शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

बालपण आणि नागपंचमी.

*बालपणीची नागपंचमी*🐍

   नागपंचमी झाली आईचीही सय आली आणि बालपणातल्या किती तरी नागपंचमींची आठवण जागवत गेली, नव्हे ताजीच झाली...
अगदी आठ नऊ वर्षाची होते मी, तिसरी चौथीत असेल...दर वर्षी नागपंचमीला आई आम्हा भावंडांना नवीन कपडे शिवून घ्यायची...त्या वेळच्या नवीन फॅशनचा!
आणि अगदी पारंपारिक पध्दतीने हा सण साग्रसंगीत  साजरा व्हायचा...
माझ्यासाठी लाल रंगाचा पांढरी लेस लावलेला प्लेन पाकिजा शिवला होता त्या वर्षी...
आजही लख्ख आठवतोय...
नागाचे चित्र असलेल्या पुठ्ठ्याच्या वहीची खरेदीही झाली...त्या पूर्वि दोन दिवस बारीक पानांची मेंदीची झाडं मैत्रीणींनी मिळून शोधत शोधत त्याची पानं आणून झाली होतीच....ती पाटा वरवंट्यावर वाटून मेहंदी भिजवणे त्यात कात, चुना मिसळून...आणि दोन्ही हातांवर रात्री झोपताना लेप फासणे, शिवाय यावर थोडे सुकल्या नंतर कपडयाने तळहात बांधून झोपणे असा कार्यक्रम असायचा...
सकाळी तेल लावून हात धुतले की लालेलाल हात बघून स्वतःचेच कौतूक वाटायचे!
    शाळेत नवीन कपडे, नव्या बांगड्या, नवे कानात, गळ्यात, हातावर मेहंदी आणि सजून धजून स्वारी शाळेत निघायची...आठवणीने नागाच्या पुठ्ठ्याची वही सोबत घेऊन...
मग शाळेत या पुठ्यावरच्या चित्राची पुजा म्हणून तीन तीन वेळेला पाया पडले जायचे!
   त्या दिवशी अर्धीच शाळा असायची, घरी आईने कागदावर पेनाने काढलेल्या नागोबाला नमस्कार होत असे आणि मग उकडीचे दिंड, ढोकळा यावर जेवणात ताव मारला जायचा...
   दुपारी वाड्यात गारुडी यायचा नागोबा त्याच्या गोल झाकणाच्या परडीतुन हळूच डोकावत हळू हळू वळवळत बाहेर यायचे...किती दूर उभे असायचो आमही मूले!मनातील भितीचे साम्राज्य डोळ्यात मावायचे नाही!
कोणी तरी मावशी, काकू समोर जाऊन त्याला हळदी कुंकू वहायच्या आणि दूधाची छोटी वाटी त्याच्या समोर ठेवायच्या...गट्टम करायचा ना तो क्षणात!
आणि मग दिवसभर काय दोन तीन  दिवस उंबराच्या झाडाला बांधलेल्या झोक्यावर उंच उंच झोके घेत मज्जा चालायची! आम्ही मुलीच नव्हे तर वाड्यातील सर्वच स्त्रियाही बालिकाच बनायच्या!
हळू हळू पानांच्या मेंदीची जागा मेंदीच्या पावडरने घेतली, काडीने हातावर डिझाईन आले,मग तीच जागा मेंदीच्या कोनाने घेतली....
झाडावरच्या झोक्याची जागा परसातल्या झूल्याने किंवा झोपाळ्याने घेतली....जेवणात दींड ऐवजी ईडली,उखरी आली आणि नागोबाची गच्छंती होऊन कायम ते चित्रातच जाऊन बसले...
  सासरी आल्यावर सासुबाईंकडनं  नागपंचमीचा एक दिवस अगोदरचा धान्य उपवास समजला...त्या दिवशी चीरणं,आणि विंचरणं हा प्रकारही बंद असतो हे समजलं...माहेर घरच्या लेकीचं कौतूक असतं, बहिणीनं भावाला दूधलाह्या भरवायच्या असतात हे सारं समजलं...त्या साठी गावातल्या नणंदबाई यायच्या...
    हल्ली तर काय हे 
सुध्दा हळू हळू लोप पावत चाललंयं...ती पिढीही, तो साग्रसंगीतपणा आणि तो मेन्यूही...
कुणाला हे सारं करण्यासाठी वेळही नाही, अशा औपचारिकपणाची आवश्यकता वाटतही नाही....
पण आमच्या पिढीजवळ त्या आठवणींचा खजिना आहे...तो सांगावासा वाटला म्हणून हा प्रपंच!
    हल्ली मात्र निसर्गाचा श्रावणात असणारा उल्हासितपणा, वृत्तींची तरलता, आणि प्राणीमात्रांविषयी सहानुभूतीपूर्वक दृषटकोन यांविषयी मनात वाटणारी प्रगल्भता पूर्णपणे वाढलेली आहे...हे ही नसे थोडके!हो ना? बस आता थांबते...🐍

©️ 
*नंदिनी म.देशपांडे*
नागपंचमी, २०२१.
औरंगाबाद. 
🌹🌹🌹🌹🌹
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा