रविवार, ३ नोव्हेंबर, २०१९

स्टॅच्यू ऑफ युनिटी.

*स्टॅच्यू ऑफ युनिटी*

    गुजरात राज्याची पर्यटनासाठी ट्रीप आखताना, नर्मदा नदीतीरी असणारे केवडिया येथील,सरदार सरोवर, "स्टॅच्यू अॉफ युनिटी" हे एक मुख्य आकर्षण होतेच.... 

    फार मोठे क्षेत्रफळ असणाऱ्या भुमीच्या एका तुकड्यावर भारताचे पोलादी पुरुष, सरदार वल्लभाई पटेल या *लोह* पुरुषाचा भव्य दिव्य पुतळा....

     जगातला सर्वांत उंच पुतळा अशी ज्याची  ख्याती आहे...आरवली पर्वत राजींच्या कुशीतून उंच उंच होत,या पर्वतांची उंची गाठणारा हा सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा,त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या अतिशय समिप घेऊन जाणारा असाचआहे.... सरदारांना आपण प्रत्यक्षपणे बघत असल्याचा भास निर्माण करणारा असा अप्रतीम पध्दतीनं,कलाकुसरीनं बनवलेला आहे....
अगदी चेहऱ्यावरची रेष न रेष बोलकी आहे, ईतपत जाणीव निर्माण करणारा हा पुतळा.भारताच्या एकतेचे प्रतिक बनून प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावणारा असाच आहे...

     रम्य निसर्गाच्या सान्निध्यात,नर्मदेच्या पात्रात तयार करण्यात आलेल्या सरोवर किंवा धरणाच्या काठावर तसेच नर्मदेच्या विशाल पात्रा लगत उभा आहे...जणू कांही अगदी उंच उंच मान करत सरदार पटेल हे पोलादी व्यक्तिमत्व,आपल्या भारत भुमीवर बांधलेल्या बुलंद गढीवर उभे ठाकून आपल्या मातीचा कण ना कण एकत्रित जोडलेला आहे ना?याची टेहाळणी करत आहेत...अशी जाणीव निर्माण करणारा असाच....
खरंच अतिशय प्रेरणादायी आणि प्रत्येक भारतीयाचा स्वाभिमान व्दिगुणित करणारं असं हे ठिकाण आहे... एकदाच नव्हे तर पुनःपुन्हा भेट द्यावं असंच....
हा पुतळा बनवताना वापरलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कसा उपयोग केला गेलाय, ते तेथे गेल्यानंतर समजेलच...
   
   पण आपल्या देशाची एकात्मकता टिकवून ठेवण्या साठीचे आणि एकूणच त्यांचे भारतीय भुमीच्या स्वातंत्र्यासाठी चे भरीव योगदान,त्यांचे प्रेरणात्मक कार्य आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय,या पुतळ्याच्या माध्यमातून करवून देण्याचा केलेला प्रयत्न अतिशय स्तुत्य आहे....
   
     भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा ईतिहासाचे स्मरण करत पुढच्या पिढ्यांपर्यंत ते कायम पाझरत ठेवण्याचं काम अशा पध्दतीनं केलं जाणं खरोखरच एक आदर्श पायंडा आहे...
वरकरणी आपण केवळ
पुतळा बघण्यासाठीच आलो आहोत येथे. असे वाटत असले तरीही तेथे गेल्यानंतर अख्खा दिवस त्या परिसरात घालवल्या नंतर, आपला दिवस सार्थकी लागला आहे व आपण कृतकृत्य झाल्याचे पुरेपूर समाधान मिळते....

    पुतळ्याच्या आतून लिफ्ट ने आपण नऊ माळे वरती जातो, त्यावेळी तेथून दिसणारा नजारा काय वर्णावा! एवढ्या उंचावरुन म्हणजे पुतळ्याच्या आतून त्यांच्या हृदयाच्या लेव्हल ला आपण पोहोचतो आणि तेथून दिसणारा नर्मदा नदीवरील भव्य असे धरण,आरवली पर्वतांच्या काळ्याशार रांगा,त्यावर भव्य रंगीबेरंगी छटांना कवेत घेऊन हसणारे आकाश, आणि सभोवतालचा निसर्ग रम्य परिसर डोळ्यांचे पारणे फिटते....
हे सारं बघून खाली उतरलो आपण,की लेखी आणि चित्र रुपातील स्वातंत्र्य संग्रामातील आणि स्वतंत्र भारताच्या विलिनीकरणाच्या कार्यातील वल्लभभाई पटेलांच्या कार्याचा आढावा घेणारं म्यूझियम अप्रतिम आहे...
भला मोठा परिसर अत्यंत सुशोभित स्वरुपात आणि प्रकाशाच्या झगमगाटात डोळे दिपून टाकणारा आहे....आपण अक्षरशः स्तिमित होऊन बघत रहातो.... 

    हे सारं डोळ्यात साठवत साठवत आपण पर्यटन बस मधून व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, आणि धरण परिसरात चक्कर मारुन येतो...
विविध प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांनी सजवलेली ही व्हॅली मन मोहवून टाकते...
धरण परिसरात अजून काम चालू आहे....बहुतेक धरणाच्या भिंतींची उंची वाढवण्याचे काम चालू होते...
 
    आणखीही बऱ्याच प्रकारच्या विविध प्रकल्पांची कामं जोमानं चालू असल्याचे दिसून आले....त्यात प्राणी संग्रहालय,डिस्ने लॅंड इ.अनेक प्रकारची कामं प्रगतीपथावर चालू आहेत....
हे सारं बघून आपण पुनश्च पुतळ्याच्या पायथ्याशी परततो. सायंकाळी सव्वासात वाजता दाखवल्या जाणाऱ्या साऊंड अॅंड लाईट शो बघण्यासाठी साठी प्रत्येकजण आतूर झालेला दिसतो....

    बरोबर वेळेत चालू होणारा हा शो आपल्या ला या पोलादी पुरुषोत्तमाच्या जीवन चरित्राची,त्यांच्या महान  कार्यकर्तृत्वाची इत्यंभूत माहिती देतो.तसेच यातून आपण, पुतळा बनवताना लागलेल्या कौशल्यपूर्ण हातांची महती,त्यातील तंत्रज्ञानाचं स्वरुप वगैरे गोष्टींची इत्यंभूत माहिती घेत रहातो आपण. आणि इतिहासाची सफर  करुन येतो...

 आपसूकच नतमस्तक होतो....आणि आपल्या राष्ट्र गीतानं कार्यक्रमाचा समारोप करत,भारत मातेचं गुणगाण गाऊ लागतो....

    या साऱ्याच गोष्टी वाचनातून अनुभवण्या पेक्षा प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन अनुभवण्यात खरोखरच दिव्यत्वाची प्रचिती येऊ लागते..... आपण त्रिवार वंदन करु लागतो... आपल्या भारत भूमीला आणि देशहितासाठी झटणाऱ्या सरदार पटेलांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वांना.....

*जयहिंद-जय भारत*

अशा घोषणा देत....

अशा पध्दतीची स्मरण स्थळं,प्रेरणास्थानं ठिकठिकाणी बनवली गेली पाहिजेत आणि भारताच्या स्वातंत्र संग्रामाचं,एकत्वाचं गीत सतत आळवत राहिलं पाहिजे ही काळाची गरज आहे निश्चितच....याची महती पटत जाते...

©
*नंदिनी म.देशपांडे*.

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा