सोमवार, २२ एप्रिल, २०१९

श्लोक १२५.

मनाचे श्लोक, एक अलौकीक महाकाव्य.

      पुष्पमाला सदर.
     
      श्लोक १२५.

    अनथां दिनाकारणे जन्मताहे।
     कलंकी पुढे देव होणार आहे.।
     जया वर्णितां सिणली वेदवाणी।
      नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी।

       अनाथ आणि असहाय्य अशा दीन जनांसाठी भगवंत जन्म घेतो. पुढे कल्की च्या रूपाने देवाचा अवतार होणार आहे. त्या भगवंताचे वर्णन करता करता वेदवाणी थकली. असा हा भगवंत भक्तांचा कैवारी आहे. तो आपल्या भक्ताची उपेक्षा कधीच होऊ देत नाही. या श्लोकाचा हा दार्शनिक अर्थ.

     आता गुह्यार्थाच्या दृष्टीकोनातून बघूया.

        भगवंतांनी अनाथांच्या दीनांच्या, संकटग्रस्त भक्तांच्या संरक्षणासाठी आपले वेगवेगळे अवतार धारण केलेले होते.केवळ इंद्र, अहिल्या, द्रोपदी, प्रल्हाद, ध्रुव यांच्यासाठी भगवंताने अवतार घेतले होते असे नव्हे. आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी तो तो अवतार भगवंताने धारण केला होता आणि आपले चरित्र समाजातच घडवले त्यातून समाजापुढे आदर्श निर्माण करून ठेवले. त्यांच्या एक एक अवतार म्हणजे एका एका युगाचा संदर्भ आहे. राम आणि कृष्ण अवतार सर्वांच्याच परिचयाचे आहेत यानंतर होणारा अवतार कलंकी रूपात कलंकी अवतार असेल. असे समर्थांनी म्हटले आहे.

     भक्त हे सज्जन असतात असा एक संकेत आपल्या मनामध्ये दृढ झालेला असतो. त्यामुळे आताच्या काळात सज्जनता कुठे उरलीच नाही तर देव अवतार का घेतील? असे प्रश्न विचारणारेही आहेतच. जगात सज्जन माणसे शिल्लकच नाहीत तर कोणासाठी भगवंत अवतार घेणार? असे काही नाही. कारण गाईं सारखे अतिशय उपयुक्त प्राणी देखील या भूमीवर आहेत. अशा प्राणिमात्रांसाठीही भगवंत अवतरत असतात. असे समर्थांना यातून सुचवायचे आहे.

     भगवंताच्या लीला अगाध आहेत. सगुणा पासून निर्गुणा पर्यंतचे  त्यांचे कितीही चरित्र गायिले तरी ते कमीच आहे. भगवंत अनंत अनादि आहेत. तेथे त्यांचे वर्णन करून वेदवाणी ही थकली. तेथे आपण भक्तीशिवाय दुसरे काय करू शकणार?

     अध्यात्मिक अर्थ :

परमेश्वराच्या कर्तुम अकर्तुम शक्तीवर ज्याची पूर्ण निष्ठा आहे. जिवाचा असाहाय्यतेची ज्याला  जाणीव आहे. म्हणून ज्याने, आपला सर्व अहंकार, सर्व भाव परमेश्वराच्या आधीन केला आहे असा हा दीन.  भक्तवत्सल देव, अनाथ दीन अशा भक्तांचा उद्धार करण्यासाठी या जगात अवतीर्ण होतो.

     कलियुग हा भारतीय संस्कृतीच्या अधोगतीचा काळ समजावा. अध्यात्म प्रणित आणि त्यागप्रधान भारतीय संस्कृती जेंव्हापासून इहलोकवादी आणि भावनाप्रधान बनू लागली तेव्हा, कलियुगाचा आरंभ झाला. कलियुगात भगवंताने मौन धारण केले याचा अर्थ अध्यात्माला मालिन्य आले. हे मालिन्य नाहीसे व्हावे यासाठी सर्व संतांनी प्रयत्न केले. पण त्यांना अपेक्षित यश आले नाही. म्हणून श्री समर्थ म्हणतात,

    प्रपंच सुखे कराव।  परी काही परमार्थ वाढवावा।
    परमार्थ अवघाची बुडवावा। हे विहित नव्हे दा. ५-३-१०३

  ©*नंदिनी  म. देशपांडे.

💐💐💐💐💐💐

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा