रविवार, २३ मे, २०२१

# चहा. #

☕ चहा  ☕
           _________

     खरे तर चहा, चहा मी स्वतः दहावीला गेल्यानंतर वार्षिक परीक्षेचा, रात्री जागून अभ्यास करायची ना, तेंव्हापासून घेणे चालू केलेले....हे मला निश्चित आठवते....
     नवीन टेपरेकॉर्डर घेतला बाबांनी, आणि दिवसभर आमच्या एका स्नेह्या कडून गाण्याच्या  तबकड्या आणून नवलाईने आवडीची गाणी टेप करायची, मी....आणि मग रात्री अभ्यास करत जाऽगत बसायचं....
त्यावेळी, अभ्यासासाठी जागायचं म्हणजे, चहा तर घ्यायला हवाच...हे समिकरण डोक्यात पक्कं बसलेलं...
   जागून अभ्यास करणारांचा तो मुलभूत हक्कच जणू, असंच नेहमी वाटायचं...
    
   त्या वेळीच प्रथम झालेली चहाच्या चवीची ओळख, हळू हळू दोन वेळच्या चहामध्ये कधी बदलत गेली समजलेच नाही....
वयाच्या तीशी पर्यंत दोन  वेळेला चहा घेणारी मी, चांगलीच चहाबाज बनले आहे,  हे प्रवास करताना लक्षात आलं...बरोबर चार साडेचार  झाले की दुपारचा आणि  सकाळी आठ वाजता चहाची आठवण यायचीच यायची....
प्रवासात बाहेरचा चहा तेथील स्वच्छता (? )बघता भावायचीच नाही कधीच आणि मग जाणवला हा माझा चहाबाजपणा मलाच पहिल्यांदाच....
या शिवाय पर्यटनासाठी परदेश दौऱ्यावर असताना तर चहाची आठवण प्रकर्षाने व्हायचीच....
       
    पण चहा सुध्दा बाहेर गेल्यानंतर कुणाच्या घरी झाला असेल,आपल्या वेळेतच झाला असेल तरीही त्याला आपल्या घरच्या, त्यातही आपल्या हाताने बनवून घेतलेल्या चहाची सर काही केल्या येत नाही....असेच वाटत रहाते...."ती" तल्लफ काही केल्या भागतच नाही...
   बरं घरीही चांगला भरपूर दुध घालून चांगला उकळवून दाट केलेला....थोडी साखर आणि सवाईने चहापूड टाकत बनवलेलाच चहा, शिवाय कपामध्ये तोही बऱ्या पैकी मोठ्या आकाराच्या काठोकाठ भरुन घेतल्या शिवाय चहा पिल्याचे समाधान मिळतच नसे...असा चहा घेऊन मग जेवणाला कितीही उशीर लागला तरी बेहत्तर असेच वाटायचे...
       
   चाळीशी पार झाली आणि डायबेटिस नावाच्या दोस्ताचा सहवास आता नेहमी साठीच लाभेल की काय अशी शंका निर्माण झाली...मग मात्र त्यावेळी पासून बिना साखरेचा चहाच गोड लागू लागला....कधी वेलची पूड घालून तर कधी आलं घालून हळू हळू साखरेच्या चहाची सवयच गेली ती कायमचीच!
     हल्ली तर चुकून सुध्दा घेतलेला साखरयुक्त चहा औषध घेतल्या सारखा कडवट
भासू लागतो.... 

    काळा चहा घेणर्यांचे तर मला फारच कौतूक मिश्रीत आश्चर्य वाटते...आणि हे कोणत्या परग्रहावरचे लोक आहेत की काय अशी शंका येते...
या शिवाय ग्रीन टी की काय आणि ते लेमन फ्लेवर टी ही अशा प्रकारची नावं कितीही फॅशनेबल असतील तरीही पुळचटच आहेत हे नक्की.....
    
  आताशा म्हणजे हा कोरोना चालू झाल्यापासून मात्र मस्तपैकी आलं घालून उकळवून तयार केलेल्या काळ्या चहात नंतर व्यवस्थित दुध घालून बनलवेला चहा अमृततुल्य वाटायला लागला....
छान पैकी आल्याच्या स्वादाने घशाला शेकून खाली उतरणारा चहाच जास्त भावायला लागलाय, नव्हे त्याचीच सवय झालीय,आता तीच कायम राहील असे वाटते....
   
हल्ली खास, छान छान स्वच्छ अशी वेगवेगळ्या चवीच्या आणि नावाची चहाची खास दुकानं दिसून येतात...अमृततुल्य काय,  मातीच्या भांड्यातील काय आणि आणखी कितीतरी नावांची बिरुदं लावून बनवलेला चहा 
असू दे ,पण आपल्या घरच्या चहाची सर कशालाच नाही हेच जाणवतं....
      
   पण गंमत म्हणून आणि कुठे तरी ऐकलंय म्हणून म्हणा, मी एकदा किंचित मीठ घालून चहा केला...पण असा चहा फारसा पचनी पडलाच नाही...
     चहा,हे पेय गरीबांचे जेवढे जवळचे तेवढेच श्रीमंतांचेही....
    जेवढा एखाद्या टपरीवर चांगला मिळेल चहा, तेवढाच हल्ली निघालेल्या पॉश दुकानातूनही...
  किमान माणुसकी दाखवण्याचे एक साधे सरळ साध्या लोकांचे माध्यम म्हणजे चहा....
गहन विषयावर चर्चाही घडवल्या जातात,  त्या याच चहाच्या साक्षीनं आणि हलके फुलके विनोद साधत डोकं ताजंतवानं करता येतं तेही याच चहाच्या साक्षीनं.... 

  तो सर्व शाष्टाचार पाळत, 'टी सेट' नामक भांड्यांमधून येणाऱ्या चहाची शपथ घेऊन सांगते, पण त्या चहाची रयाच गेलीय असेच वाटते....
      डोक्यातली तल्लफ भागवणारे एक अनुपमेय पेय आहे हा चहा....हल्ली त्याला आरोग्य रक्षणाचे दाखलेही मिळू लागले आहेत, पण अती प्रमाणात काहीही वाईटच बरं का....
     मला बाई रोज दोन वेळेस काठोकाठ कप भरलेला चहा मिळाला, की मग तिसऱ्या वेळी पुन्हा तो घ्यावा अशी साधी ईच्छाही होत नाही...
   पण हं कुणाच्या घरी गेल्यानंतर मोठ्या मोठ्या भारी कपांमध्ये तळाशीच बसेल असा चहा बघितला की, देणाऱ्याच्या मानसिकतेची कीव येते आणि अगदीच छोट्या कपात काठोकाठ असेल तो तरीही 'नकट्या' कपात काय दिलायं चहा म्हणून नाक मुरडावेसे वाटते...काय करणार स्वभावाला औषध नसतं असे म्हणतात ना.... 

  तर असो, पण आजचा दिवस खास चहासाठी राखून ठेवलेला, अगदी जागतिक स्तरावर!केवढा या अमृततुल्य  चहाचा सन्मान!

। इति श्रीचहा पुराणम् संपुर्णम्। 

©️
*नंदिनी म. देशपांडे*
मे, २१,२०२१ 

🌹🌹🌹🌹🌹

सोमवार, १० मे, २०२१

"आई "(मातृदिना निमित्त)

"आई "

      'आई ' हा शब्द उच्चारला की केवळ वात्सल्य वात्सल्य आणि वात्सल्यच आठवतं....आईच्या सहवासातील ते प्रेमभरे, वात्सल्यभरे क्षण अन् क्षण डोळ्यासमोरुन सरकत जातात...
आज जागतिक मातृदिनाच्या निमित्ताने सारं जग मातृ उत्सव
साजरा करत असताना तुझी आठवण होणार नाही हे केवळ अशक्यच ना, आई?...
     आई, तुला जाऊन सहा वर्षे होऊन गेली, पण तू आमच्या अवतीभोवती नाही आहेस असे कधी वाटलंच नाही...
मुर्ती दृष्टिआड झाली असेल,पण तरीही तुझ्या आठवणी जागवल्या की आपोआप तुझी प्रेमळ मुर्ती डोळ्यासमोर उभी रहातेच...तू स्वतः संवाद साधत आहेस असाच भास होत रहातो...
   आई,तू आहेस नक्कीच आहेस, आमच्या ह्रदयात, आमच्या आठवणीत, तुझ्या घराच्या वास्तूत किंबहूणा वस्तूंमध्येही,त्यांच्याअस्तित्वात, स्पर्शात...त्यातील तू वापरलेली प्रत्येक वस्तू आजही तुझी आठवण देतात....एवढेच नव्हे तर, देवघरासमोर हात जोडून ऊभं राहिलं की, त्यातील प्रत्येक मुर्ती त्या प्रत्येकाला तुझा झालेला स्पर्श,देवघरासमोरची रांगोळी, तुझ्या अंगणातील रांगोळी, तुझ्या मनात अंबाबाईवर असणारी तुझी श्रध्दा
हे सारं सारं तुझीच आठवण देत रहातं...
     संक्रमणाने तुझ्याकडून आम्हा सर्वांमध्ये आलेले, तुझ्या नातवंडांमध्ये परावर्तित झालेले तुझ्यातील सद्गुण, सवयी, शिस्त या साऱ्यां मधूनही तू डोकावत असतेस आमच्याकडे...
तुझ्या आवडीचा एखादा पदार्थ, तुझ्या सारखा मला न जमलेला पदार्थ या बाबी तुझीच आठवण करुन देतात...
तुझे संस्कार तर पदोपदी आठवण करुन  देतात आम्हा सर्वांना...
आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे, आम्हा भावंडांचे अस्तित्व, माझे अस्तित्व हेच मुळी तू असण्याची सजीव साक्ष आहे....
मग तू नाहीस असं कसं गं म्हणू?
तू आहेस, तुझ्या आशिर्वादाचा हात आमच्या डोक्यावर आहे...आणि दूरून कुठून तरी तू आमच्यावर कायम लक्ष ठेवून असतेस यावर माझी श्रध्दा आहे....
    तुझं अस्तित्व जाणवत रहावं म्हणूनच तर मन प्रसंगानुरुप तुझ्या आठवणीतून अशी जाणीव करत रहातं बोलण्यातूनही तुझ्या आठवणी व्यक्त करताना मन प्रसन्न
होतं रहातं...तू आहेस आणि कायम असणारच आहे...
आई, तुला त्रिवार विनम्र अभिवादन. 🙏🙏🙏🌹🌹

 ©️
नंदिनी म. देशपांडे.
मातृदिन, 
९ मे,२०२१.