शनिवार, २७ मे, २०२३

फुलांचा हार.

फुलांचा हार
-‐------------------------------

आहाहा! किती सुवासिक, नाजूक शुभ्रफुले गुंफली आहेत ही...अगदीच ताजी ताजी....सारखं हाताळून खराब हण्याची भिती वाटते...असाच सारखा बघत रहावा असे वाटते...
पण याकडे बघत असताना कितीतरी विचार मनात येवून गेले...
     खरं म्हणजे हा सुंदर हार देवघरातील देवाच्या तसवीरीवरच जास्त शोभून दिसेल...मध्यभागी केशरी फुलांचे पदक आणखी सौंदर्य खुलवत जाते आहे...देवाच्या मुर्तीच्या गळ्यात विषेशत्वानं खुलेल हा हार!असो...

  एखाद्या नवपरिणीतेच्या केसांमध्ये माळून याच हाराची हेतूच बदलेल नाही का?नव्हे तो केसांत गजरा म्हणून छानसा मिरवेल...
लाजत मुरकत आपलं आरसपाणी सौंदर्य बहराला आलंयं याची जाणीव तिला करवून देईल...
    
     पण जर हार  एखाद्या पुढार्याच्या किंवा उत्सव मुर्तीच्या गळ्यात गेला, तर मात्र अजून एक अर्थ घेऊन येईल, ज्याला सत्कार, कौतूक असे म्हणता येईल....
    
     हाच हार शुभमंगल प्रसंगी नवरा नवरीच्या गळ्यात पडतो, आणि दोघेही परस्परांच्या गळ्यातील ताईत कधी बनून जातात त्यांनाच समजत नाही...आहे की नाही गम्मत!
     
    पण असाच हार एखाद्या व्यक्तीच्या फोटोला घातलेला असेल तर एकदम संदर्भच बदलतो...
यामागचा हेतू आणि उद्देश दोन्हीही पापणीच्या कडा ओलावणारे....

    एखाद्या यंत्रावर, वस्तुंवर, असेच काहीसे घाालेले हार मात्र उद् घाटनाचा,नवेपणाचा आपला बाझ सांभाळून असतात...तर....
घरांवर सणावाराला लावलेले हार उत्सवी वातावरण सोबत आणतात...सार्या घराला आनंदी उत्साही बनवतात...
  
    आणि....आणि....  हाराने जर सरणावरच्या निर्जीव कलेवरावर जागा शोधली तर...तर. 
....निःशब्द व्हायला होते...काय बोलणार....

     तर अशा प्रकारे हार फुलांचाच असतो, तो कधी मनात भक्तीभाव निर्माण करतो, कधी प्रणय भावना जागृत करतो तर कधी कधी कौतुकाची थाप पाठीवर देतो....हाच हार नवरा बायकोची लग्नगाठ बांधतो तर
       कधी उत्सव, उत्साह यांना मनसोक्त दाद देतो तर 
      कधी आठवणींच्या मोरपिसारा फुलवतो...तर तर कधी मनातील व्याकुळता हुरहुर यांचे प्रतिक बनतो...
      " हार " (फुलांचा)अशा पधादतीने संदर्भाने आपला हेतू बदलतो भावनांचा आदर करत स्वतःचे अस्तित्व जपून असतो...आणि लोकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण करतो...
हार एकच तरीही संदर्भाचे कोंदण लागले की आपल्या मनातील भावनांना वाट करवून देतो....अशी बहुपदरी ख्याती सांभाळत आपले महत्त्व कायम ठेवतो तो असाच फुलांचा हार असतो....काय खरे आहे ना?

©️नंदिनी म.देशपांडे. 

🌹🌹🌹🌹🌹🌹

मंगळवार, १६ मे, २०२३

पहाडांचा देश,भुतान....

*पहाडांचा देश*,    
*"भुतान"*
***********
लेखिका-
©️नंदिनी म. देशपांडे.

           आठ दहा वर्षे झाली...सर्वांत अगोदर हिमाचल प्रदेशाची एक  पर्यटक म्हणून सैर केली...थोडी वाटली भिती,तेथील वळणावळणांचा प्रवास,ते खचलेले रस्ते, पाण्याच्या प्रवाहाने सातत्याने उघडी पडलेली वळणं आणि ड्रायव्हिंग साठी लागणारं विशेष कौशल्य हे सारंच थोडसं छातीत धडकी भरवणारं असं होतं...भव्य पहाडी प्रदेशातून मोठी म्हणावी अशी ती पहिलीच सहल!
   नंतर दोन एक वर्षात, कश्मीरची सहल केली...अर्थातच भारताचे एक सुंदर "नंदनवन" याच दृष्टिकोनातून तेथील निसर्ग न्याहाळला आणि तेथूनच मग हिमपर्वतांच्या आणि हिमालयाच्या रांगड्या पहाडांच्या आम्ही दोघेही जणू प्रेमातच पडलो...

         हिमालयिन रांगांमधून भटकंती साधत, त्याच्या सहवासाची ओढ काही स्वस्थ बसू देत नाही आजही...हाच धागा पकडून उत्तरांचल, अरुणाचल ह्याही प्रदेशांमध्ये भटकंती पार पडली आमची...आणि गेल्या आठवड्यातच "भुतान" या छोट्याशा देशाची सैर केली...
       किती छोटा देश तो!केवळ वीस जिल्ह्यांचा!अहो आपल्या महाराष्ट्राएवढाही नाही!आश्चर्य वाटले...बघण्याची उत्सुकता जागी झाली आणि तडीसच नेली...

       कोरोना काळापासून बाहेरच्या कोणत्याही एअरवेज ला परवानगी नाही या देशात....
     सहाजिकच बागडोगरा या प. बंगाल मधील शहरापर्यंत विमानाने गेलो आम्ही, आणि बागडोगरा या भुतान आणि भारताच्या सीमेवरच 'इमिग्रेशन' आणि 'व्हिसा ऑन अरायव्हल' या प्रक्रिया पूर्ण करत, मिनी बसने या देशाच्या सफरीवर निघालो आम्ही!
      गाडी सुरु झाली, आणि पाच दहा कि.मी. पर्यंतही गाडी वेग घेते न् घेते तोवर मोठ्या मोठ्या डोंगर रांगांमधून वळणं गिरक्या घेत आहेत लक्षात येऊ लागले...

         स्वच्छ व चकचकीत रस्ते, रहदारीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणारे बसचे हसरे चालक, रहदीरीसाठी आवश्यक सुचनांचे स्पष्ट फलक आणि मार्किंग हे सारेच आम्हा भारतीयांना आचंबित करणारे होते...आपल्याला सवयच नाहीए ना एवढ्या व्यवस्थितपणाची!
         अतिशयोक्ती सोडा पण या देशाची एकूण लोकसंख्या केवळ साडेसहा ते  सात लाख,  हेच याचे गुपित असावे असे वाटते....
     असंख्य पहाडांच्या कुशीत ,मनमोकळ्या विशाल अशा सौंदर्यपूर्ण निसर्गाच्या सान्निध्यात आणि अल्हाददायक हवामानाच्या लयीने आपले आयुष्य जगणारा हा देश आपल्या भारतीय घड्याळापेक्षा बरोब्बर अर्धा तास पुढेच धावतो!
      फारसा प्राचीन असा इतिहास नसणारा हा भुतान तीन वेळेला,म्हणजे एकदा ब्रिटिशांच्या, एकदा तिबेटच्या तर एकदा उल्फा अतिरेक्यांच्या चढाईला सामोरा गेला पण निधड्या छातीने आणि हिमालयिन रांगांच्या ढालीने यावर मात करुन गेला...हे सांगत असताना, आमच्या बसचा गाईड, जिमी त्याचे नाव,अभिमानाने उर भरुन आला होता....
      
     असंख्य गिरक्या घेत  शुध्द हवेचा अविरत स्रोत श्वासांमध्ये किती साठवून घ्यावा असेच वाटत राहिले....आपल्याकडे एवढ्या शुध्द हवेची वाणवा तर येथे प्रदुषणातील 'प्र' सुध्दा कुणाला माहिती नाही अशी परिस्थिती!
       शुध्द, गारेगार, अल्हाददायक हवेची सोबत, संगतीला ऊन सावलीचा खेळ आणि कधी कधी आकाशातील काळ्या मेघांची गर्दी सारंच हवंहवंसं!

         असा चाललेला प्रवास फुंगशुलिंग या पहिल्या मुक्कामी घेऊन गेला आम्हाला....रात्रभर आराम
झाल्यानंतर दिवसभराचा प्रवासाचा शिण पार पळून गेला...सकाळी नऊ वाजता भरपूर ब्रेकफास्ट आटोपून आम्ही भुतानच्या राजधानीचे शहर,"थिम्पु" या ठिकाणासाठी निघालो...अंतर कमी असले तरीही घाटाच्या रस्त्यांवरून ते कापण्यास वेळ जरा जास्तच लागतो...

         थिम्पु या राजधानीच्या शहरात आम्ही दाखल झालो, तेंव्हा सायंकाळ होत आलेली होती...जास्त उंचीवर आल्याने हवेतील गारठा वाढलेला जाणवला...हॉटेल च्या रुम मध्ये वॉर्मर्स होती त्यामूळे बाहेर आल्याशिवाय हवामानाचा अंदाज येत नव्हता....थिम्पु मधील ट्रेक आणि व्हॅलीज दोन्हीही छानसे एन्जॉय करता आले...
      सकळी नाश्ता आटोपत शहर आणि परिसर रपेटीला निघालो...
सर्व प्रथम आम्ही, तेथील राजाचे स्मृतिचिन्ह म्हणून उभे असलेली सर्वात जुन्या असणाऱ्या  मॉनेस्ट्रीला भेट दिली...
     मागच्या वर्षीच अरुणाचल प्रदेशातील आणि या वर्षी भुतान मधील बऱ्याच मॉनेस्ट्रीज बघण्याची संधी मिळाली....पण दोन्हीही वेगवेगळ्या विचारधारांनी प्रेरित आहेत आणि त्यांचे तत्त्वज्ञानात सुध्दा थोडाफार फरक जाणवला...देशपरत्वे फरक जाणवणे अगदीच सहज शक्य आहे...
      भव्यदिव्यता, स्वच्छता आणि शांतता या तीनही गोष्टी दोन्ही प्रदेशात सारख्याच होत्या, पण या मठांच्या वास्तू रचनेत फार फरक वाटला....
       बौध्द धर्मातील आद्य पुरुष पद्मनाभ आणि गौतम बुद्ध यांच्या प्रचंड मोठ्या मुर्ती माणसाची नजर खिळवून ठेवतात....शिवाय गाभाऱ्यात चोहोबाजूंनी मांडुन ठेवलेल्या छोट्या छोट्या मुर्ती आपले लक्ष वेधून घेतात...
           कोणत्याही मॉनेस्ट्री  मध्ये अतिशय सुंदर असे रंगीबेरंगि कोरलेले काष्ठशिल्प फारच अप्रतिम आहे...त्यात मोठमोठ्या दालनात भलेमोठ्ठे सुबक खांब आणि त्यांवरील शिल्प मनाला भुरळ घालतात. या शिल्पांमध्ये बौध्द धर्माच्या प्राचीन वाङमयावर प्रकाश टाकलेला दिसतो...
       अतिशय व्यापक जागेवर बांधल्या गेलेल्या या दिव्य वास्तू मनाला शांतता बहाल करतात....
     या नंतर "ताशीचू डॉंग्झ" ,थिम्पुमधील नॅशनल लायब्ररी, ज्यात पवित्र अशा अनेक धार्मिक आणि मौल्यवान पुस्तकांचा फार मोठा संग्रह आहे...काही तर हस्ताक्षरात लिहिलेली, जीर्ण झालेली आहेत पण व्यवस्थित पध्दतीने जपलेला हा ठेवा छानच आहे....येथेच, ज्याचे गिनिज बुक ऑफ वल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेले विशालकाय कारातील पुस्तकही बघावयास मिळाले...
       गौतम बुध्दांचा प्रचंड मोठा अणि अती उंच असा भव्य् पुतळा असणारा बुध्दा'ज पॉईंट बघताना, माणूस रममाण होतो...या उंचीवरुन थिम्पु शहराचा नजारा फारच आकर्षक वाटतो...व्हॅलीत वसलेले शहर धुक्याची दुलई पांघरुन बसलंय असा भास होतो....
     फोल्क हेरिटेज म्यूझियम बघितले आणि आपल्या प्राचीन काळातील दैनंदिन जीवनाचा मोठा भाग असणारी अवजारे, वस्तू,आणि साधनं यांची आठवण झाली...
    जगाच्या पाठीवर कुठेही असो,अलवार उत्क्रांत होत होतच मानवाने प्रगती साधली आहे हे निर्विवाद सत्य होय!

       एका विशिष्ट झाडाच्या साली पासून कागद बनवण्याची प्रक्रिया अगदी जवळून प्रात्यक्षिकासह बघण्याची उत्सुकता पुर्णत्वास गेली, ज्यावेळी आम्ही ट्रॅडिशनल पेपर फॅक्ट्रीला भेट दिली...
        पेंटिंग आणि वुडन कार्व्हिंग जेथे शिकवले जाते अशा प्रशिक्षण केंद्राला भेट दिल्यानंतर त्या मागची मेहनत, एकाग्रता आणि कार्य कौशल्य यांचा सुरेख मेळ साधत बनवलेल्या वस्तू बघून या हस्तकौशल्याला खरोखरच सलाम करावासा वाटतो...हा भुतान मधील मोठ्या प्रमाणावर असणारा कुटिरुद्योग असणार हे नक्कीच...
      पाईन वृक्षांची मुबलकता, पहाडांचा गराडा आणि जंगलांचे अस्तित्व या साऱ्या गोष्टी भुतीनीज लोकांसाठी वरदान ठरल्या आहेत..
      "ताकिन"नावाचा प्राणी हा भुतानचा राष्ट्रीय प्राणी आहे...हा अत्यंत रागीट आणि थोडासा अस्ताव्यस्त म्हणावा असाच...तो बघण्यासाठी "मोतथँग झू" ला थोडा ट्रॅक करत भेट दिली...पण तो झोपलेलाच दिसला आणि निराशा पदरी पडली...
    हा प्राणी मला, केरळ मध्ये बघितलेल्या "वारायाडू" या प्राण्याशी साम्य सांगणारा वाटला..
     दोन दिवस दोन रात्री थिम्पुमध्ये घालवल्याचे सार्थक वाटले...
महाराष्ट्रातील उन्हाची काहिली टाळत थंड हवेच्या ठिकाणी आल्याचे समाधान फार मोठे होते...

         तिसऱ्या दिवशी आमच्या बस ने थिम्पुहून पुनाखा च्या दिशेने प्रस्थान केले...बोलका आणि पदवीधर असणारा गाईड प्रवास चालू असताना आम्हाला भुतानच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थिती विषयी माहिती द्यायचा....राजेशाही पध्दतीचा स्विकार करणार्या भुतान देशातील नागरीकांनी तेथील वंशपरंपरागत राजेशाहीला डोक्यावर घेतलंयं असं जाणवलं...राजाचे स्थान त्यांना ईश्वरापेक्षा काही कमी नसावे असेच वाटत राहिले....ठिकठिकाणी ओळीने प्रत्येक राजाचे तसेच त्याच्या परिवाराचे मोठे मोठे फोटोज येथे लावलेले दिसतात....कोरोना काळात राजाने आपले शेअर्स विकून लोकांसाठी निधी ऊभा केला व मदत केली, याची कृतज्ञता जनता तेथे व्यक्त करते....भारत मित्र राष्ट्र असून दोन वेळेला मोदीजींनी भुतान ला भेट देवून आर्थिक मदत केली याचीही वाच्यता त्या गाईडने आवर्जुन केली...
      राजाने, आपल्या राणीची निवड अगदी सामान्य माणसांमधून केली आहे याचा या नागरीकांना अभिमान वाटतो...
        समाजात मुलींचे स्थान वरचढ आहे...घटस्फोटाचे प्रमाणही बरेच वाढते आहे हे लक्षात आले....
       हॉटेल व्यवसायात आणि इतरही व्यवसायात मुलींचे प्रमाण मोठे आहे...अगदी मेहनतीची कामं करण्यातही.... प्रशाकीय क्षेत्रात मात्र पुरुषांचे वर्चस्व असावे असे समजले...असो....

      थिम्पुहून पुनाखाला जाताना आम्ही 3100 मी.उंचीवर असणारा रम्य असा डोचुला पास हा व्ह्यू पॉईंट बघितला....हवेतील थंडावा, आजूबाजूला हिरवळीने फुललेल्या छोट्या मोठ्या टेकड्या, आणि झुळूझुळू वाहणारी हवा अंगावर रोमांच उठवत होती...अशा वातावरणात गरमागरम कॉफीचा आस्वाद म्हणजे सोनेपे सुहागा! बराच वेळ रेंगाळत तेथे फोटोशुट करणे आनंद देऊन गेले...
      उल्फा अतिरेक्यांशी लढताना मारले गेलेल्या एकशे आठ लोकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भुतानच्या राणीने बांधून घेतलेले एकशे आठ स्तुप  येथे एका टेकडीवर आहेत....त्यापैकी प्रत्येकाचे बलिदान फार मौल्यवान असल्याचे गाईड ने सांगितले....
     बसचा कॅप्टन अगदी हसरा आणि रिकापणात सुरेल बासरी वाजवण्यात मग्न असायचा...

         डोचुला पास वरुन पुनाखात प्रवेश करण्यापुर्वि आम्ही, भुतान मध्ये लांबीने दुसर्‍या क्रमांकाचा असणारा सस्पेन्शन ब्रिज पादाक्रांत केला....नदीच्या विशाल पात्रावर आपण तरंगत चालतोय ही कल्पना चालताना मध्यावर आलो आपण,की धडकी भरवते...पण आल्हाददायक वातावरणात मजा आणली या रपेटीने!वार्‍या चा वेग चालताना काळजी वाढवत होता मात्र...

       भुतान मधील "पुनाखा" हे शहर बऱ्या पैकी मोठे आणि राजधानीचे जुने ठिकाण...येथे आम्ही पुनाखा डिझॉंग ला भेट दिली...डिझॉंग म्हणजे जिल्ह्याचे ठिकाण आणि प्रशासकीय कामकाज चालवणारी सारी कार्यालये एकाच आवारात असणारे ठिकाण....किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असे आपण म्हणू शकतो...बाहेरुनच या मोठ्या मोठ्या ईमारती नजरेखालून घातल्या...अगदी अप टू डेट असणाऱ्या या नेटक्या इमारती अभूतपूर्व स्वच्छता राखून होत्या आणि रंगीबेरंगी पानाफुलांच्या विषेशत: गुलाबाच्या वाफ्यांनी सजवलेल्या होत्या....त्यामुळे ही निरस ठिकाणंही रमणीय बनलेली होती....
        सुर्यास्त होण्यपुर्वि आमच्या पैकी बऱ्याच जणांनी पुनाखात रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेतला...मी मात्र दुरुनच हे सारं न्याहाळण्यात धन्यता मानली...

         भुतान मध्ये मला सर्वांत जास्त आवडलेले शहर आणि निसर्ग म्हणजे पारो....जिल्ह्याचे ठिकाण, निसर्गसौंदर्याने नटलेले....खरे तर अख्खा भुतान देश निसर्गावर निस्सिम प्रेम करणारा आणि त्याला धक्काही लागू नये याची कळजी वाहणारा...निसर्गाला न छेडता होईल तेवढीच प्रगती साधणारा..."हेल्पिंग नेचर स्विकारत सदैव आनंदी रहाण्याचा मूलमंत्र सांगणारा असा....

          पारो,आणखीन उंचावरचे आणि सहाजिकच थंडी असणारा परिसर...ही आरामदायक सहल आपल्याकडच्या उन्हाळ्याला काही दिवस पर्याय म्हणून होती...त्यामूळे येथे आरामात तीन दिवस राहिलो आम्ही...
         पहिल्या दिवशी थोडे तेथील मार्केट मध्ये फिरुन हस्तकौशल्याने बनवलेल्या काही वस्तुंची खरेदी साधली....मार्केट अगदी छोटेसेच....ओळीने दुकानं, पर्वतराजींनी आणि त्यातही हिमपर्वतांनी वेढलेलं हे शहर...कुठुनही दिसणारा निसर्गाचा नजारा बघतच रहावा असाच...क्षणभर येथे रहाणार्‍या स्थानिक लोकांचा हेवा वाटला...असो. 
       दुसरा दिवस पारो मधील काही मॉनेेस्ट्रीज, डिझॉंग बघण्यात अर्धा संपला...कुठलेही ठिकाण बघावयाचे म्हटले की, बराचसा ट्रेक असायचाच...कधीही ट्रेकला न गेलेली मी भुतान मध्ये एवढी चढ चढतच राहिले याचे मलाच फार आश्चर्य वाटले...
        'पाय बोलणं','पायांचे तुकडे पडणं ' वगैरे वाक्प्रचार येथे प्रत्यक्ष अनुभवले मात्र झोपही पटकन आणि मुरमुसून लागायची...
       पारो परिसरात बघितलेला सर्वात प्राचीन आणि अगदी कठिण असा खडा 6 कि.मी. ट्रेक असणारा,ता झांग् प्राचीन ताक्शँग (टायगर्स नेस्ट) मॉनेस्ट्री...एवढा ट्रेक शक्यच नव्हते...आम्ही आपला व्ह्यू पॉईंट बघत खालूनच फोटो कढले...
   उंच डोंगरात कपारीमध्ये बनवलेली ही मॉनेस्ट्री महंतांनी ध्यानधारणेसाठी उपयोगात आणल्याची सांगतात....याच्याच पायथ्याशी असणारं पाईन वृक्षांचं जंगल मात्र वेड लावतं मनाला....उंचच उंच असंख्य वृक्षांना पाईन ची ती शेंगा वजा फळं लगडलेली होती...आणि हवेतील थंडगार गारवा यथेच्छ सोबत करत होता...

             आमच्या गाईडने, तेथील पुरुष वर्गात सारखे विड्याचे पान चघळणाच्या सवयीला धार्मिक अधिष्ठान असल्याचे सांगितले....
पण तेथील स्त्रियांना हे वागणे फारसे आवडत नाही हे सांगावयास तो विसरला नाही....
            पण गोरीगोरीपान तेही चकचकीत!बसक्या नाकांची ही माणसं पान खाण्याच्या सवयीने कायम लाल चुटूक ओठ घेऊन लिपस्टिक लावून असतात....

       "चेलेलापास" भुतान मधील मोटर वे ने जाण्यासारखे सर्वात उंच असे 3800 मी. उंचीवरचे हे हुडहुडी भरवणारे अतीथंड ठिकाण...हिमाच्छादित पहाडांनी वेढलेला, धुक्यानं भारलेला आणि वार्‍यावर डोलणारा हा प्रदेश...अगदी निर्मनुष्य....रस्तेही निर्मनुष्य आणि आवाजहीन... एवढ्याही शांततेची भिती वाटते आपल्याला...येथे येताना मात्र जंगलांमध्ये चरत असणारे 'याक'प्राण्यांचे कळप मात्र दिसले...

      पण सेलेला पास अगदीच भावले मनाला आणि मागच्याच वर्षी भेट दिलेले अरुणाचल मधील सेला पास या पॉईंट ची आठवण जागी झाली....

       भुतान मध्ये विषेश जाणवलेली बाब म्हणजे तेथील युनिफॉर्मिटी....कुठेही जा,तेथील स्त्रिया आणि पुरुष त्यांच्या परंपरागत पोषाखातच वावरतात..
सर्वांच्या कपड्यांचे डिझाईन सुध्दा एकच...बहुतेक बारीक चेक्स...फक्त रंगात वैविध्य....
       तसेच घरांची आणि बिल्डिंग्ज चे डिझाईन सुध्दा सारखेच....त्यांच्या घरांचच्या खिडक्या पारंपारिक वुडन कार्व्हिंग करत रंगवलेल्या आणि सजवलेल्या...
         रहावयाची घरं आणि कार्यालयं यांच्या छताचा रंग मात्र सगळीकडेच सारखा...फरक केवळ रंगात...लाल आणि हिरवा असा....

      सेलेला पास आणि भुतान मधील काळेकुळकुळीत  नागमोडी रस्ते, उंच उंच पहाडांची गर्दी, त्यातून दिसणारे निळे, सावळे, जांभळे आकाश, पारोमधील बर्फाळलेले आरशासारखे चमचमणार्या टोप्या चढवलेले पहाडांच्या टोकदार टोप्या,तेथील जंगलांना मिळालेलं पाईन वृक्षांचे सौंदर्य, रंगीबेरंगी फुलं, तेथील हवीशी थंडी, गारवा हे सारं मनात साठवून तेथील लोकसंगीताचा आस्वाद घेत आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो...
       पारो-पुनाखा मार्गे भारतात प्रवेशत घड्याळ अर्धातास अलिकडे केलं... सिलिगुडी -बागडोगरा -पुणे  असे औरंगाबादेत "आपल्याघरी" परतलो...

🌹🌹🌹🌹🌹🌹