गुरुवार, ३० डिसेंबर, २०२१

नाना,एक देवमाणूस.

*नाना-एक देवमाणूस*
*********
    
    खूप दिवसांचं ठरवत होते,आपल्या नानांचं व्यक्तीचित्र शब्दांत मांडू या...पण या अख्ख्या महिन्यात कमालीची धावपळ झाली आणि राहून गेलं....आज प्रयत्न करते...
    माझा नोव्हेंबर मध्ये वाढदिवस आला की नानांची मला फार प्रकर्षाने आठवण येते...माझी भेट झाली की, अगदी हमखास ते माझ्या जन्माच्या वेळी त्यांची झालेली फजीती मोठ्या कौतूकाने सांगत आणि त्या वेळी त्यांना झालेले मानसिक क्लेश जणू ते आत्ताच अनुभवून आले आहेत असे वाटत असे....त्यांच्या चेहर्‍यावर....
     "नाना",श्री विश्वंभरराव निटूरकर मामा म्हणजे, आमच्या आक्का (गोदावरी)आत्याचे येजमान....उंचे पुरे धिप्पाड, छान कमावलेली शरीरयष्टी!दोन्ही गालांवर आणि हनुवटीवर मोठ्या खळ्या!मला आठवतात तसा जाड भिंगांचा गोल काळ्या फ्रेमचा चष्मा,विपूल काळा कुळकुळीत केशसंभार, सावळ्या रंगाला शोभेल असा पांढरा शुभ्र कुर्ता आणि शुभ्र पांढरं धोतर आणि डोक्यावर काळी टोपी असा पेहराव! त्या काळचा अधुनिक आणि नीटनेटका म्हणावा असाच अगदी...
     आक्का आत्यांचे लग्न झाले तेंव्हा त्या नऊ वर्षांच्या होत्या हे ऐकण्यात आहे...पण नानांचे वय किती असावे?याचा काही अंदाज सांगितला नाही कोणी त्यांचासोबतचाफोटोहा लग्नानंतर काहीच दिवसात काढलेलाआहे.....या वरुन त्यांचे वय सधारण सतरा अठरा वर्षे असावे....मुरली दादा सांगू शकेल...
     अत्यंत लाघवी, नितांत प्रेमळ आणि मायाळू कधीही कुणाला दुखावणार नाहीत असा स्वभाव आणि बोलताना कायम "माय "हा प्रेमभरा शब्द मुखातून बाहेर आला की समजावे हे नानाच होत!
     एकत्र कुटुंबात मधले,बहुतेक हे दोन नं चे भाऊ...त्या मूळे व्यावहारिक जबाबदारी अशी काही नसावी त्यांच्यावर....
मोठेभाऊ आणि नानांच्या पाठचे भाऊ हुशार म्हणून आर्थिक व अगणीत असणारी सांपत्तिक जबाबदारी सांभाळण्याचीही जबाबदारी या दोन भावांवरच...हे सारं आत्याच्या बोलण्यात यायचं...शेताची जबाबदारी असावी नानांवर असे वाटते......
   जगरहाटी प्रमाणे कालौघात भावाभावांच्या वाटण्या झाल्या तेंव्हा मोठ्या भावा शिवाय न करमणारे नाना, जेवणाचं ताट घेऊन भावाच्या पंक्तीला येऊन बसायचे, असे आत्या सांगतात...
   नानांच्या या अतिशय साध्या, सरळ, निर्मळ मनाच्या, आत्यांना लटका राग येत असे कधी कधी, आणि "ह्यांना काही कळत नाही, भोळा सांभ आहेत अगदी" असे आत्या म्हणायच्या...
    आत्यांची बोलण्याची ढब बघून आम्हाला हसू यायचं...
     मला नाही वाटत नाना कधीच कोणावर रागावले असतील!
    सासुरवाडीला, परभणीला आले तरीही जावयासारखे कधीच वागले नाहीत...आईबाबांना ते नेहमीच वडलां समान होते...बाबांवरही मुलासारखेच प्रेम करायचे आणि आईला 'माय दुर्गा' असेच संबोधायचे...
     माझ्या जन्माच्या वेळची गम्मत सांगते हं आता...त्यांच्या बाबतीत घडलेली...
     नोव्हेंबर महिना, थंडी मी म्हणत होती, आमावस्येची रात्र,त्यातही उगवत्या सुर्याला ग्रहण लागलेला दिवस होता तो...
माझ्या आईला प्रीमॅच्यूअर लेबर पेन्स चालू झालेल्या, अचानक सुरु झालेला त्रास बघून सारेच भांबावलेले गोंधळलेले...
      पहाटे चार पाच वाजता परभणीच्या सरकारी दवाखान्यात आईला  ॲडमीट केलेलं...सोबत मोठीआई, बाबा, कुमारकाका आणि नाना...
सगळे जेंट्स बाहेर ऊभे माझ्या आगमनाच्या प्रतिक्षेत ! खूप थंडी...बाहेर पटांगणात इतर पेशंट्चे नातेवाईक गच्च पांघरुणात झोपलेले...अशा वेळी अंधार असताना, एका पांढर्‍या रंगाच्या मोठ्या धोंड्याजवळ नाना लघुशंकेसाठी गेले...आपला कार्यभाग आटोपून ते वळले एवढ्यात ताड ताड फटाके फुटावेत तश्या शिव्या एक बाई नानांना घालत होती...त्यांचा जीव अगदी अर्धमेला झालेला...कारण 'तो' मोठा 'धोंडा' नसून एक पांढर्‍या रंगाचे पांघरुण पांघरत झोपलेली बाई होती...नानांना अंधार असल्याने हे काही दिसलं नाही आणि लक्षातही आलं नसावं....हे फटाके फुटत असतानाच थंडीचा चहा घेण्यासाठी आणि माझ्या जन्माची बातमी देण्यासाठी कुमारकाका नानांना शोधत तेथे पोहोंचले आणि हा सारा प्रकार त्यांच्या लक्षात आला...
   ईकडे नात झाल्याचे समजल्या बरोबर घरी बाप्पांच्या आनंदाला पारावार राहिला नाही...तेवढ्यात, "दे दान सुटे ग्रीह्राण", असे म्हणत दारावर दान मागावयास आलेल्या लोकांना, बाप्पांनी, खुंटीला अडकवलेला जावयाचा (नानांचा) काळा कोट दान करुन टाकला...घालण्यासाठी म्हणून कोट कुठे गेला?अशी विचारणा नानांनी करताच बाप्पा म्हणाले, तुमचा होता का?मी दान करुन टाकला...हे ऐकले आणि नानांनी आपल्याच कपाळावर हात मारुन घेतला आणि गप्प राहाले बिचारे नाना....काय करतील?सासर्यांना जाब कसा विचारावा?
    अशी सारी त्यांच्या झालेल्या फजीतीची आठवण मला डोळ्यासमोर बघताच त्यांना हमखास व्हायचीच, आणि नाना केवालवाणा चेहरा करत, अगदी विनोदी ढंगाने ती कथन करायचे!आम्हा सर्वांची मात्र हसून हसून मुरकुंडी वळायची!
    असे आमचे नाना, आजही त्यांची प्रकर्षाने आठवण येते...अशी प्रेमळ माणसं आपल्या आयुष्यात आली,त्यांचा थोडाफार सहवास मिळाला आणि आयुष्य समृध्द होत गेलं, याचा मनस्वी आनंद वाटतो आज!
ति.स्वरुप नानांना विनम्र अभिवादन करत मी येथे थांबते आता...🙏🙏

©️ सौ.नंदिनी म. देशपांडे. 
🌹🌹🌹🌹🌹