बुधवार, २४ एप्रिल, २०१९

मनोबोध श्लोक क्र.१४९.

मनाचे श्लोक एक अलौकीक महाकाव्य.

पुष्पमाला सदर.

      श्लोक १४९.

जगी पाहता चर्मचक्षी न रक्षे।
जगी पाहता ज्ञानचक्षी न रक्षे।
जगी पाहतां पाहणे जात आहे।
  मना संत आनंत शोधोनि पाहे।

     सद् वस्तू या चर्मचक्षूंनी पाहता येत नाहीत. त्याला ज्ञानचक्षू नी पाहिले तर ते ज्ञानात राखले जात नाही. (ज्ञानात सामावले जात नाहीत). त्याला पाहणे असे आहे की पाहू जाता पाहणेच हरपुन जाते. म्हणूनच अरे मना, त्या अनंत सद् वस्तूचा तू शोध घे .हा या श्लोकाचा दार्शननिक अर्थ.

    गुह्यार्थ सांगावयाचा तर, समर्थांनी या श्लोकातून अतिशय सोप्या भाषेत अत्यंत गूढ असे तत्त्वज्ञान, ब्रह्मज्ञान, तत्त्वविचार स्पष्ट केला आहे. वेदांत एवढ्या सोप्या भाषेत मांडणारे समर्थ खरोखरच महान तत्त्ववेत्ते होते. हे तत्त्वज्ञान सर्वांसमोर, सर्वांसाठी मांडून समर्थ परमार्थाचे निरूपण करताना लक्षात येत जातात.

   सद् वस्तू किंवा परमात्मतत्त्व निर्गुण निराकार असल्यामुळे डोळ्यांना ते दिसत नाहीत.माणसाची सर्व ज्ञानेंद्रिये पंचभूतात्मक आहेत. त्यामुळे ती पंचभूतात्मक गोष्टीच बघू शकतात. परमात्मा किंवा सद्वस्तू हा पंचमहाभूतांच्या पलीकडचा विषय आहे. त्यामुळे ही पंचभूतात्मक इंद्रिय त्याला बघू शकत नाहीत.

   याच परमात्म्याकडे ज्ञानचक्षूंनी म्हणजेच बुद्धीने बघितले तर त्याचे बुद्धीला आकलन होऊ शकते. पण अनुभव मिळत नाही. अनुभव व आकलन यात महद् अंतर आहे. ज्ञानाच्या पातळीवर दिसणारे ज्ञान हे कोरडे असते. तर अनुभवाच्या पातळीवर येणारे ज्ञान हा भावनेचा ओलावा सोबत घेऊन येत असते. म्हणूनच ज्ञान चक्षूंनी पाहणे हे खरे पाहणे नाहीच. पाहता पाहता पाहणेच हरपून जाणे, असे जे असते तेच खरे पहाणे होय. याचाच अर्थ दृश्य दृष्टा आणि दर्शन ही सुत्रीच हरवून जाते. केवळ अद्वैत तेवढेच शिल्लक राहते. हे अद्वैत म्हणजे परमात्मा किंवा सद् वस्तू होय.

     या परमात्म्याला बघताना त्याच्या अस्तित्वामुळे चर्मचक्षू, ज्ञानचक्षू दोन्हीही निस्तेज बनतात. अद्वैताचा साक्षात्कार होताना पुज्य,पुजक ,पुजा या तीनही गोष्टी शिल्लकच राहत नाहीत. आणि पुजू काय तुला मी अशी अवस्था निर्माण होते. म्हणजेच आत्मवस्तु पहाताना त्यात एकरूप  असावे लागते. हेच विलीनीकरण म्हणजे अव्दैताची प्राप्ती होय.तीच करून घेण्यासाठी समर्थ मनाला आवाहन करतात आणि सांगतात, हे मना या अद्वैत आनंत अशा सद् वस्तूचा तू शोध घे.

   आता अध्यात्मिक अर्थ. निराकार सर्वाधार ब्रह्माचे वर्णन करता येत नाही. तर ते जाणून घ्यावे लागते. तसेच ते वाणीने सुध्दा वर्णन करता येत नाही. चर्मचक्षूंना किंवा ज्ञानचक्षूंना ते दिसत नाही. डोळ्यांना दिसणारी वस्तू ही सगुण साकार असावी लागते. ब्रह्म हे निर्गुण निराकार असल्याने ते नेत्रांना दिसणार नाही. डोळ्याने ते पाहू जाणारा मूर्ख ठरतो. चर्मचक्षूने ब्रह्म दिसत नसले तरी ते ज्ञान चक्षूंनी जाणता येते. चर्मचक्षूने अनुभव घेणे ही देहबुद्धीची भूमिका तर  ज्ञानचक्षूंनी अनुभवणे ही आत्मबुद्धी ची भूमिका होय.

© नंदिनी  म.देशपांडे.

🎇🎇🎇🎇🎇🎇

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा