मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२

लक्ष्मीचा प्रवास...

मानवी आयुष्यात कन्यादाना एवढं पुण्य कशात नाही असे म्हणतात...याचाच अर्थ पोटी कन्येनं जन्म घेणं किती पुण्याई आहे बघा...
      कन्या, मुलगी घरात अवतरते ती 'लक्ष्मीचे' रुप असते असे म्हणतात...लक्ष्मीच्या पावलाच्या आगमनाने या घराण्याची भरभराटच होत जाते...हळू हळू ती सरस्वतीचा आशिर्वाद मिळवते आणि जिद्दीने आपल्या पायावर ऊभे रहाण्याचा अट्टहास ठेवते....
     हे साधत असताना ती घरातील सर्व सदस्यांच्या गळ्यातील ताईत बनते...भावंडात सर्वांत मोठी असेल ,तर वडिलांचा उजवा हात बनते...आईला घरकामात मदत करते...गृहिणीपदाची  वाट अजमावून बघण्याची आस मनी ठेवते...
      मोठी ताई असेल तर भावंडांची आईसारखी काळजी घेण्याचा प्रयत्न करते आणि लहान असेल तरीही भावंडांवर प्रेमाची पखरण करते...आजी-आजोबा यांची सेवा करण्यात कृतार्थता मानते...
      एकूणच मुलगी घरात आनंदी आनंद पेरत पेरत येते...

       हिच मुलगी लग्नाळू वयाची झाली की, भावंड तिला चिडवतात, 

ताई मला सांग, मला सांग, कोण येणार गं पाहूणे?

     ही ताई मग लटक्या रागाने 'मी लग्नच करणार नाही मुळी'असं म्हणते...पण मनात मात्र रुबाबदार राजकुमाराची वाट बघत असते...स्रीसुलभ भावना मनात नाचत रहातात ती स्वप्न बघण्यात रममाण होते...
      मनासारखा राजकुमार तिला मिळाला म्हणजे, मग ती, 

लेक लाडकी या घरची होणार सून मी त्या घरची....

असं गुणगुणंत रहाते...
       हात पिवळे होण्याची घटिका समिप येऊ घालते...मग हातभरून हिरवा चुडा आणि नाजूक मेंदीने रंगलेले आपल्या लेकीचे हात कौतुकाने बघून घरातील मोठी मंडळी,आणि तिच्या सख्या तिला म्हणत असतात, 

 पिवळी पिवळी हळद लागली भरला हिरवा चुडा, वधु लाजरी झालीस तू गं सांगे तो चौघडा...

    अशाप्रकारे सनई चौघड्याच्या साक्षीने आपल्या घरची लाडली दोनाचे चार हात होत, नियंत्याने बांधलेल्या ब्रह्मगाठीत बांधली जाते...नवर्या मुलाला गळ्यात हार घालताना लाजेनं चूर होत नजरेनंच त्याच्याशी बोलते...
      
हळव्या तुझीया करात देता करांगुली मी 
स्पर्शावाची गोड शिरशिरी उठते ऊरी 
सप्तपदी मी रोज चालते तुझ्या सवे शतजन्मीचे हे माझे नाते...
      
ही नववधू असे मनातल्या मनात गुणगुणत असेल का?असा भास होतो...
 
      विवाह वेदीवर चढलेले नवरानवरी विवाह विधी पूर्ण करत या समारंभाच्या शेवटाकडे येऊ लागतात...आईचा ऊर आपल्या लाडकीची लवकरच पाठवणी करावी लागणार म्हणून राहून राहून दाटून येऊ लागतो...आपले भरले डोळे ती जाणीवपूर्वक लपवत असते...आणिक वरमाय असणाऱ्या आपल्या विहिणबाईंना विनवते...

ओटीत घातली मुलगी विहिणबाई 
सांभाळ करावा हिच विनवणी पायी...

मुलीचे आणि तिच्या स्वकीयांचे या हळव्या शब्दांनी डोळे पाणावतात...आपल्या लाडक्या सानुलीच्या विरहाने वधूपित्याचे मन मूक रुदन करु लागते...

     आता निरोपाचा क्षण आलेला असतो...वधूला आपले माहेर आणि तेथील माणसं आपल्याला दुरावणार या भावनेने सारखं वाईट वाटणं सहाजिकच असते...
    मनातून ती म्हणत असते, 

निघाले आज तिकडच्या घरी 
एकदाच मज कुशीत घेऊनी पुसुनि लोचने आई 
तुझी लाडकी लेक आपुले घरकुल सोडून जाई 
तव मायेचा स्पर्श मागते 
अनंत जन्मांतरी 
निघाले आज तिकडच्या घरी...

आईवडील आणि वधू या हळव्या क्षणांना सामोरं जात जात 
आई बाबा मुकपणे म्हणत असतात, 

जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा 
गंगा यमुना डोळ्यात ऊभ्या का...

     भरल्या डोळ्याने आपल्या लाडक्या लेकीची पाठवणी करताना आईबाबा कृतकृत्य नजरेनं लेक जावयाला शुभाआशिर्वाद देतात...

     वाजत गाजत नववधु उंबरठ्यावरचं माप ओलांडत सासरच्या घरी प्रवेश करते...सासरच्या घरी लक्ष्मीचे आगमन अगदी वाजत गाजत आनंदाने होते....
 सासुबाई म्हणतात ,

लिंबलोण उतरता 
अशी का झालीस गं बावरी 
मुली तू आलीस आपल्या घरी 
मुली तू आलीस आपल्या घरी...

    असा हा माहेर घरच्या लक्ष्मीचा सासर घरची लक्ष्मी या नात्याने होणारा प्रवास हुरहूर लावणारा पण मोठा गोड आणि हवाहवासा असतो...

      ती कुठेही असेल तरीही लक्ष्मीच असते...
पण आयुष्याच्या अनेक वळणांवर ती सरस्वती, दुर्गा, चंडिका, रेणूकाई, अंबाबाई,अशी शक्ती देवतेची नवचंडी रुपं धारण करत करत नवचंडीच्या अनेक रुपांतून आपल्या आयुष्याचा प्रवास करते...
न थकता, कोणत्याही तक्रारीशिवाय आणि अडचणींवर मात करत करत जिद्दीने यशस्वी होत जाते....

   आज जागतिक कन्यका दिनाच्यानिमित्ताने आणि उद्या येणाऱ्या नवरात्रीच्या शुभारंभाच्या निमित्ताने एका स्त्रीच्या प्रवासाचा असा आढावा घ्यावासा वाटला...म्हणून हा लेखन प्रपंच...
वाचकांनाही आवडेल अशी आशा करते...

©️नंदिनी म. देशपांडे. 
दि.२५,सप्टेंबर २०२२.

🌹🌹🌹🌹🌹

मंगळवार, २० सप्टेंबर, २०२२

गौराई....

भादव्यात अवतरली गौराई 
आगमनाचा तिच्या थाट होई भारी 
परजन्याने बरसवले पाणी 
वसुंधरेनं ल्याली बनारसी हिरवी 
फुलांनी घातल्या पायघड्या रंगीबेरंगी 
आकाशी जमल्या सप्तरंगी राशी 
इंद्रधनू तोरण लावे निलांबरी 
गणेशाला सवे घेऊनी 
झोकात आली गौराई 
समृध्दीचे सिंचन झाले भुवरी 
संपन्नतेची शहेनाई वाजे अवनीवरी 
गौराई चे कौतूक करावे किती किती!!

©️नंदिनी म.देशपांडे. 
२०,सप्टें.२०२२.
🌹🌹🌹🌹🌹🌹

गौराई चे स्वागत...

भादव्यात अवतरली गौराई 
आगमनाचा तिच्या थाट होई भारी 
परजन्याने बरसवले पाणी 
वसुंधरेनं ल्याली बनारसी हिरवी 
फुलांनी घातल्या पायघड्या रंगीबेरंगी 
आकाशी जमल्या सप्तरंगी राशी 
इंद्रधनू तोरण लावे निलांबरी 
गणेशाला सवे घेऊनी 
झोकात आली गौराई 
समृध्दीचे सिंचन झाले भुवरी 
संपन्नतेची शहेनाई वाजे अवनीवरी 
गौराई चे कौतूक करावे किती किती!!

©️नंदिनी म.देशपांडे. 
२०,सप्टें.२०२२.
🌹🌹🌹🌹🌹🌹

गौराईचे स्वागत..

*सोनपावली गौराई आली* 

गौराईच्या स्वागता
  सांजवेळ दारी आली 
धूपदिप तुळशीपाशी 
मंगल आरती तेवते होई 
प्रासन्या सवे देवा जवळी 
लक्ष्मीच्या सोनपावली 
गौराई आगमनीत झाली
लक्ष लक्ष दिपांच्या ओळी 
मनामनांत दिपू लागली 
मंगलसनई वाजू लागली 
जेष्ठा कनिष्ठा सुहास्य वदनी
स्वागता नित् ऊभ्या घरी
  बघा सांज आली आली 
आनंदे सारी  नाचू गाऊ लागली...

©️नंदिनी म.देशपांडे. 
१९,सप्टें.२०२२.
🌹🌹🌹🌹🌹

गुरुवार, १५ सप्टेंबर, २०२२

हिंदी भाषा दिन.

*हिंदी एक राष्ट्रभाषा*

      खरं म्हणजे,माझा हिंदी भाषेचा संबंध आला तो मी पाचव्या वर्गात आल्यानंतरच....व्दितीय भाषा म्हणून हिंदी अनिवार्य...
     पण कुटुंबात आणि अजुबाजूला सर्व मराठीभाषिक! घरी घरकामासाठीची बाई हिंदीभाषिक होती तरीही ती चांगलं मराठी बोलायची...एक मुस्लीम मैत्रीणही होती पण तीही मराठीतच बोलायची! परिणाम असा झाला की, हिंदी भाषेची आवड निर्माण होऊन गोडीच लागली नाही तिची...
       पण, "हिंदी" ही आपली "राष्ट्रीय भाषा"आहे
याचे ज्ञान झाले आणि तिच्याबद्दल आदर वाटू लागला...अभिमान वाटू लागला आणि नकळत प्रेमही वाटू लागलं...मग हिंदीभाषिक लोकांशी तोडकं मोडकं संभाषण सुरु झालं...समोरच्या व्यक्तीच्या चेहर्‍यावर जाणवणारी माझ्या बोलण्यातली कमालीची विसंगती बघून तोच आपसूक मराठीत बोलावयास सुरुवात करतोय हे लक्षात येऊ लागलं....मग मीही बापडी फारशी तसदी घेत नसे बोलण्याची...
     मला परीक्षेच्या वेळीही हिंदीचंच टेन्शन यायचं, पण लिहिताना मात्र म्हणावी तशी भिती नाही वाटली.... बोलताना अजूनही जीव्हेची कसरतच होत असते असो...विनोदाचा भाग वेगळा...
    आज "हिंदीभाषा" दिवस..."मराठीभाषा" दिवस साजरा करताना ज्या उत्साहाने लिहिती झाले त्याच उत्साहात आजही लिहिण्याचा प्रयत्न केला....
      हिंदी साहित्य फारसे वाचनात नाही पण तरीही हिंदुस्थानची हिंदी भाषा, आपली राष्ट्रीय भाषा म्हणून निश्चितच तिचा आदर, अभिमान आहेच...तो भारताच्या प्रत्येक नागरिकाने करावयास हवाच...
      उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पुर्वेपासून पश्चिमेपर्यंतच्या संपूण भारतभर हिंदीविषयी तेवढाच अभिमान असणे अपेक्षित आहे...
      भारतात बोली भाषेंची तर गणतीच नसावी एवढ्या आहेत....दर बारामैलांवर भाषा बदलते असे पूर्वि लोक म्हणायचे...
    संस्कृत ही साऱ्या भाषांची जननी आहे ती पण तेवढीच शिरोधार्ह... पण अखंड हिंदुस्थान ची ती हिंदी म्हणून विशेष अभिमान....
       पण पर्यटनासाठी म्हणून जेंव्हा दक्षिणेतील राज्यांमध्ये आम्ही गेलो, त्या वेळी त्यांचा हिंदीला असणारा विरोध आणि दःस्वास मनाला फार यातना देऊन जातो...
     त्यांच्या बोलण्यातून इंग्रजीचा उध्दार ऐकून राग येत नाही,  पण मनात मात्र त्यांच्या विषयी आपुलकी  वाटत नाही....
       हिंदी भाषेची अशी अवहेलना किमान भारत भुमीवर तरी होऊ नये एवढीच या दिनाच्या औचित्याने माझे एक मत...

©️ नंदिनी म.देशपांडे. 
दि. १४ सप्टेंबर, २०२२.

🌹🌹🌹🌹🌹