शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०२३

बाबांची माय. ....

"बाबांची माय"
 -------------

             ©️ नंदिनी म. देशपांडे. 

         "आपल्याला काही गोष्टींचा कालपरत्वे विसर पडतच असतो ना? कारण आपला त्याच्याशी फारसा संबंध येत नाही हो ना? "
      
         अगदीच प्राथमिक टप्प्यात अल्झायमर चालू झालेला असताना माझ्या वडिलांनी मला प्रश्न केला एक दोन वेळेला....किंबहूणा त्यांना अशा काही मानसिक आजाराची सुरुवात झाली असेल याचा मलाही थांगपत्ता लागला नव्हताच....

      "कांही दिवसानंतर मला डोक्यात काहीतरी वेगळंच जाणवतंयं...डोकं जड होतंयं आणि झोपही येते आहे"...अशी एक सुचना मला त्यांनी केली...

      आपल्याला काहीतरी वेगळं होत आहे, ते जाणवतंय, पण नेमकं काय ते सांगता येत नाहीए, याची सातत्याने बाबांना स्वतःला जाणीव होत होती...चाणाक्ष बुध्दिमान माणूस,म्हणूनच आयुष्याचे 78 वर्षे काढलेली ही व्यक्ती अजूनही विचार क्षमता प्रगल्भ होतीच याचेच हे उदाहरण!

         पण जेंव्हा,व्हॉट्स ॲपवर गुुड मॉर्निंग मेसेजेस ईव्हिनिंगला ते पाठवू लागले, शेव्हिंग करताना 
डोक्यावरचे केसही स्वतःच कापू लागले  तेंव्हा मात्र आमचे धाबे दणाणले...आणि अचानक एक दिवस मोबाईल ऑपरेट कसा करावा हेच पूर्णपणे ते अगदीच विसरून गेले...
 
      या सर्व घटना केवळ महिना दोन महिन्यातच घडू लागल्या आणि नेमकाच कोरोना संपलेला असताना आम्ही भावंड मानसोपचार तज्ञाकडे बाबांच्या 'केस'विषयी चर्चेसाठी गेलो...
       
      खरं म्हणजे बाबांच्या दैनंदिन वागण्यात झपाट्याने होणारा बदल हा प्रथम भावाच्या लक्षात आला...तो आम्हा बहिणींना कळकळीने, "मानसोपचार तज्ञाकडे बाबांना घेऊन जाऊ या आपण"असे बोलत होता पण आम्हाला फारसे जाणवत नव्हते आणि बाबा स्वतः यासाठी तयार होतील का?हा फार गहन प्रश्न आमच्यासमोर होता...त्यांना त्यासाठी कसे तयार करावे यासाठी लुप्तीशोध चालू झाला...उलट आमच्या बोलण्यातील या विषयावरची कुणकुण त्यांना लागली असावी, आम्हाला ते स्वतः पेपरमध्ये आलेली अल्झायमर आजारावरचे लेख वाचून दाखवत...आठ नऊ ऑक्टो.ला मानसिक आरोग्या विषयी विशेष दिना निमित्त बरेच लेख आले होते,ते सारे पेपर्स सांभाळून ठेवण्या विषयी आम्हाला सांगत होते...
     
        प्रथम आम्हीच भावंड डॉ. शी चर्चेत भाग घेऊन ठरवू या असे आमचे ठरले...

       एका मानसोपचार डॉक्टर शी पाच फूट लांब बसून आम्ही चर्चा केली...पेशंटला आणण्याची गरज नाही त्यांचा दैनंदिन वागणूकीचा एक व्हीडीओ करुन घेऊन या असे त्या बोलल्या...
तसे आम्ही केलेही आणि दोन दिवसातच त्यांनी बाबांच्या अल्झायमर वर शिक्कामोर्तब करुन औषधंही लिहून दिली...

      फारतर तीनचार दिवसातच औषधांचे परिणाम दिसू लागले...बाबांचा बडबडा स्वभाव अगदीच लोप पावला...एवढा की त्यांना बोलता येतच नाही की काय? अशी शंका मला येऊ लागली...जेवणावरची वासनाही उडत चालली होती....कळजी करण्यासारखी परिस्थिती उद्भवली आणि आम्ही या औषधांना कचराकुंडी दाखवली...

        पुन्हा तज्ज्ञ म्हणवणारे नवीन मानसोपचाराचे डॉक्टर बघितले...त्यांनी पेशंट च्या एमआरआय वगैरे टेस्टस् सुचवल्या लगेच करुनही घेतल्या आणि आमच्या बाबांचा मेंदू श्रींक (आकसण्याची) प्रक्रिया चालू झाली आहे, अशा पेशंटच्या वागण्या बोलण्यात काय काय बदल होऊ शकतात, काळजी कशी घ्यावी वगैरे ईत्यंभूत माहिती आम्हा सर्वांनाच त्यांनी दिली, आणि औषधोपचार चालू केले...पुन्हा पेशंट ला आणण्याची अजिबात गरज नाही हे आवर्जून सांगत...

        डॉक्टर म्हणाले तसे बदल बाबांमध्ये फारच झपाट्याने होत गेले...तसा त्यांचा त्रास आम्हाला नव्हता पण केअर टेकर 24 तास सोबत हवाच  हे कळून चुकले आम्हाला, आणि आम्ही ते ठेवलेही...केवळ एक वर्षच ठेवावा लागला तो...दिवसभर ते माझ्या आसपासच असायचे...मला अजिबात दूर जाऊ द्यायचे नाहीत...अगदी त्यांचं लहानपण फिरुन आलंयं का?अशी शंका वाटण्या ईतपत आमची सोबत त्यांना हवी असायची...

     मला तर त्यांनी त्यांच्या "माय" चा  दर्जा दिला होता...तू माझी आई आहेस तिच्या सारखीच माझी काळजी घेतेस हे वारंवार बोलून दाखवायचे ते!
या निमित्ताने दिवसातले जवळ जवळ बारा तास माझ्या सान्निध्यात असायचे बाबा, होईल तेवढी सेवा करत आपल्या जन्मदात्याच्या ऋणातून किंचितशी उतराई होण्याचा प्रयत्न करत होते मी पण...त्यांनी मला दिलेल्या आईपणाच्या दर्जाला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होते...

     पण आयुष्याची 77 वर्षे ज्यांनी शाही,वैभवी जीवन जगलं, आपला दबदबा आपल्या कार्यकौशल्यातून दाखवला, कितीतरी माणसं जोडून ठेवली..ज्यांनी आम्हा भावंडांवर नितांत प्रेम करत आमची काळजी वाहिली,माझी आई गेल्यानंतर आम्हा भावंडांवर आईचीही माया केली...त्या आपल्या वडिलांची केवळ एकच वर्ष का असेना पण अल्झायमर मूळे झालेली विकलांग मानसिक अवस्था, मला माझ्या समोर बघणं म्हणजे,हा माझ्या मनाच्या क्लेशदायक वेदनांचा अक्षरशः कडेलोट होता....

      पण त्यांची "माय" बनून कसा सहन केला ते, आठवले तरी मन विदीर्ण होते आजही...

         मागच्या वर्षी ऑक्टो. च्याच 9 ता.ला ,कोजागिरी पौर्णिमेस माझ्याच घरुन त्यांना हॉस्पिटल मध्ये ॲडमीट होण्यासाठी निघताना,मी सांगितल्यानंंतर देवाला व्यवस्थित नमस्कार करुन निघालेले आमचे बाबा, परत फिरुन येतील ना?अशी पालही चुकचुकली माझ्या मनात...

      आपण मोठी माणसं गावाला निघताना त्यांना पदस्पर्श करत नमस्कार करतो तसाच, त्या वेळी मलाही घालावासा वाटत होता...पण सकारात्मक विचार मनात आणत आपण येथेच त्यांचे आनंदाने स्वागतच करणार आहोत असे मनात ठरवून त्यांना हॉस्पिटल मध्ये जाताना निरोप दिला होता मी....

   पण महिनाचभरात परिस्थितीत  फारच गुंतागुंत होत जाऊन माझ्या मनात निर्माण झालेली शंका वास्तवात बदलली...
  तशाही अवस्थेत प्रसन्न आणि तेजःपुंज असणारा त्यांचा हसरा चेहरा मात्र कधीच मलूल झाल्याचे आठवत नाही...
     
      नियतीशी दिलेली बरोबर महिनाभराची त्यांची नीकराची झुंज देखील दुःखाचा लवलेशही आणू शकली नाही बाबांच्या चेहर्‍यावर...

    अगदी आमच्या नकळत शांत सोज्जवळ तेवणारी प्राणज्योत 7 नोव्हेंबर च्या, त्रीपूरी पौर्णिमेच्या नीशेच्या निद्रेमध्ये चीरनीद्रा घ्यावयास गेली....

     आजच्या वर्ष भरापूर्विच्या त्या सर्व दिवसांचे आपसुकच 
पुनरावलोकन मनाने चालू केले आणि माझ्या मनातील या क्लेशदायक आठवणींना वाहून जाऊ दिले अगदी अलवारपणे...

        पण त्यांच्याही नकळत मला माझे बाबा मला "माय" बनवून गेले होते...याचा मला झालेला आनंद मनाच्या आतल्या कुपीत जपून ठेवलाय मी कयमचाच....

आज ति.बाबांचा,प्रथम स्मृतिदिन 
या निमित्ताने त्यांना आदरपूर्वक 
विनम्र अभिवादन....
🙏🙏🙏

औरंगाबाद, 7 नोव्हेंबर 2023.

🌹🌹🌹🌹🌹