मंगळवार, २३ एप्रिल, २०१९

मनोबोध,श्लोक क्र.१४४.

*मनाचे श्लोक एक अलोकिक महाकाव्य*

    पुष्पमाला सदर .

श्लोक १४४.

जगी पाहता साच तें काय आहे।
अती आदरे सत्य शोधूनि पाहे।
    पुढे पाहतां पाहतां देव जोडे।
भ्रमे भ्रांती अज्ञान हे सर्व मोडे। 
       
    जगात शोध घेतला तर खरे काय आहे ?अगदी मनापासून सत्याचा शोध घेतला पाहिजे. असा शोध घेता घेता ईश्वराचे दर्शन होईल .नव्हे,ते होतेच. त्यामुळे माणसाला होणारे भ्रम,भ्रांती,अज्ञान हे सर्व काही नाहीसे होते. हा झाला या श्लोकाचा दार्शनिक अर्थ.
आता गुह्यार्थ.
    माणूस सतत सत्याचा शोध घेण्यासाठी पाठपुरावा करत असतो.प्रपंच करत असताना त्याला भौतिक सुखाच्या अनेक साधनांचा शोध लागतो. त्याचा बोधही त्याला होतो.त्यामुळे माणसाच्या आयुष्यात समृद्धीही निर्माण होते. त्यातून त्याला सुखाची प्राप्ती ही होऊ लागते. मग असे झाले तरीही त्याचे मन मात्र रिते रितेच असते.आपली मानसिक शांतता या सर्व सुखाने पूर्ण होऊ शकत नाही याची त्याला जाणीव होते. हा सल सतत त्याच्या मनात असतो. आपल्याला नेमके काय हवे हे माणसाला कळत नाही. आपल्या अंतर्मनाला नेमके काय हवे याचा शोध घेण्यासाठी माणसाने  पाठ पुरावा केलाच पाहिजे. असे समर्थ येथे सुचवत असताना दिसून येतात.
    या सुखाच्या शोधाचा मार्ग काही साधा नाही. सरळ सोपा नाही. ही प्रक्रिया बराच काळ चालणारी असते.माणसाला एकदा शाश्वत सुखाचा शोध लागला, की आपल्या मनातील रितेपणाची हुरहुर कमी व्हावयास सुरवात होते. ती बराच काळ चालू असते. हळूहळू ती  क्षीण होत  जाते.  हीच हुरहुर माणसाला 'साच' म्हणजे खरे काय आहे?याचा वेध घेत असते.  त्याच्या शोध कार्यातूनच दुःखाचे तत्वज्ञान जन्माला येते. आणि यातून सत्याचे, आत्म शांतीच्या मार्गाचे  म्हणजेच परमात्मा स्वरूपाचे दर्शन त्याला घडते. आणि हाच तो क्षण असतो,जेथे माणसाला सत्याचा शोध,त्याच्या मनातील सल , हुरहुर यांना पूर्णविराम मिळतो .आणि याच परिस्थितीत तो लौकिक दुःखांना पार करून पुढे जातो . पुढे पाहता पाहता म्हणजेच पुढे जाता जाता त्याला देवाची सोबत मिळते. अज्ञान भ्रम, भ्रांती हे सारे  नाहीसेे होण्यास मदत होते.
     म्हणूनच जगात सत्य काय आहे? याचा शोध माणसाने मनापासून घेतलाच पाहिजे.असे आवाहन समर्थ या श्लोकातून करतात.
    अाता या श्लोकाचा अध्यात्मिक अर्थ पुढील प्रमाणे. 
    खऱ्या खोट्याचा विचार न करता कल्पना रूप अविद्येचे खोटे नाणे जवळ बाळगल्यामुळे मानवाला आपले अत्यंतिक हित नाही तर, उलट आपले हित साधणार आहे या भ्रमात मात्र तो राहतो. अविद्यारुपी खोटे नाणे संग्रह केल्याने होणारा तोटा त्याच्या लक्षात येतो.ब्रह्मविद्या रुपी खरे नाणे संग्रह केल्याने निश्चितच फायदा होतो. साचा म्हणजे सत्य जे जे डोळ्यांना दिसते, अगर मनात असते, ते ते सर्व विकारी आणि नाशवंत आहे.सत्य असे काहीच नाही यासाठी हे मना, जगात सत्य वस्तू कोणती याचा विचार केल्यास कालांतराने तुला सत्य वस्तूचे ज्ञान होईल. म्हणजे जे अव्यय म्हणजे कधीच नाश न पावणारे,नित्य कायम राहणारे आणि अविकारी म्हणजे ज्याचे स्वरूप कधीही पालटत नाही ते सत्य होय .

©  नंदिनी म. देशपांडे.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा