शुक्रवार, ८ जुलै, २०२२

पुस्तक परीक्षण...."द लॉयर्स कॅम्पेनिअन्"...

पुस्तक परीक्षण
पुस्तकाचे नाव:
"द लॉयर्स कॅम्पेनिअन" 
*********
       "द लॉयर्स कॅम्पनिअन्" हे जनशक्ती वाचक चळवळ यांनी संपादित केलेलं पुस्तक माझ्या हाती आलं आणि कधी एकदा वाचून काढेन असं झालं...खरं म्हणजे पुस्तक तसं छोटंसंच आहे...सलग दोन तास बैठकीत आरामात वाचून झालं असतं...पण माझ्या इतर अनेक व्यापापायी ते वाचून पूर्ण होईस्तोवर अख्खा आठवडा गेला....असो...
     जनशक्ती वाचक चळवळ यांनी संपादित केलेल्या पुस्तकाची मांडणी आणि मुखपृष्ठ नेहमीच वाचकाला वाचनासाठी उद्युक्त करतं...माझंही "आठवणींचा मोरपिसारा" हे पुस्तक यांनीच संपादित केलं आहे...
    "द लॉयर्स कॅम्पेनिअन्",ह्या 
पुस्तकाने वाचनासाठी उत्सुकता वाढवण्याचे आणखी एक कारण म्हणजे, ते माझ्या मैत्रीणीने दीपाली कुलकर्णी हिने लिहिलेलं आहे... व्यवसायाने वकील असणाऱ्या व्यक्तीच्या संदर्भाने, जो तिचा आयुष्यभराचा जोडीदार आहे, हा धागा कायम पकडत लिहालेलं हे पुस्तक...
 मी सुध्दा एक वकील असल्यामूळे सहाजिकच वाचनाचा मोह मला टाळता आला नाही...बघू या तरी एक वकील जेंव्हा संसार रथाचे एक चाक पेलून धरतो, तेंव्हा आपल्या सहचराच्या मनात त्याच्या विषयी काय टिपणी असू शकते?हे तरी समजेल, ही ताणलेली उत्सुकता ठेवतच मी वाचनाला सुरुवात केली....
      "द लॉयर्स कॅम्पेनिअन्" यात लेखिकेनं आपल्या आयुष्याच्या वाटेवरचा एक टप्पा म्हणजे पंचेवीस वर्षांचा संसार पूर्ण करेपर्यंत तिला,  किंबहूणा तिच्या जोडीदाराच्या व्यावसायिक आयुष्यात आलेले काही अनुभव व्यक्त केले आहेत असे आपण म्हणू शकतो...
     एखाद्या वकीलाला त्यांच्या व्यवसायात येणारे अनुभव म्हणजे निश्चितच त्याच्या अशिला संदर्भात असणार...
  निरनिराळ्या दिवाणी, फौजदारी, धार्मिक,सामाजिक स्तरावर दावा न्यायालयात लढत असताना त्यांच्या सहवासात आलेले अशिल,त्यांचे स्वभाव, त्यांची मानसिकता आणि तो विशिष्ट दावा यशस्वीपणे हाताळत असताना आलेले अनुभव यांची मांडणी अगदी समर्पक पध्दतीने केलेली दिसून येते...
   या छोट्याशाच पुस्तकात एकूण पंचेवीस प्रकरणं आहेत...प्रत्येक प्रकरण अगदी एक ते दोन पानांचंच असेल, पण यात संबंधीत खटल्याचे वास्तव शब्दांकन ज्याला आम्ही आमच्या वकीली भाषेत प्लेंट, किंवा फॅक्टस् म्हणतो, ते गोष्टींच्या रुपात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे...यात अगदी थोडक्यात न्यायालयाची पायरी चढण्यासाठी असणारा हेतू व उद्भवलेली कारणं यांचा समावेश आहे...तेवढ्यावरुन वाचकाला या खटल्या संदर्भात अंदाज येऊ शकतो...
       पण व्यवसाय म्हणून काम करता करता कशी वेगवेगळी प्रतिष्ठीत मंडळी सहवासात येत गेली आणि त्यांच्याशी कायमचे ऋणानुबंध निर्माण झाले हे फार सुरेख पद्धतीने मांडलंय या पुस्तकात....तसेच एक प्रतिथयश वकील म्हणून आपली जागा तयार करताना सुरुवातीला येणाऱ्या अडचणी त्यावर मार्ग काढत काढत एक यशस्वी कारकिर्द उभी करताना पर्यंतच्या प्रवासाचा घेतलेला वेध म्हणजे "द लॉयर्स कॅम्पेनिअन्",असे  मला वाटते...
    बरेचदा खटला चालू असताना अशिलाशी आपलेपणाचे नाते कसे निर्माण होत जाते...कधी कधी तनमनधनाने वकिलाला आपल्या व्यवसायात योगदान देणं किती अपरिहार्य असतं...तर कधी कधी बदमाशांशी वारंवार संबंध येऊन त्याचे मतपरिवर्तन  कसं घडवता येऊ शकतं....या विषयीचे विवेचनही या पुस्तकातून वाचावयास मिळते...
    वकीलाला आपल्या व्यवसायाकडे केवळ "व्यवसाय" म्हणून न बघता मानवतेची कास धरत समाजात एक प्रतिमा तयार करताना त्याच्या गृहलक्ष्मीचे योगदानही तेवढेच महत्वाचे आहे...ती घरची आघाडी सांभाळते आणि संसारात तडजोडी करत आपल्या सहचराच्या यशस्वीतेसाठी कष्ट घेते याचा आढावा या पुस्तकातून बर्‍याच ठिकाणी उधृक्त होते...
शेवटी संसार हा दोघांचा असतो..
तडजोड नामक चावी दोघांनीही सांभाळली आणि परस्पर विश्वासाची कास धरली की तो कसा सुखाचा होत जातो आणि या टप्प्यावर कृतकृत्यतेची भावना मनात जोपासत आपण किती समाधानाने भरुन पावलो आहोत यांचा मांडलेला आलेख म्हणजे दीपाली कुलकर्णी यांचं "द लॉयर्स कॅम्पेनिअन" हे पुस्तक होय...
    यात या दोघांच्या संसारात अनुभवलेले, व्यवसायात आलेले अनुभव आहेत पण हे आत्मचरित्र निश्चितच नव्हे....काही ठिकाणी कथेचे स्वरुप घेत लिहिलेले लेख आहेत तर काही ठिकाणी मनोगत वाटावे अशी व्यक्त झाली आहे लेखिका....
    आणि या टप्प्यावर मिळणाऱ्या समाधानाला ती दुरुन न्याहाळत आहे ही जाणीव करुन देणारं असं हे पुस्तक...एकदा तरी निश्चितच वाचावं असंच आहे...

लेखिका ---
नंदिनी म. देशपांडे. 

जूलै 8,2022.
औरंगाबाद. 

🌹🌹🌹🌹🌹

पुस्तक परीक्षण...

पुस्तकाचे नाव-- "मनभर सावल्या".
लेखिका--
सौ.श्यामा चातक देशपांडे. पुणे. 

परीक्षण---लेखिका:
नंदिनी म.देशपांडे. 
औरंगाबाद. 

   आश्चर्य वाटलं ना?सावल्या अशा मनभर मापात मोजता येतील?होय,पण असा प्रयत्न केलाय खरा, सौ.श्यामा चातक देशपांडे या लेखिकेनं...आपल्या 
"मनभर सावल्या" या पुस्तकातून...
     मनभर सावल्या छोटेसेच पुस्तक आहे ,त्यातील ललित म्हणता येतील असे लेखही अगदी छोटे छोटे; म्हणजे काही लेख तर एका एका पानाचेच आहेत पण, एकूण २७ लेखांचं हे पुस्तक वाचनीय ठरलंयं नक्कीच...
    लेखिकेनं आपल्या बालपणापासूनच्या आठवणींच्या; तिच्या मनात उमटलेल्या कितीतरी प्रसंग, भोवतालचा परिसर, निसर्ग, त्यातील विविध घटक यांच्या संदर्भातील आठवणींचा कल्लोळ 'मनभर सावल्या' या पुस्तकात मांडला आहे...
      गुरुस्थानी असणाऱ्या वडिलांना आणि आईसमान मोठ्या बहिणीला वाहिलेली अर्पण पत्रिका मनाचा ठाव घेते....
    लेखिकेचं माहेर म्हणजे कायम अध्यात्मिक वातावरणाने भारुन राहिलेलं एक समृध्द केंद्र....संत जनीजनार्दनाचे देवस्थान बीड;हे अध्यात्मिक ,धार्मिक ठिकाण.लेखिकेचे वडिल दरवर्षी भागवत पठण,इतर पोथ्या पुराणे, 
सणवार,उत्सव, मोहोत्सव यांचे परंपरापुर्वक साजरीकरण,सादरीकरण करणारे त्या केंद्राचे अधिपती...
    त्यामूळे या सर्व वातावरणाचा, तेथे साजरे होणारे सणवार, उत्सव, अन्नदान,धार्मिक ग्रंथपठण या साऱ्या गोष्टींचा तिच्या मनावर खोलवर रुजून बसलेला पगडा; तिच्या लेखांमधून ठाई ठाई जाणवतो...
    नकळतच तिच्यावर झालेले हे संस्कार तिला आयुष्यभराची साथ करत आठवणींच्या स्वरुपात कोरल्या गेल्या आहेत....  त्याचे अगदी बारीक सारीक इत्यंभूत वर्णन तिने आपल्या लेखांमधून केलेले दिसून येते...
या वर्णनात वाचकासमोर प्रसंग ऊभी करण्याची ताकद दिसते...
    याच बरोबर लेखिकेला निसर्गाच्या सान्निध्यात रमण्याची मनस्वी आवड दिसून येते....निसर्गातील प्रत्येक घटक मग ते झाड असो, शेतातील ऊभी पिके असो किंवा ऊन, पाऊस,नदी समुद्र असो...पशू पक्षी, फुलं,वेली या सर्वांचा सामावेश यात आहे...
   झाडाकडे बघून तिचे चिंतन चालू असते तर सोनसळी ऊन्हामध्ये ती सावल्यांबरोबर हरखून जाते...समुद्राचे रुप तिला ईश्वराचा भास घडवते... सागरलाटांशी हितगुज तिचे मन करते...
  निसर्गाच्या स्वभावाला अनुसरुन  ज्ञानेश्वरी मधील ओव्यांचा संदर्भ अधून मधून लेखिकेने काही ठिकाणी दिलेले दिसतात...ते अगदी समर्पक आहेत...
काही ठिकाणी काव्यपंक्तींची गुफण आहे...
 निसर्गसान्निध्यातील काही अनुभवांचे त्या त्या संदर्भाने पुनरावृत्ती झालेली वाचताना लक्षात येते...
     'सांजवेळ'आणि 'मी जाता राहिल कार्य काय'   या लेखांमध्ये लेखिकेच्या हळव्या झालेल्या मनाचा प्रत्यय येतो...वृध्द झालेले शरीर नश्वरच आहे पण अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्यात आणि ज्ञानाच्या ज्योती उजळवत त्या वाटेवरुन चालणं हेच जीवन आहे...हा तिच्या वडिलांनी सांगितलेला तात्विक उपदेश,हा लेखिकेला त्यांच्याकडून मिळालेला गुरुमंत्र आहे यावर तिचा विश्वास आहे, आणि त्या क्षणापासून तिने आपल्या वडलांना गुरुस्थानी मानले आहे...आपल्या आयुष्याची वाटचाल आपणही त्याच मार्गावरुन करत आहोत असे तिला लक्षात येतंयं...
     आईची माया देणाऱ्या मोठ्या  बहिणीचा मृत्यू लेखिकेच्या मनावर फार आघात करुन गेला आहे,हे लक्षात येते. 
आपल्याला पहिल्यांदाच मिळालेली एखादी वस्तू किती प्रिय असू शकते आणि तिचे मोल केवढे अनमोल असते ते 'माझी पहिली साडी' या लेखात यथोचित वर्णन करत मांडले आहे....
लग्नानंतर सासरी असणारा 'झोपाळा' त्यावर घालवलेले निवांत क्षण, आपल्याच मनाचं केलेलं अवलोकन; तसेच सहज म्हणून परिसरात फिरणाऱ्या मांजरीवर कसा जीव जडत गेला सर्वांचा, वगैरे गोष्टी लेखिकेच्या स्मरण शक्तीची दादच म्हणावेत...
एखाद्या व्यक्तीची वाट बघत बसण्यात काय हुरहुर असते ती एका लेखातून मांडली आहे...
सुरुवात बालपणीच्या शाळेच्या आठवणींपासून बालवयात खेळलेले विविध खेळ, दिवाळी सारखे उत्सव, खेडे गावातील आठवणी यांपासून आहे,तरीही बालपण सारखं शेवट पर्यंत डोकावत रहातं...
एकूणच छोटे छोटे असे हे सारेच लेख वाचनीय असून त्या वातावरणात आपल्याला घेऊन जातात...
पुस्तकातील दृश्यांसंबंधी  काही चित्र रेखाटलेली आहेत..ती समर्पक वाटली...बाकी मी सुरुवातीलाच सांगितलं तसे मनभर सावल्या म्हणचे मनातील मनभर आठवणींचं प्रतिक आहे आणि ता आठवणी आठवतील तशा उजाळा देत त्या जागवत ठेवण्याचं काम लेखिकेच्या या पुस्तकाने निश्चित केलंयं असं आपल्याला म्हणता येईल....
🌹🌹🌹🌹🌹