बुधवार, १० नोव्हेंबर, २०२१

दिवाळीचा निरोप एक हुरहुर.

आली आली दिवाळी आली, म्हणत म्हणत आजच निरोप घेऊन निघून गेलेली दिवाळी आपल्याला कितीतरी सकारात्मक उर्जा बहाल करवून गेलीए, ही जाणीव आज मनाला झाली...
गतस्मृतिंना उजाळा देत, माहेरच्या आठवणीत आईच्या स्मृतांना स्मरत त्या जागवत गेली...
नवीन आठवणींची दुलई मनावर घालत मानसिक ऊब देऊन सांगता होणारी ही दिवाळी म्हणजे आपली जवळची सखीच जणू!
आपल्या सहवासात चैतन्याने न्हाऊ माखु घालणारी,कितीतरी मनोकामनांचा नैवैद्य स्विकारणारी अशीच....
माणसाच्या वागण्या बोलण्यात सकारात्मक वृत्तींना खतपाणी घालत जाणारी,ती हिच दिवाळी...
अंतःकरणात प्रेम माया, वात्सल्य, भक्तीरस यांना सवे घेऊन येणारी ती हिच दिवाळी!
   या दिपोत्सवाच्या मंद प्रकाशात तेजाळत जाणारी मनं, आपल्याला मिळालेल्या समाधानाचे तेज चेहर्‍यावर विलसत ठेवते...आपल्या देहबोलीतून प्रकट होत जाते...
    लक्ष्मीच्या रुपाने आगमन करणारी ही दिवाळी पक्वान्नांच्या  पंक्तींचा थाट करते...फराळाच्या पदार्थांची मांदियाळी सजवते...रंगावलींचा गालिच्या ची बिछायत घालते... घराचे सुशोभीकरण करत मनाचे सुशोभीकरण साधते...
शरदाच्या चांदण्या शिंपवत हवेतील गारव्याचे मोरपीस अंगावर फिरवते आणि रोमांचित करते...ऋतूबदलाची वर्दीही देऊ करते...
    अशा या हव्याहव्याशा मैत्रीणीने आज निरोप घेतला आणि 
लगबगीला मंदावलेपण आलं जरासं...
गेल्या काही दिवसांत अपूर्ण राहिलेली निद्रादेवी आपल्या डोळ्यांचा ताबा घेतीए असं जाणवत राहिलं...आणि एखाद्या मोठ्या कार्यानंतर मांडववारं
लागणं काय असतं? हे लक्षात आलं...
पण हे मांडव वारं नव्हे तर नवीन स्वप्न, योजना यांना आकारण्या साठी घेतलेला अल्पविराम आहे असे मनानं समजावलं....

  ©️
नंदिनी देशपांडे. 
🌹🌹🌹🌹🌹

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा