रविवार, २४ नोव्हेंबर, २०१९

विहिणींचा गोडवा.

*विहिणींचा     गोडवा*

    दोन दिवसांपूर्वी मैत्रीणीच्या मुलीच्या लग्ना निमित्ताने बांगड्या व मेहंदी च्या कार्यक्रमासाठी जाण्याचा योग आला....
    त्या घरची मोठी आणि एकच लेक, लहानपणापासून  आई-वडिलांच्या,आजी आजोबांच्या लाडाकोडात न्हाऊन निघालेली....पण तेवढीच संस्कारी....उच्च शिक्षाविभुषित.....
     जमलेल्या सर्व सुवासिनी,पाहूणे मंडळी, कार्यक्रमाची रंगत वाढवत ठेवण्यासाठी गाणी गाण्यासाठी बोलावण्यात आलेला समुह....अशी सर्व मंडळी नवरीच्या आगमनाची आतुरतेने वाट बघत होतीे...
    लग्नघरच ते! वेळेचं गणित थोडसं ईकडे तिकडे होणारच!पण तो पर्यंत सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी लेकीच्या हौशी आईनं,आपल्या लेकीचा लहानपणीच्या रम्य आठवणी, म्हणजे जन्मापासून ते आत्ता नवरी बने पर्यंत असंख्य गोड गोंडस अशा वेगवेगळ्या मूड मधील, अनेक प्रासंगिक स्वरुपाचे आणि कौतूकाचे असे छाया चित्रांचे मोठ्ठे कोलाज दर्शनी भागातच ठेवले होते...त्याला लागूनच नवऱ्या मुलीच्या बालपणीचा भातुकलीचा संसार,तिची खेळणी यांची सुरेख मांडणी केलेली होती......
    नवरीच्या आगमना पर्यंत कुतुहलाने बघाव्या अशाच या सर्व वस्तू ! सर्वांचीच चांगलीच करमुणही झाली आणि प्रत्येकानं हे बघत असतानाच आपल्याही बालपणात हळूच डोकावून बघितल्याचे लक्षात आले....
तो पर्यंत होऊ घातलेल्या नव्या नवरीचं आगमन झालं....अत्यंत कौतुक मिश्रीत पण संमिश्र भावनांची चेहऱ्यावरची गर्दी लपवण्याचा प्रयत्न करत,तिची आई लहान मुलीसारखी तिचे बोट पकडून तिला घेऊन आली....सगळ्यांच्याच नजरा नवरीवर खिळलेल्या....
    आपल्याला आवडलेल्या मुलाशी लग्न करावयाचे तेही आईबाबांची संमती घेऊन तिनं ठरवलेलं....पण तरीही बावरलेपण,आईबाबांचासहवासाची निर्माण होणाऱ्या पोकळीचे मनात निर्माण होणारं शल्य,बालपणीच्या अगणीत क्षणांच्या आठवणी सोडून दूर जाण्याचं हुरहुरलेपण अशा भरघोस भावनांची मांदियाळी मनात घेऊन आलेली ही नवरी....अतिशय देखणी,समंजस दिसत होती....साधंच मेकअप केलेलं होतं तरीही सौंदर्यानं परिपूर्ण असणारी....तिच्या हातांवर हात भरुन सुंदर नाजूक मेहंदी  रेखाटलेली बघून प्रत्येकीच्या चेहऱ्यावर तिच्या विषयी कौतुक दाटून आलेलं दिसत होतं...
   मला मात्र तिच्या विषयी कौतुक तर वाटत होतेच.पण नवरीचा चेहरा अवलोकन केला, आणि मनामध्ये झरझर अनेक अवीट गोडीच्या गाण्यांनी गुणगुणनं सुरु केलंय असं लक्षात आलं.....
 
* होणार सून मी त्या घरची....
लेक लाडकी या घरची
होणार सून मी त्या घरची...

 ‌*पिवळी पिवळी हळद लागली भरला हिरवा चुडा....
वधू लाजरी झालीस तू गं सांगे तो चौघडा....

 *निघाले आज तिकडच्या घरी
एकदाच मज कुशीत घेऊन पुसूनी लोचने आई....

अशा अनेक गोड विहिणी कानात गर्दी केली होती....किती सार्थ अर्थ होता या साऱ्याच गाण्यांचा.... कोणत्याही काळातील
लग्नसमारंभात अगदीच ताजातवाना वाटावा असाच...नव्या होणाऱ्या नवरीला आपल्याच भावविश्वात खिळवून ठेवणारा...मनाला गहिवर आणणारा आणि हुरहुर लावणाराही....
आपल्या या गीतांच्या गीतकारांचे, संगीकारांचे आणि गयिकांचे मानावेत तेवढे आभार कमीच आहेत असे जाणवले या वेळी...
नकळतपणे या सर्वांच्या भारतीय संगीत क्षेत्रातील या कार्याला मनापासून सलाम करत मनोमन धन्यवाद द्यावेसे वाटले....

या अवीट गाण्यांची गोडी आपणही ऐकावी यासाठी हा सारा प्रपंच!!
ऐका तर मग या विहिणी....

©
*नंदिनी म.देशपांडे*

🌷🌷🌷🌷🌷🌷

रविवार, १७ नोव्हेंबर, २०१९

सुख म्हणजे नक्की काय असतं?

*सुख म्हणजे नक्की काय असतं*

सुख म्हणजे नक्की काय असतं?अहो हे काय विचारणं झालं ! सुख असं कधी शब्दात व्यक्त करता येतं का? ही काही मूर्त स्वरुपात दाखवण्याची वस्तू का आहे! जी हातात घेऊन दाखवता येईल आणि ही काही प्रत्येक व्यक्ती जवळ अगदी सारखीच, सारख्याच प्रमाणात असते ! असेही नव्हेच.

      सुख म्हणजे काय तर ही प्रत्येकाने मनातून जाणून घेण्याची अशी एक मानसिक कल्पना आहे असेच मी म्हणेन.ती व्यक्तिसापेक्ष अशीच एक भावना, मानसिक कल्पना  आहे. 

     सुख हे स्थळ,काळ,परिस्थिती काही प्रमाणात आपली किंवा त्या संबंधित व्यक्तीची आर्थिक स्थिती, शैक्षणिक पात्रता इत्यादींवर अवलंबून असू शकते.पण ही पुर्णपणे माणसाच्या मनात घर करून राहिलेली मानसिक कल्पनाच होय,हे नक्की.

     वयानुरूप या संकल्पनेविषयी प्रत्येकाच्या मनात एक वेगळंच चित्र बनत जातं. ही सुखाची संकल्पना मनात तयार होत असताना नक्कीच स्वानुभवाची सभोवतालच्या परिसराची आणि आपल्या आर्थिक परिस्थितीच्या जाणिवेचा विचार यामागे केलेला असतोच.

     प्रत्येकाची सुखाची कल्पना जेवढी माणसाच्या अनुभवावर ठरत जाते, तशीच ती समाधानी वृत्ती, आनंदी वृत्तीशी, आवडीनिवडींशी एकरुपकत्व साधते.

     आपण छोटे असतो तोपर्यंत आई-वडील घरातील मोठी माणसं यांच्या छायेखाली अगदी सुरक्षित असतो. आपले पुरवले जाणारे लाड, तोंडातून बाहेर पडल्याबरोबर मान्य केली जाणारी आपली मागणी, बालहट्ट यांची पूर्तता होणं, हिच प्रत्येक बालकाची आपल्या स्वतःबद्दल असणारी सुखाची कल्पना असते. वाढत्या वयानुसार प्रत्येकाचीआपल्या वैचारिक पातळीचा, निरीक्षणाचा आणि कल्पनाशक्तीचा परिघ सुद्धा विस्तारत जात असतो. आणि त्यानुसार सुखाच्या संकल्पनेतही बदल होत जातो. त्या त्या वयातील आवश्यक त्या सोयी सुविधा आवश्यक बाबी प्राधान्यक्रमाने प्राप्त होत जाणे, यातच माणूस आपले समाधान,पर्यायाने सुख शोधू लागतो.

    सुख आणि समाधान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरु नये. प्रत्येकाच्या मनातील सुखाची कल्पना ही ज्याच्या त्याच्या समाधानाच्या संकल्पनेवर अवलंबून असतेच. समाधान हे आपल्या मानण्यावर असतं. शेवटी,रहावयास उत्तम घर,खाऊन पिऊन सुखी,चांगली नोकरी किंवा व्यवसाय तसेच अंथरुण बघून पाय पसरण्याची आपल्यातील प्रवृत्ती, मुलांना यथायोग्य शिक्षणाच्या संधी, आपल्या कल्पना चित्रात रेखाटल्या नुसार चाललेला संसार वगैरे गोष्टींची परिपूर्णता किंवा मुबलकता ही एखाद्याची सुखाची कल्पना असते. ती त्याला भरभरुन  समाधान देऊन जाते. अशा व्यक्तीच्या कल्पनेतील सुखाची व्याख्या,सुख सुख म्हणजे काय? तर हेच उपरोक्त सर्व बाबींची परीपूर्तताच ! 

    कधीकधी काही लोक सुखाची कल्पना किंवा सुखाची व्याख्या करताना आपल्या श्रीमंतीचा मापदंड लावतात. जेवढी जास्त आर्थिक सुबत्ता तेवढं जास्त सुख असे विचार करणारी माणसं खरंच सुखी असतील का? हा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही. अशा लोकांनी अंतर्मुख होऊन सुखाची व्याख्या करावयास शिकले पाहिजे. सुख आणि श्रीमंती, आर्थिक श्रीमंती यांची जवळीक असू शकते पण पूर्णपणे सलगी असेलच असे अजिबात नाही.कधी कधी काही लोकांची सुखाची कल्पना ही, त्यांच्या महत्वकांक्षेशी नातं सांगत असते. अशा व्यक्तीच्या बाबतीत मात्र समाधानाची व्याप्ती फार विस्तृत असते. आपल्या  महत्त्वाकांक्षेचा परमोच्च बिंदू गाठल्याशिवाय अशा व्यक्तींना समाधान प्राप्त होत नाही. म्हणूनच तो स्वतःला 'पूर्णपणे सुखी आहे मी',असेही मानत नाही. सुखप्राप्तीसाठी त्याची सारखी धडपड सातत्याने चालू असते 
    
