मंगळवार, १३ जुलै, २०२१

तात्यासाहेब देशपांडे.

दोन तीन दिवसांपूर्वीच फादर्स डे पार पडला...प्रत्येकाने तो आपल्या वडिलांप्रती कृतज्ञ भाव व्यक्त करत, साजरा केला...
काकांविषयी व्यक्त व्हावं असं आवर्जुन वाटायचं माझ्या मनाला,काका,माझे सासरे,म्हणजे माझ्यासाठी पित्यासमानच...यांच्या विषयी व्यक्त होण्यास वाटलं,  हे निमित्त अगदी योग्य आहे 

   केवळ वर्ष दिडवर्षेच काय तो त्यांचा सहवास लाभला मला त्यांचा...वाटलं असे कितीसे ओळखतो आपण त्यांना? पण मधुकरच्या बोलण्यातून येत असणाऱ्या त्यांच्याविषयीच्या संदर्भाने मग मी एक आठवणींची मालिका मांडत गेले....
     काका, म्हणजे स्व.श्री भुजंगराव संतुकराव उमरजकर देशपांडे. जन्म.१९०७ चा ...
माझे हे सासरे.... त्यांच्या शेंडेफळ आपत्याचे लग्न झाले, म्हणजेच मधुकर आणि मी विवाहबंधनात बांधले गेलो, तेंव्हा आमच्या काकांचे वय होते, ७८ वर्षे....
लग्नानंतर गावी गेले असताना चार आठ दिवस आणि ते आमच्या बदलीच्या गावी जेमतेम महिनाभर राहिले असावेत एवढाच काय तो माझा त्यांच्याशी प्रत्यक्ष सहवास!
      त्यांचे आईवडिल लवकरच गेलेले, आत्याने (वैधव्य आलेल्या)या दोन भावंडांना सांभाळले...आमच्या घरी राहून त्यांचे पालनपोषण केले...शेती बघितली...
    काकांना गावात सारेजण 'तात्यासाहेब' या नावाने संबोधत....
तात्यासाहेबांनी त्या काळात नववी पर्यंत शिक्षण घेत शेतीकडे लक्ष द्यावयास सुरुवात केली....आपल्या शिक्षणाला पूर्णविराम देत,शहरात शिकावयास न जाता घराच्या कारभाराची जबाबदारी स्विकारली...

   तात्यासाहेबांना गावातील पोस्टाचे, (पोस्टमास्तर) चे काम मिळाले...नोकरी म्हणून नव्हे पण काही अंशी मानधन मिळायचे त्यांना यातून...पोस्ट खात्याकडून विचारण्यात आल्या नंतर त्यांच्या विनंतीला मान देत,काकांनी गावात पोस्टाची सोय होईल लोकांसाठी, या हेतूने हे काम घरीच करावयाचे पण आनंदाने स्विकारले...
      त्या वेळी सहा पैशांना एक पोस्टकार्ड होतं, असे चार पोस्टकार्ड घेतल्यानंतर एखाद्या ग्राहकाने पंचेवीस पै. दिल्यास, राहिलेला एक पैसाही काका ग्राहकाला परत करत असत!
त्यामूळे घरी येणाऱ्या लोकांचा राबता वाढला...

    काकांना,धार्मिक ग्रंथ पठणाचा नाद होता...ओसरीवर त्याचे नियमित पणे काही वेळ हे वाचन पठण चालू असायचे...आपल्या कानावरही हे पडेल या निमित्ताने अनेक जण येवून बसत ओसरीवर....
    एक अतिशय तत्त्वनिष्ठ आणि प्रामाणिक व्यक्तिमत्व, एक सोज्वळ देवमाणूस अशी त्यांची गावभर ओळखली जाणारी प्रतिमा होती...
    गाव तसे छोटेसेच. फार पूर्वी दवाखान्याची सोय नव्हती,पण लोकांची तात्यासाहेबांवर फार श्रध्दा. एखादी अडलेली पहिलटकरीण असेल तर आमच्या काकांना ही लोक नदीवर घेऊन जायची पाण्याची घागर त्यांच्या स्वहस्ते भरून आणत, पहिलटकरीणीच्या अंगावर ओतायला लावायचे लगेच ह्या बाईची प्रसुती होऊन तिला वेदना मुक्ती मिळायची असा गावकऱ्यांचा विश्वास होता...

    उममरज आमचे गाव...मन्याड नदी वाहते आमच्या गावातून....नळाची सोय नव्हती त्या वेळी, पुरुष माणसं नदीवर अंघोळीला जायचे आणि येताना पिण्याच्या पाण्याची लगड  घेऊन यायचे हा शिरस्ता होता...
  
काकांच्या प्रामाणिकपणाची
साऱ्या पंचक्रोशीत ख्याती होती...आसपासचे लोक बाहेरगावी जाताना स्वतःच्या घरातील किंमती ऐवज, पैसा अडका काकांच्या स्वाधीन करुन जायचे!आपण केंव्हाही परतलो तरी, जसाच्या तसा सारा ऐवज आपल्याला लगेच परत मिळतोच असा लोकांना गाढ विश्वास होता त्यांच्यावर....

  दिसायला देखणे, मध्यम उंचीचे, गोरेप्पान काका अत्यंत शिस्तीचे होते....सकाळी अगदी हलकी न्याहरी आटोपून देवपुजा,गड्याने शेतातून आणलेल्या पळसाच्या पानाचे दररोज थोडे द्रोण पत्रावळी बनवून ठेवणे, शेतामध्ये जाऊन येणे, पोस्टाचे काम बघणे, आल्या गेलेल्यांची व्यवस्थित विचारपूस करणे, पाहूणे आले तर त्यांचा आदर सत्कार करत,त्यांना पाहूणचार करणे ,दररोज मठामध्ये जाऊन दर्शन घेऊन येणे..आणि सायंकाळी सायंप्रार्थना आटोपत  अगदी वेळेच्या वेळी 
मोजकाच आहार घेणं असा त्यांचा दिनक्रम असायचा...
वर्षातून दोन वेळेस तरी लेकीबाळी माहेरपणाला आणणे...दिवाळी आणि उन्हाळ्यात...
जावयांचा मानसन्मान, नातवंडांच्या सहवासात रमणं हे सारं त्यांना आवडत असे...
   बाजारहाट करण्यासाठी जवळच्या तालूक्याच्या ठिकाणी पायी किंवा बैलगाडीने जावे लागायचे....
सारा प्रपंच आवश्यक त्या गरजा पूर्ण करत पण काटकसरीनं, व्यवस्थित रीती रिवाजानं सणवार साजरे करत, कुलधर्म कुलाचाराचे आचरण करत कोणाचेही मिंधेपण न स्विकारता अगदी स्वाभिमानाने चालवला त्यांनी....केवळ शेतीच्या उत्पन्नावर!
सहा आपत्यांचे शिक्षण,लग्नकार्य, त्यांची बाळांतपणं सणवार यथोचित केले...
गाठीशी रोकड रक्कम नसायची पण अडल्या नडल्या परिस्थितीत लोकांना, नातेवाईकांना शेतमालाच्या रुपाने मदत द्यायचे....
मधुकरचे सारेच शिक्षण घरापासून लांब राहून झाले...त्याला नियमीत पत्र लिहून त्याची खुशाली विचारत.. येणाऱ्या सणवारांची माहिती द्यायचे...
व्यवहारात अगदी चोखपणा बाळगला काकांनी...
भावाने जरी तिकीट काढले असेल कधी बसचे,तर त्यालाही घरी आल्यानंतर लगेच तिकीटाचे पैसे चुकते करत ते!
   मला आठवतं, आमच्या लग्नाच्या वेळी उमरजहून औरंगाबाद येथे येण्यासाठी बसभाडे रु.पाच हजार माझ्या बाबांनी देऊ केले होते....साडेचार हजारच लागले, 'हे उरलेले पाचशे रु.' असे म्हणत बाबांनी नको म्हणत असतानाही त्यांनी ती पाचशे रु.ची रक्कम परत केली होती...

मला प्रथम बघितले त्यांनी होणारी सून या दृष्टिकोनातून... आणि पहिला प्रश्न विचारला, 'आम्ही खेडेगावात रहाणारी माणसं, निमित्तानं चार दिवस आलीस, पोरी गावी,तर करमेल तुला?"आणि "भाकरी खाणारे आम्ही, ती बनवायला येते का?"
मला खरोखरच येत नव्हती...पण मीही अश्वासन दिले त्यांना, मी शिकेन लवकरच आणि तुम्हाला बनवून वाढेल...
आणि ज्या वेळी पहिल्यांदा ते आमचा संसार बघावयास सेलू या गावी आले तेंव्हा, मी त्यांना माझ्या हातची भाकरी करुन वाढली....तर ते माझ्या सासुबाईंना कौतुकाने म्हणाले, "पोरीने केलेली ही भाकरी बघा किती पातळ आहे!पोळी आहे का भाकरी?कळत सुध्दा नाही"...
    गावी मी चूल पेटवून स्वयंपाकही बनवलाय हे बघून त्यांना फार कौतूक वाटायचे...जन्मापासून शहरातच वाढलेली मी, काही कामं येतील का हिला?यासाठी साशंक होते ते...
पुनःश्च एकदा आमच्या बदलीच्या गावी (सेलू ) येथे त्यांना काही दिवस येऊन रहावयाचे होते...लकडा लावला होता त्यांनी सारखा 
पण, नियतीला ते अमान्य होते...
   मार्च महिना,दुपारचे भर बारा वाजत आलेले,
कोणी परिचित आलाय म्हणून त्याच्याशी बोलत बसले....पर्यायानं स्नान, देवपुजा यांना उशिर झाला..."आजच्या दिवस राहू द्यात देवपुजा", असे म्हणताच चिडून म्हणाले,"माझ्या जीवात जीव आहे तोवर मी पुजा करणे सोडणार नाही" ...
सिंहगर्जनाच केली त्यांनी...मात्र दररोज सोवळे नेसून पुजा केल्या नंतर त्यांना लगेच  गरमागरम जेवण तयार लागायचं...
 ते स्वयंपाक घरात आले की जेवायला बसायचे...
त्या दिवशीही असेच घडेल असे वाटले होते....आमच्या ताई पुजेची सारी तयारी काकांना करुन देत, त्यांचे ताट वाढण्यासाठी स्वयंपाक गृहात दाखल झाल्या आणि सासूबाई चूलीजवळ गरम भाकरी करु लागल्या...
 देवासाठी लावलेली तेवती निरंजन एका कपाटा प्रमाणे असणाऱ्या देवघरात ठेवताना, त्यांच्या डोळ्यांच्या अधू झालेल्या दृष्टिने घात केला आणि,ती निरंजन त्यांच्या सोवळ्याच्या सोग्यावर ठेवली गेली....भराभरा सोग्याने खालच्या बाजूने पेट घेतला...पायाला चटके बसेपर्यंत त्यांच्या लक्षात आले नाही...तेथून तसेच बाहेर आले...आतल्या खोलीत जाऊन आपले पेटलेले सोवळे त्यांनी फेडून टाकले...पण... पण तो पर्यंत कमरेपर्यंत चा भाग अगदी भाजून निघाला होता....
सासूबाई आणि ताई तेथे येईपर्यंत बरीच हानी पोहोंचली होती त्यांच्या शरीराला...
असह्य वेदना होत असतानाही तशाच वेदना सहन करत स्थितःप्रज्ञ होऊन केवळ "डोंगराला आग लागली", असे म्हणाले आणि मुखी विष्णूसहस्रनामाचा पाठ त्यांनी सुरु केला....
    खेडेगाव, वाहनाची बस शिवाय दुसरी सोय नाही...बसही फक्त दोन वेळेस...त्या दिवशी योगायोगाने  नेहमी दहा वाजता येणारी बस दुपारी बारा वाजता आली...
गावकऱ्यांनी घडलेल्या अपघाताची कल्पना बसचालकाला दिली...त्या भल्या माणसाने काकांना आणि आवश्यक त्या लोकांना बसमध्ये घेतले आणि सरळ ती बस कंधारच्या हॉस्पिटल समोरच थांबवली....घरी असेपर्यंत सासूबाई आणि लेकीने त्यांना साठवलेल्या सायीमध्ये हळद मिसळून लेप लावला होता त्यांच्या  शरीरावर....
    हाच काय तो प्राथमिक उपचार झाला...कारण कंधारचे डॉक्टर ही पेशंटची अवस्था बघून उपचारास धजावले नाहीत...त्यांनी सरळ नांदेडला घेऊन जावयास सांगितले...
त्यात आणखी दोन तीन तास गेले...
पण, डोंगराएवढ्या काळजाचा,करारी वृत्तीचा हा देवमाणूस अजिबात डगमगला नाही...मुखी अव्याहत देवाचे नामःस्मरण चालूच होते...रक्ताची आवश्यकता त्यांच्याच धाकट्या मुलाने म्हणजे, मधुकरने त्यांना रक्त देवून पूर्ण केली...ऐंशी वर्षाच्या या महापुरुषाला आपली दोन्ही मुलं आपल्या जवळ आहेत याचे खूप समाधान वाटले आणि अपघातानंतर आठ दिवसांनी अगदी शांततेने दोन हात जोडत, २८मार्च,१९८७ या दिवशी जगाचा कायमचा निरोप त्यांनी घेतला...
 गंगाकिनारी आपला देह ठेवून गावकरी आणि आप्तजनांसाठी आपल्या कितीतरी समृतींचा गंध साठवून गेला....सारं गाव हळहळलं देवमाणसाविना पोरकेपणा आल्याच्या भावना व्यक्त करत साश्रू नयनांनी त्यांच्या आठवणी जागवत राहिलं....
असे माझे हे पित्यासमान सासरे, 
केवळ दीड वर्षांच्या सहवासातून माझ्या मनातील त्यांची प्रतिमा कितीतरी उंचावर नेऊन ठेवत, स्वर्गवासी झाले...नेमक्याच झालेल्या पितृदिनानिमित्त त्यांचे स्मरण करत, माझी ही शब्दसुमनांजली त्यांना वाहते....
🙏🙏
-- नंदिनी म. देशपांडे. 

🌹🌹🌹🌹🌹

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा