रविवार, २८ नोव्हेंबर, २०२१

पवशी.

ओळखलंत का मला मंडळी? माझी आठवण येते का कधी कुणाला?जरासा ताण द्या तुमच्या
स्मरणशक्तीला!अगदी, बालपणात जा म्हणजे येईल माझी सय!
    अहो, माझ्याशिवाय गृहिणीचं पान हालत नसे...स्वयंपाक चालू करण्या अगोदर माझ्याशी संवाद अनिवार्य च असायचा!
छोटीशी जागा व्यापणारी मी, पण पटदीशी मदतीसाठी तत्पर असायचीच!साऱ्या स्वयंपाकघरभर भिरभिरती नजर असायची माझी. बाजारातून आणलेल्या ताज्या ताज्या भाज्यांवर विशेष नजर ठेवून असायची मी... आणि कुठलीही भाजी आणि मी आमच्यात आडवा विस्तू जात नसे कधीच...'विळ्या भोपळ्याचे नाते', 
ही म्हणही माझ्याच स्वभावाचा परिपाक!चांगला किंवा वाईट?हे ज्याचे त्याने ठरवावे....चांगले मानाल तर जेवणात भाजी खाल आणि वाईट मानाल तर भाजीशिवाय जेवाल!ठरवावे ज्याने त्याने...
  मला मात्र खूप आठवण येते हो, आजही....कुठे तरी कोपर्‍यात  आहे माझे अस्तित्व शिल्लक!पण वय झाल्यासारखी पडून रहाते आपली....कोणाला तरी कधीतरी आठवण होईल माझी या आशेवर...कधी कधी वाटतं, दुर्मिळ वस्तूंच्या यादीत माझी रवानगी होऊन काचेच्या कपाटात जागा मिळेल कदाचित!
   कैरीचा,लिंबाचा आंबटपणा, भेंडीचा चिकटपणा, भोपळ्याचा कडकपणा, मिरचीचा तीखटपणा आणि 
आवळ्याचा तुरटपणा,कारल्याचा कडवटपणा आणि फळांचा गोडवाही सगळ्यांच्या सगळ्या तर्‍हा, स्वभाव फार जवळून अनुभवलंय मी!
माझ्या सर्वात जास्त आवडीचं ओलं नारळ बरं का... माझ्या बोटांवर नाचवत नाचवत  त्याचा अख्खा चव काढण्याची किमया मला साध्य करता यायची!
     आता "मात्र गेले ते दिन गेले",असंच म्हणावे लागते...
 येतील का परत फिरून गेलेले ते दिन?कठिण वाटतंयं सारंचं...असो...पण झालीच कधी आठवण माझी तर नक्कीच आवाज द्या,असेल त्या कोपर्‍यातून लगेच येईन तुमच्या मदतीला धावून!आजही त्राण आहे बऱ्या पैकी माझ्यात...पण तुमच्यात आहे आहे का बघा तरी बसण्याचा त्राण?तेच आजमावून बघा अगोदर आणि मग मला बोलवा.....
    अरे,हो विसरलेच मी माझे नावच सांगावयाचं राहून गेलं...जुन्यांना, आडजुन्यांना माहित असेल कदाचित पण नव्यांना मात्र माझी ओळख करवूनच द्यायला हवी....माझे नाव ना,'विळी' विदर्भात मला,'पावशी' म्हणतात...
दोन्हीही नावं माझ्या आवडीचीच!

©️
*नंदिनी म. देशपांडे*

🌹🌹🌹🌹

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा