बुधवार, १८ जुलै, २०१८

*अश्रुंची किमया*

*अश्रुंची किमया*

       गेल्या दोन दिवसांपासून,हिमा दास नावाच्या मुलीचा,जिने धावण्याच्या शर्यतीत सुवर्ण पदक मिळवले आहे.या भारतीय युवतीचा ,आश्रुंनी भरलेल्या डोळ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे.
       तिच्या आसवांमध्ये जबरदस्त ताकद दिसते आहे.त्यात,तिने घेतलेल्या मेहनतीला दिलेली दाद आहे.तिच्या प्रतिक्षेला फळ मिळाल्याचा आनंद आहे.तिला मिळालेल्या विजयाचं ते प्रतिक आहे तसेच तिच्या या आसवांतून तिचे देशप्रेम व आदर भरभरुन दिसतोय!
      खरंच,माणसाच्या डोळ्यातील पाण्याचा एक थेंबही
लाख मोलाचा बरं का ! एक तर हा थेंब बरंच काही बोलून जातो. तर हाच डोळ्यातील एक थेंब आपलं आणि समोरच्या व्यक्तीचं अख्खं भाव विश्व बदलवू शकतो. म्हणूनच तो खूप किमती आहे.
      आश्रुं मध्ये खूप ताकद असते असे म्हणतात, ते उगाच नाही. मानवाला जन्माला आल्यापासून ते त्याच्या अंतापर्यंत आजन्म साथ करणाऱ्या डोळ्यातील पाण्याला अश्रू असे म्हणतात हे,अगदी चार-पाच वर्षाच्या छोट्या बालकालाही समजते.ईश्वराने माणसाला बहाल केलेलं हे सर्वात ताकदवान असं अंगभूत अस्त्र होय.
     प्रत्येकाच्या भावविश्वाशी निगडित असणारी अश्रुंची ही देणगी त्याच्या मनातील खळबळ, मग ती एखाद्या हर्षोल्हासापायी असो किंवा उदासवाणे पणाची. त्याच्या चेहऱ्यावर प्रकट होताना नकळतपणे डोळ्यातही बरेच काही सांगून जाते. त्यावेळी डोळे अलगदपणे अश्रूंचा आधार घेतात.
    नवजात अर्भक या पृथ्वीवर अवतरल्या नंतर, अवकाशाशी जुळवून घेताना पहिली सलामी देते. ती म्हणजेच आपल्या डोळ्यातून अश्रूंना वाट मोकळी करून देत,आपल्या 'टॅहां टॅहां'रडण्यातून. स्वतःच्या अस्तित्वाची खास अशी एक जागा बनवताना सुरू झालेला हा अश्रूंचा प्रवास त्याच्या अंतापर्यंत चालूच राहतो. नवजात बाळाचा पहिला गोंडस रडवेला स्वर त्याला कदाचित थोडासा क्लेशकारक असेल, पण बाकी सर्वांसाठी खूपच आनंदमय असतो. आपल्याच अंशाने या जगात नव्याने प्रवेश घेतल्याची ही जाणीव त्याच्या आप्तस्वकियांना आनंद देते. तेंव्हाही डोळ्यात अश्रूंची गर्दी नकळत दाटून येते, पण ते आनंदाश्रु म्हणूनच.
    बाळ जसेजसे मोठे होऊ लागते तसे त्याला आपल्या अश्रुंची मूल्य समजू लागते.भूक लागली तरीही त्याला रडूनच सांगावे लागते.थोडक्यात,रडवेल्या सुरात आपल्या अश्रुंचे प्रकटीकरण करण्याची कला, खूपच उपयोगी आहे हे त्याला कोणी मुद्दाम शिकवावे लागत नाही.
     वाढत्या वयानुसार प्रत्येकाचे भावविश्व बदलत जाते आणि त्याचे प्रतिबिंब त्याच्या अश्रुतून परावर्तित होते.कोणतीही शारीरिक इजा झाली तर जीव विव्हळतो. तोंडातून निघणार्‍या हूंकारातून ती वेदना बाहेर पडते आणि अश्रुंच्या रुपात डोळ्यांतून पाझरु लागते.हे झालं अश्रुंचं वेदनादायक रुप.
       अगदी निकटच्या व्यक्तीला एखादी शारीरिक किंवा मानसिक वेदना त्रास देत आहे,त्याला ती सहन होत नाही, हे जेव्हा आपल्या लक्षात येते, तेव्हा अगदी नैसर्गिकपणे संबंधित व्यक्तीला होणारा त्रास आपल्या डोळ्यात आलेले अश्रू केंव्हा व्यक्त करून जातात हे बघणार्‍याला कळतही नाही. 'त्याची वेदना ती माझीच वेदना' ही संवेदना जेंव्हा डोळ्यातून पाझरते,मला वाटतं हेच तर खरे अंतकरण होय.ही काही हातात घेऊन दाखवण्याची वस्तू नव्हे. तर मनातील भावनिक कल्लोळामूळे चेहऱ्यावर व मनावर उमटणारी प्रतिक्रिया होय.जिचे उगमस्थान हृदयातून होते. त्याला आपण मनाचं हळवेपण असेही संबोधू शकतो.
       आपल्या प्रेमाच्या लोकांची एखाद्या कार्यातील यशस्विता, त्याने केलेल्या,आमाप प्रयत्न आणि मेहनतीने मिळवलेली आहे हे बघून सहाजिकच संवेदनशील व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही.ही संबंधित व्यक्तीच्या दैदिप्यमान कारकिर्दीला आनंदाने दिलेली आपली अश्रू रुपी पावतीच असते. किंबहुना कितीही कष्ट पडत असतील, ते करताना वेदना होत असतील आणि त्या डोळ्यातून अश्रू रूपाने बरसत असतील तरीही 'प्रयत्नांती परमेश्वर' किंवा 'केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे' तसेच 'वाळूचे कण रगडीता तेलही गळे'या उक्तींवर विश्वास ठेवत, एखाद्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात यशाला कवेत घेऊन आले, तरीही डोळ्यातून नकळत पणे वारंवार भरुन येणाऱ्या अश्रुंना फुलांची उपमा मिळते.म्हणूनच म्हणतात ना अश्रुंची झाली फुले !
        अश्रुंचा अशा प्रकारचा आविष्कार हा मनातील संमिश्र भावनांचा कल्लोळ दाखवून जातो.आनंदाच्या क्षणी सुध्दा ते डोळ्यात तरळतात तर वेदना होताना सुद्धा ते वाहतातच. कधीकधी ते मूकही असतात. मूकपणे वेदना सहन करतात. म्हणूनच कोणाकोणाला रडू लवकर येत नाही असे आपण म्हणतो, ते याच अर्थाने.
     रडू येणे, हा दु:खाने परिसीमा गाठल्या नंतर अश्रूंचा,दिसणारा बाह्याविष्कार आहे. आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला आपण गमावले आहे,ती व्यक्ती पुन्हा कधीही दिसणार नाही, अशी जाणीव झाल्यानंतर फुटणारा अश्रूंचा बांध.हाअगदी अनावर करणारा असतो. संबंधित व्यक्तीची राहून राहून आठवण येत हा आवेग वारंवार येतोच.त्याला आपण थांबवावे म्हटले तरी ते थांबत नाहीत. अशावेळी तो  दुःखावेग होय.असे म्हटले जाते.
     शिवाय आपल्या कुटुंबातील एखादा माणूस आपल्यावर ओरडला,तर त्यामूळे आपल्याला रडू येऊ शकते. लहानपणी शाळेमध्ये शिक्षकां‌कडून  मिळणारा ओरडा सुद्धा कधीतरी आपले अश्रु वाहते करून गेलेला असतोच.
          लहानपणी आजी-आजोबा, आई-वडील, थोरली भावंड यांच्या कडून खाल्लेल्या ओरड्यानं कितीहीे रडू आणले तरीही ते विसरायला लावणारा असतो हा ओरडा. प्रेमाच्या माणसांकडून असतो ना तो ! ओरडा बसल्यावर डोळ्यांतून वाहणारे अश्रू हे वाईट वाटतयं आपल्याला, याचीच आठवण करून देणारे असतात.
      प्रेमाच्या माणसां वरुन लक्षात आलं जेंव्हा आपल्यावर खूप प्रेम करणारा व्यक्ती, प्रेमाने आपल्याला कुरवाळतो तेंव्हा नकळत पणे त्याच्या वात्सल्यपूर्ण स्पर्शामुळे आपल्या डोळ्यात अश्रू तरळून जातातच. सच्च्या प्रेमाची ही जणू दोघांनीही परस्परांना दिलेली ग्वाहीच असते.
       आपल्याला एखाद्या परीक्षेच्या नंतर खूप अभ्यास करूनही पेपर कठीण गेला असेल किंवा रिझल्ट मनाप्रमाणे आला नाही, तर मिळालेल्या अप यशा मुळे वाईट वाटणे अगदी स्वाभाविक आहे.म्हणूनच हे वैफल्य अश्रु रुपातून बाहेर पडून मनावरील ताण कमी करु शकतात.
     आपल्या कुटुंबातील व्यक्ती शिक्षणा निमित्त बऱ्याच दिवसांसाठी दूर परदेशात वगैरे जात असेल तर, मनाची अवस्था अतिशय द्विधा, घालमेल करणारी असते. एकीकडे तो शिक्षणासाठी परदेशात जाणार याचा आनंद,अभिमान यामुळे ऊर भरुन येतो. तर दुसरीकडे त्याचा विरह होणार या भावनेने कंठ दाटून येतो. परिणती शेवटी डोळे ओले होण्यातच होते हे मात्र खरे.
        मनाची अशीच काहीशी घालमेल, मुलीला लग्न होऊन सासरी पाठवताना असते, तिच्या कुटुंबाची. किंबहुना मुलगी कोणाचीही असेल तरीही, ती आपल्याच घरी येणार आहे असे असतानाही तिला माहेरहून सासरी पाठवताना पहिल्यांदा निरोप देण्याचा क्षण म्हणजे बघणाऱ्या सर्वांचेच मन हेलावते. डोळे पाणावतात. अतिशय हळवा प्रसंग असतो तो.ज्याच्या मनी हळवेपण असतं, तो अशा प्रसंगी साश्रु नयनांनीच वावरतो. हे सर्व आपोआप घडत असते. येथे न बोलता मनाचा मनाशी संवाद चालू असतो.
      अशीच परिस्थिती बरेच दिवस माहेरी राहून सासरी जाणाऱ्या मुलीच्या मनाची होत असते. माहेरहून सासरी जाताना तिची पावले जड होतातच. एकीकडे सासरची ओढ असतेच पण त्याच वेळी आपल्या प्रेमाच्या माणसांच्या विरहाची जाणीव तिला अस्वस्थ करत, डोळ्यांत अश्रुंची गर्दी करते.
     कधी कधी एखाद्या कौटुंबिक  विषयात आपल्याच लोकांकडून व्यक्तीच्या मनाची कोंडी होत असेल तर,अतीव दुःख होणे अपरिहार्य ठरते. हा दु:खावेग अश्रु रुपाने डोळ्यातून पाझरु लागतो.त्या बरोबरच होणारे मानसिक क्लेश सुद्धा अश्रुंना वाट करून देतात. त्यामुळे झालेल्या दुःखाचा निचरा होण्यास बरीच मदत होते.
   माणसाला काही शारीरिक व्याधी लागणे, हा निसर्गनियमच आहे.अशा परिस्थिती  मध्ये वेदनांची तीव्रता वाढली की,सहन करण्याची क्षमता कमी होते. अशावेळी डोळ्यातून अश्रु ओघळू लागतात. त्याची वेदना अश्रु रुपात बाहेर पडू लागते. हे अगदी नैसर्गिक आहे.
     तर,अशाप्रकारे अश्रुंची ही सारी किमया माणसाच्या जन्मापासून ते अगदी शेवटच्या क्षणा पर्यंत,इतर कोणाचीही साथ असू दे वा नसू दे आयुष्यभर आपल्याला साथ करत असतात.ते आपल्याला एकटे सोडून जाणार नाहीत याची शाश्वती असते.कधी कधी व मूकपणे ते  बरेच काही बोलून जातात. तर कधी रूदन करत आक्रंदन करतात.कधी दुःखावर फुंकर घालतात. आणि कधी दुःखावेगाने भरभरून वाहू लागतात.
     आनंदाच्या प्रसंगी ते कधी डोळ्यात तरळून आनंदाश्रु म्हणून वाहतात.असे हे माणसाचे अश्रु निर्मळ पाण्यासारखे पण खूप शक्तिमान असतात. बरेचदा या अश्रुं मूळे हृदय परिवर्तन होणारी माणसं आपल्या अवतीभवती दिसू शकतात. तर काही कायम हळवेपणा हा जीवलग मित्रा प्रमाणे सोबत ठेवतात. म्हणूनच मानवी मनाचे व अश्रुंचे नाते खूपच जवळचे असते.भावनांना मूर्त रुप देण्याचे काम त्याचे अश्रू मधून साधले जाते.पुष्कळदा व मूकपणे बरेच काही सांगून जाण्याची किमया असते या अश्रुंची.म्हणून ते फार परिणामकारक ठरते.
     मनाशी अगदी जवळचा संबंध ठेवून असणारे अश्रु,त्याच्या सौंदर्याशीही तेवढीच सलगी करतात. म्हणूनच ते 'पाणीदार डोळे' (मोठे डोळे आणि बोलके भाव दाखवणारे डोळे)ठरतात. पाणीदार या विशेषणातच पाण्याचे अर्थात आसवांचे डोळ्यांना किती महत्व आहे हे लक्षात येते. ते असल्याशिवाय डोळ्यांनाही सौंदर्य मिळत नाही.
    डोळ्याच्या आरोग्यासाठी डोळ्यात पाणी ,अश्रू तयार होण्याची नैसर्गिक रचना असते.  खरोखर सृष्टीच्या या शास्त्रीय दृष्टिकोणाला त्रिवार अभिवादन.
       अश्रुंना मानवी मनाच्या भावनांचे कोंदण मिळाल्यामुळे डोळ्यातील प्रत्येक थेंबाची किंमत अमूल्य अशीच आहे. म्हणूनच कित्येक मनस्वी कवींनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर डोळ्यांवर आणि त्यातील आसवांवर आपल्या काव्यातून व्यक्त केलेले आपल्याला दिसून येते.
     उदारणार्थ,
डोळ्यामधले आसू पुसती ओठांवरले गाणे.
  ‌
   तुझे डोळे पाण्याने भरले माझे डोळे पाण्याने भरले.

   आसू भरी है,ये जीवन की राहे.

             रोते रोते हसना सीखो हसते हसते रो ना.इत्यादी.

   ‌ तर असे हे माणसाचे आंसू, त्याच्यातील माणूसपण जिवंत असल्याची खूण आहे,त्याच्या सजीवपणाची एक ओळख आहे.असेे नक्कीच म्हणता येते.
     किटक,मुक प्राणी, पशू ,पक्षी, झाडे, वेली या सर्वांची आपण सजीवांमध्ये गणना करतो. त्यांना सुद्धा माणसां प्रमाणे या जाणिवा कदाचित असतीलही, पण माणसातील भावनाशील वृत्तीमूळे त्याच्यातील वेदनेची, आनंदाची जाणीव माणूस स्वतःहून करुन घेतो. तशीच ती करून घ्यावी लागते. हा ज्या त्या  व्यक्तीच्या भावनिक जाणिवेशी संबंधित विषय असल्यामुळे प्रत्येकाच्या जाणिवा वेगवेगळ्या असू शकतात निश्चितच.
      आजन्म साथ करणाऱ्या डोळ्यातील अश्रुंचे, प्रत्येक मानव प्राण्याने शतशः आभार मानावयास हवे. हे मात्र पूर्ण सत्य होय.
    सारांश,भावना, मन व अश्रु यांचा त्रिवेणी संगम ज्याच्या जवळ असेल,त्यालाच आश्रुंची किमया आणि किंमत कळू शकते.

        *©* *नंदिनी म. देशपांडे*

✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा