शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०२२

.गौताळा सहल.

जणू काही ती वनराणी आम्हाला साद घालत होती, "अरे अरे माझ्या मित्र मैत्रीणींनो, बघा, बघा जरा वेळ काढून, माझ्या या वैभवाला! पायधूळ तुमची झाडा एखादा दिवस माझ्या या हिरव्यागार मऊशार लादीवर आणि होऊ द्यात माणसांचा चिवचिवाट या माझ्या राज्यात!"
     मस्त श्रावणधारा बरसत आहेत...ऊनपावसाचा लपंडाव चालू आहे...आकाशात आकर्षक रंगांची मुक्तहस्ते उधळण चालू आहे...वनराई अगदी चकचकीत पोशाखात चमकत आहे...हिरव्या,पोपटी रंगांच्या गालिच्यावर रंगीबेरंगी रानफुलं मनसोक्त पणे बागडत आहेत...छोटी छोटी फुलपाखरं त्यांवर रुंजी घालत, शिवनापणीचा खेळ खेळत आहेत...
      हवेतला आल्हाददायकपणा, हवाहवासा गारवा, ऊंच मान करुन ऊभी असणारी सातपुड्याची पर्वतराजी, सभोवतीची वातावरणातील लोभस शांतता....शुभ्र पांढर्‍या ईवल्या ईवल्या चांदण्यांनी लखडून गेलेली अगणीत सागाची झाडं... झाडं नव्हे जंगलच....या झाडांच्या जाडजाड पानांची वार्‍या मूळे होणारी सळसळ... वार्‍या च्या तालावर ठेका धरलेली...या अवनीवर अधून मधून डोकावणारे सचैल पावसात न्हाऊन स्वच्छ झालेले काळेशार पाषाण....मध्येच आपली मान वर करुन आमच्याकडे अवखळपणे बघणारी, खुणावणारे काही विशालकाय काळेपाषाण...नकळतपणे त्यांच्यावर बसून स्वार होत हा निसर्ग, ही हिरवाई, दूरवरून दिसणारी धुक्याची अर्धपारदर्शक चादर,सातपुडा पर्वत रांगांनी हातात हात घालून दंग होऊन धरलेला फेर... आणि त्याला बालगूनच पसरलेले खानदेशाचे पठार... त्यावर डोलणारी काळपट हिरवीगार वनराई!सगळं अवर्णनीय, अप्रतीम आणि हवहवसं....वेळेची सारी बंधनं झिडकारुन तास न तास तृप्त नजरेनं चौफेर न्याहाळत बसावं.
    असंच हे वसुंधरेचं वैभव!
     अशा या नयनरम्य परिसरात, निसर्ग आणि श्रावण यांनी मांडलेल्या प्रसन्नतेच्या सारीपाटावर एका मोठ्या ऊंच अशा डोंगरावर पहारा ठेवत दिमाखात ऐटदारपणे ऊभा असणारा "अंतूर किल्ला", ! सगळंच विलोभनीय!इतिसासाच्या दमदार खूणा अंगावर दागिन्यांसारखा बाळगत ऊभा असणारा हा किल्ला, त्या वरील बालेकिल्ला, किल्ल्याची तटबंदी दुरुनही नजरेत भरणारी अशीच....
      निसर्गाचे हे रमणीय रुपडं आणखीनच बहारदार बनवलं ते तेथील काही धबधब्यांनी आणि दूरवरुन चमकणार्या पानवठ्यांनी....
    वसुंधरेचं हे सारं लावण्य किती किती म्हणून डोळ्यांनी पिऊन घेवू, किती साठवून ठेवू डोळ्यात आणि कॅमेरात अशी झालेली मनाची अवस्था....
      अवनीचं हे अतीसुंदर रुप बघताना आपण कितीतरी पायपीट केलीए आणि आता पाय केवळ दुखरेच नव्हे तर बोलतेही झाले आहेत हे लक्षातही आले नाही...
      कालचा अख्खा दिवस 
अशा या सुखावून टाकणाऱ्या वातावरणात मनभरून घालवला, ते ठिकाण होतं, औरंगाबाद जिल्ह्यातील गौताळा अभयारण्य!....
    हा योग घडवून आणला तो समुह, साऱ्या भटक्यांचा,निसर्गावर प्रेम करणारांचा,ऐतिहासिक ठेवा निरिक्षणाचा छंद जोपासणारांचा आणि शिल्पकलेच्या अस्वादकांचा....नावच आहे याचं "भटका तांडा"...
     भल्याभल्यांनी प्रेमात पडावं याच्या, मिसळून जावं यांच्यात आणि केवळ या तांड्याचा एक घटक या ओळखीनेच भटकंती करत रहावं असेच वातावरण असणारा.... आनंदाचा, खेळीमेळीचा असा हा एक धम्माल समुह....
     प्रत्येक सहलीची यथोचीत माहिती देणारा, उत्तम व्यवस्थापन आणि संघटक असणारा श्रीकांत  आणि त्याला साथ देणारा,प्रत्येक सहल जास्तीत जास्त चांगली कशी होईल या साठी झटणारा आकाश या दोघांच्या डोक्यातून प्रत्यक्षात उतरलेली ही भटकंतीची एक पर्वणीच!
     दररोजच्या व्यापातून एक अख्खा दिवस अशी भटकंती करत मनाला आलेली मरगळ दूर करत एक सकारात्मक उर्जा, चैतन्य जमा करण्यासाठी आवर्जुन भटकंती साठी जावयास हवेच याची जाणीव करुन देणारा हा तांडा...छोट्यांचा,तरुणाईचा, मोठ्यांचा, किंबहुणा तरुण जेष्ठांचाही आणिक सुदृढ वृध्दांचाही....
सर्वसमावेशक, निकोप मनाचा वृत्तीचा आणि आनंद वाटत निघणारा असाच....
    या भटक्या तांड्याला त्यांच्या कार्य पुर्ती साठी आणि पुढील वाटचालीसाठी मनःपुर्वक शुभेच्छा ....

©️नंदिनी म.देशपांडे. 
ऑगस्ट,२२,२०२२.
औरंगाबाद. 

🌹🌹🌹🌹🌹