शनिवार, ६ सप्टेंबर, २०२५

काल आमच्या काही मैत्रीणींच्या गप्पा चालू होत्या,शिक्षक दिन असल्याने ओघानेच त्या विषयावर गाडी आलीच...आमच्या लहानपणीच्या आठवणींना, त्यातही शिक्षक दिनाच्या दिवशी आम्ही शाळेत केलेल्या धम्माल गमती जमती सांगताना प्रत्येकजण भरभरुन बोलत होती..
      आजच्या दिवशी,सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला नमस्कार करत, त्यांच्या प्रति आदर व्यक्त करणं,सर्व शिक्षकवृंदांना नमस्कार करत त्यांचे आशीर्वाद घेणं...त्यांच्या कौतूकाची नजर आपल्यावर पडली की, चेहरा खुलून जाणं हे सारं आठवलं...
      याच दिवशिची आणखी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आठवण म्हणजे, आम्हा विद्यार्थ्यांकडून "स्कूल डे " साजरा होत असे...
   एवढा एक दिवस आम्ही विद्यार्थी शिक्षक शिक्षिकेच्या भुमिकेत प्रत्यक्ष वावरत शाळेचा प्रत्येक विषयाचा तास वाटून घेत असू....काय मज्जा यायची! आपला तास पार पडेपर्यंत जाम टेन्शन असायचं...पण छान वाटायचं...बरंच काही शिकावयास मिळायचं, बरेच अनुभव मिळायचे आणि मुख्य म्हणजे,आमचा आत्मविश्वास वाढावयास मदत होऊन आत्मभान यायचे...आत्मसन्मान साधला जायचा...

     हे झालं आमच्या पिढीचं बालपण!खरोखरच आदर्श ठरावेत आणि आदर्शाच्या मार्गावरुन बोट धरुन चालवणारे होते त्यावेळचे बहुतांशी शिक्षक वृंद...अत्यंत साधेपणात मुर्तीमंत सात्त्विकता,विद्यार्थ्यांप्रति अत्यंत जिव्हाळा आणि प्रत्येक विद्यार्थी घडवण्यात त्यांची तळमळ त्यांच्या धाटणीचे कौशल्य या साऱ्या गोष्टी विद्यार्थ्यां साठी  अनुकरणप्रिय असायच्या...
       विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हा एक महत्त्वपूर्ण संस्कार असायचा...त्याची किंमत शब्दांत किंवा पैशात होणं अगदीच दुरापास्त होतं....शिकवणी किंवा ट्यूशन हे आज असणारे  परवलीचे शब्द अर्थशून्य होते....
       मुळातच शिक्षकीपेशाला,त्यांच्या संस्कार वर्गांना आणि विद्यादानाच्या त्यांच्या निष्ठेला कोणताही पर्यायच असू शकत नव्हता...
     शिक्षकांचे अध्यापन कौशल्य एवढ्या प्रचंड ताकदीचे होते,की त्यांच्यामुळे संबंधित शाळेचे नाव भरभराटीला यायचे...
      खरखर नतमस्तक व्हावेसे वाटते ते अशा शिक्षकांसमोर!
धन्य ते शिक्षक आणि धन्य ते विद्यार्थी  असे समजले जाणाऱ्या पिढीचे आम्ही विद्यार्थी...आम्हाला याचा सार्थ अभिमान आजही वाटतो आणि म्हणूनच आम्हा मैत्रीणींच्या गप्पांनाही कढ येत गेला या विषयावर बोलताना अगदी!

      ओघानेच आजच्या शिक्षकांचा,विद्यार्थ्यांचा आणिक शैक्षणिक पध्दतींवरही नकळतपणे प्रकाशझोत पडत गेला...आज विद्यार्थी, शिक्षक आणि तिसरा महत्वाचा घटक म्हणजे पालक हे तीनही या शैक्षणिक क्षेत्राचा अनिवार्य भाग आहेत...
       पूर्विच्या काळी पाल्याच्या कौतुकासाठी किंवा त्याच्या तक्रारी साठीच कधीतरी पालकांना शाळेत बोलावले जायचे...पण हल्ली पालकांची आर्थिक संपन्नता आजमावणे हाच एकमेव उद्देश ठेवत पाल्याच्या अगोदर पालकाची मुलाखत होते...पालक शाळेतील शिक्षकांपेक्षा शाळेचे नाव/ इतर सोयी बघून मुलाला शाळेत घालतात...अध्यापन कौशल्यावर आधारित शिक्षक निवडण्यापेक्षा 'डोनेशन' म्हणून जास्तीत जास्त 'दाम'देणारा गृहस्थ शिक्षक म्हणून नेमला जातो...
       मुल्याधिष्ठित नेमणुकी ऐवजी आणि शिक्षणा ऐवजी, गोंधळाधिष्ठित वातावरणात शाळेला सुरुवात होते...भपकेबाज पणावर गुणांपेक्षा कितीतरी भर असतो बर्‍याच शाळांचा....अगदी बोटावर मोजण्या इतपतच शाळा किंवा शिक्षकही औषधाला उरले आहेत...
       मग अशावेळी "आडातच नाही तर पोहोर्यात कसे येणार"?अशी सारी परिस्थिती दिसते...

    मुळात शिक्षकांना प्रशिक्षित करुन मुल्ये काय असतात?गुणाधिष्ठित शब्दाचा नेमका अर्थ, संस्कार आणि त्याचे सामाजिक स्थान, भाषा, व्याकरण,भाषेची शुध्दता म्हणजे काय?किंवा विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत वर्तन म्हणजे काय? शिकवावयास हव्या, तरच त्यांचे योग्य परावर्तन मुलांच्या मनावर पडेल...
     
         याचा अर्थ सरसकट असेच नाहीत असे अजिबात नाही पण यांचे प्रमाण मात्र नगण्यच असावे असे आज चित्र दिसते....शिवाय आपली संपूर्ण शिक्षण पध्दती ही "कोचिंग क्लासेस ",नामक वाळवीने पोखरुन निघाली आहेत...पैसा फेकला की कोणतीही गोष्ट अगदी सहज मिळते ही भावना वाढीस लागून शाळा ही केवळ परीक्षाकेंद्रेच आहेत की काय?असे खरे वाटणारे विदारक सत्य आहे दिसून येते.....
      आपल्या पाल्यांना (चांगले)?
शिक्षण देण्याच्या आणि भारंभार क्लासेस लावण्याच्या नादात पालक म्हणजे पैसा कमावणारी सजीव यंत्र, पाल्य म्हणजे मान हलवणारी बैलं आणि शिक्षक म्हणजे शाळेतील एक शोभेची वस्तू किंवा शिकवणे सोडून इतर भारंभार कामं कागदावर दाखवत निधी जमवणारे मशीन बनले आहे या कणभरही अतिशयोक्ती वाटू नये ही आजची शैक्षणिक पध्दतीची शोकांतिका....
   का म्हणून कोणाला आजच्या शिक्षक दिवसाचे महत्व वाटावे?
का म्हणून या दिनाचे सोहळे साजरे व्हावेत?

     एकूण या पध्दतीतील सर्व घटकांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ येऊन ठेपली आहे..
     अगदी मोजक्या म्हणता येतील अशा काही शाळा आजही आपली पत टिकवून आहेत त्यात भरपूर वाढ होणं फार गरजेचं आहेच...
     शिक्षणाचं बाजारीकरण थांबवून त्याला प्रेम वात्सल्याचं खतपाणी घालत जिव्हाळ्याची भावना 
मनापासून अर्पण करतील यातील सारे घटक तर, या क्षेत्रातील चमचमणारे तारे हे हिर्यांच्या लखलखीने तेजाळून निघतील असे नक्कीच म्हणावेसे वाटते...

शिक्षक दिन. 

©️ नंदिनी म. देशपांडे. 

🌹🌹🌹🌹🌹🌹

शिक्षकदिन

काल आमच्या काही मैत्रीणींच्या गप्पा चालू होत्या,शिक्षक दिन असल्याने ओघानेच त्या विषयावर गाडी आलीच...आमच्या लहानपणीच्या आठवणींना, त्यातही शिक्षक दिनाच्या दिवशी आम्ही शाळेत केलेल्या धम्माल गमती जमती सांगताना प्रत्येकजण भरभरुन बोलत होती..
      आजच्या दिवशी,सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला नमस्कार करत, त्यांच्या प्रति आदर व्यक्त करणं,सर्व शिक्षकवृंदांना नमस्कार करत त्यांचे आशीर्वाद घेणं...त्यांच्या कौतूकाची नजर आपल्यावर पडली की, चेहरा खुलून जाणं हे सारं आठवलं...
      याच दिवशिची आणखी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आठवण म्हणजे, आम्हा विद्यार्थ्यांकडून "स्कूल डे " साजरा होत असे...
   एवढा एक दिवस आम्ही विद्यार्थी शिक्षक शिक्षिकेच्या भुमिकेत प्रत्यक्ष वावरत शाळेचा प्रत्येक विषयाचा तास वाटून घेत असू....काय मज्जा यायची! आपला तास पार पडेपर्यंत जाम टेन्शन असायचं...पण छान वाटायचं...बरंच काही शिकावयास मिळायचं, बरेच अनुभव मिळायचे आणि मुख्य म्हणजे,आमचा आत्मविश्वास वाढावयास मदत होऊन आत्मभान यायचे...आत्मसन्मान साधला जायचा...

     हे झालं आमच्या पिढीचं बालपण!खरोखरच आदर्श ठरावेत आणि आदर्शाच्या मार्गावरुन बोट धरुन चालवणारे होते त्यावेळचे बहुतांशी शिक्षक वृंद...अत्यंत साधेपणात मुर्तीमंत सात्त्विकता,विद्यार्थ्यांप्रति अत्यंत जिव्हाळा आणि प्रत्येक विद्यार्थी घडवण्यात त्यांची तळमळ त्यांच्या धाटणीचे कौशल्य या साऱ्या गोष्टी विद्यार्थ्यां साठी  अनुकरणप्रिय असायच्या...
       विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हा एक महत्त्वपूर्ण संस्कार असायचा...त्याची किंमत शब्दांत किंवा पैशात होणं अगदीच दुरापास्त होतं....शिकवणी किंवा ट्यूशन हे आज असणारे  परवलीचे शब्द अर्थशून्य होते....
       मुळातच शिक्षकीपेशाला,त्यांच्या संस्कार वर्गांना आणि विद्यादानाच्या त्यांच्या निष्ठेला कोणताही पर्यायच असू शकत नव्हता...
     शिक्षकांचे अध्यापन कौशल्य एवढ्या प्रचंड ताकदीचे होते,की त्यांच्यामुळे संबंधित शाळेचे नाव भरभराटीला यायचे...
      खरखर नतमस्तक व्हावेसे वाटते ते अशा शिक्षकांसमोर!
धन्य ते शिक्षक आणि धन्य ते विद्यार्थी  असे समजले जाणाऱ्या पिढीचे आम्ही विद्यार्थी...आम्हाला याचा सार्थ अभिमान आजही वाटतो आणि म्हणूनच आम्हा मैत्रीणींच्या गप्पांनाही कढ येत गेला या विषयावर बोलताना अगदी!

      ओघानेच आजच्या शिक्षकांचा,विद्यार्थ्यांचा आणिक शैक्षणिक पध्दतींवरही नकळतपणे प्रकाशझोत पडत गेला...आज विद्यार्थी, शिक्षक आणि तिसरा महत्वाचा घटक म्हणजे पालक हे तीनही या शैक्षणिक क्षेत्राचा अनिवार्य भाग आहेत...
       पूर्विच्या काळी पाल्याच्या कौतुकासाठी किंवा त्याच्या तक्रारी साठीच कधीतरी पालकांना शाळेत बोलावले जायचे...पण हल्ली पालकांची आर्थिक संपन्नता आजमावणे हाच एकमेव उद्देश ठेवत पाल्याच्या अगोदर पालकाची मुलाखत होते...पालक शाळेतील शिक्षकांपेक्षा शाळेचे नाव/ इतर सोयी बघून मुलाला शाळेत घालतात...अध्यापन कौशल्यावर आधारित शिक्षक निवडण्यापेक्षा 'डोनेशन' म्हणून जास्तीत जास्त 'दाम'देणारा गृहस्थ शिक्षक म्हणून नेमला जातो...
       मुल्याधिष्ठित नेमणुकी ऐवजी आणि शिक्षणा ऐवजी, गोंधळाधिष्ठित वातावरणात शाळेला सुरुवात होते...भपकेबाज पणावर गुणांपेक्षा कितीतरी भर असतो बर्‍याच शाळांचा....अगदी बोटावर मोजण्या इतपतच शाळा किंवा शिक्षकही औषधाला उरले आहेत...
       मग अशावेळी "आडातच नाही तर पोहोर्यात कसे येणार"?अशी सारी परिस्थिती दिसते...

    मुळात शिक्षकांना प्रशिक्षित करुन मुल्ये काय असतात?गुणाधिष्ठित शब्दाचा नेमका अर्थ, संस्कार आणि त्याचे सामाजिक स्थान, भाषा, व्याकरण,भाषेची शुध्दता म्हणजे काय?किंवा विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत वर्तन म्हणजे काय? शिकवावयास हव्या, तरच त्यांचे योग्य परावर्तन मुलांच्या मनावर पडेल...
     
         याचा अर्थ सरसकट असेच नाहीत असे अजिबात नाही पण यांचे प्रमाण मात्र नगण्यच असावे असे आज चित्र दिसते....शिवाय आपली संपूर्ण शिक्षण पध्दती ही "कोचिंग क्लासेस ",नामक वाळवीने पोखरुन निघाली आहेत...पैसा फेकला की कोणतीही गोष्ट अगदी सहज मिळते ही भावना वाढीस लागून शाळा ही केवळ परीक्षाकेंद्रेच आहेत की काय?असे खरे वाटणारे विदारक सत्य आहे दिसून येते.....
      आपल्या पाल्यांना (चांगले)?
शिक्षण देण्याच्या आणि भारंभार क्लासेस लावण्याच्या नादात पालक म्हणजे पैसा कमावणारी सजीव यंत्र, पाल्य म्हणजे मान हलवणारी बैलं आणि शिक्षक म्हणजे शाळेतील एक शोभेची वस्तू किंवा शिकवणे सोडून इतर भारंभार कामं कागदावर दाखवत निधी जमवणारे मशीन बनले आहे या कणभरही अतिशयोक्ती वाटू नये ही आजची शैक्षणिक पध्दतीची शोकांतिका....
   का म्हणून कोणाला आजच्या शिक्षक दिवसाचे महत्व वाटावे?
का म्हणून या दिनाचे सोहळे साजरे व्हावेत?

     एकूण या पध्दतीतील सर्व घटकांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ येऊन ठेपली आहे..
     अगदी मोजक्या म्हणता येतील अशा काही शाळा आजही आपली पत टिकवून आहेत त्यात भरपूर वाढ होणं फार गरजेचं आहेच...
     शिक्षणाचं बाजारीकरण थांबवून त्याला प्रेम वात्सल्याचं खतपाणी घालत जिव्हाळ्याची भावना 
मनापासून अर्पण करतील यातील सारे घटक तर, या क्षेत्रातील चमचमणारे तारे हे हिर्यांच्या लखलखीने तेजाळून निघतील असे नक्कीच म्हणावेसे वाटते...

शिक्षक दिन. 

©️ नंदिनी म. देशपांडे. 

🌹🌹🌹🌹🌹🌹

गुरुवार, २८ ऑगस्ट, २०२५

हुरहूर...

हूरहूर
--------------
    2025 च्या वर्षारंभीपासूनच लागलेली मनाची हूरहूर अजूनही कमी होत नाहीए...किंबहूना ऑगस्ट च्या प्रारंभापासून ती चांगलीच उसळी घेत आहे...कारणच तसे खूप ह्रदयस्पर्शी आहे... 
     ॲड.आनंद उमरीकर, याच्या आणि आम्हा सर्वांच्या आनंदाचा हा ऑगस्ट आणि पर्यायाने श्रावण महिना...
  माझा लहान भाऊ,ॲड.आनंदच्या वाढदिवसाचा हा महिना.  गोकुळ अष्टमीच्या पूर्व सुर्योदयाला, म्हणजे सप्तमीला (1975) आम्हा तीघी बहिणींना हक्काचा भाऊ दिला होता देवाने.त्यामूळे अख्ख्या श्रावणात आम्हा बहिणींसाठी सेलीब्रेटी असायचा तो....
     आजोबांचे नाव चालवावे म्हणून मोठ्या आईने बाळाचे नाव "आनंद",ठेवावे हे सांगितले होते...त्याच्या येण्याने आमच्या घरी आनंदीआनंद झाला होता,तो सार्थ ठरवला आनंदने.
त्याच्या नवसाची सत्यअंबेची पुजा दरवर्षीच्या श्रावणातच घालायची आईने...तसेच 
  गोकुळावर फुलोरा लावायची  तो आनंदच्या रुपाने घरात बाळकृष्ण आला तेंव्हापासूनच.... आजी नागनाथाच्या रथावर याच बाळकृष्णाला आशिर्वादासाठी निशान लावायची  महाशिवरात्रीला. राखी बांधावयास छोटा भाऊ झाला म्हणून आम्ही बहिणी किती सुखावून गेलो होतो, त्या लहान वयातही....तो न चुकता बांधून घ्यायचा तीनही बहिणींची राखी ....
     राखीपौर्णिमा काय, दिवाळी काय आमच्याकडे अगदी उत्सवी वातावरण ठेवण्यात आईबाबांसह आम्हा चौघाही भावंडांचा उत्साह ओसंडून वाहायचा...
त्यातच याच श्रावण/ऑगस्ट  महिन्यात 28 तारीख  आनंदच्या वाढदिवसाची...
वीस वर्षांपूर्वि याच महिन्यात सप्तश्रृंगीचा घाट चढत असताना आनंदला झालेला हार्ट अ‍ॅटॅक...पण तिच्याच आशिर्वादाने जवळ आलेल्या 
काळाशी खंबीरपणे लढत परतवून लावले होते त्याने...
आजही अंगावर शहारे आणणारी ती आठवण...
त्यानंतर बायपास सर्जरीला 
यशस्वीपणे तोंड देत त्यातून सुखरुप बाहेर पडल्याचा आनंदी क्षणही याच श्रावणातला....
24ऑगस्ट,2005 हाच तो दिवस...
28 ऑगस्ट 2005,या दिवशी त्याला हॉस्पिटल मध्ये जाऊन आनंदाने शुभेच्छा दिल्याचा क्षण आम्ही सुवर्णाक्षरात लिहून ठेवला अगदी...
    आजही आनंदच्या वाढदिवसाचा दिवस आहे,
त्याला मनभरुन शुभेच्छा आणि आशिर्वाद देण्याचा आजचा दिवस...
    त्याच्या शिवाय आलेला त्याचा हा पहिला वाढदिवस.... तोही पण्णासावा....पण आमचा, उत्साह कोमेजून टाकणारा, उदास बनवणारा आणि आनंदच्या आठवणींत रेंगाळत ठेवणारा...
     मागच्या वर्षी वाढदिवसानिमित्त आम्हाला नमस्कार करावयास आला तेंव्हा फार खुषीत होता आनंद. 
राखीपौर्णिमेला मी दिलेल्या शर्ट पँट ची घडी तो वाढदिवसाच्या दिवशी मोडायचा आणि ते नवीन कपडे घालून नमस्कार करावयाचा...आशिर्वादाचा हात कायमच त्याच्यावर होताच आमचा...तो हार्ट पेशंट म्हणून "खाली वाकू नकोस",नमस्कार करताना ही माझी नेहमीची सुचना डावलून आम्हा उभयतांना पदस्पर्श केल्याशिवाय रहात नव्हता कधीच आनंद....त्यावेळी बहिण आणि भाऊजी म्हणून...त्याच्या आणि आमच्या चेहर्‍यावर विलसत जाणाऱ्या समाधानाचे वर्णन करावयास शब्द तोकडे पडतील खरंच...
    मागच्या वर्षी याच दिवशी म्हणाला होता,"चला पण्णाशीत तर आलो"...माझा आवाज कातर होत गेला आणि मी म्हणाले होते,अरे,नव्वदी शंभरी गाठायची आहे तुला चांगली...आत्ताच काय वर्षे मोजतोस?"
    पण त्याच्या या वाक्याने निःशब्द केले काही वेळ आम्हा तिघांनाही...काहीतरी बोलतो म्हणत माझ्या मनाने देवाजवळ तक्रार केली आणि आनंदच्या उदंड आयुष्याचं मागणं मागितलं मी देवघरातील देवांना...
कारण त्याने कधीच त्याला असणाऱ्यां ह्रदयरोगाच्या व्याधीचा साधा उल्लेख सुध्दा केला नव्हता कधीच...

    पण नीयतीपुढे कोणाचे काही चाललेय का?अगदी सहज म्हणून तो बोलला आणि नीयतीनं त्यालाच शब्दांत पकडलं असं वाटतंय आज राहून राहून...
    कायमचं घर करुन मनात बसलेली हुरहूर व्यक्त होऊन काहीशी विरळ होईल का?असा एक बालीश प्रश्न शिवला मनाला आणि व्यक्त झाले...
    चि.आनंद तू लहान म्हणून नेहमीच तुला चिरंजीव हे विशेषण लावायची मी...
तू  "चिरंजीव" आहेसच नेहमीच..तुझ्या सर्व नातेवाईकांमध्ये, तू जोडलेल्या स्नेही जनांच्या मनातील आठवणीतून, तुझ्या कर्तृत्वातून,तुझ्यात व्यावसायिक कौशल्ल्यातून, तू केलेल्या धाडसी प्रवासवर्णनातून, तुझी जीद्द, आणि सकात्मकतेतून आणि तुझ्या मनावर कायम राज्य करणाऱ्या वास्तवाचे भान ठेवणाऱ्या तुझ्याच निर्णयातून...एवढेच नव्हे तर थोड्याशाच मिळालेल्या या आयुष्यात वारंवार काळाशी जिद्दीने लढत दोन हात केलेल्या कठिण प्रसंगांच्या स्मरण क्षणांतून....
    जिथे कुठे असशील तेथे सुखात रहाशील...आम्हा सर्वांकडे लक्ष ठेवून असशील आणि मुलांवर कायमच आशिर्वादाचा हात ठेवून असशील ही खात्री आहे आम्हाला...
   तुझे स्मरण नेहमीच चीरंतन,चिरंजीव असणार आहेच....आणि आठवणींतून
तू कायमच आमची साथ करणार आहेस...
तुझ्या पवित्र स्मृतींना त्रिवार अभिवादन...🙏🏻🙏🏻🙏🏻

तुझीच, 
ताई.
(ॲड.नंदिनी देशपांडे)

🌹🌹🌹🌹🌹

रविवार, १० ऑगस्ट, २०२५

स्मृतीरुपी रक्षाबंधन.

बहिणभावाचं नातं 
ह्रदयस्थ,निःस्वार्थ,निर्व्याज 
परस्परांचा आधारस्तंभ 

बहिणभावाचं नातं 
प्रेमळ  मायेने ओतप्रोत 
शब्दावीना संवाद साधणारं 

बहिणभावाचं नातं 
एक गोड माहेरपण 
बाल्य जपणारं 
अधिकार गाजवणारं 

बहिणभावाचं नातं 
मनाच्या कोंदणातील 
हळवा एक कप्पा 
निरोपाच्या वेळी 
ओलावणारं कडा 

आज मुर्त रुपात 
नसशीलही तू
पण मनात कायम 
वसलेला आहेस तू

माहितीए मला 
गोड आठवणींना 
झोके देत 
प्रसन्न मुद्रेने बघतो आहेस 
आपल्या बहिणींकडे 

तुझ्या मनगटी पोहोंचण्या 
राखी 
माध्यम आहे ईश्वरी श्रध्दा

बांधेन राखी मी देवाला 
तुझ्या पर्यंत पोहोंचली 
समजेल मला...

असशील तेथे 
रहा सुखी 
आशिर्वाद कायम आहेत 
तुझ्या पाठी. 

नंदिनी देशपांडे. 

राखी पौर्णिमा,2025.

🌹🌹🌹🌹🌹

शनिवार, २ ऑगस्ट, २०२५

रसग्रहण, डाव मांडून भांडून मोडू नको.

डाव मांडून भांडून
मोडू नको

आणले मी तुझे सर्व मी आणले
सर्व काही मनासारखे मांडले
तूच सारे तुझे दूर
ओढू नको

सोडले मी तुझ्या भोवती सर्व गे
चंद्रज्योती रसाचे
रुपेरी फुगे
फुंकणीने फुगा हाय
फोडू नको

गोकुळीचा सखा तूच केले मला
कौतुकाने मला हार
तू घातला
हार हासून घालून
तोडू नको

काढले मी तुझे नाव
तू देखिले
आणि माझे पुढे नाव
तू रेखिले
तूच वाचून लाजून खोडू नको

#आठवणीतील कविता#

    किती किती विनवणी आहे या शब्दांमध्ये!किती आर्जवं आहेत...एका पतीनं आपल्या संसार मोडावयास निघणाऱ्या पत्नीसाठी....
या गीतातील शब्दा शब्दांमधून या गीतातील नायकाचा (पतीचा)सच्चेपणा जाणवत जातो...
   
    दोघांनी मिळून आनंदानं थाटलेल्या संसारातून त्याची पत्नी,निघून जाण्याचं ठरवते....संसाराचा डाव मोडू बघते,त्या वेळी हा पती आपल्या पत्नीला त्या सुरुवातीच्या साऱ्या आनंदमय गोष्टींची मुद्दाम आठवण करुन देत असतो....

पती तिला एक एक आठवण सांगताना म्हणतो,संसारातली प्रत्येक वस्तू,तुझ्याच पसंतीनं मी आणलेल्या आहेत...त्या साऱ्यांना घेऊन आपण संसार मांडलाय आणि हे सारं तुझंच असताना तू दूर करु नकोस...

प्रिये,तुला मी सारी सुखं उपलब्ध करुन दिली आहेत...
ह्या सुखांना कवींनी दिवाळीत उडवल्या जाणाऱ्या चमकत्या फुग्यांची (झाड) उपमा दिली आहे....पण हे सारं तूच तुझ्या हातानं उध्वस्त करु नकोस...

आपण दोघांनी मिळून उभं केलेल्या गोकुळाचा
(संसार)सखा,सोबती तूच मला कौतुकानं बनवले आहेस,माझ्या गळ्यात वरमाला घालत तू माझी निवड कौतुकानं केली आहेस आणि आता तोच हार (संसार)सोडून तू अशी जाऊ नकोस...

आपल्या लग्नात मीच तुझे नाव देवापुढे लिहून तुला माझी अर्धांगिनी बनवले आहे...तू पण तुझ्या नावापुढे माझे नाव लावत, मला तुझा पती म्हणून स्विकारले आहेस,ते वाचताना तू लाजतही होतीस आणि तेच माझे नाव असे पुसून टाकून जाऊ नकोस....असा मांडलेला संसार भाझ्याशी भांडून तोडू नकोस....

गर्भितार्थानं किती आशयघन असं हे गाणं आहे... लहानपणापासून रेडिओ वर लागलेलं कानावर पडणारं हे गाणं मला त्यातील अर्थही कळत नव्हता पण तरीही आवडायचं...सूर, ताल,लय साऱ्याच बाबतीत सरस असणारं म्हणूनही असेल कदाचित...पण नंतर त्यातला अर्थ समजत गेला आणि हे तर तसं बघितलं तर,मनाला क्लेश करणारं गाणं आहे हे लक्षात आलं...
      या गाण्याचे गीतकार कवी ना.घ. देशपांडे....यांच्याच गावी,मेहकरला वास्तव्याचा योग आला आणि मग त्यांची रचलेली सारीच गाणी आवडू लागली....

नागोराव घनःश्याम देशपांडे.ना.घ.देशपांडे या नावानं मराठी माणसाला परिचित आहेत...
आपलं,एल.एल.बी.
करुन त्यांनी नंतर 'वकिली' व्यवसाय म्हणून स्विकारला...पण बी ए.चं शिक्षण चालू असताना त्यांनी,
"शिळ"ही त्यांची पहिली कविता लिहिली...त्यांच्याच वर्गमित्राने ती गायली आणि ती लोकांमध्ये अतिशय प्रसिध्द झाली...अगदी कविता वाचनाचे कार्यक्रम होऊ लागले...नंतर ती ध्वनिमुद्रित केली गेली आणि येथूनच मराठी मध्ये भावगीतांची परंपरा सुरू होत नावारुपाला आली....
या अर्थानं कवी ना.घ.देशपांडे भावगीतांचे जनक ठरले असे म्हणता येईल...

नंतरच्या काळात त्यांच्या हातून बरंच मोठं काव्यलेखन होत अनेक कविता संग्रह प्रकाशित झाले...ललित लेखनही झालं...
त्यांच्या खूणगाठ या काव्यसंग्रहास ')साहित्य अकादमी' पुरस्कार मिळाला....

साहित्यिक कारकिर्दी शिवाय त्यांनी ईतरही अनेक क्षेत्रात आपले महत्वाचे योगदान दिले आहे....
१९०९मध्ये जन्मलेल्या या कलासक्त व्यक्तिमत्वाचं २०००साली निधन झालं....पण त्यांच्या कवीता,गीतं,त्यांनी स्थापन केलेली शिक्षण संस्था वगैरे अनेक गोषटींमधून ते कायम आठवणीत राहिले आहेत...
अंतरीच्या गुढ गर्भि,
शीळ, मन पिसाट माझे अशी अनेक गाणी आजही प्रसिद्ध आहेत...
बाबुजींनी गायलेली ना घं ची गाणी तर अप्रतीमच!
त्यांपैकीच एक हे काव्य जे नंतर गाण्यात रुपांतरीत झालं....
डाव मांडून भांडून मोडू नको
डाव मोडू नको
डाव मोडू नको.

काव्य वाचा आणि गीतही ऐकाच...

©️नंदिनी म. देशपांडे.

🌹🌹🌹🌹🌹🌹

https://youtu.be/wgdacZ9fd98

शुक्रवार, १ ऑगस्ट, २०२५

रसग्रहण, "हे विश्व प्रेमीकांचे "

#आठवणीतील कविता# 

हे विश्व प्रेमिकांचे!
                    कवयित्री-     शांता शेळके. 

रसग्रहण. 

शांताबाईंची ही कविता,म्हणावी तर,प्रेम कविता किंवा त्या पेक्षा व्यापक अर्थानं सांगायचं झाल्यास,ही प्रेमाचा खरा अर्थ उकलून सांगणारी,प्रेमिकांमधील प्रगल्भ प्रेमाची व्याख्या करणारी कविता...
खरं प्रेम कसं असावं?त्याची महती काय आहे हे शिकवणारी ही कविता....

आधुनिक काळात आजूबाजूला दिसणाऱ्या, प्रियकर आणि प्रेयसीच्या किंवा नवरा बायकोच्या प्रेमातील उथळपणा,गांभिर्याचा अभाव किंवा परस्परांशी समरस न होता स्वार्थ साधण्याची प्रवृत्ती यांवर लगाम घालण्याच्या दृष्टीने खरे प्रेम कसे असते?त्याची महती काय आहे?
याची जाणीव करुन देणारी ही कविता!

   दोन खऱ्या प्रेमिकांची आयुष्य ही दोन वेगळी माणसं असूनही ती, मनानं एकमेकांच्या खूप
जवळ असतात... हे दोन्ही निराळी नसतातच कधी...
ही दोघं जवळ असतात तेंव्हा न बोलताही, शब्दांशिवाय त्यांना परस्परांची मनं वाचत असतात...त्यांना बोलण्याचं कामही पडत नाही....मनाची भाषा मनाला नि डोळ्यांची डोळ्यांना कळते....
एवढे ते मानसिक पातळीवर एकरुप असतात...
परस्परांच्या विरहातही ते सुखी असतात प्रेम करणारी ही दोन माणसं
मुळी वेगळी नसतातच...

माणूस म्हटला की राग लोभ आलाच,पण प्रेमाच्या या विश्वात,रागाला थारा नसतो... वरकरणी दिसणारा राग हा लटका खोटा किंवा लाडिक म्हणता येईल असाच असतो...तो काही क्षणातच विरुन जातो....

ह्या दोन्ही प्रेमिकांना एकमेकांचे भारी कौतूक असते...ते अखंड परस्परांच्या प्रेमात असतात....

प्रेमी युगुल दूर असतील एकमेकांपासून तरीही त्यांच्यात अजिबात दुरावा नसतोच...दूर असूनही परस्परांच्या आठवणींनीसुध्दा ते मोहरुन जातात...हाही एक प्रेमाचा आविष्कार होय!

आपण एकमेकांवर करत असणाऱ्या प्रेमाची खोली त्यांनी जाणलेली असते...
तो आणि ती वेगळी नाहीतच याची होणारी जाणीव त्यांच्या मनाला तृप्त करुन जाते आणि आपले आयुष्य परस्परांच्या सहवासात सार्थकी लागले, याचा बोध त्यांना होतो....
 
खऱ्या प्रेमी युगुलांचे विश्व हे असे जगावेगळे असते...
हिच खऱ्या प्रेमिकांची ओळख आहे...

अगदी साध्या सोप्या शब्दांत प्रेमाची महती सांगणारी ही कविता मनाला भावते...वाचकाला आपल्या प्रेमाचं प्रतिबिंब दाखवते....
मनाने एकरुपकत्व साधणारं प्रेम वासनेला प्राधान्य न देता परस्परांच्या भावभावनांचा आदर करतं...परस्परांचा सन्मान करतं आणि एकमेकांना समजून घेत जीवन व्यतित करतं....
जणू काही शांताबाईंनी प्रेम हे अशा पध्दतीनं केलेलं असावं तरच ते अर्थपूर्ण ठरेल हे सांगण्यासाठीचा हा  दिलेला मंत्रच!

अतिशय प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व असणाऱ्या शांताबाई म्हणजे मराठी साहित्याचं एक लेणं आहेत....
कथा,कादंबरी, कविता, चरित्र लेखन,वृत्तपत्रातून लेखन असे सारे साहित्य प्रकार हाताळणाऱ्या त्या एक चतुरस्त्र लेखिका होत्या...
अतिशय सुंदर गीत  रचनांच्याही त्या उद्गात्या आहेत... तोच चंद्र मा नभात,रेशमाच्या रेघांनी,जे वेड मजला लागले,मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश ही कांही उदाहरणे सांगता येतील...
मराठी साहित्यातील विविध पुरस्कारांच्या या मानकरी...
अशा या थोर साहित्यिक  व्यक्तिमत्वाला विनम्र अभिवादन.🙏🏻

नंदिनी म. देशपांडे. 
🌹🌹🌹🌹🌹🌹

कविता. 

असता समीप दोघे
हे ओठ मूक व्हावे
शब्दाविना परंतु
बोलून सर्व जावे

अमृत मीलनाचे विरहातही सुखावे
विश्वाहूनी निराळे
हे विश्व प्रेमिकांचे ।

फसवा वरुन राग
रुसव्यात गाढ प्रिती
होता क्षणिक दूर
वेडी मनात भिती

दिनरात चिंतनाचे अनिवार कौतुकाचे
विश्वाहूनी निराळे
हे विश्व प्रेमिकांचे

दुरातही नसावा दोघांमध्ये दुरावा
स्पर्शाविना सुखाने
हा जीव मोहरावा

ओठी फुलून यावे
स्मित गोड सार्थकाचे
विश्वाहूनी निराळे
हे विश्व प्रेमिकांचे!

शांता शेळके.

🌹

बुधवार, ३० जुलै, २०२५

कवितेचं रसग्रहण. "कढ"

#आठवणीतील कविता#
या शृंखलेतली पाचवी कविता, 

 ‌.    "कढ"

सुप्रसिद्ध कवियित्री,
इंदिरा संत (१९१४-२०००)यांची,
"कढ"
ही कविता आज आणली आहे वाचकांसाठी....

    "कढ", म्हणजे ऊकळी.हा झाला बोली भाषेतील शब्दशः अर्थ....पण कवियित्री इंदिरा संतांना,आपल्याला जाणवत असलेलं एकटेपण नकोसं वाटण्या ईतपत असह्य झालं असावं, म्हणूनच या त्यांच्या एकटेपणाच्या दुःखावेगात ही त्यांची कविता रचली गेली असावी....
     ह्या एकटेपणाला   अगदी कढ येईपर्यंत,तो उतू जाई पर्यंत असह्य होत,मन उद्विग्न झालं आहे हेच त्यांना आपल्या,"कढ"
या कवितेत सुचवायचे असावे...

कवियित्री म्हणतात,
माझी कुणीही निंदा केली,मला नावं ठेवली तरी,मी मात्र त्याला नेहमीच नमस्कारच केला आहे...त्याचे आदरातिथ्यच केले....कुणी आपल्या वागण्यातून माझ्याशी कितीही दुरावा निर्माण केला असेल तरी मी मात्र ते सारं विसरुन त्याचा नेहमी प्रमाणेच
सन्मानच केला आहे...

कोणीही माझ्याशी कसेही वागत गेले तरीही मी मात्र त्यांच्याशी कायम चांगलेच वागावयास हवे
माझा मान सन्मान,माझी अस्मिता,मीपण हे सारं सारं बाजूला सारुन....
कायम दुसऱ्यांकडून मी स्वतः गृहितच धरली जाते...माझ्या अस्मितेची दखल इतरांनी तर नाहीच पण मीही घेऊ नये कारण मीच साऱ्यांची मनं जपावित नेहमीच...

खरं म्हणजे,मी माझ्या आयुष्यात कितीतरी जणांची अन्नाची भूक माझ्या घासातला घास त्यांना देत भागवली आहे...कितीतरी लोकांचं दुःख जाणलंयं त्याना आधार दिलाय,त्यांचे अश्रु पुसले आहेत....

पण माझ्या मनात आज दुःखावेगाचा कढ आलाय अगदी,मला ते सहन होत नाहीए...पण माझं मन,माझं दुःख बोलून हलकं करण्यासाठी,माझे अश्रु पुसण्यासाठी मात्र माझ्याजवळ कोणीही नाही,एक तेवढे आभाळ सोडले तर...आणि मनात दाटून आलेला कढ,हे शल्य जाणून घेण्यासाठी मला साथ आहे ती केवळ या अंधाराची... म्हणूनच हा अंधार सुध्दा कवियित्रींना प्रेमळ वाटतोय...

माणसाला आपण इतरांकडून गृहित धरत जात आहोत ही होणारी जाणीव फार क्लेशदायक असते...त्यात आपलं अस्तित्व अगदीच नगण्य होत चाललंय अशी भावना निर्माण होत जाते...यातूनच एकटेपणाही वाढत जतो...नकोसा होण्याईतपतचा एकटेपणा आपोआप बाहेर व्यक्त होऊ लागतो...त्यालाच आपण कढ आलाय अगदी असं म्हणतो...
प्रत्येकाच्या आयुष्यात अशी परिस्थिती उद्भवू शकते म्हणूनच कोणाजवळ तरी 'व्यक्त'
होणं याला अर्थ प्राप्त झालाय असं म्हणावसं वाटतं...

इंदिरा संतांच्या अनेक कविता स्वानुभवाच्या दुःखावेगातून निर्माण झाल्या त्यातलीच ही एक...

प्रामुख्यानं काव्य आणि कथा लेखन करणाऱ्या या कवियित्रिचं मराठी साहित्य क्षेत्रात स्वतःच असं एक मानाचं स्थान आहे....पती नारायण संतही कवी मनाचेच!दोघांचाही एकत्रित असा,"सहवास नावाचा कविता संग्रह प्रसिद्ध झाला आणि तेंव्हापासून इंदिरा संत वाचकांच्या परिचयात आल्या....
आपली साहित्यिक कारकिर्द घडवताना त्यांनी अनेक काव्यसंग्रह आणि ललित कथा संग्रह लिहिले...अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी ठरल्या....
 त्यांची आम्ही लहानपणी शिकलेली बालकविता,
"रंगरंगुल्या सानुसानुल्या
गवत फुला रे गवतफुला"
ही आजही मनात गुणगुणून जाते...
एक थोर कवियात्री म्हणून नावलौकिक मिळवलेल्या या विदुषीला विनम्र अभिवादन....🙏🏻

आज या निमित्ताने मला सांगावयास हे आवडेल की,इंदिरा संतांची नात,मुलाची मुलगी आमच्या कुटुंब सदस्यांपैकी एक आहे....याचा आम्हा सर्वांना मनस्वी आनंद होत असतो नेहमीच...

©️नंदिनी म.देशपांडे.
संवाद.९४२२४१६९९५.

🌹🌹🌹🌹🌹