    काहीजण सुखाची कल्पना ही सभोवताली दिसणाऱ्या परिस्थितीशी, वातावरणाशी तुलना करत ठरवत असतात. सभोवताली दिसणार्‍या परिस्थिती पेक्षा आपल्या परिस्थिती मध्ये कमालीची सकारत्मकता असेल तर, आपसूकच माणूस आपल्या स्वतःला इतरांपेक्षा 'मी नक्कीच सुखात आहे', असे मानावयास लागतो. आपल्या भारतीयांमध्ये आपल्या कौटुंबिक आयुष्याच्या समाधानावरही सुखाची कल्पना निश्र्चित केली जाते.आपलं कौटुंबिक आयुष्य जेवढं सामंजस्याचं, खेळीमेळीचं , मानसिक प्रगल्भतेनं समृद्ध असणारं, तेवढं आपलं सुखही अधिक समृद्ध असं म्हटलं तर काहीच वावगं नाही.

    लग्न होऊन सासरी जाणाऱ्या लेकीला 

"जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा",

 असाच आशीर्वाद आई  देत असते. एकदा मुलगी व्यवस्थित तिच्या संसारात रममाण झाली की हिच मुलगी, 

" घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात।माहेरी जा सुवासाची कर बरसात।
सुखी आहे पोर सांग आईच्या कानात। 
आई भाऊसाठी परी मन खंतावतं। "

असं म्हणून आपल्या माहेरी निरोप पाठवते ही आपली गाण्यातून व्यक्त झालेली सुखाची परंपरा.

     संसारातील सुखाची दालनं ही "तडजोड" नामक चावीने खुली होत जातात.हे वास्तव सत्य आहे. शेवटी दोन भिन्न पार्श्वभूमी असणाऱ्या, दोन भिन्न व्यक्तींच्या सहजीवनाने  माणसाचा संसार सुरु होत असतो. अशावेळी मतभिन्नता असणे अपरिहार्य आहे. पण दोघांनीही (पती-पत्नी) यांनी सामंजस्याने चर्चा करून आपल्या सुखाच्या कल्पनेचं चित्र रंगवलं,त्याच्या कक्षा निश्चित केल्या तर, आणि सहमतीने दोघांनीही परस्परांच्या विचारांचा आदर करत तडजोडीचे तंत्र  अंगीकारले, तर दुःखाची सावली सुद्धा त्यांच्यावर पडणार नाही. हे मात्र खरे ! म्हणूनच आयुष्यात तडजोडीला अनन्यसाधारण महत्त्व आहे असं म्हणावसं वाटतं.

    शेवटी आपलं सुख हे आपलीच  कृती, वर्तन यावर उभं असतं. सर्वसमावेशक विचार करुन त्याची उभारणी पक्क्या पायावर उभी करणं यातच माणसाचं खरं कसब आहे. 

    आपल्या सुखाच्या कल्पना ठरवताना त्याची सीमारेषा आखून घेताना प्रत्येकाने "ऐकावे जनाचे करावे मनाचे", या तत्त्वाचा अंगीकार करावयास हवा असे वाटते.सुख सुख म्हणजे काय? तर दुसरं काही नसून आपला, "कम्फर्ट झोन"होय. यातून मिळणारा आपल्या मनाचा आनंद, समाधान आपल्याला प्राप्त होणारी मानसिक शांतता,सुरक्षितता आर्थिक सुबत्ता या साऱ्या बाबींचा एकत्रितपणे आपल्या आयुष्यावर पडणारा सकारात्मक परिणामच.  तो केवळ आपल्यालाच जणवू  शकतो. ही अशी जाणीव विस्तारत जाताना माणूस आपल्या आयुष्यात येणारे सुखाच्या, आनंदाच्या, समाधानाच्या परिपूर्ती चे कितीतरी क्षण टिपत टिपत एकत्रित साठवून ठेवतो. आणि त्यातून निघणाऱ्या निष्कर्षाला, त्या सर्वांमधून घेतलेल्या आस्वादाला, त्यांच्या गोड आठवणींना, आणि आठवणींच्या   साठवणीलाच तर सुख असे म्हणतो. म्हणूनच म्हणावसं वाटतं, 

" सुखाचे क्षण, 
टिपत टिपत जाताना
ठेवा आनंदाचा
वाटत वाटत जावा ।
समाधानाच्या, हिंदोळ्यांवर 
स्वार होत असताना
परिपूर्तीचा आस्वाद घ्यावा ।
गंध हा परिपूर्णतेचा
नकळत माझाच श्वास बनावा 
नकळत माझाच श्वास बनावा ।

©
नंदिनी म. देशपांडे.


मो.क्र. ९४२२४१६९९५.

email :

nmdabad@gmail.com

🌹🌹

शनिवार, १६ नोव्हेंबर, २०१९

बालपण

बालपण

आपल्याच बालपणात पुन्हा फिरुन डोकावताना....

   वाटतं,पुनःश्च
   लहान व्हावं...
    अवती भोवतीचा
   स्वच्छंदीपणा आणखी
   एकदा अनुभवावा...

    निरागस प्रश्नांची
     मौक्तिक माला 
    अविरत ज्यपावी...

    फुलपाखरू होऊन
     उंच उंच उडावे
     परि बनून आनंदाने
    खूप खूप बागडावे....

   भातुकलीच्या खेळात,
    बाहुला बाहूलीचे
    लगिन लावावे...

  लुटूपूटूचा स्वयंपाक
   साग्रसंगीत बनवून
 जेवणावळी
घलाव्यात....

 पावसात भिजत चिंब
कागदाची नाव
पाण्यावर सोडावी...

  चॉकलेटचे बांधावेत ईमले
      टपाटप टाकत टापा
    घोड्यावर घ्यावी रपेट....

मामाचं पत्र,आंधळी 
     कोशिंबीर,शिवनापाणी 
आणि
लपाछपी खेळत खेळत
दमून जावं....

बाबांच्या हातून घास
   घेत गोड खाऊचा
  आईच्या तोंडून गोष्ट
   ऐकावी हिरकणीची....

 होताच रात्र,
  पदराच्या पांघरुणात
   आईच्या कुशीत
   झोपावं गुडगुडुप्प
   झोपावं गुडगुडुप्प...

© 
*नंदिनी म.देशपांडे*

🌹🌹🌹🌹🌹🌹

घराचं घरपण...

‌      *घराचं घरपण*

"घराला घरपण देणारी माणसं.... विश्व" अशी काहीतरी जाहिरात असायची पूर्वी टीव्हीवर. हल्ली हिच माणसं अडचणीत आहेत, हे वाचनात आलंयं जाऊ दे. तो मुद्दा निराळा.

     पण मुद्दा हा आहे की ही जाहिरात मला आवडायची. कारण त्यातला "घरपण" हा शब्द माझ्या फार आवडीचा.किंबहूणा 'घराचं घरपण जपणं'हा माझा सर्वांत आवडीचा छंदच.

     कधी कधी,'काय करावं?दिवसच संपत नाही लवकर....' घरात खूप बोअर होतंयं'.असं म्हणणाऱ्या स्त्रियांची कीव करावीशी वाटते.आपल्या स्वतःच्याच संसारात, आपल्या घरातच करमत नाही.वेळ जात नाही. काय करावं?समजत नाही. असं म्हणणाऱ्या स्त्रीयांचीही मोठी गंम्मत वाटते. मला प्रश्न पडतो, या स्त्रिया असं म्हणूनच कसं शकतात?

    गृहिणी,प्रत्येक घरातली गृहिणी ही आपल्या घराचा कणा असते. असे माझे ठाम मत आहे. तिच्यावर लहानपणापासून रुजवलेल्या संस्काराप्रमाणे ही गृहिणी आपल्या घरावरही त्या मूल्यांचे संस्कार रुजवू पाहात असते. त्यात तिच्या आवडीनिवडी,घराचे हित, कुटुंबाचे हित,आपल्या सासरचे संस्कार,रितीरिवाज,
रुढी परंपरा, घरातील व्यक्तींचे स्वभाव,त्यांची प्रगल्भता इत्यादी अनेक गोष्टी विचारात घेऊन, ही स्त्री आपल्या घराच्या संस्कृतीला आकार देत असते.

    प्रत्येक गृहिणी मग ती पूर्णवेळ गृहिणी असो किंवा अर्थार्जनासाठी घरातलं सगळं आटोपून बाहेर पडणारी स्त्री असो, आपल्या घराची, संसाराची ती अनभिषिक्त सम्राज्ञी असतेच.

        आपल्या भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये गृहिणीला गृहलक्ष्मीचा दर्जा दिला जातो. त्यामुळे तिचे अनन्यसाधारण महत्त्वाचे स्थान आहेच.प्रत्येक गृहिणी ही त्या त्या घरात घराला संस्कारांच्या कोंदणात बसवून आकाराला आणते  त्यावेळी ती आपल्या घराचा आत्मा कधी बनते! हे समजतही नाही. घरामध्ये सुख, शांती, आनंद, चैतन्य ठेवायचे असेल तर त्या घरची लक्ष्मी सदैव खूष आणि समाधानी वृत्ती बाळगत वावरणारी असावी.असं म्हटलं जातं ते खूपच खरं आहे.

   कुंभार ज्याप्रमाणे आपल्या चाकावर ओल्या मातीच्या गोळ्याला सुबक आकार देऊन त्यातून एखादे आकर्षक आकाराचे भांडे बनवतो,बनवत असतो तसेच घराच्या बाबतीतही आहे! प्रत्येक गृहिणी ही आपल्या स्वतःच्या घराला, त्यातील  माणसांना किंबहुना वस्तूंना, अन्नपदार्थांना,
स्वच्छतेला नी शिस्तीला तसेच नीटनेटकेपणाला जसं वळण लावेल,तसाच त्या घराचा तो स्वभाव बनत जातो. हळूहळू हा स्वभावच  त्या विशिष्ट घराची ओळख बनते. प्रत्येक घराची अशी ओळख बनवणं, घरावर चांगले संस्कार करणं, घरातील सदस्यांमध्ये सामंजस्य व समन्वयाचं वातावरण निर्माण करणं या सार्‍या गोष्टीत घरातल्या स्त्रीचाच सिंहाचा वाटा असतो. या साऱ्या संस्कारांनी युक्त बनलेलं घर हेच तर त्या घराचं 'घरपण' असतं. 

    म्हणूनच घराचं घरपण जपणारी ही गृहिणी म्हणजे, संसार रथाचे एक चाकच नव्हे,तर ती 'संसाररथाची सारथीच असते',असं म्हणावंसं वाटतं. घराला मंदिर बनवण्यासाठी अशी स्त्री कायम आटापिटा करते.

    आज धकाधकीच्या आयुष्यात आपले राहणीमान, शिक्षण, विविध आवश्यक गरजा पुरवण्यासाठी एकट्या पुरुषाची मिळकत तुटपुंजी पडू शकते. हा विचार करून गृहिणी घराबाहेर पडून,आपल्या बुद्धी चातुर्याच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर आपल्या यशस्वीतेचा एक एक टप्पा पादाक्रांत करते आहे.पतीच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने किंवा,कधीकधी त्याच्यापेक्षा जास्तही योगदान देत संसारातील आर्थिक बाजू बळकट बनवण्याला प्राधान्य देत असते. देत आहे. त्यामूळे सहाजिकच आहे की पारंपरिक पद्धतीच्या पूर्ण वेळ गृहिणी प्रमाणे आधुनिक गृहिणी आपला पूर्णवेळ घरासाठी पूर्णपणे देऊ शकत नाही. तरीही घराच्या प्रत्येक क्षेत्रावर,प्रत्येक आघाडीवर लक्ष देऊन काळजीपूर्वक सारे प्रश्न, अडचणी मार्गी लावत असते.
   
      त्यासाठी घरातील इतर सदस्यांना आणि आपल्या मदतनीस स्त्रियांना वारंवार मार्गदर्शन करत असते. म्हणूनच कालमानाप्रमाणे घराच्या घरपणाच्या व्याख्येत बदल होताना दिसून येतोय.

    पण "घर" या संकल्पनेत मात्र बदल होणं अशक्य आहे.

    दिवसभराच्या धकाधकीतून बाहेर आल्यानंतर बौद्धिक मानसिक व शारीरिक थकवा घालवण्यासाठी प्रत्येक माणसाला सायंकाळी आठवण होते ती आपल्या घराचीच.

   विसाव्यासाठी घरात आले की घरातील वातावरण प्रसन्न हसतं खेळतं असावं, असं साऱ्यांनाच वाटतं.ते तसंच टिकवून ठेवणं हेच आपण जपलेलं घराचं "घरपण"होय. घरपण जपण्यात गृहिणीचा सिंहाचा वाटा असतोच असा उल्लेख आलेला आहेच ,तरीही तिला त्यासाठी समर्थपणे साथ लागते ती इतरही सदस्यांची.अशी साथ
 देण्याची वृत्ती घरातील इतर सदस्यांचीही असावयास हवीच.ही काळाची गरज बनली आहे हल्ली. अधुनिक पारंपारिक गृहिणीला निगुतीने संसार करायचा असतो. आपला संसार करत असताना तिला घरात हवं नको ते बघणं, ऋतुमानानुसार घरातील अन्नधान्याची योग्य पद्धतीने साठवण करून ठेवणं, घरातील सदस्यांची विविध प्रकारची वस्तूंची,कपड्यांची खरेदी करणं. प्रत्येकाच्या आवडीनुसार त्याला हवं-नको विचारणं, ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घेणं, त्यांच्या  औषधांचा स्टॉक बघणं आल्यागेल्याची विचारपूस, आल्या गेलेल्यांचा पाहुणचार करणं. त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधणं या गोष्टीही  बघायलाच लागतात तिला.

      गृहिणीला घराची अन्नपूर्णाही  बनावं लागतं.प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपून त्याप्रमाणे पदार्थ बनवण्यास प्राधान्य देणं,त्यातही पुन्हा सर्वंकष जीवनसत्त्व  असेल असा मेन्यू बनवणं .त्यासाठी लागणारी सामग्री वगैरे अनेक गोष्टी आवर्जून तिलाच आणावी लागतात. किंवा कुणाला तरी सांगून मागवून घ्यावी ‌लागतात. एवढेच नाही तर त्या साफ करणं,निवडणं, किंबहुणा घरगुती दही दूध तूप पनीर वगैरे गोष्टीही बनवणं तिच्याशिवाय केवळ अशक्य!

        खाऊचे पदार्थ सणावारांचा गोडाचा मेन्यू, देवपूजा सण-समारंभ तसंच उत्सवांचं सादरीकरण आणि साजरीकरण यांची रुपरेषा ठरवणं, विविध प्रकारची बीलं भरणं, बँक व्यवहार एक ना दोन कित्येक बारीक-सारीक गोष्टींकडे तिचं बारीक लक्ष असतं. ते स्वतः करणं किंवा करवून घेणं या दोन्हीही भूमिका तेवढ्याच महत्त्वाच्या.

     अन्नपूर्णेच्या महत्त्वाच्या भूमिकेबरोबरच आपल्या घरापुरता "इंटेरियर डेकोरेटर",हे पदही स्त्रीला निभवावं लागतंच.  घराची सजावट,फर्निचर त्यांची सुयोग्य मांडणी करणं,प्रत्येकाच्या सोयीनुसार त्यात,त्यांच्या रचनेत बदल करणं घराचे पडदे,चादरी या गोष्टींकडेही तिचं बारीक लक्ष असतचं.

      हे सर्व करताना या गृहिणीला, तिच्याशी असणाऱ्या इतर 
नात्यांची भूमिका सुद्धा तेवढीच महत्त्वाची वाटत असते.कारण एकदा विवाह बंधनात स्त्री अडकली की, लगेच ती निरनिराळ्या नात्यांत गुंफली जात असते.
    'गृहिणी' किंवा 'गृहलक्ष्मी' हे पद प्रमुख तर आहेच.त्या सोबत या ईतर नात्यांत समन्वय ठेवणंही तेवढंच गरजेचं मानते ती.
   
     गृहिणी किंवा गृहलक्ष्मी या प्रमुख भुमिकेबरोबरच  ती पत्नी, सून, आई, वहिनी, काकू,या आणि इतर अनेक नात्यां मध्येही गुंफत गेलेली ही गृहिणी नाती जपणं, त्यांना योग्य तो न्याय देणं हे सुद्धा महत्त्वाचं कर्तव्य तिचा संसार करताना तिला पार पडावं लागतं.

        या शिवाय घरात छोटी मुलं असतील तर, त्यांचं शाळा-कॉलेज, त्यांचा अभ्यास,त्यात मार्गदर्शन करणं या गोष्टी सुद्धा गृहिणीसाठी हल्ली फार महत्त्वाचं काम बनलं आहे.

       मुलांच्या शिक्षणाकडे, त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या संस्कारांकडे लक्ष ठेवणं,त्यांना घरातूनही योग्य संस्कार देणं,  त्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे बारीक लक्ष ठेवणं अशा आणखीही खूप काही गोष्टींकडे, स्त्रीही पूर्णवेळ गृहिणी असो किंवा नोकरी करणारी गृहिणी असली तरीही वर सांगितलेल्या सार्‍याच आघाड्यांवर तिला कायम तत्पर राहावं लागतंच. कारण तिचं घर,तिचा संसार, तिची माणसं ही सर्व तिचा 'आत्मा' असतात. त्यावर कधीही कोणतीही आच येऊ नये असाच तिचा कायम प्रयत्न असतो. 
    
    हे सर्व करत असताना आपले चार पैसे कुठे आणि कसे वाचतील याकडेही चांगलंच लक्ष असतंच तिचं. त्यामूळे घराचं 'घरपण' हे चार भिंतींनी बनत नाही किंवा टोलेजंग इमारतीवरही ते अवलंबून नसतं, तर ते त्या घरातील माणसांवर त्यांच्या संस्कारांवर, स्वभावावर त्या घरातील वातावरणावर, सुख-शांती-समाधान यांवर अवलंबून असतं. या साऱ्या घटकांनी मिळून युक्त असं घर बनवणं ही त्या घरातील गृहलक्ष्मी वर खूप मोठी जबाबदारी आणि तिची कला असते.ती आवडीनं ते निभावत असते. यासाठी तिला लागणारे सहकार्य मात्र घरातील इतर सदस्यांनी करणं अत्यंत गरजेचं असतं. कारण घर हे सर्वांचचं असतं. त्याचा आर्थिक आणि मानसिक  मेंटनन्स घरातल्या सर्व सदस्यांवर अवलंबून असतं.
   
     खरं म्हणजे हेच तर घराचं घरपण असतं. एक वेळ घर छोटे असेल तरीही चालत,घरात श्रीमंती थाट नसेलही तरी चालतं पण समाधान हवंच.हे समाधान,प्रसन्नता,
आदरातीथ्य,विनयशील वृत्ती,परस्परां विषयीचा आदर या सर्व गोष्टी घराला मंदिराचं स्वरुप प्राप्त करुन देतात.  त्या घराचं असं घरपण कायम ठेवणं, ते जपणं ही फार मोठी जबाबदारी आहे. आणि ते जिवापाड जपण्याचं काम त्या घरची गृहिणी लीलया पार पडते.
    
      मला वाटतं भारतीय कुटुंब व्यवस्थेचं हाच तर मुख्य गाभा आहे. घरपण जपलं तर कुटुंबव्यवस्था ही मजबूत होईल. पर्यायाने समाज आणि देशही. म्हणूनच या व्यवस्थेची मूलभूत अंग असणारी गृहिणीची भूमिका फार महत्त्वाची आहे. ओघानेच असं म्हटलं जातं, "ज्या घरातील गृहलक्ष्मी कायम प्रसन्न समाधानी असते, त्या घराचे घरपण कधीच लोप पावत नाही".

*नंदिनी म.देशपांडे*

विजया दशमी,
ऑक्टो.८,२०१९.

🌺🌺

आराधना...

*आराधना*

*आराधनेची* आराधना देवाला भावली,
नी तिची ही प्रर्थना फलद्रुप झाली.... पदरात तिच्या भरभरुन ओंजळीने दान टाकती झाली....
 कुशीतून आराधनाच्या सानुल्या दोन गोड गोंडस पऱ्यां या सृष्टिवर आगमनीत झाल्या.....
ईवल्याशा पऱ्या या दोन, 
जणू सरस्वती आणि लक्ष्मी हातात हात घालून 
हासत खेळत अवतरल्या.....  साडेतीन मुहूर्तांपैकी एक अशा दिपोत्सवाच्या, पाडव्याच्या ‌शुभ मुहुर्तावर अवनीवर पाऊल टाकत्या झाल्या.....
*नभा* सारख्या विशाल हृदयी आजीच्या या नाती दोन दिवाळी पाडव्याची मौल्यवान सोनेरी भेट बनून आल्या......
ईश्वराने बहाल केलेल्या या अमूल्य ठेव्यानं दोन्ही घरांतील कुटुंबात आनंद लहरी फेर धरत्या  झाल्या......
आई बाबा या पऱ्यांचे कृतकृत्य झाले,
 त्यांच्या
समाधानाच्या तेजाने दिपावलीचे दिवे उजळू लागले.....
पणत्या या दोघी, 
दोन्ही घरांच्या उपजतच स्वयंप्रकाश लेवून आल्या......
आम्ही स्वयंसिध्दा,आम्ही मार्ग दर्शिका,आम्ही हिरकण्या नि आम्हीच
वंशलतिका गाणी मनाशीच गुणुगुणु लागल्या.....
आजी,आजोबा,काका,मामा,आत्या आणि मावशी सारेच कसे प्रफुल्लित जाहले.... दिपोत्सवाच्या संगतीने,सनई च्या मंजूळ स्वरात सोन्याच्या पावलांनी,पाऊस धारेच्या साक्षीनं
 अवतरलेल्या 
या दोन पऱ्यांच्या स्वागतासाठी लगबगीने तयारीला लागले.......
फुलांच्या माळा, रंगीबेरंगी दिपमाळा,आकाश कंदिल सारेच जाहले उत्सुक.....
अंगण सजले रांगोळ्यांनी, अवनी सजली हिरव्या मखमली गलिच्याने..... पऱ्यांसाठीच असे जणू ही पखरण.....
मुलायम या  पायघड्यांनी निसर्ग राजा हासत डोलत भुलोकी या
सज्ज जाहला....
करण्या स्वागत सानुल्यांचे...... 
गोड गोजिऱ्या या दोन पऱ्यांचे,
आराधनेच्या या दोन कन्यकांचे...
या दोन प्रकाश दर्शक तेजस्विनींचे...

©
*नंदिनी म.देशपांडे*

दिवाळी पाडवा,२०१९.

💐💐💐💐💐💐

रविवार, ३ नोव्हेंबर, २०१९

स्टॅच्यू ऑफ युनिटी.

*स्टॅच्यू ऑफ युनिटी*

    गुजरात राज्याची पर्यटनासाठी ट्रीप आखताना, नर्मदा नदीतीरी असणारे केवडिया येथील,सरदार सरोवर, "स्टॅच्यू अॉफ युनिटी" हे एक मुख्य आकर्षण होतेच.... 

    फार मोठे क्षेत्रफळ असणाऱ्या भुमीच्या एका तुकड्यावर भारताचे पोलादी पुरुष, सरदार वल्लभाई पटेल या *लोह* पुरुषाचा भव्य दिव्य पुतळा....

     जगातला सर्वांत उंच पुतळा अशी ज्याची  ख्याती आहे...आरवली पर्वत राजींच्या कुशीतून उंच उंच होत,या पर्वतांची उंची गाठणारा हा सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा,त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या अतिशय समिप घेऊन जाणारा असाचआहे.... सरदारांना आपण प्रत्यक्षपणे बघत असल्याचा भास निर्माण करणारा असा अप्रतीम पध्दतीनं,कलाकुसरीनं बनवलेला आहे....
अगदी चेहऱ्यावरची रेष न रेष बोलकी आहे, ईतपत जाणीव निर्माण करणारा हा पुतळा.भारताच्या एकतेचे प्रतिक बनून प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावणारा असाच आहे...

     रम्य निसर्गाच्या सान्निध्यात,नर्मदेच्या पात्रात तयार करण्यात आलेल्या सरोवर किंवा धरणाच्या काठावर तसेच नर्मदेच्या विशाल पात्रा लगत उभा आहे...जणू कांही अगदी उंच उंच मान करत सरदार पटेल हे पोलादी व्यक्तिमत्व,आपल्या भारत भुमीवर बांधलेल्या बुलंद गढीवर उभे ठाकून आपल्या मातीचा कण ना कण एकत्रित जोडलेला आहे ना?याची टेहाळणी करत आहेत...अशी जाणीव निर्माण करणारा असाच....
खरंच अतिशय प्रेरणादायी आणि प्रत्येक भारतीयाचा स्वाभिमान व्दिगुणित करणारं असं हे ठिकाण आहे... एकदाच नव्हे तर पुनःपुन्हा भेट द्यावं असंच....
हा पुतळा बनवताना वापरलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कसा उपयोग केला गेलाय, ते तेथे गेल्यानंतर समजेलच...
   
   पण आपल्या देशाची एकात्मकता टिकवून ठेवण्या साठीचे आणि एकूणच त्यांचे भारतीय भुमीच्या स्वातंत्र्यासाठी चे भरीव योगदान,त्यांचे प्रेरणात्मक कार्य आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय,या पुतळ्याच्या माध्यमातून करवून देण्याचा केलेला प्रयत्न अतिशय स्तुत्य आहे....
   
     भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा ईतिहासाचे स्मरण करत पुढच्या पिढ्यांपर्यंत ते कायम पाझरत ठेवण्याचं काम अशा पध्दतीनं केलं जाणं खरोखरच एक आदर्श पायंडा आहे...
वरकरणी आपण केवळ
पुतळा बघण्यासाठीच आलो आहोत येथे. असे वाटत असले तरीही तेथे गेल्यानंतर अख्खा दिवस त्या परिसरात घालवल्या नंतर, आपला दिवस सार्थकी लागला आहे व आपण कृतकृत्य झाल्याचे पुरेपूर समाधान मिळते....

    पुतळ्याच्या आतून लिफ्ट ने आपण नऊ माळे वरती जातो, त्यावेळी तेथून दिसणारा नजारा काय वर्णावा! एवढ्या उंचावरुन म्हणजे पुतळ्याच्या आतून त्यांच्या हृदयाच्या लेव्हल ला आपण पोहोचतो आणि तेथून दिसणारा नर्मदा नदीवरील भव्य असे धरण,आरवली पर्वतांच्या काळ्याशार रांगा,त्यावर भव्य रंगीबेरंगी छटांना कवेत घेऊन हसणारे आकाश, आणि सभोवतालचा निसर्ग रम्य परिसर डोळ्यांचे पारणे फिटते....
हे सारं बघून खाली उतरलो आपण,की लेखी आणि चित्र रुपातील स्वातंत्र्य संग्रामातील आणि स्वतंत्र भारताच्या विलिनीकरणाच्या कार्यातील वल्लभभाई पटेलांच्या कार्याचा आढावा घेणारं म्यूझियम अप्रतिम आहे...
भला मोठा परिसर अत्यंत सुशोभित स्वरुपात आणि प्रकाशाच्या झगमगाटात डोळे दिपून टाकणारा आहे....आपण अक्षरशः स्तिमित होऊन बघत रहातो.... 

    हे सारं डोळ्यात साठवत साठवत आपण पर्यटन बस मधून व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, आणि धरण परिसरात चक्कर मारुन येतो...
विविध प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांनी सजवलेली ही व्हॅली मन मोहवून टाकते...
धरण परिसरात अजून काम चालू आहे....बहुतेक धरणाच्या भिंतींची उंची वाढवण्याचे काम चालू होते...
 
    आणखीही बऱ्याच प्रकारच्या विविध प्रकल्पांची कामं जोमानं चालू असल्याचे दिसून आले....त्यात प्राणी संग्रहालय,डिस्ने लॅंड इ.अनेक प्रकारची कामं प्रगतीपथावर चालू आहेत....
हे सारं बघून आपण पुनश्च पुतळ्याच्या पायथ्याशी परततो. सायंकाळी सव्वासात वाजता दाखवल्या जाणाऱ्या साऊंड अॅंड लाईट शो बघण्यासाठी साठी प्रत्येकजण आतूर झालेला दिसतो....

    बरोबर वेळेत चालू होणारा हा शो आपल्या ला या पोलादी पुरुषोत्तमाच्या जीवन चरित्राची,त्यांच्या महान  कार्यकर्तृत्वाची इत्यंभूत माहिती देतो.तसेच यातून आपण, पुतळा बनवताना लागलेल्या कौशल्यपूर्ण हातांची महती,त्यातील तंत्रज्ञानाचं स्वरुप वगैरे गोष्टींची इत्यंभूत माहिती घेत रहातो आपण. आणि इतिहासाची सफर  करुन येतो...

 आपसूकच नतमस्तक होतो....आणि आपल्या राष्ट्र गीतानं कार्यक्रमाचा समारोप करत,भारत मातेचं गुणगाण गाऊ लागतो....

    या साऱ्याच गोष्टी वाचनातून अनुभवण्या पेक्षा प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन अनुभवण्यात खरोखरच दिव्यत्वाची प्रचिती येऊ लागते..... आपण त्रिवार वंदन करु लागतो... आपल्या भारत भूमीला आणि देशहितासाठी झटणाऱ्या सरदार पटेलांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वांना.....

*जयहिंद-जय भारत*

अशा घोषणा देत....

अशा पध्दतीची स्मरण स्थळं,प्रेरणास्थानं ठिकठिकाणी बनवली गेली पाहिजेत आणि भारताच्या स्वातंत्र संग्रामाचं,एकत्वाचं गीत सतत आळवत राहिलं पाहिजे ही काळाची गरज आहे निश्चितच....याची महती पटत जाते...

©
*नंदिनी म.देशपांडे*.

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