मंगळवार, १३ जुलै, २०२१

बाप्पा.

🌹'कर्तव्याने घडतो माणूस'
  आमचे बाप्पा आजोबा.🌹
  ‐------------------------------         
 श्री आनंदराव शेषराव उमरीकर....
वकील. परभणी. 
हे माझे आजोबा. माझ्या वडिलाचे वडील...
 त्यांची मुलं,मुली,जावई,सूनबाई,आप्तस्वकीय, नातवंड ही सारीचजण त्यांना "बाप्पा"
असे म्हणत...घरी सर्वांचे बाप्पा असणारे आजोबा, बाहेर साऱ्यांचे आनंदराव,वकिलसाहेब  होते...
    मी अगदी चार वर्षांची असेल तेंव्हा आपल्या वयाची ऐंशी वर्षे पूर्ण करुन बाप्पांनी या जगाचा निरोप घेतला...सहाजिकच त्यांच्या मला मिळालेल्या सहवासाच्या आठवणी मला आठवाव्यात हे अशक्यच...पण, माझ्या बाबांचं दैवत असणाऱ्या बाप्पांचा मोठा फोटो कायम आमच्या बैठकीत लावलेला असायचा, आजही तो आहेच...सोबत माझ्या मोठीआईचाही...
पण मोठीआई मी दहा वर्षाची असताना गेली.... म्हणून तिच्या थोड्यातरी आठवणी स्मरणात आहेत माझ्या....असो...

 बाप्पांची प्रतिमा बघत बघत त्यांचं अस्तित्व कायमच माझ्या माहेरी जाणवत रहायचं....बाबांनी आईने ते त्यांच्या आठवणी सांगत जागतं ठेवलं असं म्हणू या हवं तर...
आणि यामूळे ते मला पुसटसे आठवतात असा भास होतो...
    पण बाबांच्या सांगण्यातून बाप्पांच्या आठवणींना उजाळा मिळत जातो...तो आपण शब्दबध्द करावा असं प्रकर्षानं   वाटलं आणि लिहिती झाले मी...

...२७ मे,१९७० मध्ये बाप्पा गेले तेंव्हा ते ८० वर्षे वयाचे होते...म्हणजेच त्यांचा जन्म इ.स.१८९० चा...बालपण परभणी जिल्ह्यातच असणाऱ्या (माळाची) उमरी या गावी गेलेले...या छोट्याशा गावी एका टेकडीवर ईंद्रायणी देवीची प्रसन्न मूर्ति(तांदळा)वास करतो...
याच गावी त्यांची वडिलोपार्जित घर आणि शेती, म्हणूनच ते उमरीकर....

   पूर्विपासूनच हे सुखवस्तु कुटुंब...
    एकूण सहा भावंड. त्यांपैकी शिक्षणाच्या निमित्ताने दोघे भाऊ हैद्राबादेत गेले...तेथे वकिलीची सनद घेऊन दोघांनी सध्याच्या मराठवाड्यात,पण त्या काळी निजामाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या... परभणी शहरात श्री आनंदराव यांनी म्हणजे माझ्या आजोबांनी आणि सेलू या गावी त्यांचे भाऊ रंगराव यांनी वकिली चालू करत तेथेच आपले बिऱ्हाड थाटले...

   सुरुवातीला जम बसेपर्यंत आनंदरावांनी भाड्याच्या घरात राहूनच संसाराची घडी बसवली.... एक मुलगी झाल्या नंतर त्यांची पहिली पत्नी कृष्णाबाई दुर्दैवानं जात राहिली...या कृष्णाबाईंचं माहेर परळी होतं....

    तिच्या जाण्यानं त्या वेळच्या रुढी नुसार तिची जागा माझी आजी, मोठीआई अहिल्या राम उर्फ राजाजी कोठेकर,जी बाप्पांपेक्षा पंधरा वर्षांनी लहान होती.... यांनी भरुन काढली....पण कृष्णाबाई आनंदराव उमरीकर या नावानेच तीही उमरीकरांच्या घरी माप ओलांडून आली....

   मोठी आई बाप्पांच्या लग्नानंतर लवकरच 
 प्लेगची साथ आली होती, त्यावेळी बहुतेक जण गावाच्या बाहेर तंबू ठोकून राहू लागले... बाप्पाही कुटुंबासह तेथेच होते...
...बाप्पांनाही प्लेगची गाठ आली होती...या आजाराशी निकराने झुंज देत त्यांनी मातही केली होती  प्लेगवर...
पण, एक दिवस अचानक बाप्पा एकदमच निपचीत पडले ...
तेथे उपलब्ध वैद्यांनी"बाप्पा गेले", असे जाहिर केले...
त्यांच्या अंतीम प्रवासाची तयारी केली गेली...त्यांचा खाली घोंगडीवर ठेवलेला देह आता उचलणार एवढ्यात, नव्यानेच लग्न झालेल्या माझ्या आजीच्या चाणाक्ष नजरेनं बाप्पांचा पायाचा अंगठा हलतोय हे लक्षात आलं...तिने, "ते आहेत, गेले नाहीत"असे निक्षून सांगितले. एकच गोंधळ उडाला...वैद्यांना पाचारण करण्यात येवून लगेच उपचार चालू केले...आणि काय आश्चर्य, बाप्पा यातून लवकरच ठणठणीत बरे झाले..
    या नंतर माझ्या आजीशी कित्तेक वर्षे संसार होऊन  त्यांना सहा अपत्य झाली!
त्यांच्या कर्तृत्वाने आभाळाएवढी उंची गाठत 
कुटुंबाचा आधारवड बनले ते...
ही आठवण बाबांना,१९७० मध्ये बाप्पांचे निधन झाल्यानंतर बाप्पांचे मित्र श्री महतपुरीकर देशपांडेआजोबा,जे क्रांती चौकात रहावयाचे, यांनी सांगितली होती...

   अगदी केतकी असं चमकदार गोरेपण, नाकीडोळी निटस, उंच, धिप्पाड बांध्याचे आमचे बाप्पा फारच देखणे होते...
 त्यांचा विवाह झाला त्यावेळी ते वकिल झालेले होते...
परभणीत सुरुवातीला, सध्याच्या गांधी पार्क या भागात भाड्याने राहिले ते... आपल्या कुटुंबाला घेऊन ....
म्हणजे,पहिला विवाह झाल्यानंतर ही ते तेथेच रहायचे...
पण ती जागा नंतर पालिकेने ताब्यात घेतली आणि सर्वांनाच तेथील घरं रिकामी करावी लागली...त्यावेळी बाप्पांनी, गावापासून थोडे दूर, (आताचा स्टेशन रोड)
सलग अशी मोठ्ठी जागा घेतली ... आणि आपला मोठा वाडा, बंगला बांधला... 
    बाप्पांनाही बांधकामात आणि त्याच्या नुतनीकरणात फार रस होता...
आपल्या बंगल्याचे बांधकाम झाल्यानंतर राहिलेल्या जागेचे मोठे मोठे प्लॉट्स पाडून त्यांनी ते आपल्या ओळखीच्या लोकांना आणि वकिल मित्रांना विकून टाकले...
म्हणूनच एका ओळीत आनंदराव उमरीकर, खळीकर, शहाणे,शहाणे असे बंगले होते सर्वांचे! कालांतराने माझ्या वडिलांनी,प्रभाकरराव उमरीकर यांनी त्या बंगल्याचे नुतनीकरण करत, याच बंगल्याचे नामाभिधान,"आनंद सदन " असे केले...
   त्यावेळी या भागात नळ आलेले नव्हते..पण शेजारीच एक बांधलेली विहिर होती...ती व्यवस्था बघूनच त्यांनी हा बंगला बांधला होता...
अतिशय प्रशस्त असा समोर हा बंगला आणि मागे बरेच भाडेकरु असा मोठ्ठा डोलारा छान पैकी नांदत असायचा येथे....अगदी पंधरा एक वर्षां पूर्वी पर्यंत!
परभणीचा उमरीकरांचा वाडा तेंव्हापासून प्रसिध्द होता...कित्येक बिह्राडं राहून गेली या वास्तू मध्ये!

    बाप्पांचा वकिली व्यवसाय छानच चालायचा...पण तरीही त्यांनी सिगारेटस् मध्ये भरावयाची तंबाखू तयार करण्याची फॅक्टरी काढली ती तंबाखू तयार करुन हैद्राबादेत पाठवण्याचा एक छोटेखानी व्यवसायही चालू केला होता...
या फॅक्टरीची जड मोठे लोखंडी अवशेष नंतर कित्येक वर्षे होती आमच्या अडगळीच्या खोलीत...

    परभणीत चांगला जम बसवला बाप्पांनी आणि गावी,उमरी येथे असणाऱ्या वडिलोपार्जित शेतजमीनीवरचा आणि घरावरचा हक्क मात्र बाकी भावंडांना देऊ केला...
अतिशय उमद्या मनाचे आणि समाधानी वृत्तीचे बाप्पा, फार कुटुंब वत्सल होते...
त्या काळात मुलींना शिक्षणासाठी शाळेत पाठवले जायचे नाही...पण आमच्या बाप्पांनी, आपल्या मुलींना घरी येवून शिकवणाऱ्या शिक्षकाची नियुक्ती केली होती...माझी मोठीआईही साक्षर आणि हुशार होती...
त्यांच्या काळापासूनच आमच्या घरात अंधश्रध्देला कधीच थारा नव्हता...
पण ईश्वरी श्रध्दा नांदत असायची....बाप्पा दररोज मोठ्या अशा लाकडी देवघरात बसून दररोज पुजा नैवैद्य वैश्वदेव करायचे....

   बाप्पांचा मित्रपरिवार सुध्दा फार मोठा होता...दरवर्षी ते मित्रमंडळींसोबत सुट्ट्यामध्ये पर्यटनासाठी चार दिवस बाहेरगावी जाऊन येत...पण रझाकार सुरु झाला तेंव्हा आपल्या संपूर्ण कुटुंबासह, काही नातेवाईक,त्यात माझ्या आजीचे मावसभाऊ सेलूचे वासुदेवराव टाकळकर आणि कुटुंबीयही होते...आणि कांही मित्र मंडळी व त्यांचे कुटुंबीय क्रांती चौकात रहात असणारे असे सर्वच जवळपास सहा सात महिने त्र्यंबकेश्वर येथे भाड्याने एक जागा घेऊन मुक्कामी राहिले होते...
   त्या वेळेस आमचा परभणीचा कारभार माझ्या आजीचे मोठे भाऊ श्री उध्दवराव कोठेकर यांनी आमच्या घरी राहून सांभाळला होता...त्यांना रझाकारापासून काही धोका नव्हता कारण  ते स्वतः अधिकाऱ्यांच्या बायकांना संगीत शिकवण्यासाठी त्यांच्या घरी जायचे...

  बाप्पांनी वडिलोपार्जित शेतीवरील हक्क सोडून दिला होता तरीही, परभणीत स्वकष्टार्जित अशी तीस एकर बागायती शेती घेतली होती...
आंबराई तर फारच नामी होती...आमराई थोडी उशिरा लावली, बरेच जण "तुम्हाला काय खायला मिळतील अंबे?कशाला लावताय"?असे म्हणाले पण "मी नाही तरी माझी मुलं नातवंडं खतील ना "असे ते म्हणाले ...आणि त्यांच्याच भाग्याने त्यांनी स्वतः तर खाल्लेच अंबे, पण कितीतरी लोकांच्या घरच्या रसाळी आणि लोणची या आब्यांनी साजरी केली.... वर्षानुवर्षे!
आम्ही लहानपणी चाखलेली आंब्याची मज्जा काही ओरच होती...आयुष्यभर पुराव्यात अशा या बाबतीतील गोड आठवणींची साठवण मनात रुजून बसलीए...
आमच्या या शेताला लागूनच उरूस भरायचा परभणीच्या तुरतपीराचा आजही भरतो तो...गावातच शेती झाल्याने नाईलाजाने बाबांनी साधारण वीस वर्षांपूर्वि शेती विकली....
    
   त्या काळच्या समाजमनाप्रमाणे बाप्पांचे आपल्या मुलावर अतोनात प्रेम होतं...वयाच्या आपला थोड्या पुढच्या टप्प्यात थोडं उशिरा पाच मुलींच्या पाठीवर झालेला मुलगा म्हणजे त्यांचा जीव की प्राण. मुलींचं क्षेम क्षेम आहे ना याकडे कायम लक्ष असायचे...
स्वकर्तृत्वावर प्रगाढ विश्वास असणाऱ्या अशा आमच्या बाप्पांचा आत्मविश्वास फार प्रबळ होता...

    उर्दू माध्यमातून न्यायालयिन कामकाज चालू होते तो पर्यंत म्हणजे इ.स.१९५० पर्यंत...
मराठवाडा स्वतंत्र झाल्यानंतर, कामकाजाची भाषा इंग्रजी झाली आणि आनंदराव उमरीकर वकिलांनी कोर्टात जाऊन कामकाज बघणे सोडले...
आमच्या घरी उर्दू भाषेतून कायद्याच्या कायद्याच्या पुस्तकांचा फार मोठा संग्रह मी स्वतः बघितला आहे...
आपल्या वयाच्या साठ वर्ष पूर्ण करत निवृत्ती पत्करणार्या आमच्या बाप्पांनी स्वतःचा मुलगा आपल्या जवळच असावा म्हणून माझ्या बाबांना मुद्दाम वकिलच बनवले होते...
दोन तीन वर्षे मुलाचा वकिलीतील जम बसलाय हे बघत समाधानाने,
घरात माहेरपणाला लेकी जावई नातवंड आलेली असताना, मुलाला झालेली दोन कन्यारत्न  बघून,आंबराईची अढी लागलेली असताना अगदी भरल्या गोकुळातून आनंदाने, "माझा शेवट जवळ आलाय आता औषधांचं काम नाही ही सुचना डॉक्टरांना दिली...
आमचे कौटुंबिक डॉक्टर,श्री मधुकरराव चौधरी हे बाप्पांना ऑक्सिजन सिलिंडर लावत असताना, माझ्याशी फक्त थोड्या गप्पा मारा" असे म्हणाले...माझ्या आईकडून तिच्या सासुबाईंची यथायोग्य काळजी घेण्याचे वचन घेतले.. आणि आपल्या धाकट्या जावयाकडून,श्री रामचंद्र आसोलेकर यांच्या कडून मेहूण्याकडे (स्वतःच्या मुलाकडे)
लक्ष देणयाचा शब्द घेतला त्यांनी,आणि बारा तासातच दोन ह्रदयविकाराचे झटके आल्यानंतर,बाबांच्या मांडीवर डोके ठेवून 
कायमचा निरोप घेतला आणि स्वर्गलोकीची वाट धरली बाप्पांनी...तो दिवस होता, २७,मे १९७० चा...
आजही बाप्पांची प्रतिमेतील प्रसन्नमुख छबी बघितली की, त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होते हे मात्र खरंए...
माझ्या आजीच्या ईच्छेनुसार नातवाला आजोबांचेच नाव द्यावे ही तिची ईच्छा माझा भाऊ झाल्या नंतर आईबाबांनी पूर्ण केली आहे...त्यांच्या वकीली व्यवसायाचा वारसा उत्तम पध्दतीने चालवणारी ही उमरीकरांची तिसरी पिढी होय...
   स्व. बाप्पांच्या,आनंदराव उमरीकर यांच्या स्मृतिंना विनम्र अभिवादन करत मीही आता पूर्ण विराम घेते...🙏🙏

©️ 
नंदिनी म. देशपांडे.
दि. १० जूलै,२०२१.
औरंगाबाद. 

🌹🌹🌹🌹🌹

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा