शुक्रवार, ७ सप्टेंबर, २०१८

*. लिव्ह इन रिलेशनशिप *

*लिव्ह इन रिलेशनशिप*

       सवयी प्रमाणे दैनिक पेपर वाचत असताना वाचनात आलेली एक बातमी म्हणजे,एका स्त्री ने टाकलेल्या दाव्यात, न्यायालयाने सदरील स्त्री ला निर्वाह निधी मिळावा, असा निकाल दिला. ही व्यक्ती तिच्या बरोबर  लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये रहात होती.

     संबंधित व्यक्तीस तिच्या आणि दोन मुलांच्या निर्वाहासाठी ठराविक रक्कम दरमहा दिली जावी. असा आदेश न्यायालयाने दिला होता.व्यवसायाने वकील असल्यामुळे न्यायालयीन संदर्भात आलेली एकही बातमी नजरेतून सुटत नाही.

    यातील परिस्थिती अशी की, बारा वर्षांपासून ही दोघं रिलेशनशिपमध्ये राहात होती. त्यांना दोन मुले झाल्यानंतर 'पटत नाही'या करण्यासाठी तिचा मित्र वेगळा झाला होता. आणि निर्वाहाचा प्रश्न आ वासून तिच्यासमोर उभा राहिला. न्यायालयात यासाठी तिने अर्ज केला. पण यात केवळ तिच्या मित्राचे सातत्याने म्हणणे होते की,आम्ही दोघे रिलेशनशिपमध्ये राहात होतो. आणि ही दोन्ही मुले आमच्या दोघांचीच आहेत. हेच ग्राह्य धरून सदरील आदेश देऊन त्या व्यक्तीस निर्वाहासाठी रक्कम देणे बंधनकारक ठरवले न्यायालयाने.....

    तार्किक दृष्टीने विचार केल्यास हा निर्णय अगदी योग्य असाच आहे.

   ‌ ‌ ही बातमी वाचली आणि अंतर्मुख मनाने माझे विचारचक्र चालू झाले. खरंच, लिव्ह इन रिलेशनशिप हा जो काही प्रकार समाजात रूढ होऊ पाहत आहे तो कितपत योग्य आहे? याला कोणताही धार्मिक वैदिक कायदेशीर किंवा नैतिक आधार आहे का ?या नात्यातील विश्वासार्हता कितपत मान्य करावी अशी आहे?अशा नाना प्रश्नांनी मनात वादळं उठवले. अशा पद्धतीने एकत्र राहण्याचा हा मार्ग व्यभिचाराकडे झुकणारा नव्हे काय? किंवा व्यभिचाराचा आधुनिक मार्ग आहे हा. असे का म्हणू नये? असाही विचार मनात रुंजी घालत होता.मन पुन्हा पुन्हा या मतावर विश्वास ठेवत आहे अशी जाणीव झाली.

     लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे नेमका काय प्रकार आहे?तर यात एक मॅच्युअर्ड मुलगा आणि एक मॅच्यूअर्ड मुलगी, स्वतःच्या पसंतीने एकत्र राहतात. एकाच छताखाली यांचे एकत्र राहणे हे इतर लोकांना नवरा-बायको रहातात हे. या सारखे वाटणारे असेच असते!

        कोणत्याही पद्धतीने लग्न करून एकत्र राहणे आणि अशा रिलेशनशिपमध्ये राहणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. असे दोघेजण जेंव्हा लग्नाच्या गाठींनी बंधनात राहतात, तेव्हा ते काही लोकांच्या साक्षीने, कोणत्या तरी कायदेशीर तत्वा वर आधारित लग्न पद्धतीने, स्वतःच्या आणि दोघांच्याही कुटुंबातील इतर सदस्यांच्या संमतीने संसार थाटावयास,एक नवीन कुटुंब संस्था स्थापन करण्यासाठी निश्चित उत्सुक असतात. नव्हे पात्र असतात. असे गृहीत धरले जाते. ते सर्वस्वी बरोबरच आहे.

   पण रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी एखादा तरी आधार आहे का? केवळ दोघांची इच्छा असणे हे काही समाजमान्य कारण नाही. त्याला कोणत्याही कायद्याचा, रुढी-परंपरांचा किंवा नैतिकतेचा आधार नाही.उलट पूर्वीच्या काळी, लग्न न करता एखादी स्त्री एखाद्या पुरुषाबरोबर काही दिवसांसाठी जरी अशी एकत्र राहिली, तर ती स्त्री त्या पुरुषाची 'ठेवलेली बाई' आहे असे कुजबुजले जायचे. केवळ शारीरिक आकर्षणातून असे संबंध जोपासले जायचे. तिने मूल जन्माला घातले तरी बायकोचा दर्जा तिला कधीच दिला जात नसे.मात्र कुत्सित नजरांचा सामना तिला अवश्य करावा लागत असायचा. असा पुरुष स्वतःच्या कुटुंबात अशा संबंधां बाबत ब्र ही उच्चारायचा नाही. सर्व चोरून-लपून चाललेले असायचे.

रिलेशनशिप मध्ये तरी यापेक्षा वेगळे काय आहे? फक्त फरक एवढाच झालाय की काळ बदलला.कोण, कोठे, कोणाबरोबर, कसे राहतो? हे जाणून घ्यावयास व त्यावर चर्चा करावयास कोणालाही वेळच नाही मुळी.

    या रिलेशनशिपला कायद्याचा पाठिंबा नाही त्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाल्यास कौटुंबिक न्यायालयातही दाद मागता येत नाही. अशा प्रकारे एकत्र राहण्याने कुटुंबाची निर्मिती होण्यापेक्षा वाताहात होण्याचीच शक्यता जास्त आहे.जुळले नाही तर 'वेगळे राहणे'नाहीतरी बंधनमुक्त असेच संबंध आहेत की हे!

    आज ही तर उद्या ती .किंवा आज हा तर उद्या तो. अशी भावना वाढीस लागू शकते.
    या नात्यांना नातं हा शब्द सुद्धा देता येत नाही.कारण स्वैराचातून तयार होणाऱ्या या नात्याला काय नाव द्यावे? यातील विश्वासार्हतेचे मोजमाप कसे करावे? दोघांची कुटुंबे यासाठी परवानगी देणार नाहीतच. परिणामी ते क्षणभंगुरच ठरतील.

‌  आजच्या तरुणाईने कुटुंबाप्रती कर्तव्य जबाबदारी टाळण्यासाठी, पण स्वतःची शारीरिक भूक भागवण्यासाठी तयार केलेली पळवाट म्हणजे लिव्ह-इन-रिलेशनशिप .असे आपण म्हणू या का?

      यात व्यवहार असेल भावनांची पाटी मात्र कोरीच राहिल.आकर्षण असेल पण प्रेम असेलच असे काही नाही. त्यातून जन्म घेणाऱ्या मुलांचे भवितव्य काय? त्यांच्यावर योग्य संस्कार होऊ शकतील का?जेथे त्यांना जन्माला घालणाऱ्या दोन व्यक्ती नात्याने नवरा-बायको नाहीतच. तर या मुलांनी त्यांना आई-बाबा तरी कसे म्हणावे?कुटुंब व्यवस्थेचा ऱ्हास होण्यासाठीचे हे एक लक्षण नव्हे काय?

    कुटुंबसंस्था ही आपल्या समाजाचा मूलभूत घटक आहे. येथे प्रत्येकाला खूप सुरक्षित वाटत असते. यालाच सुरुंग लावणे म्हणजे लिव्ह-इन-रिलेशनशिप!असे संबंध ठेवून मूल जन्माला घालण्याचा आणि त्याला दिशाहीनत्वाचा मार्ग आखून देण्याचा कोणालाही  अधिकार नाही. जन्मदात्यांना सुध्दा नाही.जन्मदात्यांच्या चुकीची शिक्षा मुलांना मिळता कामा नये.

   ‌ एका वृत्तपत्रात असेही वाचनात आले की, एका अभिनेत्रीने स्वतःचे मांडलेले मत असे, ती म्हणते, मी लग्न करेन किंवा नाही हे सांगू शकत नाही. मात्र माझी स्वतःची भरपूर मुले जन्माला येतील. केवढा हा विरोधाभास! लग्न न करता मुले जन्माला घालण्याचे व्यभिचार नव्हे तर काय?

रिलेशनशिपमध्ये राहताना केवळ शारीरिक आकर्षणच असावे का? बहिण-भाऊ किंवा निर्मळ मित्र-मैत्रिणी असे नाते का असू नये?

    शारीरिक आकर्षणातून कपडे बदलावेत तशा व्यक्ती बदलत जातील, आणि याचा अर्थ केवळ व्यभिचार असाच लावता येईल. याचा राजरोसपणे पुरस्कार वाढत गेला तर आपला समाज अक्षरशः वाहवत जाईल.सर्वत्र अराजकता निर्माण होऊन नीतिमूल्यांना काहीच अर्थ राहणार नाही.देश केंव्हा रसातळाला लागेल हे सांगता येणार नाही.

        आपल्या देशात, आपल्या संस्कृतीमध्ये संस्कारांना खूपच महत्त्व आहे. ते प्रत्येक कुटुंबातून टिकवून ठेवलेच पाहिजेत. त्यांची नव्याने रुजवणूक झाली पाहिजे.तरच अशा प्रकारच्या रिलेशनशिप मधून आजची तरुणाई दूर राहील.यातच सर्वांचे भले आहे. हे विसरून चालणार नाही.

    वयानुसार व्यक्तीने मॅच्युरिटी गाठली तरीही, मानसिक प्रगल्भता येण्यासाठी,ती टिकून राहण्यासाठी कुटुंबाचे पाठबळ असणे अत्यंत गरजेचे आहे. तरच माणसाला 'तारतम्याचे' भान राहिल असे वाटते.

     थोडक्यात सांगायचे तर अजूनही वेळ गेलेली नाही. प्रत्येकाने आपापल्या परीने अशा प्रकारच्या रिलेशनशिप साठी विरोध दर्शवत त्यांना कॉन्सेलिंग करत, आजच्या तरुण पिढीला सावरायला हवे.त्यांना कुटुंबसंस्थेचे लग्न किंवा विवाह संस्कारांचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. तरच काही खरे आहे असे म्हणता येईल.
 
             पाश्चिमात्यांच्या चांगल्या गोष्टीचे अनुकरण निश्चित करावे. वाईट गोष्टींचे नव्हे. पाश्चिमात्त्य लोक आपल्या देशात राहून योगा संगीत किंवा इतर कलाप्रकार शिकवून त्यांचा अभ्यास करून पारंगत होतात. मग आपणही निर्धाराने त्यांच्या केवळ चांगल्या गोष्टी आत्मसात का करू नयेत?प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू पैकी एक निश्चितच चांगली असते. तिचा अंगीकार केल्यास आपले भविष्य नेहमीच उज्ज्वल असेल. पण केवळ वासनेच्या आहारी जाऊन स्वतःची अधोगती करून घेऊ नये एवढे निश्चित सांगावेसे वाटते.....

© *नंदिनी म.देशपांडे.*

  

👫👫👫👫👫👫👫👫

          ‌

1 टिप्पणी:

  1. खूप छान लिहिले आहे. समाजात पसरत चाललेल्या कुप्रथांविषयी आवाज उठवल्याबद्दल अभिनंदन.

    उत्तर द्याहटवा