मंगळवार, १३ जुलै, २०२१

तात्यासाहेब देशपांडे.

दोन तीन दिवसांपूर्वीच फादर्स डे पार पडला...प्रत्येकाने तो आपल्या वडिलांप्रती कृतज्ञ भाव व्यक्त करत, साजरा केला...
काकांविषयी व्यक्त व्हावं असं आवर्जुन वाटायचं माझ्या मनाला,काका,माझे सासरे,म्हणजे माझ्यासाठी पित्यासमानच...यांच्या विषयी व्यक्त होण्यास वाटलं,  हे निमित्त अगदी योग्य आहे 

   केवळ वर्ष दिडवर्षेच काय तो त्यांचा सहवास लाभला मला त्यांचा...वाटलं असे कितीसे ओळखतो आपण त्यांना? पण मधुकरच्या बोलण्यातून येत असणाऱ्या त्यांच्याविषयीच्या संदर्भाने मग मी एक आठवणींची मालिका मांडत गेले....
     काका, म्हणजे स्व.श्री भुजंगराव संतुकराव उमरजकर देशपांडे. जन्म.१९०७ चा ...
माझे हे सासरे.... त्यांच्या शेंडेफळ आपत्याचे लग्न झाले, म्हणजेच मधुकर आणि मी विवाहबंधनात बांधले गेलो, तेंव्हा आमच्या काकांचे वय होते, ७८ वर्षे....
लग्नानंतर गावी गेले असताना चार आठ दिवस आणि ते आमच्या बदलीच्या गावी जेमतेम महिनाभर राहिले असावेत एवढाच काय तो माझा त्यांच्याशी प्रत्यक्ष सहवास!
      त्यांचे आईवडिल लवकरच गेलेले, आत्याने (वैधव्य आलेल्या)या दोन भावंडांना सांभाळले...आमच्या घरी राहून त्यांचे पालनपोषण केले...शेती बघितली...
    काकांना गावात सारेजण 'तात्यासाहेब' या नावाने संबोधत....
तात्यासाहेबांनी त्या काळात नववी पर्यंत शिक्षण घेत शेतीकडे लक्ष द्यावयास सुरुवात केली....आपल्या शिक्षणाला पूर्णविराम देत,शहरात शिकावयास न जाता घराच्या कारभाराची जबाबदारी स्विकारली...

   तात्यासाहेबांना गावातील पोस्टाचे, (पोस्टमास्तर) चे काम मिळाले...नोकरी म्हणून नव्हे पण काही अंशी मानधन मिळायचे त्यांना यातून...पोस्ट खात्याकडून विचारण्यात आल्या नंतर त्यांच्या विनंतीला मान देत,काकांनी गावात पोस्टाची सोय होईल लोकांसाठी, या हेतूने हे काम घरीच करावयाचे पण आनंदाने स्विकारले...
      त्या वेळी सहा पैशांना एक पोस्टकार्ड होतं, असे चार पोस्टकार्ड घेतल्यानंतर एखाद्या ग्राहकाने पंचेवीस पै. दिल्यास, राहिलेला एक पैसाही काका ग्राहकाला परत करत असत!
त्यामूळे घरी येणाऱ्या लोकांचा राबता वाढला...

    काकांना,धार्मिक ग्रंथ पठणाचा नाद होता...ओसरीवर त्याचे नियमित पणे काही वेळ हे वाचन पठण चालू असायचे...आपल्या कानावरही हे पडेल या निमित्ताने अनेक जण येवून बसत ओसरीवर....
    एक अतिशय तत्त्वनिष्ठ आणि प्रामाणिक व्यक्तिमत्व, एक सोज्वळ देवमाणूस अशी त्यांची गावभर ओळखली जाणारी प्रतिमा होती...
    गाव तसे छोटेसेच. फार पूर्वी दवाखान्याची सोय नव्हती,पण लोकांची तात्यासाहेबांवर फार श्रध्दा. एखादी अडलेली पहिलटकरीण असेल तर आमच्या काकांना ही लोक नदीवर घेऊन जायची पाण्याची घागर त्यांच्या स्वहस्ते भरून आणत, पहिलटकरीणीच्या अंगावर ओतायला लावायचे लगेच ह्या बाईची प्रसुती होऊन तिला वेदना मुक्ती मिळायची असा गावकऱ्यांचा विश्वास होता...

    उममरज आमचे गाव...मन्याड नदी वाहते आमच्या गावातून....नळाची सोय नव्हती त्या वेळी, पुरुष माणसं नदीवर अंघोळीला जायचे आणि येताना पिण्याच्या पाण्याची लगड  घेऊन यायचे हा शिरस्ता होता...
  
काकांच्या प्रामाणिकपणाची
साऱ्या पंचक्रोशीत ख्याती होती...आसपासचे लोक बाहेरगावी जाताना स्वतःच्या घरातील किंमती ऐवज, पैसा अडका काकांच्या स्वाधीन करुन जायचे!आपण केंव्हाही परतलो तरी, जसाच्या तसा सारा ऐवज आपल्याला लगेच परत मिळतोच असा लोकांना गाढ विश्वास होता त्यांच्यावर....

  दिसायला देखणे, मध्यम उंचीचे, गोरेप्पान काका अत्यंत शिस्तीचे होते....सकाळी अगदी हलकी न्याहरी आटोपून देवपुजा,गड्याने शेतातून आणलेल्या पळसाच्या पानाचे दररोज थोडे द्रोण पत्रावळी बनवून ठेवणे, शेतामध्ये जाऊन येणे, पोस्टाचे काम बघणे, आल्या गेलेल्यांची व्यवस्थित विचारपूस करणे, पाहूणे आले तर त्यांचा आदर सत्कार करत,त्यांना पाहूणचार करणे ,दररोज मठामध्ये जाऊन दर्शन घेऊन येणे..आणि सायंकाळी सायंप्रार्थना आटोपत  अगदी वेळेच्या वेळी 
मोजकाच आहार घेणं असा त्यांचा दिनक्रम असायचा...
वर्षातून दोन वेळेस तरी लेकीबाळी माहेरपणाला आणणे...दिवाळी आणि उन्हाळ्यात...
जावयांचा मानसन्मान, नातवंडांच्या सहवासात रमणं हे सारं त्यांना आवडत असे...
   बाजारहाट करण्यासाठी जवळच्या तालूक्याच्या ठिकाणी पायी किंवा बैलगाडीने जावे लागायचे....
सारा प्रपंच आवश्यक त्या गरजा पूर्ण करत पण काटकसरीनं, व्यवस्थित रीती रिवाजानं सणवार साजरे करत, कुलधर्म कुलाचाराचे आचरण करत कोणाचेही मिंधेपण न स्विकारता अगदी स्वाभिमानाने चालवला त्यांनी....केवळ शेतीच्या उत्पन्नावर!
सहा आपत्यांचे शिक्षण,लग्नकार्य, त्यांची बाळांतपणं सणवार यथोचित केले...
गाठीशी रोकड रक्कम नसायची पण अडल्या नडल्या परिस्थितीत लोकांना, नातेवाईकांना शेतमालाच्या रुपाने मदत द्यायचे....
मधुकरचे सारेच शिक्षण घरापासून लांब राहून झाले...त्याला नियमीत पत्र लिहून त्याची खुशाली विचारत.. येणाऱ्या सणवारांची माहिती द्यायचे...
व्यवहारात अगदी चोखपणा बाळगला काकांनी...
भावाने जरी तिकीट काढले असेल कधी बसचे,तर त्यालाही घरी आल्यानंतर लगेच तिकीटाचे पैसे चुकते करत ते!
   मला आठवतं, आमच्या लग्नाच्या वेळी उमरजहून औरंगाबाद येथे येण्यासाठी बसभाडे रु.पाच हजार माझ्या बाबांनी देऊ केले होते....साडेचार हजारच लागले, 'हे उरलेले पाचशे रु.' असे म्हणत बाबांनी नको म्हणत असतानाही त्यांनी ती पाचशे रु.ची रक्कम परत केली होती...

मला प्रथम बघितले त्यांनी होणारी सून या दृष्टिकोनातून... आणि पहिला प्रश्न विचारला, 'आम्ही खेडेगावात रहाणारी माणसं, निमित्तानं चार दिवस आलीस, पोरी गावी,तर करमेल तुला?"आणि "भाकरी खाणारे आम्ही, ती बनवायला येते का?"
मला खरोखरच येत नव्हती...पण मीही अश्वासन दिले त्यांना, मी शिकेन लवकरच आणि तुम्हाला बनवून वाढेल...
आणि ज्या वेळी पहिल्यांदा ते आमचा संसार बघावयास सेलू या गावी आले तेंव्हा, मी त्यांना माझ्या हातची भाकरी करुन वाढली....तर ते माझ्या सासुबाईंना कौतुकाने म्हणाले, "पोरीने केलेली ही भाकरी बघा किती पातळ आहे!पोळी आहे का भाकरी?कळत सुध्दा नाही"...
    गावी मी चूल पेटवून स्वयंपाकही बनवलाय हे बघून त्यांना फार कौतूक वाटायचे...जन्मापासून शहरातच वाढलेली मी, काही कामं येतील का हिला?यासाठी साशंक होते ते...
पुनःश्च एकदा आमच्या बदलीच्या गावी (सेलू ) येथे त्यांना काही दिवस येऊन रहावयाचे होते...लकडा लावला होता त्यांनी सारखा 
पण, नियतीला ते अमान्य होते...
   मार्च महिना,दुपारचे भर बारा वाजत आलेले,
कोणी परिचित आलाय म्हणून त्याच्याशी बोलत बसले....पर्यायानं स्नान, देवपुजा यांना उशिर झाला..."आजच्या दिवस राहू द्यात देवपुजा", असे म्हणताच चिडून म्हणाले,"माझ्या जीवात जीव आहे तोवर मी पुजा करणे सोडणार नाही" ...
सिंहगर्जनाच केली त्यांनी...मात्र दररोज सोवळे नेसून पुजा केल्या नंतर त्यांना लगेच  गरमागरम जेवण तयार लागायचं...
 ते स्वयंपाक घरात आले की जेवायला बसायचे...
त्या दिवशीही असेच घडेल असे वाटले होते....आमच्या ताई पुजेची सारी तयारी काकांना करुन देत, त्यांचे ताट वाढण्यासाठी स्वयंपाक गृहात दाखल झाल्या आणि सासूबाई चूलीजवळ गरम भाकरी करु लागल्या...
 देवासाठी लावलेली तेवती निरंजन एका कपाटा प्रमाणे असणाऱ्या देवघरात ठेवताना, त्यांच्या डोळ्यांच्या अधू झालेल्या दृष्टिने घात केला आणि,ती निरंजन त्यांच्या सोवळ्याच्या सोग्यावर ठेवली गेली....भराभरा सोग्याने खालच्या बाजूने पेट घेतला...पायाला चटके बसेपर्यंत त्यांच्या लक्षात आले नाही...तेथून तसेच बाहेर आले...आतल्या खोलीत जाऊन आपले पेटलेले सोवळे त्यांनी फेडून टाकले...पण... पण तो पर्यंत कमरेपर्यंत चा भाग अगदी भाजून निघाला होता....
सासूबाई आणि ताई तेथे येईपर्यंत बरीच हानी पोहोंचली होती त्यांच्या शरीराला...
असह्य वेदना होत असतानाही तशाच वेदना सहन करत स्थितःप्रज्ञ होऊन केवळ "डोंगराला आग लागली", असे म्हणाले आणि मुखी विष्णूसहस्रनामाचा पाठ त्यांनी सुरु केला....
    खेडेगाव, वाहनाची बस शिवाय दुसरी सोय नाही...बसही फक्त दोन वेळेस...त्या दिवशी योगायोगाने  नेहमी दहा वाजता येणारी बस दुपारी बारा वाजता आली...
गावकऱ्यांनी घडलेल्या अपघाताची कल्पना बसचालकाला दिली...त्या भल्या माणसाने काकांना आणि आवश्यक त्या लोकांना बसमध्ये घेतले आणि सरळ ती बस कंधारच्या हॉस्पिटल समोरच थांबवली....घरी असेपर्यंत सासूबाई आणि लेकीने त्यांना साठवलेल्या सायीमध्ये हळद मिसळून लेप लावला होता त्यांच्या  शरीरावर....
    हाच काय तो प्राथमिक उपचार झाला...कारण कंधारचे डॉक्टर ही पेशंटची अवस्था बघून उपचारास धजावले नाहीत...त्यांनी सरळ नांदेडला घेऊन जावयास सांगितले...
त्यात आणखी दोन तीन तास गेले...
पण, डोंगराएवढ्या काळजाचा,करारी वृत्तीचा हा देवमाणूस अजिबात डगमगला नाही...मुखी अव्याहत देवाचे नामःस्मरण चालूच होते...रक्ताची आवश्यकता त्यांच्याच धाकट्या मुलाने म्हणजे, मधुकरने त्यांना रक्त देवून पूर्ण केली...ऐंशी वर्षाच्या या महापुरुषाला आपली दोन्ही मुलं आपल्या जवळ आहेत याचे खूप समाधान वाटले आणि अपघातानंतर आठ दिवसांनी अगदी शांततेने दोन हात जोडत, २८मार्च,१९८७ या दिवशी जगाचा कायमचा निरोप त्यांनी घेतला...
 गंगाकिनारी आपला देह ठेवून गावकरी आणि आप्तजनांसाठी आपल्या कितीतरी समृतींचा गंध साठवून गेला....सारं गाव हळहळलं देवमाणसाविना पोरकेपणा आल्याच्या भावना व्यक्त करत साश्रू नयनांनी त्यांच्या आठवणी जागवत राहिलं....
असे माझे हे पित्यासमान सासरे, 
केवळ दीड वर्षांच्या सहवासातून माझ्या मनातील त्यांची प्रतिमा कितीतरी उंचावर नेऊन ठेवत, स्वर्गवासी झाले...नेमक्याच झालेल्या पितृदिनानिमित्त त्यांचे स्मरण करत, माझी ही शब्दसुमनांजली त्यांना वाहते....
🙏🙏
-- नंदिनी म. देशपांडे. 

🌹🌹🌹🌹🌹

बाप्पा.

🌹'कर्तव्याने घडतो माणूस'
  आमचे बाप्पा आजोबा.🌹
  ‐------------------------------         
 श्री आनंदराव शेषराव उमरीकर....
वकील. परभणी. 
हे माझे आजोबा. माझ्या वडिलाचे वडील...
 त्यांची मुलं,मुली,जावई,सूनबाई,आप्तस्वकीय, नातवंड ही सारीचजण त्यांना "बाप्पा"
असे म्हणत...घरी सर्वांचे बाप्पा असणारे आजोबा, बाहेर साऱ्यांचे आनंदराव,वकिलसाहेब  होते...
    मी अगदी चार वर्षांची असेल तेंव्हा आपल्या वयाची ऐंशी वर्षे पूर्ण करुन बाप्पांनी या जगाचा निरोप घेतला...सहाजिकच त्यांच्या मला मिळालेल्या सहवासाच्या आठवणी मला आठवाव्यात हे अशक्यच...पण, माझ्या बाबांचं दैवत असणाऱ्या बाप्पांचा मोठा फोटो कायम आमच्या बैठकीत लावलेला असायचा, आजही तो आहेच...सोबत माझ्या मोठीआईचाही...
पण मोठीआई मी दहा वर्षाची असताना गेली.... म्हणून तिच्या थोड्यातरी आठवणी स्मरणात आहेत माझ्या....असो...

 बाप्पांची प्रतिमा बघत बघत त्यांचं अस्तित्व कायमच माझ्या माहेरी जाणवत रहायचं....बाबांनी आईने ते त्यांच्या आठवणी सांगत जागतं ठेवलं असं म्हणू या हवं तर...
आणि यामूळे ते मला पुसटसे आठवतात असा भास होतो...
    पण बाबांच्या सांगण्यातून बाप्पांच्या आठवणींना उजाळा मिळत जातो...तो आपण शब्दबध्द करावा असं प्रकर्षानं   वाटलं आणि लिहिती झाले मी...

...२७ मे,१९७० मध्ये बाप्पा गेले तेंव्हा ते ८० वर्षे वयाचे होते...म्हणजेच त्यांचा जन्म इ.स.१८९० चा...बालपण परभणी जिल्ह्यातच असणाऱ्या (माळाची) उमरी या गावी गेलेले...या छोट्याशा गावी एका टेकडीवर ईंद्रायणी देवीची प्रसन्न मूर्ति(तांदळा)वास करतो...
याच गावी त्यांची वडिलोपार्जित घर आणि शेती, म्हणूनच ते उमरीकर....

   पूर्विपासूनच हे सुखवस्तु कुटुंब...
    एकूण सहा भावंड. त्यांपैकी शिक्षणाच्या निमित्ताने दोघे भाऊ हैद्राबादेत गेले...तेथे वकिलीची सनद घेऊन दोघांनी सध्याच्या मराठवाड्यात,पण त्या काळी निजामाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या... परभणी शहरात श्री आनंदराव यांनी म्हणजे माझ्या आजोबांनी आणि सेलू या गावी त्यांचे भाऊ रंगराव यांनी वकिली चालू करत तेथेच आपले बिऱ्हाड थाटले...

   सुरुवातीला जम बसेपर्यंत आनंदरावांनी भाड्याच्या घरात राहूनच संसाराची घडी बसवली.... एक मुलगी झाल्या नंतर त्यांची पहिली पत्नी कृष्णाबाई दुर्दैवानं जात राहिली...या कृष्णाबाईंचं माहेर परळी होतं....

    तिच्या जाण्यानं त्या वेळच्या रुढी नुसार तिची जागा माझी आजी, मोठीआई अहिल्या राम उर्फ राजाजी कोठेकर,जी बाप्पांपेक्षा पंधरा वर्षांनी लहान होती.... यांनी भरुन काढली....पण कृष्णाबाई आनंदराव उमरीकर या नावानेच तीही उमरीकरांच्या घरी माप ओलांडून आली....

   मोठी आई बाप्पांच्या लग्नानंतर लवकरच 
 प्लेगची साथ आली होती, त्यावेळी बहुतेक जण गावाच्या बाहेर तंबू ठोकून राहू लागले... बाप्पाही कुटुंबासह तेथेच होते...
...बाप्पांनाही प्लेगची गाठ आली होती...या आजाराशी निकराने झुंज देत त्यांनी मातही केली होती  प्लेगवर...
पण, एक दिवस अचानक बाप्पा एकदमच निपचीत पडले ...
तेथे उपलब्ध वैद्यांनी"बाप्पा गेले", असे जाहिर केले...
त्यांच्या अंतीम प्रवासाची तयारी केली गेली...त्यांचा खाली घोंगडीवर ठेवलेला देह आता उचलणार एवढ्यात, नव्यानेच लग्न झालेल्या माझ्या आजीच्या चाणाक्ष नजरेनं बाप्पांचा पायाचा अंगठा हलतोय हे लक्षात आलं...तिने, "ते आहेत, गेले नाहीत"असे निक्षून सांगितले. एकच गोंधळ उडाला...वैद्यांना पाचारण करण्यात येवून लगेच उपचार चालू केले...आणि काय आश्चर्य, बाप्पा यातून लवकरच ठणठणीत बरे झाले..
    या नंतर माझ्या आजीशी कित्तेक वर्षे संसार होऊन  त्यांना सहा अपत्य झाली!
त्यांच्या कर्तृत्वाने आभाळाएवढी उंची गाठत 
कुटुंबाचा आधारवड बनले ते...
ही आठवण बाबांना,१९७० मध्ये बाप्पांचे निधन झाल्यानंतर बाप्पांचे मित्र श्री महतपुरीकर देशपांडेआजोबा,जे क्रांती चौकात रहावयाचे, यांनी सांगितली होती...

   अगदी केतकी असं चमकदार गोरेपण, नाकीडोळी निटस, उंच, धिप्पाड बांध्याचे आमचे बाप्पा फारच देखणे होते...
 त्यांचा विवाह झाला त्यावेळी ते वकिल झालेले होते...
परभणीत सुरुवातीला, सध्याच्या गांधी पार्क या भागात भाड्याने राहिले ते... आपल्या कुटुंबाला घेऊन ....
म्हणजे,पहिला विवाह झाल्यानंतर ही ते तेथेच रहायचे...
पण ती जागा नंतर पालिकेने ताब्यात घेतली आणि सर्वांनाच तेथील घरं रिकामी करावी लागली...त्यावेळी बाप्पांनी, गावापासून थोडे दूर, (आताचा स्टेशन रोड)
सलग अशी मोठ्ठी जागा घेतली ... आणि आपला मोठा वाडा, बंगला बांधला... 
    बाप्पांनाही बांधकामात आणि त्याच्या नुतनीकरणात फार रस होता...
आपल्या बंगल्याचे बांधकाम झाल्यानंतर राहिलेल्या जागेचे मोठे मोठे प्लॉट्स पाडून त्यांनी ते आपल्या ओळखीच्या लोकांना आणि वकिल मित्रांना विकून टाकले...
म्हणूनच एका ओळीत आनंदराव उमरीकर, खळीकर, शहाणे,शहाणे असे बंगले होते सर्वांचे! कालांतराने माझ्या वडिलांनी,प्रभाकरराव उमरीकर यांनी त्या बंगल्याचे नुतनीकरण करत, याच बंगल्याचे नामाभिधान,"आनंद सदन " असे केले...
   त्यावेळी या भागात नळ आलेले नव्हते..पण शेजारीच एक बांधलेली विहिर होती...ती व्यवस्था बघूनच त्यांनी हा बंगला बांधला होता...
अतिशय प्रशस्त असा समोर हा बंगला आणि मागे बरेच भाडेकरु असा मोठ्ठा डोलारा छान पैकी नांदत असायचा येथे....अगदी पंधरा एक वर्षां पूर्वी पर्यंत!
परभणीचा उमरीकरांचा वाडा तेंव्हापासून प्रसिध्द होता...कित्येक बिह्राडं राहून गेली या वास्तू मध्ये!

    बाप्पांचा वकिली व्यवसाय छानच चालायचा...पण तरीही त्यांनी सिगारेटस् मध्ये भरावयाची तंबाखू तयार करण्याची फॅक्टरी काढली ती तंबाखू तयार करुन हैद्राबादेत पाठवण्याचा एक छोटेखानी व्यवसायही चालू केला होता...
या फॅक्टरीची जड मोठे लोखंडी अवशेष नंतर कित्येक वर्षे होती आमच्या अडगळीच्या खोलीत...

    परभणीत चांगला जम बसवला बाप्पांनी आणि गावी,उमरी येथे असणाऱ्या वडिलोपार्जित शेतजमीनीवरचा आणि घरावरचा हक्क मात्र बाकी भावंडांना देऊ केला...
अतिशय उमद्या मनाचे आणि समाधानी वृत्तीचे बाप्पा, फार कुटुंब वत्सल होते...
त्या काळात मुलींना शिक्षणासाठी शाळेत पाठवले जायचे नाही...पण आमच्या बाप्पांनी, आपल्या मुलींना घरी येवून शिकवणाऱ्या शिक्षकाची नियुक्ती केली होती...माझी मोठीआईही साक्षर आणि हुशार होती...
त्यांच्या काळापासूनच आमच्या घरात अंधश्रध्देला कधीच थारा नव्हता...
पण ईश्वरी श्रध्दा नांदत असायची....बाप्पा दररोज मोठ्या अशा लाकडी देवघरात बसून दररोज पुजा नैवैद्य वैश्वदेव करायचे....

   बाप्पांचा मित्रपरिवार सुध्दा फार मोठा होता...दरवर्षी ते मित्रमंडळींसोबत सुट्ट्यामध्ये पर्यटनासाठी चार दिवस बाहेरगावी जाऊन येत...पण रझाकार सुरु झाला तेंव्हा आपल्या संपूर्ण कुटुंबासह, काही नातेवाईक,त्यात माझ्या आजीचे मावसभाऊ सेलूचे वासुदेवराव टाकळकर आणि कुटुंबीयही होते...आणि कांही मित्र मंडळी व त्यांचे कुटुंबीय क्रांती चौकात रहात असणारे असे सर्वच जवळपास सहा सात महिने त्र्यंबकेश्वर येथे भाड्याने एक जागा घेऊन मुक्कामी राहिले होते...
   त्या वेळेस आमचा परभणीचा कारभार माझ्या आजीचे मोठे भाऊ श्री उध्दवराव कोठेकर यांनी आमच्या घरी राहून सांभाळला होता...त्यांना रझाकारापासून काही धोका नव्हता कारण  ते स्वतः अधिकाऱ्यांच्या बायकांना संगीत शिकवण्यासाठी त्यांच्या घरी जायचे...

  बाप्पांनी वडिलोपार्जित शेतीवरील हक्क सोडून दिला होता तरीही, परभणीत स्वकष्टार्जित अशी तीस एकर बागायती शेती घेतली होती...
आंबराई तर फारच नामी होती...आमराई थोडी उशिरा लावली, बरेच जण "तुम्हाला काय खायला मिळतील अंबे?कशाला लावताय"?असे म्हणाले पण "मी नाही तरी माझी मुलं नातवंडं खतील ना "असे ते म्हणाले ...आणि त्यांच्याच भाग्याने त्यांनी स्वतः तर खाल्लेच अंबे, पण कितीतरी लोकांच्या घरच्या रसाळी आणि लोणची या आब्यांनी साजरी केली.... वर्षानुवर्षे!
आम्ही लहानपणी चाखलेली आंब्याची मज्जा काही ओरच होती...आयुष्यभर पुराव्यात अशा या बाबतीतील गोड आठवणींची साठवण मनात रुजून बसलीए...
आमच्या या शेताला लागूनच उरूस भरायचा परभणीच्या तुरतपीराचा आजही भरतो तो...गावातच शेती झाल्याने नाईलाजाने बाबांनी साधारण वीस वर्षांपूर्वि शेती विकली....
    
   त्या काळच्या समाजमनाप्रमाणे बाप्पांचे आपल्या मुलावर अतोनात प्रेम होतं...वयाच्या आपला थोड्या पुढच्या टप्प्यात थोडं उशिरा पाच मुलींच्या पाठीवर झालेला मुलगा म्हणजे त्यांचा जीव की प्राण. मुलींचं क्षेम क्षेम आहे ना याकडे कायम लक्ष असायचे...
स्वकर्तृत्वावर प्रगाढ विश्वास असणाऱ्या अशा आमच्या बाप्पांचा आत्मविश्वास फार प्रबळ होता...

    उर्दू माध्यमातून न्यायालयिन कामकाज चालू होते तो पर्यंत म्हणजे इ.स.१९५० पर्यंत...
मराठवाडा स्वतंत्र झाल्यानंतर, कामकाजाची भाषा इंग्रजी झाली आणि आनंदराव उमरीकर वकिलांनी कोर्टात जाऊन कामकाज बघणे सोडले...
आमच्या घरी उर्दू भाषेतून कायद्याच्या कायद्याच्या पुस्तकांचा फार मोठा संग्रह मी स्वतः बघितला आहे...
आपल्या वयाच्या साठ वर्ष पूर्ण करत निवृत्ती पत्करणार्या आमच्या बाप्पांनी स्वतःचा मुलगा आपल्या जवळच असावा म्हणून माझ्या बाबांना मुद्दाम वकिलच बनवले होते...
दोन तीन वर्षे मुलाचा वकिलीतील जम बसलाय हे बघत समाधानाने,
घरात माहेरपणाला लेकी जावई नातवंड आलेली असताना, मुलाला झालेली दोन कन्यारत्न  बघून,आंबराईची अढी लागलेली असताना अगदी भरल्या गोकुळातून आनंदाने, "माझा शेवट जवळ आलाय आता औषधांचं काम नाही ही सुचना डॉक्टरांना दिली...
आमचे कौटुंबिक डॉक्टर,श्री मधुकरराव चौधरी हे बाप्पांना ऑक्सिजन सिलिंडर लावत असताना, माझ्याशी फक्त थोड्या गप्पा मारा" असे म्हणाले...माझ्या आईकडून तिच्या सासुबाईंची यथायोग्य काळजी घेण्याचे वचन घेतले.. आणि आपल्या धाकट्या जावयाकडून,श्री रामचंद्र आसोलेकर यांच्या कडून मेहूण्याकडे (स्वतःच्या मुलाकडे)
लक्ष देणयाचा शब्द घेतला त्यांनी,आणि बारा तासातच दोन ह्रदयविकाराचे झटके आल्यानंतर,बाबांच्या मांडीवर डोके ठेवून 
कायमचा निरोप घेतला आणि स्वर्गलोकीची वाट धरली बाप्पांनी...तो दिवस होता, २७,मे १९७० चा...
आजही बाप्पांची प्रतिमेतील प्रसन्नमुख छबी बघितली की, त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होते हे मात्र खरंए...
माझ्या आजीच्या ईच्छेनुसार नातवाला आजोबांचेच नाव द्यावे ही तिची ईच्छा माझा भाऊ झाल्या नंतर आईबाबांनी पूर्ण केली आहे...त्यांच्या वकीली व्यवसायाचा वारसा उत्तम पध्दतीने चालवणारी ही उमरीकरांची तिसरी पिढी होय...
   स्व. बाप्पांच्या,आनंदराव उमरीकर यांच्या स्मृतिंना विनम्र अभिवादन करत मीही आता पूर्ण विराम घेते...🙏🙏

©️ 
नंदिनी म. देशपांडे.
दि. १० जूलै,२०२१.
औरंगाबाद. 

🌹🌹🌹🌹🌹