सोमवार, ८ जुलै, २०१९

गंगोत्री-उत्तरकाशी-सीतापूर.

*हिमालयाच्या सहवासात*

*गंगोत्री- उत्तरकाशी-सीतापुर*

     गंगोत्री वर भागीरथी नदी चे दर्शन, घाटावरची पूजा, देवदर्शन आटोपत; उत्तरकाशीला आमच्या हॉटेलच्या मुख्य मुक्कामी येण्याचा रस्ता  वर जाताना जो होता, त्याच रस्त्याने आम्ही परत फिरणार होतो.
निसर्ग तोच, पण प्रहर बदलल्यामुळे त्याची आभा जराशी वेगळी वाटत होती.अर्थात एकूणच सृष्टिच्या किंवा दऱ्या पहाडांच्या सौंदर्यामध्ये तसूभरही फरक पडलेला नव्हता. या वसुंधरेचे निरीक्षण  करण्यामागे दरवेळी असायची तीच उत्सुकताही कायम होती.खरंतर अशा सौंदर्यपूर्ण पर्यटन स्थळांवर चांगले महिनाभर तरी येऊन राहावं,आणि या सृष्टीशी संवाद करत;तिच्याशी तादात्म्य पावावं आपण,अशीच उर्मि प्रत्येकाला वाटावी असं हे सारं सौंदर्य! मनाला भुरळ घालणारं, भावनांची तरलता वाढवणारं,डोळ्यांना सुखावणारं. येथे कायम राहणाऱ्या लोकांचा हेवा वाटावा आपल्याला,असं!

    ऋषिकेश पासून सुरु होणाऱ्या सर्व पहाडी रांगा या सर्व हिमालय पर्वतांच्याच.या पहाडांच्या  वर चढत चढत मार्गक्रमण करत असताना,मी पूर्वी लिहिलं आहे त्याप्रमाणे प्रत्येक पहाडी रांगाचे सौंदर्य, किंबहुना त्यांच्या दगडांच्या काठिण्याचा पोतही निरनिराळा दिसून येतो.

     काही पहाड अतिशय ठिसूळ खडकांचे,काही खूप कणखर, काही मध्यम प्रतीच्या मुरुमवजा दगडांचे तर काही पहाड अगदीच नाजूक प्रकृतिच्या मातीपासून बनलेल्या भुसभुशीत खडकांचे. प्रत्येक नद्यांचे छोटे-मोठे पात्रही पांढऱ्याशुभ्र गुळगुळीत  दगडगोट्यांनी युक्त असेच.परिणामी तिच्या प्रवाहाबरोबर येणारी वाळू पांढऱ्या रंगाचीच. पण,प्रत्येक नदीचे पाणी मात्र वेगवेगळ्या रंगांचे!

    भागीरथी, यमुना, मंदाकिनी, अलकनंदा, सरस्वती,धौली गंगा,पिंदर गंगा,झेलम आणिकही छोट्या छोट्या नद्या,धबधबे, प्रवाह यांचे उगमस्थान हे हिमालय पर्वतांच्या रांगांमधूनच!

    हिमालयाच्या या पर्वतांचे आपल्यावर केवढे तरी मोठ्ठे उपकार आहेत.नैसर्गिक संपत्तीने ओतप्रोत, जंगल संपत्तीने संपन्न, मोठ्या मोठ्या नद्यांचे उगमस्थान. शिवाय जमिनीची सुपीकता वाढविणारं नद्यांचे सान्निध्य.यांचं सर्वात मोठं ऋण म्हणजे, या हिमालय पर्वतांच्या रुपाने,आपल्या भारत मातेला नैसर्गिक पणे मिळालेली प्रचंड मोठी अशी तटबंदी! या पर्वतांच्या वैविध्यपूर्ण उपकारांचे आपण भारतीय नागरीकांनी मानावते तेवढे धन्यवाद कमीच आहेत.

     उत्तरांचल च्या या सहलीत आम्ही हिमालय पर्वतांच्या रांगा अक्षरशः पिंजून काढल्या.विधात्यानं निर्मिलेल्या या किमयेनं तोंडात बोट घालण्याची वेळ येते आपल्यावर!  किंबहुणा या निसर्गापुढे माणूस म्हणजे,अगदीच कःपदार्थ ठरतो. तो सर्वार्थाने निसर्गापुढे अगदी तोकडाआहे, याची प्रचिती आल्यावाचून राहत नाही. पर्यटन सहलीच्या निमित्तानेच काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातील हिमालयाच्या रांगाही  आमच्या बघण्यात  आल्या आहेत. त्यांचेही आपले एक खास सौंदर्य आहे.

     गंगोत्री वरुन उत्तर काशी च्या वाटेवर असताना, 'हर्षिल' नावाच्या एका सिनिक खेडे गावावरुन आम्ही पास झालो.जेथे 'राम तेरी गंगा मैली' या सिनेमाचे शूटिंग झालेलं होतं.

     तर,देवदार वृक्षांच्या जंगल क्षेत्रातून प्रवास करत करत,आम्ही सायंकाळी सात वाजेपर्यंत उत्तरकाशी येथे पोहोंचलो. दिवसभराचा प्रवास झाला पण, थकवा असा अजिबात जाणवला नाही.

     दुसऱ्या दिवशी सकाळीच नाश्ता करुन, २४० किलोमीटरचा प्रवास करत आम्हाला उरलेल्या हिमालयाच्या रांगांची भेट घ्यावयाची होती. त्यांच्यामुळे अवनी ला मिळालेले विलक्षण सुंदर असं रुप  नजरेनं पिऊन टाकायचं होतं. नव्याने ताजेतवाने होऊन.

     हा आमचा प्रवास चक्क तेरा तासांचा असणार होता. ही मिळालेली सुंदर पर्वणी अनुभवण्यासाठी मन उत्सुक झालेलं होतं.

     हा आमचा प्रवास होता उत्तर काशी ते सीतापुर. सीतापुर हे ठिकाण म्हणजे, केदारनाथ मंदिराला जाण्याच्या पायथ्याचा टप्पा होता.

       गंगामातेच्या दर्शनाने तृप्त झालेलं मन आणि शरीर, सवयीनुसार झोपेच्या आधीन केंव्हा झालं;हे लक्षातही आलंच नाही.

    ठरल्याप्रमाणे सकाळीच नाश्ता आटोपत, आम्ही सीतापूरच्या रस्त्याला लागलो.आल्हाददायक वातावरणाची, सुंदर निसर्गाची सोबत, तरल झालेले मन, विश्रांती घेऊन ताजेतवाने झालेलं शरीर या प्रवासाची उत्सुकतेने वाट बघत होतं.

      एव्हाना, आम्ही पहाडांमधून प्रवास करण्यासाठी चांगलेच  रुळलो होतो. सवयीने भीती थोडीशी बाजूला सारली गेली होती.

     प्रवास चालूच होता. जेवण चहा-कॉफी वगैरेच्या निमित्ताने छोटी-छोटी विश्रांती घेत आम्ही सर्वच प्रवासी प्रवासाचा आनंद लुटत होतो.

     उत्तर काशीहून सीतापूर कडे जाणाऱ्या रस्त्यावर आम्हाला "टिहरी" नावाच्या धरणावरुन जावं लागलं. खरं म्हणजे या धरणाच्या सान्निध्यातून जाण्याशिवाय दुसरा मार्गच नाहीए.'टिहरी' या गावावरुन या धरणाचे नाव पडले आहे.

     टिहरी धरणाची वैशिष्ट्ये बघितली तर आपण अगदी अवाक् होऊन जातो!एवढे प्रचंड मोठे धरण आहे हे! डोळे विस्फारतच  या धरणाचं गाडीतूनच अवलोकन केलं आम्ही. येथे फोटो शूटिंगला सक्त मज्जाव आहे.  कडेकोट बंदोबस्ताचा २४ तास पहारा असतो.

        या धरणाचं वेगळेपण जपणारी वैशिष्ट्य अशी, उत्तरांचलमधील सर्वात मोठी नदी भागीरथी वर बांधण्यात आलं आहे हे टिहरी धरण.

     टिहरी हे धरण भारतातील सर्वात उंच ठिकाणावर पहिल्या क्रमांकाचं आहे.उंचीच्या बाबत आशिया खंडात या धरणाचा दुसरा क्रमांक लागतो. तर उंचीच्याच संदर्भात जगामध्ये आठवा क्रमांक आहे.

    या धरणाची उंची २६० मीटर,लांबी ५७५मीटर आणि रुंदी शंखाकृती आहे.

     हे धरण बांधण्याचे काम १९७८साली हाती  घेण्यात आलं होतं.२००६ साली  हे धरण कार्यान्वित करण्यात आलं.

    येथे प्रचंड मोठा असा हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट चालवला जातो. हे वीज निर्मितीचे प्रचंड मोठं केंद्र आहे. येथून उत्तर प्रदेश, उत्तराखंड,पंजाब, दिल्ली,हरियाणा, जम्मू काश्मीर,राजस्थान, चंदिगढ, हिमाचल प्रदेश या सर्व राज्यांना वीजपुरवठा होतो.

    दुर्दैवाने या धरणाला काही इजा झाली तर त्याचे परिणाम दिल्लीपर्यंत पोहोचतील असे म्हटले जाते.

       पुर्विच उल्लेख केल्याप्रमाणे संपूर्ण उत्तरांचल हा, त्या ईश्वराने भारतमातेच्या चरणी वाहिलेला एक अतिशय सौंदर्यपूर्ण नजराणा आहे.सीतापूर ला पोहोंचेपर्यंत आम्ही हा डोळ्यात भरभरुन साठवून घेतला.

      रात्रीच्या जेवणानंतर आपसुकच झोपेने डोळ्यांचा ताबा घेतला.सकाळी नऊ वाजता आमचं हेलिकॉप्टर (चॉपर) आम्हाला केदारनाथ वर पोहोंचवण्यासाठी आमची प्रतिक्षा करणार होतं.

*क्रमशः*

©
‌‌ *नंदिनी म.देशपांडे*.

आषाढ शुद्ध पंचमी.
दि.जूलै,७,२०१९.

🌲🌲🌲🌲🌲🌲

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा