* हम्पीसाम्राज्य *
----------------------------
शाळेत असताना पुस्तकाच्या दोन पानात वाचलेला, शिकलेला प्राचीन भारताचा इतिहास आपण खरोखरच या विजयनगर साम्राज्यात प्रत्यक्ष जाऊन बघू असे स्वप्नात देखील कधी वाटले नव्हते....
एवढा प्रचंड ऐतिहासिक ठेवा हा गृपटूर बरोबर जाऊन समजावून घेणे केवळ अशक्यच...त्यामूळे यूट्यूब आणि गुगल ह्या अधुनिक शैक्षणिक साधनांचे सहाय्य घेवून आम्ही स्वतंत्रपणेच जावे असे ठरवले आणि पुण्याहून थेट रेल्वेने आम्ही नजीकच्या होस्पेट रेल्वेस्टेशनवर उतरलो...होस्पेट ते हम्पी हे अंतर 13 कि.मी.आहे केवळ...होस्पेट येथे रहाण्यायोग्य चांगली हॉटेल्स उपलब्ध आहेत...हॉटेल मध्येच गाड्या भाड्याने मिळण्याचे काउंटर्स (ट्रायव्हल डेस्क)उपलब्ध आहेत तेथे...संपूर्ण हम्पी दर्शनासाठी एखादी गाडी बुक करुन टाकावी...ते बरे पडते...आणि तेथे गाईडची मदत घेणं अनिवार्य आहे....आपण पुस्तकात कितीही वाचलेले असेल तरीही प्रत्येक शिल्पाचा अर्थ उलगडवून सांगताना आपल्याला नव्या दृष्टिने शिल्प अभ्यासल्याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्या जाणीवा समृध्द करत जातो....
छोट्याशाच असतील तरीही एकेका शिल्पाचे असंख्य कंगोरे आपण निरखत असतो तेथे...
कर्नाटक शासनाचे मला फार कौतूक वाटले की, त्यांंची पर्यटकांसाठी गाईड म्हणून काम करणारी माणसं,अभ्यासपूर्ण माहिती असणारी आहेत...वारंवार त्यांचे या संदर्भातील ज्ञान अत्यंत अपडेट करण्यासाठी त्यांना व्यवस्थित प्रशिक्षण दिले जाते...
हिंदी, इंग्लिश आणि कर्नाटकी भाषेत माहिती सांगणारे हे गाईड्स आहेत...आपल्याला हवा तो गाईड सोबत ठेवावा....अतिशय वाजवी दरात हे गाईड येथे उपलब्ध असतात...
बाय रोड जावयाचे असेल तर सोलापूर मार्गाने विजापूर बदामी हम्पी असेही जाता येते...रोड एकदम टकाटक आहेत!असो.
संपूर्ण हम्पी मधील ऐतिहासिक ठेवा,समजून उमजून बघावयास कमीत कमी तीन ते चार दिवस निश्चित हवे....
या विशाल मंदिरांपैकी एक कृष्णमंदिर आहे...राजा कृष्णदेवरायांनी चौदाव्या पंधराव्या शतकात हे मंदिर बांधल्याचे दाखले मिळाले आहेत...
हे मंदिर संपूर्णपणे भगवान विष्णूंना समर्पित आहे....या मंदिरातील सभा मंडपाच्या सर्व खांबांवर आणि छतावरही महाभारत आणि भागवतातील कथा ,एक एक प्रसंग कोरलेले दिसून येतात...मला सर्वात आवडलेले शिल्प, यशोदा मैय्या रवीने ताक घुसळते आहे आणि बालकृष्ण भोवती लोण्यासाठी घुटमळतो आहे...लंगडा (रांगता बाळकृष्ण सुध्दा फार देखणा आहे...एक ना अनेक ही शिल्प बघताना अख्खे महाभारत डोळ्यासमोरून सरकत जाते आपल्या....गाईडची खरी गरज, शिल्पांच्या विश्लेषणासाठीच आहे...
दुसरे एक मंदिर, जे उत्खननात सापडले आहे...कारण ते पूर्णपणे जमिनीत गाडले गेलेले होते, ते "भुयारी महादेव (शिव)मंदिर " जे आजही जमीनीच्या पोटात आहे आणि बर्यापैकी चांगल्या अवस्थेत आहे...येथील महादेवाची पिंड ,गाभारा, सभामंडप, नंदी सारेच विशाल आणि नतमस्तक व्हावयास लावणारे आहे....हे एवढे मोठे कसे काय गडब झाले असेल?याचे आश्चर्य वाटत रहाते...
क्षेत्रफळाच्या दृष्टिने सर्वांत व्यापक असे आणखीन एक सुंदर मंदिर आणि उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना म्हणजे, हम्पी येथील "विठ्ठल मंदिर "
आपल्याला विठ्ठल मंदिर म्हटले की आपली पंढरपूर नगरी आठवते पण याच पंढरपुराचा आपला विठोबा-रुक्मिणी मुळचे हम्पीमधील आहेत!ऐकून आश्चर्य वाटले ना?
लगेच कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू किंवा कानडा राजा पंढरीचा असे संतांनी का म्हटले असावे?याचा बोध होतो!
हे मंदीर निरिक्षण करताना आपली नजर सतत प्रत्येक शिल्पातून आपल्या विठोबाला शोधत असते....मंदिरात प्रवेशताच "देव देव्हार्यात नाही, देव नाही देवालयी" या सुधीर फडकेंच्या गाण्याच्या ओळी अगदी नकळत ओठांवर येतात आणि मन खट्टू होते आपले....
हे एवढे मोठे वैभव सोडून देव पंढरीत का दाखल झाले असावेत?असा प्रश्न पडतो...पण कालिकतच्या लढाईत मुस्लीम शाह्यांनी हिंदू मंदिरांचे, मुर्तिंचे सहा महिनेपर्यंत जेवढे करता येईल तेवढे नुकसान केले होते ,आणि याच काळात मूळ गाभाऱ्यातील मुर्ति सुरक्षित रहावी या हेतूने ती त्यावेळी कोणीतरी पंढरपुरात स्थलांतरित केली असावी हा माझा अंदाज आहे...
आणि असे झाल्यामुळेच आज पंढरीचा विठोबा अख्ख्या महाराष्ट्राचे दैवत आहे!
तर,हम्पीतील या विठ्ठल मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच आपल्याला पंढरपुरात असणाऱ्या विठ्ठलाच्या आणि रुक्मिणीच्या छोट्याशा मुर्तीचे शिल्प कोरलेले स्पष्ट दिसते...
येथेही विठोबा आणिक रुक्मिणीची ही शिल्प परस्परांपासून दूरच आहेत आणि वठोबाच्या वामांगीच रुक्मिणी आहे! हे बघूनच या दोघांच्या मुर्तिंची प्राणप्रतिष्ठा पंढरपुरात त्याच रचने प्रमाणे केलेली आहे असे गाईडने सांगितले..... याला ही शिल्प बघून पुष्टी मिळते...
हे मंदिरही भगवान विष्णूंना समर्पित आहे....
याच परिसरात कलाकारांसाठी एक मोठे,अप्रतिम सभागृह आहे...त्यातील सर्व रचना म्हणजे स्थापत्यशास्त्रातील ज्ञानाचा त्या शिल्पकाराने गाठलेला परमोच्च बिंदू म्हणता येईल...
प्रत्येक खांबातून सप्तसुरांचे आणि निरनिराळ्या तंतू वाद्यांचे सूर त्यातून प्रतिध्वनीत होतील अशी नियोजनबद्ध रचना केलेली आहे...शिवाय हे सूर दीड कि.मी. लांब पर्यंत प्रतिध्वनीत होऊन ऐकू यायचे असेही म्हटले जाते...यांतील कोणत्या खांबातून कुठल्या प्रकारचा किंवा कोणत्या वाद्यांच्या सुरांचा नाद निघतो?यासाठी त्या विशिष्ट ठिकाणी ते ते वाद्य हातात घेतलेल्या कलाकारांची अप्रतीम शिल्प येथे बनवलेली आहेत!
किती प्रगत होते हे सारे!!
खरोखरच हा हम्पीतील साराच वैभवाचा ठेवा अक्षरशः अनुपमेयच आहे....शब्दांची कितीही उधळण केली तरी सांगता येणारच नाही...प्रत्यक्ष बघून डोळ्यात साठवून ठेवावे असेच आहे सारे!
विठ्ठल मंदिर परिसरातच आणखी एक छोटेखानी पाषाणरुपी सात स्तरांचे सुंदर असे रथस्वरुपातील गरुडाचे मंदिर आहे...अतिशय लोभस आणि शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे हेही मंदिर!
भगवान विष्णूंचे वाहन गरुड आहे असे मानले जाते...आपण आत्तापर्यंत गरुडाचे रुप पक्षीरुपातच कल्पिलेले आहे...पण येथे आपल्याला मनुष्यरुपातील गरुडमुर्तिचे दर्शन होते....अगदी विष्णूदेवतेला साजेसा असाच शाही आणि विलोभनीय रथरुपी या मंदिराला,त्यात आरुढ होण्यासाठी छोटीशीच पाषाणशिडीही आहे आणि आतमध्ये मानवरुपी गरुड सारथी म्हणून उभे आहेत...अगदी बघतच रहावे असेच हे शिल्प!
युनेस्कोने उगाचच निवड केलेली नाही, जागतिक प्राचीन वारसा यादीमध्ये या शिल्पाची ,याची खात्री पटते आपल्याला...
आणि आपल्या पण्णास रु.च्या नोटेवर याा चित्राला मानाचे स्थान मिळालेले दिसून येते...
लेखाच्या सोबतच यातील संदर्भानुसार असणारे काही छायाचित्र मी पोस्ट केलेले आहेत....जे मी मोबाईलच्या माध्यमातून काढलेली आहेत...
उपरोक्त मंदिरांशिवाय हम्पी येथेच राण्यांसाठी बांधलेलं विशाल स्नानघर जे ओपन टू स्काय आहे....अप्रतिम कोरीव बांधणीची पुष्करणी, हम्पी बाजार, राजपरिवारासाठी प्रासंगिक कार्यक्रमासाठी बसण्याचे व्यासपीठ, हाथीघर आणि त्यासोबतच माहूतांच्या रहाण्याचे ठिकाण,राजाची तुला ही ठिकाणंही नोंद घेवून बघण्यासारखी आहेत...
याशिवाय मला आवडलेली आणखी एक वास्तू म्हणजे "लोटस महल"...जे इंडोईस्लामिक रचनेतून बांधलेली आहे...अत्यंत सुंदर, कलात्मक पध्दतीने आणि उन्हाळ्यात कायम थंडावा मिळेल अशा एअरकुलिंग रचनेत बांधलेली ही वास्तू आकाराने कमळाच्या फुलाशी साधर्म्य सांगते...म्हणूनच हा "लोटस महल"....
अंजनाद्री पर्वत,जेथे हनुमंताचे जन्मस्थान आहे. ...तेथे ट्रेक करत बाल हनुमानाच्या मुर्तिचे दर्शन मन प्रसन्न करते. ...उंचावरुन हम्पीचा व्ह्यू फार छान दिसतो. ..
तर अशी आमची हम्पीची सहल कायम स्मरणात राहिल अशीच पार पडली....प्राचीन इतिहासाची उजळणी होऊन हा ठेवा आम्ही डोळेभरुन बघितला, डोळ्यात साठवून ठेवला आणि कृतार्थ भावना मनात घेऊन दुसरे दिवशी सकाळी बदामीकडे प्रस्थान केले....जाताना रस्त्यात लागणाऱ्या आयहोळे आणि पट्टक्कल या ठिकाणी असणारा मंदिरांचा समुह जो बघण्यासाठी चुकून नये अजिबात,तो गाईड सह बघितला समजून घेतला आणि सायंकाळपर्यंत बदामी मुक्कामी पोहोचलो....
या नंतरच्या लेखात तेथील पहाडांमध्ये कोरलेल्या भव्य अशा शिल्पांविषयी लिहिनच....
©️ॲड.नंदिनी म. देशपांडे.
nmdabad@gmail.com
🌹🌹🌹🌹🌹