रविवार, ६ फेब्रुवारी, २०२२

गानसम्राज्ञीला विनम्र अभिवादन. 🙏🙏🙏

स्वरसूर सम्राज्ञी, गानकोकिळा, गानसरस्वती, भारतरत्न,
भारतमातेच्या पोटी जन्म घेतलेले एक अनमोल रत्न,भारतीयांचा आत्मा, संगीत क्षेत्रातील ध्रुव तारा अशी किती किती म्हणून उपाधी द्यावित असे एक स्वतःच्या अथक परिश्रमातून स्वतःला घडवलेल्या हे सुवर्ण झळाळी असणारे अनोखे व्यक्तिमत्व, आज शरीर रुपाने लूप्त झाले...त्या ईश्वराच्या दरबारात सुरांचा दरबार भरवण्यासाठी आज लता दिदी जात्या झाल्या असेच म्हणावे लागेल...
    भावनांच्या वैविध्याने ओतप्रोत स्वरांनी, भारतीय मनामनांवर किंबहूणा संपूर्ण जगावर आपल्या स्वरांचे अधिराज्य गाजवणारा हा आवाज ज्याची तुलना भारताचे नंदनवन कश्मीरशी केली जाते असा हा अलौकिक गोडवा असणारा स्वर आज हरवला....खरंच मन सैरभैर झालं काही क्षण... काहीच सुचलं नाही...हे वास्तव स्विकारावयास मन अजिबात धजावत नाहीए...दिदींच्या बाबतीत हे असे कधीतरी घडणार असं कधीच वाटत नव्हतंच...त्या कायम अमरच रहाणार स्वररुपाने आणि शरीररुपानेही हे सतत असंच वाटायचं...आणि आज अचानक ही बातमी येऊन ह्रदयाला विदीर्ण करत गेली...
    स्वरांच्या राज्यात अढळ स्थान असणारा हा चिरंतन आवाज या पृथ्वीतलावर तिच्या अस्तित्वा पर्यंत असणार आहे...
पण लतादिदी,अख्ख्या भारतीयांच्या लतादिदी आज नाही राहिल्या हे मान्य करावयास मन तयार होत नाहीए...
   पण आपले दुर्दैव आणि आज ही बातमी ऐकावी लागली...
     लता दिदींना जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रध्दांजली...

-नंदिनी म.देशपांडे.

🙏🌹🙏🌹🙏