*आयुष्य*
आयुष्य हे ऽ चुलीवरल्या
कढईतले कांदे ऽपोऽहे.....
आजच्या लेखन कल्पनेचा विषय वाचला नि,हे गाणं आठवलं पटकन....
खरंच माणसाचं आयुष्य हे कांदा पोह्या सारखंच खमंग बनत जातं दिवसेंदिवस....
त्यात साऱ्या चीजा ह्या प्रमाणातच पडायला हव्यात तरच ते चवदार बनतं....
सर्व प्रथम तर हे आयुष्य भिजवलेल्या पोह्या प्रमाणे छान पैकी पाण्यात धुवून मऊ मुलायम बनायला हवं...
लहानपणापासून आई वडिलांकडून आपल्यावर होत असणाऱ्या कोड कौतुकाच्या,लाडिवाळ लोभाच्या नि भरभरुन मिळणाऱ्या प्रेमळ स्पर्शावाच्या वर्षावात चिंब भिजत मुलायम बनलेले असतेच....
जसं आपण स्वतःला समाजाभिमुख बनवत त्यात मिसळून जाण्याचा प्रयत्न करतो तसं मग त्यात एक एक प्रकारचे मसाले पडत जातात....
आयुष्याची लज्जत वाढवायला समाजरुपाचे कांदे आवश्यकच.....केवळ यानेही काम भागणार नाहीच रंगही आकर्षक हवाच..... शेवटी 'अॅटिट्यूड' महत्त्वाचाच म्हणूनच योग्य प्रमाणात हळद हवीच....तिचं कमी जास्त प्रमाण उग्र दर्प देऊन जातं तेही बेचव वाटतंच....
आयुष्याच्या प्रवासात येणारी विविध प्रकारची छोटी मोठी वादळं, मनःस्ताप देऊन जातात... पण, पण खूप काही शिकवून जातात खचितच....परिणामी त्यातील झणझणीत पणा पोह्यात टाकलेल्या हिरव्या मिरची प्रमाणे चव व्दिगुणित करतो.....या तीखट पणाचं संतुलन साधावयाचं असेल तर,त्यात लिंबू,शेंगदाणे,दाळं,
हिंग,मोहरी व माधुर्यासाठी किंचितशी साखर आवश्यकच....हे ज्यानं त्यानं आपल्या आवडी नुसार घालावित....ह्यांचे काम करणारे आयुष्यातील घटक म्हणजे,राग व्देश,आसूया या गोष्टींचा सामना करत करत स्पर्धेच्या तोंडघाशी पडत पडत,येणाऱ्या चांगल्या वाईट अशा असंख्य अडचणींवर यशस्वीपणे मात करत त्यातून मार्ग काढत काढत शेवटी आपल्या आयुष्याची रंगत वाढवणं जशी आपण पोह्यांची रंगत वाढवत आपल्या जिव्हेला चव आणतो.... असे पोहे लिलया रसरशीत मुखरसात विरघळत पोटात ढकलले जातात.... अगदी तृप्ततेच्या भावनेनं....
आयुष्याचंही असंच आहे,वैविध्यानं नटलेल्या या स्वानुभवातून,परिस्थितीतून मार्ग काढत,ताऊन सुलखून निघालेलं आपलं आयुष्य,आपण मागे वळून बघतो तेंव्हा, कृतकृत्यतेचं मनस्वी समाधान देऊन जातं....
ही कृतकृत्यता अनुभवण्यासाठी उसंत मात्र मिळायला हवी....तरच आपण आपल्या आयुष्याचा आस्वाद घेत आहोत याची प्रचिती येईल....
अर्थातच त्यासाठी आपण मानसिक, शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असावयास हवे.....ते सर्वस्वी आपल्याच हातात आहे....
जीवनात असा सारा सुयोग जुळून आला म्हणजे,परिपूर्तिचा आनंद मनसोक्तपणे लुटत लुटत समाधानानं शेवटच्या प्रवासाला सन्मुख जाता येतं...
शेवटी माणसाचं आयुष्य आयुष्य म्हणजे काय हो,तर त्याच्या जन्मा पासून सुरू होणारा आणि मृत्यू पंथावरुन हासत चालत जाणारा जीवनपटच....
या जीवन पटावर विणली जाणारी नक्षी आपण किती सहज,संयमानं,व्यवहार कौशल्यानं, शैक्षणिक कुंचल्यानं,सहृदयतेनं,
प्रेमानं,नजाकतीनं विणतो...त्या साठी आपल्या आयुष्यात येणाऱ्या सहवासातील माणसांचे कशा प्रकारे सहाय्य घेतो यावरच सर्वस्वी अवलंबून आहे....होय ना...?
तर मित्रांनो आयुष्य म्हणजे,आपल्या जन्मापासून ते आपल्या अंतापर्यंत आपणच घेतलेला आपल्या अस्तित्वाचा शोध....त्यासाठी केलेली धडपड....मेहनत....
अन् काय....😊
©
*नंदिनी म.देशपांडे*.
सप्टें,११,२०१९.
✡✡✡✡✡✡
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा