शुक्रवार, ८ जुलै, २०२२

पुस्तक परीक्षण...

पुस्तकाचे नाव-- "मनभर सावल्या".
लेखिका--
सौ.श्यामा चातक देशपांडे. पुणे. 

परीक्षण---लेखिका:
नंदिनी म.देशपांडे. 
औरंगाबाद. 

   आश्चर्य वाटलं ना?सावल्या अशा मनभर मापात मोजता येतील?होय,पण असा प्रयत्न केलाय खरा, सौ.श्यामा चातक देशपांडे या लेखिकेनं...आपल्या 
"मनभर सावल्या" या पुस्तकातून...
     मनभर सावल्या छोटेसेच पुस्तक आहे ,त्यातील ललित म्हणता येतील असे लेखही अगदी छोटे छोटे; म्हणजे काही लेख तर एका एका पानाचेच आहेत पण, एकूण २७ लेखांचं हे पुस्तक वाचनीय ठरलंयं नक्कीच...
    लेखिकेनं आपल्या बालपणापासूनच्या आठवणींच्या; तिच्या मनात उमटलेल्या कितीतरी प्रसंग, भोवतालचा परिसर, निसर्ग, त्यातील विविध घटक यांच्या संदर्भातील आठवणींचा कल्लोळ 'मनभर सावल्या' या पुस्तकात मांडला आहे...
      गुरुस्थानी असणाऱ्या वडिलांना आणि आईसमान मोठ्या बहिणीला वाहिलेली अर्पण पत्रिका मनाचा ठाव घेते....
    लेखिकेचं माहेर म्हणजे कायम अध्यात्मिक वातावरणाने भारुन राहिलेलं एक समृध्द केंद्र....संत जनीजनार्दनाचे देवस्थान बीड;हे अध्यात्मिक ,धार्मिक ठिकाण.लेखिकेचे वडिल दरवर्षी भागवत पठण,इतर पोथ्या पुराणे, 
सणवार,उत्सव, मोहोत्सव यांचे परंपरापुर्वक साजरीकरण,सादरीकरण करणारे त्या केंद्राचे अधिपती...
    त्यामूळे या सर्व वातावरणाचा, तेथे साजरे होणारे सणवार, उत्सव, अन्नदान,धार्मिक ग्रंथपठण या साऱ्या गोष्टींचा तिच्या मनावर खोलवर रुजून बसलेला पगडा; तिच्या लेखांमधून ठाई ठाई जाणवतो...
    नकळतच तिच्यावर झालेले हे संस्कार तिला आयुष्यभराची साथ करत आठवणींच्या स्वरुपात कोरल्या गेल्या आहेत....  त्याचे अगदी बारीक सारीक इत्यंभूत वर्णन तिने आपल्या लेखांमधून केलेले दिसून येते...
या वर्णनात वाचकासमोर प्रसंग ऊभी करण्याची ताकद दिसते...
    याच बरोबर लेखिकेला निसर्गाच्या सान्निध्यात रमण्याची मनस्वी आवड दिसून येते....निसर्गातील प्रत्येक घटक मग ते झाड असो, शेतातील ऊभी पिके असो किंवा ऊन, पाऊस,नदी समुद्र असो...पशू पक्षी, फुलं,वेली या सर्वांचा सामावेश यात आहे...
   झाडाकडे बघून तिचे चिंतन चालू असते तर सोनसळी ऊन्हामध्ये ती सावल्यांबरोबर हरखून जाते...समुद्राचे रुप तिला ईश्वराचा भास घडवते... सागरलाटांशी हितगुज तिचे मन करते...
  निसर्गाच्या स्वभावाला अनुसरुन  ज्ञानेश्वरी मधील ओव्यांचा संदर्भ अधून मधून लेखिकेने काही ठिकाणी दिलेले दिसतात...ते अगदी समर्पक आहेत...
काही ठिकाणी काव्यपंक्तींची गुफण आहे...
 निसर्गसान्निध्यातील काही अनुभवांचे त्या त्या संदर्भाने पुनरावृत्ती झालेली वाचताना लक्षात येते...
     'सांजवेळ'आणि 'मी जाता राहिल कार्य काय'   या लेखांमध्ये लेखिकेच्या हळव्या झालेल्या मनाचा प्रत्यय येतो...वृध्द झालेले शरीर नश्वरच आहे पण अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्यात आणि ज्ञानाच्या ज्योती उजळवत त्या वाटेवरुन चालणं हेच जीवन आहे...हा तिच्या वडिलांनी सांगितलेला तात्विक उपदेश,हा लेखिकेला त्यांच्याकडून मिळालेला गुरुमंत्र आहे यावर तिचा विश्वास आहे, आणि त्या क्षणापासून तिने आपल्या वडलांना गुरुस्थानी मानले आहे...आपल्या आयुष्याची वाटचाल आपणही त्याच मार्गावरुन करत आहोत असे तिला लक्षात येतंयं...
     आईची माया देणाऱ्या मोठ्या  बहिणीचा मृत्यू लेखिकेच्या मनावर फार आघात करुन गेला आहे,हे लक्षात येते. 
आपल्याला पहिल्यांदाच मिळालेली एखादी वस्तू किती प्रिय असू शकते आणि तिचे मोल केवढे अनमोल असते ते 'माझी पहिली साडी' या लेखात यथोचित वर्णन करत मांडले आहे....
लग्नानंतर सासरी असणारा 'झोपाळा' त्यावर घालवलेले निवांत क्षण, आपल्याच मनाचं केलेलं अवलोकन; तसेच सहज म्हणून परिसरात फिरणाऱ्या मांजरीवर कसा जीव जडत गेला सर्वांचा, वगैरे गोष्टी लेखिकेच्या स्मरण शक्तीची दादच म्हणावेत...
एखाद्या व्यक्तीची वाट बघत बसण्यात काय हुरहुर असते ती एका लेखातून मांडली आहे...
सुरुवात बालपणीच्या शाळेच्या आठवणींपासून बालवयात खेळलेले विविध खेळ, दिवाळी सारखे उत्सव, खेडे गावातील आठवणी यांपासून आहे,तरीही बालपण सारखं शेवट पर्यंत डोकावत रहातं...
एकूणच छोटे छोटे असे हे सारेच लेख वाचनीय असून त्या वातावरणात आपल्याला घेऊन जातात...
पुस्तकातील दृश्यांसंबंधी  काही चित्र रेखाटलेली आहेत..ती समर्पक वाटली...बाकी मी सुरुवातीलाच सांगितलं तसे मनभर सावल्या म्हणचे मनातील मनभर आठवणींचं प्रतिक आहे आणि ता आठवणी आठवतील तशा उजाळा देत त्या जागवत ठेवण्याचं काम लेखिकेच्या या पुस्तकाने निश्चित केलंयं असं आपल्याला म्हणता येईल....
🌹🌹🌹🌹🌹

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा