रविवार, २१ जुलै, २०२४

चंद्रमा....

*चंद्रमा*🌕

हे शांत शितल चंद्रमा
निशेच्या आकाशीच्या
               राजसा ।

बांधतअसतोस
    प्रत्येकाच्या मनाशी
                 तू धागा ।

कळतं रे कसं
         ‌‌ तुला मनातलं
निरव शांततेत साधत
    असतोस गप्पाष्टकं ।

प्रेमिकांच्या प्रेमाचा 
       होतोस तू साक्षी
 बहिणीला भावाच्या                            
       हक्कानं तूच रक्षी।

वाढत असता
कलेकलेनं
अहंकार तू
    त्यागून टाकतोस‌ ।

कलेकलेनंच 
कमी होताना सदैव
हसतमुख असतोस ।

नभांगणीच्या तारकांशी
 मैत्र मात्र जोडतोस
आकाश गंगेचा प्रियतम
            बनून सदा राहतोस।

आभा तुझी देखणी
तेजश्री त्यातूनि प्रकटी
प्रियकराच्या प्रियेचा
       तू असशी ऋणी‌ ।

मुखकमलाला तिच्या
    तुझीच रे उपमा
सौंदर्याच्या साजाने
तूच चिरंतन साजिरा
तूच चिरंतन साजिरा ।

© 
*नंदिनी म.देशपांडे*
दि.२१,जूलै,२०१९
औरंगाबाद.

🌕🌕🌕🌕🌕🌕

मंगळवार, २८ मे, २०२४

संस्कृती.

🌸 *संस्कृती* 🌸
             

©️ लेखिका.
ॲड.नंदिनी म.देशपांडे

      *संस्कृती*,शब्द केवढासा,पण त्यातील अर्थाची व्याप्ती आणि त्यामूळे त्याला आलेले जडत्व (घनता)महानच म्हणावी लागेल!

     संस्कृती हा शब्द प्रत्येक देशाच्या सामाजिक,सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक,आध्यात्मिक,
क्रिडाविषयक अशा सर्व स्तरांना स्पर्श करणारा आहे.किंबहूणा, या प्रत्येक स्तरांचे काही मूलभूत वैशिष्ट्ये,काही महत्त्वपूर्ण संकल्पना, त्यांचा प्रत्येकाचा गाभा  एकत्रित केल्यानंतर जो एक जुडगा तयार होतो त्याला आपण "संस्कृती" असे नामाभिधान देऊ शकतो.

     या विश्वाच्या पाठीवर जेंव्हा जेंव्हा एखाद्या भूभागाचा शोध लागला;आणि त्या भूमीला ज्यावेळी मानवाचा स्पर्श झाला, त्या वेळेपासूनच त्या संबंधित भूभागावर एका विशिष्ट प्रकारच्या संस्कृतीच्या उदयाची सुरुवात होत असते असे म्हणता येते.

    प्रत्येक भागाची, आपल्या सोयीसाठी, आपण प्रत्येक देशाची असे येथे म्हणूया.
तर प्रत्येक देशाची संस्कृती ही कमी अधिक प्रमाणात लवचिक असते. या संस्कृतीवर परिणाम करणारे घटक किती प्रभावी आहेत? त्याचा तेथील समाजावर कितपत परिणाम होतो? यावर खूपसे बदल अवलंबून असतात. जी गोष्ट व्यक्तिसापेक्षतेशी जवळचा संबंध ठेवून असते, त्या गोष्टींमध्ये बदल होणे ही अपरिहार्य बाब आहे. कारण 'बदल',हे काळाचे एक गृहित तत्व आहे.जिथे जिथे जिवंत माणसाचे अस्तित्व आहे ,तेथे येथे बदल अनिवार्य आहेच. किंबहुणा ;बदल हे जिवंतपणाचे द्योतक आहे.

    आपल्या भारतीय संस्कृतीचा विचार केला गेल्यास; या बाबतीत होत जाणारे बदलही आपल्या पिढीने सुद्धा याची देही याची डोळा होत असताना बघितले आहेत, आजही आपण ते बघतो आहोत. हे सत्य नाकारता येत नाही. 

    आपण आपली    भारतीय संस्कृती ही,आपले सणवार, लग्न पद्धती, रूढी परंपरा, सामाजिक, धार्मिक तत्त्वज्ञान, कला, क्रीडा प्रकार, इत्यादि ईत्यादि अशा अनेक म्हणजेच दैनंदिन आयुष्य जगत असताना आपल्याला स्पर्श करणाऱ्या अनेक अंगांच्या माध्यमातून ,त्यांच्या नजरेतून ती आपण अवलोकन करत असतो. कळत-नकळतपणे तिचे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरण होत जाते. पण, मला वाटतं; हे सारे घडत असताना ज्या पिढीने संस्कृतीच्या मूल्यांचे अनुभव घेतलेले आहेत; ते चांगले किंवा वाईट असे दोन्ही स्वरुपाचे असू शकतात.त्यांचे मूल्यमापन करुन;त्यात सकारात्मक बदल घडवत/ सुचवत ते पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करावेत.

     मुल्यांच्या  बदलां मध्ये लवचिकता असणे फार गरजेचे आहे .म्हणजे,जुने टाकून देत,नव्याचा स्वीकार करताना आपण या दोहोत सुवर्णमध्य साधावयास हवा. म्हणजे मूळ संस्कृतीचा पूर्णपणे ऱ्हास होणार नाही; आणि नव्याची नाळ जुन्याशी बांधलेली राहील. होय ना?

    मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे; संस्कृती या शब्दाची व्याप्ती फार मोठी आहे.पण आपल्या जगण्याच्या प्रत्येक क्षेत्राशी ती बांधिलकी ठेवून आहे. म्हणूनच या प्रत्येकाशी निगडीत गोष्टींचीही अशी एक वेगवेगळी संस्कृती असतेच असते.

    धार्मिक आणि कलेच्या क्षेत्रात तर ती प्रामुख्याने दिसून येते. एवढेच नव्हे तर प्रत्येक धर्माची  उदाः हिंदू,मुस्लीम, सिख वगैरे यांची वेगवेगळी अशी एक संस्कृती असते. 

    भारतीयांची खाद्यसंस्कृती, वाचन संगीत संस्कृती या सुद्धा फार महान आहेत.

    आपण आपल्या भारतीय संस्कृतीचा; ऐतिहासिक ठेव्यांतून, पुस्तकातून,चालीरीती रुढी परंपरा यांच्या माध्यमातून त्यांचा अभ्यास करु शकतो.हा अभ्यास करत, त्याच्या मूळ गाभ्यापर्यंत पोहोचू शकतो.

    आज इंटरनेट आणि दळणवळणाच्या अत्याधुनिक साधनांमुळे जग जवळ आले आहे.आपण कांहीच तसांत लिलया सातासमुद्रापार पोहोंचतो. परत येऊही शकतो. आपल्या सोबत आपल्या संस्कृतीचेही वहन आपण करत असतो.किंवा परदेशातून येणाऱ्या लोकां बरोबर त्यांची संस्कृती आपल्या देशात येऊन पोहोंचते. यातून दोन्ही बाजूच्या संस्कृतींमधील चांगली मुल्ये स्वीकारणं निश्चितच स्वागतार्ह आहे. 'आपलं तेवढं चांगलं आणि परकीयांचं सर्व वाईट', हा दृष्टिकोन बदलणे महत्वाचे. यातूनच परस्परात दोन्ही संस्कृतीची देवाण-घेवाण घडते.यामुळे आपल्या संस्कृतीचा जगभर प्रसार होण्यास मदतच होईल.

      प्रत्येकाच्या डोळस नजरेतून, वागण्या-बोलण्यातून, आवर्तन व अवलोकनातून संस्कृती प्रवाहित रहावयास मदत होते.या संस्कृती रुपी पाण्याचा प्रवाह प्रदूषित न होता दिवसेंदिवस तो नितळ शुद्ध कसा होत जाईल याचे भान प्रत्येकाने ठेवावयास हवे. संस्कृतीच्या नावाखाली अंधश्रद्धा किंवा अंधानुकरण यांना स्थान नसावे. त्यांचे उच्चाटण झालेच पाहीजे. जास्तीत जास्त शास्त्रीय दृष्टिकोन ठेवत,संस्कृतीची देवाण-घेवाण, संस्कारांच्या माध्यमातून आपण संक्रमित करावयास हवी.ही प्रत्येक पिढीची जबाबदारी आणि कर्तव्य आहे. हे काम करत असताना प्रत्येक संस्कृतीचा आदर पूर्वक सन्मान करावयास हवा. कारण वैविध्यतेने नटलेल्या आपल्या भारत देशात ;या तत्वांना अनुसरुन एकता कायम ठेवण्यास मदत होते. 

    अर्थातच हे सारं कृतीत उतरवण्यासाठी  प्रत्येक जण तेवढ्याच सशक्त मानसिक प्रगल्भतेच्या हवा. हेही विसरता कामा नये. अशी प्रगल्भ वृत्ती आपल्यात उतरवण्यासाठी नक्कीच कष्ट घ्यावे लागतील. प्रसंगी विरोध स्वीकारावा लागेल. बंडही करावे लागेल कदाचित. पण यातून हाती जे लागेल ते नक्कीच खूप समाधान देणारे, मनःशांती बहाल करणारे असेल एवढं नक्की.

चला तर मग,

रक्षिण्या संस्कृती आपली

सिध्द होऊ या एकीने

मानवतेचा धर्म पाळूनी

सन्मान करुया आदराने.....

😊🙏🏻

संवाद.९४२२४१६९९५.
औरंगाबाद.
🌹🌹🌹🌹🌹🌹

बुधवार, २२ मे, २०२४

आमची नेपाळ सहल....

*नेपाळ सहल*
---------------
लेखिका-- 
ॲड.नंदिनी म.देशपांडे.

       भारताच्या उत्तरेतील चार धाम यात्रेला, नेपाळच्या पशुपतीनाथाचे दर्शन घेतल्याशिवाय पुर्णत्व नाही असे मानले जाते...हेच पुर्णत्व सिध्दिस नेण्यासाठी आम्ही नेपाळ सहल ठरवली होती...
      आणखी दुसरा हेतू म्हणजे, हिमालयाच्या पहाडी रांगांचे विलोभनीय दृश्ये डोळ्यात साठवून घेणे...काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश या भारताच्या राज्यांंमधूून आणि थोडाफार भुतान या देशातून हिमालयाचे सौंदर्य निरखल्या नंतर, नेपाळ मध्ये हिमालयाचे अत्त्युच्च शिखर बघणे याची उत्सुकता शिगेला पोहोंचली होती अगदी....
         मनाने ठरवले की प्रत्यक्षात कृती होण्यास वेळ लागत नाही आणि तसेच झाले....
      मुंबईहून विमानाने अडीच तासात आम्ही काठमांडूच्या "त्रिभुवन " इंटरनॅशनल एअरपोर्ट वर उतरलो...क्षेत्रफळाने लहान असले तरीही विमानांची गर्दी खूप होती तेथे....जगभरातून देवदर्शन आणि ट्रेकिंग साठी येणारे पर्यटक यामूळे जवळ जवळ सर्वच प्रमुख देशांची कनेक्टिव्हिटी आहे या देशाशी....आणि म्हणूनच पाहिल्या पाहिल्या माझ्या मनात आले, "अरे हे तर बसस्टँड सारखेच विमानस्टँड वाटतंयं....
     त्यातही नेपाळमधील डोमेस्टिक एअरपोर्ट काही कारणास्तव बंद होते...त्या विमानांचीही गर्दी याच इंटरनॅशनल त्रिभुवन एअरपोर्टवर झालेली होती...असो..
       काठमांडू नेपाळच्या राजधानीचे शहर...तसे मध्यम आकाराचे पण शांत शांत वाटणारे...कोणतीही धावपळ नाही फारशी गर्दी नाही पण जुन्या भागांत मात्र स्थानिक आणि परदेशी पर्यटकांच्या भरपूर गर्दीत वावरणारं...
       तेथील ऐतिहासिक वारसा स्थळं जी तेथील राजघराण्याशी संबंधित आहेत अशी सारी याच भागात आहेत आणि त्यांची रचना, कोरीव नक्षीकाम, त्यातील भव्यदिव्यपणा त्यातील आर्किटेक्चर या गोष्टी खूप निरिक्षण करण्यासारख्या आहेत...त्या भागांना, तेथील अशा लाकडी कलाकुसर असणाऱ्या या ईमारतींना "दरबार" असे संबोधले जाते....
        नेपाळमधील हॉटेल मध्ये प्रवेश करताच तेथील स्थानिक गाईड ने पर्यटकांचे स्वागत गळ्यात झेंडूच्या फुलांचे हार घालून केले,हे थोडे गमतीशीर वाटले आणि मनालाही भावले....शिवाय हॉटेल मध्ये स्वागतासाठी प्रवेशव्दारातच दोन्ही बाजूंनी दोन स्त्रीया येणार्‍या प्रत्येक पर्यटकला कपाळी कुंकुम तिलक लावण्याचा सोपस्कार पार पाडत होती...तेंव्हाच लक्षात आले की, या  देशावर हिंदू संस्कृतीचा फार मोठा प्रभाव आहे...आणि ते गर्वाने आम्ही हिंदुराष्ट्र आहोत असे सांगतात...
        गाईड च्या सांगण्यावरून, नेपाळच्या राजाचे कुलदैवत आपली महाराष्ट्रातील तुळजाभवानी आहे, तिचे मंदिर दरबार परिसरात राजाने बांधले आहे... हे ऐकून तर हा देश आपल्या भारतासारखाच आहे याची कल्पना येऊ लागली...गेल्या काही वर्षांत नेपाळमधील राजघराण्यातील यादवीमुळे राजेशाही संपुष्टात येवून त्यांनी स्वतःला प्रजासत्ताक राष्ट्र घोषित केलेला आहे....आता तेथील राजा एका सामान्य माणसासारखे आयुष्य जगतो....
         आपण अगदी आपल्या भारताच्या शेजारीच आलो आहोत हे पावलोपावली जाणवत राहिले...
    मध्यम उंचीची, मध्यम बांध्याची, अपर्या नाकाची नेपाळी माणसं चमकदार गौरवर्णीय आणि हसतमुख आहेत...
        नेपाळमधील पर्यटन स्थळं ही जवळपास तेथील धार्मिक स्थळांशी जोडली गेलेली आहेत...या निमित्ताने निसर्गाची सैरही होते...

काठमांडू
---------
काठमांडू हे राजधानीच्या शहराबरोबरच तीर्थक्षेत्रही आहे. अशी दंतकथा सांगितली जाते की,पशुपतीनाथ हे भारतातील केदारनाथ ज्योतिर्लिंगाचा प्राण आहे...म्हणजेच कंठापासून डोक्यापर्यंत चा भाग हा पशुपतीनाथ आणि पाठीकडून पार्श्वभाग म्हणजे केदारनाथ....दोन्हींचे दर्शन झाले म्हणजे, संपूर्ण ज्योतिर्लिंगाचे दर्शन झाले असे मानले जाते...
       अक्षय्यतृतियेच्या दिवशी पशुपतीनाथाच्या दर्शनाचा योग आला आणि आम्ही समाधानाने भरुन पावलो....
     हेमाडपंथी काळ्या पाषाणाचे मंदीर फार प्राचीन आहे...सहामुखी पशुपतीनाथाची मुर्ती, मनुष्य रुपात (भगवान शंकर यांच्या रुपाने)येथे वास करते....काळ्या पाषाणातील मुर्ती बघता क्षणीच आपले पटकन लक्ष  वेधून घेते...
उर्ध्व आणि पाताळमुख आपल्याला दिसत नाही पण चार दिशेने चार असणारी शिवाची मुखकमलं बघून मन प्रसन्न होते...चारही मुखांचे दर्शन चार दरवाजातून घ्यावे लागते...या निमित्तानेच मंदीर प्रदक्षिणाही साधली जाते...
दर्शन झाल्यानंतर कृतकृत्य तेचे समाधान चेहर्‍यावर विलसत आपण बाहेर पडतो....
      
कुमारीमाता मंदिर. 
--------‌--------
   काठमांडूतच दरबार स्क्वेअर भागात कुमारी माता मंदीर आहे...मला वाटले आपल्या कन्याकुमारी सारखे  असेच काहीसे असेल..
पण नव्हे या दरबारात तिसऱ्या वर्षांपासून पासून ते बाराव्या वर्षांपर्यंत वय होईस्तोवर अक्षरशःएका जीवंत कुमारीका मुलीला बसवले जाते...दर बारा वर्षांनी म्हणजे ह्या मुलीस ऋतुप्राप्ती होण्याच्या वयापर्यंत देवाला वाहिलेलीच असते...त्यानंतर दुसर्‍या मुलीची निवड होते...ती विशिष्ट समाजाची आणि बरीच कठिण अग्निपरीक्षा घेवून तिची निवड होते...
     माझ्या मनात आले,तिला तिसऱ्या वर्षी तिचे स्वतंत्र मत असे काय असणार?पालकांच्या हातची कठपुतळी ती नंतर नऊ वर्षे देवीला वाहिलेली कठपुतळी बनून रहाते...
तेथे तिला सामाजिक मान सन्मान भरभरुन मिळतो, तिचे शिक्षण वगैरेची जबाबदारी तथाकथित मठाधिकारी घेतात पण तिचं बाल्य मात्र ती हरवून बसलीए,स्वातंत्र्य कुलुपात बंद आहे आणि सामान्य माणूस म्हणून जगण्याच्या तिच्या वाटाच बंद केल्या आहेत असे सारखे वाटत राहिले...
     तेथील गाईडने या विषयीच्या प्रथा परंपरा किती कर्मठ आहेत याचे विवेचन सांगितले...तेथील नागरीकही हा कर्मठपणा पाळणारे आहेत...प्रथा परंपरेत कोणी मोडता घालत नाहीत असे सांगत होता...पण हे सारेच अमानवीय आणि क्रुरपणाचे आहे असे मला सारखे वाटत राहिले...
या कुमारी मातेचे (मुलीचे)खिडकीतून घेतलेले दोन तीन सेकंदाचे मुखदर्शन अक्षरशः आपले काळीज चिरुन जाते....मनातून आपण या प्रथेचा निषेध करतच या दरबाराच्या बाहेर पडतो...

भैरवनाथाचा पुतळा. 
-----------------
    या मंदीर परिसरातच चौकामध्ये एक विशाल असा भैरवनाथाचा अक्राळविक्राळ स्वरुपाचा विशाल पुतळा दिसून आला....
      एखाद्या नागरिकाने गुन्हा केलेला असेल,पण  मी असा गुन्हा केलेलाच नाही असे ठामपणे जेंव्हा म्हणायचा तेंव्हा, त्याला या पुतळ्यासमोर बसवत असत, आणि खरे बोलण्यास भाग पाडत, असे सांगितले गेले...कारण येथे येऊन खोटे बोलल्यास त्याच दिवशी संबंधित गुन्हेगार गतप्राण होतो अशी प्राचीन काळापासून येथील लोकांची धारणा होती....
     नेपाळमधील राजसत्तेने पूर्विपासूनच जेष्ठ नागरीक आणि आर्थिक विपन्नावस्थेत असणारे नागरीक यांच्या धार्मिक भावनांचा आदर केलेला असावा हे लक्षात येते...कारण भक्तपूर दरबारात या लोकांच्या सोयीसाठी केदारनाथ, बद्रीनाथ, व्दारका या मंदिरांच्या वास्तुरचनेसारखीच वास्तू(मंदिरं)उभी केलेली दिसून येतात...
  
बुधानिलकंठ मंदीर. 
------------------
        एका तलावात शेषशायी विष्णूंची निद्रिस्त अवस्थेत विशालकाय मुर्ति आहे...तलावात तरंगत्या अवस्थेत ती दुरुनही पटकन दिसेल अशी आहे...मंदिर स्वरुपात कोणतेही बांधकाम येथे केलेले नाही....
     निलकंठ नावाच्या एका म्हातार्‍या (बुढा) व्यक्तीस ही मुर्ती तलाव खोदताना दिसून आली,आणि तिथेच त्याची प्रतिष्ठापनाही केली गेली...म्हणूनच हे "बुधानिलकंठ" विष्णूभगवान होत, अशी अख्यायिका ऐकण्यास मिळाली...
   
माउंट एव्हरेस्ट दर्शन.
------------------
        आमच्या नेपाळ सहलीचे आणखी एक उद्दिष्ट म्हणजे,हिमालयिन रेंजेेसमधील सर्वात उंच असणारा, 8848.8M
(29031.69FT) असणारे"सागरमाथा" हे शिखर बघणे....
     ट्रेक करत जाणे ही पूर्णपणे अशक्यप्राय बाब आहे, पण विमानातून का असेना मस्त सैर करत ह्या हिमालयिन रांगा प्रत्यक्ष बघून डोळ्यात साठवून घेऊ या, ही सुप्त ईच्छा प्रत्यक्षात अवतरली....हवामानानेही साथ दिली आणि आमची ही ईच्छा फळाला आली...
      360 अंशातून विमान वळवून पहिली रांग जेंव्हा दिसली तेंव्हा मनाला झालेला अत्यानंद आश्चर्यकारक पणे शब्दांतून व्यक्त झाला आणि मग मात्र एक एक शिखर मनावर भुरळ पाडत गेले आमच्या....
    " सागरमाथा " बघितले आणि सहलीचे चीज झाले आपल्या!अशी प्रचिती आली...
   खरोखरच हा अनुभव आणि आनंद व्यक्त करावयास शब्द अपुरे पडतील!डोळ्यांनी अनुभव पिऊन घेणंच सार्थ ठरेल यासाठी असे माझे मत आहे...
    काठमांडू दर्शनाने देवदर्शन आणि निसर्गदर्शन दोन्हीही साध्य झाले हे मात्र खरे....
    
   चितवन. 
----------
  मी मघाशीच म्हणाले तसे, नेपाळमधील धार्मिक ठिकाणं आणि निसर्ग दोन्ही एकमेकांच्या हातात हात घालून चालताना दिसतात....

मनोकामना देवी मंदीर.
-------------------
काठमांडूहून चितवनला जाताना आम्ही केबल कारने पंधरा-वीस मिनिटांचा प्रवास करत या देवीचे दर्शन घेतले...नावाप्रमाणेच मनातील ईच्छांची पुर्ति करणारी ही देवता आहे असा तेथील लोकांचा विश्वास आहे....
 या निमित्ताने आपल्याला नेपाळमधील पहाडी प्रदेशाचे विलोभनीय सौंदर्य न्याहाळता येते....
    ' चितवन नॅशनल पार्क' हे तेथील एक विस्तीर्ण असे घनदाट जंगल आहे...त्यातून जीपसफारी चांगली दोन अडीच तास केली आम्ही, विविध प्रकारचे पक्षी निरीक्षण झाले, मयुराचे सौंदर्य जवळून बघितले....हरणं, काळवीट, गेंडे, कोल्हा ह्या प्राण्यांचे दर्शन झाले पण पण, एकतरी वाघोबा बघावयास मिळाला असेल तर शपथ! अशा वेळी वाटतं माणूस वाघाला घाबरतो का वाघ माणसाला?
     चितवनच्या आमच्या हॉटेल मध्ये नेपाळमधील अनेक आदिवासी जमातींपैकी एक असणारी "थारु",जमातीच्या लोकांचा लोकनृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता...अतिशय लयबद्ध, तालबद्ध आणि थरारक असे हे नृत्य आपल्याला बघताना खिळवून ठेवते...
नाचणारी पाऊले, हातातील काठ्यांचा ताल आणि लयबध्दता तसेच नृत्याची गती यांचा या नृत्यात घातलेला ताळमेळ 
केवळ थक्क करणारा!
    
पोखरा 
--------
   पोखरा हे थोडे थंड हवेचे ठिकाण....एका गावातून दुसर्‍या गावी जाताना निसर्ग निरिक्षण करणं हे माझ्या आवडीचं...पहाडी प्रदेशातून जाताना तेथील पहाडांची वैशिष्ट्य, वनस्पती जंगल निरखत जाताना असं वाटतं आपण माणूस किती क्षुल्लक घटक आहोत या निसर्गाचा ! निसर्गाचा पर्यायाने पर्यावरणाचा ह्रास करणं हे काम फार पटकन जमतं माणसाला....तिथे त्याच्या बुध्दिची कीव कराविशी वाटते...असो...
     तर नेपाळच्या पहाडांमध्ये,जंगलांमध्ये मला कडीपत्त्याची कितीतरी झाडं अच्छादलेली दिसली...
त्याच बरोबर रुद्राक्ष या फळांच्या विपूल वनराईने 
हिरवंगार पांघरुण ल्यालेली ही पहाडं मला उत्तरांचल मधील पहाडांशी साधर्म्य सांगणारी जाणवली...
     माझ्या उत्तरांचल चारधाम प्रवास वर्णनातही अशा पहाडांचा उल्लेख आला आहे...
अशाच पहाडांमधून वाहणाऱ्या फेवा लेक,जो जॉर्ज नावाच्या नदीमूळे बनलेला आहे....येथून 
बोटिंग करत,आम्ही विंध्यवासिनी देवतेचे दर्शन घेतले...निसर्गाशी तादात्म्यता साधली...
       आणखी एका लेक मध्ये लाकडी नावेमधून सफर अरताना मी तर अगदी जीव मुठीत घेवून बसले होते...कारण मला पाण्याची प्रचंड भिती वाटते आणि ती नाव सारखी मला, मी लहानपणी कागदाची नाव बनवून पावसाच्या पाण्यात सोडत असायची ती आठवण करुन देत होती...अगदी तशीच पण ही लाकडाची होती...
         अन्नपूर्णा पर्वत रांगांमधून दिसणारे सौंदर्यपूर्ण सुर्योदयाचे क्षण अनुभवण्यास आम्ही भल्या पहाटेच गुलाबी थंडीत त्यांच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न केला पण,आभाळात तळ ठोकून बसलेल्या ढगांनी हा आमचा हेतू साध्य होऊ दिला नाही...

गुप्तेश्वर महादेव गुफा 
-------------------
    या प्रवासात आम्ही गुप्तेश्वर महादेव केव्हज् बघितल्या...खरोखर थक्क करणारा पॉईंट आहे हा! 
 देवी वॉटरफॉल नावाचा एक सुंदर धबधबा आहे बर्‍याच उंचावरुन फेसाळलेल्या पाण्याचा गाज घालणारा स्रोत आपण येथे बघतो...नंतर तो खाली कुठे जात असेल?याचा कोणताच अंदाज बांधता येत नाही...
आपण या धबधब्याच्या पाण्याच्या मार्याने बनलेल्या एका गुहेत प्रवेश करतो....तेथे मोठी महादेवाची पिंड आहे एवढी जमिनीच्या पोटात आहे की जणू पाताळात जात आहोत की काय असा भास होतो....या पिंडीवर शंकरांचे जटाधारी मुखदर्शन होते आणि आपण आणखी खाली जात रहतो तेंव्हा परत आपल्याला धबधब्याच्या पाण्याची गाज ऐकू येते आणि तो दिसावयास लागतो!मध्येच लुप्त झालेला धबधबा एवढ्या खालच्या लेव्हलला येऊन बघण्यातील थ्रील काही ओरच आहे....एक चांगला पॉईंट बघितल्याचे समाधान निश्चित मिळते...
        याशिवाय एलेफंट ब्रिडींग अँड ट्रेनिंग सेंटर तसेच इंटरनॅशनल माऊंटेरिनिंग म्यूझियम ही ठिकाणंही निश्चित भेट देण्याजोगी आणि नेमकी माहिती  समाधान निश्चित मिळते...
        एकूण आमची नेपाळसहल,थोडी धार्मिक, थोडी धाडसाची आणि निसर्गाच्या सान्निध्यात नेणारी अशी खूप समाधान देणारी आणि ठरली यात वादच नाही...
🌹🌹🌹🌹🌹

सोमवार, २२ जानेवारी, २०२४

॥जय श्रीराम॥

हारफुलांचा साज ल्याला 
झोकात डोलल्या तोरणे पताका ।

रंगावलीने भुमी भारली 
दिपोत्सवाने रंगत आली ।

श्रीरामांचा ध्वज फडकला 
राम आगमनाचा सोहळा सजला ।

श्रीराम जयराम जयजयराम 
जल्लोष अवघ्या मातृभुमीचा जाहला ।

चराचरात गर्जे रामनामाचा गजर 
हर्ष दाटला मनोमन ।

आज विराजमान आमचे राघव 
आयोध्येत त्यांचे भव्यदिव्य स्वागत ।

याची देही याची डोळा 
सोहळा आम्ही श्रीराम आगमनाचा पाहिला ।

कणाकणास श्रीरामांचा ध्यास लागला 
त्यांंच्या चरणी अवघा भक्तीभाव 
लीन जाहला।

©️ॲड.नंदिनी म. देशपांडे.
जाने.२२,२०२४.
🌹🌹🌹🌹🌹🌹

आयहोळे, पट्डकल आणि बदामी...

आयहोळे आणि पडट्कल तसेच बदामीही....
-------------------------

         हम्पी वरुन बदामीला जाण्यासाठी केवळ अडीच तास लागतात पण रस्त्यात आयहोळे आणि पडट्कल ह्या ठिकाणचे मंदिर समुह बघण्यात आपण एवढे रमून जातो की सुर्यास्त केंव्हा झाला हे समजतही नाही.....
      पण हम्पी पेक्षाही पुरातन मंदिरं आहेत ही...कदाचित इ.स.च्या पाचव्या सहाव्या शतकातील!
       त्या वेळचे हिंदू राजे हे कलेचे भोक्ते होते...कलाकारांना राजाश्रय मिळत असे...हे राजे, देशातील कानाकोपर्‍यातून वेगवेगळ्या प्रांतांच्या शिल्पकारांना आमंत्रित करत असत आणि आपली शिल्पकला सादर करण्यासाठी अशी छोटी मोठी मंदिरं बांधण्यास प्रोत्साहन देत असत....
        आयहोळे आणि पडट्कल येथील मंदिर समुह याच काळातील आहेत...
         काही दाक्षिणात्य शैलीत, काही उत्तरेकडील शैलीत बांधलेली तर काही दोन्ही शैलींची सरमिसळ करत बांधलेली....
जैन आणि बौध्द शैलीही डोकावते काही मंदिरांतून....
        प्राथमिक अवस्थेतील या शिल्पांच्या दोषांचे निर्मुलन करत मग सुधारित शिल्पकलेतून साकारली गेली आहेत ती हम्पी येथील मंदिर समुह!
      थोडक्यात शिल्पकारांची वार्षिक परिक्षा म्हणजे हम्पीतील मंदिरं असे म्हणावयास हरकत नाही....

        आयहोळे आणि पडट्कल येथील शिल्पांचे सौंदर्य सुध्दा गाईड शिवाय समजणे अशक्यच....गाईड फार गरजेचा आहेच...

      आयहोळेतील सारीच मंदिरे छानच आहेत, बरीच भग्न होण्याच्या स्थितीत आहेत...

     सर्वांत सुंदर मंदिर म्हणजे "दुर्गा मंदिर".... या मंदिराची जडण घडण बघून आपल्याला जुन्या संसदभवनाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही..
 किंबहूना संसदभवन
या मंदिराशी साम्य सांगते....
   अतिशय वैशिष्ट्यपूर्ण रचनेतून साकारलेले हे मंदिर सुंदर, नीटनेटके आकर्षक तर आहेच पण या मंदिराचा मागचा भाग हा ऊभ्या असणाऱ्या हत्तीच्या मागच्या पाठीच्या आकारात आहे...वरकरणी हे मंदिर महादेवाच्यापिंडीच्या आकाराचे आहे....
       असंख्य खांबांवर पेललेली ही वास्तू फारच मोहक आहे....
मल्लप्रभा नदीच्या किनाऱ्यावर असणारी ही सारी मंदिरं प्राचीन वास्तुशास्त्राचा अप्रतिम ठेवा आहे...

         सामान्यपणे सुर्यमंदिरात कधीच मुर्ति दिसत नाही...पण येथे भारतातील सुर्याची मुर्ती असणारे एकमेव मंदिर असल्याचा दावा केला जातो...

         यांपैकी काही मंदिरात मुर्ति नाहीत....काही मंदिरं अर्धवट अवस्थेत बनवलेली आहेत अर्थात मी पूर्विच उल्लेख केलाय की हा शिल्पकरांचा प्रायोगिक प्रयत्न आहे....पण काही फारच अप्रतिम आहेत!
        मंदिराच्या खांबांवर, छतावर, भिंतीवर, चौकटींवर आणि बाहेरील भिंतीवर सुध्दा फार सुंदर कोरीव काम केलेले आहे....
       त्या काळी राजांची संपन्नता त्यांच्या राज्यात असणारी मंदिरं आणि शिल्पकला बघून ठरवली जात असायची असे म्हणतात...अशी शिल्प म्हणजे त्या विशिष्ट राज्याची संपत्ती आणि वैभवाची साक्ष असायची...
        गजलक्ष्मी, उजेडासाठी खिडकीवजा झरोके, बारीक कोरीव नक्षीकाम जे आजही आपण आपल्या दागिन्यांवर घडवून घेतो,अशी एक ना अनेक कितीतरी शिल्पांचा उल्लेख करता येईल....
     काहींचे फोटो मी लेखासोबत पोस्ट करत आहे....
     
          याच मार्गावरुन बदामीकडे कूच करताना आम्ही जांबुवंत गुहा, शबरीची गुहा आणि श्रीरामांचे पाय तिच्या गुहेला लागली त्या पाऊलखूणा! 
हे सारे किष्किंधा नगरीत बघताना खरोखरच कृतकृत्य झाल्याचे समाधान मिळते...रामायणातील ते ते प्रसंग डोळ्यासमोर उभे रहातात....

             सगळीकडे मोठमोठ्या शिळा आणि दगडांच्या साम्राज्यातून सैर करताना आणि तेथील तीव्र उन्हाची काहीली सोसताना त्रास होऊ नये यासाठी ठिकठिकाणी हिरवळ, मोठे वृक्ष, छोटी छोटी झुडपं आणि फुलांचे ताटवे निर्माण केलेले दिसून येतात....मनाला आल्हाददायक असणाऱ्या या गोष्टी जाणीवपूर्वक उत्तम रितीने जोपासल्या गेल्या आहेत याचे खरंच खूप कौतुक वाटलेच...शिवाय संपूर्ण परिसर अगदी स्वच्छ, योग्य तेथे नावाचे, माहितीचे बोर्ड आणि भग्न सुट्या अवशेषांचे म्युझियम बनवून ते प्रदर्शित करणं ह्या सर्व बाबी तेथील शासनाची आणि नागरीकांची पुरातन शिल्पसौंदर्याची असणारी आवड जाणवून देते....हा ऐतिहासिक ठेवा जापावयास मदतच करते...

            सायंकाळपर्यंत आम्ही आयहोळे, पट्डकल करत बदामीला पोहोंचलो...
     बदामीलाही संपूर्ण पहाडी प्रदेशातून शिल्पकलेतून साकारलेली अप्रतिम मंदीरसमुह आहे....विशाल पुष्करणीच्या भोवती ही छोटी छोटी मंदिरं दिमाखात उभी राहून तेथील निसर्ग सौंदर्यात भरच घालतात...
 पण जवळच वानरसेनेची किष्किंधा नगरी असल्यामूळे म्हणा किंवा पहाडी प्रदेशामूळे येथे काळंया तोंडाची वानरसेना आणि मर्कटसेना विपुल प्रमाणात आहे आणि त्यांचा मुक्त संचार आपल्याला काहीशी धडकी भरवतो...असो...

      दुसरे दिवशी सकाळीच नाश्ता करुन आम्ही प्रथम बदामी येथील प्रसिद्ध असणाऱ्या शाकंभरी देवीच्या मंदिरात दर्शनासाठी गेलो...नेमकीच आरती पुजा झालेली देवीची सालंकृत प्रसन्न मुर्ती आपल्या महाराष्ट्रातील तुळजाभवानीशी साधर्म्य सांगणारी वाटली...
मात्र तुळजाभवानी शांत संयमी रुपात दर्शन देते तर आई शाकंभरी थोडी उग्र रुपात ऊभी आहे असे वाटले...देवीचंच रुप ते कोणत्या स्वरुपाचा भास होईल सांगता येत नाही. 
पण दर्शनाने मन प्रसन्न झाले...मांगल्ययुक्त वातावरणात दिवसाची सुरुवात मनाला फार भावली...

       बदामीचं महत्वाचं आकर्षण म्हणजे तिथल्या पहाडांमध्ये कोरलेल्या भव्य लेण्या !
थोडा ट्रेक करण्याशिवाय पर्याय नाही...सोबतीला मर्कट सेनाही असतेच...स्त्रीयांनी चुकूनही केसांमध्ये गजरा किंवा फुल लावू नये हे चढताना....खाण्याची कुठलीही वस्तू दिसेल अशी ठेवू नये कारण ही माकडं आपल्या केसात माळलेली फुले आपल्या खांद्यावर बसून अगदी क्लचर काढून घेवून जातात...मला असा अनुभव आलाय!....आपली नुसती घाबरगुंडी उडते मात्र...
एका स्री ची हातातील पर्स हिसकावून घेतली एका  माकडाने,  ती पण अशीच घाबरलेली....तरी तेथे हातात लांबलांब काठ्या घेवून सेक्यूरिटी पर्यटकांची काळजी घेताना दिसतात...

         बदामीच्या या भव्य लेण्यांपैकी एक लेणी विष्णू देवतेस, एक शंकराला, एक विष्णू आणि शिव या दोहोंना समर्पित आहेत तर एक लेणी गौतम बुध्दांना आणि एक भगवान महावीर यांना समर्पित आहेत...
      विष्णू लेणीत विष्णूंच्या दशअवतारांपैकी कही अवतार कोरलेले आहेत...शिवाच्या लेणीत शंकराची रुपं तर काही हरिहराची 
म्हणजे शरीराचा अर्धा भाग विष्णूंचा आणि अर्धा शिवाचा अशा आहेत...
छतावर, खांबांवर महाभारतातील प्रसंग आहेत...
बुध्द लेणीत गौतम बुध्दांची तर जैन लेणीत भगवान महावीर यांची विशाल शिल्प आहेत...
सारीच शिल्प आपण स्तिमित होऊनच बघत रहातो आणि त्या शिल्पकारांना मनोमन शतदा नमन करतो, ज्यांच्यामूळे आपण आज हे वैभव बघू शकतो...
     आम्ही गेलो तेंव्हा मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट  या महाविद्यालयातील ऐंशी विद्यार्थ्यांची अभ्याससहल आली होती आणि हे सर्व विद्यार्थी या शिल्पांचे स्केचेस काढण्यात मग्न होती....दरवर्षीच अशी सहल येते असे समजले...
        येथेही गाईड गरजेचा पण आम्हाला त्या दिवशी मिळू शकला नाही...कारण त्या वेळी सर्व गाईड लोकांची सात दिवसांसाठी प्रशिक्षण शिबीर चालू होते...
   
         पण ही भव्य शिल्पे बघून आपल्याला दिव्यत्वाची प्रचिती येते आणि आपली हम्पी बदामीची सहल सुफळसंपन्न झाल्याचे समाधान आपल्याला भरभरुन मिळते हे अगदी खरंए...
      प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी बघावा आणि आपल्या पुढच्या पिढीला आवर्जुन दाखवावा असाच हा प्राचीन ऐतिहासिक ठेवा आहे....

©️ॲड.नंदिनी म. देशपांडे. 

🌹🌹🌹🌹🌹

आयहोळे आणि पडट्कल येथील मंदिर समुह....

शनिवार, ६ जानेवारी, २०२४

हम्पी, २.

*हम्पी*
__________

       दगडधोंड्यांच्या राज्यात तापलेल्या पाषातून पुरातन इतिहासाच्या खूणा बघताना, तोंडात बोट घालण्याची पाळी आपली येते,जेंव्हा आपण हम्पी येथे मोठ्या नव्हे अतिप्रचंड पाषाणातून, आणि किंबहूणा पहाडी पाषाणातून भव्य दिव्य अशा धार्मिक मुर्ति बघतो ना त्यावेळी...

        एक ना अनेक अशी कितीतरी शिल्प आहेत जे बघताना आपली नजरही कमी पडेल....घडवलेली मुर्ती बघताना खरंच वर्णनास शब्दच सुचत नाहीत पण त्या अनामी शिल्पकारास लोटांगण घालावेसे वाटते....
      त्यांपैकी काही शिल्पाविषयी आज सांगते...

          *चनागणपती*
________________________

       हे गणपतीबाप्पाचे भले मोठे शिल्प, "महागणपती" ,या नावानेही ओळखले जाते...एका अखंड विशालकाय पाषाणात विजय नगरच्या साम्राज्यात शिल्पकाराने बनवलेली ही मुर्ती....
      जमीनीच्या पोटात प्रचंड उलथापालथ होवून पृष्ठभागावर आलेल्या या पाषाणातून एक एक  मुर्ति आकाराला आलेली आहे...
          शिल्पकला किती प्रगत होती त्या ही काळात याचेच हे द्योतक आहे...कलाकारांना, शिल्पकारांना राजाश्रय होता आणि शिल्पकलेतून प्रत्येक राजाने आपापल्या काळाचा ठसा उमटवून ठेवला आहे असे निश्चित सांगतायेते....असो...

    तर ह्या महागणपतीचे पोटाचा आकार "चन्या" (हरभर्या सारखा) आहे म्हणून यास "चनागणपती" असेही संबोधले जाते...

*उग्रनृसिंह*
_______________________

       मुर्तिरुपात नृसिंह आपण बहूतेक उग्र रुपातच बघितला आहे...याला अपवाद मला आपल्या वाईच्या जवळ असणाऱ्या नृसिंह मुर्तित सापडला...वाईजवळ एकाच पाषाणी चौथऱ्यावर एका बाजूने नृसिंहाची उग्र मुर्ति आहे आणि त्याच्या पाठीच एक मुर्ति शांत स्वरुपात आहे...मला खूप आवडलेल्या मुर्तिंपैकी या कायम मनात घर करुन राहिलेल्या मुर्ति! असो...  
      तर हम्पीमधील नृसिंहाची ही विशाल मुर्ति सुध्दा एकाच भव्य पाषाणात अतिशय उग्र स्वरुपात शतकानुशतके विराजमान आहे... पण,शेजारीच लक्ष्मीचीही मुर्ति होतीच असे ठामपणे सांगता येते....कारण आदिलशाहीच्या माथेफिरु लोकांनी यातील लक्ष्मीची मुर्ति फोडलेली दिसून येते...पण तिचा सालंकृत हात आजही मुर्तित स्पष्ट दिसतो....म्हणूनच हिला "लक्ष्मीनृसिंह"असेही म्हणता येईल....
     
         *बडवीलिंग*
________________________

याच परिसरात आणखी डोळे विस्फारत बघावी अशी विशाल अशी महादेवाची पषाणाची पिंड आहे....विशेष म्हणजे ही वर्षानुवर्षे पाण्यात ऊभी आहे....समोरच नंदीही आहे... आजही त्या पिंडीभोवती पाणी असून ते कधीच आटलेले नाही....असे सांगितले जाते...तेथे पाण्याचा नैसर्गिक स्रोत असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येतो...मी पण या मताला पुष्टीच देईन, कारण आम्ही बघत होतो तो सगळा पाषाणी पठाराचा भाग होता...तेथून काही कि.मी. अंतरावर खाली उतरले की, दगडधोंड्याच्या साथीने, त्यांना कवेत सामावत, तुंगभद्रा नदी खळाळून वाहताना दिसते....
     तिचे स्वच्छ, सुंदर खळाळते रुप दगडगोट्यांच्या संगतीने फारच मोहक दिसते...पाण्याचा प्रवाह त्यामूळे अजिबात भितीदायक वाटत नाही...
या पात्रात वेताच्या मोठ्ठया टोपलीवजा तराफ्यात बसुन जलविहार करताना मजा आली...
       नदीतून विहार करतानाही दगडांच्या कितीतरी कपारी दिसतात....त्यातही वेगवेगळ्या देवतांची शिल्पे कोरलेली आहेत...ती लांबून बघितल्याने स्पष्ट दिसत नाहीत...पण त्या भगवान परशुराम, पांडव वगैरे आहेत...कांही कपारी पाण्याच्या मार्याने बनल्या असाव्यात असे जाणवते...

      एकूणच या मुर्ती भग्न पावलेल्या असल्याने त्यांची पुजा होत नाही...
      अशा भल्या मोठ्या मुर्ती,आणि त्यातही त्यांचं देवपण लोप पावलेले बघून सुरुवातीला अंगावर शहारे येतात...भितीही वाटते...पण त्यांच्या निर्मितीमागे कितीतरी श्रम,मेहनत आणि जिद्द पणाला लागलेली आहे हे बघून त्या आपल्याला शिल्पकाराच्या कलेसमोर नतमस्तक होण्यास भाग पाडतात...त्या वेळच्या या हिंदू राजांच्या कलासक्त स्वभावधर्माला प्रणाम करावयास लावतात हे निश्चित....

©️ॲड.नंदिनी मधुकर देशपांडे.
छ. संभाजीनगर. 

🌹🌹🌹🌹🌹

बुधवार, ३ जानेवारी, २०२४

हम्पी....

कर्नाटकातील हम्पी आणि बदामी ही सहल करावी असे सारखे वाटत होते...ऐतिहासिक ऐवज असणारी ही सोनेरी खाण डोळेभरुन बघावी आणि त्या सुवर्ण काळाच्या साक्षीदारांशी हितगुज साधावे आपण,असे फार मनापासून वाटत होतेच...
     पण, तेथील तो ट्रेक, त्या दोन दोन दोन तीन तीन फूट असणाऱ्या पायऱ्या चढणे आपल्याला कितपत झेपेल?ही शंकाही अंतर्मनात घोंघावत होती...शेवटी मनातील प्रखर ईच्छाशक्तीचाच विजय झाला आणि तेथील सहली साठी अनुकूल कालावधी बघून आम्ही हम्पी ,बदामी या सुप्रसिद्ध ऐतिहासिक स्थळांना भेट दिली...

      *हम्पी*
***************
अगदी प्राचीन काळापासून म्हणजे इ.स. च्या सहाव्या शतकापासून भारतीय संस्कृती परंपरा, शासन पध्दती किती तरी पुढारलेली,आपला स्वतःचा एक वेगळाच बाझ जपणारी होती...तसेच शासन आदर्शत्वाच्या मार्गाने चालणारी शासन व्यवस्था होती याची साक्ष देणारी विशालकाय मंदिरं, त्यांवरील कोरलेली असंख्य शिल्प आणि पावलोपावली मिळणाऱ्या प्राचीन इतिहासाचं आगार भांडार असेच वर्णन करावे असे हे हम्पी शहर...

लाखो वर्षांपूर्वि भूगर्भातील प्रचंड मोठ्या हालचालींमुळे, बहूतेक ज्वालामुखीच्या उद्रेकामूळे पाण्याखाली असणारा जमिनीचा भाग अगदी कोरडा ठक्क होवून तेथे जमीनीच्या पोटातून आलेल्या प्रचंड मोठ्या खडकांचा, दगडांचा, पाहाडांचा उष्ण प्रदेश म्हणजे हम्पी असा अंदाज व्यक्त केला जातो...

        दक्षिणेकडील म्हणजेच कर्नाटकातील  शेवटचा हिंदू राजाच्या कार्यकाळात विजयनगरच्या साम्राज्याचा सुवर्णकाळ दर्शवणारे कितीतरी पुरावे आजही येथे अस्तित्वात आहेत...
     कित्तेक देवालंयं जी मुर्तिविना मुक रुदन करत आहेत असा भास होतो...कित्तेक किल्ले, बाजारपेठा, ईमारती, राजवाडे, जलकुंभ, भग्न मुर्तींचे असंंख्य अवशेष या साऱ्या खुणांचे शहर हे हम्पी शहर...आजचे खेडे पण त्या काळचे विजयनगर साम्राज्याच्या राजधानीचे शहर, अर्थात पूर्विचे " विजयनगर ".
   
        म्हणावे तर भग्न अवशेषांचे शहर, म्हणावे तर, दगडांच्या खाणीचे शहर म्हणावे तर सुवर्णकाळ कथन करणारे शहर आणि मानले तर प्रत्यक्ष रामायणातील राम-रावण युध्दाची कल्पना जेथे प्रत्यक्षात  मांडली गेली ,आणि त्या दृष्टिने जेथून पावले उचलली गेली तीच ही किश्किंधा नगरी! आपल्या बाहूत रामायणातील कितीतरी प्रसंगांचा थेट पुरावा देते आपल्याला!..
हम्पी देवालयांपैकी सुप्रसिद्ध असणारे "विरुपाक्ष मंदिर"...
या परिसरात केवळ हे एकच मंदिर असे आहे की, जेथे मंदिरातील मुर्तीची, विरुपाक्ष, महादेवाच्या पिंडीची आजतागायत पुजा केली जाते...कारण केेवळ ही एकच मुर्ती आदिलशाही निजाम
शाहीच्या वक्रनजरेतून सुटली आणि अभंग राहिली....
इतर अनेक मुर्ती खूप सुंदर, रेखीव प्रचंड मोठ्या आहेत...काही एकाच दगडात अखंड कोरलेल्या आहेत...शिल्पकलेचा उत्तुंग अविष्कार असणारी ही शिल्प कुठे ना कुठे भग्न आहेत तर काही मंदिरांच्या गाभाऱ्यात देवच  नाही....भंग पावलेल्या मुर्तिंची पुजा करणे निशिध्द मानले जाते, म्हणून तेथे पुजा होत नाही...आणि आज ती सुवर्णकाळ दाखवणारी ऐतिहासिक साधनं बनली आहेत...
     एक एक मुर्ति घडवण्यासाठी कितीतरी शिल्पकारांनी आपले अख्खे आयुष्य खर्च केलेले असेल याची प्रचिती आपल्याला प्रत्यक्ष बघताना नक्कीच येते...
हा वैभवशाली इतिहास जगासमोर आणणं फार महत्वाचं आहे...आपल्या भारताचं हे भुषण युनेस्के जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलंय ते अगदीच योग्य आहे...

   इतिहासाचा एवढा महत्वपूर्ण ठेवा प्रत्येक भारतीयाने आवर्जुन डोळेभरुन बघावा असाच आहे... 
आपल्या पुढच्या पिढ्यांना हा ऐतिहासिक ठेवा आवर्जुन दाखवावा आणि शक्य तेवढा जतन करावा असाच आहे...

            वर उल्लेख केल्या प्रमाणे हम्पी येथील मंदिर समुच्चयात केवळ विरुपाक्ष मंदिरात प्राचीन काळापासून ते आजतागायत मुर्ति ची पुजा केली जाते...
      महादेवाची स्वयंभू पिंड असणाऱ्या या देवालयात मुर्तिपुजेचं मांगल्य आणि पावित्र्य संपूर्ण परिसर व्यापून टाकतं आणि पाऊल टाकताच मनाला प्रसन्न वाटतं...
        या विशाल मंदिराच्या कळसाला गवसणी घालताना तब्बल नऊ मजले पार करावे लागतात...आतल्या आत वरपर्यंत पोहोंचावयास जिन्याची व्यवस्थित बांधणी केलेली आहे, पण सुरक्षेच्या कारणास्तव हल्ली हा मार्ग पर्यटकांसाठी बंद केलाय...नऊ माळ्यांच्या गोपुराची रचना अगदी वरच्या टोकावर बघाल तर, लांंबूून गायीच्या दोन कानांसारखी वाटते...वास्तविक हे दोन्ही टोकाचे (कानांमधील) अंतर बरेच जास्त आहे पण शिल्पकाराचे कसब पणाला लावून यातील एक एक शिल्प घडवलेले दिसते...
       येथील आणखीन  एक वैशिष्ट्य म्हणजे,महादेवाचे वाहन नंदी आपण प्रत्येक मंदिरात बघतो पण या मंदिरात मात्र मुळ नंदी तीन तोंडाचा बघावयास मिळतो...तो भग्न पावलाय म्हणून ओळीने तीन नंदी याला पर्याय म्हणून बनवले गेले आहेत...

        त्याही काळात शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून मंदिराची बांधणी केलेली दिसून येते त्याचा पुरावा म्हणजे जेंव्हा आपण या मंदिरात एका बारीकसारीक छिद्रातून या ठिकाणी सूर्योदयापासून ते सुर्यास्ता पर्यंत गोपुराची थ्रीडी इफेक्ट बघाायास मिळणारी सावली बघतो आणि थक्क होऊन जातो...
       मंदिर परिसरात गजलक्ष्मी हत्तीणीचे दर्शन घेताना समाधान मिळते...
      मुख्य मंदिरातील उत्सव मुर्तिचा फोटो घेण्यास मनाई आहे त्या मूळे ती सोडूण काही फोटो शेअर करत आहे...
        हम्पी राजधानीचे ठिकाण असल्याने मोठ्ठी बाजारपेठ येथेच होती...मंदिराच्या दोन्ही बाजूस लांबच लांब असे अधुनिक शटर्स सारखे दगडीशिळांचे शॉपिंग कॉम्प्लेक्स तेही दोन मजली बघून आचंबित होण्याची पळी आपली असते...
       व्यापारासाठी वेगवेगळ्या प्रदेशातून येणारे व्यापारी महिनोन महिने मुक्कामास यायचे, त्यांच्या खाण्यापिण्याच्या, निवासाची आणि पाणवठ्याची व्यवस्था अगदी चोख होती हे आजही या खुणा बघून खात्रीच पटते आपली...
      
   पण,प्रत्यक्षात भेट देवून बघण्याजोगे हे ठिकाण एकदा आवर्जुन बघावे असेच...
 आज एवढेच पुरे...
बाकी मंदिरांविषयी  यथावकाश लिहिनच...

©️ॲड.नंदिनी म.देशपांडे.
छ.संभाजीनगर.

हम्पी....

कर्नाटकातील हम्पी आणि बदामी ही सहल करावी असे सारखे वाटत होते...ऐतिहासिक ऐवज असणारी ही सोनेरी खाण डोळेभरुन बघावी आणि त्या सुवर्ण काळाच्या साक्षीदारांशी हितगुज साधावे आपण,असे फार मनापासून वाटत होतेच...
     पण, तेथील तो ट्रेक, त्या दोन दोन दोन तीन तीन फूट असणाऱ्या पायऱ्या चढणे आपल्याला कितपत झेपेल?ही शंकाही अंतर्मनात घोंघावत होती...शेवटी मनातील प्रखर ईच्छाशक्तीचाच विजय झाला आणि तेथील सहली साठी अनुकूल कालावधी बघून आम्ही हम्पी ,बदामी या सुप्रसिद्ध ऐतिहासिक स्थळांना भेट दिली...

      *हम्पी*
***************
अगदी प्राचीन काळापासून म्हणजे इ.स. च्या सहाव्या शतकापासून भारतीय संस्कृती परंपरा, शासन पध्दती किती तरी पुढारलेली,आपला स्वतःचा एक वेगळाच बाझ जपणारी होती...तसेच शासन आदर्शत्वाच्या मार्गाने चालणारी शासन व्यवस्था होती याची साक्ष देणारी विशालकाय मंदिरं, त्यांवरील कोरलेली असंख्य शिल्प आणि पावलोपावली मिळणाऱ्या प्राचीन इतिहासाचं आगार भांडार असेच वर्णन करावे असे हे हम्पी शहर...

लाखो वर्षांपूर्वि भूगर्भातील प्रचंड मोठ्या हालचालींमुळे, बहूतेक ज्वालामुखीच्या उद्रेकामूळे पाण्याखाली असणारा जमिनीचा भाग अगदी कोरडा ठक्क होवून तेथे जमीनीच्या पोटातून आलेल्या प्रचंड मोठ्या खडकांचा, दगडांचा, पाहाडांचा उष्ण प्रदेश म्हणजे हम्पी असा अंदाज व्यक्त केला जातो...

        दक्षिणेकडील म्हणजेच कर्नाटकातील  शेवटचा हिंदू राजाच्या कार्यकाळात विजयनगरच्या साम्राज्याचा सुवर्णकाळ दर्शवणारे कितीतरी पुरावे आजही येथे अस्तित्वात आहेत...
     कित्तेक देवालंयं जी मुर्तिविना मुक रुदन करत आहेत असा भास होतो...कित्तेक किल्ले, बाजारपेठा, ईमारती, राजवाडे, जलकुंभ, भग्न मुर्तींचे असंंख्य अवशेष या साऱ्या खुणांचे शहर हे हम्पी शहर...आजचे खेडे पण त्या काळचे विजयनगर साम्राज्याच्या राजधानीचे शहर, अर्थात पूर्विचे " विजयनगर ".
   
        म्हणावे तर भग्न अवशेषांचे शहर, म्हणावे तर, दगडांच्या खाणीचे शहर म्हणावे तर सुवर्णकाळ कथन करणारे शहर आणि मानले तर प्रत्यक्ष रामायणातील राम-रावण युध्दाची कल्पना जेथे प्रत्यक्षात  मांडली गेली ,आणि त्या दृष्टिने जेथून पावले उचलली गेली तीच ही किश्किंधा नगरी! आपल्या बाहूत रामायणातील कितीतरी प्रसंगांचा थेट पुरावा देते आपल्याला!..
हम्पी देवालयांपैकी सुप्रसिद्ध असणारे "विरुपाक्ष मंदिर"...
या परिसरात केवळ हे एकच मंदिर असे आहे की, जेथे मंदिरातील मुर्तीची, विरुपाक्ष, महादेवाच्या पिंडीची आजतागायत पुजा केली जाते...कारण केेवळ ही एकच मुर्ती आदिलशाही निजाम
शाहीच्या वक्रनजरेतून सुटली आणि अभंग राहिली....
इतर अनेक मुर्ती खूप सुंदर, रेखीव प्रचंड मोठ्या आहेत...काही एकाच दगडात अखंड कोरलेल्या आहेत...शिल्पकलेचा उत्तुंग अविष्कार असणारी ही शिल्प कुठे ना कुठे भग्न आहेत तर काही मंदिरांच्या गाभाऱ्यात देवच  नाही....भंग पावलेल्या मुर्तिंची पुजा करणे निशिध्द मानले जाते, म्हणून तेथे पुजा होत नाही...आणि आज ती सुवर्णकाळ दाखवणारी ऐतिहासिक साधनं बनली आहेत...
     एक एक मुर्ति घडवण्यासाठी कितीतरी शिल्पकारांनी आपले अख्खे आयुष्य खर्च केलेले असेल याची प्रचिती आपल्याला प्रत्यक्ष बघताना नक्कीच येते...
हा वैभवशाली इतिहास जगासमोर आणणं फार महत्वाचं आहे...आपल्या भारताचं हे भुषण युनेस्के जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलंय ते अगदीच योग्य आहे...

   इतिहासाचा एवढा महत्वपूर्ण ठेवा प्रत्येक भारतीयाने आवर्जुन डोळेभरुन बघावा असाच आहे... 
आपल्या पुढच्या पिढ्यांना हा ऐतिहासिक ठेवा आवर्जुन दाखवावा आणि शक्य तेवढा जतन करावा असाच आहे...

            वर उल्लेख केल्या प्रमाणे हम्पी येथील मंदिर समुच्चयात केवळ विरुपाक्ष मंदिरात प्राचीन काळापासून ते आजतागायत मुर्ति ची पुजा केली जाते...
      महादेवाची स्वयंभू पिंड असणाऱ्या या देवालयात मुर्तिपुजेचं मांगल्य आणि पावित्र्य संपूर्ण परिसर व्यापून टाकतं आणि पाऊल टाकताच मनाला प्रसन्न वाटतं...
        या विशाल मंदिराच्या कळसाला गवसणी घालताना तब्बल नऊ मजले पार करावे लागतात...आतल्या आत वरपर्यंत पोहोंचावयास जिन्याची व्यवस्थित बांधणी केलेली आहे, पण सुरक्षेच्या कारणास्तव हल्ली हा मार्ग पर्यटकांसाठी बंद केलाय...नऊ माळ्यांच्या गोपुराची रचना अगदी वरच्या टोकावर बघाल तर, लांंबूून गायीच्या दोन कानांसारखी वाटते...वास्तविक हे दोन्ही टोकाचे (कानांमधील) अंतर बरेच जास्त आहे पण शिल्पकाराचे कसब पणाला लावून यातील एक एक शिल्प घडवलेले दिसते...
       येथील आणखीन  एक वैशिष्ट्य म्हणजे,महादेवाचे वाहन नंदी आपण प्रत्येक मंदिरात बघतो पण या मंदिरात मात्र मुळ नंदी तीन तोंडाचा बघावयास मिळतो...तो भग्न पावलाय म्हणून ओळीने तीन नंदी याला पर्याय म्हणून बनवले गेले आहेत...

        त्याही काळात शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून मंदिराची बांधणी केलेली दिसून येते त्याचा पुरावा म्हणजे जेंव्हा आपण या मंदिरात एका बारीकसारीक छिद्रातून या ठिकाणी सूर्योदयापासून ते सुर्यास्ता पर्यंत गोपुराची थ्रीडी इफेक्ट बघाायास मिळणारी सावली बघतो आणि थक्क होऊन जातो...
       मंदिर परिसरात गजलक्ष्मी हत्तीणीचे दर्शन घेताना समाधान मिळते...
      मुख्य मंदिरातील उत्सव मुर्तिचा फोटो घेण्यास मनाई आहे त्या मूळे ती सोडूण काही फोटो शेअर करत आहे...
        हम्पी राजधानीचे ठिकाण असल्याने मोठ्ठी बाजारपेठ येथेच होती...मंदिराच्या दोन्ही बाजूस लांबच लांब असे अधुनिक शटर्स सारखे दगडीशिळांचे शॉपिंग कॉम्प्लेक्स तेही दोन मजली बघून आचंबित होण्याची पळी आपली असते...
       व्यापारासाठी वेगवेगळ्या प्रदेशातून येणारे व्यापारी महिनोन महिने मुक्कामास यायचे, त्यांच्या खाण्यापिण्याच्या, निवासाची आणि पाणवठ्याची व्यवस्था अगदी चोख होती हे आजही या खुणा बघून खात्रीच पटते आपली...
      
   पण,प्रत्यक्षात भेट देवून बघण्याजोगे हे ठिकाण एकदा आवर्जुन बघावे असेच...
 आज एवढेच पुरे...
बाकी मंदिरांविषयी  यथावकाश लिहिनच...

©️ॲड.नंदिनी म.देशपांडे.
छ.संभाजीनगर.