मनाचे श्लोक, एक अलौकीक महाकाव्य.
पुष्पमाला सदर.
श्लोक १४३.
अविद्या गुणे मानवा ऊमजेना।
भ्रमें चूकले हीत ते आकळेना।
परीक्षेविणे बांधले दृढ नाणें।
परी सत्य मिथ्या असे कोण जाणे।
अज्ञानामुळे माणसाला खरे काय ते कळत नाही. त्याच्या बुद्धीला भ्रम पडलेला असतो. त्यामुळे जो व्यक्ती भलतीकडे जातो, त्याला आत्महित साधता येत नाही.
खऱ्या-खोट्याची पारख न करता एखादे नाणे कमरेला बांधणे किंवा एखादी गोष्ट कवटाळून ठेवणे, म्हणजे, अज्ञानच.
जीवनात सत्य असत्य कोण जाणतो? अशिक्षितपणामुळे आयुष्य जगताना माणसाला प्रत्येक गोष्टीचे म्हणावे तसे ज्ञान मिळू शकत नाही. आणि यातूनच अनेकदा गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. त्यालाच आपण भ्रम होणे असेही म्हणू शकतो. भ्रम निर्माण होणे यासाठी समर्थांनी दासबोधामध्ये (दा.१०स.६)मध्ये अशा प्रकारच्या अनेक भ्रमांचे वर्णन प्रत्ययकारी रीतीने केले आहे. असा भ्रमिष्ट माणूस सत्यापासून दूर गेलेला असतो. परमार्थ किंवा आत्मज्ञान अशा भ्रामक कल्पना तो सांभाळत असतो. पण या भ्रामक कल्पना सहजासहजी पुर्ण होत नसतात, तर त्यासाठी स्वतःला सिद्ध करावे लागते, सिद्ध व्हावे लागते. भक्तिसाधना समजून घेऊन ती प्रत्यक्षात उतरवणे आवश्यक असते. खरा देव काय आहे? त्याचे ज्ञान करून घ्यावे लागते त्यासाठी गरज पडल्यास सद्गुरूंना वाट विचारावी लागते. त्यांचे मार्गदर्शन घ्यावे लागते. त्यामुळे आपल्या साधन मार्गातील विघ्ने दूर होऊन तो मार्ग सुकर होण्यास सद्गुरूंची मदतच होते. यातूनच नंतर आत्मज्ञान होऊ शकते. त्यामुळेच भ्रममूलक आचार, नवस-सायास, आत्मक्लेश या सर्व गोष्टी भ्रामक आहेत. त्यातील सत्यता न पडताळता अशा गोष्टी किंवा नाणे आपण कितीही दिवस जवळ बाळगून ठेवले तरी त्याचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे देवाला अशी काहीतरी आमिषं दाखवून असे झाल्यास अमुक करेल तसे झाल्यास तमुक करेल या गोष्टींना आयुष्यात अजिबात थारा देऊ नये. प्रथम मुख्य देव ओळखावा. सद्गुरू कृपेने त्याची निष्काम भक्ती करावी. यातच आनंद व सत्य मानावे. हाच विचार या श्लोकातून समर्थांनी मांडला आहे.
थोडक्यात देव हा सर्वत्र एकच आहे. पण तरीही त्यात अनेकता भासवून घेणे, आणि त्यालाच खरे मानणे, म्हणजेच माणसाचे अज्ञान होय.
अध्यात्मिक अर्थ बघताना आपण असे म्हणू शकतो की, अज्ञानाच्या प्रभावाने माणसाला खरे काय ते लक्षात येत नाही. त्याच्या बुद्धीला भ्रम झालेला असतो. त्यामुळे तो मार्ग चुकतो. मार्ग चुकल्यामुळे त्याला आत्महित साधता येत नाही. मनुष्याला अविद्येमुळे स्वस्वरूपाची ओळख पटत नाही. अविद्या म्हणजे अज्ञान.
व्यक्तीला आपण कोण? आपले स्वरूप काय आहे? याची जाणीव नसणे.
“ मी कोण ऐसे नेणारे। तया नांव अज्ञान बोलिजें।”
मी खरा कोण आहे? हे न कळणे याचे नाव अज्ञान होय. ते अज्ञान नाहीसे झाले की परब्रम्ह हस्तगत होते. असा या ओवीचा अर्थ आहे.
© नंदिनी म.देशपांडे.
💥💥💥💥💥💥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा