*तू एक स्त्री आहेस म्हणून*
*~~~~~~~~~~~~~~*
आईच्या गर्भातच कायमचं खूडून टाकण्याचा प्रयत्न होतोय गं तुला.... जन्माला येण्याआधीच तुझा मृत्यू घडवून आणला जातोय.... का तर तू एक स्त्री आहेस म्हणून.... याला खतपाणी मिळतंयं घरातल्या जुनाट विचारांकडून....त्यांचा पगडा असणार्या तुझ्याच माणसांकडून.... काय ही शोकांतिका ?कुठे फेडतील ही पापं ही लोक....
बरं तू जन्माला आलीसही.... सिद्ध केलंस स्वतःला आपल्या स्वतःच्या मेहनतीनं आपल्या बुद्धी सामर्थ्यावर... तर, तर तुझ्या उच्च शिक्षणासाठी मोडता घातला जातो....आम्ही आता उजवून टाकणार,तुला.,..आमच्या कर्तव्यातून मुक्त होणार आम्ही....जे काय शिकायचे ते नवऱ्याकडे कडे जाऊन....का तर तू एक स्त्री आहेस म्हणून...
मग धसास नेतेस गं तू लग्नानंतरही हीच जिद्द शिक्षणाची... व्यवस्थित संसार सांभाळत घरच्या रूढी-परंपरा,रितीभाती सांभाळत,सर्वांचं सर्व काही करत असतेस. रात्रंदिवस जागून, नेतेस तुझ्या शिक्षणाची नौका पार करत.... पण आता बस झालं नोकरी वगैरे ची गरज नाहीये.... तुझ्या पैशावर काही घर चालणार नाही ....."आता पाळणा हळू द्या", अशा सूचना होतात....पुन्हा पहिलाच कित्ता,का....तर तू एक स्त्री आहेस म्हणून....
पाळणा लवकर हलला तर ठीकच.पण वेळ लागू लागला तर तुलाच दूषणं दिली जातात...तुला वांझ म्हणत हिणवलं जातं.... कुटुंबातील तुझं अस्तित्व पुसून टाकण्याचा प्रयत्न केला जातो..... का तर तू स्त्री आहेस म्हणून....
वाढत्या संसारात वेलीवरच्या दोन तीन साजिऱ्या फुलांचं,घरातील ज्येष्ठांचं, नवऱ्याचं,करत करत एव्हाना फार मागे राहिलेल्या आपल्या करिअरला तू विसरूनही जातेस .... मुलं मोठी होत जातात....आपले छंद आवडीनिवडी भटकंती यामध्ये रममाण होतात....पण तुझी वैचारिक प्रगल्भता आणि बौद्धिक चातुर्य तुला अस्वस्थ करत रहातं....
हल्ली खरंतर खूप रिकामा वेळ मिळतो आपल्याला....तो सत्कारणी लावून, बघूया चार पैसे मिळाले तर ....आपल्या आवडीचे काम मिळते का कुठे ते? पण कसचे काय ?बराच काळ पुढे सरकलेला असतो.... आतापावेतो पुष्कळशा संधी दारावर टिकटिक करत पुढे सरकलेलल्या असतात....वयाचा आकडा सुद्धा संधींना सीमारेषेच्या आत येऊ देत नाही... शिवाय ,"तुला काय कमी आहे आत्तापर्यंत काही कमी केले आहे का मी?आहे ते सर्व तुझंच तर आहे.....कशाला हवीए धावपळ?कर की ,थोडा आराम....असे सल्ले वजा संवाद घराच्या चार भिंतीत होऊ लागतात....का, तर तू एक स्त्री आहेस म्हणून....
तुझ्या करिअरला महत्व नसतंच मुळी.... कालौघात जावई सुना येतात.... घर कसं माणसांनी भरुन जातं...छोटी नातवंड चिव चिव करत असतात....आजोबा रिटायर्ड झाले तरीही,आजी आजोबा सुखाने राहतील एवढी पेन्शन त्यांना मिळत असते.... मुलं-मुलगी , सून,जावई सारे कमावते असतात.....कोणाला काहीही कमी नसतं.....पण तुझं आईचं अंतःकरण ना!.... तुला चार सहा महिन्याला लेक घरी आली की साडीचोळीनं तिची पाठवणी करावीशी वाटते....नातवंडांचे लाड करावेसे वाटतात..... निमित्तानं जावयाला कधीतरी कौतुकानं सूटबूट शिवावा वाटतो.... सासुरवाडीचा....कौतूक म्हणून....पण येथेही माशी शिंकतेच....काही फालतू खर्च नकोयंत आता.....त्यांच्या लग्नात झालंयं सगळं यथायोग्य आता काही देणं-घेणं नको....मुलगी परक्याचं धन....तिच्यावर कशाला हवाय खर्च ?...तू बिचारी गप्प बसतेस... मनातून दुखावली जातेस....मनाची कुचंबणा सहन करत....सबला बनण्याच्या तुझ्या प्रयत्नांवर जाणीवपूर्वक पांघरूण घालत....तू अबलाच कशी राहशील याचे प्रयत्न होत राहतात.... त्याची प्रौढी मात्र मिरवली जाते....का तर तू एक स्त्री आहेस म्हणून....
तुझंही वय उतरणीला लागलेलं असतं...आर्थिक सूत्र तुझ्याकडे नसतात....आता तुझ्या सर्व गरजा वेळेवर भागवल्या जातात....मग तुला हातात रक्कम कशाला हवी आहे ? दिलीच तर त्याचा हिशेब मागितला जातो.....कारण तुला आर्थिक व्यवहारांचं निर्णय स्वातंत्र्य उरत नाही... काहीच आवश्यकता नाही याची....या सबबीखाली... तुझ्या हातात पैसा खेळू नये याची व्यवस्थित तरतूद होते...का तर तू एक स्त्री आहेस म्हणून.....
उतारवयात तू ही शरीराने थकलेली असतेस....मनाने खचून जातेस.....आणि मुख्य म्हणजे तुझी आता गरजच उरलेली नसते....विरोध केलास तू, तरी त्याची किंमत काहीच नसते..... का तर तू एक स्त्री आहेस म्हणून.....
मुलं मोठी होत राहातात.... त्यांची आकाशं विस्तारतात.....त्यांचे मार्ग सुध्दा बदलतात.....पण आई-वडिलांच्या पुंजीची बरोबरीनं हिस्सेदार होतात......"आता तुमचे असे किती दिवस राहिले आहेत ? कशाला हवंयं तुम्हाला ऐश्वर्य ?" असं म्हणत, आपल्या पदरात गोडीगोडीनं काढून घेतात.....कारण ती या घरची कुलदिपकं असतात....मुलगी परकी....आणि मुख्य म्हणजे,ती एक स्त्री असते म्हणून....
याही वेळी पूर्णपणे अबला ठरलेल्या तुला एक 'आई' म्हणून लेकीला काहीतरी द्यावं असं मनातून वाटतच राहतं.....तुझी इच्छा पूर्ण होणार नाही हे माहित असतानाही.....कारण तुझं आईचं अंतःकरण असतं..... तुझ्याच हाडामासाची बनलेली तीनही मुलं...तुझाच एक भाग असतात....तू कधीच त्यांच्यात आपपरभाव करत नसतेस.... कारण तू एक स्त्री आहेस म्हणून...
आपल्या साऱ्या मुलांशिवाय तुझं संसारचक्र पूर्ण होऊच शकत नाही....या वर्तुळावर तुला आपला नवरा,मुलं,सुना,जावई नातवंडं सारी हवी असतात....आपण स्वतःला झिजवून उभ्या केलेल्या संसार विश्वात तू कायम तुझ्या साऱ्या लेकरांना समान दर्जा देत असतेस....प्रत्येक पाखरावर सारखीच माया आणि प्रेम करत असतेस....त्यांच्याशिवाय तुला पूर्णत्व नसतंच....हे पूर्णत्व आल्याशिवाय तू मोकळा श्वास घेऊ शकत नाहीस....कारण कारण तू एक स्त्री आहेस म्हणून....
स्त्रीच्या जन्माला आल्यानंतर तुला,जन्मापासून ते वृद्धत्वा पर्यंत काळानं बरंच काही शिकवलेलं असतं......दुर्दैवानं कधीतरी बंड करुन तू एकटी उभी राहिलीस कुणाच्याही आधारा शिवाय..... तर,तर भोवतीच्या घाणेरड्या नजरांचा सामना तुलाच करावा लागतो.... संशयाच्या भोवर्यात तुलाच अडकावं लागतं.... कारण कारण तू एक स्त्री आहेस म्हणून .....
नराधमांच्या हैवानी वृत्तीची शिकार तुलाच व्हावं लागतं नव्हे,तुला जीवंत ऊभं जाळलं जातं.....कारण तू एक स्त्री आहेस म्हणून....
पावलोपावली, तू एक स्त्री आहेस याची जाणीव तुला करवून दिली जाते....जेणे करून तुझं मानसिक खच्चिकरण होईल....कारण तू एक स्त्री आहेस म्हणून....
अगं तू कितीही स्त्री-पुरुष समानतेचे नारे दिलेस,निशाणं फडकवलेस,तरीही ते फाडूनच टाकले जातात....कधी या पुरुषप्रधान समाजाकडून,कधी धार्मिक नियमांचा भंग होतो या सबबीखाली....तर कधी तू वरचढ ठरशील या धास्तीनं....आणि रुढी परंपरांच्या पगड्यांनं...कारण तू एक स्त्री आहेस म्हणून....
कधी तू सबला बनलेली नसतेस..... तू कायम अबलाच असते....सर्व बाजूंनी हेळसांड होते ती केवळ तुझीच....कारण तू एक स्त्री आहेस म्हणून......
महिला दिनाचे कितीही गोडवे गायलेस,कितीही आनंद उत्सव साजरे केलेस,तरी आपल्या समाजात असणाऱ्या अशा मनोवृत्तीचं ,तुला कायम कमी लेखणाऱ्या या प्रवृत्तीचं समूळ उच्चाटण झाल्याशिवाय तुझा गौरव कधीच होणार नाही.....तुझा सन्मान तुझ्यापर्यंत कधीही पोहोंचणार नाही.... कारण तू एक स्त्री आहेस म्हणून....
तरीही
*जागतिक महिला दिनाच्या तुला भरभरुन शुभेच्छा*
*©*नंदिनी म.देशपांडे*.
*मार्च,७,२०२०*
*औरंगाबाद*
🌹🌹🌹🌹🌹🌹
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा