शुक्रवार, २६ एप्रिल, २०१९

मनोबोध श्लोक क्र.१५१.

मनाचे श्लोक एक अलौकीक महाकाव्य.
         पुष्पमाला सदर.
       श्लोक १५१.
खरे शोधिता शोधितां शोधताहे।
मना बोधिता बोधिता बोधाहे।
परि सर्व ही सज्जनाचेनि योगे।
बरा निश्चयो पाविजो सानुरागे।
     शोध घेता घेता खरा शोध लागतो. मनाला पुन्हा पुन्हा बोध केला म्हणजे त्याच्या ठिकाणी ज्ञान स्थिर होते .पण हे सारे सज्जनांच्या संगती मध्ये घडते. या संगतीने म्हणजेच चांगल्या लोकांच्या सहवासात सद् वस्तूचे निश्चित ज्ञान होऊन तिच्यावर प्रेम जडते.
    समर्थांनी अभ्यासयोग आणि सत्संग ही दोन्हीही परमार्थ मिळवण्याची, त्याच्यापर्यंत जाण्याची साधने आहेत असे म्हटले आहे. एखाद्या गोष्टीचा सतत ध्यास घेतला, एकच गोष्ट सारखी सारखी सांगून मनावर बिंबवली म्हणजे ती कायम लक्षात राहते. “प्रयत्नांती परमेश्वर” म्हणतात ते हेच. शोध घेणे ही प्रक्रिया सुद्धा कायम चालू राहणारी असते.
    संशोधकांनी एखादा शोध लावण्यासाठी प्रयोगशाळेत अव्याहत प्रयत्न केले तरच, एखादा शोध त्यातून साध्य होतो. त्याचप्रमाणे एखादा चांगला विचार जगाच्या कल्याणासाठी सांगावयाचा असेल तर, तो धर्म प्रवर्तकांना सुद्धा वर्षानुवर्षे तपश्चर्या करून त्याची प्रचिती घ्यावी लागते. आणि नंतरच समाजापुढे वारंवार ती गोष्ट सांगावी लागते. तरच तिचा प्रभाव समोरच्या माणसांवर पडू शकतो. एखादा शोध नव्याने लागला तर कायमच लागलाय आणि यापुढे काहीही नाही असे निश्चितपणे ते शास्त्रज्ञ कधीही सांगत नाहीत. कारण त्यानंतरही नवीन काहीतरी शोधण्याची प्रक्रिया चालू होणार असते, चालू राहणार असते. अखंड अशी प्रक्रिया नवनवीन शोधांना सिद्धांतांना जन्म घालते. पण हे सर्व घडण्यासाठी वातावरणही तसेच असावयास हवे. शोध ही गोष्ट  ज्ञानी,संशोधक यांच्या संगतीत घडू शकते.परमार्थ दर्शन सुद्धा संत सहवासातच घडू शकते.   परमार्थाचा शोध ही प्रक्रिया सुद्धा अखंडपणे चालणारी अशीच आहे. एकदा तो शोध लागला म्हणजे शेवट झाला असे अजिबात नाही. उलट एक निष्कर्ष समजला, कळला आता पुढे काय? असा प्रश्न कायमच राहतो. परमेश्वर जसा अनंत आहे तसा त्याचा शोधही अनंत काळापर्यंत चालूच रहाणार आहे.
     याचा अध्यात्म दृष्टीने आपण असा अर्थ लावू शकतो, की सत्याचा चिकाटीने शोध घेतला तर शोध लागतो. मनाला जर वारंवार समजावले तर त्याच्या ठिकाणी ज्ञान स्थिर होते. हे सर्व संतांच्या सहवासाने घडून येते. सत्संगाने सद् वस्तूचे निश्चितच ज्ञान होते. तिच्यावर प्रेम जडते.त्यासाठी इंद्रियजय, विषयवैराग्य, मुमुक्षा ह्या बाबी तर तीव्र तर असाव्याच लागतात. पण त्याशिवाय श्रवण, मनन इत्यादीही घडावे लागते. या साधना द्वारे मनाला हळूहळू आत्मबोध होत जातो. ज्ञान घेतल्या शिवाय मनुष्य जगू शकत नाही.  म्हणजेच सत्याचा शोध घेता घेता मोठी लागते चिकाटी माणसा जवळ असावी लागते.
© नंदिनी म.देशपांडे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा