लाभले आम्हास भाग्य,बोलतो
मराठी.
जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी
धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी.
२७ फेब्रुवारी,ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले सुप्रसिद्ध कवी कुसुमाग्रज (वि.वा.शिरवाडकर) यांचा जन्मदिवस आपण 'जागतिक मराठी दिन' असा साजरा करतो.किंबहूणा या फेब्रुवारी महिन्यात संपूर्ण महिनाभर , मराठी साहित्य संमेलनाचे वारे अख्ख्या महाराष्ट्राला व्यापून टाकते.
मराठी साहित्य संमेलन सुध्दा नेमकेच पार पडले.आपल्या मायबोलीचा जागर आपल्याच भुमीवर व्हावयास हवा असे वाटून गेले मनाला पण असो,बडोदेला हा मान मिळाला असे मानू या आपण.
याच दिनाच्या औचित्याने ठिकठिकाणी साहित्य सभा, संमेलनं,काव्यसंमेलनं, साहित्य वाचन वगैरे वगैरे उपक्रम विविध स्तरांवर राबविण्यात येताना दिसतात.आपल्या मायबोलीच्या सन्मानासाठी असे उपक्रम आयोजित करणं,त्यात सहभागी होणं हे, प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाचे नैतिक कर्तव्य आणि जबाबदारी आहेचअसे म्हणावेसे वाटते.
या अंतर्गत महान अशा सिध्दहस्त लेखकांच्या लेखणीतून पाझरलेले गद्य किंवा पद्य या स्वरुपातील प्रसिध्द मराठी वाङमयाचे स्मरण,वाचन,लेखन करत, त्यांना पुनरुज्जीवित करत नवीन पिढीसमोर वैशिष्ट्य पूर्ण दृष्टिकोनातून मांडणे यासाठी होणारा प्रयास खूपच स्तुत्य आहेच.तो मायबोलीच्या अस्तित्वासाठी,ते टिकवून ठेवण्यासाठीअत्यंत गरजेचा आहे यात वादच नाही.
हल्ली सोशल मिडिया मुळे अभिव्यक्त होणार्यांची संख्या लक्षणीय स्वरुपात वाढलेली दिसून येते.कारण एक चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे असे म्हणता येते.या मुळे नवनवीन लेखक , कवी उदयाला येत आहेत.त्यांना स्वत:ला आपल्यात दडलेल्या नवीन लेखकाची ओळख होताना दिसून येत आहे.परिणामी त्यांची सृजनशीलता पण बहराचे लावण्य लेवून बरसाताना आपण बघत आहोतच.
खरे म्हणजे त्यांच्याही नकळत अशा अनेक लेखकांच्या हातून मराठी भाषा जोपासण्याचे काम यथोचितपणे घडत आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही निश्र्चितच.त्यांच्या लिखाणाचे स्वरुप भलेही वेगवेगळ्या पध्दतीचे असेल.कोणी कथा, ललित लेख,कोणी कादंबरी तर कोणी कविता,गझल या प्रकारात लिहिते होत असेल. अगदी सुविचार,चारोळी या प्रकारातही अभिव्यक्त होत असेल पण तो सुध्दा नवनिर्मितीचा आनंद देवून जातोच की ! मराठी भाषेचा अस्त समिप येऊ घातलाय की काय? या शंकेला एक सकारात्मक प्रतिक्रिया देत शंका निरसन करण्याचा खूप महत्त्वाच्या प्रयत्न या नवलेखकांकडून केला जातोय हे खरंच कौतुकास्पद म्हणता येईल.मातृभाषेच्या ऋणातून काही प्रमाणात उतराई होण्याचा हा प्रयत्न प्रशंसनीय आहेच.
अर्थातच आपल्या महाराष्ट्रातील जेष्ठ , प्रसिध्द लेखक,कवींचे वाङमय वाचत मोठी झालेली ही लिहिती पिढी, आपल्या लेखनातून पुढच्या पिढीसाठी मराठीभाषा संवर्धनासाठीचे काम करत आहे.मराठी भाषेचा हा सौंदर्यपूर्ण ठेवा 'वसा' म्हणून जपून ठेवत आहे .पुढच्या पिढीसाठी.याच हेतूने प्रत्येक पिढीने पुढच्या मराठी भाषिकांनी हा ठेवा जपून ठेवल्यास तिच्या अस्तित्वाला धक्का बसणार नाही. अर्थात ही आपली मायबोली आहे.ती व्यक्त करण्याचे प्रकार अनेक आहेत पण ती बोली भाषा संपणे केवळ अशक्यप्राय .पण मुर्त स्वरुपात ती टिकवून ठेवणे जास्त आवश्यक आहे.
या साठी आजच्या नवलेखकांना ,संधी उपलब्ध करुन देणे,त्यांच्या साहित्य कृतिंचे प्रकाशन करणे,आणि त्यांचे पुस्तक वितरण करणे किंवा ते वितरणासाठी त्यांना हमी मिळवून देणे या साठी शासन स्तरावर,वेगवेगळ्या साहित्य,सामाजिक मंडळां मार्फत सामाजिक संस्थाच्या माध्यमातून,ग्रंथालयांकडून प्रामाणिकपणे मदत होणे अत्यंत आवश्यक आहे.असे झाले तरच आजचे नवलेखक हे भावी लेखक पिढीचे प्रेरणा स्थान बनु शकतात.
हल्ली शाळांमधून तर आपल्या मातृभाषेचे जवळजवळ उच्चाटन झालेले दिसून येत आहे.कारणे कोणतीही असतील पण वास्तविकता नाकारता येणारच नाही.एक मार्ग खुंटित होतोय म्हटल्यावर त्यांवर केवळ भाष्य करुन चालणार नाही,त्या पेक्षा दुसर्या विविध मार्गांनी ती उजळवत ठेवावयास हवी.उन्नत करावयास हवी.या साठी वेगवेगळे मार्ग,माध्यमं अवलंबिणे अनिवार्य आहेच.आज ई बुक्स ,सी.डी.ज अॉडिओ बुक
वगैरे माध्यमातून या साठी होणारे प्रयत्न कौतुकास्पद आहेतच निश्चित .पण मुर्त स्वरुपात ,पुस्तक रुपात पुढच्या पिढ्यां साठी. ठेव म्हणून चांगले लेखन साहित्य टिकवून ठेवणे खूपच प्राधान्याचे आहेच.
गायन क्षेत्रात जसे विविध घराण्याचे शिष्य आपल्या गायनाच्या सुरुवातीला आपल्या घराण्याचा लौकिक वाढवण्या साठी स्वरवंदना अर्पण करतात ,तद्वतच लेखन क्षेत्रात आपल्या मातृभाषेतील सौंदर्य स्थानं प्रत्येक नव्या लेखका मार्फत उद्धृत होणे, चर्चिले जाणे गरजेचे आहे.आणि म्हणूनच नव लेखकांना त्यांच्या पुस्तकाच्या वितरणासाठीची हमी मिळणे फार आवश्यक आहे.तरच ते लिहिण्यासाठी उद्यूक्त होत , मायबोलीच्या संवर्धनाला हातभर लावू शकतील असे वाटते.खर्या अर्थाने असे संगोपन साधायचे असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे असे म्हणावेसे वाटते.
लेखकांच्या लेखणीत खूप ताकद असते हे जगन्मान्य आहेच,यातून समाज आणि पर्यायाने देशाच्या जडणघडणीत त्यांचा सहभाग ते नोंदवू शकतात.पण त्यांच्या लिखाणामागचा हेतू स्पष्टपणे लोकांच्या समोर येणे आवश्यक आहे.तो जास्तीत जास्त वाचकांनी वाचावयास हवा.महाराष्ट्रीयनांची मायबोली मराठी चिर:काल टिकण्या साठी सर्व बाजूंनी प्रयत्न करणे हे प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाचं कर्तव्य आहे.तरच आपण गर्वाने म्हणू शकतो,
माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट
माझ्या मराठीचा छंद मना नित्य मोहवितो
ज्ञानोबांची तुकयाची मुक्तेशाची जनाईची
माझी मराठी चोखडी रामदास शिवाजीची
यारे,यारे अवघे जण,हाक माय मराठीची
बंध खळाळले गळाभेट साक्ष भिमेच्या पाण्याची
डफ तुणतुणे घेऊनच ऊभी शाहिर मंडळी
मुजर्याची मानकर वीरांची ही मायबोली
नांगराचा चाले फाळ अभंगाच्या तालावर
कोवळीक विसावली पहाटेच्या जात्यावर.
नंदिनी म. देशपांडे . ©
💎💎💎💎💎💎💎💎