्यात अलगद
होऊन कुंकुम तिलक उठून राहिलं हसत.

नंदिनी.

शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२०

बहुरंगी पुष्पमेळा.

बहुरंगी फुलांचा मेळा
भास्कराच्या स्वागताला
अधिर जाहला स्पर्शावाला
रवीकिरणाच्या सान्निध्याला

बहुरंगी या फुलांमधूनी
बहुढंगी ती पानं हसली
हरित कणांचे अर्घ्य देऊनी
पर्णिका मनातून तृप्त जाहली

पानाफुलांच्या मुखकमलातूनी
तृप्तीचे तव पाट वाहती
धन्य जाहली अवनी बघूनी
वसंत हसला कणाकणातूनी

बहरु लागली तरुवेलीही
नवचैतन्य सोबतीने घेऊनी
पक्षीही आळवती सुरांतूनी
गोड मधुर तो पावा ओठी.

*नंदिनी*

🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

पुष्प कविता.

हिरव्या हिरव्या कोंदणात
   अवतरली आभ्रकाची फुलं
हसून प्रसन्न स्वागताला
जाहली होऊन सज्ज

  शंखनाद सोबतीला
जल तरंग उठवती
शुभ्रतेच्या प्रकाशानं
आसमंत उजळती

उजळल्या दाही दिशा
उजळले अंबर
आदित्याच्या तेजाला
दिले सृष्टिने समर्पण

सुगंधाच्या कुपीतूनी
सुवास मंद शिंपिती
वाऱ्यासवे झुळूकीतूनी
भारुन टाकती दिशा दिशा

समर्पण सृष्टिचे 
कणकणातून बहरले
पानेफुले तरुवेलीतून
जीवाजीवांत नाहले

धन्य झाली वसुंधराही
समाधानानं तृप्त
ऊभी धरणीमाय अधिर
वसंतोत्सवाच्या सन्मुख.

*नंदिनी*

🌹🌹

पुष्परचनेवर आधारीत कविता.

उंच भरारी घेऊन अलगद
उमलवूनी नाजूक पाकळ्या सुंदर
हसले गाली फूल अवचित
करुनी साजरा साज शृंगार 

गळा वैजयंती नाजूक सोनेरी
हिरवे कोंदण सजलंय भारी
गुलबक्षी पेहराव देखणा लेवूनी
सजली अहा किती फुलराणी

 हासलं चांदणंं सांडून रुपेरी
उमटवूनी गराऱ्यावर नाजूक नक्षी
लगबग चाले किती‌ फुलराणीची 
स्वागता भृंगराजाच्या उभी गोजिरी.

*नंदिनी*

🌹🌹🌹🌹

श्रध्दांजली...

आज,निसर्गही मलूल झालाय... हिंगणघाट च्या"त्या"मुलीचा अतिशय दुःखद, क्लेशकारक अंत झालाय....काय चूक होती त्या मुलीची? केवळ तो "नालायक" मुलगा तिला आवडत नव्हता, तिनं नकार दिला म्हणून?मुळात आपण कोणत्या माणसा बरोबर आयुष्यभर रहावयाचं हे ठरवण्याचा तिचा मुलभूत अधिकार होताच....ती सज्ञान मुलगी सद्सद्विवेक बुध्दीने वागणारीच असावी....त्या मुलाच्या वागण्याच्या पध्दती वरुनच तिनंं आपला नकार दिलेला असावा...नकार देण्यासाठी याशिवाय इतरही भरपूर कारणं असू‌ शकतातच ना....
पण म्हणून असा माथेफारु पण पणा....
आपण सर्वजणही याच समाजाचा एक भाग आहोत....केवळ ऐकायचे,टिव्हीवर बघायचे आणि सोडून द्यायचे का?अशा माणूसकीला काळिमा फासणाऱ्या गोष्टी घडू नयेत म्हणून आपलीही काही जबाबदारी आहेच ना....
आपल्याच घरातूनच अशा प्रकारच्या जबाबदारीची जाणीव आपण आपल्या मुलांना करवून द्यावयास हवी...नैतिकतेचे धडे गिरवण्याची सुरुवात मूळी सर्वांत प्रथम‌ घरातूनच केली जाते....
मुलांना मागेल ती गोष्ट अगदि आणूनच द्यावयासच हवी हा अट्टहास मुलाचाही नसावा आणि पालकांचाही....
मुलांना नकार पचवता यावयास हवा.कोणताही नकार सकारात्मकतेनं घ्यावययस हवा याचे संस्कार बाळकडू त्याला सर्व प्रथम घरातूनच मिळत असततात....
मुख्य म्हणजे त्याला आपल्या जवळ असणाऱ्या सद्सद्विवेक बुध्दीचा उपयोग कसा करावा? याचे पाठ घरातून सुरुवात करत द्यावयास हवेत
तर आणि तरच आपण थोडी का होईना समाज ऋणाची उतराई करण्याचा प्रयत्न केलाय असं मनाला वाटेल...
अशा पिडितांना मानसिक आधार देणं गरजेचं आहे...केवळ मेणबत्त्या दिवे लावून मोर्चे काढून आणि कायदा हातात घेऊन काहीच होणार नाही...
तो नराधम तर फाशीच्याच शिक्षेच्या काबील आहे...त्याला ती कायद्याच्या चौकटीत नक्कीच मिळेल पण अशा प्रवृत्ती उद्भवूच नयेत यासाठी कुटुंब,समाज,शाळा कॉलेज पासूनच संस्कार फार महत्वाचे आहेत....ते पाल्यांवर करणं हे प्रत्येकाचचं कर्तव्य आहे...
त्या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली...

नंदिनी.

😢

सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा.

*आण्णा काका अन् प्रभा काकू*

 मंगल दिन आज
 सोनियाचा आला ।
      रंगला सोहळा 
सहस्त्र चंद्रदर्शन अन्
   अमृतमोहोत्सवाला ।।

  तेजःपुंज दाम्पत्य 
  बैसले सिंहासिनी ।
 उत्सव मूर्ती‌ प्रभा                                  काकूंसह
मूर्ती आण्णा काकांची भारदस्त साजिरी  ।।

 ही लक्ष्मी नारायणाची              जोडी अविरत ।
    असते करीत सतत        प्रेमाची बरसात ।
 स्नेह सावली आप्तांची
बनत.

साऱ्यांचीच ही स्नेह सावली।
  आनंदे क्षण वेचती                     भरभरुनी
कौतुकाच्या वर्षावी सदा हासतमुख जोडी ही देखणी

स्पर्श ममतेचा पाठीवरी
    मुलायम फिरे
     उभयतां करवी
निरपेक्ष प्रेमाचा सागर                   अव्याहत
वाहतसे यांच्या रंध्री ।।

स्नेह सावलीने यांच्या
मिळे आधारवडाची थंड दाट छाया ।
तृप्त लोचने निरखिती
भुषण आप्तजनांचे करीती ।। 

 आनंद मुर्तींची जोडी
जणू खाणच 
ही आशिर्वादांची ।
घालिती सडा अंगणी यशस्वीतेच्या मार्गावरुनी ।।

भरभरुन मुखी त्यांच्या
प्रेमळ आश्वस्त संवाद वसशी।
यथार्थ दिलासा सदा 
आम्हा आप्त स्वकियास
   देती ।।

चालतं बोलतं विद्यापीठ आण्णा काका आमचे असती ।
कुलगुरुचे पद भुषवी
प्रभा काकू विव्दान   विदूषी।।

अभिमान यांचा असे आम्हा आप्तांना ।
 लावी छंद जीवा
 या पितृतुल्य जोडीच्या सहवासा रमण्या ।।

आशिर्वाद रुपी फुलांची
अशीच पखरण त्यांनी करावी ।
अन् उधळलेली फुलं
सारखी मनात आम्ही
मिरवती ठेवावी‌।।

उदंड आयुष्य 
     लाभो उभयता
ईश्वर चरणी प्रार्थना मनस्वी।
 फुलं शतायुषाची वाहण्या 
आस ही आहे सर्वस्वी।।

हृद्य सोहळा शतायुषाचा
पुनःश्च घडवूनी आणा देवा ।
ईच्छा ही आमच्या मनीची आपण पूर्ण करावी देवा पूर्ण करावी देवा।।

© *नंदिनी म. देशपांडे*.

🌹🌹🌹🌹

बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२०

चोचले जिव्हेचे.

चोचले जिव्हेचे.

     उखरी

   चुली मधील निखऱ्यावर छान फुललेली उखरी त्यावर टाकलेला तुपाचा गोळा वितळून घरंगळत ताटभर पसरत जावा...तो ताटात वाढलेल्या भुरक्यात,लोणच्यात मिसळू नये यासाठी आपली होणारी त्रेधातिरपिट....मध्येच तुपाने माखलेली दोन बोटं चाटणं... अणि उखरी गरम आहे तोवर संपवणं....गट्टम करणं.....
     होते थोडी तारांबळ आपली,पण आहाहा!एकदा जिभेवर घास ठेवला रे ठेवला की,ही होणारी तारांबळ कुठच्या कुठे पळून जाते....ऊलट दुसरी गरमागरम उखरी केंव्हा एकदा पानात पडते आपल्या याची वाट बघत असतो आपण....
     उखरी,पानगा अशा वेगवेगळया नावानं प्रचलीत असणारा हा आपला एक पारंपारिक पदार्थ....नाश्त्यासाठी पोटभरीचा.... शिवाय पौष्टिकपणा सोबत ठेवणारा...जेवणातही हमखास चालेल असा...पण बरं का,ही उखरी अशीच कोरडी कोरडी तूप,भुरका,लोणचं, आणि शेंगदाण्याची चटणी अशीच खाण्यात गम्मत आहे... म्हणूनच ती जेवणात नको वाटते...
     आधुनिक काळात निखाऱ्यांवर भाजलेली उखरी खाणं दुरापास्तच.पण,लोखंडी झाऱ्यावर गॅसच्या फ्लेमच्या मध्यम आचेवर ती बनवता येते...थोडंसं तेलाचं किंवा तुपाचं मोहन घालून दुधात घट्ट भिजवलेल्या कणकेची हातावर थापून बनवलेली उखरी चवदार लागते....छानशा भाजलेल्या उखरीचा स्वाद जिभेला कशी भुरळ घालतो ते कळतही नाही.... त्यामूळे करावयास थोडं पेशन्स लागलं तरीही बदल म्हणून आठवड्यातनं एकदा अगदी चालण्यासारखं आहे....
मी करत असते नेहमी अशी उखरी,पण लहानपणी आजोळी आजीज्या हातच्या खाल्लेल्या चुलीतील निखाऱ्यावर बनवलेल्या पानग्याची आजही आठवण येतेच येते....

 *नंदिनी म.देशपांडे*.

😋😋

शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२०

भुवनेश्वर.

*ॐ नमः शिवाय*

लिंगराज मंदिर, भुवनेश्वर
ओरिसाची राजधानी भुवनेश्वर,नावच मुळी या मंदिरामूळे पडलंयं...भुमीतून स्वयंभू निघालेली लिंगराजाची मुर्ती ह्या शहराची शान आहे....
बारा ज्योतिर्लिंगाचा राजा असणारे लिंगराज देवाचे दर्शन घेणं म्हणजे बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेणं होय...येथे फोटो काढण्यासाठी परवानगी नव्हती....पण या शिवपिंडीमध्ये विष्णू आणि शिव दोघे एकत्रित वास करतात.शिवपिंडीच्या मध्यभागी खोल जागेवर विष्णूंचे शाळीग्राम आहेत....
    येथे एकाचवेळी पिंडीवर तुळशीपत्र आणि बिल्वपत्र वाहिले जाते....
भुवनेश्वर मंदिरांचे शहर  मानले जाते....येथे १००० मंदिरं आहेत... त्यांपैकी केवळ एक मंदिर विष्णूचे आहे बाकी सर्व शिवाची आहेत...म्हणून शिवाला वाहिलेलं हे शहर....
भुवनेश्वर शहरातील सिध्देश्वर आणि मुक्तेश्वर या दोन मंदिरांची ही उत्कृष्ठ शिल्पकला....

*नंदिनी म.देशपांडे*

🌹🌹


शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०२०

सोरटी सोमनाथ.

*सोरटी सोमनाथ*

सौराष्ट्र सोमनाथंच  श्रीशैले मल्लिकार्जुनम्। उज्ययिन्यां महाकाल ओमकारम मल्लेश्वरम्। परल्या वैजनाथंच  डाकिन्यां भीमाशंकरम्।  वाराणस्या तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे। हिमालये तु केदारं
घृष्णेशं शिवालये ।।

पवित्र अशा बारा ज्योतिर्लिंगाची महती सांगणारा हा श्लोक मनात सारखा रुंजी घालत होता, जेंव्हा आम्ही द्वारका नगरी चा निरोप घेऊन सौराष्ट्रातील सोमनाथा च्या वाटेवर गाडीत बसून धावू लागलो. द्वारके हुन सोमनाथाकडे जाताना आपण आता हळूहळू समुद्रसपाटीच्या समिप जात आहोत, याची वर्दी हवेतील दमटपणा आणि खाऱ्या पाण्याचा एक विशिष्ट वास आपल्याला देत आहे, असे लक्षात आले,
   
    आमच्या या प्रवासात मार्गावर पोरबंदर या शहराला भेट दिली. पोरबंदर हे शहर, श्रीकृष्णाचा बाल पणीचा मित्र, सुदामा यांचे जन्मस्थान.सुदामाचे छोटेसे मंदिर येथे बघावयास मिळते.या परिसराला 'सुदामपुरी', असे संबोधले जाते.

    या शहराची आणखी एक महत्त्वाची ओळख म्हणजे, राष्ट्रपिता महात्मा गांधींचेही हे जन्मगाव. त्यांचे निवासस्थान गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी अगदी बाजाराला लागूनच आहे.आज जुन्या पद्धतीच्या रचनेने युक्त असे तीन-चार खोल्यांचे हे छोटेखानी घर बघताना, महात्मा गांधी यांच्या बाबत इतिहासात सांगितलेले अनेक प्रसंग आपण वाचले आहेत याची आठवण होते. त्यांच्या जन्माच्या वेळी साक्षीदार असणारी ती खोलीही खास आठवण म्हणून आज दाखवली जाते पर्यटकांना.

याच मार्गावर "भालका तिर्थ",हे ठिकाण बघण्याचे प्रचंड कुतूहल होते आमच्या मनात! तुम्ही म्हणाल येथे काय असे विशेष होते? पण खरंच,महाभारताच्या दृष्टीने आणि कृष्ण अवताराच्या दृष्टिने या जागेला विशेष असे महत्त्व प्राप्त झालेले आहे. भालका तीर्थ म्हणजे ज्या ठिकाणी एकशे पंचवीस वर्ष आयुष्य लाभलेल्या श्रीकृष्णांचा वध झाला ते ठिकाण.आश्चर्य वाटलं ना कि देवांनाही मृत्यू असतो हे ऐकून! त्यांचाही वध होऊ शकतो याचे!पण, दुर्दैवाने हे सत्य आहे. जरा नावाच्या एका पारध्याने आपला बाण श्रीकृष्णांच्या पायाच्या अंगठ्यावर मारला. केवळ अनाहूतपणे ही कृती या पारध्याकडून घडली. पण ती श्रीहरीचा प्राण घेऊन गेली,असेच म्हणावे लागेल.
  श्रीकृष्ण एका पिंपळाच्या झाडाखाली दुपारची वामकुक्षी घेत होते. एका पायाच्या गुडघ्यावर दुसऱ्या पायाचा तळवा टेकवून पहुडलेल्या स्थितीत ते असताना, जणू काय हे हरिणच आहे.असे समजत लांबून या पारध्यानं हरणाची शिकार करण्यासाठी म्हणून बाण मारला.तो नेमका श्रीकृष्णांच्या पायाच्या अंगठ्यात  घुसला आणि श्रीकृष्ण गतप्राण झाले. याठिकाणी आजही त्या झाडाचे अवशेष दिसून येतात. त्या जागेवर कृष्णाची त्याच अवस्थेत झोपलेली मूर्ती आपण बघतो. जणू हा सारा प्रसंग आपल्या डोळ्यासमोर तरळून जातो.
   देवांचा अंत घडून आलेलं भालका तीर्थ पाहून क्षणभर मन हेलावून जातं.

 यानंतर आम्ही भारतमाता मंदिराला भेट दिली.अगदी ओसाड ठिकाणी,जिथे फारशी वर्दळही नाहीए,अशा ठिकाणी एका भव्य हॉल मध्ये हे मंदिर आहे.माझ्या कल्पने नुसार तेथे आपल्या भारत मातेची मूर्ती असावी असे वाटले होते.पण तसे नव्हतेच.तेथे सिमेंटच्या असंख्य उंचच उंच खांबावर,भारतमातेच्या उदरात जन्म घेतलेल्या असंख्य सत्पुरुषांच्या आणि विदुषींचे मोठी मोठी पेंटिंग्ज आहेत.ते बघून अभिमानाने आपला ऊर भरुन येतो.
त्यात आपले ज्ञानेश्वर माऊली आणि जिजाऊ पण आहेत.ह्या सर्वांची चित्र रुपानं होणारी ओळख मनावर कोरली जाते कायमची.या शिवाय याच ठिकाणी खाली जमिनीवर प्रचंड मोठा असा भारत मातेचा नकाशा, सिमेंटच्या सहाय्याने कायम स्वरुपी बनवलेला आहे.त्यामूळे भारत मातेच्या कानाकोपऱ्याची आपल्याला पटकन ओळख होते.खूपच सुंदर ठिकाण आहे हे.पण येथे पर्यटकांची फारशी वर्दळ दिसत नाही याचे शल्य वाटले मनाला.

    सायंकाळच्या सुमारास समुद्राच्या काठाकाठाने आपण सोरटीसोमनाथ या शिवालयाच्या सानिध्यात पोहोचलो. हे लक्षात आलं. 
   सोमनाथ,
 बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले असणारं असं खूप प्राचीन, सागराच्या संगतीनं, या निसर्गाचं, हवामानाचं, एवढेच नव्हे तर, काळाच्या ओघात होऊन गेलेल्या वेगवेगळ्या राजसत्ता, त्यांच्या राजकारणाचे अर्थकारणाचे आणि समाजकारणातील चढ उतारांचे चटके या दोघांनी सहन केलेले. यांच्या घणाघाताने तावून सुलाखून निघालेल्या या सागर लहरींनी आणि मंदिराच्या एका एका पाषाणाने ढाल बनवून या शिवलिंगाची प्राणपणाने जपवणूक केली. त्याच्यावर कोणतीही आंच येऊ न देता त्यांच्या देवत्वाचं संरक्षण केलं. म्हणूनच आपण सर्वजण आज मोठ्या भक्तिभावाने या सोमनाथा समोर नतमस्तक होऊन चार क्षण मनःशांती मिळवत कृतकृत्य होतो. प्राचीन मंदिर थोडेसे अलीकडे, हेमाडपंथी असून त्यात तळमजल्यावर  मन प्रसन्न करणारी शिवपिंड आहे कालांतराने अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला असे इतिहास सांगतो.

 सागराच्या समीप असणारे सोमनाथाचे मंदिर बांधले ते सोनेरी पाषाणात! हे अतिशय भव्यदिव्य स्वरूपात बांधलेलं आहे. १९५१ साली स्थापन झालेल्या या मंदिरात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या हस्ते शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.पश्चिमेच्या सागर किनाऱ्यावर वसलेले हे देवालय, तीर्थक्षेत्र अतिशय रम्य आणि अप्रतिम आहे. मंदिराच्या भिंतीवरून सागर लाटा न्याहाळताना आपण कितीतरी वेळ उभे आहोत हे लक्षातही येत नाही!जणू काही या मंदिराच्या वैभवशाली इतिहासाची कहाणी सागर आपल्याला कथन करतो आहे असं वाटत रहातं.
   सायंकाळी मंदिराच्या गाभाऱ्यात होणाऱ्या आरती चा महिमा काय वर्णावा !भव्यदिव्य स्वरूपात होणारी आरती बघताना आपण भक्तिरसात न्हाऊन निघतो. त्यानंतर मंदिराच्या आवारात मंदिरावर दाखवण्यात येणारा साऊंड आणि लाईट शो केवळ अप्रतिम!मंदिराची गाथा आपण याच वास्तूच्या तोंडून प्रत्यक्ष ऐकत आहोत ईतपत भास व्हावा असे आपण यात रममाण होऊन जातो. हा सारा इतिहास ऐकून आपण अक्षरशः भारावून जातो. पुन्हा एकदा या ठिकाणाला भेट देण्यासाठी यावयास हवेच. ही ईच्छा मनोमन व्यक्त करतो आणि तेथे मिळणारा चुरम्याच्या लाडूचा मधुर प्रसाद जिभेवर ठेवतो...

© 
*नंदिनी म. देशपांडे*

✴️✴️✴️✴️✴️✴️

मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२०

चोचले जीव्हेचे!😋

चोचले जीव्हेचे.😋

"कंटाळा आलाय ती बटाट्याची भाजी,ते आलू पराठे आणि तो बटाटेवडा खाऊन खाऊन....आता ना एक महिना तरी मी अजिबात हात नाही लावणार त्या बटाट्याच्या पदार्थांना",...."मी पण आणणारच नाही आता बटाटे मंडई मधून...."
 हे असे संवाद अगदी घडतातच एखादी पर्यटन टूर करुन आले की....कधी एकदा घरी पोहोंचतो आपल्या,नी कधी एकदा गरमा गरम खमंग पिठलं भात खातो आपण असं वाटतंच वाटतं अगदी....
किती तरी दिवसांत जीव्हेला चवदार अन्न मिळालेलंच नाहीए...हे खाऊन तोंडाची गेलेली चव परत येते हा ठाम विश्वास असतो‌च असतो आपल्याला... 
अस्सल महाराष्ट्रीयन डिश ही कोणालाही प्रेमात पाडणारी....
पण,पिठलं त्यातही टोमॅटोचं, थोडसं आंबूस थोडं पातळसर गरम वाफाळलेल्या मऊसूत भातावर तूपाचा गोळा टाकून खाण्यापेक्षा कधी कधी खमंग ‌पिठल्यातला शिजवलेला भातच जिव्हेला मोहात पाडतो मला तरी....एकत्रित शिजवल्यामूळे तो एकजीव बनत आणखी चवदार लागतो....तो रसरशीत पिठल्यातला भात टोमॅटो हिंग,जिरं युक्त असा आणि वरतून लोणकढ्या तूपाची धार,सोबतीला ठेचा,कच्चे शेंगदाणे,कांदा असेल तर अशा गरम गरम पदार्थाची चव काय व्दिगुणित होते म्हणून सांगू!....
वा!व्वा! आठवड्यातून एकदा तरी रात्रीच्या जेवणासाठी ही डिश बनवायलाच हवी....अशीच प्रतिज्ञा नक्कीच घेतली जाईल घराघरांतून....बघा तर एकदा चव घेऊन....

*नंदिनी म.देशपांडे*